सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
चित्र एकच.. विचार दोन…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
[ एक – झाड बोलाया लागले.. ]
शिशिर आला, पानगळ झाली
तरी महत्व आले पानाला
पुत्र मरे बापा आधी जाणून
सांगा काय वाटत असेल झाडाला?
*
पिकले पान झाले, गळणारंच कधीतरी
हीच शिकवण मानवाला द्यावी
असेल का पानाच्या हृदयांतरी?
*
गळून पडले पान
पण शाबूत औषधी गुण
म्हणूनच गोळा करती पान न पान
तेलरूपे ठेवती बाटल्या भरून ||
*
तसेच जगावे हे माणसा
घे तू छोट्या कृतीतून जाणून
मरावे परी कार्यरूपे उरावे
आदर्श द्यावा आठवांमधून ||
*
झाड परी सांगे जीव तोडून
जाऊ नका संकटांना घाबरून
जाणार हे पण क्षण निघोन
येणार सुख जीवनी वसंत होऊन ||
☆
[ दोन – बागेतला बाक]
बागे मधला बाक एकला
काय सांगतो जरा ऐक
विसावली किती पिकली पाने
गळून गेली करीत एक एक ||
*
झाडावरुनी मग गळली पाने
आठव सांगत विसावली थोडी
हळवी झाली मग ती ही वेडी
सांत्वन बाकाचे करीत धागे जोडी||
*
पिकल्या पानांच्या बाकावरुनी
चाललेल्या अनेक गप्पा
मागचे झाड ऐकत होते सारे
साक्षी ठेवत हृदय कप्पा||
*
गेली कित्येक पाने सोडून
बाक एकला रडू लागला
पान रूपी शब्द झाडाचे
आले धावून सांत्वनाला||
*
संगतीला कोणी नाही
म्हणून उदास का व्हायचे?
कोणत्या रूपे देव येऊन
साथ देईल हेच आशेने बघायचे||
*
हसला बाक हळूच गाली
दुसरी पाने येतील कोणी
देव साथीला आहे विश्वास ठेऊनी
पानांना कुरवाळे सद्गतीत होऊनी||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप सुंदर ताई