श्री संभाजी बबन गायके

 

??

“किती कठीण असेल हे ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

बीज एका मातीत रुजतं, वाढतं आणि मोठं होत राहतं आणि कालांतरानं तिथंच आणि त्याच मातीत मिसळून जातं. पण मानवी समाजातल्या मुलगी नावाच्या बीजाला एका मातीत वाढावं लागतं आणि मुळांसह उपटल जात दुस-या मातीत स्वत:ला गाडून घ्यावं लागतं… आणि तिथंही नुसतं रुजावं लागणार नसतं तर वाढावं लागतं… इतरांना सावली, फळं आणि आधार देण्यासाठी. या झाडाला दुसरी ओळख लगडलेली असते… एखादी नदी सागरात विलीन झाली की ती सागरच होऊन जाते, तशी!

पण मुलीचं एकाच मातीत रुजून तिथंच नष्ट होणा-या बीजापेक्षा किंचित बरं असतं… तिला नव्या मातीत एका आधीच वाढलेल्या झाडाचा आधार मिळतो… नव-याचा! किंबहुना या नात्यात नव-याचं हेच तर मुख्य काम असतं… अन्यथा त्याच्या संसाराची बाग फुलणार नाही!

जसं बाळाचं सर्वांत जवळचं जर कुणी असेल तर ती आई असते, तसे विवाहोत्तर आयुष्यात मुलीचं त्या नव्या घरात सख्खे जर कुणी असेल तर तो नवरा असतो… किंबहुना असावा लागतो. त्याच्या आधारे, त्याच्या साठी ती नवी नाती स्वीकारते आणि फुलवत राहते. रातराणी जसं फुलून येण्यासाठी चंद्र उगवण्याची प्रतीक्षा करत दिवस ढकलते, तशी नवपरिणिता नवरा घरी येण्याची वाट पहात राहते दिवसभर. कारण या अनोळखी जगात संवाद साधायचा तरी कुणाशी आणि किती? अर्थात, उलटत जाणारे दिवस हे सुसह्य करू शकतात… अनुभवाने नाती घट्ट किंवा ढिली होत जातात! अर्भकाला केवळ स्पर्शावरून समजतं… कुणाच्या खांद्यावर मान टाकली की झोप येते आणि जीवाला घोर रहात नाही!

ती याच मुलींची प्रतिनिधी. आईबापाचं नाव राखण्यासाठी त्यांचं नाव त्यागून नवं नाव, नवी भूमिका स्वीकारत जीवनाच्या रंगमंचावर एक पात्र जगून दाखवण्यासाठी उभी राहणारी.

लग्नाच्या धामधुमीत पहिले काही दिवस निघून गेले असतील… त्यात देवकार्य झालं असेल, एकदा सूनबाईला घेऊन घरी येऊन जा या आग्रहाखातर नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या असतील. आणि मग सर्वांच्या शोधक नजरांच्या पल्याड जाण्यासाठी दूर जावं लागलं असेल… मधुचंद्र म्हणजे केवळ एकांगी प्रवास नसतो… चंद्राच्या साक्षीने एकमेकांना प्रदक्षिणा घालत राहण्याच्या आणाभाका आणि कक्षा ठरवायचे हे दिवस!

नव-याकडून अनेक गोष्टी समजत जातात, नात्यांचे अर्थ, त्यांच्या सीमा, त्यांच्या बोलण्याचे, कटाक्षांचे मतितार्थ ध्यानात येतात. हे अगदी भरात आलेलं असताना, मोकळ्या आकाशाखाली तिच्या माथ्यावर मध्यान्हीचा सूर्य आग ओकून गेला… कपाळावरचं कुंकू मृत्यू नावाच्या रसायनाने रक्ताचा लाल रंग वागवू लागले!

त्याला निरोप देईपर्यंत सर्व काही लक्षात आलं… पण त्याला मूठमाती देऊन आपल्या देहाची माती घरी आणल्यावर, ज्यावर तांदळाचं माप ठेवलं होतं आणि ते माप हलकेच उलटवून जीवनाच्या अक्षता भूमीच्या स्वाधीन केल्या होत्या… तो उंबरा ओलांडताच समजलं की घरातल्या या गर्दीत आपलं कुणीच नाही! जे आहेत त्यांना आपलं मानावं लागणार आहे… कुणाच्याही आधाराशिवाय अर्धवट वाढलेल्या नाजूक वेलीला आभाळाकडे वाटचाल सुरु ठेवावी लागणार आहे!

ओले मूळ, खडकाचे अंग भेदी हे खरं असलं तरी काळाचा खडक भेदत राहणं म्हणजे प्रत्येक क्षणी बोटं रक्तबंबाळ करीत राहणे… खडक कित्येक वर्षांच्या अनुभवाने अधिकाधिक कणखर झालेला असतो. त्याला सुरुवातीला तर मूळाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ गुदगुली वाटत असेल! अशी अनेक मूळं या खडकांनी सुकून गेलेली पाहिलेली असतात!

ती मात्र अजूनही तग धरून आहे. ती बाहेर पडते पण तिला घरी यावं लागतंच. तिचे आईबाप तिच्या माहेरी आहेत, तिला त्याच्या आईबापाला त्याची कमतरता जाणवू द्यायची नसते. तिला काही सांगायचं असतं… भिंती ऐकून घेतात पण काही प्रतिसाद देत नाहीत. रात्रीचा अंधार पूर्णवेळ हिच्या बंद पापण्यांआड उघड्या असलेल्या डोळ्यांकडेच तर पहात जागत राहतो! सूर्याचं पहिलं किरण दिसत नाही… कारण दमून गेलेल्या पापण्या उघडता उघडत नाहीत… त्यांच्यावर मनाचं आणि मणा-मणाचं ओझं असतं.

वेलीच्या पोटी एखादं फूल असेल तर त्याचा आधार मिळतो… पण इथं तर तेही नाही. जाणारा प्रत्येक क्षण नवीनवी आव्हानं समोर उभे करत राहतो. गर्दीतला हा एकांतवास नरकापेक्षाही भयावह. भावनांच्या आहारी जायचं की व्यवहाराच्या हा तिढा सुटता सुटत नाही. हे सोडलं तर पळून गेलेलं चालणारं नसतं आणि धरून बसलं की ओरखाडे सुरूच राहतात… खूप कठीण असतं हे… खूप कठीण असतं हे!

या अंधा-या गुहेचं प्रकाशाच्या बाजूला उघडणारं टोक या पावलांना कधी तरी गवसू दे… देवा!

आशेया… पहलगाम मध्ये सर्वस्व गमावून परत आली आहे… एक वर्ष म्हणजे आपल्यासाठी फार कमी कालवधी असला तरी तिच्यासाठी एक युग असेल… आणखी अशी किती युगं तिच्या नशिबी आहेत देवच जाणो! आपण केवळ प्रार्थना करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो तिला! ह्या ओल्या जखमा सुकाव्यात, त्यांवर आशेचं आवरण चढत जावं आणि एक नवं जग तिच्यासाठी आकाराला यावं! 

सहज मनातलं.. माणूस म्हणून मनात आलेलं…..

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments