श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४१ आणि ४२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ४१ —
बहु हिंडता सौख्य होणार नाही |
सीणावे परि नातुडे हीत काही |
विचारे मना अंतरा बोधवीजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४१|
अर्थ: समाधान किंवा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खूप हिंडले किंवा फिरले तरी समाधान होणार नाही. त्याने नाहक श्रम मात्र होतील पण हाती काही लागणार नाही. म्हणून हे मना, तू नीट विचार करून स्वतःची समजूत घाल आणि भगवंतापाशीच कायमचा आश्रय घे.
(नातुडे – साध्य होत नाही/ हाती लागत नाही, अंतरा – अंतर्मन)
विवेचन : हा अतिशय अर्थगर्भ असा श्लोक आहे. “बहु हिंडता सौख्य होणार नाही “या ओळीचे तीन प्रकारचे अर्थ घेता येतात. आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान प्राप्त व्हावे म्हणून आपण वणवण हिंडत असतो. व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे “अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा. ” आपल्या उपजीविकेसाठी सुद्धा आपण आयुष्यभर वणवण करत असतो. उपजीविकेसाठी, पोटासाठी धावपळ करणे हे समजू शकते. हा पहिला अर्थ घेता येईल.
दुसरा अर्थ असा सांगता येतो की परमार्थात सुद्धा माणसे खूप भटकत असतात पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. मन:शांती नाही, अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून लोक बाबा, बुवांकडे हिंडत असतात. देवालये, नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे, तीर्थयात्रा माणूस आयुष्यभर करत राहतो. पण तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तो कोरडाच राहतो. या ठिकाणी एक पौराणिक कथा आठवते.
महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात. हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो, ” माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या. ”
पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात. कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ‘ आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक. ‘ त्यावर भीम म्हणतो, ‘ केशवा, आमची चेष्टा करतोस का? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल? ‘
तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. समर्थ आपल्याला या श्लोकात हीच गोष्ट समजावून सांगतात.
तिसरा अर्थ सर्वात महत्त्वाचा वाटतो. तो हा की हिंडत राहणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हिंडत राहणे. विषयवासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे चक्र सुरू राहते. यालाच समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही असे म्हणतात. कारण यातून कोणतेही हीत साध्य होत नाही. अनेक जन्म घेऊनही मुक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. जीवात्मा मात्र जन्ममृत्यूच्या या चक्रात भरडून निघतो.
मग अंतिम समाधान किंवा सौख्य कुठे मिळेल? तर ते एका परमेश्वराच्याच ठायी आहे. आपण विचार करून आपल्या मनाला या गोष्टीचा बोध करून दिला पाहिजे. आणि त्या राघवाच्या ठिकाणीच आपले मन कायम स्वरूपी एकाग्र केले पाहिजे. “सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.. “असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते यासाठीच!
स्वसंवाद ::
१) मी आयुष्यात कशासाठी सर्वाधिक वणवण केली? पैशासाठी, यशासाठी की मनःशांतीसाठी? त्यातून खरे समाधान मिळाले का?
२) लिंबाची काडी स्नानाने गोड होत नाही. माझ्या बाह्य धार्मिक कृतींमागे अंतर्मनाची शुद्धी आहे का?
३) तीर्थयात्रा, उपवास, पूजापाठ या गोष्टी मी करतो. परंतु माझ्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर कमी झाले आहेत का?
४) जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हे आपले अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात या ध्येयाची जाणीव मला असते का?
– – – –
श्लोक क्र. ४२ – – –
बहुतांपरी हेचि आता धरावे |
रघुनायका आपुलेसे करावे|
दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४२|
अर्थ : हे मना, तुला वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले. आता ही एकच गोष्ट लक्षात ठेव की रघुनायकाला म्हणजे रामाला तू आपलेसे कर. तो अनाथांचा नाथ आहे असा त्याचा लौकिक सर्वत्र गाजतो आहे. तेव्हा तू मनाने भगवंतपाशीच कायमचा निवास कर.
(बहुतांपरी – वेगवेगळ्या प्रकारे, धरावे – लक्षात ठेव, तोडर – पायातील किंवा हातातील एक अलंकार/तोडा/तोरड्या)
विवेचन : सगळ्या गोष्टींचा (आपल्या कर्तव्याचा किंवा स्वधर्माचा नव्हे) म्हणजे माया, मोह इत्यादींचा त्याग करून भगवंताला शरण जावे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले असे समर्थ आपल्याला सांगतात. इथे बहुतांपरी या शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे नाना परीने, निरनिराळ्या प्रकारे. जी लहान मुले ऐकत नाहीत त्यांना आपण निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच समर्थ देखील आपल्याला हे वेगवेगळ्या शब्दात समजावून सांगतात. चांगल्या गोष्टी या परोपरीने पुन्हा पुन्हा सांगून मनावर ठसवाव्या लागतात. तसेच समर्थ या ठिकाणी करतात परंतु अशा गोष्टींनाही एक मर्यादा असते. म्हणून ते निर्वाणीचे सांगतात की आता तू रघुनायकाला म्हणजे भगवंताला आपलेसे कर.
बहुतांपरी या शब्दाचा दुसराही अर्थ असा घेता येतो की परमेश्वराचे जे अनेक भक्त झाले, त्यांच्याप्रमाणे तू वाग आणि परमेश्वराला आपलेसे करून घे. रामायणातील कैकयी, रावण यासारखी काही मोजकी पात्रे वगळली तर बहुतेक इतरांनी श्रीरामांना भक्तीने आपलेसे करून घेतले आहे. हनुमान, बिभीषण, शबरी, गुहक असे अनेक जण त्यांचे भक्त होते. सुदामा, कुंती, द्रौपदी, पांडव, विदुर यासारखी अनेक मंडळी श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे करून घेतले होते. श्रीकृष्ण त्यांना आपला सखा, मित्र, बंधू, मार्गदर्शक, तारणहार असे सगळे काही वाटत होता.
रावणाला श्रीरामांबद्दल सर्वांनी सांगितले. परंतु त्याला ते कधी आपलेसे वाटले नाहीत. त्याला स्वसामर्थ्याचा अहंकार होता. पांडवांना श्रीकृष्ण जसा आपला वाटला, तसा दूर्योधन आणि अन्य कौरवांना कधी वाटला नाही. ज्यांना ज्यांना भगवंत आपला वाटला नाही, त्यांचा मार्ग चुकला. ते नको त्या मार्गाने गेले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला.
जसा अहंकारी माणूस व्यवहारातही कोणाला आवडत नाही. तसा तो भगवंताला सुद्धा आवडत नाही. अहंकार हा अध्यात्मात फार मोठा शत्रू आहे. म्हणून आपण आपला सर्व अहंकार टाकून भगवंताला शरण जावे आपल्याला तो आपलासा वाटला पाहिजे.
तो ‘ दीनानाथ ‘ आहे, हे त्याचे ब्रीद सर्वत्र गाजते आहे. इथे आपण ‘दीनानाथ ‘या शब्दाचा अर्थ केवळ दीनदुबळ्यांचा नाथ असा न घेता शरणागताला आश्रय देणारा असा घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भगवंताशिवाय ज्यांना आपले दुसरे कोणी नाही असे वाटते अशांचा तो नाथ आहे. संत मीराबाई म्हणतात, ” मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई. ” तेव्हा हे मना तू केवळ एका राघवाचा म्हणजेच भगवंताचा आश्रय घे.
भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर भगवंताशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे, आत्मीय असे नाते आहे. ज्याला भगवंत “आपला” वाटतो, त्याचा जीवनप्रवास सुकर होतो. आणि ज्याने भगवंताला “आपलेसे” केले, त्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही.
स्वसंवाद ::
१) माझे भगवंताशी नाते कसे आहे? त्यात प्रेम, समर्पण भाव आहे का? की ते गरजेपोटी आहे?
२) माझ्या स्वभावातील अहंकार मला जाणवतो का? तसे असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय करतो?
३) संकटाच्या वेळी खरोखर एकमात्र भगवंतच मला तारील असा त्याच्यावर विश्वास ठेवतो का? (क्रमशः)
– क्रमशः श्लोक ४१ आणि ४२.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





