मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

गा बेटी गा     क्रमश:३

(मागील भागात आपण पाहिलं –  मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर… आता इथून पुढे)

प्रज्ञा तिशीच्या आसपासची. गेली पाच-सहा वर्ष त्याच्याकडे येतेय. ती पी.एच.डी. करत होती. ‘लोकसंगीताचा शास्त्रीय संगीताशी असलेला अनुबंध’ या विषयावर भारतभर फिरून अनेक मोठमोठ्या गायकांबरोबर चर्चा केली होती. या संदर्भात निरंजनशी चर्चा करायला ती एकदा घरी आली आणि नंतर येतच राहिली. प्रबंध पूर्ण झाला. तिला पीएच.डी. मिळाली. पण निरंजनच्या गाण्याने प्रभावित होऊन ती त्याच्याकडे गाणं शिकायला येऊ लागली. आता तर बहुतेक मैफलींच्यावेळी त्याच्यामागे तंबोऱ्याच्या साथीला ती असते.

निरंजनने लिहिलं होतं, ‘प्रज्ञा माझी प्रेरणा आहे. चेतना आहे. माझी प्रतिभा आहे. स्वरदा आहे. माझे संगीतीय प्रयोग हे खरे तर आमचे संयुक्त प्रयोग आहेत. तिचा अभ्यास आणि चिंतनच मी माझ्या गाण्यातून लोकांपुढे मांडतो. नाही. ती नसली तर माझं गाणं संपून जाईल. ती असताना माझं गाणं रंगतं. फुलतं. मला नवीन नवीन काही तरी सुचत रहातं. तिच्याशिवाय, गायक म्हणून मला अस्तित्व उरणार नाही. मी चुकत असेन. तरी, अनिवार्य आहे हे सारं…’

साधना सुन्न बधीरशी झाली. प्रज्ञा गेली पाच-सहा वर्षं घरी येतेय. गोड गळ्याची, सुरेल आवाजाची, काहीशी अबोल, शांत, प्रतिभावंत तरूणी साधनाला आवडायची. कळत नकळत आपलं तारूण्यरूप साधना तिच्यात शोधायची. धाकट्या बहिणीसारखं तिचं कौतुक करायची. निरंजनाबद्दल तिच्या मनात भक्ती होती. साधना जाणून होती ते! तिची भक्ती प्रितीत कधी रूपांतरीत झाली? बहिणीची सवत होण्यापर्यंतची वाटचाल कधी झाली? आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

एक काळ असा होता, साधना निरंजनची प्रेरणा होती. त्याची प्रतिभा जागृत करणारी चेतना होती. त्यावेळी त्याचं नाव झालेलं नवतं. एक उदयोन्मुख कलाकाल म्हणून त्याच्याकडे खूप अपेक्षेने पाहिलं जात होतं. तेव्हा त्याचा रियाझ साधना समोर असल्याशिवाय होत नसे. कोणत्याही मैफलीच्या वेळी साधनाच तंबोऱ्याची साथ करत असे. संसार वाढला तसतशी ही साथ सुटत गेली.

निरंजनला गाण्यासाठी पूर्णवेळ मिळावा म्हणून साधनाने नोकरी पत्करली. मुलं झाली. घराचा व्याप वाढला. कामात, मुलांत, त्यांच्या आणि निरंजनच्या वेळी सांभाळण्यात साधना इतकी गुंतत गेली की गाण्याचा पदर तिच्या हातून कधी सुटला, ते तिचे तिलाच कळले नाही. गाण्यामुळे त्यांची ओळख झाली होती. ते परस्परांच्या जवळ आले होते. एकरूप झाले होते. परस्परांपासून दूर न जाण्याच्या शपथेने बांधले होते.

‘कामाच्या रेट्यात प्रथम गाण्यापासून दुरावलो आणि आता निरंजनपासून…’ साधनाला वाटत राहिलं.

पुढे पुढे निरंजनच्या रियाझाच्यावेळी आपल्याला तिथे थांबायला वेळ होईना. सुरुवातीला आपण तिथे थांबत होतो. त्याच्या नेमक्या जागा. सुरेख मींड, दमदार तान यांना दाद देत होतो. मन किती उत्सुक आणि टवटवीत होतं तेव्हा… काही काही वेळा तर आपण त्याला सूचनाही देत होतो. पुढं मुलं झाली. त्यांचं रडणं. आई हवी, हा हट्ट. त्याच्या रियाझात व्यत्यय नको म्हणून मुलांनाच दूर नेणं, मुलं मोठी झाल्यावर त्यांचे गृहपाठ, त्यांचे कार्यक्रम, शिवाय नोकरी, घरकाम या साऱ्याचा आपल्यावर उतरलेला शीण… पहिल्यासारखं आता निरंजनच्या आगेमागे करता येत नव्हतं. त्याचा आणि आपला ही संसार सावरता सावरता त्याच्या गाण्यापासून आपण दुरावत चाललो. आपलं स्वत:चं गाणं तर त्याहीपूर्वी केव्हाच सरलं होतं.

सुरवातीला वाटायचं, आपण हळूहळू बधीर, बोथट होत चाललोय. नंतर नंतर हे वाटणंही बोथटून गेलं. रियाझाचं राहू द्या. प्रत्येक मैफलीला जाणंही अशक्य झालं. निरंजन नावलौकिक मिळवत गेला. पण, त्याची प्रेरणा, प्रतिभा म्हणून असलेलं आपलं स्थान हरवत गेलं आणि आता तर धक्काच… आपल्यापेक्षा १७-१८ वर्षांनी लहान असलेल्या आपल्या शिष्येबरोबर तो रहाणार. खरंय. त्याच्या नावाला वलय आहे. त्याहीपेक्षा जीव ओवाळून टाकावं असं त्याचं गाण आहे. खरं आहे. प्रज्ञाही अति संवेदनाक्षम, तरल मनाची आहे. अभ्यासू आहे. त्याच्या सांगितीय प्रयोगात तिचा मोठा वाटा आहे. हे सारं पटतंय आपल्याला.

पण, त्यासाठी खरंच दोघांनी एकत्र रहाणं अपरिहार्य आहे का? शिष्या मुलीसारखी असते ना?

सरत्या संध्याकाळी शिकवणीहून मधू परत आली. कोप-यात चपला आणि सोफ्यावर दप्तर भिरकावत तिने विचारलं,

‘आई, बाबा आले? सकाळीच येणार होते ना?’ साधनाच्या चेहऱ्याकडे बघता बघताच तिच्या लक्षात आलं. बाबा आले नाहीत.

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहीलं – तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं. आता इथून पुढे -)

दुस-या दिवशी साधना बॅंकेतून घरी आली तर निरंजनने पाठवलेलं पत्र मिळालं.

‘छान! म्हणजे हा काही कोणार्कहून सरळ घरी येत नाही. कुठे कुठे हिंडूण, मैफली गाजवून येणार स्वारी… त्याला कितीदा सांगितलं, अशी परस्पर आलेली आमंत्रणं स्विकारू नकोस…’ असं पुटपुटत साधनानं पत्र फोडलं.

‘साधना गेले वर्षभर मी एका प्रचंड वादळात सापडलोय. संसार की संगीत… मला वाट दिसत नव्हती. भोवतीनं दाट धुकं आहे आणि मला श्वासही घेता येत नाही असं वाटत होतं.

मनाशी खूप झगडून मी संगीताच्या वाटेवर पावलं ठेवलीत. प्रज्ञा माझी साथसंगत करणार आहे.

माझ्यासाठी केव्हापासून तिने आपलं घर सोडून यायची तयारी दाखवलीय. माझाच निर्णय होत नव्हता.

वाटत होतं, मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय. अजूनही वाटतंच. मी तुझा ऋणाईत आहेच. शेवटपर्यंत तसाच राहीन. तुझ्यामुळेच माझा कलंदराचा संसार मार्गी लागला. त्यासाठी तुला तुझं आवडतं संगीतही सोडावं लागलं, हे कसं विसरू? त्यासाठी तुला तुझी आवडती संदीताची करिअर सोडावी लागली, हे तरी कसं विसरू? पण, या कलंदराला साथ द्यायला, सावरायला, सांभाळायला तुझे हातच आता रिकामे नाहीत…

वाचता वाचता साधनाच्या मनापुढे तिचा भूतकाळ उभा राहिला. गाण्यानेच त्यांना जवळ आणलं होतं. दोघेही साधुरामांचे पट्ट शिष्य. या दोघांबद्दलही खूप आशा बाळगून होते ते! आपल्या घराण्याचा नावलौकिक दोघेही वाढवतील याबद्दल साधुरामांची पक्की खात्री. गाता गाता दोघेही एकमेकांत गुंतत गेले. पुढे लग्न करून अगदी एकमेकांचे झाले. संगीताच्या क्षेत्रात दोघेही अजून धडपडत होते. अजून नाव व्हायचं होतं. दोघांनाही मैफलीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रणे यायची. पुढे वर्षभरात मधू झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, दोघांनाही विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन हिंडणं शक्य नाही. कुठे तरी स्थिर झालं पाहिजे. वाढल्या संसाराला स्थैर्य येण्यासाठी निश्चितपणे आणि नियमितपणे अर्थप्राप्ती होणारा व्यवसाय पत्करणं जरूर होतं. मग साधनाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. निरंजनने मात्र गाणं आणि गाणचं करायचं. साधनाला बॅंकेत नोकरी मिळाली. घराला स्थैर्य आलं. मधूच्या पाठीवर तीन वर्षांनी अनूप जाला. वर्षे सरत गेली. नावलौकिकाच्या पायऱ्या चढत निरंजन नामांकित गायक झाला. घराणेशाहीत बंदिस्त झालेल्या शास्त्रीय संगीताला त्याने अभ्यास, प्रयोगशीलता याच्या साहाय्याने नवी झळाळी, नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. लोकसंगीताला शास्त्रीय बैठक देण्याचा त्याने प्रयत्न केला. हे सारं खूप लोकप्रिय झालं. रसिकांमध्ये, जाणकारांमध्ये त्याने स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.

अलीकडे अलीकडे साधनाला जाणवत होतं. स्वरांचा धागा पकडून निरंजन उंच उंच जातोय. त्याच्या दृष्टीच्या कवेत केवढा तरी विशाल विस्तार आहे. आपण मात्र जमिनीवरच उभे आहोत आणि तो सप्तसुरांचा धागा आपल्या हातून निसटत चाललाय. छे! केव्हाच निसटून गेलाय. आता आपलं गाणं हौशानवशा गायिकेइपतपच! बॅंकेमधली नोकरी करता करता इतके रूक्ष होऊन गेलो का आपण? कधी झालं असं? निरंजनच्या रियाजाच्यावेळी त्याने एखादी सुंदर जागा घेतली, एखादी अवघड तान घेतली तर पूर्वीसारखी आपली झटकन् दाद जात नाही. कामाच्या घाईत आपल्या लक्षातच येत नाही. कान जणू बधीर झालेले… त्या गाण्यातल्या, स्वरातल्या लावण्यकळा आपल्या मनाला उमगायच्याच नाहीत. निरंजनमधला कलावंत मग नाराज व्हायचा. पत्रातून त्याने हीच वस्तुस्थिती मांडली होती. पण, व्यवहाराच्या साऱ्या जबाबराऱ्या पेलता पेलता ती इतकी थकून जायची की त्याला अपेक्षित असलेलं ताजं, टवटवीत, तरल मन तिच्याकडे उरलेलंच नसायचं.

पुढे मधू गाणं शिकायला लागली. तिचा आवाज, तिची गाण्यातली जाण पाहून साधनाने आपल्या आशा-आकांक्षा तिच्यावर केंद्रित केल्या. आपली स्वप्नपूर्ती ती तिच्यात शोधणार होती. मधूला चांगली गायिका बनवायचं. दहावीची परीक्षा झाली की तिच्या गाण्यावर भर द्यायचा. कॉलेजचं शिक्षण दुय्यम, असं त्यांनी केव्हाच ठरवून टाकलं होतं. मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर…

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मधू बागेला पाणी देत होती. गुलबक्षीच्या ताटव्याजवळ आज मे फ्लॉवरचा दांडोरा उमडून आलेला होता. दांडोऱ्यावर हजारभर कळ्यांचं कणीस. काल तर तिथे काहीच नव्हतं. आज पापण्या मिटलेल्या गप्पगप्पशा कळ्या कणसात एकमेकांना बिलगून बसल्याहेत. उद्या बाहेरच्या परिघातल्या कळ्या डोळे उघडतील. लालसर गुलाबी केशरकाड्या दूर होतील. आतल्या वर्तुळातले गुलाबी केसर मुकुटासारखे पिवळे परागकोश माथ्यावर मिरवतील. परवाला त्याच्या आतल्या वर्तुळातल्या कळ्या उमलतील. तेरवाला त्याच्या आतल्या. चार-पाच दिवसात त्या दांडोऱ्यावर गुलाबी रंगाचा फुटबॉल झोकात झुलू लागेल.

आज बाळ पोटात ढुशा देतंय. नंतर लाथा झाडेल, वळेल, फिरेल आणि एक दिवस पोटातलं बाळ कुशीत येईल. गळामिठी घालील. पापे घेईल. ती विलक्षण उत्तेजित झाली.

