श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

(स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.) 

इथून पुढे – – 

जीवनात मोठी मजल मारली होती. हा अनुभव शब्दबद्ध करण्याची उर्मी दाटून आली मनात. त्यानुसार जुळवाजुळव करीत पुस्तक प्रकाशित केलेही. लाखो शब्दांची कहाणी हजारो शब्दांत आणताना कसरत करावी लागली. तोवर विविध ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देण्याची संधी मिळत होती… नाव होत होते. स्वत;चे घर झाले होते. एकूणच आयुष्य आता सुखात जाईल, अशी चिन्हे होती. पण पत्नीच्या गंभीर आजारात मोठी रक्कम खर्ची पडली… तिचे हाल बघवत नसतानाही आशा न सोडता उपचार सुरु ठेवले होते. पुस्तकाला प्रतिसाद तर उत्तमच लाभला. पण मध्येच कोरोना महामारी उपटली. घरातील सर्वच या कचाट्यात सापडले. यातून आर्थिक नाकाबंदी होत गेली. इंग्रजी पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करून देण्यात मदत करेन, पुस्तकाचे प्रमोशन करेन असं सांगत एक महिला संपर्कात आली. आधी फोनवर होणा-या संभाषणातून चर्चेची गाडी प्रत्यक्ष भेटण्यावर आली. माझा नवरा आणि मी येते असे म्हणाली. आपल्या छोट्याशा मोटारीतून जाऊन साहेब त्या महिलेला भेटले. काही कारणांनी नवा-याला येणे जमले नाही… म्हणून ती महिला एकटीच आली होती. सर्वसामान्य सभ्य महिलांचा पोशाख अंगावर, उत्तम संभाषण कौशल्य तिच्याकडे होतेच. जुजबी चर्चा झाल्यावर नंतर भेटू असे ठरत असतानाच त्या महिलेने आणखी चर्चा करण्यासाठी एखाद्या हॉटेलात बसू असे सुचवले. इथे शंका आली. नम्र नकार देत साहेबांनी त्या महिलेला मोटारीतून दिल्लीतल्या एका पोलिस स्टेशनसमोरच सोडले. तिला तिथेच जवळपास काही काम होते, असे तिने सांगितले होते म्हणून. हा प्रवास केवळ सुमारे पंचवीस मिनिटांचा होता. साहेब घरी पोहोचले आणि त्यांना त्या पोलिस स्टेशनमधून फोन आला… एका महिलेने बलात्काराची फिर्याद गुदरली आहे… त्वरीत या.. अन्यथा हातकड्या घालून घेऊन येऊ! पलीकडून पोलिसी खाक्या बोलला. महिलेचे नाव विचारले तर भलतेच नाव सांगितले गेले. साहेब थेट पोलिस स्टेशनात धडकले. ती महिलाही तिथे होती… जी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्यांना मदत करणार होती. “यांनी मला पेयातून गुंगीचे औषध पाजून माझ्यावर चालत्या मोटारीत लैंगिक अत्याचार केले… अशी फिर्याद होती. मामला अत्यंत गंभीर होता. अटक… बदनामी… खटला… आणि तुरुंगवास ठरलेला होता. अचानक बॉम्ब पडल्यावर कानठळ्या बसतातच… कारण कानांवर हात ठेवायला फुरसत मिळत नाही. इथेही असेच झाले. ती महिला मोटारीत बसली असताना जवळजवळ वीस मिनिटे दुस-या फोनवरून कुणाला तरी मेसेज करीत असल्याचे साहेबांनी पाहिले होते… त्यांच्या लक्षात हा डाव यायला वेळ लागला नाही. तेवढ्यात साहेबांच्या मुलाचा फोन आला… त्याला मेसेज गेला होता… तुझ्या वडिलांनी गुन्हा केला आहे!

पोलिसांनी त्या महिलेचीही चौकशी चालवली होती. पण सामान्य प्रश्नाला ती भलतीच उत्तरे देत होती… तपासात सहकार्य करायला राजी नव्हती. नशिबाने पोलिसांनी साहेबांविरुद्ध अटक करण्याची जरुरी नसलेले warrant जारी केले आणि खटल्याला सामोरे जाण्याची सुचना केली. पोलिसांना साहेबांचा काही दोष असल्याचे दिसत नव्हते. पंचवीस मिनिटांच्या मोटार प्रवासात महिलेला गुंगी आणणारे पेय देणे, तिला गुंगी येणे, छोट्या मोटारीच्या आसनावर तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करणे आणि तिला भरवस्ती असलेल्या रस्त्याने आणि त्यात डिसेंबर न्यू इअरसाठी लावलेल्या पोलिसी बंदोबस्ताच्या नाकाबंदीमधून आणून पोलिस स्टेशन समोर उतरवणे… आणि मग त्या महिलेने काही वेळाने त्याच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराची तक्रार नोंदवणे… आणि या लेखी तक्रारीच्या अर्जावरचे अक्षर सुबक, नीटस आणि अगदी तपशीलवर वर्णन करणारे होते… जणू काही हा अर्ज आधीच तयार करून ठेवलेला होता… गोष्टी काही जुळत नव्हत्या.

साहेब घरी आले. पत्नीला, मुलाला परिस्थिती सांगितली. मित्रांशी चर्चा केली. तेवढ्यात त्या महिलेच्या तथाकथित वकिलाचा फोन आला… ले दे के बात को रफा-दफा कर सकते हैं! ‘वकील’ महाशय बोलत होते. अर्थातच कर नाही त्याला डर नाही… या उक्तीने साहेबांनी त्याला नकार दिला. काही मित्रांनी, पोलिसांतल्या काही मार्गदर्शक लोकांनी ‘तात्पुरते फरार व्हा… मग पुढे पाहू’ असा सल्ला दिला… जो साहेबांनी लगेच धुडकावून लावला. जामिनासाठी अर्जही केला नाही. आणि पोलिसांनीही ना-अटक वारंट बजावल्याने अटकेची वेळ आली नाही.

पुढे खटला खालच्या न्यायालयात चालला. महिलांच्या बाजूचे असलेले काही कायदे या महिलेच्या बाजूने वागले. कायद्यांचा गैरफायदा घेतला जाऊ लागल्यावर कायदेही हतबुद्ध होतात! इथे साहेबांच्या विरोधात निकाल गेला… पण वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा मिळाली!

तोवर मिडीया, लोकांत, नातेवाईक मंडळीत चर्चा तर झालीच होती. धूर आहे म्हणजे आग असणारच की… अशी घिसी-पिटी कहाणी इकडे तिकडे फिरली. साहेब नोकरी करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आता तुमच्या सेवेची गरज नाही, असे कळवले. प्रश्न केवळ पैशांचा नव्हता.. इभ्रतीचा होता!

पण फौजी साहेब गप्प बसणा-यातले नव्हते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनेही समांतर तपास केला. लष्करी सेवेत असताना त्यांनी गुप्त माहिती विभागातही सेवा बजावली होतीच. संगणक प्रणाली वापरण्याचेही ज्ञान तोवर मिळवले होते. त्यांनी त्या महिलेची इत्यंभूत माहिती मिळवली. पैसे द्या… सर्व मिटवून टाकू म्हणाना-या त्या महिलेने अशा प्रकारचे सात-आठ खटले विविध प्रौढ व्यक्तींवर दाखल केल्याचे दिसून आले. संबधित पोलिसांनी प्रोटोकौल न पाळता घाईघाईने गुन्हे दाखल केल्याचेही दिसले. साहेबांनी सर्व माहिती गोळा केली. काही लोक बदनामीच्या भीतीने पैसे देऊन गप्प बसलेले होते. साहेबांनी दिल्लीतील एका स्वयंसेवी कायदा साहाय्य सेवेची मदत घेतली. एकम न्याय फौंडेशन नावाची ही संस्था असून दीपिका नारायण भारद्वाज नावाची तरुणी हे सेवाभावी काम करते. तोवर या महिलेच्या माध्यमातून साहेबांना ४७ वेळा फोन केले गेले… पैसे मागितले गेले… साहेबांच्या वकिलांना त्या महिलेचा वकील भेटायला आणि प्रकरण मिटवण्याचे बोलणे करूनही गेला होता! साहेबांच्या वकिलाने त्या वकिलाचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवण्याची युक्ती मात्र वापरली, त्याचा फायदा झाला.

सुप्रीम कोर्ट मध्ये advocate अश्विनी कुमार दुबे साहेबांनी ‘आरोपी’ची बाजू मांडली. आरोपी आणि गुन्हेगार हे दोन वेगळे शब्द असतात. ज्याच्यावर आरोप केला गेलेला आहे तो गुन्हेगार असतोच असं नसतं. कायद्यांतील पळवाटा शोधून निष्पाप लोकांना अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणे ही सुद्धा एक प्रवृत्ती बनत चालली आहे, अशी शंका वाटते.

एका सेवानिवृत्त सैनिक अधिका-याच्या वाट्याला आलेले, २०२२ मध्ये सुरु झालेले हे दुष्टचक्र २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टच्या सकारात्मक निकालाने संपले… आणि भारतीय सेनेसाठी जीवाची बाजी लावून आलेला एक सैनिक अधिकारी जीवनाच्या या मोठ्या युद्धात विजयी ठरला… एकम न्याय संस्था, श्रीमती दीपिका नारायण भारद्वाज, वकील अश्विनीकुमार दुबे साहेब यांचे आभार मानताना आपले कथानायक शूरवीर कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) यांचेही त्यांच्या never say die वृत्तीबद्दल अभिनंदन झालेच पाहिजे. त्यांनी सेवा बजावली त्या गोरखा पलटणमध्ये ‘‘कायर हुनु भांडा मरनु रमरो’ म्हणजे ‘ भिऊन जगण्यापेक्षा लढून मरणाला कवटाळणे उत्तम’ असं म्हटलं जातं… कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) न भिता लढले… आणि जिंकले! त्यांनी स्वत: पस्तीस मिनिटे न्यायसनाच्या डोळ्यांना डोळा भिडवून नीडर युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली, हे विशेष! सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने वालिया साहेबांची निर्दोष मुक्तता केली आहे.

एकम न्याय कॉन्फरन्स संस्थेने वालिया साहेबांना ‘आयर्न स्पाईन ‘ (अर्थात पोलादी कणा असलेला माणूस). या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

जय हिंद… जय हिंद की सेना.

– समाप्त –

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments