तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ जगण्यात राम हवा ! ☆ तृप्ती कुलकर्णी

आपण अनेकदा पूर्वीच्या पिढीकडून एक वाक्य ऐकलेलं असतं—“यात काहीच राम नाही. ” लहानपणी हे वाक्य ऐकताना त्याचा नेमका अर्थ कळत नसे; पण जसजसं आकलन वाढत गेलं, तसं या वाक्यामागचा आशय उलगडत गेला. “राम” म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्या अभावाने जगणं अपूर्ण का वाटतं—या प्रश्नांची उत्सुकता मनात निर्माण झाली.

भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीराम हे केवळ श्रद्धास्थान नाहीत, तर आदर्श जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. अनेक पिढ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली आहे. म्हणूनच “रामराम” म्हणत अभिवादन करण्याची परंपराही आपल्या संस्कृतीत रूढ झाली. म्हणजेच, “राम” हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे.

रामायणातून आपण श्रीरामांचे जीवन वारंवार ऐकले, पाहिले आणि वाचले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्नेह, साहस, संयम, सात्विकता, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसतो. आयुष्यातील अनेक कठीण आणि वेदनादायक प्रसंग त्यांनी अत्यंत शांतपणे आणि धैर्याने स्वीकारले—वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करणे, राक्षसांशी लढणे, सीतेचे अपहरण आणि तिची सुटका, तसेच राज्यप्राप्तीनंतरही प्रजेच्या हितासाठी घेतलेले कठोर निर्णय. स्वतःकडे अपार सामर्थ्य असूनही त्यांनी अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या जीवनातून माणसाने कोणत्या स्तरावर जगावं, याचं सूक्ष्म मार्गदर्शन मिळतं.

त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे नातेसंबंधांची जपणूक. राजा, पुत्र, भाऊ, पती आणि पिता या प्रत्येक भूमिकेत त्यांनी जबाबदारी, संवेदनशीलता आणि न्यायबुद्धी जपली. आजच्या काळातही, कुटुंब असो वा संस्था, नात्यांमध्ये संतुलन आणि विश्वास टिकवण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो.

मानवी जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन पातळ्यांवर उभं आहे. या दोन्हींचा समतोल साधला, तरच जीवन अर्थपूर्ण होतं. आज तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक सोपं आणि सुलभ झालं आहे; अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. तरीही मनाच्या पातळीवर अस्वस्थता, असंतोष आणि तुटलेपणाची भावना वाढताना दिसते. कारण भौतिक प्रगतीच्या तुलनेत मन, भावना आणि आत्मिक जाणीवा यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही.

यामुळेच व्यक्तीच्या आत विसंगती निर्माण होते—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे जणू वेगवेगळ्या दिशांनी ओढ घेतात. विचार काही सांगतात, भावना काही अनुभवतात आणि कृती वेगळ्याच घडतात. परिणामी, मनात अस्वस्थता, मत्सर, लोभ, असुरक्षितता या भावना निर्माण होतात. स्वतःशीच तुटलेपण जाणवू लागतं.

खरं तर “राम” म्हणजे या सर्व स्तरांचं—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा—संतुलित, सुसंवादी आणि एकात्म अस्तित्व. जेव्हा या चारही घटकांमध्ये सुसंगती असते, तेव्हा जीवनात शांतता, समाधान आणि स्पष्टता येते. पण आज आपण स्वतःपासूनच दूर जात असल्यामुळे हा “राम” हरवत चालला आहे.

हा हरवलेला “राम” पुन्हा मिळवण्यासाठी मानवी मूल्यांची जाणीवपूर्वक जोपासना आवश्यक आहे. त्याग, सेवा, समर्पण या गोष्टी आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात. पूर्ण निस्वार्थपणे जगणं जरी शक्य नसलं, तरी आपल्या कृतींमुळे दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, शक्य असेल तिथे त्याला मदतच होईल, हा दृष्टिकोन आपण नक्कीच स्वीकारू शकतो. आपल्या गरजांबरोबर इतरांच्या गरजांचाही विचार करणं, आपल्या उपभोगावर मर्यादा ठेवणं—या साध्या गोष्टीही मोठा बदल घडवू शकतात.

तसंच, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर, शरीराला सक्रिय आणि निरोगी ठेवणं, तसेच तंत्रज्ञानाचा सजग वापर करणंही आवश्यक आहे.

थोडक्यात, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद आणि संतुलन साधणं—यालाच “राम असणं” म्हणता येईल. आतल्या या रामाला जागं केलं, तरच आपल्या बाह्य जगण्यातही समाधान, स्थैर्य आणि अर्थपूर्णता अनुभवता येईल.

आपल्या प्रत्येकाला जगण्यात राम प्राप्त होवो या सदिच्छा!

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments