शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी ☆
☆
“अरे वाटीने दिल तर पाटीने गोळा करशील. ” हे आमच्या आजीचे दातृत्वाचे माप! मोलाचा विचार !!आज आपल्यातील थोडं जे आहे त्यातलं लोकांना दिलं तर पुढे जाऊन त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला खूप काही मिळतं… साधी गोष्ट पण एका ओळीत सुंदर सांगितलेली.
वाटी हे आपल्या भोजनपात्रातले सर्वात लहान भांडे वाटीचे अनेक प्रकार आहेत. नैवेद्याची वाटी, आमटीची वाटी, भाताची मुद पाडायची वाटी, तुपाची वाटी, आमरसाची वाटी, श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, या अशा अनेक वाट्यांना त्यातल्या पदार्थ प्रमाणे मानाचे स्थान असे. त्यांचाही थाट असायचा.. काही वाट्या चांदीच्या काही पितळेच्या नंतरच्या काळात स्टीलच्या जर्मनच्या पण वाट्या असायच्या पण त्या वापरत नव्हते. जगावर राज्य करायला निघालेल्या जर्मनच्या वाटीची अवस्था फारच वाईट होती. कुत्र्या मांजराला खाऊ घालण्याचे पदार्थ त्या वाटीत ठेवले जायचे ती जरा आकाराने मोठी असायची. मला त्या धातूला जर्मन असे का म्हणतात हेच कळत नाही. त्या काळात जर्मनची भांडी हलकी म्हणून प्रसिद्ध होती पण ती घरात वापरायला कोणी तयार नसे. हमालाचं काम करतानाही जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारा क्रूर माणूस म्हणजे हिटलर… किंबहुना क्रूरतेला हिटलर हा शब्द पर्यायी म्हणून दिला आहे. असो एकूण जर्मनच्या वाट्या फारशा वापरल्या जात नव्हत्या.
नैवेद्याच्या वाटीचे नशीब जोरदार… ती चांदीची, देवापुढे रोज ठुमकत जाऊन बसण्याचा मान तिला! तिच्यामध्ये असलेले पदार्थ म्हणजे केशर काजू बदाम मिश्रित शिरा, केशर घातलेल श्रीखंड तर कधी मस्त घट्ट बासुंदी कधी बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, साखरभात अशा भारदस्त पक्वान्नाना त्या वाटीत सामावून घेण्याचा मान मिळायचा. बाकीच्या वाट्या आमटी भाजी इत्यादीसाठी असायच्या.
आमरसाच्या वाटीचे मात्र वैशिष्ट्य.. ती खास असायची. तिला आपला हा मध्यम आकार चालायचाच नाही. हाताची बोटे पसरल्यावर जेवढा आकार होईल त्यात मावणारी ती वाटी.. ही चांदीची वापरायची. आता मात्र ती स्टीलची असते. चांदीच्या वाटीतला तो आमरसाचा रंग मोठा देखणा दिसायचा.. ते उत्तम मॅचिंग होतं. वाटी पाहिल्यानंतर माणसाच्या जिव्हेला आवर घालणे अवघड असायचे.
तसेच आमटीच्या वाटीचा आकारही थोडा मोठाच असायचा कारण त्यामध्ये कधी चिंच गुळाची आमटी, कधी शेवग्याच्या शेंगाची आमटी, कधी कांद्याची आमटी, उपवासाची शेंगाची आमटी, नवीन मसाला केल्यावर उखळ धुतल्यावर केलेल्या पाण्याची.. मसाला आमटी, वड्याची आमटी, आणि हल्ली प्रसिद्ध असलेली बाजार आमटी – – आमटीचा भुरका मारला की त्या आमटीने माणसाचा मेंदू तरतरीत होत होता.
उसनवारीचा व्यवसाय केला तो वाटीनेच… वाटीभर साखर, वाटीभर डाळीचे पीठ, वाटीभर डाळ, वाटीभर तांदूळ, वाटीभर तेल, ही सगळी उसनवारी या वाट्याच्या माध्यमातून होत असे.
लहान मुलांना तरी वाटीत काहीतरी घालून बसवले.. अगदी चुरमुरे वगैरे कि ती खात निवांत बसायची आणि आईचे काम व्हायचे.. ! शाळेतून आल्यानंतर आईने वाटीत काहीतरी खायला दिले की आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत केली जाणारी भेळ वाटी वाटीतूनच वर्तमानपत्राच्या कागदावर वाटली जायची. चाळ आणि वाडे यांच्यातील घराघरामधील स्नेह वाढवण्याचे काम या वाटीनेच केले आहे. भाजी आमटी चांगली झाली की शेजाऱ्याकडे ती वाटी जायची किंवा काही खास वेगळे केले तरी वाट्यांची देवाण-घेवाण व्हायची शेजाऱ्याकडे दिलेली वाटी कधीही रिकामी परत येत नसे, आणि आतासारखे चार दाणे साखर टाकून देण्याचा जमानाही नव्हता. त्यामध्ये पुन्हा घसघशीत पदार्थ घालून ती वाटी परत केली जात असे. माझ्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबातील मुलगी माझ्या आईच्या हातच्या आमटीसाठी हट्ट धरून बसायची. तिच्या आईला संकोच वाटायचा की रोज काय त्यांच्याकडून आमटी आणायची. माझी आई म्हणायची ‘अगं नेत जा.. मला नाती सारखी आहे ती ‘. पण त्यांनी एक युक्तीच केली आमच्या घरची वाटी घेऊन जाऊन त्यात ते त्यांच्या घरची आमटी घालून ठेवत आणि मग ती आमटी बाईंनी तुला दिली आहे असे सांगितले की ती खुश व्हायची आणि आईला म्हणायची, ” बघ बाईच्या हाताची आमटी किती सुंदर होते “– ही फसवा फसवी तिच्या आईने किती तरी दिवस केली होती. अशी ही गंमत.
या वाटीने सकाळी नळावर झालेली कडाक्याची भांडणे क्षणात विसरून जाऊन बायका पुन्हा चार वाजता गप्पा मारण्यासाठी एकत्र यायच्या. हे वैशिष्ट्य चाळ आणि वाड्यातच पाहायला मिळणार. नळावरची भांडणं त्या वाटीतून कधी बादली, घागरी पर्यंत पोहोचली नाहीत. ते सगळे विचार.. नाराजी वाटीमध्ये विरून जायची !
लग्नात या वाटीचे महत्त्व फार मोठे. मधुपर्कच्या एका विधीला जावयाला चांदीची वाटी देत असत. तसेच संक्रांतीला चांदीच्या वाटीत हलवा घालून जावयाला आहेर करायची पद्धत होती. भाच्याला पहिला दात समोरचा आला तर चांदीची वाटी मामाने आणून मारायची अशी पद्धत होती.. मारायची म्हणजे त्याला आहेरच करायचा. पूर्वी चांदीच्या वाटीचा आहेर करीत असत. बारशाला वाटी चमचा असा आहेर व्हायचा.. आहेरात चांदीची वाटी देणे याला खूप महत्त्व होते. बायका हिंगाच्या डबीत पैसे साठवून एक एक चांदीची वाटी जमा करीत असत. चांदीची वाटी, चांदीचं ताट, चांदीचे ताम्हण हे त्या घराचं वैभव बायकांच्या हिंगाच्या बचतगटाच्या डबीतून आलेलं आहे. आहेरात चांदीची वाटी दिली तर देणाऱ्याचा मान वाढत असे.. “अग बाई चांदीची वाटी का दिली… ” असे कौतुकही होत असे
माणसांच्या संभाषणात सुद्धा वाटीला अनन्यसाधारण महत्त्व होतं. उदाहरण पहा… “वाटीभर रक्त आटवलं याच्यासाठी पण काही उपयोग झाला नाही” यासारख्या वाक्याने वाटीला एक साहित्यिक महत्त्व आलं आहे. तिला ताटाची जोड मिळाली ना की मग तिचं सौभाग्य फुलते. पूर्वी ताटवाटीचा आहेर करायचे – – एकूण आपल्या संस्कृतीत जोडी असणे याला खूप महत्त्व आहे… वाटीतलं ताटात सांडले तर काय बिघडतं… वाटीतलं ताटात काय आणि ताटातलं वाटीत काय… इत्यादी म्हणजे थोडक्यात आपल्या माणसासाठी हे सगळं आहे असं सांगण्याचा तो उद्देश आहे.. त्याला दिले तर काही बिघडत नाही.
– अशा अनेक साहित्यिक वाक्यांमध्ये वाटीला स्थान आहे.
सर्वांना समान वाटणी करण्याची पूर्वी पद्धत होती, म्हणजे अगदी द्राक्ष आणली तरी प्रत्येक मुलाला सहा- सहा आठ आठ अशी मोजून द्राक्ष वाट्यात घालून दिली जात असत. (पूर्वी द्राक्ष दुर्मिळ होती) वाटीत कोणाला तरी गुपचूप काढून ठेवून देणे हे त्याच्यावर असलेल्या मायेच प्रतीक होतं. सुनबाई जर सासूबाईंना म्हणाल्या, ” आई आहो तुम्ही देवळात गेला होता ना म्हणून यांनी आणलेली बर्फी मी तुमच्यासाठी वेगळी काढून वाटीत ठेवली आहे “… सासुबाई सुखावून जातात… ! गपचूप काढून ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व विरोधी गटातही प्रेम वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे.
चांदीच्या वाट्या कपाटात असतात. पितळेच्या वाट्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. स्टीलच्या वाट्यांची चलती जोरात आहे. पण त्यांनाही मागे टाकून आता प्लास्टिकच्या वाट्या येऊ लागल्यात. पण या वाट्यांना चांदीच्या आणि पितळेच्या वाट्यांचे शाहीपण नाही…
… पण सगळ्याच वाटी प्रकाराला जे बाईपण लाभलं आहे ना ते वाखाणण्याजोग आहे. बाईपण यासाठी की हा संसारातला स्नेह, समजूतदारपणा, भांडणे मिटवून टाकणं, आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देणं, हे जे गुण घरातल्या बाईजवळ असतात तेच गुण या वाट्यामध्ये आहेत. वाटी हे वाडे आणि चाळीचे स्नेह वाढवणारे घटक आहेत. बंगल्यात ती देवघेव होत नाही आणि तो स्नेह ही निर्माण होत नाही.
… “एक वाटी आमटी भाजी की कीमत तुम क्या जानो बंगले वालो… ”
आता हा लेख वाचल्यानंतर शेजारच्या पाजारच्या बंगल्यातून मला वाट्या येतील असं वाटतंय… बघूया एक छोटं भांडं – ‘वाटी‘ – यावर मी माझे विचार प्रकट केले आहेत. आवडले असले तर वाटीभर अभिप्राय द्या आणि ही वाटी पुढच्या घरी पाठवा माझे काही बंधन नाही…!
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





