सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ संस्कृतीचा ऱ्हास — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज राखी पौर्णिमा !भाऊ नी बहिणीचे नाते दृढ करण्याचा दिवस !रेशीम धागा बांधूनही वज्राहून कठीण, बंध तुटता तुटणार नाही असे मनाने मनाशी बद्ध होण्याचा क्षण !! भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे जाते. हातावर रेशीम रेशमी राखी बांधते ••••आणि औक्षण करून भावासाठी दीर्घायु प्रार्थना करते ••••ही पारंपारिकता••• हे संस्कार •••मन मोहरून येते!! किती आनंद वाटतो हे सांगायला नकोच••••

आपले हे संस्कार  पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे ••• हे पण आपल्यावर झालेले संस्कार ! मग विचार आला ••• हे सगळे आपल्या पिढीपर्यंत ठीक होते ••• पण आजच्या युगात एक अपत्य असणार आहे. मग त्यांना बहिण भावाचे नाते कसे कळणार ?

त्यातल्या त्यात  ही पिढी सुद्धा बरीच म्हणावी लागेल. कारण आपल्याला बहिण-भाऊ असल्याने मुलांना  काका, मामा, मावशी, आत्या, ही नाती आहेत; त्यामुळे चुलत, मामे, मावस, आते बहीण किंवा भाऊ पण आहेत. त्यामुळे आताची ही पिढी  याच बहिण-भावां समवेत रक्षाबंधन करू शकत आहे ; पण पुढे काय? या पिढी नंतरची पिढी ••• म्हणजे या एकुलत्या एक अपत्याला, एकुलते एक अपत्य. मग त्यांना तर काका, मामा, मावशी, आत्या असणारच नाही. पर्यायाने असे बहिण-भाऊ पण असणार नाहीत. मग आपली ही गोड पारंपारिकता, आपली इतकी चांगली संस्कृती, पुढे जाणार कशी?

काळाची हीच पावले ओळखून त्या दृष्टीने आपण काही गोष्टी का अनुसरू नयेत  ? स्वतंत्र भारतापासून आपण नेहमी प्रतिज्ञेत म्हणतो ;सारे भारतीय माझे बांधव आहेत••• मग हे वाक्य फक्त प्रतिज्ञा पुरते न मर्यादित ठेवता ;खुल्या मनाने आपणच काही नाती निर्माण केली पाहिजेत. अलीकडे बऱ्याच जणी जवानांना राखी पाठवून सैनिक हे देशाचे, पर्यायाने आपलेही रक्षण करतात; म्हणून ते भाऊ झाले, या भावनेतून त्यांच्याशी बहिण-भावाचे नाते दृढ करू पाहतात. किती उत्तम उदात्त विचार आहे पण यातून खंत वाटते आपण ज्यांना राखी पाठवतो तो भाऊ कोण आहे हेच आपल्याला कळत नाही जीवन भरात एकदा का होईना पण आपण पाठवलेला  राखी भाऊ आपण पहावे हे येथेच ना मनात पण मग जेव्हा कोणी कोणताही जवान दिसेल तोच आपला भाऊ मानायचे आणि उगीच मनाचे समाधान करून घ्यायचे. यातून खरेच हेतू साध्य होतो का ?जरी हेतू साध्य नसेल होत तरी भावनिक बंध निश्चित निर्माण होतात •••

पण मग यातूनच हा क्षण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, जातीयवाद धर्मवाद सगळे बाजूला सारून, अशी नाती आपणच निर्माण करायला पाहिजेत. असे वाटते. आपण आपल्या आजूबाजूची, परिचयाची, वेगळ्या धर्मातील, वेगळ्या जातीतील, व्यक्तीला बहिण भाऊ मानून, त्यांच्याशी असे नाते प्रस्थापित केले पाहिजे. म्हणजे मग हाच आदर्श आपली पुढची पिढी जे एकुलते एक आहेत ते डोळ्यापुढे ठेवतील.

; आणि नकळत त्यांचे एकटेपण दूर होण्यास मदत होईल. रक्ताच्या नात्या पेक्षा ही मानलेली नाती जास्त महत्त्वाची असतात.

नुसतेच वेगवेगळ्या जाती-धर्माचे बांधव करणे गरजेचे नाही तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांगगृहे येथील काही जणांना अगदी व्रत घेतल्यासारखे तेथे जाऊन हा दिवस साजरा केला ;तर त्यांना सुद्धा आपले कोणी आहे, हा विश्वास, जो त्यांना मिळणे अत्यंत गरजेचे असते ; तो विश्वास ते नाते आपण दृढ केले पाहिजे.

खरंच असे रक्षाबंधन मनापासून प्रसिद्धीसाठी नव्हे जर आपण सुरू केले तर खऱ्या अर्थाने हा आदर्श आपण नव्या पिढीपुढे स्थापन करू शकू ;आणि एवढी गोड परंपरा, एवढी चांगली संस्कृती हिचा र्‍हाद न  होता ती वेगळ्या प्रगल्भ अर्थाने वृद्धिंगत होईल ••••आणि खरोखरच आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनाच म्हणावे वाटेल••••एक सोडून बाकी साऱ्या बंधू-भगिनींनो••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted