श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “पैसा नाती बदलतो हेच खरं !!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की…
गाडी सर्व्हिसिंगला दिली म्हणून बसनं ऑफिसला निघालो. दहा-पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर बस आली बऱ्यापैकी गर्दी होती. लांबचा प्रवास असल्यानं मागच्या सीटवर का होईना पण बसायला जागा मिळाल्याचा आनंद झाला. स्थिरस्थावर झाल्यावर सहज लक्ष गेलं तेव्हा पुढच्या सीटवर बसलेला दाढीवाला ओळखीचा वाटला. निरखून पाहिलं. तो पम्या होता. माझा मित्र. एकाच शहरात असून देखील तब्बल दहा वर्षानी आम्ही भेटत होतो. मी हाक मारणार इतक्यात पम्यानचं मागे वळून पाहिलं पण मला पाहून त्याचा चेहरा खारकन उतरला. पम्याचं पडलेलं तोंड बघून राग आला अन वाईटही वाटलं. दोघं औपचारीक हसलो. तोंडदेखले विचारपूस झाली. बोलताना पम्या नजर चुकवत होता आणि अचानक उभं राहत म्हणाला “बाय, परत भेटू. माझा स्टॉप आला”बस थांबल्यावर घाईघाईनं उतरून पम्या भरभरा चालायला लागला.
“काय पण एकेक नमुने असतात. ”कंडक्टर.
“काय झालं”मी विचारलं.
“यानं लास्ट स्टॉपचं तिकीट काढलं पण मध्येच उतरला”कंडक्टर हसत म्हणाला. मी काहीच बोललो नाही.
पम्या आणि मी, लहानपणापासूनचे मित्र. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मार्ग वेगवेगळे झाले तरी मैत्री शाबूत होती. नोकरी सोडून पम्यानं व्यवसाय सुरू केला. कामाच्या व्यापात हळुहळू आमचं भेटणं कमी झालं तरी आधीमधी सणाला भेटीगाठी व्हायच्या. आठ-पंधरा दिवसातून फोन व्हायचे.
एकदा सकाळी सातलाच पम्या भेटायला आला. त्याचं असं अवेळी भेटण्यानं मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अंदाज खरा ठरला. पम्यानं उसने पैसे मागितले. शक्यतो मैत्रीत पैशाचा व्यवहार करू नये आणि केलाच तर पूर्ण पारदर्शकता हवी असं माझं स्पष्ट मत. आजतागायत मी असे व्यवहार टाळलेत. पम्याला स्पष्ट ‘नाही’सांगितलं पण त्यानं पिच्छाच पुरवला. रोज फोन किवा मेसेज करत होता. “यावेळेला मदत कर. परत कधीच मागणार नाही. दोस्तीची शपथ” “खूपच गरज आहे” “आयुष्यभर लक्षात ठेवीन” हेच पुन्हा पुन्हा सांगत होता. शेवटी मैत्रीखातर तीन महिन्यात परत करण्याच्या बोलीवर पैसे दिले. त्यानंतर काही दिवसांनी पैशाचा विषय काढला पण ‘देतो रे, लक्षात आहे”एवढंच उत्तर मिळालं. आमची मैत्री आणि माझा भिडस्त स्वभाव यामुळे सारखं सारखं पैसे मागणं योग्य वाटलं नाही. याविषयी घरीही सांगता येत नव्हतं. पैसे मिळाल्यावर पम्याचं वागणं बदललं. त्यानं घर, मोबाइल नंबर बदलला. नवीन पत्ता कोणालाच माहिती नव्हता. आमच्या कॉमन मित्रांशी बोलताना समजलं की पम्याला पैसे दिलेले माझ्यासारखे अजून एकदोघं आहेत.
दहा वर्षे झाली अजून एक रुपायाही परत मिळालेला नाही. उसने दिलेले वीस हजार रुपये अक्कल खाती जमा केलेत.
मैत्रीत अडीअडचणीला मदत केलीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. गरजेच्या वेळी मलाही मित्रांनी मदत केलीय. त्याची जाणीव आजही आहे. प्रत्येक मित्र ‘पम्या’ नसतो हे शंभर टक्के मान्य पण उसने पैसे मागणारा आणि वेळीच परतफेड न करणारा एकतरी ‘पम्या’ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. गायब झालेला पम्या अचानक भेटला आणि लगेच पळून गेला. प्रश्न पैशाचा नव्हता तर मैत्रीचा, विश्वासाचा होता. तोंड लपवण्यापेक्षा पैसे देऊ शकत नाही स्पष्ट सांगितलं असतं तरी चाललं असतं पण पम्यानं मैत्रीपेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं. वाईट याचचं वाटतं. जवळच्या माणसाकडून फसवलं जाणं फार त्रासदायक असतं. पैसा नाती बदलतो हेच खरं!!
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






