सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ रघुनायका, मागणे हेचि आता… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मंदिराची पायरी उतरून ताई भयंकर चिडीने, त्राग्याने मुख्य दरवाजापाशी आल्या. स्वत:शीच पण मोठ्याने बडबडत होत्या. स्वत:शीच बडबडण्याच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला त्याच्याशी बोलू लागल्या :
“पुन्हा इथे दर्शनाला यायचं नाही. इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाहीत हे लोक. लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात.”
तो दादा : “पहिल्यांदा येताय का ?”
ताई : “नाही हो. नेहमी हे असंच असतं.”
तो : “अहो ताई, इथे असंच होतं याची कल्पना होती तरी आलात ना ? मग आता जाऊ द्या की. नावं का ठेवत आहात ?
ताई : “अहो दादा, आशा वाटतेच ना की जरा नीट दर्शन होईल म्हणून ? देवापुढे मागणे मागता येईल, तोपर्यंत देवासमोर उभे राहता येईल. मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब लागला. आता जावयाच्या घराचा व्यवहार पक्का होऊ घातला आहे, त्यामुळे देवाचे दर्शन घेऊन येऊ म्हणून आले. पण इथे साधे दहा सेकंदही देवासमोर नीट उभे राहता येत नाही. आजही जेमतेम पाहिले देवाला.”
तो : “रांगेत किती वेळ गेला हो ?”
ताई : “तब्बल पाऊण तास होते रांगेत. तरी बरे पुढच्या एक ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरे झाले.”
तो : “हाsss. हे बरे. एकट्या असता तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभे राहावे लागले असते.”
ताई (त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून) : “म्हणजे?”
तो (विषय टाळत) : “म्हणजे काही नाही हो. पाऊण तास नामस्मरण करायचे आणि प्रत्यक्ष देवासमोर दहा सेकंदही उभे राहता आले नाही तर सामान्य माणसाला राग येणारंच ना. साहजिकच आहे.”
ताई (एक भुवई वर करत) : “सामान्य माणूस म्हणजे?”
तो (विषय टाळत) : “काही नाही हो. जनरल बोललो.”
ताई : “नाही. सांग नीट.”
मनातली चीड जराशी व्यक्त झाली असल्याने एव्हाना ताई किंचित शांत होत होत्या.
तो : “ताई, समजा एक दिवस असे झाले की सबंध गाभारा. गाभाराच कशाला ? सबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिला तर ? अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी. मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा. तो सोबत न्यायचा नाही. बाकी सगळे देऊळ तुम्हाला. तर काय कराल ?”
ताई (तोंडाचा आ वासून, विचारांत गर्क) : ….
तो : “आहेत की अशीही पुरातन देवळे अजून, जिथे माणसे फार नसतातच. आणि ते राहू द्या बाजूला. पण समजा खरेच असे झाले तर ?”
ताई विचारातच पडल्या होत्या.
तो : “सांगा.”
ताई : “अहो, थांबा हो. विचार करतेय.”
तो : “जास्त ताण देऊ नका. मी सांगतो काय कराल ते. फक्त माझे म्हणणे बरोबर की चूक ते सांगा.”
“तुम्हाला देवाचे शांततेत दर्शन हवे आहे, देवाशी संवाद हवा आहे, त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, यासाठी सबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केले. संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही. तर तुम्ही आत जाल, नमस्कार कराल, देवाकडे मागण्या मागाल. हे असलं सगळं कराल आणि मग पाच मिनिटांत पहिला प्रश्न मनात येईल. ‘आता काय करायचे दिवसभर ? मोबाईल पण नाही सोबत. स्तोत्रे बित्रे किती म्हणणार.? जप तरी किती करणार.? इतर वेळेस सगळे सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखे देवाचे करतो ते वेगळे. पण अख्खा दिवस देवळात करायचे तरी काय ? आणि देवाशी आपण बोलून बोलणार तरी किती? तो तर काहीच बोलत नाही. बापरे.’ होईल ना असे ?”
हे बोलणे ताईंसाठी अनपेक्षित होते असे त्यांचा चेहराच सांगू लागला.
“अहो ताई, आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्स वर! आपल्याला हवा तसा ! आपल्याला हवा तेव्हा ! हो की नाही ? आपल्याला नको असताना तर देवही नको असतो. हो ना ?
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला, नाही ? आणि आपण स्वत: ठरवून देवाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे कसे सुखावह, आरामात व्हायला हवे म्हणजे ‘देवदर्शन छान झाले’ असे वाटते. आपल्या अपेक्षा अगदी इथपासूनच सुरु होतात, नाही ? ‘तुझे कारणीं देह माझा पडावा’ श्लोक तर केवळ चाल शिकवण्यासाठी शाळेत शिकवलेला असतो, नाही ?
ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते.
“ताई, तुम्ही देवदर्शन करता ना ! ते तुमच्या मागण्या मी पुरवीन या आशेने. संतांनी देवदर्शनाला महत्व दिले ते आत्मज्ञानानंतर. ते आत्मज्ञान-बित्मज्ञान राहू द्या बाजूला. पण काही त्रास झाला नाही, काही भीती नसेल, कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का तरी तुम्हाला ? माझ्याकडे आल्यावर पहिले काय करायचे तर नमस्कार आणि लगेचच दुसरे काय करायचे तर आधीच मनात लिस्ट आऊट करून आणलेल्या मागण्या मागायच्या. एकापुढे एक. हो की नाही ? खरे सांगा ? तुम्ही देवळात मला भेटायला येता की तुमची स्वप्ने पूर्ण करणाऱ्याला लाच द्यायला येता ? पाव किलो पेढ्यांत मी ऐश्वर्य द्यायला तयार होतो ते केवळ ‘करुणा’ हा माझा स्थायीभाव आहे म्हणून. मी वेडा आहे म्हणून नव्हे. नाहीतर, कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो. माझे अनुसंधान नित्य टिकवा म्हणून नाम घ्या, असे संतांनी सांगितले. त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता. पण रांगेत पाऊण तास उभे राहावे लागले तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागते, नाहीतर डोके खुपसायला मोबाईल लागतो. त्याऐवजी नाम घेणे होत नाही. खरे की नाही ? आणि काय हो, ‘जे होते ते त्याच्या इच्छेने’ यावर मुलांना – नातवंडांना मोठे लेक्चर देणारे तुम्ही – तुम्हाला इतकेही वाटत नाही का की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचे तप आहे ? आपले तितके भोग सरले असा का नाही हो विचार करत तुम्ही ?.”
– – – आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेनासा झाला.
ताई त्याच्या मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दांत इतक्या गुंगल्या होत्या की सुरुवातीला ‘देवाला’, ‘देवाचे’ असे देवाबद्दल बोलणारा तो मोरपिसवाला शेवटी शेवटी ‘मी’, ‘मला’, ‘माझ्या’ असे प्रथम वचनात बोलत होता हेच त्यांच्या वेळेवर लक्षात आले नाही आणि जेव्हा हे भान आले तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसत नव्हता. फक्त तो उभा होता त्या जागी एक मोरपीस मात्र पडलेले होते.
हे उमगले आणि ताईंच्या पायांतील त्राणच गेले. त्या तशाच खाली बसल्या. आजूबाजूची माणसे आणि आवाज त्यांच्या जाणिवेतच उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो तोच सावळा मोरपीसवाला ! आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज !
मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते मोरपीस उचलले आणि कपाळाला लावले. तो उभा होता तिथली धूळ कपाळी लावली. मग मंदिरातील गाभाऱ्याकडे वळून पाहू लागल्या. जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंतीपल्याडच्या देवाला पाहात होती. तिथे पाहात दाटल्या गळ्याने त्या इतकेच म्हणाल्या :
.. .. “पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे ! पुन्हा तुला वेगळा मानणार नाही रे ! आता अनुसंधान सोडून राहणार नाही रे ! फक्त…
.. .. उपेक्षू नको गुणवंता अनंताsss, रघुनायका, मागणे हेचिं आता.”
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




