राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “खऱ्या अर्थाने जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

मी जितकी वर्षे जगलो आहे, त्यापेक्षा आता कमी वर्षे जगायची आहेत, हे समजल्यापासून माझ्यात झालेले बदल:

आता एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मी फार रडत नाही, कारण आज नाही तर उद्या माझीही वेळ येणार आहे हे मला उमगले आहे.

माझे अचानक निधन झाले तर, माझ्यानंतर काय होईल याची चिंता करणे मी सोडून दिले आहे. कारण माझ्याविना कोणी उपाशी राहणार नाही, माझ्यावाचून कुणाचे काहीही अडणार नाही. हे जग आधी होते तसेच अव्याहत सुरू राहणार आहे. माझी संपत्ती माझ्यासोबत येणार नाही, हेही उमगले आहे.

समोरच्या व्यक्तीकडे असलेला पैसा, पद, सत्ता, प्रतिष्ठा पाहून, आता मला इर्षा, असूया किंवा भीती वाटत नाही.

स्वतःसाठी भरपूर वेळ काढू लागलो आहे. जग माझ्या खांद्यावर टिकून नाही आणि माझ्याविना काहीच थांबणार नाही, हे लक्षात आले आहे.

छोट्या विक्रेत्यांशी आणि फेरीवाल्यांशी घासाघीस करणे आता मी बंद केले आहे. कधी आपली फसवणूक होते आहे, हे कळत असूनही ते हसत स्वीकारायला शिकलो आहे.

भंगार गोळा करणाऱ्यांना जुनी वर्तमानपत्रे, रिकामे डबे सहज देऊन टाकतो. त्यातून त्यांना मिळणारा आनंद पाहून मलाही समाधान मिळते.

रस्त्यावर बसून व्यापार करणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीकडून कधी गरज नसलेली वस्तूही विकत घेऊ लागलो आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे तेच तेच बोलणे कितीही वेळा शांतपणे ऐकतो. “हे आधीही सांगून झाले आहे, ” असे म्हणणे सोडले आहे.

चुकीच्या व्यक्तीशी वाद घालण्यापेक्षा मानसिक शांतता जपणे पसंत करू लागलो आहे.

लोकांच्या चांगल्या कामांची आणि विचारांची मनापासून प्रशंसा करतो. त्यातून आनंद मिळतो. स्वतःच्या वाईट/चुकीच्या सवयी आणि हट्टी समजुती माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवायला शिकलो आहे. त्यांना बदलवण्याचा प्रयत्न आता करत नाही.

जीवनाच्या शर्यतीत मला मागे टाकण्यासाठी कोणी डावपेच खेळत असेल, तर मी शांतपणे त्याला पुढे जाऊ देतो. कारण, माझा कोणी प्रतिस्पर्धीही नाही आणि मी कोणाशी स्पर्धाही करू इच्छित नाही.

स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला शिकलो आहे. लोक काय म्हणतील, याची चिंता त्यांच्यावरच सोपवली आहे. इतरांना खूश ठेवण्यासाठी स्वतःचे मन मारणे बंद केले आहे.

पंचतारांकित हॉटेलांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडू लागले आहे. जंक फूडपेक्षा साध्या, पौष्टिक अन्नात जास्त समाधान मिळते, हे आता लक्षात आले आहे.

गरज नसताना, स्वतःवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजूच्या हातात मदतीची रक्कम ठेवण्याचा आनंद अधिक मोठा वाटतो. मदत करण्याची वृत्ती पूर्वीही होती, आता ती प्रयत्नपूर्वक वाढवू लागलो आहे.

चुकीच्या माणसांसमोर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणे पसंत करतो. जास्त बोलण्यापेक्षा मौनाची निवड करतो. स्वतःवर जास्त प्रेम करायला शिकलो आहे.

मी या जगातला एक प्रवासी आहे. माझ्यासोबत फक्त केलेली सत्कर्मे, वाटलेले प्रेम, आदर आणि माणुसकीच येणार आहे, याची खात्री पटली आहे.

हा देह आई-वडिलांची देणगी आहे, आत्मा ही परमेश्वराची देणगी आहे, माझे नावही इतरांनी दिलेले आहे. जेव्हा माझे स्वतःचे काहीच नाही, तेव्हा नफा-तोट्याची गणिते कशाला?

माझे दुःख, अडचणी, काळज्या, तक्रारी लोकांना सांगणे बंद केले आहे. कारण

जे समजून घेतात, त्यांना सांगावे लागत नाही आणि ज्यांना सांगायची वेळ येते, त्यांना समजूनच घ्यायचे नसते, हे वास्तव आता लक्षात आले आहे.

आता मी माझ्या स्वतःच्या आनंदात रमतो. माझ्या सुख-दुःखासाठी शेवटी मी स्वतःच जबाबदार आहे, हे मला उमगले आहे.

मी प्रत्येक क्षण जगायला शिकलो आहे. जीवन अत्यंत मौल्यवान आहे. कधीही काहीही घडू शकते, हे वास्तव स्वीकारले आहे. चांगले किंवा वाईट दिवसही निघून जातील. कारण, येथे काहीही कायमचे नाही.

अंतःकरणातील आनंदासाठी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. मानवसेवा, जीवदया आणि निसर्गसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. अनंताकडे जाणारा मार्ग याच्यातून जातो, हे लक्षात आले आहे. निसर्गाच्या कुशीत राहायला शिकलो आहे, कारण उशिरा का होईना, शेवटी त्याच्याच कुशीत विलीन व्हायचे आहे, हे समजले आहे.

कदाचित मला आता खऱ्या अर्थाने जगता यायला लागले आहे.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted