श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, दळणवळण सुविधा नाहीत. आरोग्याच्या सोयी तर नाहीतच पण जंगलातील माडिया, गोंड यासारखे आदिवासी तर आरोग्य आणि शिक्षण यांच्याबद्दल काडीचीही आस्था नसलेले. अशा वेळी बाबांना प्रश्न पडतो. मी तर आनंदवनात कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु केलंय पण अशा बिकट ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवाना कोण सेवा देणार? त्यांच्या मनातील खंत जाणून घेऊन नुकताच डॉक्टर झालेला प्रकाश म्हणतो, ‘ मी करीन इथे काम. ‘ बाबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.

एम बी बी एस झालेला, डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरळत असलेला हा तरुण निश्चय करतो आदिवासींच्या सेवेचा. त्याच्यासाठी हे काम अजिबात सोपं नसतं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि त्या तालुक्यातील हेमलकसा हे ठिकाण. इथे सुरु होतो लोकबिरादरी प्रकल्प. या क्षेत्रात माडिया, गोंड आदी आदिवासी जमातींचा निवास. त्यांची भाषा वेगळी. राहणी तर कमालीची साधी. अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. शिकार करून मिळेल ते खायचे. नाही मिळाले तर उपाशी राहायचे. कुपोषित बालके जन्माला येणं ही तर जणू काही इथली परंपराच! त्यातील काही योगायोगाने जगायचे आणि पुढे अनेक आजारांचे शिकार व्हायचे. बाळंतपणत होणारे मृत्यूही भरपूर. त्यांना कोणी काही सांगू गेले किंवा शिकवू गेले तर, त्या माणसाला ते आपला शत्रू समजायचे अशी सगळी परिस्थिती.

अशा भयाण परिस्थितीत प्रकाशाची एक छोटीशी पणती तेवत होती ती प्रकाश आमटेंच्या रूपाने. जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी उभारली गेली. या झोपडीला दारही नव्हते. प्रकाश यांची सहधर्मचारिणी मंदाताई या झोपडीतच त्यांच्यासवे आल्या. त्याही डॉक्टर होत्या. पण त्यांनीही आपल्या पतीसमवेत सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले. आदिवासींमध्ये काम करणे सोपे नव्हते. अशा बाहेरच्या व्यक्तींना स्वीकारायला आदिवासी अजिबात तयार नव्हते. त्यासाठी या दाम्पत्याला त्यांची भाषा शिकावी लागली. त्यांच्याप्रमाणेच साधी राहणी ठेवावी लागली. हळूहळू त्या लोकांचा विश्वास या दाम्पत्यावर बसू लागला. ही माणसे आपल्याला मदत करण्यासाठीच आली आहेत अशी त्यांची खात्री झाली. लोकबिरादरी प्रकल्प मार्गी लागला. आदिवांसीसाठी दवाखाना, शाळा सुरु झाली.

४ नोव्हेंबर २०१९ हा तो दिवस. याच दिवशी या सेवाव्रतींचे दर्शन आम्हाला घडले. त्या दिवशी आम्ही हेमलकशाला गेलो होतो. भेटीसाठी प्रकाश आमटेंची वेळ मिळाली होती. प्रकाश आमटे आणि मंदाताई भेटणार म्हणून कोण आनंद झाला होता. माझ्यासारखेच इतरही काही पर्यटक प्रकाश आमटेंचं सेवाकार्य आणि लोकबिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी आले होते. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. एवढ्यात डॉ प्रकाश आणि मंदाताई आल्या. त्यांच्या राहण्यातला साधेपणा, वागण्याबोलण्यातली अकृत्रिमता लक्ष वेधून घेत होती. आमच्याशी त्यांनी काही वेळ संवाद साधला. त्यावेळी माझं ‘ कवडसे सोनेरी… अंतरीचे ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालं होतं. ते पुस्तक त्यांना भेट देण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ प्रकाश यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती आम्हाला दिली. आणि मग स्वतः आमच्यासोबत येऊन त्यांचे प्राणी अनाथालय त्यांनी आम्हाला दाखवले. प्राण्यांबरोरबर ते संवाद साधत होते. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना भरवत होते. ते मुके जीव सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या देवमाणसाला अत्यंत प्रेमाने प्रतिसाद देत होते.

डॉ प्रकाश यांचं प्राणीप्रेम, त्यांना घराच्या एखाद्या सदस्यासारखं सांभाळणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्या थोड्या वेळात अनुभवल्या. त्यांचं हे प्राणी अनाथालय कसं सुरु झालं याची हकीकत रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. जंगलात राहणारे आदिवासी जो प्राणी दिसेल, त्याची शिकार करून खात.

शक्यतो वानरांची शिकार कोणी करत नाही पण एकदा काही आदिवासी माणसे एका वानरीणीची शिकार करून तिला घेऊन जात होते. वानरी मृत झाली होती पण तिचे पिलू जिवंत होते. ते तशाही अवस्थेत तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करीत होते. कोणत्याही सहृदय व्यक्तीचे मन हेलावून टाकणारे ते दृश्य होते. प्रकाश यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी त्या आदिवासींना त्या पिलाला सोडून द्या म्हणून विनंती केली. पण ते म्हणाले की आमच्या लेकरांना खायला काय द्यायचे? तेव्हा डॉ प्रकाश यांनी त्यांना डाळ तांदूळ दिले. तेव्हा आदिवासींनी ते पिलू त्यांच्या हवाली केले. ही त्यांच्या प्राणी अनाथालयाची पहिली सुरुवात होती. पुढे मग जंगलात सापडलेली अनाथ पिले आदिवासी डॉ प्रकाश यांना आणून देऊ लागले. आपल्या आईलाही ज्यांनी पाहिले नाही अशा या अनाथ पिलांना आईची माया डॉ प्रकाश यांनी दिली.

हेमलकसा इथे साधारणपणे १९७४ च्या सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर २६ डिसेंबर हा डॉ प्रकाश यांचा जन्मदिवस. आता त्यांचं वय सुमारे ७६/७७ वर्षे असावं. या दरम्यान जीवनातील खूप चढउतार या दाम्पत्याने अनुभवले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे आमटे कुटुंब. तोच वारसा डॉ प्रकाश आणि मंदाताई यांनी पुढे चालवला. अनेक आदिवासींना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांची पुढची पिढीही हा वारसा जपते आहे, पुढे नेते आहे. आपल्या परिसरातील रुग्णांची सेवा करता करता डॉ प्रकाश याना गेल्या वर्षी एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागला पण सेवाकार्याची पुण्याई पाठीशी असल्याने त्यातूनही ते सुखरूप बाहेर पडले. आदिवासींची सेवा करताना त्यांनी भेदभाव केला नाही. अनेक नक्षलवाद्यांवरही त्यांनी उपचार केले, त्यांचे समुपदेशन केले. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांची दूर रवानगी केली.

हेमलकसा येथील शाळा सुद्धा पाहण्यासारखी आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी या शाळेत जीवनाचे धडे गिरवत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण त्यांना इथे दिले जात नाही. शेती करणे, निरनिराळे उद्योगव्यवसाय करणे, निरनिराळी कौशल्ये हस्तगत करणे या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. जीवनमूल्ये शिकवली जातात. या विद्यार्थ्यातून अनेक विद्यार्थी शिकून मोठे होऊन आज मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत, तर काही आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करत आहेत. डॉ प्रकाश आमटे म्हणतात, ‘ मी तर केवळ निमित्तमात्र आहे. हे सगळे टीमवर्क आहे. मला सेवाभावी कार्यकर्ते मिळाले म्हणून एवढे मोठे कार्य करणे शक्य झाले. ‘ त्यांचे हे उद्गार त्यांची नम्रता दर्शवतात. डॉ प्रकाश आणि डॉ मंदाताई यांना मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या कार्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यांच्यामुळे या पुरस्काराना मोठेपण लाभले आहे. त्यांनी लिहिलेली ‘ प्रकाशवाटा ‘ आणि रानमित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा ‘ डॉ प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो ‘ हा सुंदर चित्रपट आहे. यात नाना पाटेकर यांनी डॉ प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटातील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गीत अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर आहे.

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे,

जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

अशाच ‘सत्यसुंदराचा ध्यास घेतलेल्या’ डॉ प्रकाश आमटे यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments