सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आजी फिरायला निघाली.

दोन जिने उतरून आजोबा खाली आले…

“अग जरा थांब”

” का… काय झालं? “

” अगं स्वेटर घालायला विसरलीस… उद्या आजारी पडलीस तर मलाच पाय दाबून द्यावे लागतील… “

” ईश्य… अहो काय हे… चार चौघात काय बोलताय”…

मैत्रिणींबरोबर थोडी लाजत हसत आजी गेली.

दोन्ही लेकी लग्न होऊन सासरी गेलेल्या… त्यामुळे आजोबा आजी दोघेच घरात.. पण मजेत दिवस घालवत असतात.

 

“आज दमलेली दिसतेस.. पोळ्या आणू का बाहेरून..? “

“नको आज मेथीची भाजी, भाकरी आणि दाल फ्राय करणार आहे.. “

” फक्कड मेन्यू… कर कर… “

 

त्या दिवशी संध्याकाळी आजोबा सारखा फोन हातात घेत होते.

” अहो सारख काय बघताय? कोणाचा फोन येणार आहे का? “

” हो पल्लवीचा”

“कोण पल्लवी… “

” अगं गोव्याला आमच्याबरोबर ट्रेनिंगला होती… “

तेवढ्यात वाजलाच…

” हो हो निघतो.. पोचतो वेळेत”

अस म्हणून आजोबा गडबडीत गेले..

तरीच आज टी शर्ट घातलाय.. नवीन जॅकेट घातलय… पण या आधी कधी पल्लवी चा उल्लेख केलेला नाही डोक्यात किडा वळवळलाच

सत्तरीतही…

खुशीत आजोबा घरी..

 आजीला कुठले चैन पडायला आजोबा पाय धुवायला गेल्यावर आधी कुणाचा फोन आला होता हे चेक केलं…

आजीला हसूच यायला लागले..

अमोल पिल्ले… ही पल्लवी का…

मनाशी म्हणाली,

घरी आल्यावर माझी कशी गंमत केली हे सांगून माझी मस्करी करणार होता का? मी पण काही कमी नाही… हे आता दाखवतेच…

 

“अहो किती उशीर केलात.. आत्ताच अरू गेला… “

” कोण अरू…? “

” अहो माझी मैत्रीण अरुणा आत्ताच गेली. आमंत्रण द्यायला आले होते दोघे.. “

” पण आत्ता तू अरू गेला अस म्हणालीस.. “

” कोण मी..? “

आजोबांचा चेहरा बघण्यासारखा…

” अहो… उद्या कानाच्या डॉक्टरांकडे जाऊच या.. हल्ली तुम्हाला नीट ऐकू येत नाही बाई. मी बोलते एक तुम्ही दुसरच ऐकता… “

“अग खरचं आत्ता मला स्पष्ट ऐकू आलं.. तू अरुच म्हणाली होतीस”

 

आजीनी फोनचा नंबर फिरवल्याची एक्टिंग करायला सुरुवात केली होती. अशी झक्कापक्की चालु असते दोघांची…

खरं सांगू का…

आयुष्यभर दोघांनी हसत खेळत आयुष्य जगायचं…

मन जुळली की हे असले दिवस साजरे करावेच लागत नाहीत…

तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस असतो का हो व्हॅलेंटाईन…

सकाळी हातात दिलेला गुलाब संध्याकाळी कचऱ्यात जातो…

त्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन आयुष्यभर आनंदात राहाव… सुखदुःखात एकमेकांना साथ द्यावी..

दोन माणसं म्हंटली की मतं

वेगवेगळी असणारच… इकडे तिकडे जरा होणारच. ज्याला जमेल त्यानी चार पावलं मागे यायचं… मग प्रश्न फार पुढे जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत आनंदात राहायचं… ईतकच तर सुखी संसाराच गमक असतं..

 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरून आलं की शांतता हवी असते…

अगदी कुठल्याही वयात…

आपला साथीदार जोडीला आहे.. एकमेकांची साथ… विश्वास आहे असं लक्षात आलं की कुठलंही दुःख झेलायला मन तयार होतं.

तरुणपणी आयुष्य धुंदीत जातं. चाळीशी नंतर भान येतं. ते भान आधीच येऊ दे… कदाचित नंतर ऊशीर झाला असेल.

 

आपली हिंदू संस्कृती स्नेह, माया, प्रेम शिकवते. त्याच्याबरोबरच नात्याची कदर आणि आदर करायला पण शिकवते. त्याचा अंगीकार करा. चॉकलेटवाल्यांच्या जाहिरातीतबाजीला आपण फसायचं का? भुलवायला नेकजण बसलेले आहेत… आपण विचार करायला हवा.

शाश्वत आनंद, सुख कशात आहे हे ओळखा. असा आनंद आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळायला हवा..

हो की नाही… तो मिळाला की रोजचाच दिवस निरपेक्ष प्रेमाने भरलेला असतो.

 

एक गंमत सांगू का…

आजींना भेटायला अरुणच आला होता… पण बायकोला अरूणाला घेऊन…

आज ना ऊद्या आजी हे आजोंबांना सांगणारच.. असेच छोटे आनंद घेत दोघेजण जगत आहेत…

आता हा लेख आधी का पाठवला हे तुम्ही ओळखलंच असेल..

तुम्ही सुज्ञ आहात..

घेताल समजून…

 

मग शीर्षक हे का घेतले? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल..

तुम्ही त्याशिवाय वाचणार नाही हे मला माहीत होतं म्हणून…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted