विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ मी आणि AI – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
माझे आत्ता पर्यंत जे व्यक्ती विशेष (थोडक्यात म्हणजे बावळटपणा किंवा मूर्खपणा) मी लिहिले आणि आपण वाचले त्यात अजून एक भर पडली. खूप दिवस AI नामक सर्वज्ञात असलेल्या जीन विषयी ऐकत होते. फारसा विश्वास नव्हताच! पण म्हंटले बरेच लोक प्रशंसा करत आहेत, तर बघावे हा जीन काय काय करतो? कारण नवीन नवीन शिकणे, विविध प्रयोग करणे हे जणू रक्तातच आहे.
आज एका वस्तूवर अडले. इमेज तर दिसली आणि उत्सुकता वाढली. म्हणून सर्वज्ञ AI कडे धाव घेतली, तर त्या वस्तुच्या फोटोत आणि याच्या उत्तरात काहीच साम्य नाही. शेवटी त्या विषयी योग्य माहिती घरातूनच मिळाली. म्हणजे आपण पूर्वेचा रस्ता विचारावा आणि AI ने आकर्षक पद्धतीने उत्तरेला नेऊन सोडावे. कालच एक वसंत कानेटकर लिखित एक प्रसिद्ध नाटक बघून आले. वाटलं AI ला कथानक विचारावे. तर मूळ विषय सोडून काहीही कथा येऊ लागल्या. पुन्हा शेवटी प्रश्न आहेच. मी अजून काही मदत करु शकतो का? दोन तास त्यात घालवले तरी इतक्या प्रसिद्ध नाटकाची कथा त्याने अजून सांगितलीच नाही. मग इतर गोष्टी लांबच!
मग या विषयी जे सध्याचे तंत्रज्ञान वापरतात म्हणजे आपलीच लेकरे, त्यांच्याशी चर्चा केली. तर असे कुठे विचारतात का? म्हणून त्यांनी वेड्यातच काढले. मग आमची चर्चा आणि मध्यंतरी काही वाचले होते ते आठवले.
AI विरुद्ध मानव (AI vs Human) हा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगत होत असली तरी, मानवी बुद्धिमत्तेला तिचा पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
मानवी क्षमता सर्वश्रेष्ठ आहे. मुंबईतील ७७% प्रोफेशनल कामाचे मोठे निर्णय घेताना AI पेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.
AI ची उपयुक्तता: ७३% प्रोफेशनल AI चा वापर मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त मानतात, पूर्ण निर्णयासाठी नाही.
AI मानवाची जागा घेणार नाही, तर मानवी क्षमतेत वाढ करेल. हे मानवी भावना आणि यंत्रांचे तर्कशास्त्र यांचे मिश्रण असेल.
एआयचे जनक जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे.
एआय चॅटबॉट्सचा चुकीच्या कामासाठी वापर (उदा. डीपफेक) समाजासाठी घातक ठरू शकतो.
योग्य नियोजन आणि मर्यादित वापर केल्यास AI मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकते, परंतु मानवी विवेकबुद्धीला पर्याय नाही.
एआय आणि मानव यांच्यातील मुख्य फरक
मानव
माणूस सर्जनशील आहे.
उच्च कल्पना आणि भावनांवर आधारित निर्मिती करु शकतो. निर्णय क्षमता भावना, नैतिकता आणि अनुभव यावर आधारित असतात.
वेग व स्मृती मर्यादित असतात. संदर्भ हे नैसर्गिक समज व भावनांवर आधारित असतात.
AI
सर्वजनशीलता मर्यादित डेटा वर आधारित असते. वेग प्रचंड असतो. निर्णय क्षमता डेटा आणि अल्गोरिदमवर आधारित असते.
संदर्भ हे शिकवलेल्या माहितीवर आधारित असतात.
AI हे एक साधन आहे साध्य नाही.
आत्ता पर्यंत एवढेच समजले. अजून काही ज्ञानात भर पडेलंच! या कामी आपणही मदत कराल ना?
© विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





