श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ पौर्णिमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
पौर्णिमा येईल तेव्हा चंद्र पूर्णाकार होतो
विश्व सारे शांतवाया अमृताची धार होतो
*
फार चिंता वाढताना गात गाणे रात जाते
आवसेला वेढणारा रंग काळाशार होतो
*
रोज दारी चांदण्याची रांग येते सोबतीला
त्या घडीला रोज त्यांचा चांगला सत्कार होतो
*
संकटानी ग्रासले की कोण नसते सोबतीला
आपला निर्धार तेव्हा आपला आधार होतो
*
रीत आहे या जगाची दूरदृष्टी पाळण्याची
काळ पुढचा त्यामुळे तर शेवटी साकार होतो
*
काळजीच्या संगतीने सर्वकाही योग्य होते
धुर्ततेने वागले की चांगला संसार होतो
*
सत्य आहे नित्य येथे चांगल्याला साथ देते
बंध सारे पाळताना नेमका संस्कार होतो
*
तो खरा तर लाच खावू हे कधी कळलेच नाही
घेत जातो देत जातो तोच दावेदार होतो
*
रोज मंत्री ऐतखाऊ बैठकाचा स्वाद घेतो
आणि तेथे नेमका तो भामटा सरदार होतो
*
प्रेम खोटे कोणतेही फार होते स्वार्थ साधू
गरजवंताच्या पुढे मग नेमका अंधार होतो
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





