राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ राघवची व्यथा… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆
प्रवाश्यांचा प्रवास सुखकर, आरामशीर करणाऱ्या सगळ्या अडचणींना तोंड देत हंसतमुखाने, जबाबदारीने सामोरं जाणाऱ्या राघवची, वाहनचालकाची ही कथा आणि व्यथा आहे.
जागरणामुळे तांबारलेले डोळे, कमालीचा थकवा आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या शरीराला सांभाळत राघव घरात शिरला सीता काळजीने पुढे येत म्हणाली, “अहो काय झालं? तब्येत बरी नाही का?
“हे बघ सीता आधी अंथरूण घाल मला शांतपणे झोपू दे आणि हो! आईने शिवलेल्या गोधडीची मला आता खूप आवश्यकता आहे “स्वारी दमली आहे हे समजून तिने सासूबाईंची गोधडी त्याच्या अंगावर घातली.
आणि मग आईच्या मायेच्या, गोधडीच्या उबेत तो शांत शांत झोपला. डे ड्युटी, नाईटड्युटी करून सतत वाहन चालवताना राघवच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, आई बाबांना गावाकडे औषध पाण्याला दरमहा पैसे पाठवायचेत. त्यांना सुखात ठेवायचं आहे. मुलांना शिकवायचय आणि काटकसरीने संसार करणाऱ्या बायकोसाठी सोन्याचं साधसं मंगळसूत्र आणायचेय. तिच्या डौलदार मानेवर एखादं गंठण किती शोभून दिसेल नाही का! दर वेळी काळे मणी ओऊन ती अगदी साध्या वाट्यांचं मंगळसूत्र वापरते.
विचार करताकरता तो झोपेच्या अधीन झाला पुरेशी झोप झाल्यावर उठला. नित्यनेमानी डायरी लिहिण्यासाठी पुढे सरसावला. मनातलं शब्दात उतरवताना जणू काही महामंडळच त्याच्या पुढे उभं आहे आणि तो महामंडळाचं लक्ष वेधून घेत होता, त्यांना विनवणी करीत होता असंच वाटलं. तो मनात म्हणत होता साहेबजरा आमच्याकडेही बघा आमची कथा आणि व्यथाही जाणून घ्या ना सरकार.
काय सांगू तुम्हाला कालच्या काय, आधीच्या वस्तीच्या, मुक्कामाच्या ठिकाणाच्या रात्री अतिशय क्लेशदायी ठरल्यात.
रहाण्याची असुविधा. पांघरुणाचा अभाव आणि डासांची वाढती, संख्या, सोबतीला जीवघेणी थंडी. आम्ही एस. टी. वाहक आणि चालक, प्रवाशांना जबाबदारीने त्यांच्या घरी पोहोचवतो पण शेवटचा स्टॉप, रात्र झाल्याने आमचं ‘मुक्काम पोस्ट’ते गावचंअसतं.
मान्य आहे आमचा विचार करून आम्हा कर्मचाऱ्यांना, महामंडळाकडून आधी पांघरायला चादर मिळायची. पण 2019 पासून तीही रद्द करण्यात आली. मग सांगा बरं कडाक्याच्या थंडीत घरून नेलेली पांघरूणे पण अपुरी पडल्यावर आम्ही कसं करावं? पलंग नाही गैरसोईच्या खोलीत डासांचा मारा चुकवत आम्ही रात्र संपण्याची वाट बघत बसतो.
पहाटे जरा कुठे डुलकी लागली तर वेळेवर गाडी सोडायच्या ड्युटी मुळे खडबडून जागे होऊन एस. टी. बसकडे धाव घेतो कारण स्टॉप वर प्रवासी आमची वाट बघत बसलेले असतात.
