श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गोष्ट रिझर्व बँकेची” – लेखक : श्री विद्याधर अनासकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गोष्ट रिझर्व बँकेची 

लेखक: विद्याधर अनास्कर

पुस्तकाची पाने: २७६

मूल्य: ५५०₹

शेतकर्‍यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्‍या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास?

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद्धती? देशातील सरकार, प्रशासन, अर्थव्यवस्था अन् सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यापासून दीर्घकालीन परिणामांपर्यंत अनेक घटकांवर परिणाम करणार्‍या धोरणांची आखणी करणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक.

भारतासारख्या खंडप्राय विशाल देशाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग असणार्‍या रिझर्व्ह बँकेचा रोचक इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने सांगत आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर…गोष्ट रिझर्व्ह बँकेची.

पुस्तकातील काही अंश…

पाकिस्तानला दिलेले ‘ते’ पंचावन्न कोटी

पाकिस्तान सरकारने रिझर्व्ह बँकेस पत्र लिहून उर्वरित पंचावत्र कोटी रुपयांची मागणी केली. गव्हर्नर श्री. सी. डी. देशमुख आणि भारत सरकार यांच्यामध्ये पाकिस्तानच्या मागणीवर चर्चा झाली. विभागणी करारानुसार रिझर्व्ह बँकेने पाकिस्तान सरकारला रुपये पंचावन्न कोटी देणे आवश्यक होते, तरी या रकमेचा उपयोग पाकिस्तान भारताविरुद्धच्या युद्धांमध्ये शस्त्र खरेदीसाठीच करेल, याचा ठाम विश्वास असल्याने गृहमंत्री श्री. वल्लभभाई पटेल यांनी सदर रक्कम देण्यास नापसंती दर्शविली.

रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था असल्याने भारत सरकारच्या दबावाखाली पाकिस्तानची मागणी नाकारली असे दिसू नये, म्हणून २४ डिसेंबर १९४७ रोजी श्री. सी. डी. देशमुख यांनी भारत सरकारला पत्राद्वारे कळविले की, अजूनही पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर भारतीय नोटा असल्याने, त्याचा हिशेब पूर्ण होईपर्यंत पाकिस्तान ला  55 कोटी न देता दर आठवड्याला तीन तीन कोटी देण्यात येतील..

लॉर्ड माऊंट बॅटन यांनी महात्मा गांधीच्या कानांवर रुपये पंचावन्न कोटींची बाब घातली. महात्मा गांधींनी नैतिकतेच्या मुद्यांवर लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या म्हणण्याला पुष्टी देत जातीय सलोख्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये, रुपये पंचावन्न कोटी पाकिस्तानला देण्याचीही अट घातली. वास्तविक या मुद्यावर इतिहासात दोन प्रवाह आहेत.

महात्मा गांधीजींच्या उपोषणामुळे हतबल झालेल्या भारत सरकारने १५ जानेवारी १९४८ रोजी आपल्या निर्णयावर फेरविचार करीत पाकिस्तानला रुपये पंचावन्न कोटी न देण्याचा निर्णय बदलला व ‘ती ‘ रक्कम देण्याचे मान्य केले. १८ जानेवारी रोजी गांधीजींनी आपले उपोषण मागे घेतले.

३० जानेवारी १९४८ रोजी ७८ वर्षीय गांधीजींची गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येमागे असलेल्या अनेक कारणांपैकी आपल्या आमरण उपोषणाने भारत सरकारला रुपये पंचावन्न कोटींची रक्कम पाकिस्तानला देण्यास भाग पाडल्याचे प्रमुख कारण होते.

या लेखामध्ये १९४६ मध्ये भारतात आलेल्या ब्रिटिश शिष्टमंडळातील लॉर्ड लॉरेन्स पेथीक यांच्याबरोबर असलेल्या महात्मा गांधीच्या फोटोतील चेहरा भारतीय नोटेवर वापरण्यात आला आहे. आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या व भारतीय नोटेवर छायाचित्र असलेल्या गांधींच्या हत्येमागील अनेक कारणांपैकी एक कारण पैशाचे होते, हा देखील विचित्र योगायोग ठरावा.

आपल्या देशाच्या या मध्यवर्ती बँकेबद्दलची महत्वपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच….

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

पुस्तकाची ओळख आवडली.