सुश्री सुरेखा चिखलकर
मनमंजुषेतून
☆ नात्यांची वीण – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆
नात्यांची वीण ही रेशमाच्या धाग्यासारखी असते, जितकी मऊ आणि सुंदर, तितकीच नाजूक.
… आयुष्य जगत असताना अनेक माणसे भेटतात, काही मनात कायमचे घर करतात, तर काही जीवाभावाचे सोबती बनतात. पण कधी कधी काळाच्या ओघात किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात हीच हवीहवीशी वाटणारी नाती अचानक दुरावतात. एखादा छोटासा गैरसमज, बोलता बोलता तोंडातून गेलेला एखादा चुकीचा शब्द किंवा केवळ एका क्षणाचा राग, वर्षानुवर्षांच्या प्रेमावर मिठाचा खडा टाकतो आणि सुरू होतो एक न संपणारा अबोला. खरे तर अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची ओढ असते. जुन्या आठवणी आठवून मन भरून येतं, साध्या साध्या गोष्टींतून एकमेकांची उणीव भासते, पण संवाद मात्र खुंटलेला असतो. या दुराव्याचं सर्वात मोठं कारण असतं ‘अहंकार ‘म्हणजेच इगो. मी का वाकू? मी का आधी बोलू? मी वयाने मोठा आहे तर त्यानेच आधी यायला हवं, किंवा मी लहान असूनही मला सन्मान मिळाला नाही, अशा विचारांचे काहूर मनात माजलेले असते.
मोठेपण आणि लहानपण या तराजूत जेव्हा आपण नात्याला तोलतो, तेव्हा नात्याचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं. आपण हे विसरतो की, नाते टिकवण्यासाठी कोणाचे तरी वयाने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठे असणे जास्त महत्त्वाचे असते.
कोणतेही नाते पुन्हा पूर्ववत करायचे असेल, तर अहंकाराची भिंत पाडावीच लागते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा विचार केला की इगोची किंमत शून्य होऊन जाते. चूक कोणाचीही असो, पण जर ते नाते आपल्यासाठी अनमोल असेल, तर पुढाकार घेण्यात कसलीच लाज वाटायला नको. कधी कधी ‘सॉरी’ म्हणण्याने आपण लहान होत नाही, उलट ज्याला आपल्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीची साथ जास्त महत्त्वाची वाटते, तोच खरा मोठा असतो.
अबोला हा नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे, तो केवळ अंतर वाढवतो. त्याऐवजी समोरासमोर बसून, मनमोकळेपणाने बोलल्यास मोठमोठे डोंगरही विरघळून जातात. नाती ही जपून ठेवायच्या वस्तू नसून ती जगण्याची अनुभूती आहे.
– – आयुष्याचा प्रवास तसा छोटा आहे, त्यात रुसवे-फुगवे आणि अहंकार घेऊन चालण्यापेक्षा प्रेमाची शिदोरी सोबत असलेली केव्हाही चांगली. जर तुम्हाला वाटत असेल की एखादं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग उशीर करू नका. ‘मोठा ‘ किंवा ‘छोटा ‘हा विचार बाजूला ठेवा आणि मनाच्या मोठेपणाने संवादाचा हात पुढे करा. कारण गेलेली वेळ आणि तुटलेली माणसं पुन्हा मिळवणं कठीण असतं. एखाद्याला गमावून पश्चात्ताप करण्यापेक्षा, स्वतःचा इगो बाजूला सारून त्या नात्याला पुन्हा एकदा फुलायला मदत करणं, हेच खऱ्या समृद्ध आयुष्याचं लक्षण आहे.
☆
© सुरेखा चिखलकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