आबाल वृद्धांना, आईच्या कुशीत झोपलेल्या बाळांना दमल्या भागल्या बायाबापड्यांना, वेळेवर घरी पोहोचवायचं असतं मग त्यांचे हाल होऊ नयेतं, त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आळस झटकून ड्युटी साठी आम्हाला चंद्रबळ आणून होशियार व्हावचं लागतं पण खरं सांगू! देह थकला, @ना की मनही अस्थिर होतं पण वाहन चालवताना जागरूक राहून वाटेत येणारे अनपेक्षित अडथळे टाळून, प्रवाशांना सुखरूप मुक्कामी सोडायचं असतं, त्यामुळे आपली ड्युटी जागरूकतेची जबाबदारीची आहे याची जाणीव ठेवून आम्ही थकलो असलो तरी सीटवर बसून स्टेअरिंग हातात घेतो. आणि ड्युटी साठी सज्ज होतो.
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र गोठलाय आमची हालत काय सांगू राव! गावांमधून काही ठिकाणी झोपायला जागा नसते कडाक्याच्या थंडीमुळे अंगण ओसरीचा पण आधार घेता येत नाही. मग काय झोपतो गाडीतच. पण तिथेही सैरावैरा इकडून तिकडे धावणारे डास आमच्यावर हल्ला करतात,
झोपण्याची सोय नाही, शौचालय नाही उघड्यावर नैसर्गिक विधी पार पाडावे लागतात.
पण आमचे हाल बघून एखादी आजी, एखादी वहिनी, ताईमाई आम्हाला प्रेमाने आलं, दारचा गवती चहा टाकून तुटक्या कानाच्या कपातून घोटभर गुळाचा चहा देते. तेव्हा मात्र आम्ही कृतकृत्य होतो.
आणि तो अतिशय मायेने अगत्याने दिलेला चहा आमच्यासाठी अमृत ठरतो. एखादी मावशी दारच्या वालाच्या, भुईमुगाच्या शेंगा, पेरू, सीताफळं भरभरून देते. तेंव्हा मनात येतं गरिबीतही यांच्यात एवढी दानशूरता येते कुठून?
महामंडळानेही ह्यांचा आदर्श उचलावा. सरकारने सोयी केल्यात ना मग आम्हालाही गणवेशाचे कापड, शिलाई, उलन ब्लॅंकेट, गरम जर्सी, पावसाळ्यासाठी रेनकोट छत्री द्या ना राव!
मनातले भाव शब्दात उतरवून राघवने डायरी बंद केली आणि जुना झालेला गणवेश घालून तो ड्युटीसाठी सज्ज झाला.
एसटी स्टँड कडे पळत जाणाऱ्या त्याला सीता सूचना देत होती, “अहो डबा वेळेवर खा. पाण्याच्या दोन बाटल्या दिल्यात बाहेरचं पाणी पिऊ नका. थकल्यावर थर्मास मधला चहा घ्यायला विसरू नका हं ” खळखळून हसत राघव म्हणाला अग हो हो! किती सुचना! तिकडे आई-बाबांचे वेगळच, आई म्हणत होती, “सुनबाई देवापुढे दिवा लाव सांजच्याला पोरगं सुखरूप घरी येऊ दे. ” बाबा ओरडून सांगत होते, “सांभाळून गाडी चालव रे बाबा प्रवासी सुखाने त्यांच्या घरी पोहोचू देत. ” असं हे आई-बाबांच्या मायेचं बायकोचा प्रेमाचं गाठोडं सांभाळत राघव त्याच्या रथावर एसटी बसवर आरुढ झाला.
आता तो कुणाचा लेक नव्हता बायकोचा नवरा नव्हता तर फक्त भगवद्गीतेचा अर्जुनाचा सारथी झालेला श्रीकृष्ण होता अशा ह्या आजच्या काळातील श्रीकृष्णाला, वाहन चालकाला माझा सादर प्रणाम
☆☆
© राधिका माजगावकर पंडित
सन सॅटॅलाइट पुणे – 51
मो. 8451027554
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈





