श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा

– – – आणि काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री!

वर्ष १९६५. आपल्या जन्मजात शत्रूने अर्थात पाकिस्तानने १९४७ नंतर १८ वर्षांनी पुन्हा फणा उभारला आणि भारतावर आक्रमण करण्याचा मनसुबा प्रत्यक्षात आणला ! –

– – आपल्या पंजाब सीमेवरील फिरोजपूर जिल्ह्यातलं, सतलज नदीच्या अगदी अंगाखांद्यावर खेळणारं आणि पाकिस्तानातील गंडासिंगवाला गावच्या अगदी समोर असलेले हुसैनीवाला गाव. अमृतसर पासून हे स्थळ सुमारे ११० किलोमीटर्स भरते. हुसैन नावाच्या मुस्लिम संताच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे.

या गावाला एक विशेष इतिहास लाभला आहे. क्रांतीपुरुष भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी फासावर चढवले. या तिघांवर सतलज काठावरील एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. भारतीय जनमत या बलिदानांनी विदग्ध झालेले होते… या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जमाव जमून काही विपरीत घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ठरलेल्या दिवसापेक्षा एक दिवस आधीच गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची योजना आखत या तिघांची शवं तिथे पोहोचवली… पण याचीही खबर लोकांना लागली… मोठाच तणाव निर्माण झाला… यामुळे ब्रिटिशांनी हे तीन मृतदेह जागेवरच ठेवून तिथून पळ काढला. मग स्थानिक नागरिकांनीच या देहांवर अंत्यसंस्कार केले! इथे पुढे प्रेरणा स्थळ स्मारक उभारले गेले.

भगत सिंह यांच्या मातोश्री, विद्यावती देवी यांनी आपले अंतिम संस्कार मुलाशेजारीच केले जावेत, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यांच्या देहावर भगत सिंग यांच्या स्मारकाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले… मूल आईच्या कुशीत शिरते… इथे आई मुलाच्या कुशीत शिरून चिरनिद्रा घेती झाली! क्रांतिवीर बी. के. दत्त यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली होती… त्यांनाही इथे अंतिम विश्रांती देण्यात आली.

१९४७ च्या फाळणीत हुसैनीवालासह येथील बारा गावे पाकिस्तानात गेली. नतद्रष्ट पाकिस्तान्यांनी इथून जाताना भारतात असलेला कैसर ए हिंद हा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला सुंदर पूल नष्ट केला!

मुंबईतून हुसेनीवाला मार्गे पाकिस्तानमध्ये जाणारी पंजाब मेल दिल्लीवरून फिरोजपूरला वळवण्यात आली.. हुसेनीवाला रेल्वे स्टेशन तिथे जतन करून ठेवलेले आहे.

फाळणीमुळे पाकिस्तानात गेलेल्या शहीद प्रेरणास्थलाची अवस्था खराब झाली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न करून तो भाग भारतात घेतला आणि त्या बदल्यात नदीचा आणि जलव्यवस्थेचा काही भाग पाकिस्तानला दिला! 

१९५६. प्रचंड पावसाने महापूर आलेला होता, येथील ब्रिटिशकालीन पूल वाचवण्यासाठी अभियंते झटत होते. परिस्थितीचा गैरफायदा घेत पाकिस्तानने या पुलावर हल्ला चढवला. ४, जम्मू काश्मीर रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तान्यांना हुसकावून लावले!

आणि यानंतर दहाच वर्षांनी पाकिस्तान पुन्हा उलटून आला.. !१९६५ मध्ये पाकिस्तान ही जागा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची खबर भारतीय सैन्यास लागली. या भागाच्या रक्षणासाठी २, मराठा लाईट इन्फंट्री या आपल्या चपळ सैन्यदलास इथे घाईघाईने तैनात करण्यात आले.

– – या काळ्या पाचवीच्या नेतृत्वाची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल टी. टी. ए. नोलान साहेबांच्या भक्कम खांद्यांवर होती. खरं तर मराठा सैनिक इथे संरक्षणात्मक पवित्रा घेतील अशी इतरांची कल्पना होती!

काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री या नावाला एक अर्थ आहे. या सैनिकांच्या गणवेशात काळया रंगाचे प्राबल्य आहे. सह्याद्रीचा रंगही करडा, काळा कभिन्न! आणि इथं जन्मलेली शरीरं आणि मनं कणखर! वायुवेगाने हालचाली करीत शत्रूच्या गोटात शिरून त्याच्या राईराई एवढ्या चिंधड्या उडवाव्यात त्या मराठ्यांनीच! यशाचे धनी असलेले मराठा गडी लष्करात विशेष वकूब राखून आहे. पूर्वी आपल्याकडे गणपत हे नाव प्रचलित असे. त्यावरून अधिकारी लोकांनी प्रेमाने आपल्या सैनिकांना Ganpats हे नाव दिले होते! आता दुसरी असलेली ही इन्फंट्री पूर्वी पाचवी होती. लष्करात प्रत्येक दलाला विशिष्ट क्रमांक दिलेले असतात.

पाकिस्तान पूर्ण ताकदीने या हल्ल्यात उतरले असताना नोलान साहेबांनी आक्रमक पवित्रा घेतला! मराठे त्वेषाने लढले… एक विरुद्ध शंभर अशी स्थिती असताना एक मराठा शंभर पाकिस्तान्यांना भारी पडला! हल्ले परतवून लावले जातच होते… एके दिवशी नोलान साहेब युद्धाची व्यूहरचना करीत असताना त्यांच्या अगदी जवळच बाँब पडला आणि आपण एका शूर अधिकाऱ्यास मुकलो. त्यांच्यासह वीस सैनिक, अधिकारी हुतात्मा झाले. नेता धारातीर्थी पडलेला असताना मराठे आणखी जोरदार लढले आणि पाकिस्तान शेपूट घालून माघारी पळून गेला!

या लढाईतील कामगिरी मुळे २, मराठा लाईट इन्फंट्रीला Husseniwala Battle Honour प्राप्त झाला. स्थानिक नागरिकांनी विशेष मानपत्र प्रदान केले!

 १९७१ मध्ये सुद्धा पाकिस्तानने इथेच हल्ला चढवला होता. पंजाब बटालियनने यावेळी शौर्य गाजवून त्यांना खूप काळ रोखून धरले होते! पण यावेळी पाकिस्तानची ताकद आणि तयारी तिप्पट होती… त्यांनी हुसेनीवाला पूल उडवून लावला आणि परिसर ताब्यात घेतला… मात्र शिमला करारात भारताने हा भाग पुन्हा मिळवला!

या जागेचे महत्त्व व्यापारीदृष्ट्या सुद्धा अधिक होते आणि आहे. भारत – पाकिस्तान – अफगाणिस्तान यांच्यात जो काही व्यापार होतो… तो बराचसा इथून होतो. परस्पर संवाद वाढवा, सौहार्द वाढावे म्हणून सीमा सुरक्षा दलाचे तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल अश्विनीकुमार शर्मा साहेबांनी १९७० मध्ये आटारी बॉर्डर सारखी The Beating The Retreat Ceremony सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि ही परेड सुरू झाली.. आणि १९७१ पासून ही नियमित झाली!

माहितीचा किंवा प्रसिद्धीचा अभाव या कारणांनी अनेक भारतीय नागरिकांना ही जागा माहीत नाही. खरं तर हुतात्मा भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांची बलिदाने, भगत सिंग यांच्या मातोश्री यांना वंदन करण्यास लोकांनी गेले पाहिजे… हे एक पवित्र स्थळ आहे. भारतीय सैनिकांनी इथे बलिदाने दिली आहेत… मराठी अधिकाऱ्यांनी इथे अनुभव पणाला लावला आहे. त्यांना वंदन म्हणून इथे भेट द्यायला पाहिजे!

सैनिक आणि नागरिक यांनी आता अधिकाधिक जवळ आले पाहिजे… कारण पाकिस्तान सुधारणार नाही… आपण सदैव दक्ष असले पाहिजे! सैन्य आहेच तैनात! जय हिंद.. जय हिंद की सेना!

(सेवानिवृत्त सैन्याधिकारी श्री. संजय सहस्रबुद्धे साहेबांनी या लेखासाठी प्रेरणा दिली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted