मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

☆ कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल ☆

 

लेक गेला परदेशी, हुरहूर कासाविशी

मन गेले ते त्यापाशी तन उरे झुरे स्वतःशी

 

किती येड येड मन ठरयेना मज जवळी

समजाऊ किती त्याला राही व्याकुळ होऊनी

 

किती काळ गेला गेला तू आला आला वाटे

डोळे अंथरून वाटेवर जीव भ्रमला फार फार

 

नादावल फार फार नित्य काळजी सकल

उडे भुरकन भूर फिरून लेका तुझ्याजवळ

 

काय करू त्याला तोड लागे भेटीची ओढ ओढ

व्हॉट्सअँप,इंस्टाग्राम सारा मृगजळी सरंजाम

 

चंद्रताऱ्यांच्या डोळा भेटी तश्या संगणकी भेटी गाठी

हाय हॅलो रोज बोली रुक्ष ख्याली खुशाली

 

कशी करू याला तोड साऱ्या जीवाची घाल मेल

प्रेम झाले मती मोल धनापुढे सारे फोल

 

पैसा रोकडा ट्रान्स्फर एक गुलाब कटे फार

ये म्हणता नाही सवड डोळे अश्रूंनी कवाडं

 

तुला बोलावी आभाळ तोकडे जननीचे मोल

माझी अमूल्य तू ठेव, देवा ती ठेव सुखी ठेव

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- neela.deval@gmail.com

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – अभंग ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ एकादशी विशेष – अभंग ?️?

आज एकादशी

जावे पंढरीशी

भेटाया विठूशी

सावळ्या त्या!!१!!

 

सुरेख सावळी

उभी भीमातटी

सुंदर गोमटी

विठाबाई!!२!!

 

माझी विठूआई

सौंदर्यांची खाण

नसे तिथे वाण

कोणतेही!!३!!

 

चंद्रभागे तीरी

भक्त पुंडलीक

साधू जवळीक

त्याची आधि !!४!!

 

वाळवंटी होई

मृदंग गजर

टाळ चिपळ्या त्या

निनाद ती!!५!!

 

नामदेव चिरी

वसे महाद्वारी

सबाह्य अंतरी

दुजे नाही!!६!

 

चोखोबा बंकोबा

जनाईची भेट

तेव्हा दिसे नीट

पांडुरंग !!७!!

 

तुकोबा रायांना

ओढ विठ्ठलाची

झाली अनावर

दर्शनाची!!८!!

 

तुकोबा म्हणती

धन्य हे वैकुंठ

झाले हो प्रकट

भूमिवरी !!९!!

 

दिनांक:-२६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 73 ☆ गीत – लावणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 73 ☆

☆ गीत – लावणी

यूट्यूब लिंक >>  रंगणार विडा नक्की

स्वर : सावनी रविंद्र :: संगीत : सागर – संतोष :: गीत ‌ : अशोक भांबुरे

रंगमहाली बैठक जमली

पानविड्यांनी मैफिल रंगली

 

चुना लावला, कात पेरला, त्यात सुपारी पक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… धृ

 

पान मनाचं माझ्या कोर

नाजूक देठाच हिरवं गार

अलगद घ्याना तळहातावर

थोडं केशर घाला त्यावर

लवंग टोचा, प्रेमाने खोचा, आत सुपारी कच्ची

रंगणार, राया विडा हा नक्की… १

 

नेसून आले पैठणी कोरी

रागू- मैनेची नक्षी भारी

अवतीभवती होत्या पोरी

तरी दिलाची झालीच चोरी

कुठं शोधावं, काही कळेना, झाले मी वेडी पक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… २

 

हवा तेवढा देईल मोका

ईश्काचा दोघे घेऊ झोका

चुकेल माझ्या काळजाचा ठोका

द्याल कधी जर मजला धोका

तक्रार देईल, चौकीत नेईल, पिसाया लागल चक्की

रंगणार, राया विडा हा नक्की… ३

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

चिंब चिंब काळी आई

थेंब  थेंब  झेलतेय

गारठ्याशी शिरशिरती

झोंब अधिरी खेळतेय

 

कोंभ कोंभ डवरले

पान पान तरारले

हिरव्याकंच वावरात

गच्च तुरे पिसारले

 

फुललेल्या वावरीत

अंकुरते बीज दडे

मुळे रुजली,मातीची

गच्च गच्च दिठी पडे

 

जाता जाता दान दिलं

परतीच्या पावसानं

बळीराजा सुखावला

चढे त्याला अवसान

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

कुठे थांबायचे हे समजले पाहीजे”

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुठे थांबायचे हे समजले पाहीजे. हे जीवन जगण्याचे तत्वच आहे. हे कुठेही लागु होते.बर्‍याच जणांना समजत नाही म्हणा किंवा बर्‍याच जणांच्या लक्षांत येत नाही कुठे थांबायचे ते. ज्यावेळी लक्षांत येते त्यावेळी खुप ऊशिर झालेला असतो आणि नुकसानही खुप झालेले असते. तेंव्हा कुठे थांबायचे हे तत्व आपण सर्वांनी अंगिकारले पाहीजे.

आता पर्यावरणाचाच प्रश्र्न घ्या. आपण निसर्गावर अत्याचार करीत आलेलो आहे.त्याचा परिणाम पर्यावरणाचा  र्‍हास होण्यात झालेला आहे. खरी जंगले न वाढवता आपण सिमेंटची जंगले वाढवित गेलो. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लोकांना श्र्वास घेणे अवघड होत चाललेले आहे.ही परिस्थिती बहुतेक सर्व मोठ्या शहरांमधुन आहे. विकास करीत असताना योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे ही परिस्थिती ऊदभवली.

कांहीवेळा आपल्याला प्रचंड राग येतो. रागाच्या भरात आपण खुप बोलतो असे नाही तर कांहीही बोलतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची की राग आला की १ ते १० अंक मोजायचे. हेतु हा की अंक मोजेपर्यंत राग थोडा तरी शांत होतो. रागाच्या भरात बोलताना कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलत सुटतो. अद्वातद्वा बोलतो. माणसे दुखावली जातात, दुरावली जातात. हे टाळले पाहीजे. राग आला की योग्य ठिकाणी थांबता आले पाहीजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतील.

अलिकडे असे लक्षांत आले आहे की तरूणपिढी व्यायाम, जीम याकडे अधिक लक्ष देत आहे. पण हे करीत असताना कुठे थांबायचे हे या तरूणपिढीला समजत नाही. अशा बातम्या वाचनात आल्या आहेत की व्यायाम करीत असताना कांही मुले अति व्यायामामुळे दगावली आहेत. तेंव्हा तरूण पिढीने व्यायाम करताना कुठे थांबायचे हे लक्षांत घेतले पाहीजे.

सध्या सर्वांकडे स्मार्ट फोनस आहेत. कंपन्याचे तीन तीन महीन्यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बोलण्याचे चार्जेस पडत नाहीत. अनेकजण त्यामुळे फोनवर बोलायला लागले की थांबतच नाहीत. तासन तास बोलत राहतात. या कालावधीत एखाद्याला यांचेशी संपर्क साधावयाचा असेल तर यांचा फोन बिझी. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे थांबायचे हे समजलेच पाहीजे.

अलिकडे सर्वांना “व्हाटसअॅप” हा फार मोठा विरूंगळा आहे. आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे.आपल्याकडील माहीतीसुध्दा आपण शेअर करू शकतो. पण कांहीजण याचा दुरूपयोग करतात. आला मेसेज की कर फॉरवर्ड. कांहीवेळा मेसेज वाचायचेसुध्दा कष्ट घेत नाहीत. एकाचवेळी वीस वीस तीस तीस फोटो, ६०/७० एमबीचे व्हीडीओज पाठविणे कितपत योग्य आहे. याचा विचार अतिशय आवश्यक आहे. पण तो होताना दिसत नाही. व्हाटसअॅपवरती मेसेजस पाठविताना कुठे थांबायचे हे समजले पाहीजे नाहीतर मेसेजेस डीलीट करण्याचे कामच होऊन जाते.

पुर्वी लग्नसभारंभात जेवणाच्या पंक्ति ऊठायच्या. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे प्रदर्शन व्हायचे. जेवताना पाहुणेमंडळीना प्रचंड आग्रह केला जायचा. अन्नाची नासाडी व्हायची. आग्रह करण्याला “कुठे थांबयचे” हे न समजल्यामुळे असे घडायचे. आता थोडी पध्दत बदलली आहे. पंक्तिच्याऐवजी बूफे पध्दत आली. तरीसुध्दा अन्न वाढुन घेताना काय काय घ्यायचे काती किती घ्यायचे हे न समजल्यामुळे अन्नाची नासाडी ही होतेच. फक्त प्रमाण थोडे कमी.

थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. म्हणतात ना अति तेथे माती. या लेखाचे सार हेच की कुठे थांबायचे हे आपल्याला समजले पाहीजे आणि हे समजले तर आपले सर्व नातेसंबंध नॉर्मल राहतील, सुधारतील.

मैत्रीत, नातेसंबंधात बर्‍याच वेळा चेष्टा केली जाते. जोपर्यंत मजेत चालले आहे तोपर्यंत ठीक वाटते. पण चेष्टेचा अतिरेक झाला की नातेसंबंध बिघडतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहीजेत.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इंद्रधनु! ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  इंद्रधनु! ☆ श्री मुबारक उमराणी ☆

चालतांना चाललीस

गीत उद्याचे ते गात

मनी माझ्या पेटवीत

ह्दयी प्रेमाची वात

 

तुझ्या सवे चाललो मी

प्रेम उद्याचे भरत

स्वर्ग सुखानंदी मीही

तुज ह्दयी धरत

 

झाडीवेली नाचतात

फुल सुगंधाचे गीत

मनीमोर रानभर

पंखफुले गंध पित

 

खळखळ वाहे झरा

थेंब मोती अंगावरी

चिंब चिंब भिजतांना

भासे रानस्वप्न परी

 

ओल्या तुझ्या कुंतलास

चुंबे गवताचे पाते

मनोमनी फुलतांना

फुल तुझे गुण गाते

 

पडे  प्रतिबिंब तुझे

लहानग्या त्या झ-यात

मंद मंद लहरत

निनांदे दरीखो-यात

 

पक्षी सारे बोले तुला

गीत श्रावणी ते म्हणू

फांदीवरी झुलतच

होऊ दोघे इंद्रधनु

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 25 ☆ सत्य परिस्थिती… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 25 ☆ 

☆ सत्य परिस्थिती… ☆

अध्याय माझा संपेल

मी रुद्र भूमीत असेल

घरी पेटतील चुली

सडा सारवण होईल

 

जेवायला बसतील सर्व

अश्रू डोळ्यांचे थांबतील

माझ्याच घरातील सर्व

भोजनाचा स्वाद घेतील…

 

स्वाद घेत घेत भोजनाचा

आग्रह एकमेकांना होईल

रुदन संपेल त्या क्षणाला

कामाला हात लागतील…

 

हे जीवन क्षणभंगुर

इथे कुणाचे स्थिर ते काय

आला त्याला जावे लागणार

यात आश्चर्य नाय…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्रांतीचा पार खुला ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ विश्रांतीचा पार खुला ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पाशही सगळे सोडू मोकळे,चल जाऊया दूर तिथे

तुझे, माझे ,देणे, घेणे     नसतील असले शब्द जिथे.

 

नसेल खुरटे घरटे अपुले,बंद ही नसतील कधी दारे

स्वच्छ,मोकळ्या माळावरूनी वाहत येतील शीतल वारे

 

आशंकेला नसेल जागा,नसेल कल्लोळ  कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे.

 

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत,पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

 

धकाधकीच्या जीवनातले क्षण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे,हासत पुढच्या हाती देऊ.

 

खूप जाहले खपणे आता,जपणे आता तुला मला

खूप जाहला प्रवास आता,करू विश्रांतीचा पार खुला.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीपांडुरंगाचा फराळ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ श्रीपांडुरंगाचा फराळ ?️?

खा..ऽ..रे विठ्ठला उपासाची खिचडी..

खा…रे विठ्ठला..खा..!!धृ.!!

 

करायला घेतली उपासाची खिचडी!

साबूदाणा शेंगदाण्याने केली फाकडी !

किसून घातली त्यात मी काकडी!

खा…ऽ.रे विठ्ठला उपासाची खिचडी!!१!!

 

घेतले शेंगदाणे खमंग भाजून !

गूळ वितळवला तूप घालून!

चिक्की बनवली पाटावर थापून!

खा..ऽ..रे विठ्ठला गोड गोड चिक्की !!२!!

 

वरईचा तांदूळ तुपात भाजला !

खुमासदार छान शिजवून घेतला!

चिंच गुळाचा कोळ केला!

दाण्याच्या आमटीला कोळ घातला!

झाली चवदार तांदूळ आमटी!

खा..ऽ.रे विठ्ठला.. वाटी वाटी !!३!!

 

खजूर सोलली बिया काढूनी!

बदाम बेदाणे पिस्ते घालुनी!

मिरची मीठ चवीस घालुनी!

त्याची केली चवदार चटणी!

खा..ऽ..रे विठ्ठला.. खजूराची चटणी!!४!!

 

पिकलेली ती लिंबे आणली!

फोडी करुनी उकडून घेतली!

तिखट मीठ साखर टाकली!

झाले तयार चवदार लोणचे!

खा..ऽ.रे..विठ्ठला उपासाचे लोणचे!!५!!

खा..ऽ ..रे विठ्ठला..खा..ऽ..

 

दिनांक:-१६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

जीवन परिचय 

  • स्थापत्य अभियंता.
  • युवा पिढी चा कवी.
  • काव्य आणि अभिनय याची आवड.

☆ कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की 

नाही मिळाला कसला न्याय,

नुसते झाले सरकारी दौरे

पाहणी करून उपयोग काय,

इथं उपाशी बसलेत मोहरे

 

मागं पळून तुमच्या जोरात,

दुखु लागले हताश पाय

कुजलेलं पिक दाखवून तरी,

पाहिलं मदत मिळेल काय

 

इथं सोन्याला येई झळाळी,

शेअर मार्केटला उसळी

पण शब्द घुमतो महगाई,

जेव्हा फुलते माती काळी

 

परत नका येऊ बांधावर,

राहुदे आम्हाला जरा शांत

तुम्ही फक्त भेटा चॅनेलवर,

आता अर्णब आधी सुशांत

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares