श्री मेघ:श्याम सोनवणे

? जीवनरंग ?

☆  मैत्री… भाग – १ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

“लागवडीचं मधेच काय काढलंय? ” बायको ओरडली, “उद्या रविवार आहे, कामाला बाया मिळणार नाहीत. आणि उद्या तुमचं गेटटुगेदर पण आहे ना? ” 

“मला गेटटुगेदरला जायचं नाही! ” मी शांतपणे बोललो, “उद्याच्याला लागवड करून घेऊ. ” 

“इतके दिवस गेटटुगेदर, गेटटुगेदर नाचत होता आणि आज काय झालं? ” अचानक काढलेल्या कामाने बायको वैतागली होती.

“मला जायचं नाही. विषय संपला! ” 

“रविवारच्या दिवशी दिवस आणि सवयीनी बायका रोज पण जास्त मागतील… ” मला बाहेर जाताना बघून बायको कुरकुर करू लागली. रविवारची लागवड करायची तिची इच्छा नव्हती.

“बायांनी किती पण रोज घेऊ दे. लागवड उद्याच करायची! ” 

मागच्या काही वर्षांत दहावीचं स्नेहसंमेलन घेण्याची टूम निघाली आहे. आमच्याही वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन घ्यायचं ठरवलं. माझ्यासह गावातील काहीजण एकत्र आले आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. स्नेहसंमेलनाच्या आयोजक समितीत मीही होतो.

गावात राहणारे वर्गमित्र सोडले तर दहावीच्या बॅचमधली बरीचशी मुलं संपर्कात नव्हती. मुलींचंही तसंच. लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. क्वचित एखाद दुसरीची भेट व्हायची.

“दादा, उद्या तुमचं गेट-टुगेदरहे ना? ” रविवारच्या दिवशी मालकाने कांदा लागवडीचा घाट घातल्याने गडी बावरला होता. त्या बिचाऱ्यालाही रविवारची सुट्टी हवी असते.

“उद्या कार्यक्रम आहे पण मी जाणार नाही. आपली लागवड महत्त्वाची आहे. ” मी तिरसटपणे बोललो. माझा मूड बघून तो गप्प बसला. रविवारचं काम करणं कुणाला आवडतं?

स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला आणि व्हाट्सअप ग्रुपवर मॅसेजचं प्रमाण वाढलं. कोण कुठे आहे, काय करत आहे याची कल्पना येऊ लागली.

गावातली म्हणजे आमच्याच वर्गातली कितीतरी पोरं-पोरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होती. काही पदव्यांनी मोठे झाले होते, काही अधिकारांनी तर काही पैशांनी. आमच्यातले काही कंपनीत कामगार झाले, काही नोकरदार, काही डॉक्टर, काही इंजिनियर, काही प्राध्यापक तर काही सरकारी अधिकारी. दोन वर्गमित्र तर सैन्यात भरती झाले होते. काही पोरीदेखील पोरांना लाजवतील अशा पदांवर काम करत होत्या.

स्नेहसंमेलनाचा दिवस जवळ येऊ लागला तसा माझ्यातला न्यूनगंड जागा होऊ लागला.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, शनिवारी संध्याकाळी, आम्ही सात-आठ जण शाळेत जमलो. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. दिलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडली होती. आता कार्यक्रमात उपस्थित राहणं एवढाच भाग शिल्लक होता. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझ्याकडे कसलीच जबाबदारी नव्हती.

त्या रात्री मला झोप येईना. वर्गात माझ्या शेजारी बसणारा, अभ्यासातही कायम माझ्या मागे असणारा बोराटे आता महसूल अधिकारी झाला होता. आमच्या वर्गातला साळवे, ज्याच्या घरी त्या काळात खाण्यापिण्याचे वांधे असायचे, किलोस्कर न्यूमॅटिकमध्ये सिनिअर इंजिनियर झाला होता. कायम मागच्या बेंचवर बसून धिंगाणा घालणारा जाधव आता मोठा बिल्डर झाला होता.

एवढंच कशाला? केदारी नावाची मुलगी, जी कुणाला आठवतही नव्हती, झेडपीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परीषद सदस्या झाली होती. ढेरंगे आडनावाचा पोरगा, ज्याला शाळेत असताना चप्पल घालायला मिळाली नाही, आता क्लास-वन ऑफीसर झाला होता.

मला खरं कौतुक वाटलं परटाच्या मोडकाचं! आम्ही एकमेकांना आडनावानेच हाका मारायचो. तो मला लोखंडे म्हणायचो आणि मी त्याला मोडक. खालच्या आळीत त्यांची लाॅन्ड्री होती. त्या काळात कोण रोज कपड्यांना इस्त्री करत होतं? मोडकाची लाॅन्ड्री फारशी चालत नसे. त्याच्या घरी कायमची तारांबळ. ज्या दिवशी तो डबा आणत नसे, त्या दिवशी त्याला मी माझ्या घरी जेवायला नेत असे.

तोच एके काळचा गरीब मोडक आता जर्मनीत नोकरी करत होता. इंग्रजीबरोबर जर्मन भाषा शिकला होता. दहावीनंतर तो शहरात मामाकडे शिकायला गेला आणि त्यानंतर आमचा संपर्कच झाला नाही. आता व्हाट्सअप ग्रुपवर पोरं-पोरी त्याचं कौतुक करत होते. खास स्नेहसंमेलनासाठी भारतात येणार म्हणल्यावर मोडक आमच्यासाठी सेलिब्रिटी झाला होता.

एकदा मला मोडकला व्हाट्सअपवर “हाय” करावसं वाटलं होतं. पण नंतर म्हणलं आता मोडक मोठा माणूस झालाय. त्याने आपल्या “हाय”ला रिप्लाय दिला नाही तर? एक मन असंही सांगत होतं की मोडक स्वतःच मला फोन करेल. पण त्याचा फोन आला नाही.

वर्गातल्या बऱ्याचशा मुला-मुलींनी केलेली प्रगती बघून मला प्रश्न पडले. मला काय कमी होतं? मी का प्रगती करू शकलो नाही? वर्गात माझी गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आमच्या घरची परिस्थिती चांगली होती. वडील मोठे शेतकरी होते. तरीही मी एवढा मागे का राहिलो?

मी शिकलो नाही असं नाही. माझं पोस्टग्रॅज्युएशन झालं. पण करिअर म्हणून जी जडणघडण व्हायला हवी होती ती झाली नव्हती. मला चिंता लागली. आयुष्यात यशस्वी ठरलेल्या मित्र-मैत्रिणींना उद्या तोंड कसं दाखवायचं? सर्वजण विचारणार, “तू आता काय करतो? ” त्यांना काय सांगायचं? शेवटी मी ठरवलं. गेट-टुगेदरला जायचंच नाही.

त्या रात्री नीट झोप आली नाही. पहाटेच उठलो. हळूहळू उरकलं. सहा वाजता ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून शेतात गेलो. बरोबर गडी होताच. सकाळी सकाळी आम्ही कांद्याचं रोप उपटायला सुरुवात केली. आठ वाजता रोजंदारीवरच्या बायका हजर झाल्या. बायको त्यांच्यामागे होतीच. मी पाण्याच्या बाऱ्यावर तर गडी कांद्याचं रोप वाफ्यांनी टाकत होता. वावरात लागवड चालली असली तरी माझं मन शाळेतच होतं.

फोन सायलेंट मोडवर ठेवलेला. आज मी कुणाचा फोन घेणार नव्हतो. दहा वाजेपर्यंत कुणाचा फोन आलाही नाही. साडेदहानंतर मात्र खिशात ठेवलेला मोबाईल थरथरू लागला. दोन-तीन वेळा तसं झाल्यावर मोबाईल चेक केला तर मित्रांचे मिस्ड कॉल. न पाहिल्यासारखं करून मोबाईल खिशात ठेवला.

अकरा वाजल्यानंतर एसएमएस येऊ लागले. नेट चालू केलं तर व्हाट्सअपवर धडाधड मॅसेज पडू लागले. कार्यक्रमालाच जायचं नाही त्यामुळे मॅसेजला उत्तर द्यायचा किंवा कॉलबॅक करायचा प्रश्न नव्हता.

विहिरीवरून आणलेल्या पाईपलाईनचं पाणी पाटाने खळखळत पुढे सरकत होतं. बारं दिल्यावर लोण्यासारख्या मऊ मातीचे गादीवाफे पाण्याने टरारून भरत होते. माझंदेखील मन शाळेच्या आठवणींनी भरून आलं होतं.

पहिली ते चौथी मराठी शाळा आणि पाचवी ते दहावीतली हायस्कूलची वर्षे डोळ्यांपुढे उभी राहिली. मला माझ्या मित्र-मैत्रिणींना खरंच खूप भेटावंसं वाटत होतं. पण काय करणार? मी शेतकरी माणूस. त्यांच्यापुढे कसा जाणार? त्यांना काय सांगणार? स्वतःबद्दल सांगताना “एवढं शिकूनसुद्धा मी मातीत मरतोय” हे सांगू?

आता सर्वजण हॉलमध्ये बसले असतील. आता दीपप्रज्वलन चाललं असेल. आता प्रमुख पाहुणे सरस्वती पूजन करत असतील. आता आमची वयोवृध्द शिक्षक मंडळी व्यासपीठावर बसली असतील. आता माझे मित्र व मैत्रिणी समोरच्या खुर्च्यांवर बसून शिक्षकांची मनोगतं ऐकत असतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतलेला बर्वे आत्ता डायसपुढे उभा बोलत असेल.

कार्यक्रमाचा आराखडा आम्हीच बनवला असल्याने ते नियोजन मला पाठ होतं. मनगटावरच्या घड्याळात बघून ‘आता तिथे काय चालू असेल’ याचा अंदाज मी बांधत होतो. कांद्याची लागवड चालू असलेल्या वावरात उभा असलो तरी मनाने मी शाळेतच होतो. पुढे जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाबरोबर स्नेहसंमेलनात काय घडत असेल याचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहत होतं.

मला मित्रांची, मैत्रिणींची आठवण क्षणोक्षणी येत होती. पण कार्यक्रमात बिझी असलेल्या मित्रमैत्रिणींना माझी आठवण येत असेल का? माझी शंका निराधार होती. जसा इथे मी त्यांना मिस करत होतो, तसं तेदेखील मला मिस करत होतेच की! त्याशिवाय का एवढे मिस्ड कॉल आणि मेसेजेस आलेत?

अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या, श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments