श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्र ५४

गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं|

अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम् ||”

अर्थभगवंतावरील या प्रेमाला कोणतेही गुण नाहीत, त्यामध्ये कोणतीही वासना नाही, ते अखंड, अतिसूक्ष्म, प्रत्येक क्षणी वाढणारे, आणि केवळ अनुभवरूप आहे.

विवेचन:

नारद मुनी इथे आपला अनुभव सांगत आहेत. आपण इथे असे समजू की नारद मुनींनी भगवंतावर कसे प्रेम केलं असेल…

इथे नारद महर्षी आपल्याला सहा गुण अथवा प्रकार सांगत आहेत. त्यातील तीन हे थोडे नकारात्मक आणि तीन सकारात्मक आहेत. आधी नकारात्मक पाहू.

१. गुणरहित: 

सर्वसाधारण मनुष्य प्रेम करतो ते स्वार्थासाठी. स्वार्थाचा रंग वेगवेगळा असू शकतो. पण खरे अर्थात भगवंतावरील प्रेम हे निःस्वार्थ असते. त्याला सत्व, रज अथवा तम असा कोणताही गुणदोष चिकटत नाही. एका अर्थाने ते निर्गुण असते.

२. कामनारहितं: 

सामान्यतः कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक मनुष्याच्या मनात काही विशिष्ट असा उद्देश असतो, कामना असते. कधी ती लौकिक असते तर कधी अलौकिक. कधी सकाम असते तर कधी निष्काम. पण खरा भक्त भगवंतावर अकारण प्रेम करीत असतो. अमुक व्हावे किंवा अमुक होऊ नये म्हणून तो काहीही करीत नसतो. तो फक्त प्रेम करीत असतो.

समर्थ रामदास याचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – – 

“देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित।

इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥”

(दासबोध ०४. ०८. २२)

– – – जो भक्त आपल्या सर्व कामना /इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.

३. अविच्छिन्नं:

आपण सर्वांनी आपल्या लहानपणी आईकडे हट्ट करून तेलाच्या डब्यातून तेल ओतून पाहण्याचा प्रयोग नक्की केला असेल. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ती तैलधार अखंड असते. देवावर प्रेम करण्याची सवय लावून घ्यावी. सवय झाली की ज्याप्रमाणे वाहन चालवताना गप्पा मारता येतात, गाणी म्हणता येतात, तसे प्रपंच करता करता, प्रपंचाची स्थिती कशीही असली भगवंतावर त्याचे स्मरण ठेवून अखंड प्रेम करता येते.

४. अनुभवरूपम् 

आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकतो. अमक्या मनुष्याचा मी चांगलाच अनुभव घेतला आहे. याचा व्यावहारीक अर्थ असा आहे की त्या माणसाने याला वाईट अनुभव दिला आहे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अर्थात भगवंताचा अनुभव. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासारखे व्हावं लागेल. किंवा त्याच्याशी तादात्म्य पावावे लागेल. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“अणुरेणिया थोकडा | तुका आकाशा एवढा ||”

संत सोयराबाई म्हणतात,

“अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥”

५. सूक्ष्मतरं :

प्रेम जात्याच सूक्ष्म आहे. इथे नारदमहाराज सूक्ष्मतरं असे म्हणतात. आपली सूक्ष्मतेची व्याख्या आपल्या देहबुद्धीप्रमाणे असते. प्रेमाची अनुभूती सुद्धा अधिक सूक्ष्म असते. अशी अनेक उदाहरणे आहेत की भक्ताला कोणीतरी शारीरिक त्रास दिला आणि त्याचे वळ मात्र भगवंताच्या पाठीवर उठले. ज्ञाना नावाच्या रेड्याला पैठण येथे लोकांनी मारले आणि त्याचे वळ माउलींच्या अंगावर उठले. उदा. म्हणून आपण याचा आधार घ्यावा.

६. प्रतिक्षणवर्धमानं :

एखाद्या व्यक्तीवरील एखाद्या मनुष्याचे प्रेम ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत किंवा त्या व्यक्तीचे सौंदर्य टिकेल तोपर्यंत असते, असे आपल्या लक्षात येते. भगवंत अमर आहे, त्यामुळे त्याच्यावरील केलेले प्रेम हे सुद्धा अमर होते. मीरा प्रेमात एवढी तल्लीन होऊन गेली (अर्थात तिचे प्रेम इतके वाढत गेले..) की समोर आणलेला विषाचा प्याला ठाकूरजींचा प्रसाद समजून तिने प्यायला आणि ती अमर झाली.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्ति सूत्रे ५५

तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव श्रृणोति

तदेव भाषयति तदेव चिंतयति ||”

अर्थ: या प्रेमाचा, अर्थात भागवतांच्या प्रेमाचा लाभ झाल्यावर तो सर्वत्र ते प्रेमच पाहतो. सर्वत्र ते प्रेमच ऐकतो. त्या प्रेमाबद्दलच बोलता आणि सर्वकाळ त्या प्रेमाचेच चिंतन करतो.

विवेचन: संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. माझ्यामते तो या सूत्रांचे स्पष्टीकरण अधिक सुलभतेने करू शकेल…

“तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥”

– – भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा अभंग म्हणजे नामदेवांच्या “नामभक्तिचे” एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. “चक्रवाक पक्षी वियोगे बाहती । जाहले मज प्रती तैसे आता ॥” असे म्हणणाऱ्या नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विठ्ठल दिसू लागला. खरं तर “तीर्थ” म्हणजे पाण्याने भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल. म्हणून चंद्रभागा नदी हे “तीर्थ” आणि त्याकाठी वसलेलं “पंढरपूर” हे “क्षेत्र” म्हणजे स्थान! नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झाले. ह्या विठ्ठल नामाच्या गजरात “माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली” आणि म्हणून “देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥. ” पुढे नामदेवांना माय, बाप, आप्त, इष्ट, गण, गोत, गुरू ह्या सगळ्यातच विठ्ठल दिसू लागतो आणि अखेर ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात, ते सुख जे ह्या मायिक विश्वाच्या अतीत आहे, जे कालातीत आहे आणि निरंतर आहे म्हणजेच “नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥”. त्या सुखाचं “निधान” म्हणजे साठाही विठ्ठलच आहे असे ते सांगतात. आता ह्या जागेला पोचल्यावर, विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचे भय नाही.

नारद मुनी जी स्थिती सांगतात की भक्ति मार्गातील परमोच्च स्थिती आहे असे मला तर्काने वाटते. यानंतर काही मिळवायचे असेल किंवा मिळवायची इच्छा राहील असे वाटतं नाही.

संतांचे आपल्यावर उपकार आहेत की त्यांनी ही स्थिती अनुभवली आणि स्वतःचे अवतरण करून ती अभंगाच्या रूपात आपल्या समोर ठेवली, अन्यथा त्याची शाब्दिक अनुभूति आपल्याला घेणं शक्य झालं नसतं…!

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५६ 

गौणी त्रिधा गुण भेदादार्तादिभेदाद्वा||५६||”

अर्थसत्त्व, रज आणि तम या तीन प्रकारांच्या भेदांमुळे किंवा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीन प्रकारच्या भेदांमुळे गौण भक्तीचे तीन प्रकार होतात, करता येतात.

विवेचन: भक्तीचे प्रामुख्याने दोन भाग केलेले आढळतात. एक मुख्य भक्ति आणि दुसरी गौणी भक्ति. सर्वसाधारण मनुष्य बरेच वेळेस अपघाताने या भक्तिमार्गात खेचला जातो, असे म्हटले तर वावगे होऊ नये. कधी हा अपघात सुखद असतोझ तर बरेच वेळेस तो वेदनेचा असतो, असे आपल्या लक्षात येईल. जन्माला आला आणि भक्तिमार्गाला लागला असा जीव सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यास सारखे म्हणता येईल..!

प्रत्येक मनुष्यच नव्हे तर सारी सृष्टि त्रिगुणाची बनलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. सत्व, रज आणि तम. प्रत्येक मनुष्यात या तिन्ही गुणांचे प्रमाण कमीअधिक प्रमाणात असते. ज्याप्रमाणे ते त्या त्या मनुष्याचा अंगी हे तीन गुण असतात, त्यानुसार तो करीत असलेली भक्ति सात्विक, राजस किंवा तामस स्वरूपात प्रकट होत असते. भक्ति न करणाऱ्यापेक्षा तामस भक्ति करणारा बरा. तामस भक्ति करता करता कालांतराने बदल होऊन मनुष्य राजस भक्ति करू लागतो आणि अशी राजस भक्ति वृद्धिंगत होत गेली हा मनुष्य सात्विक भक्ति करू लागतो. या तिन्ही भक्ती चढत्याक्रमाने उत्तम मानल्या जातात.

समर्थ रामदास स्वामी या त्रिगुणांचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – –

“मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।

त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।

तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥”

(दासबोध दशक २, समास ५)

आता मुख्य भक्ति कशी असते हे सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. एकूण चार प्रकारचे भक्त सांगितले जातात. याचे वर्णन गीताई मध्ये पुढील प्रमाणे आले आहे – – 

“भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना|

ज्ञानी तसे चि जिज्ञासू हितार्थी आणि विहृ़ल||”

(गीताई ०७:१६)

– – – सात्विक भक्ति फळास येते तेव्हा तो भक्त सिद्ध स्थितीस पोहोचतो.

मी आहे, हे भक्तिमार्गातील पहिली पायरी. मी आहे आणि देव आहे ही दुसरी पायरी म्हणता येईल आणि देहबुद्धीचा लय होऊन देव आहे आणि मी नाही अशी स्थिती येणे ही भक्तिमार्गातील सर्वोच्च पायरी म्हणता येईल. थोडक्यात काम्य भक्तीतून निष्काम भक्तीकडे वाटचाल होणे म्हणजे भक्तिमार्गात प्रगती होणे असे म्हणता येईल.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५४ / ५५ / ५६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments