मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जळता निखारा… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ जळता निखारा… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लग्नानंतर चार वर्षांनी दिवस गेल्यावर गौरी अगदी हरखून गेली. किती वाट बघत होती ती या दिवसाची. प्रसन्न सुद्धा अगदी खूष झाला. गौरीच्या सासूबाईंना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. माहेरी आईवडील आनंदी झाले.

पाचव्या महिन्यात सोनोग्राफी झाल्यावर समजलं, गौरीला जुळी बाळं होणार आहेत. गौरी घाबरून गेली. एकदम दोन मुलं कशी काय वाढवायची म्हणून तिला भीतिच वाटली. पण सासूबाई आई म्हणाल्या, त्यात काय ग घाबरायचं?आम्ही आहोत ना?होईल सगळं छान. आनंदात रहा आता.

सगळीकडची कौतुकाची डोहाळजेवणे सगळं पार पडलं. यथावकाश गौरीला दोन जुळ्या मुली झाल्या. किती छान होत्या त्या. पण अगदी वेगळ्या दिसत होत्या. एक गोरीपान आणि दुसरी सावळी.

गौरी आणि प्रसन्न, बाळांना घेऊन घरी आले.

सासूबाईंनी भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि गौरी घरात आली.

दोन दोन बाळं संभाळताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. पण दोघी मुली शांत होत्या.

तीन महिन्यांच्या झाल्यावर मुलींचं जोरदार बारसं केलं आणि शुभा विभा अशी जोडीच्या बहिणींची नावंही जोडीची ठेवली त्यांच्या आत्याने.

दिवस भरभर पळत होते नुसते.

शुभा दिसायला सावळी, नाकडोळे नीटस पण अगदी सामान्य होती दिसायला. विभा मात्र गोरीपान सुंदरच आणि कुरळे केस किती सुंदर दिसत तिला. बघणारे म्हणत, या जुळ्या आहेत?अजिबातच वाटत नाही. किती वेगळ्या आहेत हो या दिसायला.

मुली जसजशा वाढत होत्या तसं गौरीच्या लक्षात येऊ लागलं, विभाची प्रगती व्हावी तशी होत नाहीये. शुभा पालथी पडून सरकायला लागली तरी विभा अजून कुशीला वळत नाही. तिने मुलांच्या डॉक्टरांकडे विभाला तपासायला नेले. त्यांनी नीट तपासले आणि म्हणाले, मला वाटत हिच्या मेंदूची जरा कमी होतेय. ही स्लो लर्नर व्हायची शक्यता आहे. बघूया आपण. पण लक्ष ठेवा. काही औषधे देऊन त्यांनी गौरीची पाठवणी केली.

गौरीला हा शॉकच होता. एक मुलगी चपळ, सगळे तिचे माईल स्टोन्स सुंदर आणि दुसरीची प्रगती कासवाच्या गतीने होतेय. पण त्यावर इलाज नव्हता. जसजशा मुली मोठ्या व्हायला लागल्या तशी विभा आणखीच सुरेख दिसायला लागली.

गौरीने उत्साहाने दोघींना जवळच्या नामांकित शाळेत प्रवेशासाठी नेले. शुभाला त्यांनी लगेचच प्रवेश दिला. विभाला प्रश्न विचारले. , तिला ते समजलेही नाहीत. ती नुसती बघत उभी राहिली. प्रिंसिपल बाईनी गौरीला सांगितलं, “सॉरी मिसेस गोरे. या मुलीला आम्ही ऍडमिशन नाही देऊ शकत. तुम्ही हिला स्पेशल स्कूललाच घाला. शुभाला दिलीय आम्ही ऍडमिशन. , “

गौरी घरी आली. आता हे सत्य तिला स्वीकारणं भागच होतं.

प्रसन्नला तिने हे सांगितलं. त्यालाही याचा धक्का बसला. पण म्हणाला, “घालूया आपण विभाला त्या शाळेत. तिथे चांगली प्रगति होईल तिची. , असा धीर नको सोडू गौरी. मी कायम आहे तुझ्या बरोबर. ”

दोन मुली वेगवेगळ्या शाळेत जायला लागल्या. शुभाची शाळेत छानच होती प्रगति.

विभा रोज शाळेत जायची. गौरी जीवतोड मेहनत करून तिचा अभ्यास घ्यायची. पण एकेक गोष्ट शंभर वेळा शिकवून सुद्धा विभाच्या लक्षात ते राहीलच अशी खात्री नव्हती. कशीबशी विभा आठवी पर्यंत गेली.

शुभा अतिशय उत्तम गुण मिळवून कॉलेजला गेली.

गौरीच्या पोटात तुटे, आपल्याच दोन मुलीतला जमीन अस्माना एवढा फरक बघून.

शुभासुद्धा खूप काळजी घेई आपल्या बहिणीची, तिला वेळ होईल तशी.

एकदम बघितल्यावर विभाला समज कमी आहे हे पटकन लक्षात येत नसे. त्यातून तिचे अप्रतिम रूप नजरेत भरण्यासारखे. पण चार वाक्य बोलली की समजायचं काहीतरी गडबड आहे या मुलीत. समोरचा हळहळ करायचा. पण गौरी, शुभाने कधीही तिला कमी लेखलं नाही. त्या दोघी तिला सगळीकडे घेऊन जात आपल्याबरोबर.

विभा अजूनही शाळेच्या कार्यशाळेत जात होती. तिथे मेणबत्त्या करायला, छोटी कामे करायला शिकवत या मुलांना. हळूहळू का होईना, विभाच्या लक्षात शिकवलेल्या गोष्टी येत आणि सरळ सरळ असेल ते ती करू शके. त्याचे थोडे पैसेही तिला शाळा देत असे.

शुभा एमबी ए उत्तम तऱ्हेने पास झाली आणि तिला एका छान कंपनीत चांगला जॉबही मिळाला. समीर तिच्याच टीम मध्ये काम करणारा इंजिनीअर मुलगा. रोज त्यांची कामानिमित्त भेट होत असे. जरी त्यांची डिपार्टमेंट्स वेगळी असली तरी लंच ला, किंवा मीटिंग्जना ते भेटत असत.

अचानक समीरने एक दिवस शुभाला विचारलं, ”शुभा, तुझा लग्नाचा काय विचार आहे?कुठे ठरलंय का?”

शुभा गंभीर झाली. ”समीर, तुला मी कधी सांगितलं नाही. मला जुळी बहीण आहे. विभा तिचं नाव. दुर्दैवाने ती गतिमंद आहे रे. अगदी मतिमंद नाही पण स्लो लर्नर आहे. मी कसा विचार करू लग्नाचा?आई बाबांनंतर तिची जबाबदारी माझ्यावरच येणार. आत्ता ठीक आहे रे. पण नंतर काय होईल मला माहीत नाही. ”शुभा खिन्न होऊन म्हणाली.

दुसऱ्या दिवशी समीर तिला पुन्हा भेटला. ”आपण तुमच्या घरी जाऊ शुभा. मी तुझ्या आईबाबांना भेटतो आणि बघतो तुझ्या बहिणीलासुद्धा. पण मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे शुभा. मला आवडतेस तू.”

पुढच्या आठवड्यात समीर, त्याचे आईवडील शुभाच्या घरी गेले. त्यांनाही शुभा आवडली होतीच.

गौरी आणि प्रसन्नने त्यांचे मनापासून छान स्वागत केलं. विभाला आतून बोलावलं. विभा येऊन आईशेजारी बसली. समीर त्याचे आईबाबा विभाच्या देखण्या रुपाकडे बघतच राहिले.

गौरीने तिला सांगितलं, ” विभा, या डिशेस कप ट्रे आत ठेव हं नीट. ”

विभा आत गेल्यावर गौरी म्हणाली, ” ही माझी दुसरी मुलगी विभा. वरून समजत नाही पण ही स्लो लर्नर आहे. हिची कोणतीही जबाबदारी आम्ही शुभावर पडू देणार नाही. तिच्यासाठी आम्ही भरपूर पैसे ठेवणार आहोत. पण ही अशी आहे हे सत्य आम्ही कोणापासून लपवणार नाही. आता निर्णय तुम्ही घ्या. ”

समीर घरी गेला. त्याचे आईवडील म्हणाले, ”अरे समीर कशाला करतोस ही मुलगी?पैसे कितीही ठेवलेले 

असले तरीही शेवटी तिची जबाबदारी शुभावर येणारच. बघ बाबा. शुभा छानच आहे. पण तरी पुन्हा नीट विचार कर बाबा. ”

पण समीरचा निर्णय पक्का होता.

चार महिन्यांनी एका चांगल्या मुहूर्तावर शुभा समीरचं लग्न गौरी प्रसन्न ने अगदी थाटामाटात करून दिलं. भरल्या डोळ्यांनी शुभा सासरी गेली.

काळ कोणासाठी थांबतो?

शुभाला दिवस गेले आणि योग्य वेळी तिला छान मुलगा झाला. अगदी छान नॉर्मल मुलगा बघून सगळ्याना आनंद झाला. छोट्या साहिल ची प्रगति बघून गौरीने सुटकेचा निश्वास टाकला.

कुठेतरी मनातून तिला भीति होती, न जाणो, शुभाचं बाळ विभासारखं गतिमंद नाही ना होणार?

पण तसं झालं नाही. साहिल एकदम नॉर्मल बाळ झाला. त्याचे वेळच्यावेळी रांगणे, मान सावरणे, थोडे शब्द बोलणे गौरीला सुखावून जाई.

विभासुद्धा बाळाजवळ बसे त्याला खेळणी दाखवे. त्याची दुपटी बदले. गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला?” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कान – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ कान – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.)

इथून पुढे – – – 

उजव्या कानाच्या मागे हात ठेऊन ते त्याला पुढे ओढण्याचा प्रयत्न करायचे. जणू कांही आपल्या कानालाच ते बजावत, -” जा रे बाबा, कांही ऐकू येत असेल तर बघ. ” पण अडेलतट्टू आणि नालायक मुलासारखा त्यांचा कान वळून बघत परत सरळ व्हायचा, जणू एखादे रंगहीन आणि अर्थहीन बिना पत्त्याचे पत्र उलट टपाली घरी परत यावे. डावा कान देखील उजव्या कानाचे अनुकरण करायचा. कुठल्याही आवाजाशी देणे घेणे नसलेला तो कुठलाच संदेश पोहोचवायचा नाही. वैतागून जणू त्यांना शिक्षा देण्यासाठी बाबा आपल्या दोन्ही कानांना ओढत बसायचे. पण खरे तर ती शिक्षा त्यांच्यासाठीच होती.

कित्येकदा तर समोर बसलेल्या माणसाला बघून बाबा हसण्याचा अभिनय देखील करत, इतके पोकळ हास्य की त्यामुळे ते स्वतःच आतून पूर्णपणे कोलमडून पडत. समोरच्या माणसाशी ते इतक्या जोराने बोलत की तो घाबरून जाई. ते अजून काय करू शकत होते? त्यांना वाटायचे की ते हळू बोलले तर समोरचा माणूस ते ऐकू शकणार नाही. त्यांचे पौरुष वैतागून चिडचिड करायचे. घरातील सदस्य त्यांच्यापासून नजर चोरायचे. ह्या लहान लहान गोष्टी असूनही त्यांना खूप तीव्रतेने टोचायच्या, त्यांना मनातल्या मनात सतत सलत राहायच्या. या मानसिक यातना सतत झेलत राहिल्याने त्यांच्या स्वभावात बदल झाला तो कायमचाच! पांढरेसफेद कडक इस्त्रीचे कपडे बाबांच्या मनातील सुरकुत्यांना मात्र वाचवू शकत नव्हते. मनावर पडलेल्या त्या मोडक्या तोडक्या अढ्या आणि सुरकुत्या कधी कधी बाहेर येऊन त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आपल्या आडव्या तिडव्या रेषांमध्ये गुंतवून ठेवीत.

बाबा जिवंत असतांना त्यांच्या या असहायतेबाबत कुणी कधीच विचार केला नव्हता, ना शीनाने, ना तिची लहान बहीण बीनाने. शैलू तर तसाही बाबांबद्दल कधीच विचार करीत नसे. बाबाच काय, कुणाचाही विचार करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. उरली ती आई, ती सदासर्वदा घरकामांत अडकून बसलेली असे. बाबांच्या या नैराश्याला त्यांच्या स्वभावाचेच एक अंग मानून ती गप्प असे. आपल्या लाडक्या मुलाला, शैलूला तर ती कधीच नाराज करीत नसे. उलट त्याला समजावत ती म्हणे, “बेटा, तू आपल्या बाबांना तर ओळखतोस ना! त्यांना रागवायची सवयच आहे. ” 

बाबांची ही तीक्ष्ण वेदना त्यांच्या स्वभावात भिनली होती. त्यामुळे त्यांच्या एकाकीपणाला आणखीनच खतपाणी मिळत होते. त्यांच्या कानाच्या या अकार्यक्षमतेने त्यांना कुठेच थारा मिळत नव्हता, अगदी घरीही. बाबा शेवटच्या श्वासापर्यंत एका विचित्र अव्यक्त कोंडमाऱ्यात जीवन कंठीत होते. फक्त मृत्यूद्वारेच या दुष्टचक्रातून त्यांची सुटका होऊ शकली. त्यांची सर्वात जीवघेणी व्यथा ही असावी की त्यांचे दुःख कोणीही समजू शकत नव्हते. त्यांचे तक्रार करणारे डोळे आईलाही म्हणायचे – “किमान तू तरी मला समजून घे! ” 

आई आपल्या लाडक्या मुलाच्या चिडचिड करण्याचे यथायोग्य कारण देत बाबांच्या शांततेत भरच घालीत असे. शीनाला देखील आपल्या बाबांचे दुःख तेव्हा जाणवले जेव्हा तिला स्वतःला कमी ऐकू यायला लागले. दिवसाच्या कित्येक वेळा जेव्हा तिला नीट ऐकू येईना, तेव्हां त्या प्रत्येक क्षणी बाबांचा अगतिक चेहरा तिच्या मनाच्या आत खोलवर सामावून जात असे. तेच दुःख कित्येक पटीने वृद्धिंगत होत आतल्या आत तडफडत असे. परदेशात वास्तव्यास असतांना पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच तिला हे जाणवू लागले होते. कोण काय बोलतंय हे तिला नीटसे समजत नव्हते. दुसऱ्यांचे शब्द जणू रेशमी धाग्यांसारखे एकमेकांत गुंतत जायचे. या रेशीमगाठी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना त्यांची गुंतागुंत आणखीनच वाढत जाई. त्या अर्थहीन शब्दांचे अनेक असंबद्ध अर्थ निघायचे. ती कधी काहीतरी बोलत असे, तर कधी कांहीच बोलू शकत नसे. जग आपली थट्टा करेल याची तिला भीती वाटत असे. कित्येकदा कोणी कांहीही बोलले किंवा विचारले तरी ती आपली मान हलवून सहमती दर्शवायची. मग ती प्रश्नार्थक नजरेने समोरच्या माणसाकडे पाहायची जणू तिच्या कानांनी कदाचित बरोबर अंदाज लावला असावा. पहिल्यांदाच, अशाच कांही न ऐकू येण्याच्या प्रसंगावर तिच्या स्वतःच्या पतीने म्हटले होते – “तुला कामाची गोष्ट बरोब्बर ऐकायला येते. बाकीच्या गोष्टी मात्र ऐकू येत नाहीत. ” 

त्या क्षणी, तिच्या अकार्यक्षमतेच्या तीव्र पीडेमुळे तिला जाणीव झाली की बाबूजींनी आयुष्यभर किती मानसिक त्रास सहन केला असेल, जेव्हा की शीनाला हे सर्व जास्त काळ सहन करावे लागले नाही. जोवर हा जनुकीय दुष्परिणाम शीना आणि बीना या दोन मुलींपर्यंत पोहोचला, तोवर वैद्यकशास्त्राची प्रगती घराघरात पोहोचली होती. शीनावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आमोरासामोर होणारे संवाद चांगल्या प्रकारे सुरु झाले होते. बस, कोण्या इतर खोलीतून आवाज आला तर ऐकायला येणे कठीण जायचे. शीनाच्या शस्त्रक्रियेनंतर बीनावर देखील असाच शल्योपचार करण्यात आला. मात्र शस्त्रक्रियेनंतरही नीट ऐकू न येण्याची भावना संपूर्णपणे कधीच नाहीशी झाली नाही. आजही असे अनेकवार असे घडते. ऐकू आल्यानंतरही असे वाटत राहते की कदाचित आपल्याला ऐकू आले नाही.

या फलकावर ‘कर्णबधिर मूल’ असे शब्द वाचताक्षणी, त्या सर्व आठवणी ताज्या होऊन एकामागून एक अखंडपणे पाझरू लागल्या. त्या मुलाच्या वेदनेशी एकाकार होऊन आत खोलवर दबलेले अतीत उकरताच त्याची टोकदार टोचणी तिला सलायला लागली. जेव्हा शरीराचा कोणताही भाग त्याच्या कर्तव्यापासून विमुख होतो तेव्हा मानवी मेंदू किती एकाकी होत असतो, असहाय्य आणि विवश! जर हे मूल जन्मापासूनच बहिरे असेल तर ते त्याचे आयुष्य कसे कंठणार कोणास ठाऊक! आता तर म्हणे ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची देखील मदत मिळू शकते. या मुलाबाबत कदाचित असे झालेले नसावे. म्हणूनच तर सरकारकडून हे फलक लावण्यात आलेले आहेत. कोणाचाही आवाज न ऐकता माणूस कसा जगू शकतो! अशा परिस्थितीत तो आयुष्यभर स्वतःशीच बोलेल. स्वतःच ऐकेल आणि स्वतःच उत्तर देईल!

 आवाजाशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या त्या निरागस मुलासाठी हा शब्द निरर्थक होता. या मार्गावरील प्रत्येक घरावरून जातांना शीनाला विचार करीत होती की, हे मूल कुठल्या घरात राहत असेल. तिला त्याला एकवार तरी बघायचे होते. तिला स्वतःचे दुःख त्याच्यापुढे व्यक्त करायचं होतं. त्याला सांगायचं होतं की येणारे दिवस त्याच्यासाठी कसे असतील? किंवा ऐकू न येताही तो पेन, ब्रश, छिन्नी-हातोडा किंवा इतर कोणत्याही कलेच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध करू शकेल. जिथे त्याला स्वतःला बोलावे लागणार नाही, तिथे त्याच्या कलेनेच शब्द धारण करावेत, अशा शब्दांनी लोकांना मोहून घ्यावे आणि प्रशंसा करणाऱ्या कैक लोकांच्या डोळ्यांतून त्याचे कौतुक ओसंडून वाहावे. त्याला या माध्यमातून जे जे बोलायचे आहे ते ते समजून घेण्याचा त्या रसिकांनी प्रयत्न करावा.

ओठांच्या आकारावरून कितीतरी शब्द समजू शकतात! सांकेतिक भाषेचीही त्याला मदत होईल. पण हजारोंपैकी फक्त एकालाच त्या सांकेतिक भाषेचे ज्ञान असू शकते. आज, जेव्हा मुले त्यांचा बहुतेक वेळ आयपॅड आणि फोनच्या सानिध्यात घालवत असतात, तेव्हा हे मुलाचे जग त्याच्या मूक जगात बंदिस्त राहिले असावे.

आधी तर तिला त्या रस्त्यावर एकही मूल दिसले नाही, आणि तिने एखाद्याला पाहिले तरी तिचे मन अंदाजच लावीत बसायचे की कदाचित हा मुलगा तोच तर नव्हे! तिच्या विचारांच्या गुंत्यात सायकल चालवणाऱ्या, हॉर्न वाजवणाऱ्या, समोरच्या वाहनाशी टक्कर झाल्यानंतर खाली पडणाऱ्या मुलाच्या अपघाताच्या भयंकर दृश्यांची मालिकाच दृश्यमान व्हायची. वेदनेचा सूर आणि स्वराचा राग एकच होता, यदाकदा वाजत असायचा. किंबहुना असेही म्हणता येईल की त्या स्वरात कुठलाच राग समाहित नव्हता. होती ती निव्वळ नीरव शांतता, बाबांच्या, तिचीच्या स्वतःची, तिच्या धाकट्या बहिणीची बीनाची, आणि त्या अज्ञात मुलासोबत 

अवचितपणे निर्माण झालेली अनुभूती, एकमेकांशी जोडलेली एक अनवरत वेदना!

भूतकाळातील आणि वर्तमानातील त्या क्षणांमागे वेड्यासारखे धावण्याची कित्येक कारणे समोर आली. या घाईगडबडीत धावतां धावता ऊर भरून येतांना आणि काळीज धडधडत असतांना शीनाच्या मनात अवचितच एक विचार आला -” ऐकू न येणाऱ्यांना निसर्गाने ती कर्णक्षमता दिलेली नसते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना ऐकू येत असतांना देखील ते ऐकत नाहीत. ऐकणाऱ्यांना ती क्षमता दिलेली असूनही बरेच लोक आहेत जे ऐकल्यानंतरही ऐकत नाहीत. ” त्यांच्यासाठी वापरल्या जाणारे सामान्यतः शब्द असत, “नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे”. अर्थात तुम्ही कांहीही आणि कितीही सांगितले तरी कांही लोक एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. शीनाच्या मोठ्या भावाला, शैलूला बाबांनी कांहीही सांगितले तरी तो त्याकडे कानाडोळा करून चालला जात असे. प्रत्येक ठिकाणी असे कितीतरी शैलू असतील! शासन, सत्ता, खुर्चीने माजलेले शैलू!

***

आता फिरत असतांना जाणवणारी गुलाबी थंडी ऋतूपरिवर्तनाचे संकेत देत होती. काही दिवसांतच बर्फाच्छादित उंच सखल जमिनीवर अशा प्रकारचे चालणे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलले जाईल. शीनाच्या पायांनी ‘कर्णबधिर मूल’ च्या फलकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कधी मार्गक्रमण करायला सुरुवात केली हे तिचे तिलाही कळले नाही. तिने वाटेवरील चार पाचच घरे ओलांडली असतील, तेव्हां तिला एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत खेळताना दिसला. त्याचे वडील त्याच्या हाताच्या बोटांनी सांकेतिक भाषेत त्याला खेळाबद्दल काहीतरी समजावून सांगत होते. ते मूलही आपल्या डोळ्यांनी त्या संकेतांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला आपल्या वडिलांच्या संकेतांचा अर्थ समजला आहे असे तो त्यांना संकेतांनीच समजावून सांगण्याचा आणि संवाद साधण्याचा यत्न करत होता. वडिलांचे बोलणे समजून उमजून त्यांना तो प्रतिसादही देत होता. त्याक्षणीच शीनाला वाटले की कदाचित हे तेच मूल असावे जे आपल्या वडिलांशी ‘सांकेतिक भाषेत’ बोलत होते.

त्याच क्षणी, त्या खेळणाऱ्या मुलाचा चेंडू घसरत येत शीनाच्या समोर येऊन पडला. तिने खाली वाकून चेंडू उचलला आणि मुलाला परत केला. मुलाने प्रेमभराने आभार व्यक्त करण्याचा संकेत करीत स्वतःचा उजवा हात आपल्या हनुवटीवर ठेवला. शीनाच्या डोळ्यांनीही तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. मुलाच्या त्या आभार मानण्याच्या गोंडस संकेतात जणू हरवून जात स्मितहास्य करीत शीनापुढे जात राहिली. तोवर तिला दुसऱ्या कोपऱ्यावरील तो फलक परत दृष्टीस पडला. आज मात्र त्या फलकावरील आकृती हसत खेळत, जिवंतपणाने रसरसलेली आणि चक्क बोलतांना दिसत होती. मुलाच्या डोळ्यातील चमक कुणास ठावे कशी त्या फलकात सामावून गेली होती. अत्यंत बोलके डोळे! पाहणारे, त्या नजरेतून शिकणारे, समजून घेणारे आणि त्यासोबतच ऐकणारे भावपूर्ण डोळे. त्या मुलाचे डोळे कानांची जबाबदारी देखील अतिशय उत्तमरित्या पार पाडायला शिकलेले आहेत हे बघून शीनाला अंतरंगात आत्यंतिक समाधान वाटत होते.

समाप्त

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कान – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ कान – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

शीनाचे नवे घर असे कांही नवीन होते की जणू कांही पृथ्वीग्रहाच्या ऐवजी दुसऱ्याच एखाद्या ग्रहाच्या अंगणात पाऊल ठेवल्याचा भास होत होता. घरांच्या बाहेर माणसांच्या अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा जाणवत नव्हत्या. रस्यावर मुलांच्या खेळण्याचा आवाज येत नव्हता. सडकेवर एकही प्रेमी युगल हास्य विनोद करीत रमत गमत फिरतांना दृष्टीस पडत नव्हते. रस्त्यावर ये जा करणाऱ्या माणसांनाच एखाद्या नैसर्गिक चमत्कारासारखे समजून एकही म्हातारबाबा घराबाहेरील व्हरांड्यात आरामखुर्चीवर रेलून आनंद घेतांना आढळत नव्हते.

रस्त्यांवर शांतता! घरांमध्ये शांतता! माणसांत देखील शांतता आणि फक्त शांतता!

इथला निसर्ग मात्र शांत नव्हता. वृक्षांच्या फांद्या सळसळणाऱ्या वाऱ्याचे आनंदाने स्वागत करीत त्याच्या तालावर ठेका धरीत झुलत होत्या. पुष्पसंभाराचे उमलणे आणि कोमेजणे अव्याहतपणे सुरूच होते. सुंदर फुलांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक लहानखुऱ्या वनस्पतींच्या अंगाखांद्यांवर कोवळ्या कळ्या फुटत होत्या तर दुसरीकडे पिकलेली पिवळी पानगळ गळून पडत होती.

शीना अस्वस्थ होती. इथे जीवन असल्याची समस्त लक्षणे होती, मात्र नीरव शांततेच्या गडद धुक्यात हरवलेली! शहराचे एक टोक २४ तास गजबजलेले, तर त्याच शहराचे दुसरे टोक निर्जन आणि उजाड! एकात उत्साहाने रसरसलेल्या जिवंत माणसांची गर्दी तर दुसऱ्यात नीरव मौनाची पडछाया. इतकं असूनही एकापेक्षा एक प्रशस्त बंगले कुणाचेही मन मोहून घेत, जणू सुंदर वास्तुकलेचे कॅनव्हासवर चितारलेले आकर्षक चित्रच! या विशाल बंगल्यांतून कोणी माणूस बाहेर पडेल अशा आशेने तिचे डोळे आसपास भिरभिरत. अरे हो, माणसे नाहीत पण एखाद दुसरी गाडी गॅरेज मधून बाहेर पडतांना किंवा आत शिरतांना दिसे. या आलीशान गाड्यांचे आवाजही आलीशान होते. कधी उगाचच चिरकी फट-फट नाही, तसेच चुकूनही पों-पों हॉर्नचा आवाज ऐकू येत नसे. कुठलाही कर्णकटू ध्वनी न करता या विशाल गाड्या लागलीच गॅरेजच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून सर्रकन आत घुसत.

बर्फाच्छादित वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आलेल्या आल्हाददायी सायंकालीन वेळी या मनुष्यविहीन मार्गिका बरंच कांही सांगून जात.

बंगल्यांच्या खिडक्यांतून हलकेच बाहेर डोकावणाऱ्या मंद प्रकाशामुळे तिथे माणसे वास्तव्य करून आहेत हे कळायचे. शहराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्रशांत आणि निवांत परिसरास शीनाने पहिली पसंती दर्शवली होती, परंतु तो इतक्या प्रमाणात शांत आणि एकाकी असेल याचे तिला खूपच आश्चर्य वाटले.

इथे बरेच कांही नवीन होते. सहज फेरफटका मारतांना आता शीनाची नजर एका फलकावर पडली. तो एक असा फलक होता जो तिने यापूर्वी कधीही आणि कुठेही पाहिला नव्हता. साहजिकच चालता चालता तिचे पाय त्याच ठिकाणी खिळले. पिवळ्या रंगाच्या त्या फलकावर लिहिले होते “कर्णबधिर मूल”! त्या कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकाला गेल्यावर देखील तसाच फलक उभारलेला होता. आता उत्सुकतेपोटी ती तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेली आणि काय आश्चर्य! तिला तिथेही परत तसाच फलक आढळला. चार दिशांना जाणाऱ्या चारही रस्त्यांच्या कोपऱ्यांवर तोच फलक ठाण मांडून बसला होता. बहुदा या लांबलचक गल्लीच्या समोरासमोर असलेल्या घरांमधील कुठल्यातरी घरात असे मूल असावे ज्याला ऐकू येत नसेल. म्हणूनच त्या रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा एक संकेत सूचक फलक होता. त्यासोबतच त्यांना ताकीद असावी, की त्यांनी हे रस्ते ओलांडताना ही बाब कटाक्षाने लक्षात ठेऊन मंद गतीने वाहने चालवावीत.

… तो फलक निव्वळ एक फलक नव्हता, ना त्यावरील एक मुलाची आकृती एक निर्जीव आकृती होती! त्यामागील संदेश म्हणजे निसर्गाने दिलेला एक निर्मम आणि निर्दयी संदेश! एक नैसर्गिक विपदा, विवशतेच्या महासागराच्या कधी उसळणाऱ्या तर कधी माघारी वळणाऱ्या अजस्त्र लाटा. अशी असह्य पीडा, जिच्या संगतीनेच एका निर्व्याज बालकाला संपूर्ण आयुष्य कंठायचे आहे.

एकाएकी त्या फलकाआडून तिच्या बाबांचा चेहरा डोकावू लागला. तेच दुःख, तीच वेदना! तिच्याकडे टक लावून बघणारे विवशतेने भरलेले त्यांचे नेत्र शीनाला त्या दिवसांकडे परत घेऊन गेले. शीनाच्या बाबांनी कर्णबधिरतेचा शाप वर्षानुवर्षे भोगला. त्याच असहाय अवस्थेत ते आयुष्याचे उरलेले दिवस कंठत होते. शेवटी त्याचा शापाचे ओझे वागवीत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या आनुवांशिक व्याधीचा प्रभाव शीनापर्यंत पोहोचला होता. इतकंच काय, बीना ही तिची लहान बहीण देखील याच व्यंगाने पीडित होती. जसजसे वय वाढत होते, तसतसे कानांनी ऐकू येणे कमी कमी होत होते. तिच्या कानांनी तर जणू असहकाराच्या पुकारला होता आणि कांहीही न ऐकण्याची जणू शपथच घेतली होती. आवाज ऐकू यायचे, पण त्यांचे अर्थ मात्र अनाकलनीय असत. तिचे कान जन्मापासून होते म्हणून आपल्या जागी निमूटपणे असण्याचे इतिकर्तव्य नाईलाजाने पार पडत होते, पण ज्यांच्याद्वारे कांही ऐकायला येत नसेल ते कान म्हणजे निरूपयोगी अस्तित्व विहीन अवयवच म्हणायचे.

ज्याच्यामुळे हा फलक लावला होता ते मूल कदाचित जन्मजात कर्णबधिर असावे. अगदीच ऐकू न येणे आणि कमी ऐकू येणे या दोहोंमध्ये बराच फरक असतो. दोन वेगवेगळ्या व्यथा. एकीत कानांनी कधी आवाज ऐकलेलाच नाही. सजावटीसाठी एखाद्या प्रदर्शनात मांडलेल्या निर्जीव वस्तूसारखे ते चेहेऱ्यावर ठेवलेले असतात. बस्स, त्याहून अधिक कांहीही नाही. दुसरीत तिच्या बाबांसारखी परिस्थिती! कोणे एके काळी कानांनी व्यवस्थित ऐकू यायचं, पण वाढत्या वयानुसार कानांनी ऐकू येणे हळू हळू कमी होत गेले. जणू काम करता करता एखादा मुलगा उद्धटपणे असहकार पुकारीत काम करायचे बंद करतो, त्याने पूर्वपदावर यावे यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करता, पण सारे कांही उलट्या घागरीवर पाणी! अशा अवस्थेत कित्येक प्रकारचे ध्वनी फसफसून कानांशी आदळून परत जात. जणू समोरच्या माणसाने असे कांही षडयंत्र रचले आहे की त्याचा आवाज कानाच्या पडद्यापर्यंत पोचणारच नाही, आणि तसाच त्याच्याकडे परत निघून जाईल.

गतकाळाचे फिक्कट पिवळसर थर उलगडतांना शीनाचे विचार आता काळाच्या दरीत खूप खोलवर पोचले. त्या काळी भारतातील गावांत आवश्यक असलेल्या बऱ्याच वस्तूंचा तुटवडा जाणवत असे, मात्र शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असे. बहुतेक याच कारणामुळे आरोग्याच्या बाबतीत गाव सामान्यतः निरोगी होते. गावातील रहिवासी तंदुरुस्त, सशक्त आणि निरोगी होते.

मात्र इतके निरोगी वातावरण असूनही शीनाच्या स्वतःच्या मोठ्या घरात एक अव्यक्त व्यथा होती. कुणालाही ऐकू न येणारी वेदना, एकांतातील मुका विलाप! जर कोणी माणूस शारीरिक आजारामुळे अंथरुणाला खिळलेला असेल तर ते लगेच समजण्यासारखे आहे, मात्र जेव्हा एखादा चालताफिरता माणूस आतल्या आत आपल्या अदृश्य आजाराशी झुंजत असतो तेव्हा त्याला कोणाकडून सांत्वन कसे मिळणार? शीनाच्या बाबांचा आजारही असाच होता. त्यांचे असहाय जीवन दुःखात गेले. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष विचित्रच होता, कारण त्यांना वर्षानुवर्षे ऐकू येतच नव्हते. शीनाला जेव्हांपासून समजायला लागले, तेव्हांपासून तिने त्यांना अशाच अवस्थेत पाहिले होते. बऱ्याचदा ते बोलणाऱ्याच्या हलणाऱ्या ओठांवरून अंदाज बांधायचे. तो काय बोलला, त्याने काय विचारले हे समजून घेण्याच्या आशेने ते त्याच्याकडे टकमक बघत बसायचे. वारंवार बोलणाऱ्याने आपल्या शब्दांची पुनरावृत्ती करूनही जेव्हा ती गोष्ट त्यांना ऐकू यायची नाही आणि म्हणून कळायची देखील नाही, तेव्हा ते अंदाजाने उत्तर द्यायचे. त्यांचे उत्तर बहुदा ८० टक्के चुकीचेच असायचे. पण त्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास, हिम्मत, तीव्र इच्छाशक्ती हे सर्व ढासळून पडायचे. समोर असलेला माणूस गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत राहायचा. तो असंतोषाने डोके हलवत असे आणि आतल्या आत कोलमडलेले तिचे बाबा देखील निराशेने डोके हलवीत बसत.

त्या काळात कुठल्याही प्रकारचे श्रवण यंत्र गावात पोचणे शक्य झाले नव्हते. उपचारांची देखील कोणतीच व्यवस्था नव्हती. त्या जमान्यात कोणी विचारही केला नसेल की अशा कामचुकार कानांना वठणीवर आणायचा देखील उपाय असू शकतो. कधी कधी तर बाबांच्या विचित्र आणि अप्रासंगिक उत्तराने समोरच्या माणसाची हसून हसून पुरेवाट होत असे. मात्र बाबा निष्कपटपणे त्याच्या तोंडाकडे फक्त बघत बसत. हसणाऱ्याचे तर हसू थांबत असे, मात्र त्यानंतरही बाबांच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या हसण्याचे आवाज घुमत असत. त्या तिरकृस्त क्षणांच्या टोचणीचे आवाज एखादा खिळा ठोकल्यासारखे त्यांच्या कानावर जोरजोरात आदळत असत…. ठक-ठक-ठक-ठक!

कानांत अव्याहतपणे वाजणाऱ्या या अनिश्चिततेच्या फुंकणीचे कर्कश आवाज इतर ध्वनी ऐकण्याची मुळी परवानगीच नाकारत असत. “काय? काय? काय? ” हे शब्द मुखात असे कांही ठाण मांडून बसत की, त्यांच्याशिवाय एकही प्रश्न त्यांच्या मुखातून बाहेर येत नसे. व्यवसायात, कामकाजात, दुकानात वगैरे वारंवार तेच तेच प्रश्न विचारीत ते आपले काम कसेबसे उरकत असत. मात्र घरी आणि नातलगांच्या घोळक्यात असतांना गप्पा गोष्टी करणे हे त्यांच्याकरता एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नसे. कित्येकदा तर “माझी तब्येत बरी नाही” किंवा “कामासाठी बाहेर जायचंय”, असे सांगून उठून जात ते आपली सुटका करून घेत. त्या दिवशी बाबा मुद्दामच दुकानातून रात्री खूप उशीरा घरी परतत. तोंवर मुलेबाळे, इतकंच काय, आमची आई देखील झोपी गेलेली असे.

बाहरच्या लोकांना ते या ना त्या कारणाने टाळू शकत होते, मात्र त्यांना घरच्या लोकांचा सामना करावाच लगे. शैलू या त्यांच्या मोठ्या मुलाची चिडचिड त्यांना त्रस्त करीत असे, तीक्ष्ण काट्यांसारखी खोलवर रुतून जखम करीत असे. यासाठी ते स्वतःलाच अपराधी समजत. जणू त्याने सांगितलेली गोष्ट न ऐकू येणे हा त्यांचाच खूप गंभीर गुन्हा होता! बाबूजींपर्यंत आपले शब्द पोचवण्यासाठी शैलू खूप ओरडून बोलायचा. इतक्या जोरात की बाबा लगेच त्याला म्हणत, “ओरडू नकोस रे. ”

पुन्हा बोलावे लागू नये म्हणून तो आपली सर्व शक्ती एकवटून आणि आणखीनच आकांताने ओरडून त्यांना म्हणायचा, “असं जोरात ओरडल्यावरच तर तुम्हाला ऐकू येतंय”. असे आकांडतांडव करीत शैलू रागाने लाल झालेला नाकाचा शेंडा फेंदारीत फरशीवर धड धड पाय आपटत बाहेर चालला जात असे. धाडकन दरवाजा बंद केल्याचा आवाज नंतर कितीतरी वेळ खोलीत घुमत राहायचा. शैलूचे चिडचिड करणारे तरुण लालभडक डोळे बाबांच्या वयस्कर झालेल्या डोळ्यांना भिडल्यावर जणू आग ओकत असत. त्याच्या डोळ्यातले भाव बाबूजींना लगेच वाचता येत असत. झालेल्या अपमानाचा असा दारुण अनुभव आल्यावर त्यांच्या मनात क्रोध आणि निराशेसोबतच असहाय्यतेच्या गडद सावल्याही झाकोळून येत. अशा प्रकारे शैलूला दरवाजातून बाहेर जातांना बघत ते अपेक्षेने मागे वळून बघत. कदाचित आमच्या आईच्या नजरेत सहानुभूतीच्या रेषा दिसतील अशी त्यांना किमान आशा असे, कुणीतरी जखमेवर नरम कापसाचा बोळा हलकेच फिरावावा तशी! पण त्यावेळी त्यांना फक्त वळून मागे फिरणाऱ्या आईची पाठच नजरेस पडत असे.

तीन मुले आणि पत्नी, या आपल्याच कुटुंबीयांसमोर बाबा अगदी असहाय होऊन जायचे. घरातील इतर सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारायचे. हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(नातेवाईक स्त्रियांपासून काहीशी दूर ती एकटीच एका कोपर्‍यात खुर्चीवर बसलेली होती. डाॅक्टरांचा चेहराही दुःखाने विदीर्ण झालेला. पण पुरूष आणि त्यातून स्वतः डाॅक्टर असल्याने ते संयम राखून होते. 

‘तिच्या वेदना बघवत नव्हत्या, त्यातून तिची सुटका झाली, ‘एवढंच ते बोलले.)  इथून पुढे – – – 

दिवसकार्य आटोपून डाॅक्टर परत हाॅस्पिटलला येऊ लागले. दोनच दिवसांनी त्यांना एका महत्त्वाच्या काॅन्फरन्ससाठी दिल्लीला जायचं होतं. आता सुकन्या एकटीच घरी कशी राहणार, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वैपाक करणाऱ्या मावशींना रात्री तिच्यासोबत थांबायला सांगितलं होतं. इतर वेळी त्या रात्री आठनंतर घरी जायच्या. पण डॉ. च्या बायकोसोबत एक नर्स कायम घरात असायची. त्या दिवशी दुपारी दोन वाजता डाॅक्टर दिल्लीला निघून गेले. रात्री नऊ वाजता नंदिनीला त्यांचा फोन आला. सुकन्याला एकदम खूप ताप भरला होता आणि त्या स्वैपाकीण मावशी घाबरून गेल्या होत्या. तर नंदिनी त्यांच्या घरी जाऊन जरा सुकन्याला बघून आणि तिला औषध देऊन येईल का?  घरात औषधं आहेत पण त्या मावशींना काही इंग्रजी नीट वाचता येत नाही. 

नुकतीच जेवणं झाली होती आणि नंदिनी मागची आवराआवर करत होती. मुलं टी.व्ही. बघत होती. सासूबाई तिला म्हणाल्या, ‘मी आवरते बाकीचं. तू जाऊन ये तिकडे.’ तिनं मुलांना बाय केलं. सासऱ्यांनी बरोबर येऊ का विचारलं, पण नंदिनी एकटी जाईन म्हणाली आणि स्कूटी घेऊन पोचलीसुद्धा तिकडे वीस मिनिटात!

तिनं थर्मामीटर लावून बघितला तर सुकन्याला १०३ ताप होता. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिनं सुकन्याला गोळी दिली आणि ती तिच्याजवळ बसली. मावशींना थंड पाण्यात मीठ घालून आणि दोन रूमाल आणायला सांगितलं आणि सुकन्याच्या कपाळावर ती घड्या ठेवत राहिली. दीड तासानंतर घाम येऊन ताप १०१ पर्यंत उतरला. तापामुळे सुकन्यानं संध्याकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मावशींनी स्वैपाक केला होता, पण त्याही जेवल्या नव्हत्या. नंदिनीनं त्यांना जेऊन घ्यायला सांगितलं, तोपर्यंत ती सुकन्या जवळ बसली. त्यांचं जेवण होईपर्यंत अकरा वाजले होते. नंदिनीला घरी परत जायचं होतं. सुकन्या कण्हत होती. पण तिला झोप लागल्यासारखं वाटत होतं. नंदिनीनं थर्मामीटर लावला तर ताप परत १०२ झाला होता. तिला तसंच सोडून कसं निघणार?  नंदिनीनं घरी फोन केला, सासूबाई तिला म्हणाल्या, ‘थांब तू तिथेच. घरची काळजी नको करू. तसंही रात्री एकटी घरी येण्यापेक्षा सकाळी तिला बरं वाटलं की ये. म्हणजे आम्हाला तुझीपण चिंता नाही. 

सुकन्याचा ताप वाढत होता. चार तासानंतर परत तिने सुकन्याला गोळी दिली. रात्रभर ती सुकन्याच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत राहिली. मावशी तिथेच खाली अंथरूण घालून आडव्या झाल्या होत्या. पहाटे साडेपाचनंतर ताप पूर्ण उतरला आणि सुकन्या शांत झोपली. नंदिनीचा तिथेच खुर्चीवर बसल्या बसल्या डोळ लागला. तिला जाग आली तेव्हा आठ वाजले होते. तिनं गडबडीनं घरी फोन केला. मुलं डबा घेऊन शाळेला गेली होती. मावशींनी नंदिनीला चहा आणून दिला. तोंड धुवून चहा घेतल्यावर तिला जरा फ्रेश वाटलं. मग मावशींना विचारून 

स्वैपाकघरात जाऊन, तिनं तूप-मीठ घालून भाताची पेज बनवली आणि सुकन्याचं काही एक न ऐकता तिला जबरदस्तीने ती भरवली. नंतर तिला आराम करायला सांगून नंदिनी घरी गेली. मावशी तिथेच थांबणार होत्या डाॅक्टर येईपर्यंत. 

नंदिनी घरी येऊन आवरून अकराच्या सुमारास पुन्हा डाॅक्टरांच्या घरी गेली. तिनं सुकन्याला हात-पाय धुवून कपडे बदलायला लावले. मग घरून नेलेलं मुगाचं सूप गरम करून तिला प्यायला लावलं. आता सुकन्या जरा फ्रेश झाली होती. तिनं नंदिनीचे आभार मानले. मावशींना तिच्या जेवणाबद्दल सूचना देऊन नंदिनी हाॅस्पिटलला कामावर गेली. पुन्हा ताप आला किंवा बरं वाटत नसेल तर फोन करायला सांगून, तिनं मावशींना आपला मोबाईल नंबर दिला. चारच्या सुमारास डाॅक्टर घरी आले. त्यांनी नंदिनीचे मनःपूर्वक आभार मानले. 

सुकन्या तर नंदिनी मावशीच्या प्रेमातच पडली होती. ती अधूनमधून नंदिनीशी फोनवर बोलू लागली. नंदिनीही आईवेगळी पोर म्हणून तिला सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत राहायला बोलवू लागली. तीही कधी नंदिनीच्या हातचं इडली-सांबार, आजीच्या हातचं थालीपीठ खायला हक्कानं येऊ लागली. तिला नंदिनी, तिची मुलं आणि घरात आजी-आजोबा यामुळे नंदिनीकडचं वातावरण खूप आवडायचं. डाॅक्टर साने तिला घरी न्यायला रात्री कार घेऊन यायचे, पण ते सहसा वरती घरात येत नसत. पण घरातून काही वेळा त्यांच्यासाठी डबा भरून दिला जात असे. 

नचिकेतची दहावीची परीक्षा संपली त्या दिवशी मुलांनी सिनेमा बघायचा आणि हाॅटेलमध्ये जेवायला जायचा बेत ठरवला. आजी-आजोबा नाही म्हणाले बरोबर जायला, पण मग नंदिनी आणि डाॅक्टरांना मात्र मुलं जबरदस्तीने घेऊन गेली. प्रताप कॅनडाला गेल्यापासून नंदिनीचं असं बाहेर जाणं तर बंदच झालं होतं. त्यामुळे सासू-सासऱ्यांनीही तिला जायचा आग्रह केला. सुकन्याने पण आपल्या बाबांनी आलं पाहिजे असा हट्ट धरला. डाॅक्टरांनीही आजवर स्वतःला हाॅस्पिटलच्या कामात बुडवून घेतलं होतं. बायकोच्या आजारपणामुळे असे मजेचे प्रसंग त्यांनाही दुर्मिळच होते. रात्री सिनेमा संपल्यावर नंदिनी आणि मुलांना घरी सोडून मग डाॅक्टर लेकीसोबत आपल्या घरी परतले. खूप दिवसांनी नव्हे तर वर्षांनी असा तणावरहित वेळ अनुभवायला मिळाला होता. सुकन्याचे दहावीचे क्लास सुरू होईपर्यंत मंडळी अनेकवेळा आउटिंगला जाऊन आली. नंदिनी आणि डाॅक्टर यांच्यात मुलांबाबत काही ना काही बातचीत होऊ लागली. 

नचिकेतला मेडिकलला जायची इच्छा होती. त्यामुळे तो डाॅक्टर काकांशी त्याबाबत चर्चा करत असे. दोन्ही कुटुंब जवळ येत होती. हाॅस्पिटलमध्ये मात्र नंदिनी आणि डाॅक्टर कामापुरतंच बोलत असत. प्रतापचा संपर्क तर तुटलाच होता. पैसे येणंही आता बंद झालं होतं. मुलांनाही आडवळणाने का होईना हे कळून चुकलं होतं की आपले बाबा आता आपले राहिलेले नाहीत. 

काळ पुढे सरकत राहिला. नचिकेत डाॅक्टर.. कार्डिओलाॅजिस्ट झाला. सुकन्या सी. ए. तर नेहा फिजिओथेरपिस्ट झाली. तिघांनी आपापले जोडीदार स्वतःच निवडले होते.

त्यानंतर नेहाने मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल सत्य परिस्थिती सांगितली. दोन्ही मुलांना वडिलांचा खूप राग आला आणि आईवर ओढवलेल्या परिस्थितीचं दुःखही झालं. आपल्या भल्यासाठी ती एकटी हा भार वाहात राहिली, या जाणिवेने तिच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटली. यापुढचं तिचं आयुष्य तरी सुखाचं जावं यासाठी काय करता येईल हा विचार ती दोघं करू लागली. नंदिनीचं आत्ताचं वय जेमतेम ४८ वर्षांचं होतं. 

सुकन्यानेही आईच्या आजारपणामुळे वडिलांनी कोणत्या परिस्थितीला तोंड दिलं हे जवळून अनुभवलं होतं. त्यांना उर्वरित आयुष्य तरी सुख-समाधानात घालवता यावं, अशीच तिची इच्छा होती. डाॅक्टरांनी नुकतंच ५६ व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तिन्ही मुलांनी आपल्या जोडीदाराबरोबर आणि मग आजी-आजोबांसोबत याविषयी चर्चा केली. 

एक दिवस नंदिनीच्या सासू-सासऱ्यांनीच नंदिनी आणि डाॅक्टरांना एकत्र बोलावून असं सुचवलं, की तुम्ही दोघं कायमचं एकत्र येण्याचा विचार का करत नाही?  आम्ही दोघं आता थकत चाललो आहोत. मुलं तर आपापल्या आयुष्यात पुढे जाणार होती. 

प्रथम दोघांना हे रूचलं नाही. पण आपल्याला एकमेकांच्या सहवासात आनंद मिळतो आणि सुरक्षित वाटतं, हे एव्हाना दोघांच्या लक्षात आलं होतं. 

विचाराअंती त्यांनी पुढील आयुष्य एकत्र काढण्याचा निर्णय घेतला होता, पण तिन्ही मुलांची लग्न झाल्यावरच! नंदिनीला सासू-सासऱ्यांचीही काळजी वाटत होती. आजवर त्यांनीच तिला भक्कम आधार दिला होता. पण त्यांनी स्वतःहून वृद्धाश्रमात राहायची तयारी दर्शविली होती. पोटचा मुलगा कायमचा अंतरला, पण सून आणि नातवंडांमुळे आपलं आत्तापर्यंतचं आयुष्य समाधानात गेलं, अशीच त्यांची भावना होती. 

डाॅक्टरांनी आता कोकणात आपल्या गावी लांज्याला एक हाॅस्पिटल उभारायचं ठरवलं होतं. तिथे अल्प दरात आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार रूग्णांना मिळावे, अशी सोय करण्याची त्यांची इच्छा होती. समाजाचं ऋण काही अंशी तरी फेडावं हा उद्देश होता. जुन्या घराची डागडुजी करून, शांतपणे आयुष्य घालावं असं त्या दोघांनी ठरवलं होतं. नंदिनीनं अजून प्रतापपासून घटस्फोट घेतला नव्हता. पण त्याचं त्यांना फारसं महत्त्व वाटत नव्हतं. पण आता नेहाच्या लग्नाच्यावेळी तो अचानक भारतात आल्याने, तेही शक्य होणार होतं. वकिलांशी त्या संदर्भात बोलणं चालू होतं. 

नचिकेतची इच्छा असेल तर दुबई सोडून पुण्याचं त्यांचं हाॅस्पिटल त्यानं चालवावं असा प्रस्ताव. त्यांनी त्याच्यापुढं ठेवला होता. त्याची बायको रश्मी ही चाईल्ड स्पेशालिस्ट होती. 

नंदिनी आजच डाॅक्टरांसोबत कोकणात जायला निघणार होती. नंतर नेहा-पराग बेंगलोरला आणि सुकन्या-सलील नाशिकला रवाना होणार होते. आजी-आजोबा एक महिनाभर आपल्या घरातच राहणार होते. शारदाबाई स्वैपाक आणि इतर कामं करणार होत्या. पुढच्या महिन्यापासून ती दोघं मुळशी जवळच्या वानप्रस्थ या वृद्धाश्रमात राहायला जाणार होती. आणि प्रताप त्यांना सांगत होता की तो आता कायमचा इथे आला आहे.

आई त्याला म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. आता इथेही तुझं कोणीच उरलं नाही, या घराच्या भिंतींशिवाय! ‘

समाप्त

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यानंतर बरेच दिवस त्याचा फोनही आला नाही. नंदिनीने प्रयत्न केला पण २-३ वेळा त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या काळजीने ती रोज फोन करायला लागली.) – इथून पुढे – – – 

असाच एक दिवस तिनं हाॅस्पिटलमधून फोन लावला तर तो सूझन नावाच्या एका बाईने उचलला आणि प्रतापला बोलावलं. ही बाई कोण म्हणून नंदिनीनं खडसावून विचारलं. त्यावेळी प्रतापने जे सांगितलं ते ऐकून नंदिनीला गरगरल्यासारखंच झालं. सूझन आणि तो गेली तीन वर्षे एकत्र राहत आहेत. त्यांना दोन वर्षांची एक मुलगी पण आहे. आणि तो आता कॅनडा सोडून भारतात परत येणं शक्य नाही. नंदिनीच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती बेशुद्ध झाली. एका पेशंटनेच डाॅक्टरांना केबिनमध्ये जाऊन हे सांगितलं. डॉ. साने ताबडतोब बाहेर आले. त्यांनी दोन नर्सच्या मदतीने नंदिनीला हाॅस्पिटलमधल्या बेडवर झोपवलं. तिचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. डाॅ. नी तिला हलवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण उं उं करून ती परत बेशुद्ध झाली. नर्सला तिला सलाईन लावायला सांगून डॉ. नी एक इंजेक्शनही नंदिनीला दिलं. तिच्या घरी फोन करून निरोप देण्याची व्यवस्था केली. नंदिनीचे सासू-सासरे रिक्षा करून लगेच हाॅस्पिटलला पोचले.

आधीच्या पेशंटला आत पाठवेपर्यंत व्यवस्थित असलेल्या नंदिनीला अचानक काय झालं असावं हे डाॅ. ना ही कळत नव्हतं. त्या पेशंटने सांगितल्याप्रमाणे नंदिनी मोबाईलवर बोलत असताना हे झालं होतं. तिच्या सासऱ्यांनाही कळेना असं फोनवर काय आणि कोणाशी बोलणं झालं असावं? साधारण तासाभराने नंदिनी शुद्धीवर आली. आपण इथे का झोपलो आहोत आणि सासू-सासरे का आले आहेत, याचं तिला आकलन होत नव्हतं. सासऱ्यांनी तिला कोणाचा फोन आला होता विचारलं आणि ती प्रताप, प्रताप असं पुटपुटली. तिला पुन्हा ग्लानी आल्यासारखं झालं. डाॅ. सानेही तिथेच बसलेले होते. त्यांनी नंदिनीला सध्या आराम करू द्या आपण नंतर तिच्याशी बोलू असं सांगितलं.

दोन दिवस नंदिनी हाॅस्पिटलमधेच होती. तिसऱ्या दिवशी जरा बरं वाटल्यावर आठ दिवस पूर्ण आराम करण्याच्या अटीवर डाॅ. नी तिला घरी जायची परवानगी दिली. स्वतः कार घेऊन ते तिला आणि तिच्या सासऱ्यांना घरी सोडून आले.

ते घरी पोचले तेव्हा मुलं शाळेत गेलेली होती. घरी येताच नंदिनीचा बांध फुटला आणि रडत रडतच तिने प्रतापचे प्रताप त्याच्या आई-वडिलांच्या कानावर घातले. दोघेही कोलमडून गेले. काय आणि कशी समजूत घालणार होते ते नंदिनीची! जरा सावरल्यावर मात्र मुलांना यातलं काहीच न सांगण्याची शपथ नंदिनीने त्यांना घातली. मुलांची वयं अर्धवट, त्यांच्या मनावर याचा आघात होऊ नये याची काळजी मोठ्यांनीच घ्यायला हवी होती. त्यामुळे ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये ठेवायची असं ठरलं.

आठ दिवसांनी बिछान्यावरून उठून बसलेली नंदिनी मात्र कोणी वेगळीच स्त्री होती. तिचा हसरा चेहरा गंभीर आणि दृढनिश्चयी दिसत होता. ती नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. मुलांना शाळेत पाठवून स्वतः हाॅस्पिटलला कामावर रुजू व्हायला तयार झाली. सासू-सासरे तिला अजून थोडे दिवस आराम कर असं म्हणत होते. पण ती म्हणाली की आता मला असं हातपाय गाळून चालणार नाही. माझी जबाबदारी आता जास्त वाढली आहे आणि ती स्कूटी घेऊन निघालीसुद्धा.

हाॅस्पिटलला ती आल्यावर डॉ. सानेंनी तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि मग ती आपल्या कामात मग्न राहिली. सर्व पेशंट संपल्यावर मात्र डॉ. सानेंनी तिला केबिनमध्ये बोलावलं. ‘त्या दिवशी नेमकं काय झालं नंदिनी? ‘ 

नंदिनी गप्प बसून राहिली. ‘ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर. पण एक डाॅक्टर म्हणून मला पेशंटच्या आजाराचं कारण जाणून घेणं आवश्यक आहे ना! परत कधी असा त्रास झाला तर लगेच योग्य उपचार मिळायला हवे. आपण सर्वच पेशंटची केस हिस्टरी समजून, नोंद करून घेतो ना? तू सांगितलं नाहीस तरी मला तुझ्या घरच्या लोकांकडून ही माहिती मिळवावी लागेल. तू माझ्या हाॅस्पिटलमधे काम करतेस, माझ्यावर तुझी जबाबदारी आहे. ‘

‘नाही नाही, तुम्ही आई-बाबांना काही विचारू नका. ‘ नंदिनीच्या डोळ्यात अश्रू होते. मग तिनेच त्यांना सर्व हकिकत सांगितली. डाॅक्टर देखील हे ऐकून चकित झाले. काय बोलावं त्यांना सुचेना. ते एवढंच म्हणाले, ‘नंदिनी, खचून जाऊ नकोस. स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घे. काहीही मदत लागली तर मला नक्की सांग. एक मित्र म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत असेन. ‘

एक महिना असाच गेला. पगार हातात आला तेव्हा नंदिनी विचारात पडली. आपल्या या तुटपुंज्या पगारात आपण मुलांना कसं वाढवणार? आत्तापर्यंत प्रतापकडून नियमित पैसे येत होते. अकाऊंटमध्ये बऱ्यापैकी रक्कम शिल्लक देखील होती. पण उद्या त्यानं पैसे पाठवणं बंद केलं तर? आणि आता त्याच्या पैशांवर का म्हणून अवलंबून राहायचं? सासऱ्यांना व्यवस्थित पेंशन आहे, त्यामुळे ती दोघं आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आहेत. पण मुलांचं अजून शिक्षण पार पडायचं आहे. त्यांच्या ट्यूशन फी, वेगवेगळे क्लास आणि इतर दैनंदिन खर्च मी कसा मॅनेज करणार? मला याहून अधिक पैसे कमावण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. दुसरी नोकरी शोधावी का? नचिकेत यावर्षी दहावीला होता. पुढच्या वर्षी काॅलेजला अ‍ॅडमिशन, नंतरचं उच्च शिक्षण हे सारंच खर्चिक होतं.

मग दुसर्‍या दिवशी तिने डाॅक्टरांकडेच हा विषय मांडला. हाॅस्पिटलमध्येच तिला आणखी काही काम करता येईल का? जरावेळ विचार करून डॉ. म्हणाले की आपल्या मॅटर्निटी हाॅस्पिटलच्या अकाउंट्स विभागात एका मदतनिसाची गरज आहे, कारण तिथला व्याप आता फारच वाढला आहे. तू तिथे काम करू शकशील का? तू जर जेवणाचा डबा घेऊन आलीस तर मधल्या वेळात घरी न जाता तिथे दोन अडीच तास काम करणं जमेल का? थोडे दिवस काम शिकून घेतल्यावर मग तुला कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर घरूनसुद्धा काही कामं करता येतील. म्हणजे मग मलाही विश्वासू आणि कुशल माणूस मिळेल कामासाठी आणि दुसरीकडे न जाता तुलाही इथेच जास्त पगार मिळेल. ‘

‘असं झालं तर माझी खूपच सोय होईल. पण मला अकाउंटसचं काही ज्ञान नाही आणि कम्प्युटर, लॅपटॉप वापरायची सवयही नाहिये. मी शिकण्याचा प्रयत्न मनापासून करीन, कितपत जमेल ते नाही सांगता येणार. ‘नंदिनी म्हणाली.

‘तू हुशार आहेस, तुला नक्की जमेल. मी अकाउंटसच्या जोशीबाई आणि मिस्टर सबनिसांशी बोलून घेतो. परवापासून तू सुरूवात कर. ‘

आणि नंदिनीच्या कामाला सुरूवात झाली. शिकण्याची मनापासून तयारी असल्याने तिनं तिथलं काम, कम्प्युटर, लॅपटॉपचा वापर हे थोड्याच दिवसांत आत्मसात केलं. तिथल्या लोकांशीही तिचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. आधीपेक्षा दीडपट पगार मिळू लागल्याने तिची आर्थिक चिंताही कमी झाली. शिवाय अजूनतरी प्रतापकडून दरमहा पैसे बँकेत जमा होत होते. पण शक्यतो त्या पैशांना हात लावायचा नाही असं नंदिनीनं ठरवून टाकलं होतं.

डाॅक्टरांनी केलेल्या मदतीमुळे आणि अकाउंटसच्या कामामुळे वेळोवेळी संपर्कात आल्याने नंदिनी आता डॉ. सानेंबरोबरही थोडं मोकळेपणाने बोलू लागली होती.

असेच सहा महिने निघून गेले. आणि एक दिवस सकाळी हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर तिला डाॅ. सानेंचा फोन आला. त्यांच्या बायकोची तब्येत सिरियस असल्याने ते दोन-तीन दिवस तरी हाॅस्पिटलमध्ये येऊ शकणार नव्हते. त्यांच्या सगळ्या अपाॅइंटमेंटस रद्द कराव्या लागणार होत्या. मॅटर्निटी हाॅस्पिटलमध्ये आणखी दोन मदतनीस डाॅक्टर असल्यामुळे ते चालू राहणार होतं. काही अडचण आली तर डाॅक्टरांचे पुण्यातील मित्र डाॅक्टर फडणीस किंवा डाॅक्टर देशमुखांशी संपर्क साधायचा होता. नंदिनीने सकाळी अपाॅइंटमेंटस असणाऱ्या पेशंटना आधी येऊ नका म्हणून फोन करून कळवलं आणि मग संध्याकाळच्या. नंतर ती अकाउंटस विभागात गेली.

जोशीबाई बरीच वर्ष तिथे काम करत होत्या. त्यांच्याकडून तिला कळलं की डाॅक्टरांची बायको गेली दहा वर्षे पॅरालिसिसमुळे आजारी आहे. ती पुण्यातील नामांकित काॅलेजात प्रोफेसर होती. दहा वर्षांपूर्वी काॅलेजातून घरी येताना तिच्या स्कूटरला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाला. तिच्या मेंदूला मार लागला. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस ती कोमात होती. नंतर शुद्धीवर आली पण तिचा चेहरा वाकडा झाला आणि शरिराची उजवी बाजू लुळी पडली. फिजिओथेरपीचा फारसा उपयोग झाला नाही आणि ती बिछान्याला खिळली. मागच्या वर्षीपासून तर तिची नजरही अंधूक झाली होती. तिच्यासाठी घरी कायम एक नर्स ठेवलेली आहे. डाॅक्टरांना सुकन्या नावाची एक मुलगी आहे आणि यंदा ती नववीत आहे. डाॅक्टरांच्या आईने सुकन्याला लहानाचं मोठं केलं. पण दोन वर्षांपूर्वी त्या हार्ट अ‍ॅटॅकने गेल्या. तेव्हापासून डाॅक्टरच तिचे आई आणि बाबा. त्या मुलीला बिचारीला आईचं सुख असं मिळालेलंच नाही. कारण हा अपघात झाला तेव्हा ती जेमतेम तीन किंवा चार वर्षाची असेल. नंदिनीला हे ऐकून खूपच वाईट वाटलं. आणि घरात इतक्या अडचणी आणि वाईट परिस्थिती असतानाही डाॅक्टर किती खंबीरपणे दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत याचं कौतुकही वाटलं.

दोन दिवसांनी डाॅक्टर आलेच नाहीत. त्यांची बायको निवर्तल्याची बातमी आली. सगळ्या स्टाफसोबत नंदिनीही डाॅक्टरांच्या घरी जाऊन भेटून आली. काय बोलणार अशावेळी? घरी आली तरी सुकन्याचा कोमेजलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हता. नातेवाईक स्त्रियांपासून काहीशी दूर ती एकटीच एका कोपर्‍यात खुर्चीवर बसलेली होती. डाॅक्टरांचा चेहराही दुःखाने विदीर्ण झालेला. पण पुरूष आणि त्यातून स्वतः डाॅक्टर असल्याने ते संयम राखून होते.

‘तिच्या वेदना बघवत नव्हत्या, त्यातून तिची सुटका झाली, ‘एवढंच ते बोलले.

– क्रमशः भाग दुसरा  

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नंदिनी-प्रतापच्या लेकीचं, नेहाचं लग्न दोन दिवसांपूर्वीच पार पडलं होतं. काल नेहाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा झाली होती. आज नेहा आणि तिचा नवरा पराग नेहाच्या माहेरी आले होते. नेहाचा भाऊ नचिकेत आणि रश्मीवहिनी उद्या दुबईला परतणार होते. प्रताप कॅनडाहून या लग्नासाठीच आला होता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला होता.

नेहा-पराग, रश्मी, नचिकेत, सुकन्या आणि सलील यांच्या गप्पा छान रंगात आल्या होत्या. हास्य-विनोदाला उधाण आलं होतं. नंदिनीचे सासू-सासरे त्यांच्या खोलीत आराम करत होते. नंदिनीही आपल्या खोलीत आवराआवर करत होती. मधूनच कीचनमध्ये डोकावून शारदाबाईंना जेवायला काय कसं करायचं याच्या सूचना देत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

नचिकेतनं दार उघडलं तर बाहेर प्रताप दोन मोठ्या अवाढव्य बॅगा घेऊन उभा होता. दार उघडताच त्याने ढकलत त्या बॅगा आत आणल्या. नेहा, नचिकेत आणि रश्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचत तो म्हणाला, “तुम्हाला सगळ्यांना सरप्राइज द्यायचं होतं. म्हणून हे सामान शिपिंग कंपनीच्या गोडाऊनमध्येच ठेवलं होतं. आता मी कायमचा इकडे आलो आहे. “

त्याचं हे बोलणं ऐकून कोणाच्याही चेहर्‍यावर आनंद दिसला नाही, सगळ्यांची चलबिचल झालेली दिसली. नेहातर पटकन उठून आतल्या खोलीत निघून गेली. नचिकेत, रश्मी आणि सुकन्या- सलील गोंधळून एकमेकांकडे बघू लागले.

प्रताप आपल्या बॅगा आतमध्ये ठेवण्यासाठी वळाला. त्याला नेहा आणि नंदिनी आपल्या आई- वडिलांच्या खोलीत दिसल्या. बॅगा ठेवून तोही त्या खोलीत आला आणि म्हणाला, ‘आई, बाबा, मी आता भारतात परत आलो आहे, तिकडचं सगळं सोडून! आता इथेच एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी शोधण्याचा विचार आहे. ‘ 

यावर बाबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आई एवढंच म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. ‘ आणि तिने नेहाला तिथून निघून जाण्याचा इशारा केला. ‘नंदिनी, तुझी सगळी तयारी झालीय का? नाहीतर तू ती पूर्ण कर. ‘ मग नंदिनीही तिथे थांबली नाही.

प्रताप काही क्षण आश्चर्यचकित होऊन बाहेर जाणाऱ्या नंदिनीकडे पहात राहिला. नंतर म्हणाला ‘तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आई? ‘ 

‘बस तिथे खुर्चीवर, सांगते. ‘

नेहा बाहेरच्या खोलीत आली. मुलांच्या गप्पांची जागा आता हलक्या आवाजातील कुजबुजीनं घेतली होती. नेहा एकदा आईच्या खोलीपर्यंत जाऊन आली. पण नंदिनीनं दार आतून बंद करून घेतलं होतं. आपल्या बेडवर उशीवर डोकं ठेवून ती पडली होती. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसोबत आजवरच्या आयुष्याचा चलत चित्रपट तिच्या नजरेसमोरून सरकू लागला.

नागपूरस्थित बेंद्रेची नंदिनी एकुलती एक मुलगी. तिची बी. एस. सी. फायनलची परीक्षा झाली आणि प्रताप रानडेचं स्थळ सांगून आलं. बाबांच्या मित्रानेच सुचवलं. प्रतापनं सिव्हिल इंजिनिअरिंगची डीग्री घेतली होती आणि सहा महिन्यांपूर्वी त्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली होती हैदराबादला. त्याचे आई-वडील पुण्यात होते आणि मोठ्या बहीणीचा नवरा मरीन इंजिनिअर असल्याने देश – विदेशात भ्रमंती करत होता.

त्यांचं कुटुंब मात्र मुंबईत अंधेरीला होतं. तिची नोकरी, मुलांच्या शाळा आणि सासरच्या नातेवाईकांचा मोठा गोतावळा यातच ती व्यग्र असायची. सावळी पण आकर्षक नंदिनी, प्रताप आणि रानडे कुटुंबियांना पसंत पडली. दोन्ही बाजूंनी पसंती झाली आणि तीन महिन्यांनंतर एका शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.

प्रतापसोबत नंदिनीही हैदराबादला रवाना झाली. दोघांचा संसार सुरू झाला. यथावकाश नचिकेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी नेहाचा जन्म झाला. प्रतापला पुण्यातील दुसर्‍या एका कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आणि मग मंडळी पुण्यात आई-बाबांसोबत राहायला आली. दोन्ही नातवंडांचा सहवास मिळाल्याने आजी-आजोबादेखील खुश होते. दोनच वर्षांनी प्रतापनं कोथरूडमध्ये पाच खोल्यांचा प्रशस्त ब्लाॅक घेतला आणि आई-बाबांसह त्याचं कुटुंब इकडे राहायला आलं. काळ पुढे सरकत होता.

पुण्यातील नोकरी सोडून प्रताप कॅनडाला नोकरीसाठी गेला, तेव्हा नचिकेत चौथीत आणि नेहा दुसरीत होती. सुरुवातीला कॅनडातील कंपनीसोबत दोनच वर्षांचा करार होता. दोन वर्षे पटकन जातील आणि प्रताप परत येईल असाच विचार घरच्यांनी केला आणि त्याच्या कॅनडाला जायला आनंदाने सहमती दर्शवली.

मुलांच्या शाळा, अभ्यास आणि संगोपनात दिवस कसा संपायचा ते नंदिनीला कळतही नसे. शनिवार- रविवारी प्रतापला सुट्टी असल्याने त्याचा व्हिडिओ काॅल किंवा फोन ठरलेलाच. एकंदरीत आनंदात दिवस चालले होते. दोन वर्षांचा काळ संपत आला. आता एक महिन्यानंतर प्रतापचा करार संपेल आणि तो परत येईल, या विचाराने नंदिनी उल्हसित झाली होती. प्रतापही वारंवार आपण परत यायला कसे उत्सुक आहोत, हेच ऐकवत होता. आणि एक दिवस त्याने कंपनीसोबत पुढच्या तीन वर्षांसाठी नवीन करार केल्याचं तिला सांगितलं. नंदिनी नाराज झाली, पण त्याच्या प्रगतीच्या आड कशाला यायचं, तोही आपल्या कुटुंबासाठीच पैसा मिळवतो आहे ना, अशी तिनं स्वतःची समजून घातली. नवीन करारानुसार प्राप्तीही भरपूर होणार होती. मधल्या काळात डिसेंबरमध्ये दहा दिवसांची विश्रांती होती. प्रताप त्यावेळी पुण्यात येऊन गेला. कुटुंबासमवेत कुलु-मनालीची ट्रीप एंजॉय करून गेला.

नंदिनीचे सासू-सासरे चांगले होते. मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडणं, परत घेऊन येणं ही जबाबदारी सासऱ्यांनी स्वतःहून स्वीकारली होती. सासुबाईंना थोडा अस्थम्याचा त्रास होता. पण तरीदेखील जमेल तेवढी त्या घरकामात मदत करत होत्या. पण नंदिनीला नवऱ्याचा आणि मुलांना वडिलांचा सहवास मात्र मिळत नव्हता. ही भूक फक्त प्रतापच्या फोन आणि व्हिडिओ काॅलवरच भागवावी लागत होती. कामाचा ताण वाढलाय त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कामात बिझी असतो, म्हणून त्याचे दर आठवड्याला येणारे काॅलही आता नियमित येत नव्हते.

 मुलं आता मोठी होत होती. सकाळी शाळा, दुपारी आराम, मग पोहणं, कराटेचे क्लास यांत ती गुंतलेली असायची. नंदिनीला मोकळा वेळ खायला उठे. आपणही काही तरी छोटी-मोठी नोकरी करावी असा विचार तिच्या मनात आला. सासू-सासऱ्यांनाही तिची अवस्था कळत होती. तिचं मन रमेल म्हणून त्यांनी तिला नोकरी करायची परवानगी दिली.

पुण्यातल्याच एका हाॅस्पिटलची रिसेप्शनिस्ट पाहिजे अशी जाहिरात नंदिनीच्या पाहण्यात आली. प्रयत्न तर करून बघू म्हणून नंदिनी तिथे भेटायला गेली. डाॅ. जयंत साने या स्त्री-रोग तज्ज्ञांचं ते हाॅस्पिटल तसं जुनं होतं. त्यांची आधीची रिसेप्शनिस्ट घरगुती अडचणीमुळे एक महिन्यानंतर नोकरी सोडून जाणार होती.

नंदिनीचं सौम्य सोज्वळ व्यक्तिमत्त्व, गोड बोलणं, शैक्षणिक योग्यता यामुळे आलेल्या ५-६ जणींमधून तिची निवड सहज झाली. घरापासून हाॅस्पिटल जरा लांब असलं तरी स्कूटी घेऊन जाणं नंदिनीला जमण्यासारखं होतं. दहा ते एक आणि ५ ते ७. ३० ही कामाची वेळही सोयिस्कर होती. संध्याकाळी घरी येऊन मुलांना वेळ देणं, स्वैपाक करणं साधता येणार होतं. मधल्या वेळात घरी येऊन संध्याकाळची थोडी तयारी करून ठेवणं शक्य होतं. शिवाय सासू-सासऱ्यांचा आधार होताच घरी.

अशा रीतीने पुढच्या महिन्यापासून तिची नोकरी सुरू झाली. कामातील तिचा चटपटीतपणा आणि सर्व रेकाॅर्ड व्यवस्थित ठेवण्याची पद्धत यामुळे डॉ. साने तिच्यावर खूष होते. शिवाय आलेल्या पेशंटशी तिचं वागणंही आस्थेवाईक होतं, त्यामुळे तिथे येणाऱ्या स्त्रियाही तिच्यावर खूष असायच्या.

सध्या तरी प्रतापला या नोकरीबद्दल न सांगण्याचं तिनं ठरवलं होतं. समजा आपल्याला नाही जमलं तर सोडून देऊ, असाही विचार तिनं केला होता. प्रतापचे काॅलही हल्ली कमीच झाले होते आणि फोनवरदेखील तो घाईतच असायचा. मोघम चौकशी करून फोन ठेवून द्यायचा. पूर्वीसारखा मुलांशीही फारसं बोलत नसे हल्ली तो. घरापासून तो लांब एकटा आहे, कामाचाही ताण आहे, असा विचार करून नंदिनी त्याला समजून घ्यायची. या दोन वर्षांत तर तो भारतात आलाही नव्हता, कामाचा वाढलेला ताण हे कारण देऊन. पण नचिकेत आणि नेहाच्या वाढदिवसाला फोन करायला तो विसरला, ह्याचं मात्र नंदिनीला खूप वाईट वाटलं. तिनंच बाजारातून अमेरिकन चाॅकलेट आणि काही गिफ्ट विकत घेतलं आणि बाबांनी पाठवलं, म्हणून मुलांची समजूत घातली.

तिसरं वर्षही असंच संपत आलं. दिवसेंदिवस त्याचा संपर्क तुटतच चालला होता. जेव्हा त्याने आपण पुढच्या तीन वर्षांसाठी तिथल्याच दुसर्‍या कंपनीत नोकरी स्वीकारणार असल्याचं सांगितलं, तेव्हा मात्र नंदिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण भारतात आता आपल्याला एवढ्या पगाराची नोकरी मिळणं शक्य नाही आणि आपल्या गुणवत्तेला इथे कशा संधी उपलब्ध होत आहेत, हे त्यानं आळवून तिच्या गळी उतरवलं. नंदिनीच्या मनाचं समाधान झालं नाही, पण ते मान्य करण्यावाचून तिच्याकडे उपाय तरी काय होता? मुलांनाही बाबांबद्दल काय सांगायचं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं तिला अवघड जात होतं. प्रतापच्या आई-वडिलांनीही त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बधला नाही. त्या दोघांच्याही वाढत्या वयानुसार तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या.

त्यानंतर बरेच दिवस त्याचा फोनही आला नाही. नंदिनीने प्रयत्न केला पण २-३ वेळा त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या काळजीने ती रोज फोन करायला लागली.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

आश्विन कार्तिक महिन्यात हलकीशी थंडी पडू लागते. पहाडांवर बर्फ पडू लागतो, त्याचा परिणाम सार्‍या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात होतो. या दिवसात मैदानी प्रदेशात हलकासा पाऊस होताच थंडी पडू लागते. याच दिवसात, दसरा, नवरात्र, धनत्रयोदशी, दिवाळी साजरी केली जाते. रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. दुर्गादेवीची सुंदर मूर्ती मंडपात सजवलेली असते. नवीन भांडी, कंदील, दिवे आणि फटाके यांचा हा मौसम असतो.

… त्यावेळी मी सोळा वर्षाचा होतो आणि बाबा एकोणपन्नास वर्षाचे होते. ते आजारी होते, त्यांना दुसर्‍यांदा हार्ट अ‍ॅटॅक आला होता. काही दिवस हॉस्पिटलमधे राहून ते घरी परतले होते. थोड्याच दिवसात ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले. कुल्ला दुखावला होता. डॉक्टर येऊन बघून गेले होते. औषधे वाढली होती. मी शेकायच्या रबरी पिशवीत गरम पाणी घालून त्यांच्या दुखर्‍या जागी शेकायचो, तेव्हा ते वेदनेने विव्हळत. जशा लाटा किनार्‍याशी येऊन कमजोर होतात, तसे बाबा अशक्त आणि कमजोर झाले होते. त्यांची मान आणि हात यावरच्या नसा फुगलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यांचे हात थरथर कापायचे आणि अनेकदा त्यांना स्मृतिभ्रंश व्हायचा. त्यांना वाटायचं, आम्ही त्यांची मुले नसून, ते ज्या विश्वविद्यालयात शिकवत असत, तिथले विद्यार्थी आहोत.

आणि मी.. आपल्या जीवनात त्यांची जागा रिक्त रहाण्याच्या कल्पनेनेही घाबरतो. मला वाटतं, त्यांनी सदोदित माझ्या सोबत राहावं. त्यांचा मला आधार वाटायचा. आमच्यातील स्नेहबंध आम्हाला एक-दुसर्‍याकडे आकर्षित करायचे. स्नेहात चुंबकीय आकर्षण असतं. त्यांच्या नसण्याच्या कल्पनेनेही मला कापरं भरायचं. एका भयानक पोकळीचा दैत्य मला खायला उठायचा. वाहणार्‍या नदीत एक स्थिर असा द्वीप होते माझे बाबा आणि तो द्वीप म्हणजेच माझी दुनिया होती.

त्या दिवशी बाबांनी मला बोलावलं. त्यांच्या स्मृतीच्या कुलुपावर लागलेला गंज निघून गेला होता. त्यांच्या डोळ्यात ओळखीचा सूर्य झगमगत होता. बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि खिडकीतून पावसाचे थेंब आत येत होते. बाबा अगदी मंद आवाजात कवी ‘निराला’चे गीत गुणगुणत होते,

अरे वर्ष के हर्ष, बरस तू बरसबरस रसधार,

पार ले चल तू मुझको… ‘

… आम्ही दोघे खूप मागे मागे भूतकाळात गेलो. मी तेव्हा खूप लहान होतो. पाऊसकाळात ते मला कडेवर घेऊन मुक्त स्वरात हे गीत गायचे.

… नंतर त्यांनी ‘श्री रामचंद्र कृपालु भज मन.. हरण भव भय दारुणं ‘ ही रामस्तुती ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. ही त्यांची अतिशय आवडती प्रार्थना होती. मी त्यांच्या उशाशी बसून ती म्हणू लागलो. त्यांच्या चेहर्‍यावर एक असीम शांती पसरली.

अचानक काय झालं, कुणास ठाऊक? एक वेदनेची गाठ त्यांना शूळाप्रमाणे टोचली. त्यांच्या गळ्यातून एक वेगळाच असा कण्हण्याचा आवाज आला. तो एक असा हृदयद्रावक आवाज होता, की क्षणभर हवा स्तब्ध झाली. बाहेर वाहणाऱ्या नदीचं पाणी थांबलं. देवघरातला दिवा विझल्या विझल्यासारखा झाला. मी घाबरलो. स्फुंदत स्फुंदत रडू लागलो. ‘बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. ’ असह्य वेदना होत असतानाही त्यातच ते हसून म्हणाले, ‘अरे वेड्या, मी कुठे जातोय? जा. समोरच्या भिंतीच्या कोनाड्यातून माझी लेखणी घेऊन ये. ’

लेखणी आपल्या हातात घेऊन ते तिच्याकडे प्रेमाने बघू लागले. मग त्यांनी ती लेखणी माझ्या हातात दिली आणी प्रेमाने माझे गाल कुरवाळत म्हणाले,

‘अरे वेड्या, रडतोस कशाला? जेव्हा मी नसेन, तेव्हाही मी तुझ्या लेखणीतून कथा-कविता बनून असेनच. जसे माझ्यात राहिलेले माझे वडील, आणि आपल्या मुलांच्यात तू रहाशील. तसाच मी गेल्यानंतरसुद्धा तुझ्यात राहीनच. ’ बोलता बोलता त्यांना दम लागला.

त्या रात्री मी सतत त्यांच्या छत्रछायेखाली राहिलो. त्यांचे पाय चेपत, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. ते गप्प बसले होते, पण त्यांचे डोळे जणू बोलत होते, ‘ बेटा, वेळच्या वेळी स्नान कर. वेळच्या वेळी जेवत जा. वेळच्या वेळी झोपत जा आणि खूप, निष्ठापूर्वक, दृढ होऊन अभ्यास कर. ’ 

रात्रीत थंडी वाढली. उंच पहाडांवर बहुधा हिमवृष्टी झाली. बाबांना पांघरूण घालून मी शेजारच्या खोलीत झोपायला गेलो. झोपेत मला अनेक भीतीदायक स्वप्ने पडली.

दुसर्‍या दिवशी पहाटेच घरातल्या लोकांच्या रडण्याचा आवाज आला. मी गडबडून उठलो. सगळे आक्रोश करत होते. बाबा रात्रीच गेले होते. जे हात मला आशीर्वाद देत होते, जे ओठ माझ्या माथ्याचं चुंबन घेत होते, ते थंड पडले होते. निष्प्राण झाले होते. बाबा गेले होते.

… पुढे त्यांनी दिलेल्या लेखणीने पुष्कळ कविता लिहिल्या. कथा लिहिल्या. ती काही केवळ लेखणी नव्हती. विद्यादान होतं. संस्कार होते. पूर्वापार चालत आलेला वारसा होता. संपत्ती होती. एका पित्याने दिलेले प्रोत्साहन होते. एका पित्याने दाखवलेला सन्मार्ग होता. मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवलेली मशाल होती ती. लेखणी स्वत: आपल्या जागी काहीच नसते. ज्या हातांनी ती आपल्या बोटात दिलेली असते, ती त्या हातांची निशाणी असते. त्यात त्यांच्या आठवणी वसतात.

… आता जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, तेव्हा ही लेखणी मी त्याच्याकडे सोपवीन.

मूळ हिन्दी कथा – ‘कलम 

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाडस – – भाग – २ ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

🌸 जीवनरंग 🌸

☆ धाडस – – भाग – २ ☆ श्री विश्वास दाते ☆

(स्वत:ची मन:शांति ढळू नये म्हणून, मी सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सुलेखाला सांगायचे ठरविले. विचारांचे मोहोळ चालू असताना गाडी चालवत घरी कसा पोहोचलो ते सांगणे अवघड आहे.) इथून पुढे – –

संध्याकाळचे जेवण होऊन आवरा आवर होईपर्यंत मी मनातल्या मनात काय आणि कसे बोलायचे याची पुन्हा पुन्हा उजळणी केली. अखेरीस सारे धाडस एकवटून, सुलेखाला जवळ बसायची विनंती केली.

माझा चेहरा पाहून ती म्हणाली, “ काय रे, तुझा चेहेरा एवढा गंभीर का? कसला तरी चिंतादायक विचार करत असल्यासारखा दिसतोस. ” आपल्या बायकोपासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही याचा मला पुन्हा एकदा प्रत्यय आला.

खाली मान घालून मी म्हणालो, “सुलू, मी तुला आता जे सांगणार आहे ते प्रथम पूर्णपणे ऐकून घ्यावेस असे मला वाटते. त्यानंतर तू जे म्हणशील आणि करशील ते मला पूर्ण मान्य असेल. ”

सुलेखा “रवी, आता माझी उत्कंठा फार ताणू नकोस. सांग काय जे झाले असेल ते. आणि अपराध्यासारखा खाली बघून बोलू नकोस. माझ्याकडे बघ. ”

पुन्हा एकदा धीर एकवटून मी बोलायचा प्रयत्न केला पण शब्द घशात अडकले. वर बघायचे धाडस काही झाले नाही पण पाण्याचे दोन घोट घेऊन, मी म्हणालो, “सुलू, माझ्या हातून एक घोर अपराध घडला आहे. तुला तो कसा सांगू आणि क्षमा तरी कशी मागू हे मला सुचत नाही आहे. ”

“रवी, मी तुला पूर्ण ओळखते. तुझ्या हातून काही भयंकर होईल असे मला तरी वाटत नाही. खुशाल स्पष्टपणे काय ते सांग.”

मला थोडा धीर आला. “सुलू, माझ्या कंपनीत कामाच्या जागी अंजली नावाची एक तरुण मॅनेजर आहे. मला काय झाले होते हे मला आता कळत नाही आहे पण तिच्या तरुण व्यक्तिमत्वामुळे आणि कामाच्या धडाक्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित होत गेलो. काही वेळा तिच्याबरोबर संध्याकाळी विरंगुळा म्हणून हॉटेलामध्येसुद्धा गेलो. पण तिला जास्त जवळकीने स्पर्श करण्याचे धाडस कधीही झाले नाही. फार तर कधी हातात हात घेतला असेल तेवढेच. माझ्या मनावर तिचे काय गारूड झाले होते ते कळत नाही आहे पण मी तिला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या एक दोन चिठ्ठ्या पण पाठविल्या.”

सुलेखा स्तंभित होऊन ऐकत होती. ती काही बोलायच्या आधी, मे म्हणालो, “सुलू, आता मी सुरू केले आहे ते मला संपूर्णपणे सांगू दे. मग तू जे काय बोलशील अथवा करशील ते सहन करण्यास मी पूर्णपणे तयार आहे.”

सुलेखाने मानेनेच संमती दिल्यावर, मी झालेल्या सर्व घटना इत्थंभूत विदित केल्या. तसेच मी आता कोणत्या कठीण परिस्थितीत अडकलो आहे याची पण कल्पना दिली. तसेच माझ्यावर आणि आमच्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतील हे पण मी तिला समजावून सांगीतले.

“सुलू, मला तर आता काही सुचत नाही आहे. मी तुझा पूर्ण अपराधी आहे. अंजली तिच्या स्वार्थासाठी मला झुलवत होती हे स्पष्ट आहे. मी जर अंजलीच्या धमक्यांना शरण गेलो तर जन्मभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुझ्या पण डोळ्यात बघू शकणार नाही. शांतपणे झोपूही शकणार नाही.” 

सुरुवातीला साहजिकच सुलेखा माझ्यावर चांगलीच भडकली. अखेरीस तटकन उठून झोपायच्या खोलीकडे जात म्हणाली, “रवी, खरोखरच तू माझा अपराधी आहेस. आत्ता तर मला तुझे तोंड पण बघावेसे वाटत नाही.”

त्यानंतर मी हॉलमधील कोचावर अख्खी रात्र तळमळत काढली कारण झोपायच्या खोलीत जायचे धाडस झाले नाही. घरी आणि कंपनीत यापुढे मला फक्त अंधार दिसत होता.

सकाळी, बऱ्याच वेळाने सुलेखाचा अबोला संपला आणि म्हणाली, “रवी, मलाही रात्रभर झोप नाही लागली. मन सैरभैर झाले होते. पण शेवटी लक्षात आले की मी तुझा स्वभाव पूर्ण ओळखते. तुझ्या हातून जे घडले आहे ते तुझ्यासारख्या सध्याच्या वयात आणि तुझ्या कामाच्या परिस्थितीत अनेक पुरुषांच्या बाबतीत घडत असावे. मोहजाल म्हणतात ते हेच असावे. तू माझ्यापासून काहीही लपविले नाहीस याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे. तुझा माझ्यावरील विश्वास पण स्पष्ट झाला. तुझ्या द्विधा मन:स्थितीची मला पूर्ण कल्पना आली. आता आपण दोघे मिळून जे होईल त्याला तोंड देऊ. काय वाटेल ते होऊ दे, पण अंजलीच्या धमक्यांना यापुढे भीक घालू नकोस. ” 

एकमेकावरील प्रेमाचा आणि विश्वासाचा विजय झाला होता. प्रथमच माझ्या मनावरील दडपण बऱ्याच प्रमाणात उतरले.

त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून अंजलीशी काय बोलायचे हे ठरविले आणि सोमवारी स्थिर मनाने परत कामावर निघालो.

मी अंजलीला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तिच्या चेहेऱ्यावर विजयी भाव असल्याचे जाणवले. तिला बसायला सांगून मी ठामपणे बोललो, “हे बघ अंजली मी तुझी मागणी कदापि मान्य करू शकत नाही. झालेल्या घटनांबद्दल मी माझ्या बायकोला सर्व माहिती दिली आहे. आणि माझ्या बायकोचा माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्याने ती मला विनाअट संपूर्ण सहकार्य करणार आहे. ”

अंजली काही काळ दिङ् मूढ होऊन माझ्याकडे बघत राहिली. तिला माझ्या या उत्तराची जराही अपेक्षा नसावी. मग जरा सावरून तिच्या नवीन अवतारात छद्मीपणे म्हणाली, “मला बायकोबद्दल काय सांगताय, तिला तुम्ही पटवले असेल. पण, कंपनीच्या व्यवस्थापनाचे काय? मी आता त्यांच्याकडे तुमच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करायला जाते. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही मला पाठवलेल्या चिठ्ठ्या आणि इमेल्स माझ्याकडे आहेत. मला बढती पाहिजे म्हणजे पाहिजे. मी पुढचे पाऊल उचलण्याआधी, तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करा. ”

अंजली माझ्या उत्तराची वाट बघत, नजरेला नजर देत, उद्दामपणे उभी राहिली.

या अशा धमकीच्या शक्यतेची कल्पना मला आधीच होती आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया पण माझ्याकडे तयार होती. त्या शांततेचा फायदा घेऊन, मी समजावणीच्या स्वरात पुढे म्हणालो, “अंजली, बैस खाली. आणि मी तुला आता जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे. ”

कुतूहल पोटी का होईना, अंजली परत खाली बसली.

मी, “अंजली, तुझ्या तरुण मनाला माझ्या हातून प्रोत्साहन दिले गेले ही माझी घोडचूक होती. झालेल्या घटनांचा मला पूर्ण पश्चाताप होत आहे. तू पुढे काय करणार या बाबतीत मी तुला थांबवू शकत नाही पण सल्ला नक्कीच देऊ इच्छितो. माझ्या मते, माझी इतक्या वर्षांनी निर्माण झालेली कंपनीतील प्रतिमा बऱ्यापैकी उजळ आहे. तुझ्याबद्दल तुझे सहकारी तुझ्यामागे काय बोलतात याची कदाचित तुलाही कल्पना असेल. तुझ्यावर भविष्यात कोणताही दुष्परिणाम व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. एक अनुभवी सहकारी म्हणून मी तुला सांगतो की तुझ्या हातून मला जरी काही त्रास झाला तरी तुझी सध्याची वागणूक तुझ्याच पुढील आयुष्यात तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही. ”

अंजली तिच्या धमकीवरील ह्या अनपेक्षित प्रतिक्रियेने, नि:शब्द झाली.

“मी तुला स्पष्ट सांगतो की हा विषय येथेच संपवण्याची माझी तयारी असून आपण पूर्वीप्रमाणे फक्त चांगले सहकारी म्हणून काम करू या. आणि हेही स्पष्ट करतो की त्यातूनही तू तुझी धमकी पुढे नेलीस तर मी येणार्‍या परिस्थितीस तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे. एक नक्की की सध्या तरी मी तुला हे प्रमोशन देऊ शकत नाही. या उलट कंपनीतील आणि बाहेरही तुझी प्रतिमा कायमची खराब व्हायची शक्यता आहे. माझा हा निर्णय माझ्या स्वत्व आणि मनःशांतीसाठी महत्वाचा आहे. कदाचित काही वर्षांनी तुला माझा हा निर्णय कसा योग्य आहे हे पटेलही. आत्ता तरी तुला सद्‍बुद्धी सुचेल अशी अपेक्षा आहे. आत्ता तू जाऊ शकतेस. ”

एखादी गोष्ट किती ताणायची याची समज हुशार अंजलीला असावी कारण दोघांच्याही सुदैवाने अंजलीने आपले पाऊल मागे घेतले. हे पेल्यातील वादळ तेव्हाच शमले आणि काही महिन्यांनी अंजली राजीनामा देऊन कुठे तरी दुसरीकडे नोकरीसाठी गेली. त्यानंतर आपले उत्तम काम तसेच चालू ठेवून, अतिशय समाधानी आणि यशस्वी आयुष्य व्यतीत करत, मी योग्य वेळी निवृत्त झालो.

– समाप्त – 

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

🌸 जीवनरंग 🌸

☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

शुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले होते. मी मात्र ऑफिस मधेच बसून होतो. बाहेर आमचा शिपाई मनोहर मी निघण्याची वाट पहात होता. संध्याकाळ जास्तच काळोखी वाटत होती. ऑफिसमधील एसी जराही जाणवत नव्हता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहळ माझ्या मनात उठले होते. छाती भरून आल्याने श्वास जड झाला होता. मी गळ्याभोवती असलेली टायची गाठ सैल केली पण जराही आराम वाटला नाही. एका मोठ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर मी उभा होतो.

एका मोठ्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाचा मी प्रमुख होतो आणि कित्येक मॅनेजर्सची टीम माझ्याबरोबर काम करत होती. ह्या असिस्टन्ट [कनिष्ठ] मॅनेजर्सच्या बरोबर मदतीसाठी अनेक तरूण शिकाऊ मॅनेजर्स पण होते.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजली ह्या कंपनीत शिकाऊ मॅनेजर म्हणून लागली. ती स्वभावाने आक्रमक आणि महत्वाकांक्षी तर होतीच, आणि एका उत्तम संस्थेतून MBA पण झालेली होती. तसेच ती मनमोकळी आणि वागायला मोकळीढाकळी होती. तिच्या ह्या स्वभावामुळे आणि तसेच तिच्यामधील काम तडीस लावण्याच्या क्षमतेमुळे आणि बऱ्यापैकी असलेल्या नैसर्गिक तरुण सौंदर्यामुळे, सुरुवाती पासूनच नकळत माझे लक्ष तिने आकर्षून घेतले होते.

काही काळानंतर तर अधूनमधून, तिच्या थेट अधिकार्‍याला बाजूला ठेवून, मी तिच्याशी थेट संपर्क कधी करू लागलो हे माझे मलाच कळले नाही. आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ही भावना माझ्या प्रशिक्षित मनाला कुरतडू लागली होती. असे असूनही स्वत:च्या तारुण्याच्या प्रभावाखाली माझ्याकडून तिला पाठवलेल्या कौतुकाच्या चिठ्ठ्या हळूहळू जरा जवळि‍केच्या होत गेल्या होत्या.

माझ्या मनावर अविचाराने केंव्हा कब्जा केला हे माझे मलाच समजले नाही. एका संध्याकाळी मी जरा धाडस करून अंजलीला विचारले, “आज जरा निवांतपणे बाहेर जेवायला जायचे का? ”

जरा लाडिक आढेवेढे घेऊन अंजली म्हणाली, “सर, तुमची एवढी इच्छा आहे तर जाऊया. पण फार उशीर करायला नको हं. ”

माझ्या मनाला झालेल्या गुदगुल्या मलाच ठाऊक. आणि मग, काम संपल्यावर एकत्र बाहेर जेवण घेणेही खूप वेळा होऊ लागले. मधून मधून पुसटसा स्पर्श करणे सुरू झाले व बाहेर गेल्यावर माझी प्रगती हातात हात घेण्यापर्यंत कधी झाली हे मलाच समजले नाही. फारसा विरोध न करता, अंजली पण लटका राग दाखवत असे. काही दिवसांनी, अंजली जरी ऑफिसमध्ये मला ‘सर’ असे संबोधित असे, तरी बाहेर भेटल्यावर सुरुवातीला ‘रवी सर’ आणि नंतर फक्त ‘रवी’ असे संबोधू लागली होती. तरुण अंजलीकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे माझ्या मध्यमवयीन मनातला पुरुष कुठे तरी आतल्या आत सुखावत होता.

माझ्याकडून मिळणाऱ्या ह्या अनुकूल वागणुकीमुळे, अंजलीने त्याचा फायदा घेऊन दुसर्‍याने केलेल्या कामाचे क्रेडिट घेणे आणि स्वत:च्या चुका सहकाऱ्यांवर ढकलणे सुरू केले. माझ्याकडूनही संशयाचा फायदा नेहमीच अंजलीला दिला जात होता. कधी काळी तिच्या चुकांवर मी थोडा रागावलो तरी तो वरवरचा राग आहे हे समजण्या इतकी अंजली नक्कीच चाणाक्ष होती.

कंपनीमध्ये हळूहळू अफवांचे पीक सुरू झाले. मांजरीला डोळे मिटून दूध पितांना कोणी बघत नाही असे जरी वाटत असते तरी खरे नसते. माझ्या आणि अंजलीच्या समोर खुलेपणाने जरी कोणी बोलत नसले तरी दबकून चर्चा आणि अर्थपूर्ण कटाक्ष टाकले जाऊ लागले. माझ्या डोक्यात शिरलेल्या अनामिक भूतामुळे मी आणि चाणाक्ष अंजली दोघेही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलो.

लवकरच कंपनीमध्ये, एका राजीनाम्यामुळे एक ब्रँड मॅनेजरची जागा रिकामी झाली. माझ्या मनात सुयश देशमुख या एका अतिशय कर्तुत्ववान कनिष्ठ मॅनेजरला त्या जागेवर नेमायचे होते कारण त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता तसेच त्याला खरोखरच बढती मिळणे आवश्यक होते. परंतु अतिमहत्वाकांक्षी अंजलीने त्या जागेवर तिला बढती मिळावी असा हट्ट माझ्याकडे सुरू केला.

लाडीकपणे अंजली, “रवी सर, मला वाटते की या ब्रँड मॅनेजरच्या जॉबसाठी मी अगदी योग्य आहे. तुम्ही माझी या जॉबसाठी निवड कराल अशी मला खात्री वाटते. कराल ना प्लीज. ”

“अंजली, या जॉबसाठी खूप जास्त अनुभव लागतो. तू आत्ताच तर आपल्या कंपनीत काम सुरू केले आहेस. अजून अनुभव गोळा कर. तू हुशार आहेस. कर्तुत्ववान आहेस. योग्य वेळी तुलाही बढतीची संधी मिळेल. सब्रका फल मीठा होता है. ”

अंजलीची मागणी लाडीक हावभावात चालूच राहीली. सुरुवातीला मी हा विषय टाळायचा प्रयत्न केला, कारण संपूर्ण विभागातील लोकांचे लक्ष माझ्या निर्णयाकडे लागले होते.

“सर, मी किती दिवस वाट पहायची? ही बढती मलाच द्या. ”

“अग वेडे, तुझा अनुभव अजून कमी आहे. शिवाय सुजय देशमुख खूप जास्त अनुभवी आहे आणि ह्या मोकळ्या झालेल्या जागेवरील लागणार्‍या कामाचा पण जाणकार आहे. मला वाटते की तू थोडा धीर धरून चांगले काम करत रहावे. तुला पण योग्य वेळी बढती मिळेल. तुलाही माहित असेल की ‘योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड करणे’ ही माझी जबाबदारी आहे. ” 

आज तर फारच शर्थ झाली. अत्यंत खुनशी चेहेऱ्याने अंजलीने तिचे खायचे दात दाखवत, तिची मागणी पुनः लावून धरली.

“ सर, आता फार झाले. मी तुम्हाला स्पष्ट सांगते की बढती मला दिली नाही तर मी तुमच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करायला पुढे मागे पाहणार नाही. तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही मला पाठवलेल्या चिठ्ठ्या आणि इमेल्स माझ्याकडे मी जपून ठेवली आहेत. नाइलाजाने मला ही माहिती तुमच्या बायकोकडे पाठवावी लागेल. आता तुम्हीच काय ते ठरवा. ” 

माझ्या उत्तराची वाट न बघता, माझ्याकडे तुच्छ नजरेने बघत अंजली माझ्या केबिनमधून ताडताड बाहेर पडली. अंजलीचे हे रूप मला पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित होते. तिच्या धमकीचा पुनः विचार केल्यावर मला तर आभाळ कोसळल्या सारखेच झाले. एका बाजूला कंपनी मधील चौकशी आणि त्यातून होणार्‍या बदनामीची भीती आणि दुसर्‍या बाजूला सुखाने चाललेले वैवाहिक जीवन संपूर्ण उध्वस्त होण्याची शक्यता.

विचार करून करून मन उद्विग्न झाले आणि डोके भणभणू लागले. मात्र मी जेवढा जास्त विचार करत गेलो तेवढे माझ्या लक्षात आले की जर मूल्यांशी तडजोड करून ह्या दडपणाला बळी पडलो तर यापुढे सहकाऱ्यांच्या डोळ्याला डोळा देऊन पाहू शकणार नाही आणि मनाची टोच मला जन्म भर खात राहील. शांत चित्ताने झोपूही शकणार नाही.

मला ह्याची पण पूर्ण कल्पना होती की एकदा चटक लागली की ब्लॅकमेल करणारी व्यक्ती कधीही थांबत नाही, त्या व्यक्तीच्या मागण्या वाढतच जातात. आपणच केलेल्या घोडचुकीवर नुसता पश्चात्ताप करून काही उपयोग होणार नव्हता.

कंपनीकडून दयेची अपेक्षा करणे चूक ठरले असते कारण कुठल्याही कंपनीमध्ये मत्सरी व्यक्ती असतातच. लैंगिक अत्याचार सिद्ध झाला तर त्याबाबतची कंपनीची धोरणे अगदी स्पष्ट होती. नोकरी संपल्यावर मिळणारे कुठलेही फायदे न मिळता नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले असते. याशिवाय सामाजिक नाचक्की झाली असती ते वेगळीच.

ह्याशिवाय माझे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखाचे होते. माझी पत्नी सुलेखावर माझे नितांत प्रेम होते आणि विश्वास पण होता. अखेरीस एक ठाम निर्णय घेऊन मी घरी जायला निघालो. स्वत:ची मन:शांति ढळू नये म्हणून, मी सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सुलेखाला सांगायचे ठरविले. विचारांचे मोहोळ चालू असताना गाडी चालवत घरी कसा पोहोचलो ते सांगणे अवघड आहे.

– क्रमशः भाग पहिला 

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात आली. ‘‘काकू – काकू ऐका ना ’’… मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती.

‘‘कशी आहे माझी साडी? ’’…

‘‘मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर’’… मी मनापासून म्हणाले.

– पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला…

‘‘मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणि ना आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती’’….

तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा… जेमतेम २०-२१ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. स्वच्छ आणि नीटनेटकी राहायची. चेहरा शांत. पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं… आज नेहमीपेक्षा पटापट काम संपवून ती निघूनही गेली…

— — आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, तिच्यामुळे काल दिवसभर एक वेगळाच आनंद दरवळला होता… नकळत आज मी पुन्हा त्याच आनंदाची वाट पहात होते… ‘अजून का नाही आली ही? ’…. मी अस्वस्थ व्हायला लागले होते….

इतक्यात बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती… पण ही अशी? … लालबुंद डोळे…विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा… खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली, आणि ‘आई’… म्हणत एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई’? … माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसंतरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर मायेने हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितला… काल तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली ती साडी नवऱ्याने तिच्यासाठी आणलेलीच नव्हती, तर त्याच्या ‘मानलेल्या’ बायकोसाठी आणली होती म्हणे. अशा बाईला ‘मानलेली बायको‘ नाही, तर ‘ठेवलेली बाई‘ म्हणतात हेही त्या बिचारीला माहिती नव्हते.. तर त्याचा अर्थ कुठला माहिती असणार?

… आणि ती साडी हिने नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं.

… नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं… म्हणून मग कामाला आली होती… माझ्यात तिच्या आईला शोधत होती…

जन्म देऊन तिची जन्मदात्री आई लगेचच देवाघरी गेली होती. आणि बापाने लगेचच दुसरं लग्न केलं होतं.. मनात हिच्याबद्दल प्रेम- जिव्हाळा फुलण्याआधीच. तेव्हापासून त्या सावत्र आईचा जाच आणि दुस्वास सहन करतच मोठी झालेली ती… तिची ब्याद टाळण्यासाठी त्या बाईने १५-१६ व्या वर्षीच तिशीतल्या एका बिजवराशी हिचं लग्न लावून टाकलं होतं – – तो माणूस ‘हुंडा’ नको म्हणाला एवढ्याच एका कारणाने.. इतर कुठलीच चौकशी न करता… हिच्या पसंती-नापसंतीचा कणभरही विचार न करता. आणि आता इतर कुठलाच आधार नसलेली ती.. त्याला सोडून जावं असं कितीही तीव्रपणे वाटलं तरी कुठे जाणार होती?? लग्न झाल्यापासून तिच्या वडलांनी तर तिच्याशी जणू संबंधच तोडून टाकले होते.. फार फार हतबल होऊन गेली होती ती…

… आणि मी? … मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं… मला खूप खूप मनापासून वाटत होतं की तिला म्हणावं – “ बाई या असल्या नवऱ्याला दे सोडून आणि आमच्याकडेच रहा कायमची “ म्हणून – – 

— पण त्या “ कायम “ शब्दाला आता काही अर्थ तरी उरला होता का? .. सहस्त्रचंद्र बघूनही २ वर्षं उलटून गेलेले माझे मिस्टर.. आणि त्यांच्या मागोमाग त्याच वाटेने चाललेली मी.. आम्ही किती दिवस पुरणार होतो तिला… तिचे ‘आई-बाप’ म्हणून? म्हणजे थोडे दिवस ‘आगीतून फुफाट्यात’ एवढाच काय तो फरक पडला असता.. आणि आमच्यानंतर पुनः तिची तीच फरपट.. हेच चित्र स्पष्ट दिसत होतं मला..

जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी? मला तिच्याबद्दल अगदी अंतःकरणापासून कितीही कणव.. कितीही काळजी वाटत असली तरी मी प्रत्यक्षात किती दिवस आणि काय करू शकणार होते तिच्यासाठी? शहाजोगपणाने मला ‘आई’ म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का? … प्रत्यक्षात जन्मदात्या आईसारखी मनापासून तिची आई होणं जमणार तरी होतं का मला – झेपणार होतं का मला खरंच?

… आता मलाच खूप अगतिक झाल्यासारखं वाटतं होतं… कदाचित रेखापेक्षाही जास्तच.. फार फार हतबल झाल्यासारखं वाटतं होतं मला… खऱ्या अर्थाने पूर्णपणे हतबल होते मी – – –

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares