मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन प्रवाह.. एकच स्पंदन..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘दोन प्रवाह.. एकच स्पंदन..☆ श्री दिवाकर बुरसे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरली होती.

आकाशात तारे डोळे मिचवावून एकमेकांना काहीतरी सांगत होते,

पण त्यांची भाषा अजूनही समजलेली नव्हती.

त्या शांततेत,

एक तरुण टेकडीवर बसला होता,

प्रश्नांनी भरलेला, उत्तरांच्या शोधात हरवलेला !

 

त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं—

“हे सगळं नेमकं काय आहे?”

त्याच्या प्रश्नाला प्रतिसाद देत, कुठूनतरी दोन आवाज उमटले—

एक स्पष्ट, ठाम; दुसरा शांत, खोल.

 

“मी सांगतो, ” पहिला आवाज म्हणाला,

“मी विश्व उलगडतो —

कणांच्या नृत्यातून, ताऱ्यांच्या प्रवासातून.

मी तुला सांगतो—हे सगळं कसं घडतं।”

 

तरुणाने वळून पाहिलं—

त्याच्या समोर एक तेजस्वी व्यक्ती उभी होती,

डोळ्यांत जिज्ञासेची ज्योत.

“तू कोण?”

“मी— *विज्ञान*!”

 

इतक्यात दुसरा आवाज हळूच उमटला—

जणू वाऱ्याने मनाला स्पर्श केला

“आणि मी तुला सांगतो, ” तो म्हणाला,

“हे सगळं का आहे. ”

 

तरुणाने डोळे मिटले—

आणि त्याला एक शांत अस्तित्व जाणवलं,

अगदी स्वतःच्या आत आत.

 

“तू?”

“मी— अध्यात्म!”

 

क्षणभर तिघेही शांत बसले.

 

तारे वरून पाहत होते,

जणू या भेटीची साक्ष देत.

 

तरुण थोडा गोंधळला—

“तुम्ही दोघं वेगळं का बोलता?

एक ‘कसं’ सांगतो, दुसरा ‘का’…

मग खरं कोण?”

 

विज्ञान हसलं—

“मी तुला विश्वाचं चित्र दाखवतो,

पण त्या चित्राचा अर्थ…

तो कदाचित माझ्याही पलीकडे आहे. ”

 

अध्यात्म शांतपणे म्हणालं—

“मी तुला त्या अर्थाचा अनुभव देतो.

पण तो कसा घडतो—

हे मला शब्दात सांगता येत नाही. ”

 

तरुणाच्या मनात एक लहर उठली.

त्याने पुन्हा आकाशाकडे पाहिलं,

आणि मग..

 स्वतःच्या आत.

 

त्याला जाणवलं—

बाहेरचं विश्व आणि आतलं मन

एकमेकांपासून वेगळं नाहीत.

त्या क्षणी,

विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांकडे पाहून हसले !

 

“आपण विरोधक नाही, ” विज्ञान म्हणालं,

“आपण दोन दिशांनी चालणारे एकच प्रवासी आहोत।”

“हो, ” अध्यात्म म्हणालं,

“तू प्रकाश देतोस, मी शांतता.

पण प्रकाशाला अर्थ देणारी शांतता,

आणि शांततेला दिसणारा प्रकाश—

दोन्ही एकत्रच पूर्ण होतात।”

 

तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली.

तो आता उत्तर शोधत नव्हता—

तो समजत होता.

त्याने डोळे मिटले,

आणि त्या क्षणी त्याला जाणवलं—

ना केवळ तारे दूर आहेत,

ना केवळ मन आत आहे;

दोन्ही एकाच स्पंदनाचे दोन स्वर आहेत !

 

रात्र अजूनही होती,

तारे अजूनही चमकत होते,

पण आता त्या तरुणासाठी

अंधार नव्हता—

कारण त्याने दोन प्रकाश शोधले होते—

एक बाहेर,

एक आत.

आणि त्या दोन्हींच्या संगमात

त्याला सापडलं—

एकच सत्य.

 

शेवट नाही…

कारण हा प्रवास थांबत नाही.

प्रश्न पुन्हा जन्म घेतात,

उत्तरं पुन्हा बदलतात.

पण आता भेद इतकाच—

तो एकटा नाही.

त्याच्यासोबत आहेत—

विज्ञानाचा प्रकाश

आणि अध्यात्माची शांतता !

आणि त्यांच्या मध्ये धडधडतंय—

एकच, अखंड स्पंदन !!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ देणाऱ्याने देत जावे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

(विंदा)

गोष्ट १९६४-६५ सालातली. नागरजीभाई मेहता हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या (पूर्वीच्या ठाणे – आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी गावातल्या शाळेतले शिक्षक – आज जरा ते चिंतामग्न होते. निवृत्ती जवळ आलेली. पण घरची आर्थिक घडी म्हणावी तशी नीट बसलेली नव्हती. चारही अपत्यांची शिक्षणं अजून पूर्ण व्हायची होती – अजून ती मार्गी लागायची बाकी होती. निवृत्तीनंतर ही गणितं कशी जुळणार? गुरुजी तर अगदी हवालदिल होऊन गेले होते.

शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी सोसायटीचे सर्वेसर्वा – सेक्रेटरी साहेबांना एक विनंती अर्ज पाठवून दिला. वयानुसार निवृत्तीकाळ आला आहे पण आर्थिक अडचणी लक्षात घेता मेहेरबानी करून एक वर्ष मुदतवाढ मिळू शकेल का अशी विनंती त्या पत्रात केली होती.

अर्ज विचारात घेतला गेला, गुरुजींचा व्यासंग आणि अनुभव लक्षात घेता, विशेष प्रकरण / case म्हणून संस्थेद्वारा एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मंजूरी आली. गुरुजींना हायसे वाटले.

इथे नियतीने एक वेगळीच कलाटणी घेतली. संस्थेच्या कारकुनाने गुरुजींच्या अर्जाची प्रत शिक्षण मंत्रालयाला पाठवून दिली व मुदतवाढीचा अर्ज केला. कागदी घोडे त्यांच्या गतीने चालले व सरकारकडूनही गुरुजींच्या मुदतवाढीस मंजुरी आली. कारकुनाने ही बाब सेक्रेटरी साहेबांच्या कानी घातली.

दिवसामागून दिवस भराभर चालले होते. गुरुजींचे अध्यापनाचे काम नेहमीप्रमाणेच जोमात चालू होते. आणि तेव्हाच सेक्रेटरी साहेबांचा निरोप आला.

“मी सोसायटीद्वारा तुम्हाला एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली होती. या वर्षी सरकारनेच तुम्हाला मुदतवाढ दिली आहे. तुमचा या वर्षीचा पगार सरकारकडूनच येणार आहे, त्यामुळे तुम्ही सोसायटीला पुढच्या वर्षीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा अर्ज करा. तुम्हाला सोसायटीतर्फे अजून एक वर्ष मुदतवाढ मिळेल. “

गुरुजी आनंदले. त्यांनी परत अर्ज केला. तो मंजूर झालाच पण कारकूनानेही परत सरकारकडून आणखी एका वर्षाचे extension मिळवले.

पुढची ४-५ वर्षे हा सिलसिला चालूच राहिला. गुरुजींच्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली, मुलं हाताशी आली आणि शेवटी गुरुजींनी स्वत:हून सेक्रेटरी साहेबांना पत्र लिहीले व आता निवृत्त होण्यासाठी परवानगी मागितली.

— —

१९९३ –

१९१८ साली स्थापन झालेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे ७५ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायचे घाटत होते. त्यानिमित्ताने संस्थेच्या बोर्डी शाळेतील हयात असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजिलेला होता. मेहता गुरुजींनाही आमंत्रण गेले होते. मात्र गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव झोनल सेक्रेटरींना प्रत्यक्ष येऊन भेटून गेले – आपण देऊ केलेल्या सन्मानाबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत, पण गुरुजी अंथरुणाला खिळून आहेत. ते इथे कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकणार.

झोनल सेक्रेटरींनी हा निरोप सेक्रेटरी साहेबांना कळवला होता. सेक्रेटरी साहेबांनी त्यांची appointements diary पाहिली व बोर्डी झोनल सेक्रेटरींना एक निरोप पाठवला. ते स्वत: मेहता गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार होते.

मेहता गुरुजींच्या घरी निरोप पाठवण्यात आला. मुलाला आनंद झालाच पण गुरुजींना यातील काय कळणार असा प्रश्नही पडला. गुरुजींचे वय आता नव्वदीच्या पुढे गेले होते, गेले सहा महिने ते कोमा सदृश निपचित पडूनच होते. पण त्याने सेक्रेटरी साहेब येणार असा निरोप मात्र गुरुजींना सांगितला.

बोर्डीतील माजी शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम फारच हृदयस्पर्शी झाला. सेक्रेटरी व झोनल सेक्रेटरी आता गुरुजींच्या घरी – बोर्डीपासून ४०-५० किलोमीटर दूर – वलवाडा गावी निघाले होते.

गुरुजींच्या घरी ते पोचल्यावर मुलाने गुरुजींना सेक्रेटरी साहेब आले आहेत असं सांगितले मात्र, जणू जादूची कांडी फिरावी तसे गुरुजी उठून बसले. हात जोडून ते म्हणाले, “सोसायटीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत, बोला मी आपली काय सेवा करू शकतो? “

ज्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्याला नोकरीत मुदतवाढ दिली ते साहेब निवृत्त झाले आहेत, हे नवीन साहेब आहेत हा तपशील गुरुजींच्या ध्यानात येत नव्हता, पण सोसायटीचे सेक्रेटरी स्वत: आपल्या दारात आले आहेत हे मात्र त्यांना उमगत होते.

संस्थेला अजून खूप पल्ला गाठायचा होता. बोर्डी परिसरात अजून विज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय नव्हते. डिग्रीसाठी जवळचे सायन्स कॉलेज पालघरला – बोर्डीहून अजून पन्नास किलोमीटरवर होते. इतक्या दूर मुला मुलींना शिकायला पाठवायला अडाणी अशिक्षित पालक तयार नसत. जो भरवसा; जो विश्वास त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीवर होता तो त्यांना या दूरच्या कॉलेजबद्दल नव्हता. पण यामुळे अनेक मुला-मुलींची शिक्षणं बाराव्वीतच संपत. पुढील शिक्षणापासून ते वंचित रहात. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातून आलेले हे बहुतेक सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी first generation learner होते. त्यांचे आई वडिल अशिक्षित / अल्प शिक्षित होते. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते गोखले एज्युकेशन सोसायटीकडे मोठ्या आशेने पहात होते.

करायचं खूप होतं, पण आर्थिक चणचण होती. सायन्स कॉलेजसाठी निदान ३०-४० लाख रुपयांची गरज होती. थोडीफार देणगी उभी रहात होती पण अपेक्षित रकमेच्या पासंगालाही तेवढे पैसे पुरत नव्हते. निदान काही खोल्या बांधून एखाद्या पदवी अभ्यासक्रमाचे तरी कॉलेज सुरू करता आले तर हवे होते.

सेक्रेटरी साहेबांच्या मनात क्षणार्धात हे सगळे विचार येऊन गेले पण आपण एका निवृत्त शिक्षकाच्या घरी आहोत याचे त्यांना भान होते. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यांनी गुरुजींना सोसायटीच्या पुढच्या वाटचालीची – ध्येयधोरणांची कल्पना दिली. गुरुजींना आतपर्यंत काय पोचलं; किती पोचलं कळलं नाही, सेक्रेटरी साहेब स्वत: आपल्या घरी आले यातच ते कृतकृत्य झाले होते.

काही दिवसांनंतरची गोष्ट. झोनल सेक्रेटरी मेहता गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले होते. गुरुजी कमालीचे अशक्त झाले होते, बोलताही येत नव्हतं त्यांना. गुरुजींनी एक पाटी मागवून त्यांच्या मातृभाषेत – गुजरातीत – तमारू काम थई गयू – तुमचं काम झालं – असे लिहून दाखवले. सरांना काही रेफरन्स लागला नाही.

त्याच्या दुसऱ्या दिवशी, झोनल सेक्रेटरी आपल्या ऑफिसमध्ये बसले होते, शिपायाने निरोप आणला – वलवाड्याहून मेहता गुरुजींची मुले आली आहेत.

तीन मुलगे व एक मुलगी – चेहऱ्यावर अतिशय कृतज्ञता भावाने आत आले.

“सर, तुम्ही सेक्रेटरी साहेबांना घेऊन आमच्या घरी आलात, आम्ही आपले खूप आभारी आहोत. गुरुजी तर अजून त्याच धुंदीत आहेत. आपण संस्थेच्या सायन्स कॉलेजच्या स्वप्नाविषयी सांगत होतात. गुरुजींच्यातर्फे आम्ही एक छोटी भेट आणली आहे त्याचा स्वीकार करावा. “

झोनल सेक्रेटरी सरांनी पाकिट उघडून बघितले – त्या पाकिटात चाळीस लाख रुपयांचा एक चेक होता आणि समुद्राभिमुख अशा एका सुंदर इमारतीचा – ज्यात एक मोठा हॉल, क्लासरूम्स / वर्ग, प्रयोगशाळा, ऑफिस, असा सहा सात डिपार्टमेंटसना पुरेल अशा रचनेचा आराखडा होता. “सर, आपल्या कॉलेजसाठी चालेल ना हे डिझाईन? “

झोनल सेक्रेटरी सर स्तब्ध झाले. कविवर्य विं दा करंदीकरांच्या ओळी त्यांना आठवल्या –

देणाऱ्याने देत जावे,

घेणाऱ्याने घेत जावे.

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे.

— —

१९९४

मार्च महिना – वृद्धापकाळाने जराजर्जर झालेले मेहता गुरुजी आज पुन्हा बोर्डीच्या समुद्रकिनारी आले होते. संस्थेच्या कॉलेजच्या भुमीपूजन समारोहासाठी – झोनल सेक्रेटरींना त्यांनी जे लिहून दिलं होतं – तुमचं कॉलेजचं काम नक्की होणार – ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.

दुर्दैवाने भुमीपूजनानंतर थोड्याच दिवसांत गुरुजींनी देह ठेवला पण त्यांच्या मुलांनी ती वास्तू मोठ्या दिमाखात उभारून वडिलांचे नाव अजरामर केले.

— —

२०१९ – २०२०

१९९४ साली स्थापन झालेल्या बोर्डीच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या N B Mehta (Valwada) Science College चे रजत जयंती वर्ष आहे.

नैसर्गिक उजेड, समुद्राची साद, नारळीची झाडे अशा सोबतीने ३६० विद्यार्थ्यांसह single faculty असे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या कॉलेजमध्ये आता १५०० च्या जवळपास विद्यार्थी शिकत आहेत. कॉलेजमध्ये विविध विषयांत पदवी; पद्व्युत्तर शिक्षणतर आहेच पण दोन विषयांत PhD संशोधनासाठी मान्यताही मिळालेली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात कॉलेजला महाराष्ट्र शासनातर्फे “जागर जाणिवांचा” हे जिल्हा स्तरावरील पारितोषिक व २०१२ साली मुंबई विद्यापीठाचा Best College – Rural अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

मेहता कुटुंबियांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा छान वटवृक्ष होत आहे आणि सावित्रीच्या लेकींना आणि लेकांना आता शिक्षणासाठी दूरवर पायपीट करावी लागत नाहीये.

 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे ☆ मंजुषा सुनीत मुळे 

“ अगं आज दिवसभरात तू सकाळची पुरवणी पाहिलेली दिसत नाहीये.. ”

“ का हो.. काही विशेष बातमी आहे का? “ 

“ हो तर.. आणि खरं तर ती तूच मला सांगशील म्हणून वाट पाहात होतो मी. हे बघ.. नेहेमी ज्या हॉलमध्ये फक्त गार्डनचा सेल लागतो, त्याच हॉलमध्ये अजून मोठा सेल लागलाय म्हणे. “

“ बघू बघू.. “ –

– – मोदकासाठी सारण करत असलेल्या सविताबाई तशाच लगेच आल्या आणि अशोकरावांच्या हातातलं पेपरचं ते पान त्यांनी पट्कन ओढून घेतलं… “ सुवर्णा गॅस बारीक कर आणि सारण सारखं हलवत रहा.. आलेच मी.. “ असं म्हणत त्यांनी शेजारच्या टेबलावर ते पान पूर्ण उघडून ठेवलं…आणि खुर्चीत टेकल्या.

खूप मोठी पानभर जाहिरात.. इतर बातम्या न वाचण्याचा option नेहेमीच असतो त्यांना, पण साड्यांच्या सेलची जाहिरात म्हटल्यावर अथपासून इतिपर्यंत वाचलीच पाहिजे असा जणू दंडकच होता त्यांच्यासाठी….. त्या सेलमध्ये भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या असणार होत्या… त्याही

‘ आकर्षक ‘ डिस्काउंटसकट.. (आणि प्रत्यक्षात त्या साड्या आकर्षक असोत वा नसोत.. डिस्काऊंटला मात्र “आकर्षक” हे विशेषण असायलाच हवं असं बहुतेक संविधानातच लिहिलंय की काय या विचाराने अशोकरावांना हसू आलं)

ती जाहिरात पूर्ण वाचून झाल्यावर त्यांनी सुवर्णाला (कधी नव्हे ती) आपुलकीने हाक मारली.. “ अगं इकडे ये पटकन.. ही जाहिरात बघ.. “ 

– आणि कधी नव्हे ती एवढी प्रेमळ हाक ऐकून ‘ गॅसवरचं सारण शिजलंय नीट ‘ असं गृहीत धरून सुवर्णाने झटदिशी गॅस बंद केला आणि ती पळतच तिथे गेली …. आणि मग घड्याळाचे काटेही जणू फिरायचं विसरले. त्या सेलमधल्या अजून पाहिलेल्याही नसलेल्या साड्यांमध्ये दोघी अगदी हरवून गेल्या. (‘ मी मज हरपून बसले sss गं ‘ हे गाणं बहुतेक यांच्यासारख्या बायकांकडे बघूनच सुचलं असावं हा विचार मनात येऊन अशोकराव स्वतःशीच हसत तिथून उठले.) आणि दोघींचं चक्क एकमत झालं.. ठरलं – – “ उद्या सकाळी पटापट कामं आवरू आणि जाऊ हे प्रदर्शन बघायला.. “ (.. हे वाक्य तर गृहीतच धरलं होतं अशोकरावांनी. आता साडी-खरेदी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयाबाबत सासू-सुनेत खडाष्टक योग डोकावणं कधीतरी शक्य होईल का? नाहीच … असं गृहीत धरून अशोकराव निर्धास्त झाले.)

ती पानभर जाहिरात बारकाईने वाचत वाचत पानाच्या शेवटच्या टोकाशी आल्यावर दोघीही एकदम दचकल्या…. एक लहानशी चौकट.. “ आज चंद्रोदय रात्री ८ वाजून ४७ मि. “ … आणि घड्याळाची टकटक अचानक सुरू झाली. चक्क आठ वाजून गेले होते, मोदकाचं सारण सोडलं तर सगळा स्वयंपाक व्हायचा होता.

सविताबाई नाईलाजाने उठल्या. ‘ ही चतुर्थी म्हटलं ना की ‘ असं स्वतःशीच पुटपुटत त्यांनी घाईघाईने गॅसवर कुकर चढवला … आणि उशीर झाल्यामुळे, कुकरला प्रेशर येण्याआधी त्यांचं ब्लड प्रेशरच बरंच वाढलं होतं. सुवर्णा खरंतर अगदी पटापट भाजी चिरत होती, पण त्या नादात “ कान्दा राहिला हातात आणि सुरी गेली की बोटात.. ‘ आई ग्ग ‘ ती कळवळली.. आणि कुकरची शिट्टी दोन ठिकाणी वाजली … सविताबाई तिच्यावर आधी एकदा खेकसल्या होत्याच.. “ अगं किती हा संथपणा.. आवर पटकन आणि लगेच तांदळाची पिठी काढ परातीत. ”.. आणि आता परत.. “ साधी भाजी चिरायलाही शिकून आली नाहीयेस का माहेराहून “.. त्यांचा टोन ऐकून ती घाबरली आणि तिचं बी. पी. घसरायला लागलं बहुतेक.. सून म्हणून नुकतीच तर आली होती ती त्या घरात … बावरून गेली एकदम.. कुठे काय ठेवलेलं असतं हेही कळलं नव्हतं अजून तिला.. कापलेलं बोट तोंडात धरलं आणि तांदुळाची पिठी समजून चुकून तिने मैदा काढला परातीत. पटकन भाजी फोडणीला टाकून सुनीताबाईंनी गॅसवर उकडीसाठी पाणी तापत ठेवलं आणि परात पुढे घेतली.. आणि झालं … तो मैदा पाहून त्यांचा संताप उतू जाणाऱ्या दुधासारखा अनावर झाला

…तोंडाचा दांडपट्टा सुरु होताच …. “ काहीच शिकवून पाठवलेलं दिसत नाहीये आईने.. साधा मैदा आणि पिठीतला फरक कळत नाही.. त्या डिग्र्या काय चाटायच्यात? उंडगी कुठली “ … बडबड करतच त्या स्वतः कपाटातला पिढीचा डबा काढायला गेल्या.. आणि सुनेकडे रागाचे कटाक्ष टाकण्याच्या नादात त्यांच्या हातून तो डबा चक्क धारातीर्थी पडला. “ आता कसा दाखवणार आहे मी मोदकाचा नैवेद्य.. की नुसतं सारण देवापुढे ठेवून म्हणू की बाबा हेच मोदक आहेत असं समज आणि पावन करून घे म्हणून ”.. आता आवाज अगदी टिपेला पोहोचलेला.. नेहेमीसारखाच.

…… धाड्कन आवाज ऐकून अशोकराव स्वैपाकघरात आले. बायकोच्या चेहेऱ्यावरचा उकळता संताप आणि सुनेच्या डोळ्यातून घळाघळा ओघळणारं पाणी पाहून सगळी परिस्थिती त्या अनुभवी नवऱ्याच्या लगेच लक्षात आली. भेदरून उभ्या असलेल्या सुनेला त्यांनी प्रेमळ नजरेनेच दिलासा दिला, आणि बायकोला म्हणाले … “ अगं असू दे.. होतं असं कधीतरी. हे बघ बाकी सगळा स्वैपाक झालाय ना… मग यावेळी मोदक राहू देत… गूळ खोबऱ्याचं सारण तयार आहे ना… आज त्याचाच नैवेद्य दाखव. मोदक राहू देत. गणपती काही संतापणार नाही तुझ्यासारखा. आणि तू आता पूजा करायला जा बघू.. सुवर्णा पट्कन पोळ्या करेल…” सुवर्णाने लगेच मान हलवली. सविताबाईंना ऐकण्याशिवाय पर्याय नव्हताच. तोंडाने बडबड आणि डोळ्यांनी तीक्ष्ण कटाक्ष टाकतच त्या पूजेसाठी देवघरात आल्या…अर्थात पूजा यांत्रिकपणे सुरू झाली.. गणपतीला त्याचं काही वाटलं नसावं कारण हा अनुभव काही नवा नव्हता त्याच्यासाठी… हा विचार अशोकरावांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. पण आता ते एका वेगळ्याच कारणाने हळूच हसत होते.. ‘उद्याची यांची प्रदर्शन भेट मनातला राग आणि ते सारण पचेपर्यंत तरी पुढे ढकलली जाणार आणि तितके दिवस माझा खिसा सुरक्षित राहणार’या विचाराने. असो.

… देव बिचारे समजुतदार… झाली तशी पूजा करुन घेतली त्यांनी.. नेहेमीसारखीच मुकाट्याने … आणि त्या बाहेर आल्या… इतक्यात सुवर्णा सारणाची वाटी घेऊन समोर आली… ‘‘आई हाच नैवेद्य दाखवणार ना आज? कुठे ठेऊ? देवळातच नेऊन ठेवू? ” … झालं… सविताबाई पुन्हा तिच्यावर डाफरल्या…. आणि तसंही आता डाफरण्यासाठी खरं तर एखाद्या valid कारणाची गरजच नव्हती ना?

