प्रा. भरत खैरकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ कृतार्थ… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
सेवानिवृत्त कमांडर विश्वास त्यांच्या बुलढाण्याच्या आलिशान आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बंगल्यावर निवांत आरामखुर्चीत बसलेले होते. एकंदर २६ गुंठ्यामध्ये असलेला तो भव्यदिव्य बंगला.. आज जवळपास साडेपाच कोटी रुपये किमतीचा आहे. शहरांमध्ये त्यांना मान आहे.. सामाजिक कार्य आणि सिंबोयसिस क्लबच्या माध्यमातून त्यांनी शहरातील जेष्ठ आणि सुशिक्षित व्यक्तींचा गोतावळा आपल्याभोवती जमा केलेला आहे.. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, नामांकित डॉक्टर, वकील, समाजसेवक, इत्यादींचा समावेश आहे. हा क्लब नेहमी नावीन्यपूर्ण गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेतो.. त्यांच्याशी परिचित होतो.. ह्या सर्वांमध्ये कमांडर विश्वासचा खूप मोठा वाटा आहे.. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे.. आणि नौदलाचा अनुभव तर विचारायलाच नको.. एकापेक्षा एक मजेदार किस्से त्यांच्याकडे आहेत.. त्यामुळे सहजच कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षिली जाते..
आपल्या कृतार्थ जगण्यामागे त्याच्या माध्यमिक शाळेचा जास्त प्रभाव असल्याचे ते सांगतात.. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम आणि विदर्भात पाचवा नंबर आलेल्या विश्वासला चिखलदरा येथील सरकारी पब्लिक स्कूलमध्ये वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला होता.. विश्वासचे वडील शिक्षक असल्याने चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण तसे घरीच झाले होते.. बाबांनी त्याचे नाव चौथ्या वर्गातच नोंदविले होते. विश्वास आधीपासूनच चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता.. वस्तिगृहात थोडा उशिरा प्रवेश झाल्याने पंधरा-वीस दिवसाचा अभ्यास बुडाला होता.. तो होमवर्क बाकी असल्याने.. जुनी मुले आकसापोटी त्याला कुठलीही वही, बुक देत नव्हते.. शिवाय शाळेमध्ये जिल्ह्याचे कलेक्टर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी.. नव्याने आलेल्या विश्वासची निवड प्राचार्यांनी केली होती.. ह्या गोष्टीचा रागही इतर मुलांमध्ये होता.. स्वागत करणाऱ्या मुलाला फुलपॅंट असावी म्हणून.. खुद्द प्राचार्यांनी आपल्या मुलाची फुलपॅन्ट विश्वासला दिली होती.. त्यामुळे तर इतर मुलांचा अधिकच जळफळाट झाला होता. त्या कार्यक्रमात “अध्यक्ष महाराज… ” अशी विश्वासने भाषणाची सुरुवात केली होती.. तेव्हापासून सर्व मुले त्याला “अध्यक्ष महाराज” म्हणूनच चिडवायची..
काही दिवसानंतर गॅदरिंग झालं. त्यामध्ये “जानकीबाई” नावाचा “लेडीज रोल” करायचा होता.. विश्वासने स्वतःहून ” हो” म्हटले.. नाटक झाल्यानंतर मात्र सर्वांनी “जानकीबाई.. जानकीबाई.. ” म्हणून विश्वासला खिजवायला सुरुवात केली. मग मात्र चिडवणाऱ्या सर्वांना तो एकसाथ बडवत सुटला.. त्यामध्ये मोठ्या वर्गाची ही मुले होती!
… त्यातील एका मुलाने प्राचार्यांकडे तक्रार केली की, ” सर मला विश्वासने मारलं. “
तर प्राचार्य म्हणाले, “तो कुठल्या वर्गाचा मुलगा आहे?”
” सर तो पाचवीचा मुलगा आहे. ”
“आणि तू कुठल्या वर्गाचा आहे? “
“सर मी सातवीतला आहे!”
“अरे तरीही तू पाचवीतल्या मुलाचा मार खाल्लास? जाऊन मार त्याला परत!” प्राचार्य सर त्याला बोलले.
असा हा प्राचार्याच्या छत्रछायेखाली वाढलेला विश्वास जशास तसा अशा स्वभावाचा, शरीराने आणि मनाने बळकट बनला होता. तेव्हाच त्याने बारावीनंतर आपण नेव्हीमध्ये जायचे हा बेत केला होता. त्यासाठी त्याने पुणे गाठलं होतं.. नेव्हीसाठी पोहणे अत्यंत आवश्यक आहे.. म्हणून मोरवाडीजवळील टाटा मोटर्सच्या स्विमिंग पूलामध्ये त्याने रितसर पोहणे शिकून घेतले होते. तो पोहण्यामध्ये एवढा तरबेज झाला होता की एकदा तर त्याने “कोचिंग ते लक्षद्वीप” असा शिडाच्या जहाजातून प्रवास केला होता.. त्यामुळे त्याची समुद्राची भीती गायब झाली होती.
नेव्हीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर उत्तरोत्तर प्रमोशन घेत विश्वास कमांडर या पदापर्यंत पोहोचला.. आपल्या कार्यकाळात त्याने नेव्हीमध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबविले.. विश्वास हा उत्तम कवी, लेखक, नाटककार, कलावंत, असल्याने तो सतत विविध उपक्रम नेव्हीच्या लोकांसाठी राबवत होता. त्यातून वाढलेला लोकसंग्रह आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती विश्वासला नेहमीच इतरांपासून ठळक दर्शवित होती.. विश्वासच्या ह्याच कर्तबगारिमुळे त्याला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपर्यंत नेव्हीच्या माध्यमातून पोहचता आले होते.. तरीही ह्या गोष्टीचा अभिमान आपल्या डोक्यात जाऊ न देता, विश्वासचे पाय जमिनीवरच होते.. त्यामुळे तो अधिक लाडका झाला होता..
सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी करावे, म्हणून “राजकारण करायचे कां?” हे विचारायला विश्वास त्यांचे आध्यात्मिक गुरु रविशंकर यांना भेटायला बेंगलोरला गेला होता. मात्र त्यांनी “तू इलेक्शनला उभा राहू नकोस?” सांगितल्यावर परत गावाला येऊन सिम्बॉयसिस क्लबची स्थापना केली होती..
विश्वासचा मुलगा आणि सुनबाई दोघेही नेव्हीमध्ये कमांडर आहेत.. हे दोघेही विश्वासचा वारसा चालवत भारतीय नौदलाची सेवा करत आहेत.. त्याने आपला बंगला बांधला तेव्हा, त्याच्या गुरुने एक उपदेश केला होता. “देणा-याकडे भरपूर आहे. तो भरभरून देतो.. फक्त आपली पात्रता तेवढी असली पाहिजे.. जसे की समुद्रामधून तुम्ही पाणी वाटी, मग किंवा बकेट कशा पद्धतीच्या.. पात्रातून काढता त्यावर तुमचा पाणीसाठा ठरतो. मात्र समुद्राला काही फरक पडत नाही.. त्यामुळे आपण आपले पात्र वाढविले पाहिजे. मोठे केले पाहिजे. ” हे आठवून विश्वासने निवांत खुर्चीत बसून डोळे मिटून घेतले होते.. आणि समोरच्या बंगल्याकडे पाणावलेल्या डोळ्याने बघत होता.
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





