मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे

नर्स रूबी नेहमीप्रमाणे हॅास्पिटलच्या इमर्जन्सी रूम (ER) मध्ये येऊन पोहोचली. गेली तीस वर्षं तिनं त्या हॅास्पिटलच्या इमर्जन्सी वॅार्डात मनुष्य स्वभावाचे हजारो नमुने बघितले होते. खरच पेशंट प्राण पणाला लावून झगडत असतो. त्याचा संघर्ष बघताना ती नेहमीच कासावीस होत असे. अनेकांशी रक्तापलीकडचं नातं जुळले होते.

तिला जाणवत असे.. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असलेले जीव किती शुध्द असतात.. समाजात वावरताना घातलेले मुखवटे, अहंकार, द्वेष, ईर्षा सारं काही गळून पडतं! अशा जीवाचं दर्शन तिला नेहमी परमात्म्याजवळ नेत असे.

तिच्या ॲाफिसमधील कॅाफी मेकर भुस्स भुस्स आवाज करून कराफे मध्ये कॅाफी ओतत होता. कोलंबियन कॅाफीचा तो हवाहवासा वास तिनं श्वासात भरून घेतला. खुंटीवरचा एप्रन घातला व जेमतेम दोन घोट पोटात गेले असतील नसतील तेवढ्यात तिचा पेजर खणखणला..

“रूबी, रिपोर्ट टू रूम नंबर १० प्लीज..

रिपोर्ट टू रूम नंबर १०”

तो परिचित मेसेज बघून ती कॅाफी तिथेच ठेऊन ती रूम नंबर १० कडे धावली.

“गुड मॉर्निंग आजोबा! कसे आहात? ” तिच्या परिचित आवाजाने आजोबांच्या चेहऱ्यावर हसू झळकलं..

“सुखाने घरी बसलो होतो मिस रूबी, पण तुला फार मिस केलं म्हणून भेटायला आलोय. ” साधारण ऐंशीला पोचलेले आजोबा कसेबसे हसले. १०३ ताप, उलट्या व सतत लागलेल्या धापेमुळे ते दमून गेले होते.

डॅाक्टर साठे हसऱ्या चेहऱ्याने आत आले पण आजोबांचा चार्ट बघताच त्यांचं हास्य लुप्त झालं. त्यांनी पटकन काही टेस्ट करायला सांगितल्या. आजोबांचा आजार त्यांना माहित होता. तातडीने ॲापरेशन करण्याची वेळ आली होती.

ॲापरेशन झालं. आजोबा जगले पण त्यांना वेदना सोसत नव्हत्या. ऐंशी वर्षाचं शरीर प्राप्त व्याधीशी झगडून गलितगात्र होऊन गेलं होतं.. त्यापेक्षा गेले असते तर सुटले असते हा विचार रूबीनं डॅाक्टरना बोलून दाखवला.. आजोबांचे हाल बघून तिच्या पोटात तुटत असे..

तिथून बाहेर पडताच ती डॅा साठेना म्हणाली, ” सर, कधी काळी मी जर अशा एखाद्या आजाराने ग्रासलेली असेन तर मला अजिबात जगवू नका.. अशा पेशंटला वाचवून आपण त्याचे हालच करतो.. किती सहन करायचं त्या जीवाने? ही चूक माझ्या बाबतीत करू नका..

साठ्यांहून वीस वर्षाने मोठ्या असलेल्या रूबीकडे साठे पहात राहिले.. या चर्चेची त्यांना सवय होती.

“टेक इट ईझी, रूबी. एवढी पेशंटमधे गुंतत जाऊ नको. ” एवढं बोलून ते पुढच्या पेशंटकडे गेले.

आजोबा त्यानंतर सहा वर्षं जगले.. असेच विव्हळत, रडत-खडत, कसेबसे.. अनेक औषधाच्या साईड इफेक्टमुळे बेजार होऊन दुखणं परवडलं पण हे साईड इफेक्टस नकोत म्हणत.. पण जगण्याची इच्छा मात्र चिरतरुण होती..

रूबी सारं जवळून बघत होती.. तिला आश्चर्य वाटायचं.. हे पेशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत? शरीर आपलं आपण नैसर्गिकरित्या जे ठरवेल ते नक्कीच जीवाला कमी वेदना देणारं असेल.. तो मृत्यू सोपा असतो असे डॅा साठे मेडिकल स्टुडंटसनाही शिकवतात पण या भयानक प्रोसिजर चालूच राहतात.. याला जगणं आणि जगवणं म्हणायचं?

रूबीनं आपला शेवट कसा असावा हे स्वत:च्या विल मध्ये लिहून ठेवलं होतं..

“मी आजारी पडले तर माझे कोणतेही ॲापरेशन करू नका. ज्या उपचारामुळे माझी पंचेद्रिय निकामी होतील असे कोणतेही उपचार माझ्यावर करू नका. मला शेवटपर्यंत बोलायचं आहे, देवाचं रूप बघत जायचं आहे, मोगऱ्याचा वास घ्यायचा आहे.. हे जमणार नसेल तर मला वाचवू नका. ”

आता रूबी पंचाहत्तर वर्षाची झाली होती.. एक दिवस चक्कर येऊन पडली म्हणून तिला त्याच ER ला आणण्यात आलं.

“रूबी, काय पराक्रम करून आली आहेस? ” डॅा साठे वातावरण हलके फुलके करायला बघत होते. त्यांनी चष्मा नीट केला.. तिचे रिपोर्ट बघून ते जरासे खाकरले..

“रूबी, ॲापरेशन करून तुझ्या आतड्याचा काही भाग काढून टाकायला हवा.. तुझी इच्छा मला माहित आहे. ॲापरेशन कोणत्याही परिस्थितीत करायचे नाही हे तू लेखी दिले आहेस.. तर या परिस्थितीत तुला किती दिवस मिळतील सांगता येत नाही.. few weeks may be.. ”डॅाक्टर तिच्या नजरेला नजर देणं टाळत होते..

आता रूबीची खरी परीक्षा होती.. ॲापरेशन करून घ्यायचं का नाही? रिकव्हरी सोपी नव्हती. ॲापरेशन यशस्वी होण्याची शक्यता केवळ १५-२०% होती..

रूबीनं डॅाक्टरांकडे बघितलं. अशा गोष्टी डॅाक्टर जेव्हा बेडवर पडलेल्या पेशंटला सांगत असत तेव्हा ती डॅाक्टरांच्या

बाजूला उभी असायची..

पेशंट गडबडून गेलेला असे..

एखादं दिवस विचार करून तो करा जे करायचं ते सांगत असे.. पेशंट बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास त्याची मुलं बाळं “काही करून वाचवा” म्हणत..

आज ती त्या बेडवर होती..

शेजारी उभी नव्हती..

तिच्या डोळ्यात आशा एकवटून आल्या होत्या.. समोर तिला तिची मुलं दिसत होती.. वर्षाचं नातवंड चालायचा प्रयत्न करत होतं.. नवरा.. तो आपल्याशिवाय काही करू शकत नाही.. साधी कॅाफी करता येत नाही त्याला.. अंगणातील जाई जुई शेवंती एकटी पडेल आणि तिचा आवडता कुत्रा टायगर.. त्याला कोण समजावणार..

ती डॅाक्टरांकडे बघत बोलली..

“सर, करा ॲापरेशन. १५-२०% तरी सक्सेस मिळण्याची शक्यता आहे ना?

मला जगायचं आहे!

जी लागेल ती ट्रिटमेंट मला द्या.. ते विल फाडून टाका माझं..

मला जगायचं आहे सर..

I want to live..

I really want to live..

I really really want to live..

डॅा. साठे रूम मधून बाहेर आले. डोळ्यातलं पाणी पुसतं त्यांनी परत एकदा जीवाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते ते अनुभवले..

एकेक अवयव निकामी होतो..

वेदना सहन होत नाहीत..

यापेक्षा गेलं तर बरं वरवर म्हणतात पण.. अजून काय करता येईल विचारणारे सिरिअस पेशंट्स..

कितीही त्रास झाला तरी त्यांची जगण्याची इच्छा कधीच मरत नाही..

“मला जगायचंय” या तत्वावर उभं असलेलं जग.. त्यातील माणूस, प्राणी, किडा, मुंगी सारे जगण्यासाठी धडपडत असतात..

ही केवळ जैविक प्रेरणा नसते..

जीवांच्या गाभ्यातून उसळणारी शक्ती असते..

अस्तित्वाच्या गुढतेतून आलेली..

आत्म्याच्या अमरत्वातून निर्मिलेली..

गाभ्यातून जळणाऱ्या दीपांनं प्रखर केलेली..

म्हणून तर जग चालू आहे..

आजवर काही पेशंटना नैसर्गिकरित्या मरू द्यावं म्हणणारी रूबी जेव्हा स्वत: पेशंट झाली तेव्हा विल मध्ये लिहलेले सारे काही गळून पडले होते..

पाण्यातील मासा, झोप घेतो कैसा।

जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे ॥

आतून एकच आवाज येत होता..

“मला जगायचंय”

“I want to LIVE! ”

.. सर, आज मला कळलय.. टर्मिनल इलनेस असला तरी पेंशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत..

कारण everyone wants to LIVE!

डॅाक्टर साठ्यांनी ॲापरेशनचे पेपर लगेच पुढे पाठवले.. आत येऊन त्यांनी रूबीची सही घेतली..

“Ruby, will try our best! ”

ॲापरेशनचा सक्सेस रेट ते परत परत शोधू लागले..

(सत्य घटनेवर आधारित) 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज सुदैवाने तो कामावरून लवकरच घरी आला होता. चांगलंच झालं, गणपती तोंडावर आले होते, घरी तयारीला मदत झाली असती.

तो आला, बायको बाहेर जायच्याच तयारीत होती, “अहो, बरं झालं आलात. येता का दोन मिनिटं माझ्याबरोबर? गौरीचे खडे मिळतात का बघू या. “

त्याची आई – तिची सासू हा संवाद ऐकत होती.

तिच्या नजरेसमोर पंचवीस तीस वर्षांपूर्वीची नव्या नवलाईची सून – ती स्वतःच उभी राहिली. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला नदीवर जायचं, आणि तेव्हाच नदीपात्रातून निवडून सात गोल गुळगुळीत खडे घेऊन यायचे. तोंडात पाण्याचा घोट घ्यायचा, आणि घरी येईपर्यंत एक अक्षरही बोलायचं नाही. मग त्या गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरींना सगळं घर फिरवून दाखवायचं, हळदकुंकवाची पावलं घरभर फिरवायची, आरास करायची, सगळंसगळं कसं झर्रकन नजरेसमोर उभं राहिलं.

पण पुढे नवऱ्याच्या निधनानंतर ही शहरात मुलाकडे आली, इथं कुठली नदी आणि कुठले खडे!

सून चांगली होती, कुळधर्म निगुतीने सांभाळायची. श्रावण भाद्रपद आला की तिचा खडेगौरीसाठीच्या खड्यांच्या शोध सुरू व्हायचा. पण यावेळी या ना त्या कारणाने राहूनच गेलं होतं.

आणि आता गौरी अगदी आठवड्यावर आल्या होत्या. म्हणून तिची धावपळ सुरू होती.

तो आल्यापावली परत फिरला. खेळाची मैदानं, इमारतींची बांधकामं, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कडेला मांडलेले बांधकाम साहित्याचे ढिगारे – सगळं धुंडाळून झालं.

हल्ली बहुधा वाळू चाळूनच आणत असावेत, किंवा सरळ दगडाच्या कपच्याच वापरत असावेत.

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून हवी तशी गोल गरगरीत खडी मिळतच नव्हती.

देवीच्या देवळाशेजारी बागेशी जरा बघावं म्हणून हे दोघं त्या दिशेने वळले, गुरुजींनी पाहिलं, म्हणाले, “खडेगौरी का शोधत आहात? नका घेऊ रे बाबांनो इथून. कुत्रीच काय पण माणसंदेखील लघवी करतात हो इथं निर्लज्जासारखे. ” 

त्यांचं हे वाक्य ऐकून तिथं शोधाशोध करायची इच्छा मरूनच गेली दोघांचीही.

हताश होऊन रित्या हाताने दोघेही परतले.

पण आईचा चेहरा थोडा प्रफुल्लीत होता. “अरे, तुम्ही एक काम करा, ” ती उत्साहाने सांगू लागली, “आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तिनं गाडगीळांकडून चक्क चांदीचे खडे आणले आहेत. फक्त त्यांचं विसर्जन करायचं नाही, बरं का! ” नर्म विनोद करत तिनं वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.

लेक आणि सून पु ना गाडगीळांच्या पेढीवर चांदीचे खडे घ्यायला निघाले. तिथे त्यांना जेम्सच्या गोळीच्या आकाराचा चांदीचा भरीव खडा दाखवला गेला. ४०-५० ग्रॅमच्या त्या एका खड्याची किंमत तब्बल ६, ००० रुपये म्हटल्यावर याचे तर डोळेच फिरले. अहो, सात खडे घ्यायचे होते ना!

“कमी किंमतीत आहेत का हो? ” यानं विचारलं. त्यावर साधारण त्या भरीव खड्याच्याच आकाराची पण पोकळ असा एक सोंगटीसारखा खडा त्याला दाखवला, तो होता ६०० रुपयांना. म्हणजे असे सात खडे ४, ००० रुपयांच्यावर पडणार होते.

महाग तर होतेच शिवाय त्यांचा तो सारीपाट खेळण्याच्या सोंगटीसारखा आकार काही तिला खडेगौर म्हणून रुचलाच नाही. यावेळी बहुधा पहिल्यांदाच गाडगीळांच्या दुकानातून ही दोघं रिकाम्या हाताने माघारी फिरले.

लगेहाथ वन ग्रॅम ज्वेलरीची दुकानं पालथी घालून झाली, वैशंपायनांचा सोनचाफा, आष्टेकर, सोनिगरा, रांका – सगळे ज्वेलर झाले. पण सगळीकडे नन्नाचाच पाढा.

हिरमुसले होऊन हे दोघं आपल्या सोसायटीत परतले, बिल्डिंगच्या दारात रखवालदाराला त्याने ही सगळी रामकहाणी सांगितली.

तो तोंडांत माव्याचा तोबरा भरून बसला होता. भूतदया दृष्टीने त्याने त्या मुखरसाला त्यागले, त्यामुळे मुक्त कंठाने ज्ञानरस वाटायला तो आणि त्याचा गळा मोकळा झाला होता. “बहुतही आसान है. आप ऐसा क्यो नहीं करते? आप अमेजॉन या फिलीपकार्टपर जाव, और पेबल्स मंगाव ना. सफेद, कलरवाला सब चॉईस रहता है उधर. वो फिशटँक में डालने के लिये या ऐसेच डेकोरेशन के लिये मंगाते है ना लोग. और १०० रुपयेमे काम हो जायेगा. ” त्याने आकाशवाणी केली आणि नव्या दमाने तो पुन्हा मौनात गेला.

नदीवरून गौरीचे खडे आणणाऱ्या आईच्या सुनेची वाटचाल आता अशी ऑनलाईन रंगीत खड्यांपर्यंत होणार आहे हा प्रवास त्याला काही झेपला नाही, आणि सुन्न होऊन तो तिथेच मटकन खाली बसला.

“अगर ये आप नहीं करनेवाले, तो फिर सिर्फ उपरवालाही आपकी मदद कर सकता है. ” रखवालदार.

त्याचं हे वाक्य ऐकू अचानक तिचा चेहरा उजळला, “बाई, बाई, बाई! कशी मी अशी वेंधळी? अगदी काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाली माझी. अहो, चला, हा म्हणतो आहे ना, उपरवाला मदद करेगा, अगदी बरोबर आहे हे. चला, चला, पहिल्या मजल्यावरच्या ओसवालांच्या घरी चला, ” तिने उत्साहात फर्मावलं.

“अगं, ते शेजारच्या इमारतीत भाड्याने रहात आहेत सध्या, त्यांच्याकडे renovation चं काम चाललं आहे ना. भिंती फोडल्या आहेत, नवीन बांधणार आहेत. पार लाद्यासुद्धा बदलून काढत आहेत ते, ” तो म्हणाला, आणि बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की भिंती, लाद्या बदलत आहेत म्हणजे सिमेंट रेती खडी आलीच की.

तोही नव्या दमानं तिला सामील झाला.

ते ओसवालांच्या घरी गेले, तिथल्या बांधकाम साहित्यात तिला चटदिशी तिला हवे तसे गोल गरगरीत खडे मिळाले.

तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिच्या खडेगौरीच्या शोधाची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली होती.

पर्समधून पाण्याची बाटली घेऊन ती घोटभर पाणी प्यायली, नवरोबा काहीतरी तिला विचारत होता, पण ती मुग्धच राहिली.

आता खडेगौरी सोबत होत्या ना, आता वरच्या मजल्यावर, घरी पोचेस्तोवर ती मौनातच राहणार होती.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निरोप… भाग १ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆

सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग १ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

उत्तराच्या मुलाचा जन्म झाला. श्रीकृष्णाने त्याला सुखरुप पाहिले, द्रौपदीला, पांडवाना नवसाम्राज्याच्या शुभेच्छा देऊन ते द्वारकेला परत जायला निघाले.

“कान्हा, परत कधी भेट होईल आपली? खूप कांही गमावून हे साम्राज्य मिळवले आहे… पण आनंद कुठे गेला जगण्यातला तेच कळत नाही… ” द्रौपदीला अश्रु अनावर झाले होते.

श्रीकृष्णांने तिचा खांदा थोपटला,

“पार्था, तुलाच ह्या सा-यांची काळजी घ्यायची आहे. विशेषतः उत्तरा आणि परीक्षिताची…! मला निघायला हवं, द्वारकेचेही बघायला हवचं ना? “

“कान्हा, सांभाळ हो स्वतःला, सत्याला न्याय देण्यासाठी वाईटपण पदरी घेत गेलास… विनाकारण शाप नशिबी आले तुझ्या… ” कुंती भरल्या गळ्याने बोलली.

“आत्या, नियती हीच असते, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा.. वानप्रथाश्रमाची तयारी केलीय ना… शांत मनाने जा… बदल हा निसर्गाचा नियम आहे. आता इथला विचार अजिबात नको. “

सा-यांना एक नवी उर्जा देऊन श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले.

द्वारकेत पोहचताच राज्यात वर्षभर नसल्याने द्वारकाधीश कामात गुंग झाले. दोनच दिवस झाले असतील,

गोकुळमधून निरोप आलाय असं उध्दवकाका सांगायला आले,

दूत आला आणि म्हणाला,

“महाराज, यशोदामाईंनी आठवण काढलीय आपली…! “

“काय झालय मैय्याला? “

अस द्वारकाधीशांनी हळुवार स्वरात विचारलं… पण त्याचं मन बालपणात हरवून गेलं.

कान्हा… कान्हा करत दहीभाताचं ताट घेऊन माग फिरणारी… नदीवर फिरायला खेळायला गेल्यावर कासावीस होणारी, क्षणाक्षणाला कान्हा बरोबरच मन असणारी… मैय्या अशी मैय्याची अनेक रुप द्वारकाधीशांसमोर तरळत होती… गोकुळ सोडून वीस वर्ष झाली सा-यां जबाबदा-यातून गोकुळात जाणं झालंच नव्हतं…

“मैय्या, तुझ्या कान्हाला क्षमा कर..! “

अस द्वारकाधीश रोज मनोमन म्हणत… आपण एवढे व्यस्त कसे झालो मैय्याला आपण कस तोंड दाखवणार?

द्वारकाधीशांचे मन व्याकूळ झाले होते..

द्वारकाधीश गोकुळात पोहचले…

गोकुळबनात रथ पोहचला…

तुता-या वाजू लागल्या,

“द्वारकाधीशांचे आगमन होत आहे,

सुस्वागत… महाराज..!!! “

“द्वारकाधीशांचा विजय असो…! “

द्वारकाधीशांच्या हृदयात कळ उठली, कान्हा, किसना, कृष्णा असं हाका मारणारं गोकुळ अस परक्यासारखं का हाका मारतयं मला….!!!

श्रीकृष्णांने वाड्याच्या दारात पाऊल ठेवले. समोर राधा उभी होती…

कान्हा राधेकडे पहात राहिला..

वीस वर्षांनंतर दिसत होती राधा… प्रौढ, शांत.. डोळ्यांभोवती दाट काळी वर्तुळं तोच व्याकूळ भाव..

“राधे, मैय्या कशी आहे ग? “

“यावं, द्वारकाधीश..!! मैय्या आत आहे. “

राधेनं कान्हाला हाताला धरुन आत नेल.

कान्हा आतल्या आत हलला… राधे मी तुझा कान्हा आहे ग… जन्मजन्मांतरीचे नात आपलं.. जगासाठी मी द्वारकाधीश…! तुझ्यासाठी मी कान्हाचं आहे ग..!!

कान्हाने यशोदेच्या दालनात पाऊल ठेवलं आणि पळतच यशोदेच्या बिछान्याजवळ जाऊन उभा राहिला…

इतक्या वर्षानंतर मैय्याला पहाताना कान्हा ला भरुन आलं, नेहमी साजशृंगार केलेली मैय्या… अव्याहत कान्हाच्या मागे पळणारी, उत्साहाने बडबड करणारी… उध्दवाबरोबर श्रीकृष्ण मथुरेला जाताना रथांमागे रडत रडत येणारी मैय्या, रडतच तिला सावरणारी राधा…

“मैय्या, मी आलोय ग कान्हा, डोळे उघड मैय्या…! “

यशोदेने हळुवारपणे डोळे उघडले, जणू त्यात नव्याने कुणीतरी प्राण फुंकावेत तशी उत्साहाने यशोदा उठली..!!!

मैय्या, अस म्हणतं कान्हाने त्या अशक्त कुडीला आपल्या कुशीत घेतलं, बांध फुटल्यासारखे दोघही गदगदून आपल्या आसवांनी जणू मधली विरहाची सारी वर्ष धुऊन काढत होते.

यशोदेच्या पायाशी बसलेली राधाही हुंदके देत होती… म्हातारे नंदबाबा वाहत्या डोळ्यांनी आपल्या कान्हाच्या खांद्यावर थोपटत होते.

“कान्हाला दहीपोहे दे गं राधे..!”

“मैय्या, द्वारकाधीशांना चालणार का दहीपोहे?” असं हळूच किंचित हसत राधेने विचारल

“मैय्या, बघ ना सारखचं द्वारकाधीश म्हणतेय मला, मी कान्हा चं आहे नं तुझा..?”

“राधे, नको ग असेल तो द्वारकेत द्वारकाधीश..! पण आपल्यासाठी तो कान्हाचं आहे. ” मैय्या क्षीण स्वरात म्हणाली…

“मैय्या आधीच कळवायचं ना ग, आलो असतो मी.. “आपल हे बोलण फोल आहे हे माहित असूनही श्रीकृष्ण म्हणाले.

“एवढं मोठं युध्द चाललेलं, तू पार्थाचं सारथ्य करत होतास.. सारं सांगितले बरं तुझ्या नंदबाबांनी… भरुन पावले मी, आता कांहीच इच्छा नाही, कान्हा! “

“मैय्या तु अन बाबा, राधा, अनयभाऊ सारेच चला द्वारकेला, सारे तिथचं रहाल माझ्याजवळ..! “

कान्हाला राधेनं मैय्याला जेवणं भरवायला लावलं, कान्हाला अशक्त झालेल्या यशोदेनं दहीपोह्याचे चार घास भरवले.. गोकुळात आनंद पसरला होता. नंदवाड्यात अशा पंक्ति कितीतरी दिवसांनी पडल्या होत्या.

श्रीकृष्ण क्षणभरही यशोदेला सोडून हलले नव्हते. सा-यांची जेवणं झाली…

यशोदा म्लान झाली होती. आपल्या हातात कान्हाचा शेला घट्ट पकडून तिने डोळे मिटले होते.

“कान्हा, आज बांसरी वाजवशील का रे? मी अन् राधा सतत आठवण काढत असतो त्या बासरीच्यां सूरांची..!

ही वेडी पोर तर सतत ती बासरी हातात धरुन एकटक पहात बसते…”

“कान्हा, वाजव ना रे मीही वाट पहातेय त्या अलवार सुरांची..! “राधा अधोवदनानेच बोलली.

“मैय्या, बांसरी कुठाय माझ्याकडे?”

“कान्हा, जाताना मला देऊन गेला होतास ना तुझी बांसरी.. “

अस म्हणत राधेन ती कान्हाच्या रेशमी शेल्यात निगुतीने जपून ठेवलेली बासरी बाहेर काढली. अन कान्हाच्या हातात ठेवली,

“हं, सुरु कर आता… “अस म्हणत राधा यशोदेच्या पायाशी जाऊन बसली.

श्रीकृष्णांने हातात बांसरी घेतली.. मन हळुवार झालं, यमुनेचा कांठ, गायी, गोपगोपिका सवंगडी, तो सर्वांनीच एकत्र खाल्लेला गोपाळकाला आठवून श्रीकृष्णांच्या काळजात उगाचच कासाविशी वाढली.

त्यानं मैय्याला नीट उशीला टेकून बसवलं, पाथथ्याशी बसलेल्या राधेकडे पहात त्यानं डोळे मिटले, अन् बांसरी वाजवायला सुरु केली.

अन् सारा नंदवाडा, गोकुळ त्या मधुर स्वरावर डोलू लागलं… त्या शांततेत ते खूप वर्षांनी वाजणारे मधुर स्वर… सर्वांना स्वर्गिय सुखाची अनुभूती देत होते….

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं… राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती 

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं.. राधेची मान वर केली अन् कान्हाचं काळीज चर्र झाल, डोळे अधोन्मिलीत, डोळ्यांच्या कडांवर पाणी साचलेलं. वेळीअवेळी ‘कान्हा वाजवं ना रे बांसरी असा लाडिक आणि एकच हट्ट करणारी राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

उध्दवाबरोबर मथुरेला जाताना श्रीकृष्ण राधेला भेटायला गेले होते. यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाखाली राधा झाडाला टेकून बसली होती. गोरापान चेहरा रडून रडून लाल झाला होता.

“कान्हा, जायलाच हवं का रे,…! “

अश्रुभरल्या डोळ्यांनी आणि जड गळ्याने राधेनं त्या पंधरा वर्षाच्या सावळ्या युवकाला विचारलं होतं.

“हे होणारच होतं राधे, तु दुःख करुन नको घेऊ मी येत राहिन ना… ग..! “

“नक्की येशील ना रे… मी वाट पाहिन, “

अस म्हणणारी राधा कायमची शांत झाली होती..

ते अर्धवट उघडे असलेले काळेभोर डोळे कान्हाला या वचनांचा आठव देऊन कासावीस करत होते.

माझे नेत्र राहतील उघडे,

तुझी वाट पहाताना…

माझे प्राण गेले तरी…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निरोप… भाग २ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆

सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग २ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

(कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.) इथून पुढे —- 

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती. यमुनेच्या काठावर दोन चिता रचल्या होत्या.

आधी मैय्याला चितेवर ठेवलं, श्रीकृष्णांने मैय्या च्या मुखात थरथरत्या हाताने तुलसीपत्र ठेवले.

शेवटचं चंदनी लाकूड मैय्याच्या चेहऱ्यावर ठेवले.

अन्

चितेभोवती प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. नंदबाबा आपल्या कान्हाला असं विवश पाहून दुःखी झाले होते… त्यांना कान्हाची सतत आठवण काढणारी, त्याच्याच आठवणींत जगणारी कान्हाची मैय्या आठवत होती.

कान्हा आपला मुलगा नाही असं कळल्यावर कान्हाला घट्ट मिठी मारुन 

पदराआड दडवू पहाणारी, जन्मभर कान्हाचीच आई म्हणून जगलेली भाबडी मैय्या होती ती… तिची प्रतिक्षा संपली होती. आज कान्हा माझ्याजवळ आहे या समाधानात ती गेली होती.

नंदबाबांनी मनोमन या मातेला वंदनच केलं.

कान्हाने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मैय्याच्या अग्नि दिला. कापूर, चंदनाच्या 

मध्ये मैय्याचा अशक्त देह अग्निला स्वाहा झाला.

कान्हा हात जोडून एकटक त्या जळणा-या चितेकडे पहात होते.

…………

सुन्न उभ्या राहिलेल्या कान्हाच्या खांद्याला अनय.. राधेच्या पतीने हलकासा स्पर्श केला.

अन भरल्या गळ्याने म्हणाला,

“यशोदानंदन, राधेला निरोप देऊया ना..! “

श्रीकृष्ण राधेच्या चितेजवळ उभे राहिले. जस समजायला लागलं तशी राधा त्यांच्याबरोबर होती. राधा कान्हापेक्षा मोठी होती सतत त्याला सांभाळून घेत राहिली. जिवापाड जीव टाकत राहिली.

त्या बांसरीच्या सुरांना सूर.. संगीत देत राहिली..

चितेवर सोळा शृंगारात पहुडलेल्या त्या राधेला पहाताना तिच्या लग्नात पूर्ण शृंगार केलेली दहा वर्षांची राधा आठवली.. तिच्या डोलीमागे रडतरडत धावणारा पांच वर्षांचा कान्हा…!

‘अरे दूर कुठे गेलीय राधुली, इथेच तर दोन घर सोडून अनयाघरी तर आहे. रोज खेळशील तिच्याशी तू.. ‘

अस कान्हाला यशोदेनं समजावलं होतं…

“अनयदा, आपण देताय ना राधेला निरोप..! “

अस अनयला सांगताना तो शामसावळा गदगदला होता, मनात हुंकार येत होते. राधेला निरोप देण शक्य आहे का मला? माझ्या रोमारोमात ती आहे, माझ्या अंतरंगात ती आहे… असेल जोपर्यंत चंद्रसुर्य आहेत तोपर्यंत हे राधाकृष्णाचे नातं अमर आहे..

“नाही यशोदानंदन, राधेचा लौकीकअर्थाने मी पती असलो तरी तिची शेवटची पाठवणी करायचा हक्क फक्त तुमचाच..! “

कान्हा पुढे झाला, अन् शांत मनाने राधेला अग्नि दिला….

कंदबाला टेकून उभा राहिला या दोन्ही चितेकडे पहात… त्याबरोबरच आपला इथला कार्यभाग संपला हीही जाणिव घेत… गोकुळाला… आणि आपल्या सरलेल्या बालपणाला निरोप देत राहिला… रिक्त रिक्त झालेला…

कान्हा नंदबाबांना आग्रहाने बरोबर घेऊन द्वारकेला निघाला.

द्वारकाधीश पुन्हा राजधानीत प्रवेश करते झाले. रुक्मिणी, सत्यभामा सामो-या आल्या. रुक्मिणीने नंदबाबांना मोठ्या मायेनं त्यांच्यासाठी तयार केलेल्या महालात पोहचवलं…!

द्वारकाधीश पुन्हा राज्यकारभारात रमले. पण रुक्मिणीला वाटत होतं, मैय्या आणि राधेला निरोप देऊन आल्यापासून खूप अबोल आणि शांत झालेत….

सतत विचारमग्न असणारे द्वारकाधीश 

राज्यकारभार करत होते… पण..

…………………

द्वारकाधीशांनी अश्वमेघ यज्ञ केला. अर्जुन तिकडे इंद्रप्रस्थात थुधिष्ठराच्या आज्ञेने राज्यकारभार पहात होता.

द्रौपदी सारे पुत्र अश्वत्थामाने मारल्याने विरक्त झाली होती.

परीक्षितांला मोठ आणि युध्दनिपुण करणं हेच सुभद्रा आणि पार्थाचे आता एकमेव ध्येय होते…

रुक्मिणी, सत्यभामा कृष्णपुत्र सांब, अनिरुध्द आणि इतरांच्या बाललीलात मग्न होत्या.

महाराज उग्रसेन वयस्कर झाले असले तरी या परंतवंडाकडे त्याचं लक्ष होतच.

महर्षी दुर्वास, विश्वामित्र, नारद, वशिष्ठ यांना कांही औपचारिक बैठकीसाठी द्वारकाधीशांनी आमंत्रित केले होते. राजधानी लगतच्या वनबागेत त्यांचा निवास होता. बैठक संपल्यानंतर महर्षी दुर्वास आपल्या कुटीत विश्राम घेण्यास गेले.

इकडे कृष्णपुत्र सांब आणि त्याचे मित्रांना दुर्वासऋषींची चेष्टा करायची लहर आली. सांबाने साडी नेसली, गर्भवती असल्याचा भास करण्यासाठी छोट्याशा मुसळाला कपडे गुंडाळून ते पोटाला बांधले.

“ऋषिवर, ही द्वारकाधीशांची स्नुषा आहे. आपण ह्यांना पुत्र होईल की पुत्री हे सांगाल का? “

अस सांबाच्या मित्रमंडळीनी मुद्दामच दुर्वासांना विचारलं.

महर्षी दुर्वास म्हणजे शिघ्रकोपी..!!

त्यांनी सांबच्या देहयष्टी आणि देहबोलीवरुन ओळखले हा कोणीतरी पुरुष आहे. त्यांना या तुच्छ चेष्टेचा अतिशय संताप आला…

“मुर्खा, तू जे हे पोटाला बांधलयस ना याच्यामुळेच तुझ्या पूर्ण कुळाचा नाश होईल… “

सांब घाबरला त्याने ‘मी कृष्णपुत्र आहे, मला क्षमा करा अशी याचना केली.. आजोबा उग्रसेनना सारं सांगितले, त्यांनीही क्षमा मागितली.

दुर्वास म्हणाले, “क्षत्रिय पराक्रमी, श्रेष्ठ पित्याच्या पोटी जन्म घेऊन तू अशी हीन बुध्दी कशी घेऊन आलास, अनिरुध्दाचा परिवार वाचेल कदाचित…! “

द्वारकाधीशांच्या कानांवर हे सारं गेलं, त्यांना गांधारीचा तळतळाट आठवला. कांहीच चूक नसताना सत्याचा पाठीराखा म्हणून “तू कौरव वंश संपवलास तसाच तुझा यादववंश संपेल..! ” असं गांधारीदेवी म्हणाल्या होत्या…

महायुध्द संपून पस्तीस वर्ष झाली होती. द्वारकाधीश आता वयोवृध्द दिसत होते. रुक्मिणीनेही या इहलोकाचा निरोप घेतला होता.

ज्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या महिरपीने द्वारकाधीश मोहकच दिसत ते आता रुपेरी झाले होते…

आता त्रेतायुग संपणार होते… अन कलियुग लागणार होते… हे घडणार अटळ आहे. हे त्यांनाही माहित होतेच.

राज्यात विचित्र घटना घडू लागल्या… द्वारकाधीशांच्या महालातून सुदर्शन चक्र, द्वारकाधीशांची गदा अचानक नाहिशी झाली…

बलरामदादांचा नांगरही नाहिसा झाला.

सांब आणि दुसऱ्यां भावंडामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरुन भांडणे झाली… अन् त्याचं रुपांतर मोठ्या घटनेत झालं. सांब मारला गेला…

द्वारका नदीकाठी चितांची रांग लागली…

द्वारकेवर म्लेंछ आणि डाकूंचा हल्ला झाला होता. द्वारकाधीशांनी अर्जुनाला मदतीला ये असा निरोप धाडला…

विषण्ण मनाने द्वारकाधीश वनात ध्यानधारणा करण्यास गेले… कंदबाला टेकून पाय लांब करुन शांत मुद्रेत बसले होते.

“कान्हा, आलास? मी कित्ती वाट पाहिली… पुरी पस्तीस वर्ष झाली रे मी वाट पहातेय… त्या शेवटी ऐकलेल्या बांसरीचे सूर ऐकतेय अजूनही….!

बघ तुला ऐकू येतय का? “

राधा शेजारीच बसून विचारत होती… कान्हाने तिचा हात हाती घेतला, अन् तेवढ्यात जिरु नांवाच्या शिका-याचा बाण सूं,. सूं करत 

कान्हाच्या तळपायात घुसला…

कान्हा जोरात ओरडले,

मैय्या,….. अन त्यांचे सावळेमुख लालभडक झाले… वेदना सहन करण्यासाठी त्यांनी राधेचा हात धरायचा प्रयत्न केला…. तर…

राधा सावकाश उठून द्वारका नदीच्या दिशेने जात होती…

“राधे राधे थांब… “अस कान्हा जिवांच्या आकांताने ओरडले… पण राधा क्षणार्धात त्या द्वारकेच्या पाण्यात नाहीशी झाली…

द्वारकाधीशांचे हळूहळू डोळे मिटू लागले. पृथ्वीला हात लावून आपल्या त्यांनी वंदन केलं… अन शांतपणे डोळे मिटले…. सत्य, प्रेम, करुणा यांनी पृथ्वीचा निरोप घेतला…!

……….

अर्जुन द्वारकेत आल्या आल्या श्रीकृष्णांनी इहलोकाचा निरोप घेतल्याची बातमी पार्थाला कळली…!

पार्थच्या दुःखाला पारावर राहिला नाही. बलराम आणि रेवती यांनी स्वतःला द्वारकेच्या स्वाधीन केले.

अर्जुनाने आपल्या जिवलगाचे पार्थिव द्वारकेच्या काठावर आणले.

डोळे शांत मिटलेले.. अर्जुनाला वाटले आता श्रीकृष्ण उठेल अन् म्हणेल,

“पार्था, असा पायाशी का बसलायस? बोल तुला काय मदत हवीय… चल मी येतो तुझ्याबरोबर..! “

ते रुपेरी कुरळे कुंतल, भव्य भालप्रदेश, धारदार नाक, पातळ गुलाबी जिवणी… पार्थाला कान्हाच्या चेहऱ्यावरुन नजर हटवावीशी वाटतं नव्हती… त्याच ते मनमोहक हसू… डाव्या गालावरील लाडिक खळी,

कान्हा विचारमग्न असला की माथ्यावर किंचितशी उभी आठी पडे,

द्रौपदीला शांत करण्याचं सामर्थ्य असलेला तिचा सखा..

युध्दात कर्तव्यकठोरपणे निर्णय घेणारा, द्रौपदीचे सारे पुत्र रात्री झोपेत अश्वत्थामाने मारल्यावर दुःखाने विव्हल होऊन पार्थ, द्रौपदीला पोटाशी घेणारा कान्हा…!

चितेवर श्रीकृष्णांचे पार्थिव ठेवताना अनिरुध्द आणि अर्जुन यांना गदगदून आलं… जड अंतःकरणाने त्या द्वारकाधीशाला निरोप दिला.

अर्जुनाने सत्यभामा, अनिरुध्द त्याची पत्नी उषा इतर सर्वांनाच तयार केले. सारे द्वारकेला निरोप देऊन तयार झाले… सारी द्वारका रिक्त झाली होती… इकडे द्वारका नदी उसळ्या मारु लागली होती.

अर्जुन हजारो लोकांना घेऊन आपली राजधानी इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करता झाला…

अर्जुन इंद्रप्रस्थात पोहचला… राणीवश्यात श्रीकृष्ण प्रयाणाची बातमी कळली.. तिथे आक्रोश उठला…!!!

इकडे द्वारका फारच खवळली होती. समुद्र जणू द्वारकेला भेटायला आला… अन् पूर्ण द्वारकानगरी पाण्यात बुडाली… जणू तिला द्वारकाधीशांच्या शिवाय रहायचं नव्हतं चं…

आश्चर्य म्हणजे द्वारकाधीशांचा राजप्रासाद मात्र सुरक्षित होता… तिथे पाणी गेलं नव्हतं…

पराक्रमी, न्यायी, प्रेम, करुणा असलेल्या कान्हाचा वियोग आजही त्या राजप्रासादाला जाणवतं असेल का…???

– समाप्त –

(एखाद्या कथेवरून बोध घेऊन आपला दृष्टिकोन बदलून जातो किंवा आपले विचार बदलतात, सकारात्मक होतात.) 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ १ लघुकथा आणि ३ अलक (भावानुवाद) – “ मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ १ लघुकथा आणि ३ अलक (भावानुवाद) – “ मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१) लघुकथा –  रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर”

रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावरून मजूर जातांनाचे त्यांच्या पावलांचे आवाज तेवढे ऐकू येताहेत… पण या दृश्याच्या अगदीच पलिकडे आहे त्यांचे दु:ख… वेदना… त्यांची निराश हताश मन:स्थिती…

रस्त्यावर सायकलच्या घंटांचे, गाड्यांच्या कर्कश्श हॉर्नचे आवाज आहेत. कचरा चघळत उभ्या असलेल्या गायींच्या हंबरण्याचा आवाज मध्येमध्ये ऐकू येतोय्. टांगे चाललेत, त्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकू येताहेत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या निरागस हसण्या-खिदळण्याचा गोड आवाज ऐकू येतो आहे.

मास्क घातलेले लोक भीतभीतच रस्त्यावर ये-जा करताहेत. त्यांच्या मनात करोना व्हायरसची भीती आहे… आणि त्या भीतीतून जणू मरण डोकावतंय्.

बिचारा मुका रस्ता… जिथे आहे तिथेच आहे… तो उठून कुठेच जाऊ शकत नाही. कुणीतरी फेकलेलं पेटत्या सिगरेटचं थोटूक त्या रस्त्याला कणाकणाने शोषून घेतंय्.

रस्त्यावरचा कचरा गोळा करणारा एक मुलगा… सारखं वहाणारं नाक पुसत.. रडत रडत चाललाय्… 

—- हे सगळं पाहून हवा वाहता वाहता जराशी थांबलीये… सूर्यही थोडा मंदावला आहे… आकाशाची निळाईही थोडी कमी झाली आहे.

रस्त्याच्या कितीतरी वर आकाश आहे… आकाशात पक्षी आहेत… आणि त्यांची सावली जमिनीवर पडली आहे… त्यांच्या पंखांमध्ये उडण्याची आस आहे… मनात आकाश मोजण्याची इच्छा आहे… श्वासांच्या शाईने ते त्यांचा आनंद रेखाटताहेत.

रस्त्याच्या एका बाजूला आलिशान घरं आहेत. पण त्यांना लाकडी कुंपणाने जणू काही बांधून टाकलंय्… कारण तिथे रहाणारे सगळे करोनाने ग्रासलेले आहेत.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मैदान आहे. तिथे हिरवंशार गवत उगवलंय्… ज्यात खूप किडे आहेत… एक चिमणी मन लावून ते किडे खाते आहे. एकीकडे तिची चिवचिव चालूच आहे. तिचा आनंद पाहून रस्ता हळवा होऊ लागलाय्…

दुधाच्या मोठाल्या कासंड्या सायकलला अडकवून काही दूधवाले चालले आहेत. हिंदकाळणाऱ्या त्या कासंड्यातल्या दुधाचा अभिषेक रस्त्यावर होतोय्… आणि रस्ता जरासा तृप्त होतो आहे.

काही माणसं एका तरूणाचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून चालली आहेत. त्या दृश्याच्या आडून, बेरोजगारीमुळे केलेली एक आत्महत्याच चालली आहे जणू! काही धार्मिक माणसं त्या प्रेताला नमस्कार करताहेत… आणि ते पाहून ते प्रेत उपहासाने हसतंय्…

त्याच रस्त्याने एक शेतकरी त्याचा जवळजवळ रिकामाच असलेला ट्रॅक्टर घेऊन चाललाय्. त्यात अगदी नावालाच थोडंसं धान्य आहे. गावाकडे असणाऱ्या त्याच्या बायकोचा फोन आला आहे. त्याचा भाऊही शेतकरीच होता… आणि त्याने आत्महत्या केल्याचं बायको सांगते आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आता दाट अंधार पसरलेला आहे. डोळ्यासमोर पसरलेला अंधार आणि रस्त्यावर पसरलेलं डांबर एकमेकांत मिसळून जणू एक काळाकुट्ट कोलाज बनवताहेत.

रस्त्यावरून शाळेत जाणारी निष्पाप मुलं बघतांना रस्त्याला नेहेमीच खूप छान वाटतं. त्यांच्या एका हातात जणू पृथ्वी असते आणि खिशात असतो सूर्य. त्यांच्या शांत आणि भाबडेपणाने सगळीकडे बघणाऱ्या डोळ्यात बुडून जातांना रस्ताही बाकी सगळं क्षणभर विसरून जातो.

गाणी गात गात रस्त्याकडेचं गवत कापत असणाऱ्या स्त्रिया रस्त्याला आवडतात. त्या रस्त्याने कॉलेजला जाणाऱ्या अल्लड-चंचल मुलींचं हसणं-खिदळणं रस्त्याला फार छान वाटतं. दिवसा असे हे मृदू, गोड आणि सुखद क्षण अनुभवतांना रस्ता खूप खूश होऊन जातो.

… आत्ता रात्रीची वेळ आहे. रस्त्यावरच काही अंतरावर एक दुर्घटना घडली आहे. दारू पिऊन बेधुंद अवस्थेत चाललेल्या एका ड्रायव्हरने त्याच्या गाडीने एका दुर्दैवी सायकलवाल्याला चिरडून टाकलंय्. रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावर मृत व्यक्तीचा छिन्न-विच्छिन्न झालेला देह पडलेला आहे. त्या मृत व्यक्तीचं रक्त त्या डांबरावर सगळीकडे पसरलंय्. तिथली भयाण शांतता जणू काही शोक-गीत गातेय् असं वाटतंय्. नशेत बेधुंद झालेल्या त्या गाडीचा ड्रायव्हर तिथून पळून जाऊन लांब कुठेतरी उभा आहे. हे सगळं दारूण दृश्य पाहून रस्ता शोक करतो आहे. त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होताहेत…

… कसंही करून पुन्हा एकदा पूर्वीसारखी पायवाट व्हावं आणि पूर्वीसारखंच आमराईत हरवून जावं असं आता अगदी अधीरतेने त्याला वाटतंय्…

… आणि त्या रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर… 

… हे सगळं त्रासदायक भयंकर दृश्य पाहून घाबरलंय्. त्या डांबराला मनापासून असं वाटायला लागलंय् की… त्याला पंख फुटावेत आणि त्या त्रासदायक दृश्यापासून खूप खूप लांब… त्या निळ्याशार आकाशापर्यंत उडत जाऊन, तिथेच कुठेतरी त्याने दडून बसावं… हरवून गेल्यासारखं……

मूळ हिन्दी कथा : ‘सडक की छाती पर कोलतार’

– – – 

(२) कोवळं ऊन… (अलक) 

आज मन कमालीचं उदास झालं होतं … काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी घराबाहेर पडलो, आणि इंडिया गेटशेजारी असलेल्या मैदानात येऊन बसलो होतो. तिथल्या हिरवळीवर काही जोडपी गप्पा मारत बसली होती. मुलं क्रिकेट खेळत होती. पण एकूणच वातावरण मात्र फार धूसर धूसर वाटत होतं. आकाश ढगांनी व्यापून गेलं होतं. मी नुसताच बसून राहिलो होतो. इतक्यात समोरून अडीच-तीन वर्षांची एक गोड मुलगी आपल्या आईचा हात धरून उड्या मारत येतांना दिसली.

ती माझ्याजवळून जात असतांना मी प्रेमाने तिला.. ’ हॅलो बेटा.. ‘ म्हटलं. आधी जराशी लाजली ती.. आणि मग माझ्याकडे बघून हात हलवत गोड हसली… आणि ते निष्पाप हसू पाहून मला वाटलं की माझ्या आसपास अचानक अगदी कोवळं ऊन पडलंय …. फक्त आसपासच नाही … तर माझ्या मनातही ….

– हिंदी कथा : धूप.

– – – 

(३) स्वप्न… (अलक) 

एखादं वादळ आल्यासारखा वारा खूप जोराने वहात होता. समोरच असणाऱ्या समुद्रात पाठोपाठ येणाऱ्या लाटाही अगदी अक्राळ विक्राळ दिसत होत्या. तिथे असलेले सगळे लोक घाबरून किनाऱ्यापासून लांब पळत होते. पण एक तरुणी.. जी पाठीमागून पहातांना मला ओळखीची वाटत होती.. ती मात्र किनाऱ्यावर वेगाने आपटणाऱ्या त्या लाटांच्या दिशेने चालली होती.

“ अगं तिकडे का चालली आहेस तू? “.. मी मोठ्याने ओरडत तिला विचारलं.

तिने उत्तरादाखल मला सांगितलं … “ तू त्या दुसऱ्या बाजूला राहतोस ना.. म्हणून मी तुझ्यापासून दूर.. उलट्या दिशेने चालले आहे.. “ 

… तिचं हे उत्तर ऐकलं आणि माझे डोळे खाडकन उघडले…. कायम माझ्या स्वप्नात राहणाऱ्या त्या तरुणीला मी ओळखलं …. नुकतीच मला सोडून गेलेली माझी प्रेयसी होती ती … मी भानावर आलो.. म्हणजे मला झालेला भास होता हा …. आणि तो मला सांगत होता की.. याआधी इतके दिवस माझ्याबद्दल तिच्या मनात जे प्रेम होतं ते प्रेम.. ती भावना आता पूर्णपणे मिटून गेली होती… कायमची संपून गेली होती….

– हिंदी कथा : सपना.

– – – 

(४) नोकरी …. (अलक) 

थोड्या वेळापूर्वीच मला ही नोकरी मिळाल्याचं पत्र आलं होतं. आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. भाऊ अक्षरशः पळत जाऊन पेढे घेऊन आला होता. आईने प्रेमाने माझ्या कपाळावर ओठ टेकवून मला तोंडभरून आशीर्वाद दिला. वडलांनी अतिशय मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला…. ते काहीच बोलले नाहीत पण त्यांचे डोळे बोलत होते …. ‘ माझ्या हुशार मुलाला ही नोकरी तर मिळणारच होती.. ‘.. “ पार्टी पाहिजे … दादा पार्टी द्यायचीच आहेस तू.. “ असा बहिणीचा हट्टही चाललाच होता. पण ….

… पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली एक शंका मात्र सारखी मला खुणावत होती …. म्हणजे …. कसं सांगावं … मी ही नोकरी मिळवली होती.. का या नोकरीने मला मिळवलं होतं … एक नवा ‘बकरा’ म्हणून..????

– हिंदी कथा : नौकरी.

चारही हिंदी कथांचे मूळ कथाकार : श्री. सुशांत सुप्रिय, इंदिरापुरम्

मराठी अनुवाद : सुश्री  मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पावसाची रात्र… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ पावसाची रात्र… ☆ श्री मयुरेश देशपांडे

रखमेच्या वेदना कमी होत नव्हत्या, तिचे विव्हळणे विठोबाला सहन होत नव्हते आणि इकडे पाऊस मात्र बेदकारपणे वेडावाकडा उभा आडवा कसाही कोसळत होता. समोर रस्त्यावर साचलेले तळे स्पष्ट दिसत होते. अमावस्या जवळ आली होती, अंधार अधिक गडद झाला होता. अश्यातच विठोबाने दोनदा मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन पाहिले काही मदत मिळते का? पण त्याला हताश होऊन माघारी फिरावे लागत होते. दोघेही एकदा बाहेरच्या पावसाकडे एकदा देव्हाऱ्यात लावलेल्या नंदादीपाकडे पहात होते.

“मालक तुम्हाला लवकर घराकडे बोलावलया”, धावत आलेला गणप्या धापा टाकत बोलत होता. त्याचे अस्पष्ट बोलणे ऐकून शेतातली कामे तशीच टाकून विठोबा घराकडे धावला. रखमा बिछान्यावर झोपली होती. पायाशी गणप्याची बायको बसली होती. विठोबाची आई भिंतीला मान खाली घालून बसली होती. “मालक, ताईसाहेब आजारी आहेत. “, गणप्याची बायको पदर सावरत खालच्या आवाजात बोलली.

“अग मग वैदुला बोलावणे धाडायचे ना. “

“बोलावले. तो येऊनबी गेला आणि म्हणूनच तुम्हाला एवढ्या घाईने बोलावणे धाडले. “

सर्वांचे उतरलेले चेहरे, रखमेचे असे दिवसा ढवळ्या बिछान्यावर झोपणे आणि गणप्याच्या बायकोचे दबक्या आवाजात बोलणे, विठोबाची चिंता आणखीनच वाढवित होते. विठोबाच्या लग्नाला आत्ता कुठे दोन एक वर्षे झाली होती. त्याचे रखमेवर जीवापाड प्रेम होते. आणि त्या रखमेला काहीतरी झाले या जाणीवेने त्याला त्रास होत होता.

“काय म्हणाला वैदू? “

“लई मोठ्ठा आजार आहे म्हणे. नऊ महिने काळजी घ्यावी लागेल, म्हणत होता. ” शक्य तेवढे हसू आवरण्याचा प्रयत्न करून गणप्याची बायको बोलली.

“नऊ महिने काळजी घ्यायला लागेल, असा आणिक कोणता आजार आहे? “

“आरं तु चार इयत्ता शिकला, पण खूळा ते खूळाच राहिला. ” विठोबाची आई हसत बोलली. “आर मी आजी नी तू बाप होणार हायीस. “

खरे काय ते कळले आणि विठोबा लाजला. त्याने प्रेमाने रखमेकडे बघितले आणि तिने पण लाजेने मान फिरवली.

“चल गं, बाहेर केवढी काम पडलीयेती. आता शेतातली कामं बी आपल्यालाच सांभाळावी लागतील वाटतं. “, त्या दोघांना घरात एकटं सोडत विठोबाची आई गणप्याच्या बायकोला घेऊन बाहेर पडली. “गावच्या देवाला साखर ठेवायला हवी. ” विठोबाची आई मनातल्या मनात विचार करत होती.

विठोबा रखमेच्या शेजारी जाऊन बसला. अजूनही तिने मान इकडे फिरवली नव्हती. “अवकाळी पाऊस आपल्याला पावला तर”, तिच्या खांद्यावर हात ठेवत विठोबा बोलला.

आता मात्र हळूच मान फिरवत रखमेने त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा मान फिरवली.

दिवसामागून दिवस जात होते. विठोबा घर आणि शेती दोन्हीकडे सारखाच वेळ देत होता. रात्रीच्या राखणीची जबाबदारी आता गणप्यावरच येऊन पडली होती. तर गणप्याची बायको रखमेला काय हव नको सारं बघत होती. वैदुने सांगितल्याप्रमाणे विठोबाने रखमेला तालुक्याच्या डाक्टरणीकडे दाखवून आणले होते. सर्वकाही ठिक चालले होते. रखमेचे डोहाळे शेतात काम करायचे होते पण विठोबा मात्र तिला फारवेळ शेतात थांबून देत नव्हता.

रखमेचे दिवस भरत आले तसे विठोबा अधिकच काळजी घेऊ लागला. पावसाची नक्षत्र जवळ आली होती. पावसा आधीच्या कामांनी वेग धरला होता. इच्छा असूनही विठोबाला घरी जास्तवेळ थांबता येत नव्हते. पण आई आणि गणप्याची बायको रखमेजवळ असल्याने काळजीचे फारसे कारण नव्हते. बाकीचा भार ग्रामदेवतेवर सोडला होता. पहिला पाऊस आला, अंगण ओले झाले तशी रखमा अधिकच खूलली. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतसे रखमेच्या चेहऱ्यावरचे तेज वाढत होते आणि इतरांच्या चेहऱ्यावरची काळजी. गणप्याने तर बायकोला बजावून ठेवले होते, ताई साहेबांच्या पाठीमागे सावली सारखे रहायचे. तो स्वतःसुद्धा येता जाता रखमेची ख्याली खुशाली विचारत होता. त्याची मालकीणबाई असली तरी सख्ख्या बहिणीचे प्रेम होते तिच्यावर.

पेरणी झाली, फवारणी झाली, आता यशापयश ईश्वराच्या पायी ठेवून विठोबा घरात थांबू लागला. त्याच्या शाळकरी मित्राची रंग्याची जीप त्याने सांगून ठेवली होती. कधीबी तालुक्याला जाव लागल, तयार रहा.

त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. रखमेला पाऊस प्रचंड आवडायचा. पावसाबरोबर येणारा मातीचा गंध तिची कळी खूलवायचा.

शेजारच्या गावातल्या नातेवाईकाकडे पूजा होती. विठोबा घरी होता आणि सकाळी जाऊन दुपार पर्यंत परतायचे म्हणून विठोबाची आई आणि गणप्याची बायको पूजेला गेले. त्यांना सोबत म्हणून विठोबानेच गणप्याला पाठविले. एरवी तो गेलाच नसता, पण पावसाचे दिवस, आईचे वय असा सगळा विचार करून तो तयार झाला.

अंगणात कोसळणाऱ्या पावसाला पहात दिवस कसा सरला कळालेच नाही. अंधार पडू लागला तसे विठोबाने देवघरात दिवा लावला. अजून आई कशी आली नाही या काळजीने त्याला ग्रासले होते. पाऊस कमी व्हायचे नाव घेत नव्हता. रखमेशी बोलत बोलत मग त्यानेच काहीबाही बनविले व रखमेला जेवायला दिले. हळूहळू रखमेची तब्येत बदलू लागली. तिला कळा यायला लागल्या.

विठोबाच्या लक्षात आले की आता हिला तालुक्याच्या दवाखान्यात न्यायला हवे. तश्या पावसातच अंधारात चाचपडत तो रंग्याच्या घरी गेला. तेव्हा त्याला कळाले की सकाळची फेरी घेऊन तालुक्याला गेलेला रंग्या परतलाच नाहीये. आता त्याच्या लक्षात आले की, या पावसामुळेच त्याची आई दुसऱ्या गावी अडकली असावी. आता काय करावे त्याला सुचत नव्हते. गावात तशी गाडी कोणाकडच नव्हती. एवढ्या पावसात आणि अश्या अवस्थेत बैलगाडीतला प्रवास रखमेला घातक ठरला असता. विठोबाच्या घरापासून मुख्य रस्ता जवळ असल्याने त्याने तिथून एखादे वाहन थांबते का बघितले, काही मदत मिळते का बघितले, पण सगळे प्रयत्न विफल ठरले.

आता मात्र त्याने वैदुचे घर गाठले. विठोबाची परिस्थिती पाहून वैदू मदतीला धावला. रंग्याची आई व बायको, तसेच इकड तिकडच्या चार बायका वैदूच्या मदतीला धावल्या. आणि तास दिड तासांच्या वेदनांनंतर रखमा-विठोबाचे बाळ जन्माला आले. इकडे बाळ जन्माला आले आणि इकडे पाऊस ओसरला. कृष्णाचा अवतारच जणू. वैदूने त्याच्याकडची औषधै दिली. सकाळ होताच रखमेला व बाळाला तालुक्याला घेऊन जायला सांगितले.

उरली रात्र विठोबा रखमेच्या जवळ बसून होता. तिच्या वेदना कमी झाल्या असल्या तरी संपल्या नव्हत्या. शेजारी बाळ झोपले होते. त्या ग्लानीमध्येच रखमेला झोप लागली तर विठोबाचे डोळे अधूनमधून उघडझाप करत होते.

सकाळ झाली. पाऊस ओसरला. तसा रंग्या तालुक्यावरून परतला. त्याला घरी आल्यावर घडला प्रकार बायकोकडून व आईकडून कळाला. त्याला फार अपराध्यासारखे वाटले. पण काय करणार? निसर्गा पुढे तोही हतबल होता. त्याने तडक विठोबाचे घर गाठले. घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तर उलट विठोबाने त्याच्या आईचे व पत्नीचे आभार मानले. त्याने लगेच विठोबा, रखमा व बाळ यांना तालुक्याला नेले. इकडे विठोबाची आई, गणप्या व त्याची बायको घराकडे परतले. बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे त्यांना कळाले. विठोबाच्या आईने तिथूनच ग्रामदेवतेला नमस्कार केला व संकटातून वाचविल्या बद्दल आभार मानले.

विठोबाचे बाळ आता अंगणात खेळत आहे. रखमेला दुसऱ्यांदा दिवस गेले आहेत. गणप्याच्या संसारवेलीवरही एव्हाना एक फूल फुलले आहे. गणप्या आणि विठोबा मोठ्या आनंदाने शेतात राबत आहेत तर आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून विठोबाची आईही समाधानी आहे.

आणि हो, सगळेजण मिळून पुढच्या पावसाची वाट पहात आहेत.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नावात काय आहे? – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ नावात काय आहे? – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.) – इथून पुढे —- 

” साहेब याला कारण आपली मराठीच माणसं आहेत ” तो सांगू लागला ” दोन वर्षांपूर्वी हे हाॅटेल टाकलं तेव्हा मोठ्या हौसेनं हाॅटेलचं नाव समर्थ ठेवलं. वाटलं आपली मराठी माणसं स्वामी समर्थांचं नाव पाहून हाॅटेलला येतील. खुप जोरात चालेल आपलं हाॅटेल. पण हाॅटेलचं नाव मराठी, मालकही मराठी म्हणजे हे हाॅटेलही कमी दर्जाचं असा समज आपल्या मराठी माणसांनी करुन घेतला. तुम्हांला सांगतो साहेब आपल्या मराठी माणसांना मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी खाद्यपदार्थांचा जराही अभिमान नाही. तो जर असता तर मुंबईत नव्वद टक्के हाॅटेल्स परराज्यातील लोकांची दिसली नसती. तिथंच काय इथे मलकापूरातही परक्या लोकांचीच हाॅटेल्स जास्त आहेत. आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्राचे काय स्वतःचे खाद्यपदार्थ चांगले नाहीत? “

कस्टमर आले तसा तो थांबला. कस्टमर मराठी दिसत होते पण ते त्याच्याशी हिंदीत बोलत होते. ते गेल्यावर तो म्हणाला” बघितलं साहेब माणसं मराठी होती पण हिंदीत बोलत होती. का? कारण आम्हांला मराठी भाषेचा अभिमानच नाही. महाराष्ट्रात असूनही तुम्ही मराठी माणसाशी हिंदीत बोलता. मराठी भाषा काय नाॅन स्टँडर्ड आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणे आणि इथे आम्हांला मराठीत बोलायचीही लाज वाटते. मराठी लोकांची मानसिकताच वाईट आहे साहेब” 

त्याचे मुद्दे मला पटत होते. बरेच मराठी डाॅक्टर्स मी मराठी आहे हे माहीत असूनही माझ्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचे. आणि माझ्यासारख्या एम. आर. ना फार्मा कंपन्यांचे प्राॅडक्टस् विकायचे असल्याने त्यांच्याशी आम्हांला नाईलाजास्तव हिंदीत बोलावं लागायचं.

” खरंय तुमचं म्हणणं ” मी म्हणालो ” बघा ना मराठी माणसं मराठी गाणी ऐकत नाहीत, मराठी चित्रपट पहात नाहीत. फक्त हाॅटेल्सच नाहीत तर जवळजवळ सगळे व्यवसाय नाॅन मराठी लोकांच्या ताब्यात गेले आहेत. आपल्याकडचे कॅटरर्स पहा. बहुतेक राजस्थानी आहेत. फॅक्टरीतले कामगार बिहारी आहेत. महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोकांची राजधानी असूनही मुंबईत हिंदीच बोलणारे जास्त सापडतात. मराठी माणसांसोबत मराठी भाषाही मुंबईतून हद्दपार होतेय ” 

” अहो साहेब मुंबईचं सोडा. आमच्या विदर्भातही तेच होत चाललंय. एक दिवस बघा महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्रीही परप्रांतीयच असणार आहे. आणि ही संधी आपले आपापसात भांडणारे मराठी आमदारच त्यांना देणार आहेत हे नक्की ” 

” पण काहो तुम्ही हाॅटेल गुजरात हे नाव कसं ठेवलंत? “

” तुम्ही पाहीलंच की हाॅटेल फारसं चालत नव्हतं. कामगारांचे पगार सुद्धा करणं मला कठीण होऊन बसलं होतं. हाॅटेलमधले मराठी वेटर्स, कामगार सोडून गेले. गंमत बघा साहेब आपले मराठी कामगार मारवाडी, सिंध्यांकडे कमी पैशात निमुटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे जास्त पगार मिळूनही नखरे करतात. खाडे मारतात, मालकाला जमेल तसं छळून घेतात. माझी आई गुजरातची. त्यामुळे गुजराती भाषा आणि गुजराती पदार्थ आम्हांला चांगले येतात. मी हे हाॅटेल टाकतांना माल काढणारा मुख्य कारागीर मराठी ठेवला होता. पण तो दारु पिऊन यायचा आणि खुप खाडे करायचा म्हणून त्याला काढून मी गुजरातमधून कारागीर बोलावून आणला. तो मात्र मेहनती आणि इमानदार होता. माझ्या पडत्या काळातही तो मला सोडून गेला नाही. त्यानंच मला हाॅटेलचं नाव गुजरात करण्याचं सुचवलं. एकंदरीत परिस्थितीमुळे मलाही ते पटलं. मग मी नाव तर बदललंच पण आतलं इंटिरिअरही बदलून टाकलं. त्याच कारागीरानं गुजरातमधले कामगार बोलावून घेतले. आता माझ्याकडचा सगळा स्टाफ गुजराती आहे. हे लोक कधीच मराठी माणसांसारख्या दांड्या मारत नाहीत, दारु पिऊन येत नाहीत, पगार उशीरा दिला म्हणून भांडणं करत नाहीत. सध्या सगळं सुरळीत चालू आहे. हाॅटेलचं नाव गुजरात ठेवल्यामुळे लोकांना हाॅटेल उच्च दर्जाचं वाटून ते इथंच नाश्ता, चहाला येतात “

” खरंय. सध्या तर बसायला जागा मिळत नाहिये ” मी हसत म्हणालो तसा तोही हसला 

” तुम्हांला ते पुढच्या चौकातलं ब्रजवासी हाॅटेल माहीत आहे का? “

” हो. माहितेय पण मला ते आवडत नाही. गचाळ आहे ” 

” बरोबर. तरीही त्याच्याकडे अगोदर खुप गर्दी असायची. आता तिकडचे गिऱ्हाईक आपल्याकडे यायला लागलेत ” 

मी घड्याळाकडे पाहिलं. मला आता निघायला हवं होतं. साडेदहाची डाॅक्टरांची अपाॅइंटमेट होती. मी बिलाचे ८० रुपये काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यानं ४० रुपये मला परत केले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला 

” असू द्या साहेब. तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात” 

मी ४० रुपये परत करत म्हणालो

” तुम्ही हाॅटेलचं नाव गुजरात केलं आता मराठी माणसांची मानसिकता सोडून गुजराती लोकांसारखे व्यवहारी व्हा. धंदा म्हणजे धंदा. कस्टमर कुणीही असो. नो डिस्काउंट ” 

त्यानं हसून ४० रुपये गल्ल्यात टाकून दिले. त्याच वेळी तिथं आलेल्या दोनतीन कस्टमरचेही पैसे त्यानं घेतले. ते गेल्यावर तो म्हणाला

” साहेब पुढच्या महिन्यापासून आपण वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था करतोय. पंजाबी, गुजराती, मारवाडी, जैन सगळ्या प्रकारच्या थाली मिळतील. या कधी जेवायला “

” आणि महाराष्ट्रीयन थाळीचं काय? “

तो हसला

” काय करता साहेब. आपल्या मराठी माणसाला आपलं घरचं जेवण हाॅटेलमध्ये नको असतं. त्यांना हाॅटेलमध्ये जे जेवायला आवडतं तेच आपल्याला ठेवावं लागणार ना! ” 

अर्थातच त्याच्या या युक्तिवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.

बडिशेप खाऊन मी निघालो.

रविवारी माझ्या घरी पाहूणे येणार होते. बायको मला म्हणाली. ” अहो उद्या त्या बिकानेर स्वीट मार्ट मधून एक किलो श्रीखंड घेऊन याल ” 

” का आपल्या जवळच्या दत्त डेअरीतही चांगलं श्रीखंड मिळतं. तिथून का नाही आणायचं? ” 

” नको तिथलं नको. राजस्थानी लोकांकडचे सगळे पदार्थ चांगले असतात ” 

” अहो मॅडम मराठी लोकांकडचे पदार्थ चांगले नसतात ही मानसिकता सोडून द्या आता. आपलेही लोक चविष्ट पदार्थ बनवतात. तू स्वतः मराठी आहे. तू काय चवदार पदार्थ बनवत नाहीस? दत्त डेअरीचा मालक मराठी असला तरी त्यांचं श्रीखंड बिकानेरवाल्यापेक्षा जास्त चांगलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात घे. श्रीखंड हा महाराष्ट्रीय पदार्थ आहे. तो मराठी माणसं चांगला करतील की राजस्थानी? तूच तर म्हणतेस ना की इडली, डोसा साऊथ इंडियन जितका चांगला करतात तितका आपला नसतो. छोले भटूरे पंजाबी लोक जसे बनवतात तसे आपल्याला जमत नाहीत. मग हीच बाब श्रीखंडाला का लागू होत नाही? ” 

या प्रश्नावर बायको निरुत्तर होणार हे मला माहीत होतं. झालंही तसंच. माघार घेत ती म्हणाली 

” ठीक आहे, दत्त डेअरीतून आणा “

–  समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नावात काय आहे? – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ नावात काय आहे? – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

पॅसेंजरने उतरुन मी स्टेशनबाहेर आलो. डाॅक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भुक लागली होती. मी स्टेशनजवळची हाॅटेल्स पाहिली पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डाॅक्टरांकडे जायचं होतं त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एकदोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता शिवाय मला भुकही लागली होती. माझी पावलं आपसूकच त्या हाॅटेलकडे वळली. हाॅटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं पण तरीही तिथं अजिबात गर्दी नव्हती. वीसपंचवीस टेबलपैकी फक्त दोन टेबलवर दोन माणसं बसली होती. मागेही मी आलो तेव्हाही या हाॅटेलमध्ये गर्दी नव्हती. या हाॅटेलची क्वालिटी वाईट तर नाही? नाही तर अगदी मोक्याच्या ठिकाणी असूनही तिथं गर्दी का नसावी? प्रश्न पडून मी घुटमळलो आणि दुसऱ्या हाॅटेलमध्ये जाऊ असा विचार करुन मी पायऱ्या उतरणार तेवढ्यात गल्ल्यावरच्या माणसाने आवाज दिला. ” काहो साहेब काय हवं होतं? ” 

” काही नाही नाश्ता करायचा होता ” 

” अहो मग या ना. आलूवडा आहे, मिसळ आहे. भजी, पोहे, चहा, काॅफी सगळं आहे. या सगळं गरम मिळेल ” 

मी थोड्या नाराजीनंच आत येऊन एका टेबलवर बसलो

वेटर लगबगीने पुढं आला.

” काय आणू साहेब? ” त्यानं विनम्रतेनं विचारलं 

” गरम काय आहे? “

” मिसळ एकदम गरम आहे. बाकी वडा, भजेही ताजे आहेत”

” एक मिसळ आण “

तो गेला आणि दोनच मिनिटात मिसळपाव घेऊन आला‌. सोबत दही, चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि एका मोठ्या वाटीत मिसळीचा रस्सा. मिसळीचा वास तर खुप छान येत होता

मी कांदा टाकून मिसळीचा घास घेतला. मस्तच होती मिसळ. पावही एकदम साॅफ्ट आणि ताजे होते. मिसळ खाताखाता मी हाॅटेलमध्ये नजर टाकली. हाॅटेलच्या भिंती आणि फर्निचर जुनं दिसत होतं. यामुळे तर लोक इथं येत नसावेत? पण ती शक्यता मी फेटाळून लावली. बऱ्याच गावातली यापेक्षा जुनी आणि गचाळ हाॅटेलं जोरात चालत असलेली मी पाहिली होती. याचं हाॅटेलच्या पुढच्या चौकात एक ब्रजवासी नावाचं हाॅटेल होतं. तेही गचाळच होतं पण तिथं नेहमीच गर्दी दिसायची. काही हाॅटेल्सचं नशीबच वाईट असतं. नाहीतर इतकी चांगली चव असतांना लोकांनी याकडे पाठ नसती फिरवली.

मिसळ खाऊन झाल्यावर मी चहा मागवला. गवती चहा टाकल्यामुळे तोही खुप चांगला होता. मी तिथं पडलेलं मेनू कार्ड पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या पदार्थांचे रेटस् बरेच कमी होते. मी खाल्लेली मिसळ तर फक्त तीस रुपयाची होती. इतका छान चहा तोही फक्त दहा रुपयाचा होता.

मी पैसे द्यायला काऊंटरवर आलो. चाळीस रुपये देऊन तिथल्या माणसाला म्हणालो.

” मिसळ आणि चहा दोन्हीही छान होते ” 

तो कसानुसा हसला मग म्हणाला 

” येत जा साहेब. तुम्ही मागेही एकदोनदा येऊन गेले होते ना? ” 

” हो. बरोबर. चहा प्यायला आलो होतो ” 

त्यानंतर जेव्हा जेव्हा मलकापूरला गेलो. तेव्हा तेव्हा त्याच हाॅटेलमध्ये जाऊन मी नाश्ता केला. तिथले सगळेच पदार्थ रुचकर होते. चहा तर नंबर एक होता. पण हाॅटेलमध्ये नेहमी दोनतीनच गिऱ्हाईक बसलेले दिसायचे. मला त्याचं खुप वाईट वाटायचं. एक दिवस हे हाॅटेल नक्की बंद पडणार याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही.

मध्ये तीनचार महिने कंपनीनं मला मराठवाड्याचं काम दिलं त्यामुळे मलकापूरला जायला मला जमलं नाही.

चार महिन्यांनी मी परत मलकापूरला गेलो. समर्थ हाॅटेलमध्ये जाऊनच नाश्ता करायचा हे मी ठरवलं होतं. त्यानुसार तिथं गेलो तर समर्थ रेस्टॉरंट कुठंच दिसेना. त्याजागी आता हाॅटेल गुजरात दिसत होतं. म्हणजे माझी शंका खरी ठरली होती. नावासोबत अर्थातच हाॅटेलचं बाह्यस्वरुपही बदललेलं दिसत होतं. आता आलोच आहे तर इथंच नाश्ता करु या विचाराने मी आत घुसलो. काऊंटरवर वेगळाच माणूस बसलेला दिसत होता. याचा अर्थ स्पष्टच होता. पुर्वीच्या मालकाने हे हाॅटेल कुणा गुजराती माणसाला विकलं होतं. आतमध्ये खुप गर्दी होती. एकही टेबल रिकामं दिसत नव्हतं. काय करावं याचा विचार करत असतांनाच वेटर आला. त्यानं मला एका माणसाला सरकावून बसायला जागा करुन दिली. हाॅटेलचा लूक पुर्णपणे बदलला होता. भिंतींना नवीन वाॅलपेपर लागले होते. फर्निचर नवीन दिसत होतं. मी मेनू कार्ड बघितलं. पुर्वीच्या टिपीकल भजे, मिसळ, बटाटावडा या पदार्थांसोबत आता खमण ढोकळा, पुरीभाजी, मसाला डोसा, इडली, मेदूवडा असे बरेच पदार्थ नवीन दिसत होते. पदार्थांचे रेटसही तगडे दिसत होते. मागील रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट. मी मिसळ ऑर्डर केली. एकंदरीत वातावरणावरुन आणि गर्दीवरुन मराठी माणसाला धंदा जमत नाही हे अनेकांचं मत मलाही योग्य वाटू लागलं. मिसळ आली. त्यासोबत नेहमीचाच कांदा दही वगैरे मालमसाला होता पण खाण्याच्या प्लेट्स, चमचे वगैरे आकर्षक दिसत होते. मी चव घेतली. ती पुर्वीसारखीच छान होती. याचा अर्थ आचारी बदलला नव्हता. यावेळचा चहा मसाला घालून केलेला होता. तोही छानच होता. चला मालक बदलला तरी चव तीच पुर्वीची आहे याचं मला समाधान वाटलं. फक्त यावेळी मला दुप्पट पैसे द्यावे लागणार होते याची कुठंतरी खंत वाटत होती. मी काऊंटरवर पैसे द्यायला गेलो आणि चमकलोच. मघाशी तिथं बसलेला माणूस बाहेर उभा होता आणि काऊंटरवर पुर्वीच्या समर्थ रेस्टॉरंटचा माणूस बसलेला होता. मला पाहून तो हसला

” नमस्कार साहेब” 

” नमस्कार. तुमच्या मालकाने हे हाॅटेल गुजराती माणसाला विकलंय का? “

” नाही तर. मीच या हाॅटेलचा मालक होतो आणि आहे ” 

” तुम्ही गुजराती आहात का? “

तेवढ्यात कस्टमर पैसे द्यायला आले म्हणून मी बाजूला सरकलो. कस्टमर गेल्यावर मी परत तोच प्रश्न त्याला केला.

” नाही मी मराठीच आहे “

मी कोड्यात पडलो.

” पण मग तुम्ही हाॅटेलचं नाव का बदललं? “

परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुज सगुण म्हणो की… – भाग -२ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ तुज सगुण म्हणो की… – भाग – २  ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(काकूंना वाटलं – “कालपासून हे सारखे ॲसिडिटी चा फार त्रास होत आहे म्हणत आहेत पण दाखवून या म्हटलं तर ऐकत नव्हते. बरं झालं शशांक आला ते! “

– – त्यांचा बसल्या बसल्या डोळा लागला. काही वेळाने शशांकच्या फोनमुळे त्यांना जाग आली.) इथून पुढे —

“काकू काकांची Angioplasty आजच करायचं ठरवलय. काळजी करू नका. Heart Attack आला नाही त्यांना हे महत्वाचं. आधीच लक्षात आलंय हा मोठा फायदा आहे. मी गाडी पाठवतो. शांतपणे या.”

मंगलाताई गडबडल्या. देवघरात जाऊन श्रीरामासमोर हात जोडले. “श्रीरामा सांभाळ रे बाबा!” म्हणाल्या व त्या गाडीतून हॉस्पिटल मधे पोचल्या.

हॅास्पिटलच्या लॅाबीमधे बसून त्या श्रीराम जयराम जय जय रामाचा जप करत शशांकची वाट बघत बसल्या.

लॉबीमध्ये केर काढणारा एक साठीतील कर्मचारी काकू जवळ आला.

“ताई, सगळं उत्तम झालं असेल” म्हणाला. काकूंनी त्याच्याकडे बघून कृत्रिम हास्य केलं. कुणाचा कोण हा पण बिचारा धीर द्यायचा प्रयत्न करत आहे.

“अरे आत्ता तर ह्यांना आत नेलय.. तुला काय माहित उत्तम झालं का ते? ” हे विचारायला त्या वळल्या पण तो तिथून निघून गेला होता.

“कुठे गेला एवढ्यात? ” म्हणून काकूंनी इकडे तिकडे बघितलं पण तो दिसला नाही.

काही वेळाने श्री आणि शशांक बाहेर आले. श्री ने वाकून काकूंना नमस्कार केला. “काकू उत्तम झाली प्रोसिजर. मी औषधं लिहून देतो. हा सदू घेऊन येईल. तुम्ही काकांजवळ बसा. ”

“अरे काय हे श्री! एवढा मोठा डॅाक्टर तू. मला कसला नमस्कार करतोस? “ काकूंनी श्री ला मिठी मारली. त्याला पुढचा पेशंट बघायला जायची घाई होती.

“काकू, तुमच्यामुळे श्री क्लिनिक उभे आहे. माझ्या ऑफिसमध्ये तुमचा आणि काकांचा फोटो आहे त्याला रोज नमस्कार करूनच माझा दिवस सुरु होतो. काका यातून व्यवस्थित बाहेर पडतील. जा भेटा त्यांना! ” म्हणून तो गेला आणि काकूंना आपण लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा सर्वाना सावली देणारा वटवृक्ष झाला आहे असं वाटलं.

काकूंनी खोलीत आणलेल्या काकांकडे बघितले.

त्यांच्या डोळ्यातले पाणी बघून काका म्हणाले, “ अग सगळं वेळेवर झालय. आता डोळ्यात पाणी कशाला? ९०% ब्लॅाक झालेली आर्टरी मोकळी केली बघ आपल्या श्री ने! अग हो.. तुझा श्रीराम माझ्या जवळ उभा होता असं वाटलं बघ. अगदी तोच मुकुटधारी राम, पिवळं पितांबर अन जांभळा शेला घेतलेला. तुझ्या फोटोत आहे ना तसा! ”

काकू काकांकडे एकटक बघत होत्या. सरळ साधे केशवराव मितभाषी आणि सज्जन होते.

छान केला त्यांनी संसार! कधी कशाची तक्रार केली नाही. ह्यांना ॲाप्रेशन थिएटरात चित्रातला मुकुटधारी राम भेटला? अगबाई!

पण तो विचार चेहऱ्यावर न दाखवता त्या म्हणाल्या “अहो मी घरून गरम गरम मुगाची खिचडी घेऊन येते.. काकू म्हणेपर्यंत तो केर काढणारा कर्मचारी तिथे आला व म्हणाला, ” ताई मी आहे इथं सोबतीला.. तुम्ही जाऊन या घरी. ”

त्या घरी आल्या. मन काहीसं बघीर झालं होतं.

डाळ तांदूळ घेऊन त्यांनी खिचडी टाकली व श्रीरामा समोर येऊन शांत बसल्या. समई लावली व हात जोडले.

“प्रभू सकाळी मी तुम्ही सगुण रूपात दर्शन देत नाही म्हणून तुमच्यावर रागावले होते. देवा मला माफ करा. मला थोडं थोडं समजायला लागलंय.

तुम्ही आज मला आशिष, शशांक, श्री, कर्मचारी या सर्व रूपात दर्शन दिलत.

मी रत्नजडित मुकुट घातलेल्या चित्रातल्या रामाला शोधत होते म्हणून आजवर मला तुझं दर्शन होत नव्हतं. पण आज हॅास्पिटलच्या लॅाबीमधे दोन तीन तासात मला तुझं विश्वरूप दर्शन झालं.

कधी तू डॅाक्टर असतोस, कधी नर्स, कधी वार्डबॅाय असतोस तर कधी झाड लोट करणारा कर्मचारी असतोस.

कधी ओळखीचा असतोस तर कधी अनोळखी. कधी लहानात लहान असतोस तर कधी मोठ्यात मोठा असतोस.. पण तू सतत आमच्या बरोबर असतोस हे खरं!

सात आंधळ्यांनी हत्तीच्या ज्या भागाला हात लावला त्या भागासारखा हत्ती असतो असे त्यांना वाटले. तसाच तू प्रत्येकाला वेगळा दिसतोस.. वेगळा भासतोस..

पण देवा जगात जिथे जिथे चांगुलपणा आणि सच्चेपणा आहे तिथे तिथे तू आहेस. तू सद्गुणांच्या रूपात जीवामधे वास करतोस असं मला वाटतं. दया, दान, क्षमेमध्ये जो आनंद निर्माण होतो तो तू आहेस.. भक्ती, शांती, करुणा यामधून मिळणारा दिलासा तू आहेस.

ह्यांच्या ९०% ब्लॅाक झालेल्या आर्टरी ची काळजी घेण्यासाठी शशांक होऊन आलास.. ज्या क्षणी माझ्या मनात वेडेवाकडे विचार आले त्या क्षणी तू तो कर्मचारी बनून मला धीराचे शब्द सांगितलेस..

मला वाटलं देवा, मी नैवेद्य दाखवायला विसरले.. पण आशिष च्या रूपात तू नैवेद्य पण घेतलास हे मला आत्ता कळतंय.

काकूंच्या डोळ्यातून भक्ती, भावना आणि कृतज्ञता अश्रू बनून वहात होती.

अष्टसात्विक भाव जागे होऊन मन भरून आलं होतं. आमच्या प्रत्येक प्रार्थनेला धावून मदतीस येतोस.. आणि तरी देखील कित्येक प्रश्न सतत पाठपुरावा करत असतात…

तव नामाची माळ माझिया क्लेश मनाचे जाळी

पण असशील ना रे माझ्या जवळी माझ्या अंतःकाळी।।

नचिकेताचा अंश असे मी, ब्रह्म ज्ञान ओंजळी

पण देशील ना धीर भ्रमित मनाला त्या शेवटच्या वेळी? ।।

हे सतत मनात येणारे सारे प्रश्न आता संपले रामा.. आता कशाची ही काळजी नाही!

कधीही लिखाण न करणाऱ्या काकूंच्या हृदयातून भक्ती रस कवितेच्या रूपात पाझरू लागला. सतत वाटणारी अंतःकाळाची भीती त्या भक्तिरसात विरघळून गेली.

दिलीस बकुळी, चाफा, तुळशी, सर्वोत्तम तू माळी

फुलवलास रे वेलू मोगरा, जो जाईल गगनावेरी।।

जीवन रथ हा अशाश्वताचा, वारू मनाचे उधळी

पण सावरशी मज, मी अडखळता, त्या उदास कातरवेळी।।

केशवरावांना ॲाप्रेशन थिएटरात मुकुटधारी राम कसा भेटला असेल याचे उत्तर मिळालं.

सर्वव्यापी म्हणजे काय थोडंसं कळू लागलं होतं. ज्याने एवढा मोठा विश्वाचा पसारा मांडला त्याला काय कठीण आहे? त्यांना खुदकन हसू आलं. गरम खिचडी डब्यात भरून त्या हॉस्पिटल ला जायला उठल्या. बघावे तर दारात आशिष पहिलं बक्षीस मिळालं हे सांगायला रामरायाच्या वेषात आला होता.

त्याला जवळ घेत काकू म्हणाल्या, “रामराया, किती रे तुझी तळमळ तुझ्या भक्तांसाठी! “

आशिष म्हणत होता, “अग, मी आशिष! काकू अशी कशी फसतेस ग?

काकू हसून म्हणाल्या, “राजा तू फसलास.. मी नाही! “

चित्रातला मुकुटधारी राम हा सोहळा बघत कौतुकाने हसत होता!

समाप्त –

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अबोला” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अबोला” ☆ श्री मंगेश मधुकर

आमच्यात नेहमीप्रमाणे भांडणं झाली. समोर असताना तर भांडतोच पण फोनवर सुद्धा सुरूच होतं.

“खड्ड्यात जा” मी संतापले.

“तोंड सांभाळ”

“परत थोबाड दाखवू नकोस”

“तुझं नशीब चांगलंय. आत्ता समोर असतीस तर…. ”

“अंगाला हात लावून तर दाखव मग बघ. ” 

“काय करशील”

“फार महागात पडेल. ”मी 

“धमकी!! दिसते तशी नाहीये”

“सेम टू यू”

“आधी डोळे फुटले होते का?”

“मी पण हेच म्हणते. लग्नाची तर फारच घाई झाली होती. ” मी

“तिथंच माती खाल्ली ना”

“मग आता निस्तरायचं”

“अशी वागशील असं वाटलं नव्हतं”

“मलाही.. ”

“तुझ्या घरच्यांनी तर फार कौतुक केलं होतं आणि रियलमध्ये तू तर.. ”

“तू सुद्धा भोळा भाबडा होतास. लग्नानंतर खरे रंग दिसले. तू तर पक्का.. ”मी 

“वाट्टेल ते बोलू नकोस. हजारदा सांगितलंय की बोलताना विचार करत जा. ”

“कसं बोलायचं तू शिकवू नकोस. मी अशीच आहे. जे वाटतं ते बोलणार”

“तेच म्हणतोय. रागाच्या भरात स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. त्यामुळे नक्की गोत्यात येशील. बोलताना काळजी घे. शब्दांचे वार खूप खोलवर लागतात. ”

“आय डोन्ट केअर. गो टू xx. ”

“पुन्हा तेच. जरा सबुरीनं घे. इतकंही तोडू नकोस की नंतर इच्छा असूनही जोडता येणार नाही”

“बास उगीच ज्ञानाचे डोस देऊ नकोस. यावेळेला चूक तुझी आहे. ”

“दरवेळेला माझीच असती. काहीतरी नवीन सांग. ”

“तेच खरंय!!जरा मनाविरुद्ध झालं की घर डोक्यावर घेतोस. ही घाणेरडी सवय सोड. मग मला शिकव. ”मी.

“हा!!हा!!हा!! घाणेरड्या सवयीबद्दल तू बोलावं हाच फार मोठ्ठा जोक. ”

आमची वादावादी बराच वेळ सुरू होती. मूळ विषयापेक्षा आपला मुद्दा रेटून दुसऱ्याची चूक दाखवणं चाललेलं. नवरा-बायकोच्या भांडणात नेहमी असंच होतं. भांडणाचं फलित म्हणजे अबोला. पंधरा दिवस झाले. एकमेकांशी बोलणं नाही. काही महत्वाचं असेल तर मेसेज करायचो अन्यथा आळी-मिळी गुपचिळी. खरंतर बोलण्याची इच्छा होती पण…. ईगो आडवा येत होता.

… आमचं लव मॅरेज, तीन वर्ष रिलेशनमध्ये होतो. परस्पर विरोधी स्वभाव तरीही प्रेमात पडलो. मी तडकू, संतापी, शिघ्रकोपी, फटकळ, बिनधास्त बोलणं याचं त्याला फार कौतुक अन त्याचा शांत, संयमी, समजून घेण्याचा गुण मला आवडला. घरच्यांच्या परवानगीनं धुमधडाक्यात लग्न केलं. सुरवतीचे गुलाबी दिवस संपल्यावर वास्तवाचे चटके बसायला लागले. ज्या गुणांचे कौतुक होतं तेच वादाचे कारण झाले. सततचे खटके. नंतर नंतर अशी परिस्थिती झाली की बोलणं कमी आणि भांडणं जास्त. मग बोलचाल बंद. कधी एक दिवस तर कधी दोन तर कधी आठ दिवस सुद्धा… अर्थातच मी हट्टी असल्यानं तोच माघार घ्यायचा. स्वतःहून बोलायचा, रुसवा काढायचा मग काही दिवस सगळं सुरळीत व्हायचं पण यावेळेला वेगळंच घडलं. तो गप्प, मी गप्प. घरात विचित्र अशी अस्वस्थता. दूध संपल्याचं निमित्त झालं अन वादावादी सुरू झाली.

.. पुन्हा तू तू मै मै. शब्दाला शब्द लागून आवाज चढले. त्यानं हात उगारला.

मला ते सहन झालं नाही. तिरमिरीत खाडकन त्याच्या तोंडात मारली. दोन चार शिव्या दिल्या.

तो बिथरला. अंगावर धावून आला.

तेव्हा “जा मर” म्हणत जोरात ढकलल्यावर त्याचा तोल गेला. भिंतीवर जोरात डोकं आपटलं आणि…….

त्यानंतर सगळंच बदललं.

बरेच दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. पोलिस चौकशी झाली पण त्यानं सांभाळून घेतलं.

आणि रागाच्या भरात मी चुकीचं वागले. स्वतःचाच खूप राग आला. पश्चाताप होतोय.

.. त्या घटनेचा परिणाम आमच्या नात्यावर झाला.

मी आता पटकन चिडत नाही. मनाविरुद्ध झालं तरी शांत असते. म्हणतात ना, वाईटातून चांगलं निघतं. माझ्याबाबतीत हेच असावं.

तो मात्र एकदम बदलला. आता बोलतच नाही. झाल्या प्रकारानं तो खूप दुखावला गेला. तरीही रिऍक्ट झाला नाही. वरवर शांत दिसत असला तरी मनात प्रचंड वादळ आहे. माझ्याकडे तर बघतही नाही. सतत टाळतो. बोलत नाहीये. फक्त मेसेजद्वारे आमच्यात संवाद होतो. घरात पण अनोळखी प्रवाशासारखं वावरतो. हा ‘अबोला’ फारच जीवघेणा आहे. अनावधाने घडलेल्या प्रकाराबद्दल मी हजारदा माफी मागितली. समेटासाठी प्रयत्न केले. हात जोडले, रडले, विणवण्या केल्या.. परंतु शून्य प्रतिसाद.

संवादच नसल्यानं वाद नाही. आम्ही मनानं खूप लांब गेलोय. —

“ आपण वेगळे होऊ ” त्याचा मेसेज पाहून जबरदस्त धक्का बसला. हे अनपेक्षित आणि सहन करण्यापलीकडलं होतं. प्रकरण या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी शंभर टक्के चुकलेच पण त्याचं वागणंही बरोबर नव्हतं.

.. मी बोलायचा प्रयत्न केला पण…. उपयोग झाला नाही. बोलचाल बंद करून तो अपमानाचा बदला घेत होता. खूप वाईट वाटलं पण रागही आला. तो मात्र ढिम्म !! खूप रडले नंतर विचार केला अन मेसेजला उत्तर दिलं – – 

“ जशी तुझी इच्छा ”…

— — माझा राग आणि त्याचा ईगो यामुळे आमच्या नात्याला भलतचं वळण मिळालं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares