हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं . तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी आठवत राहायची…
….. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली.
तो दिवस आठवला.
चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होत. तिने विचारलं
” काय करताय?”
” महत्त्वाच काम करतोय..मृत्युपत्र लिहितोय..विचार करून ते लिहायच असत..”
” काय मृत्युपत्र..आत्ता …कशासाठी?”
” आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको”
” म्हणजे वाटणी का “
यावर तो जरा रागवलाच..
“नुसती वाटणी नसते ती… बरं ते जाऊदे.. उगीच काहीतरी विचारत बसु नको..तुला काय त्यातल समजणार ?एक वाजायला आलाय जेवायला वाढ “
ती गप्प बसली .खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं. नेहमीचच होतं ते .. त्याचं बोलणं तिने मनावर घेतलं नाही. मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलच…
का कोण जाणे… पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होत..
आज लेक भेटायला आली .तेव्हा तिने विषय काढला .म्हणाली..
“मला पण मृत्युपत्र करायच आहे .”
“तुला ?…मृत्युपत्र ?…कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात ?” मुलीनी हसतच विचारलं..
तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती .पुढे म्हणाली ..
“अगं एक महत्वाचं विचारायचं होतं मृत्यूपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं लागतं का ?ते बदलता येत नाही ना ?” … आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं…आई गंभीरपणे काही सांगते आहे..ती म्हणाली….
” हो नाही बदलता येत .पण आई असं का विचारते आहेस?”
” मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद.. पेन .. घे लिहून …”
“कशाची वाटणी करणार आहेस ?काय आहे तुझ्याजवळ?”
लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं … ती तंद्रीतच बोलत होती ….
“भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं..
राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं .त्याला ओवाळायचं .तबकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील …भावाला घरी बोलवायचं … गौरीला माहेरची सवाष्ण हवी ..नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची.. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं ..त्याला मदत करायची.. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं. तिच्यावर माया करायची.. आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेनी आपुलकीनी राहायचं … आत्या ,काकु,मामा ,मामी सगळी नाती जपायची .. एकोप्याने रहायच.. पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं …..”
एवढं बोलल्याने ती दमली. मग श्वास घेतला. थोडा वेळ थांबली.
लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती…आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…
” तु विचारलस ना…माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ?खरंच ….काही नाही ग… मला वाटणी नाहीच करायची …तर तुमची जोडणी करायची आहे .
तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”
लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली .तिने आईचा हात हातात घेतला…त्यावर थोपटले .. आश्वासन दिल्यासारखे……लाखमोलाच सदविचारांचं धन आईनी वाटल होत..
दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते पण आत आले त्यांनीही तिचा हात हातात घेतला. चौघांचे डोळे भरून वाहत होते .
☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 2 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
(अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.) इथून पुढे
अलीकडे खूपदा त्यांच्या मनात येई.. काय मिळवले आपण आयुष्यात?वडिलोपार्जित घर आहे ते सांभाळले फक्त. अदितीला पदवीधर केले. राहुलचे इंजिनिअर पर्यंत शिक्षण केले. दोघांची लग्ने केली. बस्स. नवीन प्रॉपर्टी करणे काही आपल्याला जमले नाही. ना एवढी शिल्लक राहिली की त्याच्या व्याजावर उरलेले आयुष्य जाईल. जी काय थोडी शिल्लक होती ती पण राहुलला देऊन बसलो.
आला दिवस घालवत होते. अशीच १०-१२ वर्षे गेली. वाडा आता खुपच मोडकळीस आला होता. त्यातल्या त्यात एक खोली शाबूत राहिली होती. तिथेच आता दोघे रहात. भद्रकालीत असलेले दुकान त्यांनी आता भाड्याने दिले होते. त्या पैशातून त्यांचा प्रपंच चालत होता. अदिती अधुनमधून थोडे पैसे देई. राहुलहि मीनुच्या नकळत पैसे देत होता. त्यांनाही त्यांचा संसार होता.. फ्लॅटचे हप्ते होते.. नीलचे शिक्षण होते. त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता.
अदिती जिना चढून वर आली. जिन्याच्या फळ्या आता कधीही निसटतील अशा झाल्या होत्या. कठडे हलायला लागले होते.
“येगं.. आताच आई तुझी आठवण काढत होती” राजाभाऊ म्हणाले.
“कुठाय आई ?” तिने विचारले.
“येईल. खाली गेली आहे”.
अदितीने खोलीवर नजर टाकली. एका खोलीतील संसार. जुन्या लोखंडी टेबलवर गैसची शेगडी. त्याच्या बाजूला एक मांडणी. मांडणीवर भांडी मांडुन ठेवली होती. टेबलाच्या खाली काही डबे, ताट, वाट्या वगैरे. दुसऱ्या कोपऱ्यात लोखंडी पलंग. खरकट्या भांड्यांचा ढीग. त्याच्या वासाने अदितीला असह्य झाले.
“दादा मी एक सुचवायला आले आहे” अदिती म्हणाली.
“बोल. काय म्हणतेस?”
“तुम्हाला माहितच आहे.. इंदिरा नगरला आम्ही एक फ्लॅट घेऊन ठेवलाय.”
“मग?”
“तिथे तुम्ही रहायचं”
“अगं पण जावईबापु..?”
तेवढ्यात ललिताबाई वरती आल्या. धापा टाकीत बसून राहिल्या. राजाभाऊंनी त्यांना सांगितले.. अदिती हे असं असं म्हणतीय.
“नको गं बाई जावयाच्या घरात..”
“काही जावयाचे वगैरे म्हणू नका हं. तो फ्लॅट मी माझ्या पगारातून घेतलाय. त्याचा निर्णय मीच घेणार. आणि तसंही मी यांच्या कानावर घातले आहे”.
राजाभाऊंना काय बोलावे हेच कळेना. हो म्हणावे की नाही? त्यांना सुचेनासे झाले. स्वस्थ बसून राहिले.
“आणि आता ही खोली कधी खाली येईल याचा भरवसा नाही. आई अगं तुम्ही रहाता इथे.. पण आम्हाला रात्री झोप येत नाही. रात्री बेरात्री काही झालं… भिंत पडली तर कोण आहे इथे?पावसाळा तोंडावर आलाय. मी आता तुम्हाला या पडक्या वाड्यात राहु देणार नाही”.
“अगं पण…”
अदिती सगळं ठरवुनच आली होती. दुसऱ्याच दिवशी तिने टेंपो बोलावला. राहुलच्या कानावर पण घातलं. दोघा बहिण भावांनी सर्व सामान हलवले. आणि इंदिरा नगरच्या फ्लॅट मध्ये राजाभाऊ, ललिताबाईंचे नवीन आयुष्य सुरू झाले.
बाल्कनीत उभे होते राजाभाऊ विचार करत होते. आता इथे येऊन तीन वर्षे झाली होती. त्यांना इथली सवय होउन गेली होती. मोकळी जागा, भरपूर खेळती हवा. इथले आयुष्य त्यांना मानवले होते. अधुनमधून लेक जावयी, मुले सुना येत. नातवंडे सुटीत रहायला येत. शेजारच्या बिल्डिंग मध्ये योगा हॉल होता. तिथे सकाळी तासभर दोघे जात. संध्याकाळी ऊन उतरल्यावर दोघेजण गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन बसत. येताना भाजीबिजी घेऊन येत. सर्व व्यवस्थित चालले होते. पण…
…पण अलीकडे राजाभाऊंचे मन अस्वस्थ होऊ लागले होते. वारंवार मनात विचार येत. आपण या जागेत, म्हणजे मुलीच्या घरात रहाणे योग्य आहे का? सर्व आयुष्य स्वतःच्या घरात गेले, आणि आता अखेरीस या जागेत येऊन राहिलो. मनात तोच एक सल होता. आतल्या आत तगमग होई. हि बाब त्यांनी ललिताबाईंजवळ पण बोलुन दाखवली नव्हती.
तसं म्हटलं तर या विचारांना काही अर्थ नव्हता. त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. मग आहे ते आयुष्य आनंदाने घालवायचे तर असला विचार का करत बसायचा? पटत होते त्यांना. पण डोक्यातील विचारही जात नव्हते.
आज त्यांचे लहानपणापासून चे मित्र.. चंदुकाका त्याच्याकडे आले होते. सहजच. त्यांच्याशी बोलताना राजाभाऊंनी मन मोकळे केले. मनातली व्यथा त्यांना सांगीतली.
“अरे,कसला विचार करत बसतोस राजा. मुलाची जागा.. मुलीची जागा. राहुलच्या घरी राहिला असता तर हे विचार आले असते का तुझ्या डोक्यात?का हा भेदभाव? उतार वयातील आयुष्य जरा मोकळ्या हवेशीर जागेत घालवायचे होते ना तुला? मग लेकीनेच केली ना तुझी इच्छा पूर्ण?
एकिकडे म्हणायचं.. मुलगा मुलगी भेद नको. अरे, खरं तर तु भाग्यवान. म्हातारपणात पोरं आईबापांची रवानगी वृध्दाश्रमात करतात. तुला इतकी सुंदर जागा घेऊन दिली लेकीने आणि तु दुःख करत बसतोस. म्हणे मुलगा वंशाचा दिवा…. मग मुलगी? अरे ती तर पणती ना. दिवाळीत लावतो ती. सगळा आसमंत उजळून टाकणारी. तिनेच तर तुझे हे जीवन उजळून टाकले आहे.”
बराच वेळ चंदुकाका बोलत होते. आणि तसं तसं राजाभाऊंच्या मनावर आलेलं मळभ दुर होत गेलं. त्यांना हलकं हलकं वाटु लागलं. प्रसन्नपणे त्यांनी ललिताबाईंना हाक मारली..
☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 1 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
दुपारी दोन वाजता राजाभाऊ दुकान वाढवून घरी आले. तसे ते रोज एक वाजताच घरी जेवायला जायचे, पण आज रविवार. मुलगा, सुन घरी असणार. स्वयंपाकाला जरा उशिरच होतो. त्यांना सुट्टी… मग आरामात उठणे.. त्यानंतर नाश्ता.. मग स्वयंपाक.
सोमवार पेठेत त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. बहुतेक सर्व जुने भाडेकरू. मालकाच्या.. म्हणजे त्यांच्या ताब्यात जेमतेम अडिच खोल्या. त्याही आता जिर्ण झालेल्या.
लाकडी जिना चढून राजाभाऊ वरती आले. कठड्याला धरून जरा वेळ थांबले. हल्ली त्यांना दम लागायचा. आतला संवाद ऐकून ते जागीच थबकले.
“मला काय वाटते मिनु,आपण अजून एक दोन वर्षे थांबुया.” हा आवाज राहुलचा होता.
“नाही हं. एक दोन म्हणता म्हणता चार वर्ष झाली. तुझी कारणं चालुच असतात.”… मीनु जरा चिडुनच म्हणाली.
“माझं ऐकायचच नाही असंच तु ठरवलयं का? दादांना काय वाटेल?आईचा काही विचार केलास?”
“आता मी या पडक्या वाड्यात रहाणार नाही. चार वर्ष राहिले. खूप झालं. नील आता दोन वर्षाचा झालाय. त्याची शाळा सुरू होण्याच्या आत मला इथुन निघायचंय. या असल्या वातावरणात मी त्याला इथे ठेवणार नाही”.
