नीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ “विमानतळ…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमच्या राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत खेळल्या जाणाऱ्या एका खेळाचे नाव आहे… ” विमानतळ”
वेगळं वाटलं ना? सांगते कसा खेळला जातो ते..
सर्वांनी गोल करून उभ राहायचं. चारी कोपऱ्यात मातीतच गोल आखायचा. त्यांना चेन्नई, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशी नावं द्यायची. सर्वांनी घोषणा देत पळायचं.
“संघटन मे शक्ती है
शक्ती को बढाना है
हिंदुस्तान हमारा है “
जी खेळ घेणार असेल तिनी पाठ करून उभ रहायचं. काही वेळाने तिने शिट्टी वाजवली की ज्या विमान तळाजवळ तुम्ही उभ्या असाल… तिथे जाऊन उभ राहायचं. त्या उभ्या राहिल्या की नंतर खेळ घेणारीनी एका विमान तळाचं नाव घ्यायचं.
तिथे उभ्या असलेल्या सगळ्या जणी खेळातून बाद… कितीही नाही म्हटलं तरी पहिल्या फेरीत बाद झाल्यावर वाईट वाटतं..
परत दुसरा राउंड… सर्वजणी आऊट होईपर्यंत असा खेळ चालु ठेवायचा.
खेळाचे मर्म लक्षात आलं का?
– – सगळ्याजणी पळत होत्या. पण नेमकं ज्या विमानतळाचं नाव उच्चारलं त्या खेळातून बाद झाल्या.
आयुष्यात असंच अनपेक्षित पणे काहीही होऊ शकतं… त्याचा स्वीकार करायचा. सारखं गुडी गुडी, चांगलंच होईल का? तर नाही.. जगत असतानाही असे अचानक धक्के बसत असतात. त्यावेळी नाऊमेद व्हायचं नाही. असही घडतं.. ते पचवायची, त्याच्याशी सामना करायची… तुमची मानसिक तयारी असायला हवी..
हेच या खेळातून शिकवलं गेलं आहे. खेळातून बाद झालो हे सहजपणे घेत… बाहेर उभं राहून खेळणाऱ्यांना घोषणा देत प्रोत्साहन द्यायचे.
हा खेळ झाला की परत पुढचा खेळ खेळायला सुरुवात करायची…
दुसरा खेळ आहे अग्निकुंड..
यात गोल करून.. एकमेकींचे हात घट्ट धरून उभं राहायचं. मध्यभागी प्रतिकात्मक अग्निकुंड आहे. जोर लाऊन शेजारचीला त्यात ढकलायच. जिचा पाय उचलला जाईल.. जी गोलाच्या आत ढकलली जाईल.. ती या खेळातून बाहेर.. शेवटी दोघी राहिल्या की त्यांनी एकमेकींना ओढायचे… शेवटी त्यातली एक जण जिंकणार…
समोर संकट दिसतंय… कुणीतरी तुम्हाला त्यात ढकलतय.. त्या क्षणी तुम्ही सर्व शक्तीनिशी त्याला प्रतिकार करायचा. पाय घट्ट रोवून उभं राहायचं. अगदी ठामपणे…
एखादा मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल तर प्रतिकार हा केलाच पाहिजे.
अर्थात हे कोणीतरी शिकवलं तर हे जमेल. यष्टि प्रशिक्षणातून हेच तर समितित शिकवलं जातं. निरनिराळे व्यायाम प्रकार, खो खो, कबड्डी या सारखे खेळ घेतले जातात. शरीराला एक प्रकारची शिस्त लावली गेल्यामुळे शरीर कणखर बनते.
सध्या सोफ्यावर बसून मोबाईलवर तासन्तास खेळ खेळले जातात. त्यात जिंकलो, पॉईंट मिळाले तर ते कृत्रिम, आभासी असतात. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग शून्य आहे.
शाखेत मैदानावरच्या मातीत खेळत असताना जोम, उत्साह, तरतरी, आत्मबल हे मिळत असते. त्यासाठीच तुम्ही राष्ट्र सेविका समितिच्या शाखेत या…
त्यासाठी कुठलीही फी नाही.. परीक्षा नाही.. इथे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवले जाते.
नवीन ओळखी होतात. एकमेकांमध्ये आत्मीय भाव, स्नेह निर्माण होतो. इतर कुठेही शिकवले जात नाही… ते इथे शिकायला मिळते. देशभक्तीपर गीतं शिकवली जातात.
ती सर्वांबरोबर जोरकसपणे म्हणताना मनात उत्साह व चैतन्य येते.
” पुण्य भू: मातृभू हिंदू भूमी आपुली
स्वर्गतुल्य भासते आम्हास माय माऊली”
अशा आपल्या मायभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी एक होऊया..
… आपण सध्याच्या जगात सजग.. सतर्क व्हायला हवे आहे.
… तर मग निश्चयाने उचला पाऊल…
☆
© नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




