मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कंडक्टर…” भाग-२ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “कंडक्टर…” भाग-२ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.) इथून पुढे — 

नेहमीप्रमाणे वाशीच्या बस स्थानकात वेलचीचं बाजकं घेऊन उभा होतो. आज पुण्यात लवकर पोचायचं म्हणून मिळेल त्या पहिल्या बसनं जायचं ठरवलं होतं. नेमकी कर्नाटकची बस आली,  बस कोथरूड वरून जाते याची खात्री करून घेतली आणि बसमध्ये बसलो. वेलचीचं बाजकं सिटखाली ठेवलं. कंडक्टर आला, तिकीट देताना त्याला वेलचीचा वास जाणवला असणार, त्यानं मला एकदा निरखून पाहिलं आणि मला म्हणाला काही वर्षापूर्वी तुम्ही एका बाईला तिकीट काढायला पैसे दिले होते का? माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हिच ती बस आणि हाच तो कंडक्टर. मी हो म्हणालो.

तो काही न बोलता पुढे निघून गेला. सर्व प्रवाशांची तिकीटं झाली आणि नंतर तो माझ्या बाजूला येऊन बसला. आणि म्हणाला, “अहो साहेब मी तुम्हाला किती शोधत होतो. तुम्ही बुधवारी इथूनच पुण्याला जातो असं  म्हणाला होता म्हणून कितीतरी वेळा बस वाशी स्टॅंडवर थांबवत होतो. खाली उतरून तुम्ही कुठे दिसताय का बघत होतो, आणि आज दोन वर्षांनी भेटलात.”

 नंतर त्यानं जे सांगितले ते ऐकून अक्षरशः थक्क झालो. 

त्यानं सांगितलेली ती घटना अशी होती….

त्यादिवशी ज्या बाईला मदत केली होती तिला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून दिलं आणि थोडेफार पैसे पण खर्चासाठी दिले. आणि त्याचं दिवशी दुपारी ती बाई आपल्या वडिलांना घेऊन स्टॅंडवर आली आणि या कंडक्टरला शोधून काढलं. हातात ४००/- रू. असलेलं पाकीट आणि शेतातील भुईमूगाच्या शेंगांची पिशवी त्याच्या हातात दिली आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या “अण्णाला ” म्हणजे मला द्या असं विनवू लागली. कंडक्टर म्हणाला, “ अहो, असा पॅसेंजर काय रोज रोज भेटत 

नसतोय “ . पण त्यांनी आग्रह करून दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या आणि “ माझा नवरा पण आज येणार आहे आणि आम्ही परत भांडणार नाही. एक दोन दिवसांनी मी पण परत मुंबईला जाणार आहे नव-याबरोबर, हे पण त्या अण्णाला सांगा “  असं बोलून आणि नमस्कार करून तिच्या गावाकडे परत गेली. 

आता त्या कंडक्टर पुढे धर्मसंकट उभं राहिलं. कसं शोधायचं मला ? मग वर सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी तो माझा शोध घेत राहिला. महिनाभरानंतर त्या शेंगा त्याने इतर प्रवाशांमधे वाटून टाकल्या. 

एवढं बोलून तो उठून उभा राहिला आणि त्याच्या सिटकडे गेला, वर ठेवलेली त्याची बॅग काढून उघडली आणि काहीतरी घेऊन पुन्हा माझ्याजवळ आला आणि एक मळकट खाकी पाकीट माझ्याकडे दिलं.

‘हे काय आहे ‘ असं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो तेव्हा तो जे म्हणाला ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला, ” साहेब, ही तुमची अमानत आहे, गेली दोन वर्षे मी सांभाळून ठेवली होती, आता तुमची तुम्ही घ्या आणि मला मोकळं करा.” ते ऐकून मला काय बोलायचं हेच सुचेना. मी ते पाकीट फोडून बघितलं तर काय….. आत मध्ये १०० च्या चार नोटा….. बरेच दिवस पाकीटात बंद असल्याने चिकटून गेल्या होत्या. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आवंढा गिळून एवढंच म्हणालो  की ‘ नाही नाही हे पैसे मी घेऊच शकत नाही.’ त्यावर कंडक्टर एवढंच म्हणाला की “ अहो त्या बाईला मी कबूल केलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन, आता तुम्हीच सांगा या पैशांचं करायचं काय ….”  नंतर लगेच तो म्हणाला की 

“एखाद्या संस्थेला मदत करू किंवा एखाद्या देवळात देवापुढे ठेवून देवू .’  मग मीच तोडगा काढला. त्याला सांगितलं की पुढे मागे एखाद्या पॅसेंजरला अशी अडचण आली तर तू हे पैसे वापरून टाक. बोलेबोलेपर्यंत माझा थांबा आला म्हणून मी उतरण्याआधी त्या कंडक्टरला घट्ट मिठी मारली. आणि आभाळभरल्या डोळ्यांनी खाली उतरलो. त्या सुहृद कंडक्टरचं नाव चिदानंद हेगडे.  गुलबर्गा डेपो . त्यांचा फोटो त्यांनी काढू दिला नाही किंवा मोबाइल नंबर पण दिला नाही.

या गोष्टीला आता ८/९ वर्षं झाली. पण अजून माझा गोंधळ होतो की , सचोटी आणि प्रामाणिकपणा जर उणे अधिक करायचा असेल तर तो कुणाचा करायचा….. कबूल केल्याप्रमाणे तिकीटाचे पैसे न विसरता परत करणा-या त्या माऊलीचा, की ते पैसे मिळाल्यावर अफरातफर न करता २ वर्षं व्यवस्थित सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन करणा-या चिदानंद हेगडे यांचा…

तुम्हीच सांगा…

– समाप्त – 

लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे. 

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा,  त्यांच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण ८/९ वर्षांपूर्वी घडलेल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात . मानवी स्वभावाची जडणघडण, त्यांचे वेगळेपण, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या, पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तूपाठ पाहायला मिळाला त्यामुळे त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहात नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणा स्थानं आहेत याची नव्याने जाणीव झाली.

ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे २०१५ ते  २०१८ या काळात घडलेल्या आहेत.

त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे.

जाताना सकाळी लवकर रेल्वेनं जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं हे अनेक वर्षं रुटीन चालू होतं. येताना  आमच्या व्यवसायाकरीता लागणारी वेलची वाशी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रूटीनचा भाग होता.

असंच एका बुधवारी वाशीहून  पुण्याकडे जाणा-या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं दहा किलोचं छोटं बाजकं पण बरोबर होतंच. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या एक दोन आल्या त्या भरुन येत होत्या. त्यामुळे दोन तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून ५/६ जणच होते. कंडक्टर आला तिकीट घेतलं, त्यानं चौकशी केली साब ” वेलची का अच्छा खुशबू आता है ”  मग  वेलची कुठून आणली, कशासाठी आणली,  त्याचा उपयोग काय इ.ची जुजबी माहिती त्याला दिली. इतरांना तिकीटं देण्यासाठी पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे वाचन करायला सुरुवात केली.

काही वेळाने कानावर कानडीमध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं पण बहुदा तिकीटाच्या पैशाबाबत काही तरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेंव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिचं एक वर्षांचं बाळ आणि ३/४ वर्षांचा मुलगा पण रडायला लागले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे हे विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला….. 

…… ती बाई म्हणे नव-याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती. पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्याला उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाका  प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो पण त्या बाईला कानडीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरलाच  दुभाष्या बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली, ” तुम्हीच माझे अण्णा (मोठा भाऊ) आहात, मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू ? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनीऑर्डर करून पैसे परत पाठवते.”  

अशा गोष्टींचा अनुभव असल्याने माझा तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं.  पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत, जाऊ देत बुडीत खात्यात, असा विचार मनात आला. नाहीतरी शिवनेरी बसनं गेलो असतो तर ४५०/- रुपये तिकीट पडलं असतं आणि आताच्या बसला १५०/- रू खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता ५०/- रू. जवळ ठेवून ४००/- रू. कंडक्टरकडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुस-या पुढच्या बसचं तिकीट जाऊन १०/२० रू. शिल्लक राहतील असं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर ४/५ जणांनी २००/- रू  गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली , पाया पडायला लागली. तुमचा पत्ता द्या. मनीऑर्डरने पैसे पाठवते असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि गावाला गेलीस की नव-याला बोलावून घेऊन भांडणं मिटवून टाक असा सल्ला कंडक्टरकरवी दिला.

कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी, तिला जपून जा, मुलांकडे लक्ष दे असं सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावरसुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो. अर्थात हे प्रकरण आठवडा भरात विसरून गेलो. माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.

क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे. 

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

ती – तिच्या संसारात सुखी नव्हती. लग्नाला आठ दहा वर्षे उलटून गेली होती. दोन गोजिरवाणी मुलं होती. तिच्यावर प्रेम करणारा, निर्व्यसनी नवरा होता, त्याला ठीकठाक नोकरी होती. 

 …..पण तरीही ही संसारात सुखी नव्हती. सासरच्या प्रत्येक गोष्टीत हिला काही ना काहीतरी खोट दिसायची. 

सासू सासरे गावाहून आले की त्यांच्या वागण्यात तिला गावठीपणा दिसायचा. सासरे बशीत चहा ओतून फुरके मारत चहा पिऊ लागले की हिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे उमटायचे. सासू जरा कामवालीला ख्यालीखुशाली विचारू लागली की हिचा जीव तीळ तीळ तुटायचा.

आणि नवरोबा काय ! तो तर चुका काढण्यासाठीचा हक्काचा माणूस. पलंगावर ओला टॉवेलच टाकतो, लेंग्याची नाडी लोंबत असते, रात्री झोपेत घोरतो, घरात काय हवंय नकोय ते त्याला कसं बिलकूल ठाऊक नसतं, तिनं म्हणून संसार केला – निभावून नेलं, दुसरी कोणी असती, तर केव्हाच निघून गेली असती, वगैरे वगैरे….. तक्रारींचा पाढा मोठा आणि न संपणारा होता.

शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून, दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला सगळ्यांकडे ही कॅसेट वाजायचीच वाजायची. 

आजची सकाळही अपवाद नव्हती. कालच सासू सासरे गावाहून आले होते, त्यामुळे असंही तिचा मूड खराबच होता. काहीतरी कारण घेऊन ती तणतणतच होती, तेवढ्यात नेहमीच्या भाजीवाल्याने हाळी दिली. 

तिला ताज्या दमाचा श्रोता सापडला होता, ती अशी संधी थोडीच सोडणार होती ! 

गळ्यांच्या मनसोक्त कागाळ्या सांगून झाल्यावर ती म्हणाली, “बरं, बरं. ते राहू दे सगळं. कामं पडली आहेत घरी. सगळी मलाच करावी लागतात. कोणी येत नाही हो मदतीला… टोमॅटो दे किलो दोन किलो.”

“नाही, नाही ताई. तुम्ही टोमॅटो घेऊ नका. ते खराब आहेत. तुम्ही असं करता का, बटाटे घ्या. ते चांगले आहेत.” भाजीवाला सांगू लागला. 

“बटाटे नको आहेत मला. आणि टोमॅटोच हवे आहेत. तू एक काम कर, मला एक रिकामी टोपली दे. मी खराब टोमॅटो त्यात काढून ठेवते आणि चांगले निवडते.”

बघता बघता तिने दोन किलो चांगले टोमॅटो घेतले. 

“बरं, आता भेंडी दे बरं.” ती.

“नाही, मॅडम. भेंडीपण किडलेली आहे. तुम्ही बटाटे का घेत नाहीत ? एक नंबर माल आहे.”

पुन्हा त्याच संवादांची उजळणी झाली आणि पुन्हा तिनं निवडून निवडून एक किलो भेंडी घेतलीच. 

आणि मग तिनं त्या भाजीवाल्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. “का रे ? एवढी सगळी चांगली भाजी आहे आणि तू काय सारखं ही कुजली आहे, ती किडली आहे असा धोशा लावला आहेस ? बघितलंस ना – केवढीतरी चांगली भाजी होती की इथं. आणि तू असा आहेस की सडक्या कुजक्यातच अडकून बसला आहेस.”

ती बोलून गेली आणि क्षणभर तिला वाटलं की हा भाजीवाला भडकणार. पण झालं उलटंच. 

तो प्रसन्न हसला.

“आता कसं छान बोललात ताई ! भाजी असो की आयुष्य, आपण चांगलं तेवढं घ्यावं. सडकं, कुजकं नजरअंदाज करावं. आयुष्य किती सुंदर होऊन जाईल !”

तो तिला उद्देशून बोलला का सहज, कोण जाणे. पण ही गोळी तिला पक्की लागू पडली. 

ती आजारी पडल्यावर उपासतापास करणारे सासरे तिला आठवले. तिच्या पहिल्या बाळंतपणाच्यावेळी तिची आई हॉस्पिटलमध्ये admit होती. सासूबाईंनी तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं तिला, ते आठवलं. बायकोमुलांपासून दूर राहावे लागू नये म्हणून प्रमोशन नाकारणारा नवरा आठवला. वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे सोडूनसुद्धा त्याचं कधीतरी सहज गजरा आणणं आठवलं.

आणि भाजीवाल्याचं वाक्य मनात पिंगा घालू लागलं. 

…. आज संध्याकाळी घरी जेवण तर छान झालंच, आणि नंतरचं जीवनही.

……  ती आता चांगलं स्वीकारायला शिकली होती. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवीचे नवरात्र … ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

देवीचे नवरात्र… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सध्या देवीचे नवरात्र बसले आहे… 

 ती देवी कशी आहे? 

केसापासून नखापर्यंत सर्वांग सुंदर अशी आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. विश्वाची स्वामीनी जगत जननी आहे. अशी ही सुंदरी कोमल शांत नाजूक आहे.

पण इतकच तिचं वर्णन नाही. ती अष्टभुजा आहे. गदा ,चक्र ,शंख, धनुष्यबाण ,शूल ,पाश ,खड्ग अशी अनेक शस्त्रे तिच्या हातात आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे .ती चंडिका आहे देवांनी ही तिची स्तुती केली आहे… अत्यंत शांत कोमल …. पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी ….आणि राक्षसांशी झुंझणारी आहे… अनेक दुष्ट राक्षसांना शासन करून तिने यमलोकात घाडलेले आहे.

या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता एक स्त्री म्हणून बघा….ती पण आपल्यासारखीच आहे…अशा या देवीचा अंश आपल्या ही शरीरात आहे. आपण तिची प्रार्थना करूया.

प्रार्थना करून झाली की आपण काहीतरी तिच्याकडे मागतो… तर विचार करा काय मागायचे? लौकिकात जे हवे आहे  ते आपले सगळे मागून झालेले आहे….

आता थोड वेगळं काही मागूया …. 

राक्षस म्हटलं की अती भयंकर क्रूर अक्राळ विक्राळ असं काहीसं रूप आपल्यासमोर येतं… .. पण लक्षात घ्या राक्षस ही एक वृत्ती आहे…..ती विचारात कृतीतही असू शकते… ते प्रचंड मोठेच असतात असं नाही पण मनाला त्रास देणारे असेही असतात…. काही बहुरूप्या सारखे वेष बदलून येतात. आपण त्यांच्याशी लढूया….

अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात… त्यासाठी देवी सहाय्य करेलच… पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे….. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत….

एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं ते यायला हवं. .. .तो जोश यायलाच हवा….

शत्रूला भ्यायचं नाही तर त्याच्याशी सामना करायचा…  निकरानी आणि सर्व शक्तीनिशी लढायचं असं ती आपल्याला शिकवते….विजय मिळेपर्यंत झुंजायचं…

देवीचं गुणगान करा. ‘ श्री सूक्त ‘, ‘ देवी अथर्वशीर्ष ‘, ‘ सप्तशतीचा पाठ ‘,  हे सर्व काही करा…..आणि तिच्याकडे प्रार्थना करा …. 

“ हे देवी मला निर्भय कर सबल कर……” 

तसेच तिला आश्वासन द्या की “ मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन….” 

दोन भुजा असलेल्या अनेक जणी…. अष्टभुजा असल्यासारख्या अनेक गोष्टींसाठी लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत… त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया…

आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच…

त्या मातृरूपेण संस्थिता अशा देवीला माझा नम्रपणे नमस्कार.

आईसाहेब काय सांगत आहेत ते लक्षात ठेवा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागर…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जागर” ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.

।।नमो देव्यै महादेव्यै

शिवायै सततं नम:

नम: प्रकृत्यै भद्रायै

नियत: प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते. मंत्रजागर आरत्या  यांचा नाद घुमतो. उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.

नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत…महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात, व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया… आदिशक्ती… दुर्गामाता.

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप. तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते, व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी…. सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..

तर असा हा भोंडला, भुलाई, किंवा हादगा …. 

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

अक्कण माती चिक्कण माती .. खळगा जो खणावा

अस्सा खळगा सुरेख बाई .. जातं ते रोवावं…

अस्स जातं सुरेख बाई .. शेल्यानं झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई .. पालखीत ठेवावा

अश्शी पालखी सुरेख बाई .. माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई .. खायाला देतं

अस्सं सासर द्वाड बाई .. कोंडून मारतं..

अस्सं आजोळ गोड बाई .. खेळाया मिळतं…

गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी…. 

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील,असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे. आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं मोठ्या भक्तीभावाने पूजन, पठण होते. गरबा,दांडीयाचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

…. पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…

आपले सर्वच सण हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण , नैतिक संदेश.

उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

…… खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे, त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन  नक्की कसा आहे…?

आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मिती होते, त्या देहावर पाशवी, विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?

समाजासाठी मखरातली देवी आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?

असे अनेक प्रश्न, अनेक वर्षे..  युगानुयुगे, अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? …. ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली. तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली.

…. पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके, तिची घुसमट, तिची होरपळ…. आहेच त्या चौकटीत.

एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच… दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?

.. मग हा जागर कधी होणार?

तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …. जेव्हा  धार लावून तळपतील, तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री जन्माच्या  पावित्र्याचा..मांगल्यांचा… शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा,  नवरा, मग दीर , नणंद , आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा, कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी ,कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?

तळलेले की भाजलेले?

कुठली फळं आहेत का?

बेकरीचे पदार्थ आहेत का? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई  डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१)लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३)गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची.

“हरलीस काय तू बाळे?

गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या” आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो.

डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायची च. सगळीकडे खिरापत “परवडणेबलच” असायची. श्री बालाजी ची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री=श्रीखंड,

बा=बासुंदी, बालुशाही

ला=लाडू, लापशी, लाह्या

जी=जिलबी

ची=चिवडा, चिरोटे

सा=साटोरी, सांजा साळीच्या लाह्या

सू=सुतरफेणी, सुधारस  सुकामेवा. वगैरे. 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे… 

उदा. भाऊ .. भा=भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या), भात, भाकरी.

अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

=उंडे, उपासाचे पदार्थ…  एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा. खिरापत कोणतीही असो ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे. मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय. घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची त्यात भाज्या देखील असायच्या. १६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. 

हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली,  शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीच्या पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका किकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची ” श्री बालाजीची सासू ” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आणि आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रत्येकाचं आयुष्य, हे बासरी सारखं पोकळच असतं अनेक ठिकाणी अनेक छिद्र असतात…! 

कोणतं छिद्र कधी झाकायचं ? कधी उघडायचं ? 

श्वास कधी घ्यायचा ? आणि फुंकर कधी मारायची ? 

— एकदा याचं गणित समजलं, की मग आयुष्य सुरेल होतं…!!! 

आयुष्यात दुःख कुणाला नाही ?

आता हेच पहा ना…. कुणी लिहितंय तर कुणी वाचतंय…. !!! 

गुरुस्थानी असलेले श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मागच्या वेळी बोलताना मला म्हणाले, दुःख कमी करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे ..  ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

सोबत घेऊन जायचा कोणताही पर्याय नसेल, जे आज ” माझं ” आहे ते मला इथेच जर सोडून जायचं असेल … तर मी उद्या ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे… ? ज्याचा आज मी उपभोग घेत आहे, ते माझं नाहीच… उद्या ते दुसऱ्याच्या पदरात असणार आहे, मी ज्याला माझं म्हणतोय ती फिरती ढाल आहे, आज माझ्याकडं आहे, उद्या दुसरीकडे ही ढाल जाणार, हे एकदा समजलं, तर जातांना ही ढाल दुसऱ्याला खुल्या दिलानं द्यायला काय हरकत आहे ? 

— लेके तो जा नही सकते….. तेव्हा ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”

Give it… or leave it !!! 

वरील तत्व तंतोतंत अंमलात आणत, आपण तळागाळातल्या समाजाला आपल्या घासातला घास द्यायला अगोदरच सुरुवात केली आहे. 

आपल्या देण्याच्या या वृत्तीला मनापासून नमस्कार. 

भिक्षेकरी ते कष्टकरी …. 

१ . परिस्थितीने पिचलेले एक तरुण कुटुंब ! नाही म्हणायला एक झोपडं होतं, बाजूला शिवाजीनगर कोर्ट परिसरात “तो” छोटा विक्रीचा व्यवसाय करून बायको आणि दोन पोरांना जगवायचा. याचं झोपडं जिथं होतं, बरोब्बर तिथूनच मेट्रोला जायचं होतं… तिचा तसा हट्टच होता…. मग सर्व झोपड्या जमीनदोस्त झाल्या… याची कशी शिल्लक राहील ? अनेक कुटुंबं उध्वस्त झाली… मग आता नक्कीच विकास होणार याची खात्री पटली… ! 

ज्या रस्त्यावर अनेक लोक छोटे विक्री व्यवसाय करत होते, त्यांचे सर्व सामान उचलून त्यांना तिथे विक्रीस बंदी आणली… उदरनिर्वाह थांबला… लहान लेकरं भुकेने इकडे तडफडत होती, आणि चकाचक होण्याच्या नादात शहर मात्र तिकडं “स्मार्ट” होत होतं…! 

याचाही व्यवसाय थांबला, जगण्याचे आणि जगवण्याचे सर्व रस्ते बंद झाले. याने मग झाडाला लटकून फास घेण्याचा प्रयत्न केला… ऐनवेळी कुणीतरी बघितले आणि थोडक्यात वाचला ! 

याला मी आधीपासून ओळखत होतो. याला बोलावून घेतलं…. सातारी शिव्या आणि पुणेरी टोमण्यांनी याला आधी चांगला बुकलून काढला…. इतका, की यापेक्षा फास परवडला असता, असं त्याला वाटलं असेल. 

इलाज नव्हता… गोळ्या औषधांनी बरं होत नसेल, तर सुई टोचावीच लागते…! 

यानंतर मात्र त्याला प्रेमानं जवळ बसवून, तू गेल्यानंतर, बायको आणि लहान पोरांचे हाल कसे झाले असते… हे त्याला समजावून सांगितले. तो रडायला लागला. त्याला समजेल अशा भाषेत मग सांगितलं, ‘आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नसेल, तर वाट बदलून बघायची असते मित्रा… चालणं थांबवायचं नसतं…!.. ‘पानगळीत झाडं आपली पिकलेली पानं फक्त बदलतात येड्या … आपलं मूळ नव्हे !’ 

सोमवारी २५ सप्टेंबरला विक्रीसाठी याला लागतील त्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आहेत. विक्रीची जागा बदलली आहे… एक कुटुंब सावरलं आहे. बायकोच्या ज्या ओढणीने तो गळफास घेणार होता, तीच ओढणी, आता तो गळ्याभोवती गुंडाळून काम करतो…!  त्याच्या गळ्या भोवती पडलेले काळे निळे व्रण आणि झालेल्या जखमा आता हीच ओढणी झाकते… ! 

२ .  परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले… पत्नीवर निस्सिम प्रेम करणारे… पण तिच्याकडूनच फसवले गेलेले… भ्रमिष्ट होऊन, रस्त्यात एक्सीडेंट होऊन पडलेले एक बाबा…!  २३ तारखेला शनिवारी रस्त्यावरच यांची दाढी कटिंग करून, आंघोळ घालून यांना उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर, यांचे पुढे काय करायचे… याची दिशा भविष्यात समजेल… ! 

बाबांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य… त्यांचे झालेले विश्वासघात, हे सर्व ऐकून मी सुद्धा अंतर्बाह्य हलून गेलो होतो. 

शेवटी एकच समजलं ..  ” विश्वास किंमती असतो पण धोका खूप महाग… !!!” 

याच बाबांचा संपूर्ण आयुष्यपट “कुणी जीव घेता का जीव ?” या दीर्घ लेखात स्वतंत्रपणे मांडला आहे. 

वैद्यकीय

१.  एक वेळ अशी येते.. आई बाप थकून आणि सुकून जातात… गळून पडतात…. तेवढ्यात सुना, किंवा मुलं येतात, माने खाली हात घालून उठवतात… सुकलेल्या निर्जीव डोळ्यात तेवढ्यापुरती जान येते …चकाकी येते… सुकलेली ती पानं मग हरखून भावुक होवून विचारतात, ‘ मला कुठे नेत आहात ?’ 

समोरचा निर्विकारपणे सांगतो, ‘ जाळायला नेतोय… हल्ली सुकलेलं सरपण मिळतंय कुठं…??? ‘

अशी अनेक सुकलेली लाकडं आम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी मिळतात…. आम्ही आधी या लाकडांना शुचिर्भूत करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो… झालेल्या सर्व जखमांवर फुंकर मारून, पुन्हा या जुन्या खोडातून पालवी फुटावी यासाठी प्रयत्न करतो. ! 

या महिन्यात अशा तीन अतिगंभीर रुग्णांना ऍडमिट केले आपल्या आशीर्वादाने ते जगले आहेत. 

त्यांची कर्मकहाणी इथे किंवा स्वतंत्र लेखात मांडावीशी वाटते, परंतु साहित्यातला बीभत्स रस सुद्धा इथे ओशाळेल, म्हणून संयमाने आणि नाईलाजाने थांबतो … !!! 

२. याव्यतिरिक्त रस्त्यावरील खरोखरचे गरजू ओळखून त्यांना कुबड्या, वॉकर, काठ्या, व्हील चेअर, मानेचे तथा कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने दिली आहेत.  त्याचप्रमाणे त्यांच्या रक्त लघवीच्या सर्व तपासण्या करून रस्त्यावरच त्यांना वैद्यकीय उपचार केले आहेत…. हेतू एकच …. बरं झाल्यानंतर स्वाभिमानानं यांनी काहीतरी काम करावं आणि सन्मानानं माणूस म्हणून जगावं…!

अन्नपूर्णा प्रकल्प

खिशाला छिद्र पडलं की पैशाच्या आधी नाती गळून पडतात ही आजची वस्तुस्थिती आहे ! 

बापाच्या शर्टाला पदर नसतो आणि आईच्या पदराला खिसा नसतो… तरीही आईबाप आपल्या मुलाबाळांना झाकायला…  त्यांना काही द्यायला… कधीही कमी पडत नाहीत…! 

पण जेव्हा बापाच्या खिशाला छिद्र पडतं किंवा आईचा पदर फाटतो , त्यावेळी मात्र त्यांची किंमत तुटलेल्या आणि झिजलेल्या पायताणासारखी होते…

वापरून फेकलेली अशी बरीच पायताणं आम्हाला रस्त्यावर जागोजागी उकिरड्यावर भेटतात…! आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अशा उकिरड्यावर पडलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, रोज…. हो दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून सुरू केलेला आमचा हा प्रकल्प,  आजतागायत आपल्या आशीर्वादाने दररोज सुरू आहे…. ! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

भीक नको बाई शिक

आपल्या माध्यमातून भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांना दत्तक घेतलं आहे, आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत. 

माझ्या पूर्व आयुष्यावर मी जे पुस्तक लिहिलं आहे, त्याची विक्री करतो आहे. या विक्रीतून येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहे. 

आमचा हा संपूर्ण प्रवास आहे… भिक्षेकऱ्यांना  कष्टकरी बनवण्याचा… माणूस म्हणून त्यांना जगणं शिकवण्याचा…. !!! कोणत्याही प्रवासात, महत्वाचं काय असतं ? प्रवास सुखकर झाला …? नाही, हे फारसं महत्वाचं नाही…!  प्रवासात खूप अडचणी आल्या …? नाही, हेही फारसं महत्वाचं नाही, त्या तर येणारच …! 

मग ? इच्छित स्थळी पोचला नाहीत अजून ??? …. यालाही फारसं महत्व नाही, रोज थोडं थोडं चालतोय, इच्छित स्थळ येईलच कधीतरी …! 

अरे…. मग महत्त्वाचं काय…. ??? .. महत्त्व असतं, प्रवासात दिलेल्या सोबतीला….! 

चालताना दम लागला तर, पाठीवरून मायेनं फिरवलेल्या हाताला…!! 

धावताना तहानेनं जीव व्याकुळ झाला असता, ओंजळभर पाणी पाजणाऱ्या त्या ओंजळीला….!!! 

खाच खळगे पार करताना, कधी ठेच लागते, अंगठा रक्ताळतो… वेदना आपल्याला होते…. आणि अश्रू समोरच्याच्या डोळयात असतात… महत्त्व असतं त्या समोरच्या थेंबभर अश्रूला….! 

तुम्ही सर्वजण हेच तर करताय…. माझ्या या प्रवासात “सोबत” राहून….! 

आणि म्हणून “आपल्या सोबतीने” झालेल्या या प्रवासाचा लेखाजोखा आपणास सविनय सादर….!

सफर अहम नही…. मंजिल भी अहम नही…

अहम है…. सफर मे मिली हुई साथ….!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वेल… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…

पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…

कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच  तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .

दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.

काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …

तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..

ती प्रचंड खुश…

तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..

भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.

ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली  होती ….

त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..

“ आई इतकं काय निरखून बघताय?”

“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “

सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..

“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…

तिचा तिला वेळ द्या….  कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”

तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “  अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “

सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .

‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत  तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .

अनेक जण सांगणारे भेटले.  माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .

एकदा सुन म्हणाली …. 

“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”

तिने सुनेच्या  बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.

यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही  कमी झाला .

मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …

ती चमकली.  फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं…. 

वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…

ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.

मनोमन तिला सगळं काही उमगलं…

अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…

… आई स्टूलावर  चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल  घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल  पकडले…

आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा  डोळ्यात दिसत होती….

दोघी  कौतुकाने   छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…

सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……

कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शारदीय नवरात्र… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ शारदीय नवरात्र… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गणेशोत्सव संपला की सर्वांना नवरात्राचे वेध लागतात ! नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. नऊ हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.

सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आली आहे. पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो तर अश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो..

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकांशी जोडलेले असतात. भौतिक प्रगतीच्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप, तेज, माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची ‘श्री महालक्ष्मी’, ‘श्री महासरस्वती’ आणि ‘श्री महांकाली’ ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी  संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ज्ञानाची देवता आहे. श्री महाकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे महाकाली ही वाहनावर बसून हातात आयुधे घेतलेली अशी आपण पाहतो.

पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सर्जनाचे प्रतीक असणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरु होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत  सप्तधान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन रोपे तयार होतात. यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो. मातीच्या घटातून येणारी ही छोटी रोपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात. ही ‘आदिशक्ती’ असते.

याच काळात “सरस्वती”ची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटीपूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘ तू शक्ती दे, तू बुद्धी दे ‘ असे म्हणून सरस्वती पूजन होते. पाटी पूजन अजूनही कित्येक मराठी शाळांमधून केले जाते. ते नवमीच्या दिवशी होते.

या नवमीला खंडे नवमी असेही म्हणतात.त्या दिवशी पांडव वनवासातून परत आले आणि वनवासाला जाताना शमीच्या झाडांवर ठेवलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली आणि कौरवांशी युध्दाची तयारी केली. अशा या खंडेनवमीचे स्मरण म्हणून आपण घरी शस्त्र पूजा करतो. देवासमोर घरात असणारी छोटी मोठी शस्त्रे जसे की सुरी, कात्री, कोयता मांडून ठेवतात व त्याची पूजा करतात. (आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही स्टेथोस्कोप, फोर्सेप्स, सिरींज यासारख्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करत होतो.) शेवटी ही पण आत्ताच्या काळातील शस्त्र आहेत ना ! खंडेनवमीला वाहनांची  पूजाही करण्याची पद्धत आहे.. अर्थात काहीजण दसऱ्याच्या दिवशीही करतात. त्यानिमित्ताने  वाहने स्वच्छ करणे, धुऊन काढणे, झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सुशोभित करणे, दाराला तोरण बांधणे हे सर्व घडते.

देवीचे तिसरे रूप म्हणजे “महाकाली” ! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रुप ! यात देवी  सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते. आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठीही “महाकाली” ची पूजा आहे !

या सर्व देवी रूपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र ! या नवरात्राला “शारदीय नवरात्र” हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजनशक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे, यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर केले जातात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ ! त्यामुळे आपल्याला बुद्धी वैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते.

ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते तो हा ‘ नऊ ‘ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळे ही  नवनिर्मिती होते. भारतात विविध  प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे, गुजरातमध्ये देवीसमोर गरबा खेळला जातो. बंगालमध्ये कालीमाता उत्सव होतो. उत्तर भारतात दुर्गा पूजन होते, तसेच महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आणि इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.

सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवीस्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी, हीच या शारदीय नवरात्राच्या काळात मी देवीची प्रार्थना करते.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– माका तुजें जडले पिशें… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – माका तुजें जडले पिशें… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव ! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…

कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू!” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे?….. त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.

तेव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची! 

अ‍ॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं.  ‘धन्य अ‍ॅना मिलार्ड बाई…!’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!

त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य  झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले,  ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला. 

त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय. 

मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्‍या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं.. 

बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible…’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. 

शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्‍या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें….’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.

मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,…. 

‘माका तुजें जडले पिशें….’

 ‘world sight day’ निमित्त….. 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print