राहुल चिडलाच मग. “या असल्या वातावरणात म्हणजे? आम्ही नाही राहिलो? अदिती नाही राहिली? अगं फार काय.. लग्नाच्या आधीचे दिवस आठव. माहेरचं घर म्हणजे काय फार मोठा महाल लागुन चाललाय का?विसरलीस का ते दिवस?”
राहुलचा आवाज वाढला.. तसे राजाभाऊ आत आले. त्यांनी राहुलला शांत केलं.
“सुनबाई, समजतं मला.. तुमची इथे अडचण होते. तु फ्लॅट घ्यायचा विचार करतेय ना? मग घेऊ की आपण फ्लॅट. मी काही मदत करीन. सर्वांनी मिळुन जाऊ नवीन घरात.”
मीनु जरा शांत झाली. आणि खरंच.. पुढच्याच आठवड्यात राहुल आणि मिनलने फ्लॅट चे फायनल केले. गंगापूर रोडवर आनंदवल्लीच्या पुढे एक टाऊनशिप तयार होत होती. त्यात काही फ्लॅटस् उपलब्ध होते. फ्लॅट बुक करायला ते दोघे राजाभाऊंना घेऊन गेले. फ्लॅट बुक झाला. येताना त्यांनी नवश्या गणपतीपुढे पेढे ठेवले. येत्या दिवाळीत ताबा मिळणार होता.
राजाभाऊ खुष होते. त्यांना पण अलीकडे वाटु लागले होते की, बस झाले हे गल्लीतील आयुष्य. आपल्या आजुबाजुला बघीतले की त्यांना जाणवायचं.. बरोबरीचे बरेच जण गल्ली सोडून गेले. बहुतेक जणांचे फ्लॅट झाले. ज्यांनी फार पुर्वी प्लॉट घेतले त्यांचे तर बंगलेसुध्दा बांधून झाले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. अदिती, राहुलचे शिक्षण.. त्यांची लग्ने यातच बरीचशी पुंजी खर्च झाली.
भद्रकाली परीसरात त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. मिळुन मिळुन मिळणार तरी किती? अडचणी तर कायम दार ठोठावतच होत्या. त्यातुनही मार्ग काढला. ललितानेही साथ दिली. आता साठी जवळ आली. गावाबाहेर, मोकळ्या वातावरणात, मोठ्या खोल्यांमध्ये उर्वरित आयुष्य जाणार. अजून काय पाहिजे आपल्याला या वयात? आपल्याच मनाशी बोलत ते स्वप्न पाहु लागले.
2 बी.एच.के.चा प्रशस्त फ्लॅट सहा महिन्यात ताब्यात मिळाला. फर्निचरचे काम सुरू झाले. एक दिवस रात्री जेवताना राहुलने विषय काढला. “दादा, आम्ही पाडव्याला शिफ्ट होतोय”.
“आम्ही म्हणजे…?”
“आम्ही म्हणजे.. आम्ही तिघे. मुहूर्त पण चांगला आहे.”
“अधुनमधून येत जा ना तुम्ही आईंना घेऊन.” मीनु म्हणाली.
राजाभाऊंची बोलतीच बंद झाली. काय, कसे विचारावे त्यांना कळेचना.
“अरे,पण आपले तर ठरले होते…”
त्यांना पुढे बोलु न देता मीनलने सुत्र हातात घेतली. “ठरले होते दादा.. आपण सर्वांनी जायचं, पण मीच सांगितले राहुलला.. आई दादांना ईथेच राहु दे म्हणून. तुम्हाला इकडची.. गावात रहायची सवय आहे ना. तुम्हाला नाही करमणार तिकडे”.
“अगं,असंच काही नाही” त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
“नाही.. तसे येत जा ना तुम्ही अधुनमधून. नीलला भेटायला”.
काही बोललेच नाही राजाभाऊ. भ्रमनिरास झाला त्यांचा. किती स्वप्न रंगवली होती त्यांनी नवीन जागेची. जेवण करून बाहेर गॅलरीत येऊनही उभे राहिले. पराभूत मनस्थितीत. ललिताबाई मागे येऊन उभ्या राहिल्या.
“सांगत होते तुम्हाला.. पैसे देऊन टाकु नका. मागीतले तरी होते का त्यांनी? त्यांचे ते समर्थ होते ना जागा घ्यायला. तुम्हालाच फार हौस नवीन जागेची. जी काय गंगाजळी होती, ती पण गेली”.
राजाभाऊ ऐकत होते… आणि नव्हतेही.
पाडव्याचा मुहूर्त बघून राहुल, मीनल ..नीलला घेऊन नवीन जागेत गेले. फक्त कपडे नेले त्यांनी. बाकी सर्व इथेच ठेवले. वाड्यातील त्या दोन अडीच खोल्यात फक्त राजाभाऊ आणि ललिताबाई राहिल्या.
भद्रकालीत टेलरिंग शॉप होते, पण आता काही फारसा धंदा होत नव्हता. रेडिमेडच्या जमान्यात कपडे शिवायला कोण येणार? आणि तेही राजाभाऊंकडे. तेही आता थकले होते. फारसे काम होत नव्हते. आयुष्यभर मशीन चालवून गुडघे पण आताशा दुखत. दोघांपुरते कसेबसे मिळे. अजून तरी मुलाकडे हात पसरायची वेळ आली नव्हती. अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.
सलग तीन दिवस सुट्टी आली होती… घरात जाम सडलो होतो. मॅच, वेब सिरीज सगळं पाहून झालं, पोटभर झोप काढून झाली, चवीचवीचं खाऊन झालं, तरी कंटाळा आला होता… आत्ता पक्याचा फोन आला आणि अंगात एकदम तरतरी आली !
बायकोला सांगून निघणार इतक्यात छोटी चिमणी आडवी आली… “बाबा, तू आज मला बागेत नेणार होतास, आता नको जाऊ बाहेर!”
“नेक्स्ट संडे जाऊ नक्की हां…” हे मी म्हणता क्षणीच भला मोठा भोंगा सुरू झाला.
मग बायको आडवी आली, “कशाला चिमूला उगाच प्रॉमिस करतोस? आज मला पण बाहेर पाणी पुरी खायला घेऊन जाणार होतास… दोन दिवस झाला ना आराम? साड्यांच्या एक्झिबिशनला पण घेऊन जाणार होतास!”
“नेक्स्ट संडे नक्की…”
“गेला महिना भर हेच सांगतोय तू…!” डोळे वटारून बायको करवादली, बॅकराऊंड ला भोंगा सुरूच होता.
“आम्ही मित्र किती दिवसांनी भेटत आहोत गं…”
“मॅच पाहायला आत्ता दहा दिवसांपूर्वी एकत्र जमला होतात ना…?”
बाकी कुंडली बाहेर यायच्या आत वटारलेले डोळे आणि चिमणा भोंगा दोन्हीकडे दुर्लक्ष करून मी पळ काढला.
भेळ कट्यावर आलो… सत्या भेळेच्या दुकानात गिऱ्हाईक सांभाळत होता. बाहेरून मी तोंडाने ‘टॉक’ आवाज करून त्याला बोलवलं..
“बस कट्ट्यावर… येतो अर्ध्या तासात…”
मी एकटाच लवकर आलो होतो. अजून कुणी चांडाळ जमले नव्हते. मी सुकी भेळ घेऊन आलो… मनात सत्या दिवसाला कसा आणि किती छापत असेल याचा हिशोब मांडत बसलो.
सुट्टीमुळं दुकान भरलेलं होतं. सत्या, त्याचा भाऊ आणि बापू फुल्ल खपत होते…
इतक्यात एक आज्जी-आजोबा आले. आजोबांचं वय अंदाजे ७० आणि आजीचं ६५ असावं. आजीला त्यांनी दुकानाच्या गर्दीत न बसवता माझ्या इथं मोकळ्या कट्ट्यावर बसवलं.
“बाळा, मी आत जाऊन भेळ सांगून येतो. जरा हिच्याकडे लक्ष ठेवशील का?”
“हो… या…” इती मी.
मनात विचार आला… ‘वा ! काय हौस आहे भेळ खायची आजी आजोबांना… इथे आपण बायकोला अजून टांग मारतो!’
आजी शून्यात बघत बसल्या होत्या. चेहरा एकदम निर्विकार. आजोबा आले आणि आजीशी गप्पा मारायला लागले. पण आजीच्या चेहऱ्याची रेष हालेल तर शपथ…
“आज त्याला सांगितलंय… दाणे घालू नको, तुला त्रास होतो ना चावायला, जास्त कोथिंबीर, जास्त शेव पण घालायला सांगून आलोय. येईलच सत्या भेळ घेऊन हां…” आजोबा आजीच्या हातावर थोपटत बसले. पण आजी एकदम फ्रीझ मोड मध्येच.
तितक्यात मिल्या आणि विक्या आले. एकेक कटींग मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या…
सत्यशील छोट्याशा द्रोणात भेळ घेऊन आला. ती त्यानं आजोबांना दिली, त्यांना वाकून नमस्कार केला, “आजी भेळ खाऊन आवडली का सांग गं!” असं काही बोलून आम्हाला जॉईन झाला.
सत्या कस्टमर्सशी इतकी सलगी का दाखवत होता, हे आम्हाला समजलंच नाही. सत्याचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. खुणेनं मी त्याला ‘काय हे?’ असं विचारलं, तेव्हा “आई आली की सांगतो,” म्हणाला मग आम्ही पण जास्त विचारत बसलो नाही.
आमच्यात सगळ्यात अतिशहाणा मिलिंद होता… चहा पित फिदीफिदी हसत म्हणाला, “काय राव रोमँटिक आहेत आजोबा… दोघं एका द्रोणात भेळ खातायत!”
सत्यानं त्याला जोरात चिमटा काढून गप केलं. पण आजोबांनी ऐकलंच आणि त्याला जवळ बोलावलं…
“अरे बाबा, करायच्या वेळी रोमान्स केला असता तर काय हवं होतं रे? आज ही वेळ कदाचित आलीच नसती… पण एक लक्षात ठेव, आपल्याला माहीत नसेल, तर आपण काही बोलू नये!”
मिलिंद एकदम वरमला. आजीच्या नजरेतला तो निर्विकार भाव पाहून मिल्या अस्वस्थ झाला. मिल्यानं माफी मागितली आणि आमच्या कंपूत सामील झाला.
सत्यानं आणि मी मिलिंदला चागलं झापलं. तितक्यात सत्याई सत्याच्या बापूला घरचा चहा घेऊन आली.
प्रेम करण्यात या बायकांचा हात कुणी धरू शकत नाही… भेळेच्या दुकानाशेजारी चहाची टपरी आहे, पण सत्याई, बापूला घरचाच चहा आवडतो, म्हणून घरून चहा करून आणते. सत्याच्या आईला आम्ही ‘सत्याई’ म्हणत असू.
सत्यानं आईला हाक मारली आणि त्या आजी आजोबांची गोष्ट आम्हाला सांगायला सांगितली. मग सत्याईनं जे सांगितलं ते सगळं अचंबित करणारं होतं!
आजोबांचं नाव अविनाश भोळे… नाव ऐकून आम्ही एकदम चमकलो! भोळे कंपनीच्या उदबत्त्या, धूप, लोबान आजही घराघरात वापरले जात होते. आमच्या लहानपणापासून आम्ही घरात ‘A.B.’ कंपनीच्याच उदबत्या वापरल्यात… ते हे भोळे…?
सत्याई सांगत होती…
भोळे आजोबांचा तेव्हा एक छोटासा धंदा होता. आजोबांचं लग्न उषा आजीशी झालं आणि आजोबांना त्यांच्या धंद्यात एकदम यश मिळायला लागलं. कामानं आणि यशानं एकदम वेग घेतला. लग्नानंतरचे नवतीचे दिवस फुलपाखरू बनून उडून गेले.
सुरुवातीला आजोबा जमेल तसा वेळ आजीला द्यायचे. पण हळू हळू सगळं बदलत गेलं… आजोबांना कामाची, यशाची, पैशाची झिंग चढत गेली.
बघितलं तर सगळं आलबेल होतं. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. सुबत्ता होती, पण सगळं गोड असून कसं चालेल ना! यात वाईट एकच गोष्ट अशी होती, की आजीची कूस उजवत नव्हती… आजी या दु:खात होती आणि आजोबाही कामात खूप गुंतत गेले होते. त्यांना सुद्धा या गोष्टीची खंत होती पण ते कामात मन गुंतवून घेत होते. आजी मात्र हा मानसिक त्रास एकटी सहन करत होती.
आजी मनापासून आजोबांचं सगळं करायची… खाण्या पिण्याच्या वेळा, आवडी निवडी… पण आजीलाही काही इच्छा असतील, ती मातृसुखासाठी आसुसलेली आहे, मनानी कष्टी आहे, तिलाही काही हवं नको पाहायला हवं, वेळ द्यायला हवा, हेच आजोबा विसरले होते.
आणि एक दिवस चमत्कार झाला… आजीला बाळाची चाहूल लागली ! आजीला वाटलं आता तरी आजोबा वेळ देतील, पण आता आजोबांना कामापुढे काही सुचत नव्हतं.
घरी काळजी घेणार मोठं कुणी नव्हतं. एक मुलगी त्यांनी आजीची काळजी घ्यायला सोबत आणून ठेवली होती. पण आजीला आजोबांची गरज होती. आजोबा म्हणायचे, “आता छोटे भोळे येतील, तर व्यवसाय अजून वाढवूयात…” ते सतत काम-काम-काम हाच जप करायचे.
यातच आजीला सतत आंबटचिंबट खायचे डोहाळे लागले.. सोबतीची मुलगी हवं ते बनवून देई, पण एक दिवस आजीनी हट्ट केला की तिला बाहेरचीच ओली भेळ खायचीय!
आजोबा म्हणाले, “घरी बनवून खा.”
आजी म्हणाली, “नाही खाणार.”
आजोबा म्हणाले, “घरी आणून देतो!”
आजी म्हणाली, “तशी नाही खाणार… आपण सोबत जाऊन एकाच ताटलीत बाहेरच खायची…!”
महिना झाला… आजीला आजोबा ‘आज जाऊ’, ‘उद्या जाऊ’ करत होते.
एक दिवस आजी हट्टालाच पेटली. रड रड रडली… “नाही नेलं आज तर आत्ताच माहेरी निघून जाईन, परत येणार नाही,” म्हणाली.
हे शस्त्र उपयोगी ठरलं. आजी एका संध्याकाळी गजरा माळून, सजून धजून तयार राहिली, पण आजोबा आलेच नाहीत! आजींनी कामाच्या ठिकाणी टेलिफोन केला तर आजोबा मीटिंग घेतायत असं कळलं…
डोहळतुली बाई काही वेळा हळवी होते, काही वेळा चिडचिड करते. तिच्या मनाचे कल बदलत असतात.
आजोबा सांगून पण आले नाहीत याचा आजीला खूप राग आला… तिरीमिरीत आजी उठली, भलं थोरलं पोट घेऊन निघाली आणि उंबर्याला अडकून पडली…! क्षणात सगळं बिनसलं… होत्याचं नव्हतं झालं…!!!
आजी मरणाच्या दारातून परत आली… पण येणारा नवा जीव यायच्या आधीच देवाला प्यारा झाला! याचा आजीला भयानक मानसिक धक्का बसला. ती पडली तेव्हा डोक्याला वर्मावर मार बसला म्हणून, की बाळ गेलं हा मानसिक धक्का बसून, माहीत नाही… पण आजी ही अशी झाली!
तिची अनेक गोष्टींची पार ओळखच पुसली गेली. देव, यांत्रिक मांत्रिक, डॉक्टर, सगळं झालं, पण आजी अशी निर्जीव झाली ती आज पर्यंत. आजोबा या गोष्टीमुळं खूप हादरले… या सगळ्याला त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं.
चाळीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस… आजोबा आजीला महिन्यातून एकदा तरी भेळ खायला घेऊन येतात. त्यांना वाटतं कधीतरी भेळ खाऊन तिला जुनं काही आठवेल. तिला आपण आठवू, तिचा सगळा राग ती बाहेर काढेल. आजही ते म्हणतात…
“देव मला इतकी कठोर शिक्षा देणार नाही… तिला एकदा तरी मी आठवेन!”
आजोबांकडे बघितलं तर आजोबा आजीला प्रेमानं एकेक घास भरवत होते.
“सत्याई, तुला कसं माहीत गं हे सगळं?” विक्यानं विचारलं.
“अरे, आजीला सोबतीला जी मुलगी ठेवली होती ना, ती मीच होते ! हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय…!”
आम्ही सगळे वेगळ्याच मूड मध्ये गेलो होतो… मला एकदम तो चिमणा भोंगा आणि माझं वटारलेल्या डोळ्यांच प्रेम आठवलं…
“चल यार, मी निघतो… चिऊला बागेत आणि हिला पाणी पुरी खायला घेऊन जायचंय!”
आजी-आजोबाही भेळ खाऊन निघाले… सत्या आणि मी पटकन त्यांना आधार देऊन त्यांच्या गाडीपाशी सोडायला आलो. तितक्यात सत्याईनं एक चाफ्याचं फुल आणून आजीच्या अंबड्यात खोचलं. चाफा चाचपत आजी पहिल्यांदा एकदम गोड हसली. आजोबा पण त्यामुळे खुष झाले.
दोघं गाडीत बसताना आजोबा म्हणाले, “मुलांनो, तरुण आहात, एक सांगतो… ऐका, वेळेला जपा… आज करायचं ते आजच करा! एकदा का वेळ गेली की गेली… मग आयुष्यात येतो तो फक्त यांत्रिकपणा…!”
आणि आजीकडे बघत म्हणाले, “ओली भेळ कशी लगेच खाण्यात मजा, नंतर ती चिवट होऊन जाते! मला हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणून सांगतो… आयुष्यात योग्य वेळीच प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला हवा. उद्याची खात्री द्यायला आपण देव नाही… कायम ‘आज’ मध्ये जगा. चला निघतो, उषा दमली असेल आता !”
…. हे ऐकून डोळ्यात पाणी कधी जमा झालं, समजलंच नाही… पण सगळ्यांना ‘बाय’ करून मी सुसाट वेगानं घरी निघालो…
लेखिका : सुश्री रमा
संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.) – इथून पुढे —
मुन्नीच्या घरी गेलो. तर मुन्नीची आई आणि भाऊ खुर्चीवर बसून कॉफी पित होते. मुन्नीच्या भावाकडे मी पाहत राहिले. अनोळखी तरुण मुलाकडे सतत पाहू नये हे माहीत असूनही त्याच्यावरुन नजर बाजूला करु नये असे वाटत होते. विलक्षण आकर्षण होते त्याच्यात. सरळ नाक, गोरा रंग, चेहर्यावर हुशारीची लकाकी आणि हसतमुख. मी पर्स उघडून गुलाबकळी बाहेर काढली आणि हळूच त्याच्या समोर धरली. त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि गुलाबकळी घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श झाला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच, सार शरीर थरारलं. पुरुषांचा स्पर्श घरीदारी होतच असतो. पण शरीरात अशी स्पंदने झाल्याचे कधी जाणवले नाही. मुन्नीच्या दादात काहीतरी विलक्षण जादू होती खरी.
आणि मग मी या घरी कधी मुन्नीसोबत कधी एकटी जातच राहिली. मुन्नीचा दादा नेहमी कॉलेजात किंवा घरी असेल तेव्हा त्याच्या खोलीत बंद दाराआड अभ्यास करत असायचा. मला आता पक्के माहीत झाले होते, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर तो घरी आहे, आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तर समाजव तो घरी नाही. मुन्नी खूपच लाडात वाढलेली. त्यामुळे तिचा घरात आरडाओरड चालायचा. मग मी तिला दटवायचे. दादाचा अभ्यास सुरु आहे ना, आवाज कमी कर. मुन्नीची आई गालातल्या गालात हसायची.
मुन्नीच्या घरचा वातावरण मला आवडायचं. सर्वजण प्रेमळ आणि एकमेकांची थ्ाट्टा मस्करी करत रहायचे. मुन्नीचे बाबा फक्त रविवारी घरी असायचे. पण घरी असले की, दोन्ही मुलांसमवेत गप्पा, आपल्या धंद्यातल्या गोष्टी, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांकडे जाणे असा मस्त कार्यक्रम असायचा. मुन्नीची आई म्हणजे मुन्नीची मैत्रीणच. मुन्नी आणि मुन्नीचा दादा आपल्या आईला कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या गंमतीजमती सांगायचे आणि एकदम मोकळं वातावरण ठेवायचे. उलट आमच्या घरी हिटलरशाही. बाबा रागीट आणि हेकेखोर. त्यांच्यापुढे कुणाचे काही चालायचे नाही. आमची आर्थिक स्थिती यथातथाच. बाबा एका केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी करीत होते. ते एकटेच मिळवणारे आणि आम्ही चारजण खाणारे. माझी आईमात्र कमालीची सोशिक. संसार काटकसरीने करणारी. तिचे सर्वगुण माझ्यात आहेत असे सर्वांचे म्हणणे. पण बाबांसमोर बोलायला मला भीती वाटते. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. आई बिचारी भांडण नको म्हणून पडतं घ्यायची. आमच्या घरच्या या कोंदट वातावरणामुळे मी मुन्नीच्या घरी वारंवार जायला लागले आणि कळायच्या आधी मुन्नीच्या दादाच्या प्रेमात पडले. मुन्नीचा दादा इंजिनिअर झाला आणि बेंगलोरला निघाला पण. माझे काळीज कासावीस झाले. आता तो नेहमी नेहमी दिसणार नाही हे समजत होते. पण मला वाटत होते. तो मला आपल्या प्रेमाबद्दल बोलेल. अगदी ट्रेन सुटेपर्यंत मला आशा वाटत होती. त्याच्या डोळ्यात माझे प्रेम दिसत होते. मग ओठांवर का येत नव्हते?
मुन्नीचा दादा बेंगलोरला गेला आणि काही महिन्यात मुन्नी पुण्याला गेली. मी मुन्नीच्या घरी जातच राहिले. मुन्नीच्या दादाची खबरबात घेत राहिले. मला वाटायचे. मुन्नीची आईतरी मला विचारेल? ती पण गप्प होती. मी मुलगी, आपल्या संस्कृतीत मुली असे उघड उघड प्रेम दाखवतात का? केव्हा केव्हा वाटत असे, मी नोकरी करणारी नाही म्हणून मुन्नीचा दादा माझा विचार करत नाही की काय? हल्ली सर्वांना नोकरीवाली बायको हवी असते. मुन्नीचा दादा आपले प्रेम व्यक्त करील यासाठी जीव आसूसला होता. तीन महिन्यांपूर्वी मुन्नीची आई म्हणाली, अगं वल्लभ कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला. आता एक्सटर्नल एम.बी.ए. करतोय. तेव्हा मात्र मी मनात घाबरले. हा असाच शिकत राहणार असेल तर माझे काय?
आमच्या घरी गेली दोन वर्षे माझ्या लग्नाचा विचार सुरु होता. मी गप्पच होते. पण गेल्या आठवड्यात पुण्याच्या मावशीने तिच्या पुतण्याचे म्हणजेच विनोदचे स्थळ आणले. आणि सर्वजण हुरळून गेली. आईवडिलांचे म्हणणे सोन्यासारखा मुलगा आहे. असा नवरा मिळणे म्हणजे मिताचे भाग्य. माझ्या इतर मावश्या, मामा यांचे हेच म्हणणे. मी विनोदला कोणत्या तोंडाने नाही म्हणणार होते. वल्लभ कडून निश्चित काही कळत नव्हते, किंवा वल्लभची आई ठोस काही बोलत नव्हती. माझ ‘मौनम्’ हिच सम्मती समजून आईबाबा तयारीला लागले सुध्दा. मी मुन्नीला फोन करुन माझे लग्न ठरतयं हे कळविले. म्हटलं वल्लभकडून किंवा वल्लभच्या आईवडिलांकडून काही हालचाल होते का हे पहावे. दोन दिवस वाट पाहून काल शेवटी वल्लभच्या घरी गेली. आईना सर्वकसे गडबडीत ठरते हे सांगत होते. आता लग्न करुन पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार हे सांगताना डोळ्यातून पाणी वाहू लागले. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडून वल्लभ बाहेर आला. एक क्षणभर त्याची आणि माझी नजरानजर झाली. रात्रभर झोप न झाल्याने ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्याकडे दुर्लक्ष करुन आईना बँकेत जाऊन येतो असे म्हणून तो निघाला. आईने त्याला हाक मारुन, मिता लग्नाचे सांगायला आली रे वल्लभ असे म्हणाली. आणि बाहेर पडणारा वल्लभ मागे आला. आणि ‘‘अभिनंदन’’ असे म्हणून धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडला.
– आई –
काल मिता आणि विनोद यांचे लग्न झाले. मुन्नी मैत्रिणीच्या लग्नासाठी मुद्दाम पुण्याहून आली. मी मुन्नीच्या बाबांना एक दिवस घरी थांबायला सांगितले. आणि आम्ही तिघेही लग्नाला गेलो. मुन्नी कार्यालयात गेली ती मिताच्या खोलीत तिची लग्नाची तयारी करायला. लग्नात मिताच्या शेजारी विनोदला पाहताना खूप त्रास होत होता. मुन्नीचे बाबापण गप्प गप्प होते. लग्नाच्या मंगलाष्टका सुरु झाल्या आणि मला वाटले या आनंदाप्रसंगी मला आता हुंदका येणार. कसे बसे रडू आवरले. मिता विनोदला भेटायला स्टेजवर गेलो. मला पाहताच मिता गळ्यात पडली. तिच्या डोळ्यातील दोन अश्रू माझ्या खांद्यावर पडले. आम्ही तिला अहेर केला आणि निघालोच. बाहेर पडून गाडी स्टार्ट करता करता हे म्हणाले, मला वाटलं होतं, वल्लभचं मिताशी लग्न होईल. हे असे कसे झाले ? मी म्हटले, वल्लभच्या मनात मिता होतीच. पण तो करियरच्या मागे लागला. मिताला तो गृहित धरुन बसला. आता दुखावलाय. मिताने तरी किती वाट पाहायची. प्रेमात पुरुषाने पुढाकार घ्यायला नको? तो तुमच्यावर गेलाय. मन मोकळ करावं माणसाने. नुसतं शिक्षण, शिक्षण… मिता किती दिवस वाट पाहिल याची?
मुन्नीचे बाबा शांतपणे गाडी चालवत होते, घरी येईपर्यंत कोण कोणाशी बोलले नाही. घरी आल्यावर कपडे बदलले. आणि बेडवर शांतपणे डोळे मिटून पडले. पहिल्यांदा मुन्नीसोबत आलेली १५-१६ वर्षाची मिता ते आज लग्नात शालू घातलेली मिता, मिताची अनेक रुपे डोळ्यासमोर आली. फार काहीतरी गमावलयं अशी हुरहूर मनाला लागून गेली. यात माझे काही चुकले का? या दोन तरुण मुलांची मने ओळखून मी पुढाकार घ्यायला हवा होता का? का नाही मी वल्लभला मिताबद्दल विचारले आणि मिताला वल्लभबद्दल? आता पुढे वल्लभ काय करील? विसरेल का तो मिताला आणि मिता वल्लभला ?
होय, वल्लभ आणि मिताप्रमाणे माझेपण चुकलेच. आता ही हुरहूर आयुष्यभर मन पोखरणार. त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होत्या तिसरी बाजू त्याला जोडण्याची गरज होती.
(दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.) – इथून पुढे –
शेवटी बेंगलोरला जायचा दिवस उजाडला. माझी सायंकाळची ६ ची ट्रेन होती. सकाळपासून मिता आमच्याकडेच होती. आईला जेवणात मदत कर, माझी कपडे इस्त्री करुन दे, माझ्या बुटांना पॉलीश कर. मिता नुसती धावत होती. शेवटी दुपारी ४ वाजता मी, आई, मुन्नी आणि मिता टॅक्सी करुन निघालो. बाबा परस्पर सीएसटी स्टेशनवर येणार होते. मी एवढ्या लांब जाणार म्हणून आई फार नर्व्हस झाली होती. टॅक्सीत सर्वजण गप्प गप्प होते. टॅक्सी स्टेशनवर पोहोचली, मिताला माझ्या दोन्ही हॅण्डबॅग खांद्याला लावल्या. मी एक सुटकेस घेतली. मिताने आईला आणि मुन्नीला घ्यायला काहीच सामान ठेवले नाही. गाडी लागलेली होती. माझ्या आधी मिता गाडीत चढली आणि बर्थ नंबर शोधून माझे सामान बर्थवर लावलेसुध्दा. आई म्हणाली, ‘‘मुन्नी ती मिता किती चटपटीत बघ, नाहीतर तू. ’’ मुन्नीला पण लटका राग आला. हो, हो, मिता चटपटीत आणि मी आळशी. बसवून ठेव मिताला मांडीवर. सर्वजण खूप हसलो.
गाडी सुटायची वेळ झाली आणि मी सोडून सर्वजण खोली उतरले. मला सर्वजण खिडकीतून हात दाखवत होते. मी पाहिलं, मिता रडवेली झाली होती. पर्समधील छोटा रुमाल हलवत होती परत डोळ्यांना लावत होती. मी मुन्नीला आणि मिताला म्हणालो, आईबाबांना सांभाळा गं. आणि गाडी सुटली. गाडी बरोबर मिता धावत धावत रुमाल दाखवत होती. गाडीचा स्पीड वाढला आणि प्लॅटफॉर्मवर आई, मुन्नी आणि मिता लांब लांब दिसायला लागली.
मी बेंगलोरला आलो. कंपनीने जागा दिली होती. कंपनीत जीव तोडून काम केले. पदोन्नती मिळत होती. मुंबईला सहा महिन्यानंतर जात होतो. दरम्याने मुन्नी आणि मिता ग्रॅज्युएट झाल्या. मुन्नीला संस्कृतमध्ये पी. एच्. डी. करायचे होते म्हणून तिने पुणे युनिव्हरसिटीमध्ये अॅडमिशन घेतले आणि ती पुण्याला गेली. मिता अभ्यासात यथातथाच होती. ग्रॅज्युएशननंतर तिने शिक्षण थांबविले आणि तिच्या आवडत्या कथक नृत्यामध्ये तिने जीव झोकून दिला. मी बेंगलोरमध्ये आणि मुन्नी पुण्याला. बाबा नेहमी प्रमाणे त्यांच्या व्यवसायात. आई घरी एकटी होत होती. पण मिता सकाळ संध्याकाळ घरी येऊन सर्वकाही पाहत होती. आईला घेऊन बाजारात जाणे, डॉक्टरकडे जाणे, बारीकसारीक सर्व गोष्टी मिताच पाहत होती. मिता आईजवळ येऊन जाऊन असते म्हणून मी आणि मुन्नी निर्धास्त होतो. मी मुंबईत आलो कि, मिता तिच्या क्लासची वेळ सोडून आमच्या घरी येत होती. माझ्या आवडीचे पदार्थ घरात शिजत होते. माझ्या खोलीत आवडती पुस्तके, कॅसेट ठेवली जात होती. पण मी मुंबईत जास्त काळ राहू शकत नव्हतो. आत फक्त एक वर्ष. एम. बी. ए. पुरे करावे आणि मिताला लग्नाचे विचारावे. मी तिचा होकार गृहित धरला होताच पण….
काल मी मुंबईत आलो, आणि आईने मिताच्या लग्नाची बातमी सांगितली आणि मी सटपटलो. आईने सांगितलेली हकिकत अशी, तिच्या मावशीने हे स्थळ आणले. मुलगा मावशीचा पुतण्या. गेली चार वर्षे ऑस्ट्रेलियात असतो. इंजिनिअर आणि देखणा. एकुलता एक मुलगा. नकार देण्यास काही कारणच नव्हते म्हणे.
संपूर्ण रात्रभर मिताला प्ाहिल्यांदा पाहिले त्यापासून आतापर्यंतचा काळ चित्रपटासारखा समोर येत होता. या कुशीवरुन त्या कुशीवर होत रात्रभर जागा होतो. आयुष्याची जोडीदार म्हणून मिताशिवाय कुणाचा विचारच केला नव्हता. आता पुढे काय? ओळखीच्या अनेक मुली मिताच्या जागेवर उभ्या करुन पाहिल्या. पण छे. माझं मन समजणारी मिता म्हणजे मिताच. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही.
पुरी रात्र न झोपता मी अंथरुणातून बाहेर पडलो. चहा घेताना आई माझ्याकडे पाहून म्हणाली, अरे वल्लभ चेहरा असा काय? डोळे किती लाल. रात्रभर झोपला नाहीस की काय? काल मिताच्या लग्नाची बातमी ऐकलीस तेव्हापासून तू बेचैन झालास. अरे गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात रे. मग पश्चाताप करुन काय उपयोग? चहा घेऊन मी उठलो आणि बाहेर जायची आवराआवर करु लागलो. एवढ्यात बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. अग मिता, ये ये आत. मुन्नीने बातमी कळविली. पण तू केव्हा सांगणार म्हणून वाट पाहत होते. बस, बस, वल्लभ आलाय काल. आठ दिवसांची रजा घेऊन आलो म्हणाला, पण काल रात्रौ म्हणाला, उद्या रात्रौ म्हणजे आजच्या रात्रीच्या विमानाने निघणार. इथे आल्यानंतर काहीतरी बिनसलं त्याच. ’’ मी माझ्या खोलीतून आईचे बोलणे ऐकत होतो. ‘‘तुम्हाला आधी कळविले नाही. मुन्नीच्या आई राग मानू नका, सारे कसे अचानक झाले. ’’ मिताचा रडवेला आवाज मला ऐकू आला. ‘‘मावशीने माझ्या आईला तिच्या पुतण्याबद्दल विचारले. तो ऑस्ट्रेलियाहून आलाय आणि लग्न करुनच जाणार म्हणाली, आईबाबा एवढे खूश झाले की मला हो नाही विचारण्याची संधी न देता सर्व काही ठरवून मोकळे. माझा काही निर्णय होत नव्हता तो पर्यंत लग्नाची तारीख, हॉल सर्वकाही ठरवून झाले. ’’ आता मिताचे हुंदके मला स्पष्ट ऐकू येत होते. मला काय वाटले कोण जाणे. तिरमिरीत खाड्कन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळच आई आणि मिता बोलत होत्या. रडवेली मिता मला पटकन सामोरी आली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन मी आईला म्हणालो, आई मी बँकेत जातो. मी बाहेर पडणार एवढ्यात आई म्हणाली, अरे वल्लभ, मिता तिच्या लग्नाचे सांगायला आली रे.. मी चटकन मागे आलो आणि जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहून ‘‘अभिनंदन’’ म्हणालो, आणि धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडलो. बाहेर आलो. पोर्चमध्ये जाऊन किल्लीने गाडीचा दरवाजा उघडला. आत बसलो. गाडीचा दरवाजा, खिडक्या सर्व बंद केल्या आणि स्टिअरिंगवर डोके ठेवून ओक्साबोक्सी रडू लागलो.
– मिता –
धाड्कन दरवाजा बंद करुन वल्लभ बाहेर चालता झाला. मला माझे अश्रू आवरतच नव्हते. मुन्नीच्या आईने मला जवळ घेतले. योग्य वेळी मन मोकळं करावं गं मिता. एकदा वेळ सटकली की हळहळण्या शिवाय हातात काही राहत नाही. माझं रडू काही आवरत नव्हतं. शेवटी मुन्नीच्या आईला, येते म्हणून सटकले. आता कसला निर्णय घेण्याची क्षमता आहे का माझ्यात? बाबा कालपासून आमंत्रणे द्यायला नातेवाईकांकडे जाऊन आले सुध्दा. मनात असेल तर वल्लभने आणि वल्लभच्या आईने पुढाकार घ्यायला नको?
चार दिवसापूर्वी तिला पाहून गेलेला मावशीचा पुतण्या विनोद आठवला. खरच त्याच्यात काहीच दोष नव्हता. सुशिक्षित, उमदा, देखणा, स्थिरस्थावर सर्व काही उत्तम. पण वल्लभ….
कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मुन्नीची ओळख झाली आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे ती मैत्रीणच झाली. एक दिवस ती फार आनंदात होती. म्हणाली, माझ्या दादाला व्हि. जे. टी. आय. मध्ये अॅडमिशन मिळाली. त्यांच्या एवढ्या मोठ्या कॉलनीत प्रथमच. तिच्या घरी फार आनंद होता म्हणे. मना म्हणाली तू चल आमच्या घरी. मी तिच्या घरी जायला निघाले. तिच्या दादाचे कसे अभिनंदन करावे? असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.
आई आणि मी डायनिंग टेबलावर जेवायला बसलो असताना मी म्हणालो. आई आश्चर्यचकित झाली. ‘‘अरे काल तर आलास बेंगलोरहून, आठ दिवसांची रजा घेऊन आलास असे म्हणालास?’’ मी गप्प. हळूच म्हणालो, ‘‘कंपनीचे केबल आलीय. परवा जॉबवर यायला कळवले.’’ पण तुझी बँकेची कामे राहिली होती ना? ‘‘ ती उद्या पुरी होतील. उद्या रात्रौच्या प्लेनने निघणार.’’ आई हळूच पुटपुटली, आणि शुक्रवारचे मिताचे लग्न? मला एकदम ठसका बसला. आई म्हणाली, अरे ! हळू हळू. पाणी पी. कुणीतरी आठवण काढली.
आई आणि मी अन्न फक्त चिवडत होतो. दोघांचेही जेवणात लक्ष नव्हते. हसतमुख मिताचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी हात धुवायला उठलोच. पाठोपाठ आईपण ताटे आवरत उठली. मी म्हणालो, बॅग भरतो उद्याची. दिवसभर खूप कामे आहेत.
मी माझ्या खोलीत आलो. पाठोपाठ आई पदराला हात पुसत आली. ‘‘मिता आलेली परवा. वल्लभला लग्नाचे कळले काय ? हे विचारत होती. तशी ती येत असते नेहमीच आली की, घराची सर्व आवराआवर करुन देते. मुन्नीची खोली स्वच्छ करते. तुझीही खोली ठीकठाक करते. मला स्वयंपाकात मदत करते. आता चालली लग्न करुन.’’ मी गप्प.
“वल्लभ, मिताला तुझ्याबद्दल फार वाटायचं रे, मलाही वाटायचं मिता या घरची सून होईल. तशी बातमी तू किंवा मिता द्याल अशी वाट पाहत होते. पण शनिवारी मुन्नीचा फोन आला. ती म्हणाली, मिताचे लग्न ठरले. मिताने तिला पहिला फोन केला. शेवटी गेली दहा वर्षे त्यांची मैत्री. मुन्नी फोनवर म्हणाली, दादाने बहुतेक मिताला लग्नाचे विचारले नाही शेवटी. या दादाच्या मनातले काही कळत नाही. स्पष्ट काही बोलत नाही. माणूस घाणा आहे नुसता.’’
“मुन्नीला पण वाटत होते, तुझे आणि मिताचे लग्न होईल. तिला पण आश्चर्य वाटले. तुझ्या मनात मिताबद्दल होतं ना वल्लभ? तस मला तर वाटत होतं. मग का नाही विचारलस तिला? “ आईचे एकापाठोपाठ एक प्रश्न.
मी काहीही न बोलता बॅग भरायला सुरुवात केली. आईला काय उत्तर द्यावे कळेना. माझे चित्त कुठे ठिकाणावर होते? मिताच्या लग्नाची बातमी ऐकली आणि वाटले सार्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. चार वर्षात कंपनीत जीव तोडून मेहनत केली. गेली दोन वर्षे एक्सटर्नल एम.बी.ए. सुरु होतं. ते दोन महिन्यात संपेल की मग मी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर होईन. आणि मिताला लग्नाचे विचारीन असे मनात मांडे घातलेला मी, मिताच्या लग्नाच्या बातमीने उद्ध्वस्त झालो. बॅगेत थोडे कपडे, लॅपटॉप टाकून मी बॅग बंद केली. लाईट बंद करुन बेडवर पडलो. डोळे मिटले तरी झोप कुठली यायला. डोळ्यासमोर १६ वर्षाची मिता दिसायला लागली. इंजिनिअरिंग पहिल्या वर्षात अॅडमिशन मिळाली तो दिवस. व्हि.जे.टी.आय. सारख्या मुंबईतील प्रख्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहज अॅडमिशन मिळाली म्हणून आईबाबा खुश. मुंबईत जेमतेम दोन इंजिनिअरिंग कॉलेज. त्यात व्हि.जे.टी.आय. चे नाव मोठे. आमच्या कॉलनीत गेल्या कित्येक वर्षात व्हि.जे.टी.आय. मध्ये अॅडमिशन मिळाले नव्हते. पण यंदा मला अॅडमिशन मिळाली म्हणून कॉलनीतले सर्वजण माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. सकाळपासून फुले आणि पेढे घेऊन लोक येत होते. आई आणि मी ते आनंदाने स्वीकारत होतो. लोकं थोड कमी झाली, आई आणि मी माझी आवडती कडक कॉफी घ्यायला बसलो. एवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. आई म्हणाली, मुन्नी आली बहुतेक जा दार उघड. मी उठून दार उघडले. बाहेर मुन्नी होती. ‘‘अरे दादा किती वेळ बेल वाजवतेय मी, ऐकायला येत नाही काय?’’ असे नेहमी प्रमाणे बडबडत मुन्नी आत येताना मागे वळून म्हणाली, ‘‘अग, ये ग, आत ये.’’ मी बाहेर पाहिलं. हातात वह्यापुस्तके घेऊन एक मुलगी उभी. मुन्नीच्याच वयाची. निमगोरी, लाजाळू. खाली मान घालून वह्यापुस्तके सावरत होतील. मुन्नीने हात धरुन तिला आत घेतले. आईला ओरडून म्हणाली, ‘‘आई ही बघ मिता, अगं ही शेजारच्या रामनगर मध्ये राहते. गेल्या आठवड्यात माझी ओळख झाली.’’ मुन्नी आणि तिची मैत्रीण माझ्या समोरच बसल्या. आईने कॉफीचे कप त्यांच्या हातात दिले. आई मुन्नीला आज कोण कोण माझे अभिनंदन करुन गेले ते सांगत सुटली. मुन्नी कॉफी घेता घेता आणि कौतुकाने माझ्याकडे पाहत होती. एवढ्यात मुन्नीच्या काहीतरी लक्षात आले. ती तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मिता, तू काय आणलस दादाला? मिताने हळूच पर्समधून गुलाबकळी काढली आणि माझ्या हातात ठेवली. ‘‘अभिनंदन’’ म्हणाली. हे म्हणताना किती घाबरली होती, हे तिच्या चेहर्यावरुन आणि थरथरणार्या हातावरुन समजत होते. मिताला पहिल्यांदा बोलताना मी पाहिले ते असे. मग मिता मुन्नीबरोबर वारंवार घरी येत राहिली. दोन महिन्यानंतर आलेल्या माझ्या वाढदिवसाला आई, मुन्नी आणि मिता यांनी मोठा बार उडवून दिला. त्या दिवशी रोज आपल्या व्यवसायात अडकलेल्या वडिलांना सक्तीने घरी थांबविले. मी कॉलेजमधून आलो, तर माझी खोली फुलांनी सुशोभित केली होती. माझ्या टेबलावर ‘हॅपी बर्थ-डे’ चे ग्रीटिंग चिकटवलेले होते. माझ्या शाळेतील, कॉलेजमधील वेगवेगळे फोटो भिंतीवर चिकटविलेले होते. खोलीत माझ्या प्रिय किशोरी ताईंची कॅसेट मंद आवाजात सुरु होती आणि माझ्या आवडीचा गोड शिरा आणि कडक कॉफी तयार होती. मी आश्चर्यचकित झालो. एवढे वाढदिवस झाले माझे पण अशी वाढदिवसाची तयारी पाहिली नव्हती. मी आईला म्हणालो, अगं केवढं हे कौतुक माझे? एवढ्या वर्षात कधी नाही आणि आज? मुन्नी म्हणाली, अरे दादा – ही सगळी मिताने केलेली तयारी. तिनेच बाबांना घरी थांबायला लावले. आणि तुझ्या खोलीची सर्व तयारीपण तिचीच. तिने लवकर येऊन मला उठवले. आणि हे सर्व तुझे फोटो वगैरे मागून घेतले. नाहीतरी आपल्या घरात कुणाचे वाढदिवस असे साजरे करतो का आपण? आणि बाबा कधी दुकान सोडून वाढदिवसाला थांबतात का? मी मिताकडे पाहिले. ती हळूच हसली आणि मला प्रचंड आवडून गेली. कोजागिरी साजरी करायला जुहू बिचवर मी, मुन्नी आणि मिता गेलेलो तेव्हा मी आणि मिता जास्त जवळ आलो. मी घरी असलो आणि माझ्या खोलीत अभ्यास सुरु असला तर मुन्नी कधीकधी मोठ्याने बोलायची. मग मिता मुन्नीला ओरडायची, मुन्नी! दादांचा इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु आहे, हळू बोल. मग मुन्नी तिच्यावर चिडायची. माहिती आहे गं, चार महिन्यापूर्वी या घरात यायला लागली आणि दादाच्या अभ्यासाची काळजी करायला लागली. या सर्व गोष्टी मी आणि मिता एकमेकांच्या जवळ यायला कारण होत होत्या. पण माझे मन म्हणत होते – प्रेम, लग्न हे नंतरचे आधी करिअर महत्त्वाचे. नुसते इंजिनिअरिंग नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनपण करायचे. लहान वयात मोठ्या पदावर पोहोचायचे. त्याकरिता मनावर लगाम हवा. तेव्हा प्रेम वगैरे सर्व काही मनात.
इंजिनिअरिंग पूरे झाले आणि कॅम्पसमधून बेंगलोर मधील कंपनीत माझी निवड झाली. आमच्या घरातून मुंबईबाहेर कोणी राहिले नव्हते. त्यामुळे आईबाबा नर्व्हस झाले. पण माझा बेंगलोरला जायचा निर्णय पक्का होता. एकतर बेंगलोर आय.टी.चे मुख्य केंद्र होत होते. त्यामुळे बेंगलोरमध्ये एक से एक हुशार माणसे जमा झाली होती. दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.
प्रसंग माणसाला बरंच काही शिकवतात, आणि अनुभवानेचं माणूस शहाणा होतो. 1977 ते 80 साल असलेले ते दिवस होते. अजूनही ते आठवतात. आणि अंगावर काटा येतो, ती प्रवासातील सत्य घटना आठवल्यावर मनांत येतं कसा निभावला तो प्रसंग आपण ? बरोबर माझा लहान मुलगा चि. प्रसाद होता. पण त्याचाही आधार वाटला मला.
लेडीज डबा सगळ्यात शेवटी, म्हणजे स्टेशन आलं तरी प्लॅटफॉर्म पासून दूर असा. त्यातून स्टेशनवरचे लाईट गेलेले, रेल्वे लेडीज डब्यात आम्ही फक्त चौघीजणीच बायका होतो. त्यात 16 वर्षाची तरुण मुलगी सरला. , मूर्तिमंत भीतीचं प्रतिक असलेली ती मुलगी मला अगदी बिलगून बसली होती. मंडळी ऐकताय ना किस्सा? मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या चार वाजता सुटणाऱ्या पंजाब मेलमध्ये आम्ही चढलो. प्रसादचे बाबा पुढच्या डब्याकडे धावले. डब्यात गर्दी नव्हती. आणि लेडीज डब्यात आम्ही चौघी जणीचं, म्हणून खुश होते. आरामात बसायला मिळेल म्हणून ह्यांनी मला व चि. प्रसादला लेडीज डब्यात बसवले होते.. ही गाडी म्हणजे पंजाब मेल, भुसावळला रात्री एकला पोहोचणार होती. भरपूर मोकळी जागा म्हणून आम्ही अक्षरशः लोळण फुगडी घेणार होतो. बाकावर गप्पा मारतांना मी गाडीतल्या बायकांना आम्ही भुसावळला उतरणार असल्याचे सांगितले. ठराविक स्टेशनलाच गाडी थांबणार होती. पंधरा मिनिटांनी गाडी सुटणार इतक्यात घाईघाईनें स्टेशन मास्तर, टीसी, हमाल, आणखी काहीजण, आणि डोळे सुजलेली खूप घाबरलेली एक मुलगी, असा लवाजमा, जेव्हा माझ्याजवळ आला. तेंव्हा काय गडबड आहे, मला काहीच कळेना. अखेर स्टेशन मास्तरांनी पुढे येऊन सगळा खुलासा केला. मी भुसावळला जाणार आहे. हे एका हमालाने ऐकल्यावर तो पळतच स्टेशन मास्तरांकडे गेला होता आणि स्टेशन मास्तरांसह माझ्यासमोर सगळी फलटण उभी राह्यली होती. सगळ्यांनी मला विनंती केली की या मुलीला तुम्ही भुसावळपर्यंत सुखरूप घेऊन जा. गोंधळलेल्या माझ्या मनाला काय प्रकार आहे काहीच समजेना. स्टेशनमास्तरांनी मग खुलासा केला, ती मुलगी म्हणजे सरला… राहणारी भुसावळची होती. भाऊ जळगावला रहात होता. त्याचा मुलगा आजारीअसल्याने त्याला ऍडमिट केलं होत. मुलाजवळ बसायला कुणी नव्हतं तरी भाऊ बहिणीला पोहॊचवायला स्टेशनवर आला. गाडी यायला वेळ होता आजारी मुलगा एकटा म्हणून त्यांनी बहिणीला भुसावळची गाडी ह्या प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचं समजावून सांगून, कसं जायचं ते सांगितलं. जळगाव भुसावळ अर्ध्या तासाचाच प्रश्न आहे, अशा विचारांनी तिला स्टेशनवर सोडून अगदी नाईलाजाने घाईघाईने तो परत गेला. दुसरीच गाडी आली.. अनांऊसमेंट न ऐकता भांबावलेली, भाच्याच्या आजारपणाच्या काळजीनें व्यग्र असलेली सरला, समोर आलेल्या डब्यात चढली. दोन तास झाले अजून भुसावळ कसं नाही आल ? ह्या विचाराने ती काळजीतून जागी झाली. घाबरत शेजारच्या माणसाला विचारले, “काका भुसावळ कधी येणार ? तर त्यांनी ही गाडी मुंबईकडे जाणारी आहे. भुसावळ मागे राहयले असं सांगितल्यावर ती घाबरून रडायलाच लागली. त्या सदगृहस्थानी टी सी ला बोलावून मुलगी चुकून दुसऱ्या गाडीत बसल्याचे सांगितले. ती गाडी होती गीतांजली. गाडी धाडधाड् पुढे धावत होती. विरुद्ध दिशेला धावणारी गाडी, ठराविकचं स्टेशनं घेत असल्याने भुसावळ पासून शेकडो मैल लांब आली होती. मागचा रस्ता बंद आणि पुढचा रस्ता चुकीचा. टीसी पण आता काय करावं ? या गोंधळात पडले. मुलगी तरुण आणि सारखी रडत होती. त्यावेळी मोबाईलची सोय नव्हती. शिवाय तिच्या घरी फोन नव्हता. बहिण अर्ध्या तासात पोहोचली असणारच म्हणून भाऊ आजारी मुलाच्या तैनातीत लागलेला. त्यातून घरी फोन नसल्याने त्याने वडिलांना पण ती येत असल्याचे कळवले नाही. इकडे सगळ्यांनी खूप विचार केला. अशा तरुण मुलीला कोणाच्याही ताब्यात न देता चांगली सज्जन माणसाची सोबत बघून भुसावळला परत पाठवण्याची जबाबदारी आता त्या लोकांवर होती. शेवटी तिला गाडीने मुंबईला आणण्याचे ठरले. टी. सी. लोकांना त्यांची ड्युटी होती. त्यांनी तिला मुंबईला आणून स्टेशन मास्तरांच्या ताब्यात दिले. चांगली सोबत बघून भुसावळला रवाना करण्याची विनंती केली. स्टेशन मास्तरही सज्जन होते. त्यांनी सरलाला शांत करून खायला प्यायला घालून आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचा दिलासा दिला.. मी भुसावळला उतरणार आहे हे माझे बोलणे हमालाने ऐकले, आणि लगेच त्याने स्टेशन मास्तरांना वर्दी दिली. कारण आत्तापर्यंत वाट चुकलेल्या सरलाची बातमी सगळ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचून प्रत्येक कर्मचारी जबाबदारीनें वागत होता. आणि मग नंतर तिची जबाबदारी आपोआपच माझ्यावर येऊन पडली. अहो हो ना! मलाही सरलाची खूप दया आली. तिच्या जागी मला माझी लेक दिसायला लागली. हे बरोबर होते त्यामुळे अपरात्री भुसावळला गाडी पोहोचणार असली तरी, ह्यांच्या जीवावर मी ती जबाबदारी मान्य केली. आणि स्टेशन मास्तरांसकट सगळ्यांनी निश्वास सोssडला. सरला मला बिलगली. माझ्या आधारावर ती निर्धास्त झाली होती. पण मला काय माहित पुढे मलाच कुणाचा तरी आधार शोधावा लागणार आहे म्हणून. अहो काय सांगू ! पुढे रामायण काय महाभारतच घडलं.. गाडी पुढे धावत होती. रात्र वाढत होती. आम्ही कड्या लावून निर्धास्त पणे मोकळ्या बाकांवर लोळण फुगडी घेणार होतो. इतक्यात कुठेतरी आड मार्गावर जंगलात कचकन गाडी थांबली. बाहेर मिट्ट काळोख, त्यातून आमचा शेवटचा डबा, दरवाजा धाडधाड वाजला. गडबडीत आम्ही खिडकीची काच लावायची विसरलो होतो. बाहेर 30एक उंच पुरे धटिंगण उभे होते. “दरवाजा खोलो नही तो गोली चलायेंगे l” त्यांच्या पठाणी आवाजातल्या धमकीने आमचे पेंगुळलेले डोळे खाडकन् उघडले. खिडकीतून हात घालून त्यांनी एका लहान मुलाचे मनगट पकडले होते. त्यांच्या हातातले पिस्तूल बघून बाळाच्या आईने आकांत मांडला. , “अहो माझ्या पोराला वाचवा हो! तिचा आक्रोश ऐकवत नव्हता. दरवाजा उघडा नाहीतर ते माझ्या लेकराला मारतील. वाचवा हो माझ्या मुलाला !” तिचा आक्रोश ऐकून आमच्या मदतीला कोणीच येणार नव्हतं. कारण जंगलात उभी असलेली गाडी. , शेवटचा डबा. , सिक्युरिटी गायब, गार्डही घाबरलेला. अशा परिस्थितीत आम्ही दरवाजा उघडला. नव्हे उघडावाच लागला 30 एक लोकं आत शिरले. रेल्वे लेडीज डबा गच्च भरला. मला त्या अंधारातही गार्ड दिसला. मी मदतीसाठी हाक मारली. गार्ड साहेब हात जोडून असहाय्य होऊन म्हणाले, ” क्षमा करा ताई. मी या जमावा पुढे एकटा काहीच नाही करू शकत. , ” मी चिडले, ” अहो पण सिक्युरिटी कुठे आहेत? ” पळता पळता गार्डनी उत्तर दिलं “इतर लोकांच्या मदतीला ते धावले आहेत. हा दोनशे लोकांचा जमाव आहे त्यांच्या गावच्या जत्रेहून ते परत आलेत. गाडीत जागा मिळावी म्हणून शंभर जणांनी रुळावर उभ राहून गाडी थांबवली. आणि जबरदस्तीने आत शिरलेत. कायदा गुंडाळून पिस्तूल ‘ काठ्यांच्या धाकाने त्यांनी पूर्ण गाडीचा ताबा घेतला आहे. सगळे लोक गाडीत चढल्याशिवाय गाडी सुरू करायची नाही. असा दम भरून, ड्रायव्हरला पकडून ठेवलय त्यांनी. या जमावापुढे आमचा स्टाफ कितीसा पुरा पडणार ? “ धापा टाकत गार्ड बोलत होते. पुरुषासारखे पुरुष जीवाच्या भीतीने हवालदिल झाले होते, तर आमच्या बायकांची काय कथा! धक्काबुक्कीत बाकावर बसलेल्या बायका चेंगरल्या गेल्या. मगाचं बाळ किंचाळून रडत होत. भीतीनें आणि भुकेनी. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळाला ती पदराआड पण घेऊ शकली नाही. कारण त्यातल्या काही मवाल्यांची नजर, तरुण सरलावरून फिरत होती. अश्लील हात वारे करून ते खिदळत होते. सरला थरथर कापायला लागली. आगीतून फुफाट्यात पडली होती बिचारी. सैतानांच्या तावडीत गाय सापडली होती. प्रसंग बाका होता.
अखेर आमच्या चौघीतली एकजण धिटाईने उभी राहिली. त्यातल्या त्यात बुजुर्ग, सभ्य वाटणाऱ्या लोकांना तिने हात जोडले. “भाईसाहेब रक्षाबंधन सणाचे महत्व तुम्ही जाणता, ही राखी मी तुम्हाला बांधते. आमचं रक्षण करा.. ” असं म्हणून तिने ओढणीचा काठ फाडला आणि म्हणाली “ आज राखी पौर्णिमा नाही, तरी पण मी तुम्हाला राखी बांधतीय. आमचे चौघींचे धर्माचे भाऊ व्हा. आणि आमचे संरक्षण करा. ” असं म्हणून तिने ओढणी पसरून संरक्षण मागितलं. आणि काय सांगू! एका क्षणात चित्र पालटलं. त्या वयस्कर सज्जनांनी असभ्य तरुणांना दम भरला. भुकेल्या बाळाची भूक भागवण्यासाठी असहाय्य आईला बाकावर बसवलं. थर थर कांपणाऱ्या सरलाच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले ” बहेनजी हम लोग आपका कुछ नही बिगाडेंगे… माँ बहन बेटी को मिलने के लिए हम हमारे देश जा रहे थे. मगर रास्ते मे ही हमे माँ बहेन बेटी मिल गई. हमारे होते हुए कोई माई का लाल आपका बाल भी बाकॅl नहीं करेगा l”
आणि ते धर्माचे भाऊ शेवट्पर्यंत शब्दाला जागले. त्यांच्या शब्दात इतकी जरब होती की त्यांच्यातल्या गुंडानी माना खाली घातल्या. सगळं चित्रच बदललं. 30 एक भावांच्या जीवावर आम्ही चौघी बहिणींनी निर्धास्तपणे पुढचा प्रवास केला. अबला स्त्रिया सबला झाल्या तरी, 25, 30 पुरुषांपुढे त्या दुबळ्याच ठरल्या असत्या. तरण्याताठ्या सरलाच्या बरोबर आमच्या तिघींच्या डोळ्यासमोर काहीही, अगदी काहीही अघटीत होऊ शकलं असतं. पण नाही.. त्या दानवांतले देव जागे झाले होते. खरंच जगात देव आहे. कुठल्याही रूपाने तो आपल्या पाठीशी उभा राहतोच राहतो.
रात्रीचे दोन वाजले. अखेर भुसावळ आलं. लहानग्या माझ्या प्रसादला कडेवर घेऊन सरलाला सांवरत सामान सांभाळत आम्ही ब्रिज ओलांडला. कारण ब्रिजच्या पलीकडे आमचं क्वार्टर होतं. ब्रिजच्या अलीकडे असलेले सरलाचं घर आम्ही गाठलं. अनोळखी माणसांच्या बरोबर आपल्या लेकीला बघून आई-वडील भांबावले. सरला आईकडे धावली. आईच्या कुशीत शिरल्यावर इतका वेळ आवरून धरलेला सरलाचा अश्रूंचा बांध कोसळून वाहू लागला. गांगरलेल्या आई-वडिलांना शांत करून ह्यांनी सारी हकीगत त्यांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ” तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. आणि माझ्या मुलीला इतक्या अपरात्री सुखरूप आणलंत.. तुमचे उपकार आम्ही कसे फेडू? आम्ही म्हणालो, ” नाही हो उपकार त्या दानवातल्या देवांचे, त्या देव माणसांचे माना. त्यांच्यामुळेचं सरला, मी, माझा मुलगा आणि त्या दोन सहप्रवासिनी बचावल्या आहेत “
मित्र-मैत्रिणींनो संपली माझी सत्यकथा. पण ही लिहीतांना मनात येतं, फोन किंवा मोबाईल शाप की वरदान? हा ऐरणींवरचा प्रश्न सोडवण्याची ती वेळ नव्हती. पण हेही तितकच खरं आहे की, जगांत माणुसकी आहे. मुळात माणूस वाईट नसतोचं त्यावेळची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. जगात दानव आहेत, तसेच दयाळू पण आहेत. दानशूर ही आहेत आणि माणुसकी जपणारी देवमाणसं पण आहेत. ह्याची प्रचिती या सत्य घटनेतूनच मला आली. आणि मी आकाशाकडे बघून त्या विश्वकर्म्याला हात जोडले.
☆ का गं तुझे डोळे ओले? – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
पूर्वसूत्र : “असं म्हणाला..?”त्या बोलल्या आणि एकदम हसतच सुटल्या. त्यांचं हसणं खरं की खोटं निमाला चटकन् समजेचना.
स्वतःला सावरण्यासाठी जवळ केलेल्या या खोट्या हसण्याच्या एवढ्याशा धक्क्यानेही कमलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा तडकून गेला…! ) इथून पुढे —
“भांडण म्हणजे पैशावरून हो”अगदी सहजपणे जवळच्या माणसाला सांगावं तसं कमलाबाई मनाच्या पार तळातलं बोलू लागल्या….,
“घरात तान्ही नात आहे माझी.याचीच मुलगी.सून ओली बाळंतीण आहे. कधी दुधातुपाला चार पैसे लागले तर जवळ नकोत माझ्या? याला कां म्हणून घ्यायचे दारू ढोसायला?
इतके दिवस मी कमावतेय. खातेय, खाऊही घालतेय. पण हे पिणं म्हटलं की डोकं सणकतंच बघा माझं.ंँनंअहो, स्वैपाककामांची एक दोन घरं धरून रहावं म्हटलं,तरी याने मला आजपर्यंत दहा घरं फिरवलंय. असे प्रत्येक ठिकाणी खरे-खोटे निरोप सांग, हातउसने पैसे घे, सुरूच याचं. माझ्या जीवावर याची चैन. लपवून तरी कुणापासून आणि किती दिवस ठेवायचं? एक काम सुटलं की मग दुसरं घर असंच सुरू आहे बघा.
पण आता मात्र हे गुडघे दुखतायत. लांबचं थोडसं अंधुक दिसायला लागलंय. मधेच कधीतरी चक्कर येते. असं कांही झालं,की मी मोठ्या आशेने मुलाकडे बघते. उगीचच वाटत रहातं, हा विचारेल, ‘ आई काय होतंय गं?’ हा एकुलता एकच मुलगा आहे वहिनी माझा आणि त्याच्याकडून माझी एवढीच अपेक्षा. पण हा?..हा सतत आपल्याच तंद्रीत!”
“कमलाबाई…पण हा..”
”हा माझा असून असा कसा, असंच ना?”
कमलाबाईंनी रोखठोक प्रश्न विचारला. शांतपणे नजर वर उचलून निमाकडे पाहिलं. पहात राहिल्या. त्या नजरेला अचानक विलक्षण धार आली.ती धारसुध्दा क्षणभर पाणावली. म्हणाल्या,
“सांगू..? तो थेट त्याच्या वडलांच्या वळणावर गेलाय.”
निमाला धस्स झालं.
कमलाबाईंनी या एकाच वाक्यात आपल्या फाटक्या संसाराची सगळी चित्त्तरकथा तिच्यासमोर एका क्षणात रेखाटलेली होती!
“ते काय करतात सध्या?”
“खोकत पडून असतात. उमेद होती तेव्हाही अंग मोडून फारसं काही करायचे नाहीतच. अतिशय आळशी, मुलखाचे हेकट, तुसडे आणि तिरसट. लग्न करून संसार थाटला पण संसाराची काळजी कशी ती नव्हतीच. घरी राबायला आणि संसाराची काळजी करायला मी होतेच की. त्यांची हक्काची ‘बाई’ आणि या पोराची हक्काची ‘आई’ म्हणून घरात आणि घराबाहेर मी राबतच राहिले. लग्नानंतर एकंदर रागरंग बघून बरोबर आठव्या दिवशी हे पोळपाट लाटणं हातात धरलं ते अजून सुटलेलं नाहीय. मुलगा लग्न करून संसाराला लागला तरीही सुटलेलं नाही..!
माहेरीही गरिबीच होती. फक्त एकच वेळ कसंबसं खायला मिळायचं. पण तो घास सुखाचा होता. रात्री पाठ टेकायला फाटकं कांबळंच असायचं, पण त्यावर सुद्धा शांत झोप लागायची. इथं सासरी येताना ती गरिबी पाठराखीणी सारखी आलीच पण तो सुखाचा घास मात्र तिथंच राहिला आणि ती शांत झोपसुद्धा!”
“पण हे इतकं सगळं सोसूनही तुम्ही…”
“मी तिथं कां रहातेय हेच ना? फक्त सूनेसाठी! एरवी जीव अडकून पडावा असं दुसरं कांही आता शिल्लकच नाहीये. पण सूनेच्या काळजीने जीव पोखरतो. आता तिच्यासाठी राबायचं. तग धरून रहायचं. लग्न झालं की पोरगा सुधारेल म्हणून मीच पुढाकार घेऊन त्याचं लग्न केलं. तिला या घरात आणली.’लग्न करून आपला नवरा कुठं सुधारला होता?’ हा रोखठोक प्रश्न मायेपोटी तेव्हा माझ्या मनाला शिवलाच नव्हता. आज ती चूक उमगतीय.आता ती निस्तरायची. जन्मभर निस्तरत रहायची. सुनेला पाहिलं की मला लग्नानंतरची ‘मी’ आठवते. माझी परवड, माझे हाल आठवतात.
हा रात्री अपरात्री ढोसून घरी येणार, तिच्या अंगावर हात टाकणार,अर्वाच्य बरळत रहाणार, तेव्हा मधे पडून त्याला अडवायला मी तिथे नको? मग सगळं सोडून मी जाऊ कुठं न् कशी? सून म्हणून राहू दे, पण आपल्याच पुढाकारामुळे या फुफाट्यात येऊन पडलेल्या एका बाईला ‘बाई’ म्हणून तरी मीच सांभाळून घ्यायचं नाही तर कुणी?
बाहेरच्या कामांनाही यायची तिची तयारी आहे. मला घरी बसा, आराम करा म्हणते.पण माझ्या पोराच्याच अंगात माज आहे. ‘माझी बायको दुसऱ्यांच्या घरी कामाला जाणार नाही’ असं म्हणतो. आजवर आई फिरत होती इतकी घरं त्याचं त्याला सोयरसुतक नाही..”
काम आवरेपर्यंत कमलाबाई असंच काही ना काही बोलत राहिल्या. काम आवरलं तसा आपला चेहरा पदराने खसखसून पुसला.त्या चेहऱ्यावरचा तडकून गेलेला तो मुखवटा व्यवस्थित सांधून टाकला आणि छान समाधानी हसल्या.
“अहो, संसार म्हणजे हे असंच. बाईमाणसाचा जन्म आपला. कुठं काय तर कुठं काय सुरु रहाणारच. पण म्हणूनच आपण खंबीर रहायचं. घरात आता एकमेकीला सांभाळायला आम्ही एकीला दोघी आहोत. छान बेस चाललंय”.
त्या गेल्या. त्या गेल्या आणि निमाला उगीचच आपली शक्ती कुणीतरी काढून घेतल्यासारखं अशक्त वाटायला लागलं. तिचा नवरा आणि केदार रिकाम्या ताटांसमोर ताटकळत बसून होते.
” संपलं ‘कमलपुराण’? वाढाs आताs” नवरा खेकसला.
दुःख कोळून पिणाऱ्या आणि तरीही हसतमुख रहाणाऱ्या, वयाने याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या अशा कमलाबाईंच्या जीवघेण्या व्यथेचा आपल्या नवऱ्याकडून झालेला हेटाळणीयुक्त एकेरी उल्लेख निमाला खटकला.तिने नजर वर उचलून रागाने त्याच्याकडं पाहिलं. तिला त्याचा चेहरा पूर्वी कधीही न पाहिलेल्या, एका कोपऱ्यात खोकत पडून राहिलेल्या कमलाबाईंच्या नवऱ्याच्या चेहऱ्यासारखाच भासू लागला आणि तिच्या नजरेतून त्याच्याबद्दलचा तिरस्कार एकाएकी भरभरून वाहू लागला.
“आईs,वाढ की गं लवकर”
तिने त्रासून केदारकडे पाहिलं. पानावर बसूनसुद्धा त्याचं डोकं हातातल्या कॉमिक्समधेच होतं. तिने पुढे होत जे पुस्तक खसकन् ओढून घेतलं आणि दूर भिरकावून दिलं.
“काय झालं..?” तिच्या नवऱ्याने त्रासिकपणे विचारलं. ती जळजळीत नजरेने त्याच्याकडेच पहात राहिली. वाढायला सुरुवात करावी म्हणून नवऱ्यानं स्वतःचं ताट पुढं सरकवलं. काहीही न बोलता तिनं स्वतःपुरतं वाढून घेतलं आणि अन्न पुढे केलं.
“मला उशीर होतोय.तुम्ही घ्या आपापलं.आणि त्यालाही वाढा” तिचा आवाज तिच्याही नकळत चढला होता. नवरा पहातच राहिला.
‘सुनेला सांभाळून घ्यायला त्या घरी कमलाबाई होत्या आणि त्यांना सांभाळायला त्यांची सून. या घरात कमलाबाई मीच आणि त्यांची सूनसुध्दा मीच.’….हा विचार मनात येताच निमाचे डोळे एकाएकी भरून आले..
“काय झालं..?” नवऱ्यानं अनपेक्षित हळुवारपणे विचारलं. पण..? काही न सांगता हा कधी आपलं दुःख समजूनच घेऊ शकत नाही हेच तर तिचं दुःख होतं!नवऱ्याचा ‘काय झालं?’हा प्रश्न तिला कवितेतल्या त्या चिमणीला पिंजऱ्यातल्या पोपटाने विचारलेल्या ‘कां ग तुझे डोळे ओले?’ या प्रश्नासारखाच वाटत राहिला! ‘माझे डोळे ओले कां? हे न सांगता राहू दे, पण सांगून तरी याला समजणाराय का?’.. मोठ्या आशेने तिने मान वर करून नवऱ्याकडे पाहिले. तो..? तो खाली मान घालून शांतपणे भुरके मारत जेवत होता!आता कधीही रडायचं नाही या निर्धाराने निमाने आपले डोळे स्वच्छ पुसून कोरडे केले. पण ते तिच्याही नकळत आतआतून ओलावतच राहिले..!
☆ का गं तुझे डोळे ओले? – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- अभ्यासाचं दप्तर तसंच पसरून केदार कॉमिक्स वाचत अंथरुणावर लोळत होता. अजून अंथरुणं गोळा व्हायचीयत हे तिला जाणवलं आणि कमलाबाई अनपेक्षितपणे आल्याचा मनाला स्पर्शू पहाणारा आनंद तिथंच विरून गेला. ‘आज कमलाबाई आल्याच नसत्या तर.. ?’ ) इथून पुढे —
ऑफिस आणि घर दोन्हीकडची कसरत खूप डोईजड व्हायला लागली तेव्हा स्वयंपाकाला बाई लावायचा तिने हट्टच धरला होता. त्याशिवाय केदारचा अभ्यासही नियमितपणे घेणे शक्य होणार नव्हते. हो नाही करता करता नवऱ्याने होकार दिला पण अंथरूणं गोळा करायचं काम निमाच्या यादीत टाकून त्याने अतिशय स्वार्थीपणाने तो ‘बार्गेन’ही जिंकलाच. त्याचा तेव्हाचा हिशोबीपणा लक्षात येऊनसुद्धा निमाला फारसा खुपला नव्हता, .. पण आज.. ?
कमलाबाई स्वैपाकीणबाई होत्या. स्वयंपाक हे एरवी निमाचं काम. त्या आल्या नाहीत तर ते तिनेच करायला हवं. त्या आल्या नाहीत म्हणून हिच्या नवऱ्याच्या किंवा मुलाच्या वेळापत्रकात काही फरक का पडावा? नवऱ्याचं आणि मुलाचं हे असं आत्मकेंद्री वागणं इतक्या खोलवर आजपर्यंत तिला कधी खुपलंच नव्हतं. तिच्या ऑफिसमधे गेले दोन दिवस आॅडिट सुरु होतं. रोजच्यापेक्षा उद्या सकाळी लवकर निघायचंय हे ती आदल्या रात्रीपासून घोकत होती. आजची तिची वेळेची निकड तिच्या नवऱ्याला अर्थातच आधीपासून माहीत होती. केदारसुद्धा रांगत्या बाळाएवढा अजाण नव्हता. तरीही कमलाबाईंच्या अचानक न येण्यामुळं उद्भवलेल्या परिस्थितीत आपसूक पुढं येणं आवश्यक असणारा दोघांच्या मदतीचा हात जागचा हलला नव्हता. नवऱ्याच्या आणि मुलाच्या या स्वार्थीपणाचं दर्शन इतक्या लख्खपणानं असं तिला प्रथमच दुखवून गेलं.. ! आपण या घरात केवळ ‘बाई’ म्हणून गृहीत धरले जातोय या विचाराची तीक्ष्ण बोच तिला खुपू लागली. स्वतःच्या तथाकथित सुखवस्तू, सुसंस्कृत आणि सुरक्षित घरातही तिला उगीचच अगदी एकटं एकटं वाटू लागलं.
कमलाबाई आल्या, अगदी अनपेक्षित आल्या, पण त्यांच्या येण्याने तिला झालेला आनंद उमलण्यापूर्वीच मलूल होऊन गेला. आपल्यापेक्षा याच कितीतरी सुखी!समाधानी! दुसऱ्यांच्या घरी स्वैपाकपाण्याची कामं का असेनात पण स्वाभिमानाने करतायत. स्वाभिमानाने जगतायत. चार महिने होऊन गेले त्या कामाला यायला लागून. पण कधी कामं टाळणं नाही, चुकारपणा नाही, अघळपघळ गप्पा नाहीत, वाढत्या महागाईला शिव्याशाप नाहीत, नवऱ्याबद्दल कसली गाऱ्हाणी नाहीत, मुलासूनेबद्दल कुरबुरी नाहीत, सुखाने ओथंबून गेल्यासारख्या शांत, आनंदी, हसतमुख, समाधानी आहेत.
नाहीतर आपण! ‘नोकरी करणारीच मुलगी हवी ही मुख्य अट पूर्ण करीत होतो म्हणून इथे पसंत पडलो. आपण नाकारावं असं त्यावेळी जाणवणारं नवऱ्याचं काही नव्हतंच. म्हणून मग लग्न झालं. आणि.. आणि पूर्ण वेळेची दुसरी नोकरी असावी तसं हे घरकाम आपल्याला चिकटून बसलं!आपलं घर, आपलं काम म्हणून सगळं हौसेनं करीत राहिलो सुरुवातीला पण
आपलेपणाची ही अशी गुंतवणूक एकतर्फीच वाढत राहिली. आपण थोडे चिडलो, संतापलो, चडफडलो, कातावलो आणि मग हळूहळू निर्ढावलोसुद्धा!!
पण इतके दिवस निर्ढावलंय असं वाटणारं आपलं मन अजून मेलेलं नाहीये. म्हणूनच तर वाटतंय आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला बाळसेदार पगार या सगळ्यापासून मिळणाऱ्या दिखाऊ समाधानापेक्षा कमलाबाईंना मिळणारं समाधान कितीतरी पटीने निखळ आहे!.. ‘
कमलाबाईंची आठवण झाली आणि जेवणाचे डबे घासून घेता घेता तिनं चमकून त्यांच्याकडं पाहिलं तर भाजी चिरता चिरता त्या पदरानं डोळे पुसत होत्या.
“काय झालंय हो? तब्येत बरी नाहीये कां?” निमाने हळुवारपणे विचारलं आणि तिला एकदम त्या सकाळच्या निरोपाची आठवण झाली.
” कमलाबाई, काय झालंय सांगा बरं.. “
” कुठं काय?.. कांही नाही.. खरंच. “
” रडताय तुम्ही.. “
“छे हो.. “.. त्या एवढंसं हसल्या. “आत्ता कांदा चिरत होते ना, तो झोंबलाय डोळ्यांना” त्या स्वतःशीच बोलल्या. निमाला त्यांची मनापासून किंव वाटली.
” आज येणार नव्हतात ना? एक मुलगा निरोप सांगून गेला होता”
” एक मुलगा?” त्यांनी दचकून विचारलं. “काय सांगितलायन निरोप?”
“तुम्ही आज येणार नाही म्हणाला होता”
“असं म्हणाला? कोण तो? कसा होता?”
“कसा म्हणजे? पोरसवदाच होता. चोवीस पंचवीसचा. काळासावळा.. “
“.. आणि कळकटलेल्या तेलकट चेहऱ्याचा.. केस पिंजारलेले होते.. कपडे मळकट होते… आंघोळसुद्धा झालेली नव्हती… डोळ्यांत चिपडं तशीच होती… “
निमा थक्क होऊन ऐकत राहिली.
“वहिनी, अहो तो माझाच मुलगा असणार. केव्हा घराबाहेर पडला आणि निरोप देऊन गेला पत्ताही लागू दिला नाही बघा मला. “
निमा अवाक् होऊन या कमलाबाईंचं निरोगी सुंदर रूप आणि तो कळकट मुलगा यांचं समीकरण जुळवत राहिली.
“कां येणार नाही म्हणाला हो तो? माझ्या तब्येतीचं काही बोलला का?”
“अं.. ?”निमा अडखळली. तिला आता खरं बोलावं की बोलू नये याचा पटकन् निर्णय घेता येईना. पण त्याचवेळी तिला कमलाबाईंच्या हसऱ्या, आनंदी मुखवट्यामागचा खरा चेहरा पहाण्याची विलक्षण ओढ लागून राहिली.
“म्हणाला, घरी भांडणं झालीयत”
त्यांनी चमकून वर पाहिलं.
“असं म्हणाला.. ?” त्यानी विचारलं आणि एकदम हसतच सुटल्या. त्यांचं हसणं खरं की खोटं निमाला चटकन् समजेचना.
स्वतःला सावरण्यासाठी जवळ केलेल्या त्या खोट्या हसण्याच्या एवढ्याशा धक्क्यानेच कमलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा तडकून गेला… !