शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – १ ☆ शीला पतकी 

शब्दावाचुनी संवादाची

 लाभे तुज स्वरभाषा 

सप्तसुरांची एक स्वामिनी 

नाम तिचे आशा…

अशी ही सुरांची स्वामिनी दोन महाराण्यातील महाराणी आशा भोसले काल आपल्याला सोडून गेली. 92 वर्षाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख एकेरी करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणाच दिसतो. देवाला जसे आपण अरे परमेश्वरा असे म्हणतो तत्वत त्या दोन भगिनींना.. लता आणि आशा अशा… याना एकेरी संबोधनच मिळाली आणि तीच जगातील सर्वात आपलेपणाची भावना आहे असे मला वाटते.

काल टीव्ही वरती एक वाजता अचानक पणे बातमी आली आशाबाई आपल्याला सोडून गेल्या दोन मिनिट धक्काच बसला विश्वास बसेना चार वर्षांपूर्वी एक स्वर हरपला आणि आज दुसरा..! खूप वाईट वाटलं पण शेवटी मन म्हणायला लागलं अरे जगणार किती वर्ष. समृद्ध आयुष्य जगलेल्या जीवाने लोळत घोळत जाणे बरोबर नाही. आशाबाई अशाच उठून निघून गेल्या एका समृद्ध, संघर्षमय, बंडखोर, मिश्किल युगाचा अंत झाला. मंगेशकरांच्या पाच भावंडामधली ही सगळ्यात चुलबुली मुलगी.. एकदा एका मुलाखतीत ऐकले होते.. आशा घरात कुठे सापडली नाहीतर लहानपणी घरातली सारी या मुलीला हुडकायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री बरोबर सांगायच्या अगं पलीकडच्या गल्लीत बाया शेवाया घालताहेत तिथे गेले असेल शेवया धरायला…! अशा बाईनी लहानपणापासूनच अशा शेवया घाल कुरडया कर पापड्या घाल सांडगे तोडून दे… या सगळ्या गोष्टीत आनंद घेतला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल आणि केवळ तीन वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या भगिनीलाच सर्वस्व मानून तिचे श्रद्धेने ऐकत त्या मोठ्या झाल्या. लताबाईंवर जबरदस्त विश्वास ती म्हणाली आई वडिलांच्या पायाचे पाणी तीर्थ असते ते प्याल्याने आपले जीवन सुखी होते आणि ते झोपले असताना त्यांच्या पायावरून पाणी घालून ते एका ताटलीत जमा करून तीर्थसारखे प्राशन करणाऱ्या बहिणी… आशा बाईनी हा किस्सा सांगताना सांगितला होता… कदाचित आई-वडिलांच्या पदस्पर्शाच्या त्या पाण्याने आमचे जीवन उजळून निघाले त्यांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मोठ होता आलं…

मोठं होण्यासारखं काय होतं जवळ? वय अत्यंत लहान पाच भावंड एकट्या आईने काय करावं पैशाची विलक्षण नड दीनानाथ मंगेशकर गेल्यानंतर त्यांना घरी आणावं की नाही का तसेच स्मशानभूमीत न्यावे? हा प्रश्न त्या घराला पडला होता कारण दोनदा टॅक्सी करणे एवढे भाड्याचे पैसे नव्हते तरीही माईनी घरी नेण्याचा निर्णय घेतला ह्या सगळ्या घटनांचा परिणाम लताबाईंवर झाला होता कारण त्या थोड्याशा कळत्या होत्या. बाकी सगळे भावंडे लहानच होती ना मग सगळी श्रद्धा आपल्या मोठ्या बहिणीवर…! सुरांची जादू सगळ्यांजवळच होती लताबाई आपण मेहनत करत आणि इतराना करायला लावत. यौवनात पदार्पण केल्यानंतर आशाबाई थोड्या बंडखोर निघाल्या मनस्वी होत्याच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला. गणपतराव भोसले यांच्याशी लहान वयात लग्न केलं ते घरी कोणालाही पसंत नव्हतं तरीही त्यांनी आपला संसार नेटका करायचा प्रयत्न केला खूप गरिबी बघितली. गणपतराव भोसले विलक्षण हिंसक खूप त्रास दिला पण आपण केल आहे आपण निभावायच आहे हा आशाबाईंचा विश्वास ठाम होता, आणि त्यांनी ते केले. ही आशा भोसले यानी सांगितलेला एका मुलाखतीला किस्सा आहे… की मी कोणत्याही साडीवर पांढरा ब्लाउज घालून जात असे कारण माझ्याकडे तो एकच चांगला ब्लाऊज होता जुना ब्लाउज रात्री घालायचा आणि हा धुवून ठेवायचा सकाळी तो ब्लाउज साडीवर घालून रेकॉर्डिंग ला जायचं त्यामुळे दोन्ही खांद्यावर पदर घट्ट लपेटून म्हणलेली त्याची गाणी आपल्याला चित्रीकरणात दिसतात हे सार त्यानी मागे टाकले आणि मेहनतीच्या जोरावर त्या पुढे गेल्या त्यांना कामे मिळताना लताबाईंचाच तर मोठा अडसर होता लताबाईंच्या आवाजाची जादू लोकांवर साम्राज्य करीत होते पण हळूहळू त्यानी आपल्या आवाजाची जादू दाखवायला सुरुवात केली. आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले लताबाईंशी स्पर्धा नाही त्या नेहमी म्हणत लता शेवटी लता आहे..! एका मुलाखतीत तिने सांगितले होते दीदी कडून दाद मिळवणं खूप कठीण… एका गाण्यांमध्ये दोघी एकत्र गात होत्या गाणं होतं… मन क्यू बहका रे बहका आधी रात को… त्यावर अशा बाईंची दुसरे ओळ आहे बेला मेहका रे मेहका आधी रात को… आधी रात हा शब्द त्यांनी इतका सुंदर म्हणलाय लताबाईंनी चष्मा खाली घेतला आणि तिला हसून दाद दिली की अरे वा काय सुंदर हमसे भी आगे हो.. आशाबाईनी सांगितलं असे क्षण खूप कमी पण ते मी जपून ठेवले आहेत.

 लताबाईंपेक्षा वेगळ्या धाटणीची असंख्य गाणी गाऊन सुद्धा म्हणजे कव्वाली भावगीत शास्त्रीय संगीत गायले गझल गायल्यात पाश्चिमात्य घाटाची गाणी गायली. कॅब्रे सॉंग गायलं… इतके वैविध्य आशाबाई देऊ शकल्या तरीही त्या म्हणतात लता ही लताच आहे तो हिमालय आहे हे असं म्हणायला खूप मोठे पण लागत. आपल्या मोठ्या बहिणीबद्दल आदर प्रेम हे सगळं सगळं ओसंडून वाहत होतं लताबाई एखादी गोष्ट नाही म्हणाल्या की आशांनी पुढे जाऊन ते कधीच केलं नाही कारण त्यांना कळून चुकलं होतं कि ती जे सांगते त्यात खूप जास्त तथ्य असते. अनेक डॉलरची बिदागी देऊन आपल्या मुलाच्या लग्नात लता आणि अशांनी गावे अशी इच्छा एका माणसाने व्यक्त केली होती लता दीदीनी त्याला साफ नकार दिला. आशाबाई येतील अशी आशा त्याला वाटत होती लताबाईंनी फक्त एकच वाक्य उच्चारलं… ” लता तू लग्नात जाणार आहेस का गायला? ” ह्या एका वाक्यात सगळं काही भरून होतं आणि आशाबाईने तात्काळ नकार दिला.

आशाबाई बंडखोर होत्या कारण त्या लहान बहीण होत्या हट्ट करणे बंडखोरी करणं हा त्यांचा हक्कच होता पण लताबाई ना ते करून जमणार नव्हतं कारण त्यांच्यावर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं होतं आणि हे करत असताना आपल्या भावंडांनी कुठेही चुकू नये चुकीचा निर्णय घेऊन ये चुकीच्या ठिकाणी गाऊ नये हाच लताबाईंचा उद्देश होता आणि हा त्यांचा हेतू ती सर्व भावंड जाणून होती त्यामुळे लता बाई त्यांच्यासाठी बहीणच नव्हे तर आई बाप सर्वस्व होत्या खूप मुली आपल्या कुटुंबासाठी राबतात पण त्यांची भावंड कदर करतीलच असं नाही लताबाईंच भाग्य मोठं ही सगळ्या भावंडांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. आशाबाईंच्या प्रत्येक मुलाखतीत लतादीदींबद्दल विलक्षण आदर प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments