तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ श्रद्धा…☆ तृप्ती कुलकर्णी ☆
‘श्रद्धा’ ही जगण्यातली ॲबस्ट्रॅक्ट भावना आहे असं मला वाटतं. आपण कुठल्यातरी गोष्टीवर श्रद्धा ठेवतो म्हणजे नक्की काय करतो? श्रद्धा ही फक्त सगुण उपासने पुरतीच मर्यादित नाही. ईश्वर हे जर आपण मोठं तत्व मानलं तर ते ठराविक रूपात, ठराविक आकारात ठराविक प्रकारेच व्यक्त होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे जर आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवला तर ती शक्ती म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट भावनेसारखीच वाटू लागते. एखाद्या कृतीतून, एखाद्या विचारातून आपण त्या भावनेशी जोडले जातो आणि मग नंतर मात्र ती भावना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पण मूर्त रूपात आपल्याला जाणवायला लागते. ती दृष्टी आपली असते ते व्हिज्युअलायझेशन आपलं असतं. सगळ्यांना ते त्या प्रकारेच जाणवेल असं म्हणता येत नाही. त्याला कधी आपण प्रचिती आली असं म्हणू शकतो कधी दृष्टांत झाला असा म्हणू शकतो किंवा आणखीन काही. पण ती असते अमूर्त. आपण जशीच्या तशी आपल्याला आलेली अनुभूती दुसऱ्याला दाखवू शकत नाही. कारण प्रत्येकाचं मन त्यातला भावना आणि त्याचं या ईश्वरी शक्तीशी जोडलं जाणं हे वेगळ्या प्रकारे असतं. एका झाडाच्या सगळ्या फांद्या जशा एकसारख्या नसतात हे आपण समजतो त्याचप्रमाणे एका भावनेच्या प्रगटीकरणाची अनेक रूपं असू शकतात. हेही जाणून घेतलं की ईश्वरी शक्ती आहे /नाही अमुक एक रूपात आहे किंवा नाही हे सगळे वाद निरर्थक आणि व्यर्थ वाटू लागतात.
कधी कधी प्रश्न पडतो माणसाला या शक्तीचं इतकं आकर्षण का आहे? जेव्हा जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न करते तेव्हा जाणवतं की स्वामी समर्थ असे म्हटल्यानंतर जी एक मनात प्रबळ भावना येते ती स्वामीत्वाची असते. माणसाला स्वामित्व हवं असतं पण ते त्याला मिळण्यासाठी कुठेतरी कनेक्ट होणं गरजेचं असतं. ते कनेक्शन देणारी कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी विशेष आणि आदरणीय असते. स्वामींच्या चरणी लीन होत असताना आपल्या जगण्यातल्या अनेक समस्या दूर होऊन आपल्याला त्यांचं स्वामित्व मिळावं आणि त्यासाठी त्यांनी कृपा करावी हा साधा विचार मनात असतो. म्हणजे एकूण जर आपल्या श्रद्धेच्या पाठीमागचं कारण सच्चेपणाने शोधायला गेलो तर अनेकदा ते जगण्यावरचं स्वामित्व मिळवणं असतं. कारण खूपदा अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर नियंत्रण नसतं. अशा वेळी स्वतःवर नियंत्रण आणि परिस्थितीवर नियंत्रण या दोन्हीचा संयोग साधण्यासाठी ही श्रद्धा कामी येते. काही प्रसंग काही घटना यातून पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्याला हा दिलासा मिळतो, तेव्हा आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट होत जाते.
आज स्वामी प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला ही श्रद्धा मिळो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन सर्व काही मंगल होवो या शुभेच्छा! बाकी मला सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात स्वामी तितकेच आपलेच वाटतात.
© तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





