श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

काही गोष्टी ‘मन’ रिचार्ज करतात.

झालं असं की…

ऑफिसच्या कामानिमित्त खूप वर्षांनी बालपण जिथं गेलं त्या भागात जाण्याचा योग आला. दहावीत असताना घर बदललं त्यानंतर इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही आणि ऑफिसमुळे अनपेक्षित संधी मिळाली.

काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. ताबडतोब शाळेजवळ गेलो. खूप वर्षांनंतर ‘शाळा’ पाहताना आठवणींची एकेक फोल्डर उघडली. ‘मन’ पुन्हा शालेय दिवसात रमलं. मोबाइलच्या आवाजानं वास्तवात आलो. भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध भेळेची आठवण झाली. ते दुकान अजूनही चालू असेल की नाही असा विचार डोक्यात आला. ‘जाऊन बघू’ म्हणत निघालो. बालपणी पायी तुडवलेल्या गल्ली, बोळातून जाताना भन्नाट फिलिंग होतं. दहा मिनिटांत पोचलो. चक्क दुकान चालू होतं. आजूबाजूला आकर्षक बोर्ड, लखलखाट असलेल्या दुकानांच्या रंगबिरंगी गर्दीत साधा बोर्ड असलेलं भेळेचे दुकान लक्ष वेधून घेत होतं. गाडी पार्क करून दुकानात गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास वीसेक वर्षांनी आलेलो तरीही सगळं जसच्या तसं, पंधराजण बसतील एवढीच जागा, पन्नास वर्षाच्या वाटचालीविषयीची कात्रणं भिंतीवर लावलेली. सोबतच गिऱ्हाईकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आदेशवजा विनम्र सूचनांचा बोर्ड, तिथंच तीन प्रकारच्या भेळीचं मेनूकार्ड, लाकडी बाक, जुन्या धाटणीचं टेबल, त्यावर चिंचेच्या पाण्याचा स्टीलचा तांब्या आणि शेजारी हिरव्या चटणीचं भांडं, समोरच भेळ करण्याच्या तयारीत मश्गुल मालक, गंमत वाटली लहान असताना यायचो तेव्हाही दुकानात कामगार नव्हते आताही नाही. सगळी कामं मालक आणि कुटुंबीयच करत होते. आवडीच्या भेळेची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर ‘वाह!! ’ आपसूक तोंडातून निघाले. अजूनही ‘चव’ तशीच. यत्किंचितही बदल नाही. चिंचेचं पाणी, चटणी घेतली आणि उदरभरणात गुंग झालो. मन तृप्त झालं. तीन भेळ पार्सल घेतल्या. बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तेव्हा तिशीतले मालक आपल्या मुलाला ‘भेळ’ बनवायला शिकवत होते.

“वा, भेळ वारसा पुढच्या पिढीकडे.. ”मी बोलल्यावर मालक फक्त हसले.

“खूप वर्षापूर्वी तुमच्या वडीलांना असंच शिकवताना पाहिलं होतं. ”तिथल्या फोटोकडे बोट दाखवत म्हणालो.

“म्हणजे तुम्ही!! ”

“इथली भेळ एक रुपयाला मिळायची तेव्हापासून खातोय. नऊवारीतल्या आजी काउंटर सांभाळायच्या आणि पांढरा पायजमा, हाफ शर्टातले वडील सगळी कामं करायचे. आता तुम्ही आणि नंतर हा छोटा.. पिढी बदलली पण चव नाही. वा!! तात्पुरतेपणाला महत्व असलेल्या काळात वारसा जपला जातोय हे महत्वाचं. छान वाटलं. खूप शुभेच्छा!! ”खुष झालेल्या मालकांनी हातात श्रीखंडाची वडी ठेवली. त्यांच्यासोबत छानपैकी सेल्फी घेऊन निघालो. जुनं जाऊन नवीन येणं हे निसर्गाचं चक्र. आयुष्यही तसंच चालू असतं पण काही परंपरा, वास्तु, ठिकाणं हे पुन्हा जुन्या काळात घेऊन जातात. भेळीच्या निमित्तानं अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. मस्त वाटलं. घरी पोचलो तरी मन आठवणीतच रेंगाळलेलं.

वास्तव विसरायला लावणारी अशी ठिकाणं असतात. जिथं पद, प्रतिष्ठा, अहं काही आडवं येत नाही. अशा ठिकाणी वेळ काढून भेट द्या. भारी वाटेल.

“दिल ढूंढता हैं, फिर वही फुरसत के रात दिन…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments