शालिनी जोशी
विविधा
☆ नमस्कार… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
नमस्कार
भारतीय संस्कृतीचे एक विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे नमस्कार. नमस्कारायची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच होते.
‘समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले l विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे’
समुद्र, पर्वत यांना धारण करणाऱ्या विष्णुपती लक्ष्मीला पदस्पर्श करण्याआधी तिला नमस्कार करून तिची क्षमा मागणारी आपली संस्कृती आहे. भूमी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आदर व्यक्त करण्याचा भाव यात आहे. नंतर स्नान झाल्यावर देवाला, आई-वडिलांना, घरातील जेष्टाना, गुरुना नमस्कार करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे दोन्ही तितकेच महत्त्वाचे. नमस्कारात प्रेम, आदर, नम्रता, सद्भाव आहे.त्यानंतर मिळणारा आशीर्वाद दिवसभराच्या कार्याला यश देणारा,सत्कार्याची प्रेरणा देणारा असतो.
नमस्काराला वंदन,नमन, प्रणाम, प्रणिपात, अभिवादन, असे प्रतिशब्द आहेत. विनय हे नमस्काराचे मूळ आहे. दोन्ही तळवे एकमेकांना चिकटून सरळ छातीवर, आणि मस्तक श्रद्धेने वाकलं की नमस्कार होतो. तेथे अहंकार नाही. नम्रता, आदर, प्रेमभाव असावा. वंदन म्हणजे नमस्कारच पण श्रद्धा जास्त. ‘वंदे मातरम्’ म्हणून मातृभूमीला तसेच ध्वजवंदन म्हणजे ध्वजाला वंदन करतात. नवविधाभक्ती मध्ये वंदन भक्ती आहे.
देव, गुरु,आचार्य, सत्पुरुष यांना साष्टांग नमस्कार करतात. साष्टांग म्हणजे स अष्टांग, आठ अंगे जमिनीला टेकून केलेला नमस्कार. दोन पाय, दोन गुडघे, दोन हात, नाक व कपाळ. यात पूर्ण शरणागती व्यक्त होते. हाच प्रणिपात ऋजुता, नम्रता सांगणारा.
सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ नमस्कार पद्धती आहे.हे बारा भागात घातले जातात. याचे शारीरिक व मानसिक फायदे आहेत. व्यायाम व आसने दोन्ही साधतात. कोणत्याही साधनाशिवाय करायची ही भारतीय पद्धत आता जगन्मान्य झाली आहे.
आपली संस्कृती सर्वाभूती परमेश्वर पाहणारी आहे.त्यामुळे ‘दीपज्योती नमोस्तुते’ म्हणून साऱ्या तेज तत्वाला नमस्कार. नदीतही मनुष्यत्व बघून तिची ओटी भरून नमस्कार केला जातो. समुद्राला नारळ आपण करून जलतत्त्वाची पूजा असते. वृक्ष पूजा तर सर्वांना माहीतच आहे. एकंदरीत नमस्कार भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आहे. चूक झाल्यास नमस्कार करून माफी मागितली म्हणजे तोच नमस्कार संरक्षक कवच होतो. भारतात धर्म,भाषा, वेशभूषा यात विविधता असली तरी नमस्कार सगळ्यात आहे. प्रपंच्यात, परमार्थात, स्वागत आणि निरोपातही नमस्काराला स्थान आहे. समोरच्या व्यक्तीला रामराम म्हणून नमस्कार करणे म्हणजे स्वतःच्या व दुसऱ्याच्या हृदयस्थ रामाला नमस्कार होतो. सर्वात तोच आत्मा हा भाव समानता प्रस्थापित करतो. आपोआप राग, द्वेष दूर होतात. दोषरहीत दृष्टीने सर्वत्र भगवंत पाहणे हीच नमन भक्ती.
ग्रंथारंभी किंवा शुभकार्याच्या आरंभी संबंधित सर्वांना नमस्कार करण्याची प्रथा आहे. यातून कार्यपूर्तीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळतात. ग्रंथाची सुरुवात ‘श्री गणेशाय नमः’ने करतात.‘नमस्ते नमस्ते’ असे दोनदा म्हणल्याने त्याची तीव्रता वाढते.’ सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति l’हा विश्वात्मक भाव नमस्कारातून व्यक्त होतो. गुरु हा नेहमी वयाने मोठा असतो असे नाही. तेव्हा आपल्यापेक्षा लहान गुरु असतात तरी त्याला नमस्कार करावा. हा त्या गुरुतत्त्वाचा मान असतो. कन्या पूजनाच्या वेळी कुमारीकेला व बटू पूजनाच्या वेळी बटूला नमस्कार करतात. डोळे मिटून देवतेला नमस्कार करताना देवतेचे ध्यान होऊन सुख समाधान प्राप्त होते.मानसिक आरोग्य चांगले राहते.
नमस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हाताने पायाला स्पर्श करून मस्तक खाली वाकवतात. काहीजण चरणावर मस्तक ठेवतात. काहीजण हस्तालोंदन करतात. कोणी आलींगन देतात. कोणी नुसतेच कमरेत वाकतात. तर कोणी टोपी, पागोटे काढतात. पत्रातही ज्याला आपण पत्र लिहितो, त्याला नमस्कार लिहून मग लिखाणाला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे नमस्कार हा साधा, सोपा, बिन कष्टाचा पण लाभदायक आहे.
या कारणें नमस्कार श्रेष्ठ l नमस्कारें वोळती वरिष्ठ ll
(दा.४/६/२५)
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