‘‘काय म्हणालीस? देवळात ठेवायला नैवेद्य? कुठल्या देवळात जायचंय? ” सुवर्णाने काही न बोलता देवघराकडे बोट दाखवलं…

‘‘बाई बाई बाई …कमाल झाली आता… अगं याला देवघर म्हणतात… देऊळ नाही… कितीदा सांगायचं तुला? ”

‘‘सॉरी आई… पण माझ्या माहेरी याला देऊळच म्हणतात… तेच आठवलं मला…”

‘‘आता विसरा माहेरची कौतुकं… देऊळ म्हणे… काय काय चुकीचं शिकवून पाठवलंय कोण जाणे आई-बापांनी…” आणि सविताचा संपत आलेला संयम आता पारच संपला… आणि बहुतेक गणपतीचाही संपलाच असावा. … 

विषय अनिर्बंध भरकटत चालला होता. एव्हाना मुलगा सुजीतही घरी आला होता. पण अशोकरावांनी लगेच त्याला बाजूला घेऊन परिस्थिती सांगितली. तो बिचारा वडलांवर गेलेला. गुपचूप खोलीत जाऊन कपडे बदलून आला आणि पानं घ्यायला लागला… सुवर्णा पुढे आली. तिला हातानेच थांबायची खूण केली. तोपर्यंत अशोकराव फक्त नैवेद्याची वाटी घेऊन देवघरात गेले आणि गणपतीची क्षमा मागत नैवेद्य दाखवून बाहेर आले. सगळ्यांनाच भूक लागली होती… सगळे गुपचुप जेवायला बसले… बाप्पालाही नक्कीच अगदी हुश्श झालं असणार.

….. आणि मी? सविताच्या घराच्या बरोब्बर समोर आमच्या घराचं दार ना! समोरच्या घरात मोठमोठ्याने बोलणं ऐकू आलं… मग मी घरात कशी बसून राहू शकते हो? मी माझ्या दारात उभी राहून कानोसा घेऊ लागले. शेजारीण म्हणून जणू आद्य कर्तव्य होतं ते माझं. पण ते भांडण एन्जॉय करण्यात माझा किती वेळ गेला कोण जाणे… आता समोर सारे कसे शांत शांत भासत होते… मग मीही नाईलाजाने घरात जायला वळले……

आणि.. आणि अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं… ‘‘चला… गॅसवरची भाजी करपून कोळसा झालाय तिचा आता…” मी दचकून वळून पाहिलं आणि घाबरलेच… चक्क बाप्पा उभा होता माझ्याकडे हसून बघत…

‘‘ झाली ना इतरांची भांडणं एंजॉय करुन? आणि काय गं.. इतकी मैत्री आहे ना तुझी त्या सविताशी? आणि स्वत:ला खूप प्रगल्भ विचारांची समजतेस ना? … म्हणजे अहंकारच बाळगतेस की त्यासाठी… मग जाऊन सांगायचंस ना तिला की तिच्या चिडचिडीला काहीच अर्थ नाही म्हणून. अगं मारे प्रवचने देतेस ना की… देव सर्वत्र आहे… देऊळ, देवघर, देवालय, मंदिर.. काहीही म्हटलं तरी देव तिथे असतो कुठे? ‘सर्वाभूती परमेश्वर’ असं शिकवतेस ना इतरांना…आणि देव फक्त भावभक्तीचा भुकेला असतो हेही सांगतेस की शहाजोगपणा करत.. ठेक्यावर गाणीबिणी गात. पण तुझा हा वस्तादपणा माझ्यापासून लपला नाहीये हे लक्षात ठेव कायमचं. … ‘इथे ज्ञान पाजळल्याबद्दल कुणी हार घालणार नाही… समोर तबकही नाही… मग कशाला पडायचं या भानगडीत? ’ असाच विचार केला असशील… बरोबर ना? … खोटारडी कुठली.. आता तरी सुधारा रे… देवाला काय आवडतं… मोदक… की खीर… की श्रीखंड…. हे तुम्हीच ठरवा.. तुम्हाला काय खावंसं वाटतंय त्यावरून.. भोज्याला शिवून यावं तशी नैवैद्याची वाटी देवासमोर ठेवायची आणि लगेच आणून आपल्या ताटात ठेवायची की झाली पूजा पूर्ण… असंच ना? नाही गं नाही… मनापासूनचा एक नमस्कार आणि मनातली समर्पण भावना एवढंच अगदी हवं असतं गं आम्हाला … असो… मी सांगतोय ते काहीच तुझ्या डोक्यात.. खरंतर मनात शिरत नाहिये हे कळलंय मला तुझा चेहेरा पाहून… मी तरी का तुझं भलं करायला चाललोय… जाऊ दे …. आदतसे मजबूर हेच कारण आम्हा भोळ्या भाबड्या देवांचं…. असो.. आता त्या सवितासारखा तणतणत का होईना पण करणार आहेस की नाही मला नैवेद्य दाखवण्याचा ‘उपचार’? अगं तुलाच जे्वायला उशीर झाला की चक्कर येते असं सांगून सगळ्यांच्या आधी जेवून घेतेस नेहेमी हे इतरांना नसलं तरी मला माहितीये हे विसरू नकोस. आणि हो.. नैवेद्याच्या ताटात ती करपलेली भाजी तेवढी वाढू नकोस हं प्लीज…कारण ती मला नाही तर तुलाच खावी लागेल ना मग? … नाहीतर उद्या बाईला दे…. मी त्याबद्दल काही बोलणार नाही आणि ती बाई बिचारीही काही बोलणार नाही.. माझीच मनापासून भक्ती करते ती. आणि हो… मला जेवायला घातलंस अशी भ्रामक आणि निरर्थक समजूत करून घेतांना म्हणायला अजिबात विसरू नकोस बरं …. “ देवा तुला पावू दे… आम्हाला खाऊ दे…” 

आणि बाप्पा दिसेनासा झाला…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड☆ श्री जगदीश काबरे ☆

छोट्याशा गावात अन्नपूर्णाबाईंची पुरणपोळीची गाडी होती. ही गाडी केवळ चवदार पूरणपोळ्यांसाठीच नाही, तर “मेंदूला खाऊ” देण्यासाठीही प्रसिद्ध होती, असे गावातील लोक हसत म्हणत. कारण अन्नपूर्णाबाई फक्त पुरणपोळ्या विकत नव्हत्या, तर प्रत्येक खरेदीमागे लपलेला विचारही लोकांच्या लक्षात आणून देत असत. ती गाडी म्हणजे जणू चालती-बोलती प्रयोगशाळाच होती. सकाळी शाळेत जाणारी मुलं, दुपारी शेतातून परतणारे शेतकरी, संध्याकाळी कामावरून थकून येणारे नोकरदार, सगळ्यांच्याच तोंडात एकच वाक्य असायचं, “बाईंची पुरणपोळी म्हणजे मऊसूत, जिभेवर विरघळणारी! ” 

गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्या वर्षी विज्ञान मेळावा भरवायचं ठरलं. नेहमीसारखी पोस्टर्स, चार्ट्स, मॉडेल्स, फुगे हे सगळं असणारच होतं. पण विज्ञान शिक्षकांनी यावेळी वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. “विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतली काचभांडी नाही, ” ते म्हणाले, “… तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ” म्हणून त्यांनी अन्नपूर्णाबाईंना खास निमंत्रण दिलं.

मेळाव्याच्या दिवशी शाळेच्या मैदानात रंगीबेरंगी स्टॉल लागले. एका बाजूला सौरऊर्जेचे मॉडेल, दुसरीकडे पाण्याचा दाब दाखवणारी नळी, एका कोपऱ्यातून मात्र घमघमाट सुटलेला होता. कारण तिथे अन्नपूर्णाबाईंचा पुरणपोळीचा स्टॉल लागलेला होता.

मुलांना वाटले, वा! विज्ञान मेळाव्यात पुरणपोळी! पण अन्नपूर्णाबाई हसून म्हणाल्या, “ही फक्त पुरणपोळी नाही, हा एक विज्ञानाचा प्रयोग आहे. ” बाईंनी फळ्यावर तीन पर्याय लिहिले. ४० सेमी व्यासाची मोठी जंबो पुरणपोळी, ३० सेमी व्यासाची मध्यम पुरणपोळी, आणि २० सेमी व्यासाची छोटी पुरणपोळी.

४० सेमी व्यासाची एक पुरणपोळी चाळीस रुपयाना, ३० सेमी व्यासाची एक पुरणपोळी तीस रुपयाना आणि २० सेमी व्यासाची एक पुरणपोळी वीस रुपयाना आहे. पण ऑफर अशी आहे की, ४० रुपयात एक ४० सेमी व्यासाची पुरणपोळी मिळेल किंवा ४० रुपयात ३० सेमी आणि २० सेमी व्यासाची अशा दोन पुरणपोळ्या मिळतील किंवा ४० रुपयात २० सेमी व्यासाच्या तीन पुरणपोळ्या मिळतील.

आता सांगा मुलांनो, “तुम्ही कोणती ऑफर स्विकाराल की ज्यामुळे तुम्हाला जास्त पुरणपोळी खायला मिळेल? ” असा अन्नपूर्णा बाईंनी प्रश्न विचारला.

राघव म्हणाला, “आजी, सगळ्या पुरणपोळ्यांची किंमत वेगवेगळी का? ” अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, “कारण विज्ञानात फक्त वस्तू महत्त्वाची नसते, तिचं प्रमाण, क्षेत्रफळ आणि उपयोग महत्त्वाचा असतो. तेव्हा आज खाण्याआधी विचार करा! ”

मुलं हसली. “आजी, खाण्याआधी विचार कसा करायचा? ” एक मुलगा विचारला.

बाई हसून म्हणाल्या, “आज पोट भरायचंयच, पण त्याआधी डोकं भरायचं आहे. ”

बाईंनी तीन प्रकारच्या पुरणपोळ्या समोर मांडल्या होत्या. एक मोठी—जंबो, एक मध्यम आणि एक छोटी. त्या म्हणाल्या, “ या पुरणपोळ्या लहान मोठ्या आकाराच्या असल्या तरी प्रत्येकीची चव तीच आहे, बरं का. ” 

मग बाईंनी गोल पुरणपोळी शेजारच्या फळ्यावर काढून दाखवली. “ही पोळी गोल आहे. आता मला सांगा, गोलाचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ” 

सायली पटकन म्हणाली, “πr² या सूत्रानुसार… ” 

बाईंनी टाळी वाजवली. “मग बघा, ४० सें. मी. व्यासाची जंबो पोळी म्हणजे मोठं क्षेत्रफळ. पण तीन छोट्या पोळ्यांचं एकत्रित क्षेत्रफळ किती होईल, याचा विचार केलात का? ”

मुलांनी कागद-पेन्सिली काढल्या. कोणीतरी गणित केलं, कोणीतरी अंदाज बांधला. मग लक्षात आलं की तीन छोट्या पोळ्या एकत्र केल्यावर मिळणारा ‘खाण्याचा आनंद’ जंबो पोळीपेक्षा वेगळा आहे. कुणाला जास्त तुकडे हवेत, कुणाला एक मोठी पोळी हवी, तर कुणाला मध्यम आणि छोटी अशी जोड हवी.

तेवढ्यात बाईंनी एक गुपित सांगितलं. “ही सगळी ऑफर म्हणजे मानसशास्त्र आहे, ” त्या म्हणाल्या. “लोकांना ‘एकावर एक’ किंवा ‘जास्त मिळतंय’ असं वाटलं की ते खूश होतात. पण खरा वैज्ञानिक विचार असा असतो की, आपल्याला काय हवंय, किती हवंय आणि त्याची खरी किंमत काय आहे? ”

मुलांना अचानक जाणवलं की हा फक्त खाण्याचा प्रश्न नाही, तर विचार करण्याचा आहे. राघव म्हणाला, “मला तीन छोट्या पोळ्या हव्यात, कारण मला मित्रांबरोबर वाटून खायचं आहे. ” सायली म्हणाली, “मला मध्यम आणि छोटी, कारण दोन्ही चवीचा अनुभव मिळेल. ” एक शांत मुलगी मीरा म्हणाली, “मला जंबो पोळी हवी, कारण मला मोठी पोळी तोडत बसायला आवडतं. ” अन्नपूर्णाबाई हसल्या. “बस्स! हेच विज्ञान. एकाच माहितीवर वेगवेगळे निर्णय. योग्य-चूक असं काही नाही, फक्त समजून निवडणं महत्त्वाचं. ”

मुलांना वाटलं, यात काय विज्ञान? पैसे दिले, पोळी घेतली, खाल्ली—सोपंय. पण बाईंची ऑफर ऐकून त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. कुणी म्हणालं, “तीन छोट्या जास्त! ” कुणी म्हणालं, “एक मोठीच बरी. ” तर काही जण म्हणाले, “ऑफरमध्येच फायदाच असतो. ”

तेव्हाच बाईंनी पहिला वैज्ञानिक प्रश्न टाकला. “पोळी म्हणजे काय? ”

“खाण्याची गोष्ट! ” कुणीतरी ओरडलं.

“आकार कोणता? ”

“गोल म्हणजे वर्तुळाकार! ”

“मग वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ”

सायली नावाच्या हुशार मुलीने हात वर केला आणि पटकन म्हणाली, “πr² या सूत्राने! ”

“शाब्बास, ” बाई म्हणाल्या, “आता आपण उकल करू. ”

बाईंनी फळ्यावर खडूने तीन मोठे गोल काढले. एकावर २० सें. मी. , एकावर ३० सें. मी. , आणि एकावर ४० सें. मी. , अशी संख्या लिहिली. “हे ह्या पुरणपोळ्यांचे व्यास आहेत, ” त्या म्हणाल्या. “आता प्रत्येक पुरणपोळीचे त्रिज्या किती होईल सांगा बरं. ” मुलांनी झटपट गणित केलं. छोटी पोळी—त्रिज्या १० सें. मी. , मध्यम—१५ सें. मी. , जंबो—२० सें. मी.

मग मोजमाप सुरू झालं.

छोटी पोळी— वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² 

म्हणजेच छोट्या पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १०² = ३१४ चौ. से. मी.

मध्यम पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १५² = ७०६ चौ. से. मी.

जंबो पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × २०² = १२५६ चौ. से. मी.

हे आकडे बघून मुलांच्या भुवया उंचावल्या. कारण फरक प्रचंड होता.

“आता खरी गंमत बघा, ” बाईंनी सांगितलं. “रु. ४० मध्ये एक जंबो पोळी घेतली, तर तुम्हाला १२५६ चौ. से. मी. क्षेत्रफळ मिळतं. पण त्याच रु. ४० मध्ये तीन छोट्या पोळ्या घेतल्या, तर ३१४ × ३ = ९४२ चौ. से. मी. ”

“म्हणजे जंबो जास्त! ” एक मुलगा आश्चर्याने ओरडला.

पण बाईंनी लगेच हात वर केला. “थांबा. अजून संपलं नाही. ”

त्यांनी मध्यम + छोटीचा पर्याय घेतला. “७०६ चौ. से. मी. + ३१४ चौ. से. मी. = १०२० चौ. से. मी. ”

“म्हणजे हा पर्याय तीन छोट्यांपेक्षा चांगला, पण जंबोपेक्षा कमी, ” मुलांनी निष्कर्ष काढला.

आता मुलांना मजा यायला लागली. कारण आता फक्त पोळी खाणं नव्हतं तर तो एक गणिती खेळ झाला होता… आकड्यांचा, विचारांचा, निवडींचा.

मुलं विचार करत आहेत तेवढ्यात बाईंनी आणखी एक वेगळाच प्रश्न विचारला. “रु. ३० मध्ये काय घ्याल? ”

“दोन छोट्या! ” बहुतेकांनी उत्तर दिलं.

“की एक मध्यम? ” बाईंनी शंका उपस्थित केली.

मुलं गप्प झाली.

बाईंनी पुन्हा गणित मांडलं. दोन छोट्या पुरणपोळ्यांचं क्षेत्रफळ = ३१४ × २ = ६२८ चौ. से. मी. आणि एक मध्यम पुरणपोळीचं क्षेत्रफळ = ७०६ चौ. से. मी.

“म्हणजे? ”

“मध्यम जास्त! ” सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं.

आता मुलांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला होता. ऑफर म्हणजे नेहमी फायदा नसतो. जास्त नग म्हणजे जास्त मूल्य नसतं. दिसतं तसं नसतं. मुलं मंत्रमुग्ध झाली. विज्ञान अचानक रोमांचक झालं.

शेवटी बाईंनी निष्कर्ष सांगितला. “जर तुम्हाला जास्त खाण्याचं मूल्य हवं असेल, तर रु. ४० मध्ये जंबो पोळी सगळ्यात फायदेशीर. रु. ३० मध्ये मध्यम पोळी सर्वात शहाणी निवड. म्हणजे फक्त ‘जास्त नग’ दिसत आहेत म्हणून तीन छोट्या पोळ्या नेहमीच जास्त फायद्याच्या असतात असं नाही. आणि ‘एकावर एक’ हा शब्द ऐकून भुलायचं नाही. प्रश्न विचारायचा—खरंच किती मिळतंय? ”

त्या दिवशी मुलांना एक मोठा धडा शिकायला मिळाला. जाहिरातीच्या ऑफर –‘एकावर एक’ या सगळ्या गोष्टी डोळ्यांना भुलवतात; पण विज्ञान डोळ्यांपलीकडचं पाहायला शिकवतं. अन्नपूर्णाबाईंच्या पुरणपोळ्यांच्या ऑफरमुळे मुलांच्या मनात एक नवीन वैज्ञानिक दृष्टी तयार झाली, ती म्हणजे काहीही निवडण्याआधी “खरंच किती मिळतंय? ” हा प्रश्न विचारण्याची. आणि हाच तर विज्ञानाचा खरा गोडवा आहे. त्या दिवशी मुलांनी पुरणपोळी खाल्लीच, पण त्याहून जास्त ते शिकले की गणित फक्त पुस्तकातच नसतं, विज्ञान प्रयोगशाळेतच नसतं, आणि शहाणपण म्हणजे फक्त स्वस्त नाही तर योग्य निवड करणं असतं. अन्नपूर्णाबाईंच्या गाडीवरची पुरणपोळी संपली, पण मुलांच्या डोक्यातलं विचारांच गोड पुरण मात्र बराच काळ रेंगाळत होतं. मेळावा संपला. मुलं घरी गेली. त्या रात्री अनेकांच्या घरी चर्चा सुरू होती. बाबा म्हणत होते, “आपण तर जाहिराती पाहूनच वस्तू घेतो. ” आई म्हणत होती, “आता भाजी घेतानाही विचार करायला हवा. ”

अन्नपूर्णाबाईंची गाडी दुसऱ्या दिवशीही उभी होती. पण आज मुलं पोळी घेताना विचार करून घेत होती. कोणीतरी जंबो घेतली, कोणीतरी मध्यम. पण सगळ्यांच्या डोळ्यांत एकच चमक होती—समजून उमजून निवड केल्याची.

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव   ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव  ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

घर सांभाळणाऱ्या हातांना पगार नसतो… पण सन्मानाची पेन्शन तरी असायला हवी.

सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कुकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती.

“आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे. चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा, ” सून नेहा प्रेमाने म्हणाली.

छप्पन्न वर्षांच्या अलकाताई हसल्या…

“अगं, अजून राहुलचा डबा भरायचा आहे. तुझ्या दोघांचं दही ठेवायचं आहे. आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आहे आज. “

तेवढ्यात बेडरूममधून राहुलचा आवाज आला… 

“आई… माझा निळा शर्ट कुठे आहे गं?”

“कपाटात डाव्या बाजूला तिसऱ्या कप्प्यात बघ. “

“मिळाला. “

तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते.

“अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का. डॉक्टरांनी सांगितलंय. “

“हो, लक्षात आहे माझ्या. “

“बाबा, मी आणते चहा, ” नेहा म्हणाली.

त्यावर सुधीरराव हसले.

“अगं, तुझ्या हातचा चहा छान असतो. पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची मला पस्तीस वर्षांची सवय आहे. “

घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई.

कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस कधी आहे, या सगळ्याचं चालतं-बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घरची सवय झाली.

पण दुर्दैवाने त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं…

‘ आई आहेत ना… त्या करतील.’

राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि दोन कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या.

आज सुधीरराव खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाईल पुढे केला.

“अलका, बघ. “

मोबाईलवर बँकेचा मेसेज होता. पेन्शन जमा करण्यात आली आहे.

सुधीरराव अभिमानाने म्हणाले, “आज पहिली पेन्शन आली. पस्तीस वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य निवांत जाईल. “

अलकाताईंनी मोबाईलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांचा संसार तरळून गेला.

राहुल लहान असताना तापाने फणफणत होता, तेव्हा सलग तीन रात्री जागून काढलेले दिवस… सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा… सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर… मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण… या सगळ्यात साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं, अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचंही राहून गेलं.

त्या हळूच म्हणाल्या,

“अभिनंदन हो. “

“धन्यवाद. “

काही क्षण शांतता पसरली.

मग अलकाताईंनी विचारलं,

“एक विचारू?”

“विचार ना. “

“तुम्ही आता रिटायर झालात ना?”

“हो. “

“मग माझं रिटायरमेंट वय किती?”

सुधीररावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं.

“म्हणजे?”

अलकाताई शांतपणे बोलू लागल्या.

“तुमची नोकरी पस्तीस वर्षांची होती. वयाची साठ वर्षं झाली आणि तुम्ही निवृत्त झालात. मीही पस्तीस वर्षांपासून या घरात काम करते आहे. लग्न झालं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आज छप्पन्न वर्षांची आहे. माझी नोकरी कधी संपणार?”

सुधीरराव काही बोलले नाहीत.

अलकाताईंचा आवाज आता जरा भरून आला होता.

“मी पैशांचा हिशेब मागत नाहीये हो. हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा… मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का, आज तू आराम कर?”

सुधीरराव शांत होते.

अलकाताई पुढे म्हणाल्या,

“परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचें शंभर रुपयेही नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही. आणि मग मी गेलेच नाही. “

त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

“अहो, मला पैशांचा मोह नाही. पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल… स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल… एखादी साधी साडी आवडली असेल… तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे चार पैसे माझ्या हातात असू नयेत का?”

असं म्हणत त्या उठल्या. डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं.

त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला.

– – आपल्याला पगार मिळाला. बोनस मिळाला… आता पेन्शनही मिळते आहे.

पण अलकाला काय मिळालं?… फक्त जबाबदाऱ्या?

दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. त्यांनी एक नवीन खाते उघडलं आणि आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था केली.

दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरे पासबुक आणि एटीएम कार्ड दिलं.

अलकाताईंनी आश्चर्याने विचारले,

“हे काय आहे?”

“उघडून बघ. “

.. त्यावर नाव लिहिलं होतं… अलका सुधीर देशपांडे.

त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

“हे माझं? पण कशासाठी?”

सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला… 

“अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही. कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. पस्तीस वर्षे तू या घरासाठी जगलीस. आता थोडंसं स्वतःसाठी जग. “

अलकाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

त्या हळूच म्हणाल्या,

“मला पैशांचा आनंद नाही झाला हो. “

“मग?” सुधीररावांनी विचारलं.

अलकाताई हसल्या.

“आज पहिल्यांदा असं वाटलं… या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते. माझं अस्तित्वही आहे. “

सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला.

त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता सन्मान. स्वाभिमान. आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल.

नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते… पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का?

अनेक स्त्रिया स्वतःच्या घराच्या जवाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं पूर्ण आयुष्य संसारासाठी जातो. त्यांचे हक्क बनतो. पण पण त्याकडे दुर्लक्ष होत सगळं तुझंच आहे असं म्हणणं असतं. पण तसे अधिकार तिला मिळावे. हाच कथेचा उद्देश.

आज गरज आहे प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या ‘तिचा’ हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घरपण येणार नाही. चला, आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क अन् स्वाभिमान मिळवून देऊया!”

लेखिका : सौ तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड 

 (कथा आवडल्यास नावासोबत शेअर करा) 

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – २ लेखिका : चेतना वैद्य ☆ प्रस्तुती – संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – २ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆

(बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.) 

इथून पुढे – – – 

शेवटी समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून आईची ट्रीटमेन्ट सुरू झाली. हे काही लगेचच पूर्ण होणार प्रोजेक्ट नव्हतच. पण सुरवात महत्वाची होती.

म्हणतात ना…

As you start to walk on the way, the way appears. Clarity does not appear before action. It comes from actions.

पुण्याला दिनानाथ मध्ये Step by step treatment सुरू झाली.

पेशंट बरोबर फक्त एक attendant राहू शकतो. असा दवाखान्याचा नियम. म्हणून शाल्मली आई बरोबर, तर दुसरी रिदिमा ने सांगलीत राहून घरची जबाबदारी सांभाळली.

2022 चा year end चा तो महिना, सर्वानी new year eve एकत्र celebrate करायची, धम्माल करायची, असा कार्यक्रम ठरला होता.

पण म्हणतात ना…

Man proposes… God disposes. …

त्याच दिवशी आईचे operation झाले.

व्यवस्थित झाले… अस डोॅक्टर म्हणाले. तेंव्हा त्या असहनीय वेदना असताना सुद्धा आईला वाटल..

चला आता लवकरच आपला सांगलीला जायचा परतीचा प्रवास सुरू होणार.

पण नाही…

आईची परीक्षा पूर्ण झालीच नव्हती. परीक्षेतील प्रश्न out of syllabus होते ना. अनेक चढ उतार, अनेक comlications. पुन्हा पुन्हा त्या मोठमोठ्या मशीनी, नाका तोंडात नळ्या. त्याचवेळेस 

मी शाल्मली (attendant)

येथे तापाने फणफणली होती तर, तर सांगलीला रिदिमा आणि तिच्या नवर्याला कोरोना झालेला.

पहिलाच प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते, तर पूढे दुसरे प्रश्न तयारच होते. म्हणजे washing mavchine मध्ये जसे कपडे गोल गोल फिरतात ना, तसे झाले होते. कोणचा धागा पकडावा, आणि कोणता सोडावा. हेच कळत नव्हत. सर्वच महत्वाच होत. शांत राहून सर्व सांभाळायच होत..

आई ICU मध्ये नऊ दिवस होती. या गोष्टी आईला कळल्याच नाहीत. मला मात्र आईला भेटायची परमिशन नव्हती. मग ICU मधील ते नऊ दिवस आईची काळजी कोणी घेतली असेल बर ? आश्चर्यच आहे नाही का ?

ICU मध्ये देवाच्या रूपात डोॅक्टर नर्स तर होतेच, बरोबर पाठीशी घाबरू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आधार देणारे, श्री स्वामी पण होतेच ना.

किमोथेरेपी, injections. नंतर तीन वर्ष रोजची गोळी. हा प्रवास सोपा नव्हताच. या पिरेड मध्ये खूप उतार-चढ़ाव आले. आईने मात्र खंबीर पणे सर्व फेस केल. बाबा आईच्या पाठीशी होतेच.

या पिरेड मध्ये एक गोष्ट लक्षात आली की बाबा खाडकन ऊभे राहिले. आता भूमिकांची/ जबाबदारी ची अदलाबदल झाली आहे, हे त्यांच्या लक्षात आल.

Finally तो दिवस उजाडला, आई दिनानाथ मधून घरी सांगलीला परत आली. औषधोपचार चालू होतेच. पण दवाखान्यात राहणे आवश्यक नव्हते..

मनाला विरंगुळा म्हणून तिने या दरम्यान दोन एकांकिकांचे दिग्दर्शन केले, स्वतःचे यु ट्युब चॅनेल सुरू केले. छान उत्साहवर्धक positive लेख ती वाचत असे. कुठे तरी स्वतः ला active ठेवण, posiitive ठेवण गरजेचे आहे. हे तिला समजत होत. त्या निमित्ताने ती चार लोकांच्या संपर्कात होती. वेगवेगळया विषयांवर बोलत होती.

Strong mind always finds opportunities in difficult situatios.

बरोबर आहे…

उदास राहून कोणताच प्रश्न सुटत नसतो.

फायनली औषधांचे हे चक्र संपल. आणि पुन्हा एकदा पेट स्कॅन करून तो रिपोर्ट आज मिळाला.

रिपोर्ट आला…

डोॅक्टर ने वाचून म्हंटल… Wonderful ! अभिनंदन ! Mrs Vaidya. You have won the battle.

every thing is OK now.

एक डार्क काळ्याकुट्ट लांबलचक पिरेड finally संपला.

आजची सकाळ आधी सारखीच सुंदर, आनंदी होती. मुख्य म्हणजे आज कोणतीही गोळी घ्यायची नव्हती.

आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून आल टाकलेला कडक चहा घेतला.

पुन्हा एकदा… आई जिंकली

खरय…

What is life ? 

Life is about adjustment between your feelings and reality. life has many such situations where you have to leave your emotions and accept reality.

मला नेहमी वाटत…

आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे कौतुक करतो, त्यांच्या हुशारीची, त्यागाची, हिंमतीची, शौर्याची उदाहरण वाचतो, लोकांना सांगतो.

मग एका सर्व सामान्य घरातील सर्व सामान्य स्त्री आयुष्यात येणार्या कठीण प्रसंगाना धैर्याने, हिम्मतीने तोंड देऊन पुन्हा उभी राहते, हे पण कौतुकास्पदच आहे नाही का ?

आज पुन्हा एकदा चेतना बरोबर बोलण झाल.. आजपर्यंत मी त्यांना भेटलेली नाहिये… आज मला चेतना म्हणाली…

 

आता हे चौथं वर्ष सुरू आहे. या काळात मी दंड थोपटून उभी आहे.

 माझ्या धाकट्या नातवंडा सकट सगळं मी पाहिलंय.

 Quality life मी जगली आहे.

 मोह हा मनाला नाहीच आहे.

 फक्त माणसांचा मोह… मग विचार केला काय करावं आपण आता? जितके आयुष्य दिले परमेश्वराने त्याचे सोनं कसं करायचं ?.. त्याचे उत्तर मला माझ्या लेखणी न दिलं…

ती म्हणाली… अग! मी आहे ना… उचल मला आणि कर सुरुवात.

 अशा तऱ्हेने मी चारोळ्या लिहायला सुरुवात केली..

 नाटक हे तर माझं पॅशन आहेच..

 नाटकं बसवायला लागले, एकांकिका बसवायला लागले..

 आणि मग वाटलं सांगली पर्यतच हे सगळं सिमित होतंय… आपण जगभरातल्या लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतोय. इतकं सगळं जग आपल्या हाताच्या पंजात आलय… त्याचा फायदाही करून घ्यायला हवा ना… मग

Chetana Vaidya… चे वै

 या नावाने चॅनल उघडलं… उद्देश एकच होता… की लाखो लोकांपर्यंत पोहोचता येईल… आणि एक असाही स्वार्थी विचार येऊन गेला मनात… की उद्या परमेश्वराचा कॉल आलाच तर तेंव्हा लोकांच्या दोन लाख डोळ्यात तरी पाणी येईल.

 बस इतकच.

 

– – – मी म्हंटल…

सलाम तुम्हाला चेतना ताई… अशाच आनंदी रहा.

– समाप्त –

लेखिका : चेतना वैद्य 

प्रस्तुती  संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – १ लेखिका : चेतना वैद्य ☆ प्रस्तुती – संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “आज पुन्हा एकदा आई जिंकली..” भाग – १ लेखिका : चेतना वैद्य ☆ संध्या बेडेकर ☆

आज सकाळपासूनच आईच्या फोनची वाट बघत होतो. चारदा आम्ही दोघी बहिणींचे आपापसात विचारण झाल. आज आईच्या फोनची सर्वच वाट बघत होते. आज बाबा घरी येणार होते ना. आज बाबांना डिस्चार्ज मिळणार होता ना. म्हणून सर्वांचे लक्ष तेथे होते.

 आज मी आई बरोबर असायला हव होत.

माझ्या मनात येणारा हा आणि असे अनेक प्रश्न ? नेहमीच मला अस्वस्थ करतात.

आपण अमेरिकेत स्थायिक झालो… हे बरोबर आहे का ? आम्ही दोघी बहिणी भारताच्या बाहेर आहोत. जस जस आईबाबांच वय वाढतय, तसतसा हा प्रश्न मला खूप त्रास देतोय. आता तर मी पण चाळीशी पार केलीय, माझी मुल मोठी झाली. आता त्यांचे भविष्य, आईबाबांचे वर्तमान दोन्ही महत्वाचे. दोन्ही जबाबदार्या मनापासून पूर्ण करताना शारीरिक पेक्षा मानसिक ओढाताण खूप होते. हे जरी खर असल, तरी हे असच चालत राहणार आहे… हेही कळतय.

 करोनाच्या काळात बाबा दवाखान्यात भरती होते. त्यांचे डायलिसिस चालू होते. आई तिथे एकटी, बाबा दवाखान्यात, आणि आम्ही दोघी येथे.

 तो काळ खूप कठिण गेला. फोन, व्हिडिओ हेच एक साधन होते त्यावेळेस बाबा वरती हात लावून परत आले. अस म्हंटल तरी चालेल. ही जंग आईने एकटीने लढली आणि जिंकली सुद्धा.. मानसिक खंबीरता म्हणजे काय ? याचे जणू उदाहरणच आईने सेट केले. आम्हाला तर अजिबात यायच नाही, अशी सख्त ताकीदच आईने दिली होती.

केंव्हा एकदा हा करोनाचा काळ संपतो आणि आम्हाला भारतात यायची परमिशन मिळते. याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.

 एकदाचा कोरोना निवळला, आईची परमिशन पण मिळाली, आणि आम्ही दोघी बहिणी परिवारासह आईकडे आलो. बाबांना बघून बर वाटल. आईचे कौतुक वाटल.

आई खूप खुश होती. दृष्ट लागावी अस माझ्या घराच आज गोकुळ झालय. सूख म्हणजे नक्की काय ? याचा प्रत्यक्ष्य अनुभव मी घेतेय. आज मी गोकुळात आहे, आनंदी आहे. अस आई सहज बोलून गेली. तुम्हा सगळ्यांना बघून माझा थकवा गेला. माझ्या या गोकुळाला कोणाची नजर नको लागायला. आई देवाजवळ प्रार्थनेत अस म्हणत होती.

पण देवाच्या मनात काही तरी वेगळच planning सुरू होत.

आई थकलेली दिसत होती. सर्दी खोकला पण झाला होता.

बाबा म्हणाले… मुलींनो ! जरा आईला पण एकदा डोॅक्टर कडे घेऊन जा. तिची तब्येत पण बरीच खालवली आहे.

आईचे औषध पाणी सुरू झाले. पण औषधाचा म्हणावा तसा असर दिसत नव्हता. X ray, अनेक टेस्ट्स झाल्या. शेवटी डोॅक्टरने आधी बायोप्सी, नंतर पेट स्कॅन करायला सांगीतल. या टेस्टच नाव ऐकल्यानंतर तर चांगले चांगले लोक आधीच घाबरतात.

 खर तर बर्‍याच दिवसांनंतर आम्ही सर्व भेटलो होतो. एका मोठया संकटाला तोंड देऊन टेंशन फ्री झालो होतो. देवाचे आभार मानत होतो. तर आता पुन्हा एक नवीनच प्रश्न समोर येऊन उभा होता.

टेस्ट झाली आणि डॉक्टरने रिपोर्ट वाचून लंग कॅन्सर चे निदान केले. आणि आई सूखाच्या शिखरावरून धप्पकन खाली पडली.

 आता तर सर्वांचेच धाबे दणाणले.

अनपेक्षितपणे, दूर दूर पर्यंत मनात अस काही असेल हे आलच नाही. साधा खोकला जो कोणालाही होतो आणि बराही होतो, तो आईचा बराच झाला नाही. तो या स्तरापर्यंत गेला असेल, हे कोणाच्या मनी ध्यानी पण आल नाही. हा सर्वांना एक मोठा धक्काच होता.

आज पुन्हा एकदा असहनीय शांतता घरात होती. प्रत्येक जण सहज सामान्य वागायचा प्रयत्न करत होता.

आई सरळ आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बसली. मला माझ्या स्वतः बरोबर थोडा वेळ हवाय. अस म्हणाली. पूर्ण दोन दिवस 48 तास तिने बहुतेक स्वतःशीच वाद घातला असावा, संवाद साधला असावा. तिलाही हे accept करण कठिणच होत. जेवावस वाटत नाही, चहा पण घ्यावासा वाटत नाही. अशी अनेकदा ऐकलेली वाक्य आज आई स्वतः अनुभवत होती.

अशा वेळेस विचारांची सुनामी आलेली असते, भावनांचा विलक्षण गोंधळ मनात चालूच असतो.

भीती- काळजी-जबाबदारी-चिंता भविष्यात होणार्या संभावित घटना. मनाची तर क्षणात तोळा तर क्षणात मासा अशी अवस्था असते. विचार, भावना क्षणाक्षणाला बदलत असतात. अस्वस्थ मनाला शांत व्हायला वेळ लागतोच… वास्तव स्विकारायला मन शांत असाव लागत.

स्वतःसाठी वेळ काढून अंतर्गत शांततेत स्वतःशी संवाद साधला, तर प्रश्नांची उत्तर सापडतात. ताण कमी होतो. संकटाशी लढण्याचा मार्ग मिळतो. किंवा मार्ग काढावाच लागतो. दुसरा पर्याय समोर नाही हे लक्षात येत.

Sometimes being alone is the only way to know your power.

समोर असलेल्या नवीन प्रोजेक्ट वर फोकस करून पुन्हा एकदा Restart, Reorganize चा विचार करता येतो.

विचार भावना आणि आपले वर्तन यांचा परस्पर खूप संबंध असतो. त्यामुळे योग्य निर्णय वेळेवर घेणे आवश्यक असत.

घरात सर्वच panic / disturbed होतेच.

 दोन दिवसांनी आई व्यवस्थित तयार होऊन बाहेर आली. सर्वांसाठी आलं टाकून छान कडक चहा केला.

आई म्हणाली… मी ठीक आहे. जे आहे ते accept केलय मी. आता यापुढचा प्रवास खडतर आहे, हे माहित आहे मला. 1/2 दिवसांत डोॅक्टर कडे जाऊन line of treatment बद्दल समजून घेऊया. वेळ लागेल पण सर्व ठीक होईल, याची खात्री आहे मला. जशी वेळ येईल, तसा या परीक्षेचा अभ्यास करायच ठरवलय मी. तुम्ही सर्व आहातच बरोबर. गरज पडली तर मदतीला दुसरे पर्याय आहेतच.

सुरवातीला मला हे सत्य पचवायला त्रास झाला. पण now I am ok.

A correct decision doubles the confidence.

बाबा म्हणाले… अग! मी आहे ना तुझ्या बरोबर. काळजी करू नको. सर्व ठीक होईल. आता एडव्हांस टेक्नोलॉजी आहे. काल मी आणि शाल्मली डाॅक्टरला भेटून आलो. सध्या अगदी सुरवातच आहे. आपल्याला लगेच कळल, हे खूप बर झाल.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : चेतना वैद्य 

प्रस्तुती  संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ निघून गेलेली सावली…  लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(आई आणि मुलाच्या नात्यातल्या न बोलल्या वेदनांची कथा)

घरात… पण परकं वाटणारं..

“आई, आता पुण्यातच राहा. बंगलोरमध्ये कामाच्या घाईत मी वेळ देऊ शकत नाही. “

शुभमचं वाक्य ऐकून सुलभा ताईंनी शांतपणे मान डोलावली.

काहीशा हसऱ्या चेहऱ्याने, पण डोळ्यांत क्षणभर ओल आली.

शुभमला ती दिसली नाही… तो आधीच फोनकडे वळला होता.

 

सगळं आयुष्य मुलासाठी काढून, वयाच्या सत्तरीत त्या पुन्हा एका नवीन आयुष्याच्या पायरीवर उभ्या होत्या.

मुलगा मोठा झाला, कमावता झाला…

पण आयुष्यभर आईने उरलेलं सगळं गुंफून ठेवलेलं नातं, आता स्वतःचं वय गाठत होतं.

 

नवऱ्याचं अचानक निधन झालं…

माणसं जरा थांबली, सांत्वना दिली, आणि निघून गेली.

घर, ज्यात दोन पिढ्या घालवल्या, आठवणींनी भरलेलं – विकावं लागलं.

“आई, ते जुनं गावातलं घर विकून टाक. मी पुण्यात बघतो एक चांगली जागा. “

तेव्हा सुलभा ताईंनीही काहीच विचारलं नाही.

फक्त विचारलं – “तुला वेळ होईल का माझ्यासोबत राहायला? “

शुभम म्हणाला – “पुणं सोयीचं होईल दोघांसाठी. “

 

आता, त्याच मुलाने प्रेमाने, काळजीने, व्यवस्थेने सांगितलं –

“पुण्यात तू एकटी नको राहूस. ” तू इकडेच ये.

 

पण त्या वाक्याच्या आड एक अधुरी जाणीव दडलेली होती –

“आई, तू इथं राहा, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. “

 

सुलभा ताईंनी कपाट उघडलं, आणि जुन्या साड्या उचलायला लागल्या.

एका साडीच्या घडीत शुभमचा लहानपणीचा शाळेचा रिबन सापडला…

ती साडी अलगद डोळ्यांशी नेली.

क्षणभरात ती मुलाची आई परत झाली –

 

आता तीच आई नवीन शहरात एकटी राहणार होती, जिथं आठवणी नव्हत्या… फक्त भिंती.

 

घर मोठं होतं. सुखवस्तू. प्रिया – सून – नोकरी करणारी, सोज्वळ. नातू – रियांश – दुसऱ्या वर्गात.

पण घरात त्यांच्यासाठी जागा होती, “सुलभा ताईं” म्हणून. ‘आई’ म्हणून नव्हे.

 

पहिल्याच दिवशी, त्यांनी प्रियेच्या स्वयंपाकात मदत करायला विचारलं.

 

प्रिया सौम्य हसली, पण थोडीशी संकोचलेली –

“आई, मी ऑफिसहून येताना थकलेली असते, माझं एक ठरलेलं पॅटर्न असतं, “तुम्ही आराम करा ना! “

ती म्हणाली आणि लगेच AirPods कानात घातले.

किचनमध्ये automatic rice cooker सुरू झाला, आणि गॅसवर ready-to-eat पॅक गरम होऊ लागला.

 

सुलभा ताई काहीच बोलल्या नाहीत.

पण त्यांच्या डोळ्यांतला उत्साह मंद झाला.

 

“आई, तुम्ही आराम करा, “

हे वाक्य “आई, तुमचं काही काम नाहीये इथं” असं अनाहूतपणे कानावर पडून गेलं.

 

सुलभा ताई परत आपल्या खोलीत आल्या. रेस्ट पॅटर्न मधे.

सुलभा ताईंचं सगळं प्रेम आता रियांशभोवती फिरत होतं.

सकाळी दूध, संध्याकाळी फळं… आणि संध्याकाळी गच्चीत खेळणं हे त्यांचं दिवसाचं गोड वेळापत्रक होतं.

ती रियांशला झुला झुलवत, गाणी म्हणत –

“अरे माझा पोपट राजा, आई कुठं गेली? “

तो हसून म्हणायचा – “ऑफिस! “

 

एक दिवस, गच्चीवर जाण्याच्या तयारीत असताना प्रिया म्हणाली –

“आई, त्याला उन्हं लागून जाईल… त्याला उन्हाचा त्रास आहे. “

सुलभा ताईंनी गप्प बसून खेळण्याची चप्पल बाजूला ठेवली.

 

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी विचारलं –

“रियांशला वर घेऊन जाऊ का ग, थोडा खेळवते? “

 

प्रिया म्हणाली –

“आई, आज त्याचे ऑनलाइन क्लास आहेत… तुम्ही त्याला disturb करू नका. “

 

‘डिस्टर्ब करू नका’… हे दोन शब्द सुलभा ताईंना दिवसभर बोचत राहिले.

 

रियांश आता डोळ्यांवर चष्मा घालून स्क्रीनकडे बघायचा, आणि सुलभा ताई त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायच्या.

पण आता तो उठून बिलकुल यायचा नाही.

कदाचित त्याला आईनंच सांगितलं असेल…

 

त्या रात्री सुलभा ताईंनी त्यांच्या जुन्या चष्म्याच्या डब्यात एक कागद ठेवला.

त्यावर लिहिलं होतं –

“मी रियांशला खेळवते, पण त्याच्या आयुष्यात अजून फक्त एक ‘notification’ बनून राहायचं नाहीये. “

दुसऱ्या दिवशी, रियांशला त्यांनी झोपताना गोष्ट सांगितली.

“एक राजा होता…”

 

“आजी, प्लीज! मला कार्टूनचं अॅप लाव ना! “

शुभम आतून ओरडला, “आई, त्याला गोष्टींपेक्षा मोबाईलवर कार्टून आवडतात आता. “

 

रोजचे संवाद मर्यादित… “आई, पाणी पाज. ” “आई, भाजी झाक. “

आईला ‘होते’ होण्याची सुरुवात झाली होती.

 

‘आई’ असणं, ‘असणं’ न उरतं

 

प्रत्येक दिवशी सकाळी शुभम आणि प्रिया दोघंही ऑफिसला निघायचे.

 

सुलभा ताई दररोज आपल्या कोपऱ्यात शांत बसायला लागल्या.

कधी तरी त्या दिवसभरात बोललेलं एकमेव वाक्य असे –

“रियांशने जेवलं का? “

 

प्रिया कधीच आईशी भांडत नाही. पण संवादही फारसा नाही.

ना एकत्र स्वयंपाक, ना एकत्र टीव्ही. ना एकत्र चहा.

 

प्रिया आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करते, मदर-इन-लॉचा उल्लेख “She’s there… in her room mostly. ” असा करते.

 

शुभम हल्ली आईशी कमी बोलतो. केवळ आवश्यक उत्तरं.

प्रिया तर हसते, पण शब्दात एक अलिप्तपणा असतो.

 

“आई, फ्रीजमध्ये ठेवताना भाजी व्यवस्थित झाकून ठेव. वास येतो. “

“आई, तुला काही लागलं तर maid ला सांग. आम्ही मिटींगमध्ये असतो. “

“आई, थोडं टीव्हीचा आवाज कमी ठेव ना. रियांश अभ्यास करतोय. “

 

आवाज कमी केला जातो. आईच्या अस्तित्वाचा.

 

फ्लॅशबॅकमधली ‘आई’

 

एका दुपारी कपाट आवरताना शुभमचे जुने फोटो सापडले.

पहिलं बक्षीस, नाट्यस्पर्धा, पाढे म्हणताना…

त्या फोटोला पाहून डोळे भरून आले.

“हाच मुलगा. छोटा असताना माझ्या मांडीवर झोपायचा. त्याच्या तापात मी रात्रभर जागी राहायचे… आणि आता मी जर गप्पा मारल्या, तर disturb वाटतं त्याला? ”

 

सुलभा ताई पुन्हा डायरी उघडतात —

“मी कधी तिची सासू झालेच नाही… फक्त घरातली एक ‘म्यूट’ व्यक्तिरेखा आहे. “असचं वाटत.

 

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “मुलं मोठी होतात. उंच वाढतात, जग बघतात, शिकतात, करिअर करतात… पण त्या वाढीच्या सावलीत एक शहाणी बाई हळूहळू वयात येते — ती म्हणजे आई.

.. कालपर्यंत जी पाटीवर अक्षरं गिरवत होती, ती आज मोबाईलवर टाईप करायला शिकते… मुलांसाठी.

.. कालपर्यंत जी नकार देत होती, आज ती समजून घेते… मुलांसाठी.

.. पण तिच्या आयुष्याचा काटा मात्र पुढे सरकत राहतो — हळूहळू, नि:शब्द.

 

मुलं विचारतात — “आई, तू शांत का झालीस? “

आई हसते… तिच्या चेहऱ्यावर थकव्याची लकीर असते, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेम.

“शांत नाही ग, फक्त आवाज थोडा हळू झाला आहे. तुम्ही मोठे झालात ना! “

 

पूर्वी घरात कुठेही वळलं की तिची नजर आपल्यावर असे.

आता तीच नजर दरवाज्याकडे लागून बसते — ‘मुलं कधी येतील’ या विचारात.

एकेक करून सगळे मोठे होतात, आपापल्या आयुष्यात रमतात, आणि तिचं आयुष्य तिथेच थांबून राहतं.

 

ती आता विचार करत नाही की काय खायचं, काय आवडतं.

ती विचारते — “तुला काय हवंय? “

ती स्वतःसाठी कपडे घेत नाही, पण तुमच्या खरेदीत ती रमते.

ती आता काही मागत नाही — कारण आता ती ‘मुलांची आई’ राहिलेली असते, ‘स्वतःची व्यक्ती’ नव्हे.

 

पण प्रश्न राहतो —

“मुलं मोठी झाली की आईचं वय वाढतं … पण नातं मागेच राहतं का? “

 

नाही… नातं मागे राहत नाही.

ते कुठेही जात नाही… फक्त दुर्लक्षित होतं.

ते जपायचं असतं…

एवढंच की, जेव्हा आपण म्हणतो — “आई, वेळ नाही गं” — तेव्हा तिच्या दिवसाचा सगळ्यात मोठा अपमान होतो.

कारण तिच्या वेळाचा प्रत्येक क्षण आपणच होतो. एवढं लिहून आजचा दिवस परत एक चांगल्या आठवणीत गेला.

 

डायरी बंद करते.

 

रविवारी सर्वजण बाहेर गेले. आई घरीच.

शुभम म्हणाला, “आई, तुझी तब्येत हल्ली फारशी चांगली नसते, थोडं विश्रांती घे. “

 

त्या संध्याकाळी सुलभा ताईंनी प्रिया आणि शुभमला चहा दिला.

तेवढ्यात प्रिया चहा घेत म्हणाली –

“आई, थोडं कमी साखर घालायचं होतं. माझं डाएट चालू आहे. “

 

सुलभा ताई मनातल्या मनात म्हणाल्या –

“तिच्या डाएटचा विचार करताना माझ्या नजरेच्या अश्रूंनी कुणालाही ‘कॅलोरी’ वाटत नाहीत…”

 

एका दिवशी सुलभा ताईंनी शुभमला विचारलं –

“माझं जुने गावातलं घर आठवतं का रे तुला? चल एकदा जाऊया. थोडं आठवणींमध्ये फिरून येऊ. “

 

शुभम मोबाईलवर पाहत म्हणाला –

“आई, मी ट्रॅव्हल प्लॅन करत नाही. खूप बिझी आहे. “

 

प्रिया हसून म्हणाली –

“आई, तुम्ही तरी तिथे जाऊन काय करणार? गावात काय उरलंच आहे? “

 

सुलभा ताईंनी मान डोलावली. “हो बाई… काहीच नाही उरलं. “

 

पण त्या रात्री त्या उठून बसल्या. शेल्फमधून जुनं कपड्यांचं बॅग काढली. चार साड्या, औषधं, डायरी, आणि एक जपलेली फोटोफ्रेम – शुभम आणि त्याच्या वडिलांची.

 

सकाळी घरात शांतता होती.

आईचं रूम चा दरवाजा उघडा.

सामान नाही. फक्त एक चिठ्ठी:

 

“शुभम,

तुझ्या आयुष्यात मी अडथळा नाही,

म्हणूनच अडथळा नको वाटावा म्हणून निघतेय.

तू चांगला आहेस, प्रिया चांगली आहे.

फक्त माझ्या ‘आई’ असण्याचा अर्थ आता तुमच्या व्याख्येत बसत नाही.

म्हणून मी नजरेआड होतेय.

रियांशला सांग – त्याची आजी परत एक गोष्ट सांगायला कधीतरी येईल. “आईची माया अजूनही असते” असं एक वाक्य नक्की असेल.

 

तोपर्यंत, मी एका जुन्या घरात, एका गोधडीखाली,

आई म्हणून अजूनही तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन.

– तुझी आई अजून ही तुझीची. “

 

शुभम काहीच बोलू शकत नाही. प्रिया म्हणते, “तुमचं नातं होतंच ना? ती कुठेही गेली असेल, परत येईल. “

 

पण तो दिवसभर आईचा आवाज शोधतो — “शुभम, जेवलास का रे? “

“तुला पाणी आणून ठेवते रे! “

“थोडं थांब, थंडी पडतेय बाहेर! “

 

कोणीच काही बोलत नाही आता.

आता आवाज गेला… आणि पोकळी राहिली.

 

प्रिया विचारच करत राहिली,

“तिनं कधीच तक्रार केली नव्हती… पण त्यांनी असं का केलं? ”

 

रियांश दररोज विचारतो –

“आजोबा गेले… आता आजी पण गेली? “

प्रिया आणि शुभम काहीच बोलत नाहीत.

ते दोघंही एका अशा वास्तवात गुरफटलेत,

जिथे आई गेली हे बोलायचं नाही,

पण ती होती हे विसरायचंही नाही…

 

त्या रात्री, रियांशच्या पाटीवर एक चित्र होतं –

एक मोठ्ठं घर, त्याच्या बाजूला आजी, आणि तिच्या हातात गोष्टीचं पुस्तक.

खालच्या कोपऱ्यात एका लहानशा अक्षरांत लिहिलं होतं –

“आजी परत येईल, गोष्ट सांगायला! “

 

शुभम शांत होतो.

 

“ती जाताना काहीच घेऊन गेली नाही… पण मागे सगळंच पोकळ करून गेली. “ति असे पर्यंत कोणालाच कळली नाही.

 

कधी कधी लोक नातं संपवत नाहीत.

ते फक्त इतकं दुर्लक्षित केलं जातं की,

ते स्वतःच त्या नात्याच्या चौकटीतून बाहेर पडतात –

जेणेकरून त्यांना दोष दिला जाऊ नये…

 

तुटणं तर झालेलंच असतं ना?

फक्त त्याचा screenshot कुणाकडेच नसतो.

ना स्टेटसला लावायला,

ना आठवणीत जपून ठेवायला…

 

“तिला काय हवंय? “

हे कधीच ती सांगणार नाही… पण तिला अजूनही आपल्या आवाजाची, आपल्या स्पर्शाची, आपल्या संवादाची गरज असते हे विसरू नका.

लेखिका : तृप्ती देव

भिलाई 

प्रस्तुती : गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूरज : एका सुरवंटाचा प्रवास ! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ सूरज : एका सुरवंटाचा प्रवास  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

 (Metamorphosis – a journey of a caterpillar …)

तुम्ही कधी सुरवंट पाहिला आहे का हो? दिसायला ओबडधोबड आणि काटेरी असतो तो. चुकून जरी हात लागला ना तर काटे चांगलेच टोचतात त्याचे. पण मग हा सुरवंट प्रवासाला निघतो, स्वतःला बदलण्यासाठी तो कोशात जातो आणि एक सुंदर फुलपाखरू होऊन बाहेर येतो.

बोर्डीतल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या मेहता कॉलेजमध्ये २००५ साली असेच एक सुरवंट आले होते – सूरज नावाचं. BSc बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला होता त्याने. कदाचित ॲडमिशनच्या पहिल्या यादीत त्याचं नाव नव्हतेही. आला तेव्हाचा सूरज काही फारसा बोलका होता असं आठवत नाही. बहुधा सुरुवातीचे काही दिवस तो एकंदरीत कॉलेजच्या माहोलला ॲडजस्ट होत होता.

एकदा रुळल्यावर मात्र सूरज बोलू लागला आणि तो इतका की “बाबा रे शांत हो” असं वारंवार म्हणायची पाळी यायची.

मूर्तीमंत विद्रोही वृत्तीचा अति आदर्शवादी असा सूरज होता. कॉलेजची बायोटेकची तिसरीच बॅच होती. प्रयोगशाळेत काही उपकरणं नसली किंवा एखादा प्रयोग नीट झाला नाही किंवा काही गोष्टी शिकवायला आम्ही चालढकल केली की सूरजचा तीळपापड व्हायचा.

हेच का शिकवलं नाही, इतकंच का शिकवलं, अमूक रेफरन्स पुस्तकं का नाहीत अशी सरबत्ती व्हायची. आणि याच्यामुळे जास्तीचं शिकायला लागतं म्हणून वर्गमित्रही नाराजच असायचे त्याच्यावर.

दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मात्र हा मुलगा बदलू लागला, बदलतच गेला. म्हणजे तो शांत झाला, टीका करण्याचा बंद झाला असे नाही पण आता सकारात्मक टीका आली, अडचण सांगून झाली की लगेचच ” आपण असं करून बघू या का ” असा solution देणारा प्रश्नही पाठोपाठ येऊ लागला.

” पहिल्या वर्षाच्या शेवटीशेवटी मी जाम वैतागलो होतो. ” सूरज सांगत होता. ” माझ्या भुणभुणीने शिक्षकांची मी डोकेदुखी होतो, व विद्यार्थ्यांच्यातही माझे कोणी मित्र नव्हते. मी खरंतर सेकंड ईअरला पालघर कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो होतो. पण तिथल्या मॅडमने मला मार्ग दाखवला. इकडे ॲडमिशन का घ्यायची आहे हे ऐकून घेतल्यावर त्या म्हणाल्या की खरा चॅलेंज तिथेच राहून शिक्षकांचे तुझ्याबद्दलचे मत बदलण्यात आहे, त्याच वर्गातल्या मुलांशी मैत्री करण्यात आहे. ” मग मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारले, माझ्यात थोडासा बदल घडवला आणि फरक तुम्हाला दिसतोच आहे. “

खऱ्या अर्थाने सूरज खुलला तो डिपार्टमेंटला tissue culture च्या झालेल्या workshop च्या वेळी. २०-३० मुलांपैकी जेव्हा याच्या एकट्याच्याच explant ला कोंब आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. पण असे क्षण वगळता त्याचा रांगडेपणा अजूनही नको त्या वेळेला डोकं वर काढेल अशी सार्थ भीती आम्हाला सतत वाटत रहायची.

सोसायटीचे सेक्रेटरी एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या वकिल मॅडमना बोर्डीसारख्या ग्रामीण भागातील संस्थेचे कॉलेज दाखवायला घेऊन आले होते. आपली मुलं आळशी आहेत, ती विचार करत नाहीत, नुसती घोकंपट्टी करतात, application करीत नाहीत असा काहीसा टीकात्मक सूर त्यांनी लावला. मॅडमने critical thinking वर जोर देत न्यूटनचे उदाहरण दिले. त्याच्या डोक्यावर सफरचंद पडल्यावर त्याने critical thinking वापरले आणि इतिहास घडला.

सूरजने हे ऐकून हात वर केला आणि बायोटेकच्या सर्व प्राध्यापकांच्या पोटात एकसमयवच्छेदेकरून मोठ्ठा गोळा आला – हा बाबा आता काय तारे तोडणार?

” मॅडम, न्यूटन जर आमच्या पाड्यावर – वस्तीवर जन्मला असता आणि जर आमच्यासारखाच जर भुकेलेला असता आणि त्याच्या जर डोक्यात असे फळ पडले ना, तर तो ते खाली का पडले असा विचार करत बसला नसता. त्याने ते फळ आधी खाऊन टाकलं असतं. रिकाम्या पोटी critical thinking सुचत नाही, मॅडम. “

सूरज प्रकाशझोतात आला होता. त्याचा स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा मॅडमना भावला. सोसायटीने दिलेला पुच्छगुच्छ त्यांनी सूरजला भेट केला.

सूरजबद्दल आणखी माहिती कळत गेली. त्याचे वडिल तलासरीजवळ सरकारी कर्मचारी होते. सूरजला शिष्यवृत्ती / फी माफीही मिळू शकणार होती, पण सूरजचा बायोटेकला प्रवेश घेण्याचा विचार त्याच्या वडिलांना लहान तोंडी मोठा घास वाटत होता. आपण एका छोट्या गावातून आलो आहोत, आपण अशी मोठी स्वप्नं पाहू नयेत. तू शेतकी कॉलेजला ॲडमिशन घे, तू म्हणशील तिथे मी सही करतो. पण हे असं निसर्गाच्या विरूध्द जाणाऱ्या बायोटेक फियोटेकला जाणार असशील तर मी काही सही करणार नाही. आपला मुलगा मोठा होतोय, त्याला दात आहेत पण त्याच्यासाठी आपल्याकडे चणे नाहीत याची त्यांना खंत होती.

बोर्डीला असताना ” आई, मी इतका शिकणार आहे की पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनणार आहे. ” असं सूरजने आईला सांगितले आणि त्या माऊलीची झोप उडाली. असं प्रवाहाविरुद्ध वेगळं काही केलंस तर तुला पगार काय मिळणार आणि तुझं पोट तू कसं भरणार – तिला प्रश्न पडला.

सूरज जवळजवळ वर्षभर डहाणूला (बोर्डीपासून १५ किलोमीटरवर) आदिवासी हॉस्टेलला राहिला. फीचे पैसे उभे करायला तो चक्क एका बारमध्ये नोकरी करत होता. हे कळल्यावर त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला शिक्षण – फीसाठी पैसे दिले व अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले.

दुसऱ्या वर्षी तो रहायला बोर्डीला आला – त्याच्या दोन वर्गमित्रांबरोबर. गावातील मुलांना असलेल्या न्यूनगंडाने ते आपल्यातील गुणांना न्याय देऊ शकत नाहीत हा छाप त्याला पुसायचा होता. त्या मित्रांना चालताबोलता ज्ञानकोश सोबतीला मिळाला होता. याची फलश्रुती म्हणून हे दोघेही सोबती चांगल्या मार्कांनी पास झाले व मार्गी लागले.

सूरज BSc झाला. ६६% गुण मिळवून. पण त्यापेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत तो भारतात सहाव्वा आला होता. ही गोष्टही आम्हाला नंतर गंमतीशीर रीत्या कळली.

JNU entrance clear झाल्यावरही कुठे जायचं, कसं रहायचं, कसा निभाव लागणार त्याची खात्री वाटत नसल्याने सूरजने मुंबईच्या रूईया कॉलेजला analytical science ला MSc साठी form भरला होता. गोखले सोसायटीने थोडे फीचे पैसे उभे केले होते, थोडे डिपार्टमेंटने. आणि अशात रूईया च्या HOD चा मला फोन आला, ” मकरंद, तुझ्या सूरजचा ॲडमिशन फॉर्म मी फाडून टाकलाय. ” आम्ही सर्व सुन्न.

HOD धनश्री मॅडम सांगत होत्या. ” अरे, रूईयात JNU entrance ला पहिला आलेला मुलगा आहे ६१ rank चा आणि तो जगभर पेढे वाटत सुटलाय. तुझा मुलगा सहावा आलाय. भारतभरातील JNU च्या वीस केंद्रांपैकी कुठल्याही कॉलेजला आमच्यापेक्षा जास्त चांगलं infrastructure असेल, शेवटी centrally funded institutes आहेत बाबा त्या. मी सूरजला माझ्याकडे ॲडमिशन घेऊ देणार नाही”

सूरज शिष्यवृत्ती मिळवून गोवा विद्यापीठात गेला. MSc झाल्यावर पठ्ठ्याने PhD करण्यासाठी दोन दोन शिष्यवृत्ती मिळवल्या. आता मात्र वडिलांचा राग विरोध मावळला आणि सूरज दिल्ली स्थित प्रतिष्ठित अशा NII National Institute of Immunology त मायकेल जॅक्सनला झालेल्या vitiligo या कोडाच्या उपायावर PhD करू लागला. आज डॉक्टर सूरज युरोपमध्ये पोस्ट डॉक्टोरल फेलो आहेत.

अजूनही त्याची बोर्डीशी, आमच्यासारख्या जुन्या खोडांशी जोडलेली नाळ कायम आहे.

आतल्या धगधगत्या आगीला त्याने ज्ञान संपादनाकडे वळवलं. नुसती वैगुण्यं काढण्यापेक्षा तो उत्तरं शोधू लागला. सुदैवाने अजूनही तो तसाच आहे – रांगडा, unsophisticated, someone who calls a spade a spade. पण त्या सुरवंटाचं आता छान फुलपाखरू झालं आहे.

आणि या सुंदर प्रवासाचे आम्ही थोड्या कालावधीसाठी का होईना सोबती आणि साक्षीदार होतो याचा आम्हाला असीम आनंद आहे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ O T P – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ O T P – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

पुण्यातील एका गजबजलेल्या बँकेत सकाळची भयंकर गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळे प्रत्येक काउंटरवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याच एका रांगेत ‘रघुनाथराव’ नावाचे एक ७५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ उभे होते. त्यांच्या हाताची बोटे म्हातारपणामुळे थरथर कापत होती आणि हातात एक जुना, पण स्क्रीन फुटलेला स्मार्टफोन होता.

त्यांचा नंबर आला. काउंटरवरील क्लार्कने वैतागलेल्या आवाजात विचारलं, “काय काम आहे बाबा? लवकर बोला. “

रघुनाथराव अत्यंत काकुळतीने म्हणाले, “साहेब, हे बँकेचं खातं एका मोबाईल नंबरला ‘लिंक’ (Link) करायचं होतं. तो नंबर बंद पडू नये म्हणून त्याचं *ऑटो-डेबिट’ (Auto-debit) चालू करायचंय. *

क्लार्कने संगणकावर काहीतरी टाईप केलं आणि म्हणाला, “तुमच्या मोबाईलवर ६ अंकी OTP आला असेल, तो सांगा. ” रघुनाथरावांनी खिशातून चष्मा काढला. ते थरथरत्या बोटांनी स्क्रीनवर तो मेसेज उघडण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांना टचस्क्रीन (Touchscreen) नीट चालवता येत नव्हतं. चुकून दुसरंच काहीतरी उघडायचं.

दोन मिनिटे झाली. त्यांच्या पाठीमागे रांगेत उभा असलेला ‘रोहन’ नावाचा एक २५ वर्षांचा कॉर्पोरेट तरुण भयंकर वैतागला.

“अहो काका, काय लावलंय हे? एक साधा OTP बघता येत नाही तुम्हाला? डिजिटल इंडिया आला, पण ही म्हातारी लोक बँकेत येऊन असाच टाईमपास करणार. घरी बसायचं ना, आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय! ” रोहन रागात ओरडला.

बँकेतले इतर लोकही रघुनाथरावांकडे बघून हसू लागले आणि कुजबुजू लागले. रघुनाथरावांचा चेहरा शरमेने लाल झाला. त्यांनी अत्यंत अपराधी भावनेने मान खाली घातली.

रोहन रागात पुढे आला. “द्या तो फोन इकडे. मी बघतो OTP, ” असं म्हणून त्याने अत्यंत उद्धटपणे रघुनाथरावांच्या हातातून तो फोन हिसकावून घेतला.

रोहनने स्क्रीन लॉक उघडला आणि तो ‘मेसेज’ (Messages) ॲपमध्ये गेला.

बँकेचा OTP सर्वात वरच आला होता. रोहनने तो ६ अंकी OTP क्लार्कला सांगितला. क्लार्कने विचारलं, “कुठला नंबर चालू ठेवायचा आहे साहेब? ” रघुनाथरावांचा आवाज अचानक अत्यंत जड आणि कापरा झाला. ते अत्यंत हळू आवाजात म्हणाले, “माझ्या… माझ्या पत्नीचा नंबर आहे. सौ. सुमती जोशी. “

रोहनने सहज त्या फोनमधील ‘सेंड मेसेजेस’ (Sent Messages) कडे पाहिलं… आणि पुढच्याच सेकंदाला रोहनच्या पायाखालची जमीन, शरीरातलं रक्त आणि त्याचा श्वास एकाच वेळी गोठून गेला! त्याचा घसा पूर्णपणे सुकला आणि डोळे भीतीने विस्फारले गेले.

रोहनने पाहिले की, तो जो ‘सुमती’ नावाचा नंबर होता… त्यावर रघुनाथरावांनी गेले दोन वर्षे दररोज शेकडो मेसेजेस पाठवले होते!

“सुमे… आज डब्यात तुझी आठवण आली. भाजी करपली होती गं. “

“सुमे… गुडघे खूप दुखतायत आज, तू असतीस तर तेल लावून दिलं असतंस. “

“सुमे… पोरगा कालही आला नाही भेटायला. मला खूप एकटं वाटतंय गं. मला कधी नेणार आहेस तू तुझ्याकडे? “

रोहनला अचानक धक्का बसला. रघुनाथराव डोळे पुसत अत्यंत जड आवाजात क्लार्कला सांगत होते…

*साहेब, माझी सुमती दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेली. माझा एकुलता एक मुलगा अमेरिकेत असतो, तो दोन वर्षांत एकदाही मला भेटायला आला नाही. सुमती गेल्यापासून मी या मोठ्या घरात पूर्णपणे एकटा पडलोय. मी रोज रात्री एकटेपणा असह्य झाला की, तिच्या या बंद असलेल्या नंबरवर मेसेज करतो… मला वाटतं ती वाचत असेल. काल टेलिकॉम कंपनीचा मेसेज आला की, जर या नंबरवर रिचार्ज झाला नाही, तर हा नंबर बंद करून दुसऱ्या कुणालातरी दिला जाईल. साहेब… जर हा नंबर दुसऱ्या कुणाला गेला, तर तिच्या व्हॉट्सॲपवरचा तो हसरा फोटो नाहीसा होईल ओ! मी रोज रात्री कोणाशी बोलू? माझ्या जगण्याचा तो एकमेव खोटा आधार आहे… म्हणून माझा जीव जाण्याआधी मला हा नंबर माझ्या खात्याला कायमचा जोडून ठेवायचा आहे. *

हे काळजाचे तुकडे करणारं सत्य त्या बँकेत घुमलं… आणि त्या वातानुकूलित बँकेत एक भयंकर, जीवघेणी स्मशानशांतता पसरली!

क्लार्कच्या हातातला Mouse तिथेच थांबला. रांगेतल्या लोकांच्या नजरा जमिनीवर खिळल्या.

रोहनला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या शिक्षणाची आणि त्या ‘डिजिटल इंडियाच्या’ अहंकाराची भयंकर किळस आली. ज्या बापाला तो ‘टाईमपास करणारा अडाणी’ समजत होता… *तो बाप बँकेत व्यवहार करायला आला नव्हता, तर तो स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाला आणि जळणाऱ्या एकटेपणाला वाचवण्यासाठी धडपडत होता! *

रोहनने कोणतीही किंकाळी फोडली नाही, तो तिथे छाती बडवून रडला नाही किंवा त्याने ‘मला माफ करा’ असे कोणतेही नाटकीय संवाद मारले नाहीत.

तो अत्यंत सुन्न अवस्थेत, एखाद्या मूक पुतळ्यासारखा उभा होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्यातून मूक अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या.

त्याने स्वतःच्या खिशातून स्वतःचा लेटेस्ट आयफोन (iPhone) काढला. त्याचे हात थरथर कापत होते. त्याने स्वतःच्या फोनवरून, सुमतीच्या त्या नंबरवर पुढच्या *दहा वर्षांचा’ रिचार्ज* (Recharge) स्वतःच्या पैशांनी अत्यंत मुकाट्याने करून टाकला!

रोहनने रघुनाथरावांचा तो जुना फोन अत्यंत आदराने, दोन्ही हातांनी त्यांच्या थरथरणाऱ्या हातांवर ठेवला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तो फक्त त्या बँकेच्या फरशीवर, भर गर्दीत, त्या एकट्या बापाच्या पायांवर काही सेकंद नतमस्तक झाला.

त्यानंतर तो आपली बँकेची कामं तशीच सोडून, अत्यंत मुकाट्याने मान खाली घालून त्या बँकेतून बाहेर पडला. त्याची ती भयंकर शांतता आणि ते मूक अश्रू हेच सांगत होते की… *आपण तंत्रज्ञानात कितीही पुढे गेलो, तरी माणसाच्या एकटेपणावर ‘OTP’ नसतो. माणसाला जगण्यासाठी स्क्रीनची नाही, तर कुणाच्या तरी ऐकण्याची गरज असते, जी भूक जगातलं कोणतंही नेटवर्क भागवू शकत नाही. *

आजकाल आपण *वयोवृद्धांना तंत्रज्ञान समजत नाही म्हणून वैतागतो, पण त्यांच्या त्या अज्ञानामागे लपलेली संवादाची भूक आपण कधी समजून घेणार? *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares