श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘आद्य मराठी ‘शायर…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज २९ डिसेंबर, यवतमाळचे आद्य मराठी शायर अॅड भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्मदिन.
मराठीत ‘शायरी’ हा शाही काव्यप्रकार यशस्वीपणे हाताळणारे भाऊसाहेब हे पहिले मराठी शायर!
आपल्या शायरीविषयी त्यांना किती आत्मविश्वास होता पहा. ते म्हणतात…
शायरी ऐकून माझी सांगेल जो, ‘ आता पुरे’
तो रतीच्या चुंबनाही सांगेल की, ‘ आता पुरे! ‘
ते साक्षात ईश्वरालाही ठणकावून सांगतात….
*
नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही
भगवन्, तुझ्या दुनियेस काही देउनी गेलो अम्ही
शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती!
इष्क, जीवन, मृत्यू, विनोद, वार्धक्य अशा अनेक विषयांवरची त्यांची शायरी विलक्षण सुंदर आहे. ‘मृत्यू आणि वास्तव’ या विषयावरची शायरी वाचल्यावर कोणाही सहृदय व्यक्तीचे मन गलबलून जाते!
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले ।
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये॥
*
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला ।
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी॥
*
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले ।
थोडे जरी का दु:ख माझे, असते कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले॥
*
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही ।
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला॥
*
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला ।
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली ।।
स्वतः नैय्यायिक व शास्त्रपंडीत असणाऱ्या भाऊसाहेबांची दार्शनिक शायरीही अतिशय प्रगल्भ व रमणीय आहे. पत्त्याच्या खेळाच्या रूपकातून त्यांनी हसत खेळत मांडलेले गंभीर तत्वज्ञान पहा…
मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो ।
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे॥
*
आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला ।
राणीसही जाणीव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती, आज लाजू लागली॥
*
दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौ-र्यास आता श्रीमंत वाटू लागला ।
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले॥
*
नुसता उपाधी भेद, कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगू पुढे, तो खेळही अमुचा नव्हे ।
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला ईश, म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी॥
*
त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्त्यातले
एका परी पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले ।
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्त्यातला
आहे जरी पत्त्यातला तो, नाही तसा पत्त्यातला॥
*
नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी ।
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा ।।
अशा या ‘ मस्तवाल ‘, ‘ बेगुमान ‘, ‘ प्रतिभावान ‘ ‘ पंडित ‘ शायराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
🙏🏽🙏🏽🙏🏽
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
`