झाडांना पाणि देऊन झालं. नंतर तिने पाईपमधून पाण्याचा फवारा अंगणावर उडवला. तापलेल्या मातीचा कण न् कण उमलत गेला. त्याच्या गंधाच्या लाटा उसळत उसळत तिच्यापर्यंत पोचल्या. आवेगाने, तिने त्या श्वासातून आपल्या शरीरात सामावून घेतल्या. त्या गंधाने तिची उत्तेजना अधिकच वाढली आणि तिच्या गळ्यातून स्वर पाझरू लागले. स्वर… ताना… स्वरांच्या आवर्तनात तीदेखील झाडाझाडातून फुलपाखरासारखी भिरभिरू लागली. आता त्या स्वरांना शब्द भेटत गेले.

‘केतकी गुलाब जुई चंपक बन फुले’

गात गातच ती आत आली. मागच्या व्हरांड्यात उभी राहून बागेकडे बघत ती गाऊ लागली. आलाप-तानांचे झुले हिंदोळू लागली.

साधना घरी आली. पण, मधूचं लक्षच नव्हतं. ती आपली गातच होती. स्वरांचा झरा अविरतपणे झुळझुळत होता. साधना चकितच झाली. कितीतरी दिवसांनी वर्षांनी तिची लाडकी लेक गात होती. मनमोकळी होऊन गात होती. पण, आज असं काय घडलं? कितीतरी वर्षांपूर्वी तिने गाणारे आपले ओठ मिटून घेतले होते. गोड गळ्यावर अत्याचार केला होता. शपथ घ्यावी तसं गाणं सोडून दिलं होतं.

मधुवंतीचा आवाज अति मधुर सुरेल. ताला-सुरांची पक्की जाण. शाळेत असताना शाळेतली, शाळेबाहेरची गाण्याबद्दलची कितीतरी बक्षिसे तिने मिळवली होती. तिला खूप मोठी गायिका बनवण्याचं स्वप्नं तिच्या जन्मापासूनच निरंजन आणि साधना बघत होते. ‘पहिली बेटी-सूरकी पेटी…’ तिच्या जन्मानंतर निरंजन म्हणाला होता. मधुवंती त्याची भारी लाडकी. निरंजन रियाजासाठी तिला घेऊन बसली की साऱ्या जगाचं भान विसरायचे. गातच राहायचे. धाकट्या अनूपला मात्र एका जागी मांडा ठोकून आलाप-ताना घोटायचा भारी कंटाळा. दहा मिनिटं एका जागी बसणं त्याला कठीण जायचं. गोड बोलून, चुचकारून, रागावून सगळं करून झालं. पण, तो भारी चंचल. मन एकाग्र करून एका जागी स्थिर बसणे त्याला मुळीच जमत नसे. शेवटी, निरंजनने त्याचा नाद सोडला. आपल्या मुलीवर मधुवंतीवरच त्या दोघांनी आपल्या आशा केंद्रित केल्या. तिला ख्यातनाम गायिका बनवायचं. आपल्या घराण्याचा वारसा अधिक संपन्न करून तिच्या हाती सोपवायचा.

पण एक दिवस… निरंजनच घरातून निघून गेला.

जाता जाता मधूचं गाणंही घेऊन गेला.

कोणार्कच्या सूर्यमंदिरात संगीत महोत्सव होता. त्यासाठी निरंजन घरातून बाहेर पडला. मुलांच्या शाळा, साधनाची बॅंक… कुणालाच जाणं शक्य नव्हतं. मधूचं तर १० वीचं महत्त्वाचं वर्ष. निरंजनचं गाणं खूप चांगलं झालं असणार. दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रातून त्याचा विस्तृत रिव्ह्यू आलेला. जाणकार संगीत समीक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलेलं. मुरकती, मींड, लोच आणि मुख्य म्हणजे त्याच्या गाण्यातलं भावसौंदर्य, त्याची प्रयोगशीलता, नावीन्य, वाचताना साधना-मधूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मधू तर दिवसभर आपल्या मन:चक्षूंपुढे निरंजनचं गाणं आठवत राहिली. त्याचा दमदार पुरिया… रंग कर रसिया आओ अब… तिच्या डोळ्यांपुढे शाळा नव्हतीच जणू. तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं.

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उपाय… (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ उपाय… (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘शुक्रा… खरच  तू भेटशील अशी आशा नव्हती. पण पायर्याह उतरताना चान्स घेतला. दोन्ही लिफ्टस बंद आहेत., माहीत आहे नं? असं म्हणत म्हणत हीनाने आत प्रवेश केला.

हो ना ग! काय करणार, आजच नेमकं पूर्वीलाही उशिरा यायचं होतं.’

पूर्वी…?

‘माझ्याकडची कामवाली ग! आतमध्ये झाडू-फारशी करतेय. बोल! तुझी लीव्ह इन रिलेशनशीप काय म्हणतेय?

‘ठीक चालू आहे पण शेवटी गडबड झालीच! यार, त्याचसाठीच आलेय. ते म्हणतात नं, आगीजवळ तूप ठेवलं की कधी ना कधी वितळतच! तू म्हणाली होतीस नं, तुझ्या आजीला अनेक रोगांवरचे अनेक घरगुती उपाय माहीत आहेत.’

‘हो. माहीत आहेत. क्रॉनिक सर्दीसाठी सांगितलेला तो ओव्याचा उपाय… तूही तो करून बघितला आहेस.’

हो. म्हणूनच तर इथे आले. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी. जरा विचार नं तिला काही घरगुती उपाय….’ हीनाने आपल्या पोटाकडे इशारा करत म्हंटलं .

‘मला मारून टाकणार की काय? आजीला माझीच शंका येईल. इथे येऊन कातडं सोलेल माझं.’

‘मग मलाच फोन नं. दे. मीच बोलेन तिच्याशी.’

‘नाही नाही. तसंही नाही चालणार! आजीला माहीत आहे, तू माझी मैत्रीण आहेस. ती विचार करेल, माझाच काही तरी गोंधळ आहे आणि मला ओरडा खावा लागू नये म्हणून मी तुला पुढे केलय. कधी तरी संधी बघून मीच तिला विचारेन.’

‘जरा लवकर बघ यार…. बस, एकदा सुटका मिळावी. आच्छा मी चालते. अजून तीन जीने उतरायचे आहेत. ‘ असं म्हणत म्हणत हीना बाहेर पडली.

‘पूर्वी, जरा लवकर लवकर हात चालव. मला उशीर होतोय. आज आणि जीने उतरून खाली जायचय.’ शुक्रा म्हणाली.

‘झालं दीदी निघतेच आहे. आपण ही चिठ्ठी तेवढी बघा. ‘

‘अग, कसली चिठ्ठी आहे?

‘हा उपाय आहे. माफ करा. हीना दीदीचं बोलणं मी ऐकलं.’

‘तुला कसा माहीत हा उपाय?’ चकित होत शुक्राने विचारले. तिने चिठ्ठी बघितली होती.

‘दोन वेळा त्याचा वापर मी करून बघितलाय. गॅरेंटेड आहे.’

‘पूर्वी… तू?….’

‘दीदी एकदा रस्त्यावर भीक मागताना पकडले होते. तेव्हा पोलिसांनी मला ‘शेल्टर होम’ मध्ये टाकून दिले. तिथे रोजच कुणा ना कुणाबरोबर तरी जावं लागायचं. हा उपाय सुभाषिताप्रमाणे तिथल्या भिंतीवर लिहिलेला आहे.’ असं बोलता बोलता पूर्वीनं फ्लॅटचा दरवाजा खेचला आणि ती जिन्याकडे गेली.

मूळ हिंदी  कथा – ‘नुसखा’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काल आमच्या शाळेत वेगळंच घडलं… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ काल आमच्या शाळेत वेगळंच घडलं… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

 नमस्कार मंडळी !!

 

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं

गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं !

 

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात

 

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक

 

यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू

 

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद

 

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन

 

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला

गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला

 

यमालाही आठवलं त्याचं बालपण

दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन

 

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून

उदया येतो म्हणत यम गेला आला पावल्या निघून

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर

 

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब

 

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून

 

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती

पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती

 

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती

डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती

 

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा

 

शेवटची ही संधी गुरुजी आज नककी देईन

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन

 

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन

आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन

 

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार

शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार

 

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात

 

यम म्हटला गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी

आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी

 

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी

तुमच्या अशा वागण्यानं डयुटी धोक्यात येईन ना माझी

 

आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून

किर्द , दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून

 

उदया पासून सुरु आहे c० साहेबाचा दौरा

कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा

 

परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग

 

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी

लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी

 

पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर

 

कामाच्या या तानाची डोक्या  भेळ

आमच्याकडं नाही यमा  मरायलाही वेळ

 

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा

कांदा मुळा भाजी आमची खडू आणि फळा

 

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम

त्यांचा मधेच दिसतो कृष्ण आणि राम

 

फुकट पगार  म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव

हरकत नाही आज माझा घेऊन टाक जीव

 

यमाला आलं गलबलून , सारं काही ऐकून

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून

 

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार

 

टाटा बाय बाय करत करत  यम गेला निघून

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून

 

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं

नरक आणि स्वर्ग इथचं आहे सगळं

 

कामाशी काम करून घडवा नवा भारत

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत.

– अनामिक 

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘हार्ट’फिल – सुरेश नावडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ ‘हार्ट’फिल – श्री सुरेश नावडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते.. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त.. हार्ट अटॅक. वेळ.. मध्यरात्र…

शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता..

संध्याकाळी शुभांगी, थोडा दम खायला खुर्चीत बसली, तेव्हा तिच्या छातीत अचानक दुखू लागलं.. चमक आली असेल, असं समजून तिने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात शेखर आले. चौघांसाठी तिने चहा केला. चहा झाल्यावर ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली..

तिच्या मुलाच्या, साकेतच्या आवडीची ग्रेव्हीची मटर पनीरची भाजी तिनं करायला घेतली. रात्री साकेत आल्यावर, आठ वाजता सर्वांनी एकत्र जेवण केले. सगळं आटपेपर्यंत, रात्रीचे दहा वाजले. सासूबाईंना औषध व सासरेबुवांना गोळ्या देऊन झाल्या. साकेत त्याच्या रुममध्ये लॅपटाॅप घेऊन बसला. शेखरही झोपी गेले. शुभांगी स्वयंपाकघर आवरुन बेडवर पहुडली..

तासाभराने शुभांगीच्या छातीत, डाव्या बाजूला पुन्हा दुखू लागलं.. तिनं शेखरला उठवलं. शेखरने तिला पेनकिलरची गोळी काढून दिली व ती घेऊन झोपायला सांगितले. गोळी घेऊन तिने कसाबसा एक तास काढला. पुन्हा छातीतून तीव्र कळ आल्यावर मात्र शुभांगी घाबरुन गेली. तिला श्र्वास घेतानाही त्रास होऊ लागला. घामाने अंगावरचे कपडे ओलेचिंब झाले. तिला समजून चुकले की, आपल्याला हार्ट अॅटॅक आलेला आहे.. आता काही खरं नाही..

दरवाजात यमराज उभे होते.. त्यांना शुभांगीची मनस्थिती दिसत होती व तिच्या मनातील विचारही कळत होते..

शुभांगीला आपण अचानकपणे या जगातून निघून जाणार ही कल्पनाच सहन होत नव्हती.. तिची बरीचशी कामे व्हायची राहिली होती.. ती विचार करु लागली.. अजून साकेतचं लग्न व्हायचंय.. नवीन सूनबाई येणार.. तिला घरच्या रूढी, परंपरा समजून द्यायच्या आहेत.. कुलदैवताचं दर्शन व नवस फेडायचा आहे.. सासू-सासऱ्यांना घेऊन काशी यात्रा करायची आहे.. शेखरला एकदा गावी पाठवून, शेतीची कामं पूर्ण करायची आहेत..

शुभांगीला घरातलीही राहून गेलेली कामं आठवायला लागली.. सकाळी आणलेली पालक, मेथी निवडायची राहिलेली आहे.. मटारच्या शेंगा सोलायच्या राहिलेल्या आहेत.. शिवाय फ्रिजमधलं विरजणाचं पातेले भरुन गेलंय.. खरंतर आजच ताक करुन लोणी काढून ठेवायला हवं होतं.. मी आत्ता गेले तर लोक काय म्हणतील.. सगळी कामं अर्धवटच सोडून गेली… शिवाय किराणा आणायचा राहून गेलाय.. तांदूळ संपत आलेत…लाईटचं बिल भरायचं राहिलंय.. सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा राहिलाय…

शुभांगी विचार करीत होती.. मी जर अशीच गेले तर माझे दिवस करताना, नातेवाईक मंडळी माझ्या अशा वेंधळेपणाच्या वागण्याला हसतील.. मला तर ते कधीच सहन होणार नाही..

यमराजला, त्याच्या वडिलांच्या काळात त्यांनी सांगितलेल्या गृहिणींच्या गोष्टींशी, शुभांगीच्या मनातील गोष्टी जुळत होत्या.. अलीकडच्या काळातील शुभांगी ही संस्कारी व गृहकृत्यदक्ष पत्नी, आई व सून होती.. तिला असे मधेच घेऊन जाणे, त्याच्या मनाला पटेनासे झाले..

त्याने त्याच्याकडील राखीव कोट्यातील तीस वर्ष, शुभांगीला अनुकंपा तत्त्वावर दिली व तिला शुभेच्छा देऊन, तो आल्या वाटेने निघून गेला..

शुभांगीला, मनातील अनेक विचारांच्या गर्दीत छातीतील दुखणं कमी होऊन, कधी झोप लागली ते कळलं देखील नाही..

सकाळी ती नेहमीप्रमाणे सर्वांच्या आधी उठली. सगळं आवरुन पुजेला बसली.. प्रसन्न मनाने तिने पुजा केली व चहाचा कप घेऊन शेखरच्या हातात दिला.. शेखरने तिला विचारलं, ‘काल तुला अचानक काय झालं होतं गं?’

शुभांगी उत्तरली, ‘कुठं काय? जरा जादाचं काम केलं की, असं होतं कधी कधी.. तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला सोडून वरती जाईन? अहो, अजून खूप कामं व्हायची राहिली आहेत माझी!! ती अर्धवट सोडून, मी बरी जाईन..’

आपल्या कुटुंबाला आत्मियतेने सांभाळणाऱ्या, तमाम गृहिणींना ही ‘फॅन्टसी कथा’ समर्पित…

©  सुरेश नावडकर

१३-३-२२

मोबाईल ९७३००३४२८४

या रचनेचे सर्वाधिकार रचयिता  © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ करारनामा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ करारनामा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

विक्रमने मला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. आता हा कसले रजिस्ट्रेशन करतोय …??? त्याला विटनेस म्हणून नेहमी मीच हवा असतो. मनाशी अंदाज बांधतच मी तिथे पोचलो.

मला बघताच नेहमीप्रमाणे त्याने चिडून किती उशीर ..? असा चेहरा केला आणि हात धरूनच त्या साहेबांच्या पुढ्यात घेऊन गेला. मुख्य म्हणजे त्याची दोन्ही मुलेही तिथे हजर होती.

त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे छान चौकोनी कुटुंब आहे. दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत होती. त्यांनी सांगितलेल्या पेपरवर मी काही न बोलता सह्या केल्या. मुलांनीही सह्या केल्या. सगळे सोपस्कार पूर्ण होताच मुले मला बाय करून निघून गेली, आणि आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल मध्ये घुसलो.

मनपसंद पदार्थांची ऑर्डर करून झाली, आणि मी विक्रमला विचारले “कसल्या सह्या घेतल्यास बाबा ….?”

“तूला का काळजी …..? तुझ्याकडचे काही घेत नाही मी …… नाहीतरी आहे काय तुझ्याकडे …?”असे बोलून मोठ्याने हसला.

“तरीही मला विचारायचा हक्क आहे …” मी मोठ्याने ओरडलो, तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला “दे टाळी ….!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या. माझ्या दोन्ही अपत्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी” विक्रम शांतपणे म्हणाला.

“काय ….!! मी भान न राहवून ओरडलो. आजूबाजूची माणसे आमच्याकडे पाहू लागली “अरे वेड लागले का तुला….? असे कोण पेपर्स बनवते का…. ? मुले आहेत ती….. आयला संभाळणारच आणि त्याना मनासारखे शिक्षण देणे आपले कर्तव्य आहे….” मी त्याला समजावले.

“मान्य…. पण आपली ऐपत नसताना त्यांना शिकवणे, आणि नंतर त्याचा परतावा मागणे यात गैर काय …?” तो शांत होता.

“ते कसे….? मीही चिडूनच विचारले.

“हे बघ भाऊ …. मी आणि वनिता दोघेही जॉब करतो. वर्षाला दोघांची मिळून पंधरा लाखाची कमाई आहे. महिन्याला साधारण लाख रुपये घरात येतात. त्यात नवीन घराचे कर्ज, लाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, केबलचा खर्च वेगळा. घरात किराणा माल, गाडीचे मेंटेनन्स, पेट्रोल…. हाही खर्च. उरलेल्या पैशात दोन्ही मुलांचे शिक्षण, विविध गुंतवणुकीचे हप्ते आणि मेडिकल या सर्व गोष्टीत पैसे संपून जातात. हातात काहीच शिल्लक राहत नाही. येईल तितका पैसा कमीच पडतो. शिवाय दर चार महिन्यांनी काहीतरी खरेदी असतेच. त्यात कपडे, शूज असतातच. अरे इथून पैसा येतो आणि तिथून जातो. आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही.

वयात आलो, शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागून घरची जबाबदारी घेतली. त्यानंतर लग्न केले आणि ताबडतोब वर्षात मुलगी झाली दोन वर्षांनी मुलगा झाला. मग त्यांच्या जबाबदारीत गुरफटलो. ते आता पर्यंत…..

मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण मिळावे हा अट्टाहास. मग चाळीतून या मोठ्या घरात आलो. गावी घर दुरुस्त केले. साला… आता लक्षात येतेय, आपण आपल्यासाठी काहीच केले नाही…… दुसऱ्यांचा आनंद आपला मानत राहिलो. आई बाबा नेहमी कौतुक करतात. चार लोकांत अभिमानाने सांगतात माझ्याबद्दल. पण वनिताचे काय ? तीही माझ्याबरोबर वाहवत गेली. तिची स्वप्ने काय ते विचारलेच नाही मी. ते कोणत्यातरी चित्रपटातील वाक्य आहे ना…. अरे आयुष्याच्या उत्तरार्धात कळले की, आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहून गेले”. असे बोलून तो हसू लागला.

मी गंभीर झालो “नाही विकी… हे कारण नाही आहे. तू तसा विचार करणारा नाहीस….. खरे बोल ..” मी थोडे हळुवारपणे विचारले.

तसा तो केविलवाणा हसला ”साला …खरा मित्र आहेस. बरोबर ओळखलेस तू. ऐक… मोठी मुलगी उच्च शिक्षणासाठी तीन वर्षे परदेशी जाण्याचे ठरविते आहे. तीन वर्षांचा साधारण पंचवीस लाख खर्च आहे. त्यानंतर छोटे चिरंजीव आहेतच तयार. त्याच्यासाठीही पंचवीस लाख धर. पुढील आठ वर्षात 50 लाख अधिक शिक्षणावर खर्च होणार. तोवर मी निवृत्तीजवळ येणार… मग त्यानंतर आमचे काय ? आमच्याकडे म्हातारपणासाठी काय राहील?

“अरे …. मुले काय तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार का …? उलट चांगले सुखात ठेवतील तुम्हाला ….? मी सहज म्हटले.

“गॅरंटी देतोस का भाऊ… ? त्याने तीक्ष्णपणे विचारले. मी काही न सुचून शांत बसलो. “सरळ हिशोब आहे भाऊ. निवृत्तीनंतर हातात इतकी रक्कम येणार नाही की, त्याच्या व्याजावर आम्ही दोघे जगू. मुलगी काय उद्या लग्न होऊन सासरी जाईल. मुलगा परदेशात गेला, तर परत येईल की नाही ही शंका आणि कितीही झाले, तरी त्या दोघांच्या जीवावर उर्वरित आयुष्य काढणे आम्हाला पसंत नाही. म्हणून त्यावर उपाय एकच. उच्च शिक्षणासाठी आम्ही तुमच्यावर केलेला खर्च आम्हाला परत करा. नोकरी लागताच दर महिन्याला ठराविक रक्कम आमच्या खात्यात जमा व्हायला हवी. तसेच दरवर्षी त्यात किमान दहा टक्के वाढ हवी. आम्ही त्यातून आमचा खर्च करू. आमचे आयुष्य जगू..”

मग त्यासाठी हे पेपर्स बनवायची काय गरज ? दोन्ही मुले समजूतदार आहेत. न बोलता तुला पैसे देतील.. “मी आत्मविश्वासाने सांगितले..

“भाऊ इथे भावनिक होऊ नकोस. आपण खूप अनुभव घेतले आहेत. पुढे कोण कसे वागेल, हे आता सांगू शकत नाही. त्यामुळे हे पेपर्स केलेले बरे. उद्या मुलाकडे भीक मागण्यापेक्षा हक्काचे पैसे मागणे केव्हाही चांगले. माझा सिंघनिया होऊ नये हीच माझी इच्छा. मी माझ्यापुरता विचार केलाय तू तुझा विचार कर “. असे बोलून समोरचा थंड झालेला चहा एका घोटात संपवून उठला.

द्वारा  – किरण कृष्णा बोरकर

जून 18, 2018 

– प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पैठणी ☆ सुश्री अपर्णा देशपांडे ☆

? जीवनरंग ❤️

☆ पैठणी ☆ सुश्री अपर्णा देशपांडे ☆

काशीनाथ  ला आज कशाचच भान नव्हतं.  संतोष ने दोनदा हाक मारली, पण काशीनाथ भान हरपुन  कामात गढला होता. हे त्याचं नेहमीचंच होतं. एकदा का कटला चालवायला सुरुवात केली की धाग्याशी नाते  विठ्ठल साधी झालो एकरूप  घेतली समाधी ।।

असं होई.  संतोष ला किमान जेवणाचं भान असे, पण काशिनाथ म्हणजे…

 “ए काशी s, फोन आहे तुझा.” कुणीतरी ओरडलं, तसा काशी सगळं टाकून पळाला.  क्वचित कधी नर्मदा  फोन करत असे. 

“हॅलो, बोल”

“तुम्हाला  कसं कळलं की मीच हाय म्हणून ?”

“येडा बाई, मला दुसरं कोण फोन करणार ?  जेवण झालं माझं. काळजी करू नको “

” इतकं खोटं ?  जातांना डबा ओसरीवर विसरून गेलात, आन जेवलो म्हणे. घ्या माझी आन…घ्या न !……म्हाईतेय मला उपाशी हाय म्हणून. डबा पाठवलाय  सदाभाऊ संग. खा आता !  ठेवू फोन?”

इकडं तिकडं बघत काशी म्हणाला,

“कशी माझी गुणी बायको ती, येतांना गजरा आणतो काय..”

“नको बाई, उगा चार रुपये डोक्यात माळायचे ते! तुम्ही या वेळेत बस!

ठेवा आता फोन. पोरगी ऐकल. मनल, बा येडा झाला का काय. “

गालातल्या गालात हसत फोन ठेवून काशी वापस फिरला.

काटकसरीने कसा बसा एक मोबाईल घेतला होता, तो काशी ने नर्मदा कडेच ठेवला होता. तिला जमेल तेव्हा तीच  फोन करत असे.

उत्तमोत्तम रेशमाच्या  एक्सलुझिव्ह साड्या विणायचे  अत्यंत कुशलतेचं काम काशी आणि संतोष कडेच येत असे.  मोठ्या शहरातील शाही मंडळींसाठी, नेत्यांसाठी, सिनेमातील लोकांसाठी काशीच्या शेठ कडे पैठण्याची  मागणी होत असे.

इतर काम कारागीर करत, पण काठ आणि पदराचे खास काम मात्र ह्या जोडीकडेच यायचे.

कलश, कमळ, मोर, पोपट ह्या नेहमीच्या नक्षीकामा पेक्षा काहीतरी वेगळं आणि मनमोहक  डिझाईन  तयार करण्याचं एक अजब कसब होतं काशिकडे. ह्या त्याच्या कौशल्यावर नमू फिदा असे. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान होता. ज्याला त्याला नवऱ्याचं कौतूक सांगत फिरायची ती.

काशीचं  मन मात्र आतल्या आत फार जळत राही.  लाख लाख रुपयांच्या पैठण्या विणतो आपण, पण घरच्या लक्ष्मीला शंभर रुपयाची नायलॉनची साडी नसावी लागते…ती कधी म्हणत नाही, पण….

फार वाईट वाटे त्याला.

आज काशी घरी आला तोच अतिशय  हरवल्या सारखा.

हात पाय धुवून आत आल्या बरोबर नमूने ओळखलं. तो मान खाली घालून जाजमावर जेवायला बसला.

“तू पण जेव न.”

“तुमच्या मनातील खळबळ भाईर काढा आधी. मग मी जेवते.”

तिने खूप हट्ट केल्यावर काशीने आपल्या मनातील सल  उघड केली.

नमू  हसायला लागली.

” आता हसायला काय झालं तुला ?”

” हसू नको तर काय करू ? काल शारदा सांगत होती, ती जयश्री नटी हाय न ? ती हो, कायम हातभर जरीच्या काठाची साडी नेसुन फिरते ती, नवऱ्यानं विष घालून मारला म्हणे तिला. सांगा आता. ती दोन लाखाची साडी जीव वाचवती का तिचा ?

मला काय कमी हाय ? जीव ओवाळणारा नवरा दिलाय देवानं, उगी त्या जीवाला जाळू नका,सांगून ठेवते!..जेवा आता मुकाट.”

“आय लव्ह यु नमु.” तो म्हणाला,अन

कसली लाजली नमू .  म्हणाली,

“आत्ता !!  इंग्रजीत प्रेम ?  जेवा गुमान”

मुंबई च्या कुणा धनाढ्य आसामी च्या मुलाचं लग्न होतं. त्यांची साठ पैठण्याची मागणी होती. त्यासाठी शेठ ने बरेच नवीन कामगार आणले होते. प्रत्येक पैठणी दुसरी पेक्षा वेगळी दिसावी आणि त्यातही दोन तर अप्रतिम

कारागिरीचा नमुना असाव्यात हे शेठ ने

नमूद केलं होतं. सगळे नवीन नवीन डिझाइन्स काशी ने तयार करवून दिले.

 साहेबांच्या पत्नी आणि सूनबाईंची पैठणी विणायचं काम खास काशी संतोष ने आपल्याकडे घेतलं होतं. 

आता रात्रंदिवस  एक करून

युद्धपातळीवर कामं सुरू होती. नमू पण  केंद्रावर यायला लागली. काशी च्या जेवणाची काळजी घेणे, शटल लावून देणे, बॉबीन भरून देणे, सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था बघणे हे काम तिने स्वतः कडे घेतलं.

तिच्या समर्पणा कडे बघून काशी ला गलबलून येई.

म्हणायचा, 

“तू काहीही  म्हण नमे, एक दिवस तुला भारी पैठणी नेसवेलच मी.बघ तू. “

“येड लागलं का वो तुम्हाला ? कसं सांगू आता  या खुळ्या नवऱ्याला ?”  ती हसून म्हणे.

तीन चार महिन्या नंतर एक दिवस काशी रात्री उशिरा घरी आला.

नमू वाटच बघत होती. त्याने हळूच मागे लपवलेला गजरा पुढ्यात ठेवला.

“आता ग माय ! मोगरा ? कशाला वो पैसा घालता ह्याच्यात?”

काशी च्या डोळ्यात पाणी आलं.

“ह्या डोळ्यातल्या पाण्या परिस तो घालून द्या तुमच्याच हातानं डोक्यात.”

तिने  पाठ फिरवली.  त्याने  गजरा माळला, आणि हातातील पुडकं समोर केलं.

तिने उघडून बघितलं. ती एक हिरव्या रागाची अप्रतिम पैठणी होती.

या आधी तिने नेसणं  तर दूर, कधी हात पण लावला नव्हता पैठणीला. डोळ्यातील पाणी त्यावर पडू नये म्हणून चटकन तिने आपल्या साडीचा पदर त्यावर पसरवला.

“डाग पडला, तर शेठ रागावतील हो तुम्हाला. उद्या वापस द्यायची असंल न ?”

“काय करू तुझं, येडा बाई, तुला आणलीये ही !”

तिच्या चेहऱ्यावर चे भाव बघून म्हणाला,

” मुंबई च्या मॅडम आल्या होत्या.  त्यांनी निवांत सगळ्या साठ पैठण्या  बघितल्या. इतक्या म्हणजे इतक्या खूष झाल्या, की एक मला अन एक संतोष ला आपल्या हातानं  भेट दिली…..आहेस कुठं?”

भरल्या डोळ्यानं  नमु नं दृष्ट काढली त्याची.

पैठणी नेसून समोर उभी ठाकलेली नमू त्याला रखुमाई चं रूपच वाटली.

त्याने आत्यंतिक प्रेमाने तिला जवळ घेतले. कसली लाजत होती ती ! मग अचानक म्हणाली,

“एक बोलू ? रागावनार न्हाई न ?”

“बोल की ! “

“आज नेसून मग ठेऊन देऊ का पेटीत ? “

त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली,

“पाच सात वर्षात लगीन करू पोरीचं, मग लग्नात नेसवू की तिला, तुम्ही बनवलेली पैठणी!”

तो फक्त डोळे भरून तिच्या ह्या लोभस रुपाकडे बघत राहला.

© अपर्णा देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : तो माणूस जबरदस्तीने बिरोजाचा हात पकडून त्यात पैसे कोंबतो…….)

बिरोजाच्या मुठीत साडेचार हजाराच्या करकरीत नोटा आहेत. प्रत्येक नोटेवर अशोकाच्या स्तंभाखाली, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याशेजारी छापलंय -‘सत्यमेव जयते.’

‘बोलव तिला पटकन. गाडी सुटतेय.’ तो  माणूस बिरोजाला ढकलतो.

पण माधोला तो माणूस अजिबात आवडलेला नाही. तो सगळं काही बघतोय. त्याच्या नजरेत संशय आहे. तो बहिणीला म्हणतो, ‘तायडे, हा माणूस बाला रोज काय सांगत असतो?’ त्याच्या आवाजात चीड आहे.

मुरलीच्या भुवयाही वर चढल्या आहेत. ‘माय त्या दिवशी या माणसाला शिव्या घालत होती. ऐकलंस ना तू?’त्याचीही मती कुंठित झाली आहे. काय चाललं आहे, हे त्याला समजतच नाही.

कोसी सतलज एक्सप्रेसची शिट्टी वाजते. अचानक तो माणूस धावत त्यांच्याकडे येतो. जनकदुलारीचं मनगट घट्ट धरतो आणि तो तिला फरफटत फलाटावरून नेतो.

जनकदुलारी आक्रोश करू लागते,’बा, बा!बघा. हा मला फरफटत नेतोय.कुठे नेतोय तो मला? आणि का? तुम्ही काहीच काय करत नाही बा?’

‘बेबी, माझ्याबरोबर चल. तू तिथे राणीसारखं राज्य करशील. सगळं तुझ्या ताब्यात असेल. रोज तुला चारीठाव जेवण मिळेल. अगदी पोटभर. आणि मी तुझ्या बापाला आधीच पैसे दिले आहेत.’

देव जाणे कुठून, त्याचे दोन साथीदार उगवतात आणि तिच्याभोवती कोंडाळं करतात. कोणालाही ती दिसत नाही. तसंही काय चाललंय, याची कोणालाच पर्वा नसते.

जनकदुलारी आक्रोश करते आहे.

ती सुटकेचा प्रयत्न करते आहे. ती वडिलांना बिलगायला जाते;  पण ते व्यर्थ जातं. तिला धावत वडिलांकडे जायचं आहे; पण ती जाऊ शकत नाही.

फलाटावर दोन पोलीस उभे होते. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत ते लाठ्या उगारत होते आणि सगळ्यांच्या अंगावर वसावसा ओरडत होते,’चला. चालायला लागा. गोंगाट करू नका.’ पण आता तेही हवेत विरून गेले आहेत, असं वाटतं.

जनकदुलारीचं कर्कश रडणं-ओरडणं फलाटावरच्या भयानक कोलाहलात बुडून गेलं आहे.

गाडी सुरू होते. तो माणूस तिला फरफटवतोच आहे. उडी मारून तो गाडीत चढतो. तिलाही वर ओढतो.

तिचे दोन्ही भाऊ आपल्या छोट्याश्या हातांनी निकराने वडिलांना हलवत आहेत,’बा, तो बदमाश तिला घेऊन जातोय.’

गाडी सुरू झाली आहे….. हळूहळू वेग घेते आहे……

बिरोजा त्या डब्याकडे धावतो…. आत शिरायला बघतो, पण…..

तो माणूस दारातच उभा आहे. तो बिरोजाच्या तोंडावर ठोसा मारतो,’उतर खाली. मी पैसे टिकवलेत तुझ्या हातावर. चालायला लाग, भिकारड्या!’

‘जनकू, बबडे!ये गं. खाली उतर, बाळा.’ बिरोजा धावत्या गाडीतून फलाटावर पडतो.

‘बा! तायडे, जाऊ नकोस तू.’मुरली आणि माधो गाडीच्या मागून धावत आहेत. त्यांचा आक्रोश चालू आहे. ते गाडीत चढू पाहत आहेत.

पण त्यांच्या मानाने कोसी सतलज एक्सप्रेस खूपच वेगात धावत आहे.

आणि ते दोघे भाऊ गाडी पकडू शकत नाहीत.

समाप्त

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-4 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-4 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :सौदा पक्का झाला, असं मी समजतो, असं म्हणून तो माणूस गर्दीत हरवून गेला…….)

कटिहारहून हॅरिसनगंजला रोज दोन गाड्या येतात. दिल्लीला जाणारी गाडी फलाटाला लागताक्षणी लोकांनी एकच गर्दी केली. काही जणांच्या डोक्यावर संसाराच्या चीजवस्तूंची गाठोडी आहेत. काही जण,आपल्याकडे होतं -नव्हतं ते सगळं पत्र्याच्या  ट्रंकेत घालून,त्या ट्रंका डोक्यावर घेऊन  चालले आहेत.आपली वडिलोपार्जित घरं सोडून ते जीवनाच्या नव्या क्षेत्राच्या शोधात चालले आहेत. त्यात बरेचसे तरुण आणि मध्यमवयीन लोक आहेत. त्या गर्दीत काही म्हातारेही आहेत.फक्त थोडेच लोक सहपरिवार चालले आहेत. या मोहमयी आयुष्यात त्यांना एकत्रच पोहायचं आहे. बोटी उलटल्याच, तर सगळ्यांनी बरोबरच बुडून मरूया, असं त्यांना वाटतं. जीवन वा मरण – याला एकत्र राहूनच तोंड द्यायचं आहे.

वाल्मिकी ऋषींनी रामवनवासाविषयी लिहिलं. महाभारतासारख्या महाकाव्याचे कवी वेदव्यास यांनी पांडवांच्या वनवासाची गाथा लिहिली. पण या हजारो दुःखी माणसांच्या हद्दपारीविषयी कोण लिहिणार? एवढी आग, एवढे अश्रू पेलायची ताकद कोणाच्या लेखणीत आहे?

‘बा, आपण जाऊन तायडीला घेऊन येऊ या.’ बापाच्या घामेजलेल्या पाठीला मुरली चेहरा पुसतो.

‘ही गाडीपण सुटेल. ते जेवणाची पाकिटं घेऊन कधी येणार कोणास ठाऊक!’ माधोच्या पोटात कावळे कोकलताहेत. तो उतावीळपणे बापाच्या सदऱ्याच्या बाहीला हिसका देतो.

‘ते जीप नायतर ट्रकमधून येणार. गाडीतून नाही.’ मोठा मुरली धाकट्या भावाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतो.

बिरोजा उठतो. तिघेही कालव्याकडे जायला निघतात. इकडे असणाऱ्या दहांपैकी नऊ लोक सद्या तिथेच राहत आहेत.

जनकदुलारी सगळ्यात धाकट्या भावाच्या -छोटूच्या -डोळ्यांच्या खालच्या कडेला काजळ लावत आहे. या तिघांना येताना बघताक्षणीच ती त्यांच्याकडे धावते. भावांच्या कानात कुजबुजत ती विचारते,’मला वाटतं, आज ते तिकडे वाटणार आहेत. हो ना?’

‘म्हणूनच आम्ही आलो आहोत. चल. लवकर चल.’

मुरली आणि माधो लहान असले, तरी त्यांना चांगलंच ठाऊक आहे – फलाटावर खिचडी वाटणार आहेत, याचा सुगावा इतर कोणालाही लागता कामा नये. ही बातमी फुटली, तर यांचंच नुकसान होणार. त्यामुळे इकडे येतानाच बिरोजा त्यांना पुन्हापुन्हा   आठवण करून देत होता, ‘कोणालाही काहीही सांगू नका.’ त्यामुळे जरी त्यांची तोंडं बंद असली, तरी ही सुखद अपेक्षा त्यांच्या डोळ्यांत काठोकाठ भरली आहे. आणि त्यांची बहीण ती पटकन ओळखते.

‘माय , छोटूला घे.’ जनकदुलारी भावाला आईच्या मांडीवर ठेवते आणि ‘आम्ही लगेचच परत येतो’ असं सांगून त्यांच्याबरोबर निघते.

ती चौघं स्टेशनवर येतात, त्यापूर्वीच  मदतीच्या सामानाचा ट्रक येऊन पोहोचलेला असतो. इतरांपूर्वी, थोडासा का होईना, पण आपला वाटा मिळावा, म्हणून स्त्री-पुरुष रेटारेटी करत असतात. झोंबाझोंबी, शिवीगाळ, मारामारी चालूच आहे. असाहाय्यता आणि भूक यापुढे  माणुसकी थिटी पडते आहे.

कोणालाच धीर धरवत नाही. ते थाळीतून खायला सुरुवात करतात. मुरली म्हणतो,’माय , आजा , आजीसाठी काहीतरी नेऊया.’

‘हो.’ बिरोजा म्हणतो. पण तो उठायच्या आतच त्याला पुन्हा त्याच्या खांद्यावर पकड जाणवते. तो माणूस त्याच्या मागेच उभा असतो. तो डोळे मिचकावून बिरोजाला इशारा देतो. बिरोजा थाळी माधोकडे सरकवतो आणि त्या माणसाच्या पाठोपाठ जातो. तो माणूस फलाटाच्या टोकापर्यंत जातो. बिरोजा भारलेल्या सापासारखा त्याच्या मागून जातो.

‘यार, बघ. ही कोसी सतलज एक्सप्रेस कोणत्याही क्षणी सुटेल.हे ठेव. साडेचार हजार आहेत. काळजी करू नकोस.नंतर तू तुझ्या मुलीला कधीही भेटू शकतोस.’ तो माणूस बिरोजाच्या हातात एक गठ्ठा द्यायला जातो. बिरोजा हात मागे घेतो.

‘नको नको. भलतंच काहीतरी काय बोलतोयस? मी -मी नाही घेणार हे.’ बिरोजा गोंधळला आहे. त्याच्या आवाजात दम नाही. एवढे पैसे!एकगठ्ठा!देवानेच धाडल्यासारखे. भगवंता !वाचव मला.

‘चल.ठेव हे. बघ, विचार कर. एवढ्या पैशात तुझ्या कुटुंबाला किती दिवस रोजचं चारीठाव जेवण देऊ शकशील!अरे बाबा, भरल्या पोटावर ढेकर कसा येतो, ते तरी आठवतंय का तुला?’ तो माणूस बिरोजाचा हात पकडतो आणि त्यात जबरदस्तीने पैसे कोंबतो.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print