सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
“आजी हे घे पटकन चटका बसतोय मला “ म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले,.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भाज्यांनी काय औषधांच काम केलं का,.. ?”तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा,.. जिभेला असं थोडंस चमचमीत किंवा आवडीचं खावे वाटतं ग,.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं,.. बोललं तर राग येईल ह्या लोकांना,.. आता 80 वर्षाची मी मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही,.. एरवी अडगळ होऊन जगते,.. मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे पण ही लोकं औषध देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला,.. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली,.. सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली,.. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली,.. आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण प्रत्येकवेळी नको त्रास होईल ह्या भीतीने घास काढून घेतला,.. हळूहळू मी मान्य करत गेले पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातल लहान मुल जाग झालं,.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटत ग,.. वासना वाईटच ग पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी,.. मग कसं जमवायचं सगळं,.. बर माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणी तेच सांगतात,.. परवा त्या जोशीचा फोन आला,.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड,.. आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता,.. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला,.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही,.. तुम्हाला त्रास होईल म्हणे,.. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग,.. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असत का,.. ?शेवटी हगण मूतं करायला माणूसच लावलाय ना,.. झाले असते दोन जुलाब जास्त,.. दोन हगीज जास्तीचे गेले असते,.. पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना,.. मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी,.. आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की पण,.. त्या चावट जिभेला कोणी सांगावं,.. ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक,.. आणि तिला हे नाक साथ देत ना ग,.. आता मला सांग आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात,.. तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला,.. खाल्ला, खाऊ घातला त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल,.. बरं खायचं काही खुप नसतं उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस,.. पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना त्यावर लोणचं ना काही,.. आणि बाऊ एवढा,.. त्यांची तब्येत बिघडेल,.. मला तर अस्सा राग येतो पण आता चिमणी आली ना कामी मग मी ही झाले आता लबाड,.. हा हा म्हणत आजीने आपलं बिनदाताच बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली,.. चिमणी हसली आणि म्हणाली, ” चल बाय अज्जू अभ्यास आहे मला,.. आणि पळाली,.. “
आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली,.. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली,.. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं,.. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता,.. आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे ग चोरून,.. पण आपण नाहीच म्हणालो,.. “सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला,.. लेकही अंगावर धावले,.. बिचारी आजी गप्प बसली,.. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती,.. आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या,.. हे सगळं आठवून रमा गहिवरली होती,.. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती,.. आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं,.. आजीला आंनद गगनात मावेना,.. किती किलोच पुरण घालायचे ग मी,.. सगळयांना वाटायचे,.. एवढं म्हणत आजीला रडू फुटलं,.. रमाने डोक्यावर हात फिरवला,.. रडू नका,.. घ्या खाऊन,.. आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती,.. रमाला मनातून आंनद झाला,..
दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला,.. “जरा दम धरायचा ना पातळ खराब केलं ना,.. आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती,.. पण रमाने सावरलं,.. “असू द्या मॅडम मी आवरते सगळं,.. जा तुम्ही,.. आजीचे डोळे भरून आले म्हणाली, “माझ्या हवरट पणाचा रमा तुला त्रास ग”,.. रमा म्हणाली, “आजी काही वाईट वाटून घेऊ नका,.. ह्याचेच पैसे घेतो आम्ही,.. त्यात कसला त्रास… उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की,.. “
आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही ग पण काय माहित ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते,.. फार नाही पण अगदी घासभर का होईना खाव वाटतं.. रमाबाई निघाली,.. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहिही पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते,.. जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत,.. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस ग,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी त्या वासनेत जीव अडकून बसतो ग,.. जा बाई अंधार पडलाय ये उद्या,.. “
रमा निघाली रात्री झोपेत आजी स्वप्नात आली,.. “मुगाचा लाडू आणते म्हंटली ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे,.. “रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते,.. तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली,.. आजीच्या घरून फोन,.. तिने पटकन उचलला,.. आजीची सुनबाई रडत बोलत होती,.. आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर म्हणत फोन ठेवला.. रमाला गहिवरून आलं,.. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते,.. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते,.. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं,.. तृप्ती झाली ग रमे… हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं,.. “
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