मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हुंदका…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ हुंदका… ☆ प्रा. भरत खैरकर 

हुंदका – – – 

‘आपली गुड्डी आता बरीचशी मोठी दिसते! तिला आठवण वगैरे येत नाही.. कारण आम्ही तिची खूप काळजी घेतो.. “दिदी तेरा देवर दिवाना” ह्या गाण्यावर ती चांगली हातपाय हालविते आणि तोंडाने तोतरे बोल काढून नाचायला लागल्यावर साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनते! आम्ही सर्वजण म्हणजे मी, गुड्डी आणि ‘हे’ होळीला बैतुलला येणार आहोत. तुम्हीही या. भेट तिथेच होईल.

आपलीच 

अलका.

नारायणची ही मागील १५ मिनिटांपासून पत्र वाचायची तिसरी वेळ होती. त्यानं चौथ्यांदा वाचायला सुरुवात केली, तर बाहेर कसलासा आवाज आला. दोन पोरं कंपाऊंडच्या आतल्या ताराचा बंडल काठीने ओढत होते. त्याने दरवाज्यात ठेवलेली काठी संपूर्ण ताकतीने त्या पोट्ट्यांच्या दिशेने भिरकावली. पोरं तार टाकून पळाली.

आता त्याचं मन मात्र पत्रात लागत नव्हतं. कारण तो नुकत्याच गेलेल्या पॅसेंजर गाडीने येणाऱ्या शंकरची वाट पाहत होता. तो मागच्या आठवड्यात, जो गेला तो अजूनही आला नव्हता. आणि आजच्या पॅसेंजरने येतो असं त्यांना सांगितलं होतं. परवाची होळी असल्यामुळे आजच जब्बार सुद्धा उद्या येतो. म्हणून त्या आत्ताच्या पॅसेंजरने गेला होता. पण शंकर परतला नव्हता. तो आलाच नाही.

रेल्वे खात्यात नारायण ठेकेदारीत काम करायचा. शंकर, जब्बारही त्याचे सहकारी होते. ब्रॉड गेजचं काम सुरू असल्याने लाखो रुपयांच सामान शेडमध्ये नि शेडच्या कंपाउंड मध्ये पडलेलं होतं.. त्याची राखण करण्यासाठी सेक्युरिटी म्हणून तीन शिफ्ट मध्ये तिघं काम करत होते आणि एक जास्तीचा होता. शंकर मात्र मागच्या आठवड्यात गेला तो अजून उगवलाच नव्हता. त्यामुळे शंकरची ड्युटी नारायण, जब्बार आळीपाळीने करीत होते.

हे इतकं महागडे सामान आपण दोन- दोन, तीन तीन दिवट्या लागोपाठ करून राखायचं म्हणजे जिकरीचं काम आहे. थोडसं झोपतो म्हटलं तरी बाजूच्या झोपडपट्टीतील पोट्टे काही ना काही पळवायला तयारच असायचे! त्यामुळे नारायण जरा चिडला होता. त्यातल्या त्यात हे पत्र वाचून त्याला ‘कधी गावाला जातो आणि कधी नाही! ‘ असं वाटत होतं.

पण शंकर यायला हवा.. शंकर तर गोंड आहे! त्यांच्यामध्ये होळी आणि दसरा खूप जोशात मनवतात मग दोन दिवसांवर होळी असताना तो येईलच कसा? ह्या विचाराने मात्र शंकरचा नारायणला खूप राग आला. ‘सालं, आपण किती दिवस झाले बैतूलला गेलो नाही. ह्यांचं काय ह्यांना रोज रोज घरचे लोक भेटतात. मला कुठे तसे? धड आठवड्यातून एकदा तरी भेटता येत नाही. रेल्वेशी संबंधित म्हणून बरं! साहेब लोक तिकीट तरी विचारीत नाही. मागे असंच ह्यांच्या अशा सुट्ट्या मारण्याने आपण गावाला जाणार.. पण गेलो नाही. बायकोने तिच्या भावाला अजनी हेडक्वार्टरला ‘कां आले नाही? ‘ म्हणून चौकशी करायला पाठवलं तिथून तो इथे साइटवर भेटायला आला होता.. ह्या खेड्यात.. किती समजावून सांगावं लागलं होतं त्याला आणि हे मस्त उद्या येतो म्हणून चार चार दिवस गायब होतात.. मी तक्रार करीत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो.. आता मी जर उद्या गावाला गेलो नाही तर काय वाटेल घरच्यांना.. बाबा घरचा कर्ता माणूसच लगोलग कळवून सुद्धा आला नाही! आणि आपल्या लहान भावाला काय वाटेल? तो तर तेवढ्या लांबून डेहराडून वरून येतोय.. सोबत अलका येणार आहे.. गुड्डीला घेऊन.. लग्न झाल्यावर आपली त्याच्याशी भेटत नाही.. सालभर झालं बहुदा.. अलकाच्या लग्नात आपली गुड्डी केवढीशी होती. धड तिचं दूधही सुटलं नव्हतं.. तर अलकानं आपल्या बायकोकडून तिला मागून नेलं होतं.. ‘आम्हांला करमणार नाही म्हणायची… शेखर ड्युटीवर गेला की तिला कॉर्टरवर गुड्डीची साथ मिळणार होती.. आपण ह्यांचं नुकतंच लग्न झालंय कशाला मध्ये गुड्डी.. वगैरे पाठवायला नको.. म्हणून ‘नाही नाही ‘म्हटलं तरी रडून रडून तिला नेली होती.. शेखरही हट्टाला पेटला होता. शेखरचा हट्ट आपल्याला कधीच मोडवत नाही मग आपणच गुड्डीला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं..

शेखर किती लहान होता. तेव्हाच आपले बाबा वारले होते. मधल्या भावाने बैतुलला एमआयडीसीत नोकरी पकडली होती. तिथे बायकोसह स्थायिक झाला होता. त्यामुळे शेखरच शिक्षण, आईचा सांभाळ आणि आपली नोकरी एवढं सगळं सांभाळाव लागायचं आपल्याला! तेव्हाचा आपला पगार फक्त दीडशे रुपये होता आता शेखरला एकदम साडेपाच हजार रुपये पगार आहे. आईच्या मताचं ऐकलं असतं तर शेखर आज मिलिटरीत नसताच!!

बैतुलला त्यावेळी मिल्ट्री कॅम्प लागला होता. शेखर सकाळी तिथे दूध पोचवायचा. आपल्यापेक्षा तो धट्टाकट्टा वाटायचा. एक दिवस त्याच्या पेपरमुळे आपण दूध द्यायला गेलो तर मिलिटरीच्या साहेबांनी शेखर विषयी विचारून त्याला मिल्ट्रीत टाका असं म्हटलं. मी किती समजूत घालून शेखरला मिलिटरीत टाकला. आता पाहता पाहता त्याच सातव वर्ष सुरू आहे मिलिटरीतलं! मागच्या वर्षी त्यानं लग्न केलं. अलका सारखी सोज्वल भाऊसून मिळाली.. शेखरला पाहिजे होती अगदी तशीच ती आहे. आणि आता ते सर्वजण होळीला येणार आहे.. मी येथे अडकून पडलो एकटा.. ‘ नारायणला हे सारं आठवून आठवून हुंदका दाटून आला. तो बिछान्यावर आडवा पडला.. तर लगेच बाहेर पुन्हा कसला तरी आवाज आला.. नारायण चिडला.. त्यान पुन्हा काठी उचलली आणि बाहेर आला.. तर दरवाजा उघडून शंकर आत येत होता. त्याला पाहून नारायणचा दाटलेला हुंदका अश्रूच्या रूपाने बाहेर पडला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमी प्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच, •••••

काय झाले? बर वाटत नाहीये का? ? की आॉफिस चे काही टेंशन? ? ••••

अजय म्हणाला, •••• तसं काही नाही ग. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मला पण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय. या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलण होत. तेही आई बरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना. कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, ऑफिसचे टेंशन, त्यांना पण कधी ‘बरं वाटतं नाहिये ‘असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे. त्यांनी कसे मॅनेज केले असेल? ? ?. माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडिल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. •••

अग! आई नेहमीच महत्वाची पण बाबांना का विसरलो मी? ? ?. •••••

आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनी पण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतः ला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थिती च्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली. ••••

‘ बाबा म्हणजे पाठीचा कणा. ‘ म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का? ? पण मी त्यांना का समजू शकलो नाही.? ? ? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. ••••

मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचना पण दिल्या होत्या. आई म्हणाली होती… •••”अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात. ” •••

आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलून तरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. ••••

किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या कडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काही ही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात. ••••

आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा. तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहान सहान इच्छा पूर्ण करायच्या त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून‌ येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ. •••••

यावेळेस अजय अनिताचा ‘ India Visit Plan ‘ ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्या बद्दल काय वाटतं? ? तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता. ••••

बरोबर आहे, •••••

” Your best teacher is your last mistake. ”

म्हणतात ना, ••••

 

” रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।”••••••

येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत. ••••

आई. बाबांना म्हणाली, •••••

यावेळेस आपण आपल्या कडून काही सांगायचे नाही, •••काही काम सांगायची नाही. •••याला भेटा, •• त्यांना फोन करा ••असं काही म्हणायचे नाही. •• एकतर मुलांना वेळ कमी असतो. ••त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. •• खरेदी असते, •• ‘ वैशाली ‘ मधे सर्व मित्र जमतात, •• धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो? ? ?. ऑफिसच काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते. ••••

आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल, ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय नंतर ही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का? ? ••••

असे आईने ठरवूनच ठेवले. •••

आई बाबांना म्हणाली… ••••अहो, तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. , नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्ट वर जायला टॅक्सी व नंतर ही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले. ••••

आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली. ••••

यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे? ? या विचारात आई होतीच, तेंव्हा बाबा म्हणाले, •••• अगं! काही ‘ fixed deposit ‘ आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे. काही प्रश्न नाही. आई ने अगदी दोन पाकिट तयार करूनच ठेवली. ••••

दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा माइंडसेट मात्र वेगळाच होता. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. •• शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिता शी ओळख करून दिली. ••• छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका काकूंना भेटून आले. •••आई बाबांना जेथे एकटं जाण जमतं नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. ••• अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. ••• अजयने बाबांसाठी T shirts आणले. •• जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली. ••••

आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. •••

यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आई चे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती. ••••

अजय बाबांना त्यांच्या नोकरी बद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता? ? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते.? ? ? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. •••

कुठे तरी अजयला समाधान मिळत होत. बाबा पण खूप खुश होते. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाचे अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते. ••••

लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. ” थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा” ••••

खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का? ? द्यायचे? ? घ्यायचे? ? बोलायचे? ? याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पूढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. ••••

म्हणतात ना, ••••

” Life is a game of chess. You cannot undo the moves but you can play the next move better. ” •••

” इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो. ” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

“ ताई, मी आज लवकर घरी जाऊ? त्यो मेला कालपास्नं पिऊन पडलाय.. घरातच.. जिता हाय का न्हाई ते तरी बघत्ये एकदा” गंगूचे शब्द ऐकताच सुचेतानं लॅपटॉप वरचं काम थांबवून तिच्याकडे बघितलं.

“गंगू, असं काय बोलतेस? जा बरं घरी पटकन आणि बघ त्याच्याकडे! ” सुचेताने गंगूचा पगार तिच्या हातात ठेवला. वर शंभर रुपये जास्त दिले.

“अग, ताई काय वाईट बोलल्ये मी? त्याला सांगितलया..

भाईर पिऊन रस्त्यावर पडण्यापेक्षा घरीच पी. रस्त्यावर पडतोय कुटतरी अन् मग शोधून घरी आनावं लागतं…आता घरीच पितुया. ते फार चांगलय. ” गंगू पगार झाल्यानं खूष झाली होती. मटणाचे भाव लई वाढलेत म्हणत तिनं पैसे तिच्या लाल रंगाच्या चंचीत ठेवले.

सुचेता काही बोलली नाही पण बाबांचं व्यसन आई व आपण गंगूसारखं कधीच स्वीकारू शकणार नाही याची तिला परत एकदा जाणीव झाली. बाबा त्यांच्या उच्च वर्तुळातील मिटींग्ज मध्ये पिऊन घरी आले की ती व आई कोमेजून जात असत. दुसऱ्या दिवशी बाबा “परत कधी घेणार नाही” म्हणत केवळ पुढच्या वेळेपर्यंत! त्याला काहीच अर्थ नव्हता. पण बाबांना घरी पिऊ द्यावं हे आईला कधीच मानवलं नसतं. आईला रडत बसलेली बघून सुचेतालाही रडवेली व्हायची.

गेली पंचवीस वर्षं गंगू सुचेताकडे कामाला होती. दोन मुली व एक मुलगा होता. नवरा असून नसून सारखाच होता. तो दारू पिण्यासाठीच जन्माला आला होता. किराणा मालाच्या दुकानात बरी नोकरी होती पण ती त्याच्या दारूमुळं टिकली नाही..

“ताई, तो मनानं लई चांगला हाय.. आपण दारू पिनाऱ्यास शिव्या देतो.. पन मानूस का प्यायला लागला ह्ये नाही बघत कधी.. हाल झालेत त्याचे.. ” गंगू त्याची कुठली चांगुलकी घेऊन सारवासारव करत बसली होती ईश्वराला ठाऊक. ती त्याला अस्सल ठेवणीतल्या शिव्या मोजत असे पण नंतर मटण भाकरी खायला घालत असे. भुगा झालाय शरीराचा म्हणून दूध पाव देऊन त्याला झोपवत असे.

गंगूच्या संसाराचं वस्त्र छप्पन ठिगळं लावूनही फाटत आलं होतं. पण तरी ती ते पूर्ण फाटू न देण्याचा तिचा निश्चय कधीच डळमळला नाही. कौशल्यानं ती एकेक नवं ठिगळ जोडत राहिली! मोठ्या मुलीनं, मीनाने, एका ख्रिश्चन तरूणाबरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा सुचेतानं गंगूकडील नव्या शिव्यांचा साठा ऐकून कान झाकून घेतले.. पण त्यानंतर पोरं सासरी गेली.. मी तिची नीट पाठवणी केली नाही.. म्हणून डोळ्याला पदर लावलेलाही सुचेता बघत होती! मीना पळून गेल्याच्या तिसरे दिवशी गंगू कामाला आली ती बदाम वेलदोडा घातलेला शिरा घेऊनच!

“ताई, किरीस्तावाशी लगीन केलं मीनाने एवडं सोडलं तर बाकी समदं उत्तम हाय. प्रामानिक हाय मुलगा. त्याचं हाटेल आहे. भरपूर पैसा मिळिवतो. स्वताचं घर हाय. सासु सासरं न्हाईत मीनाला. काय वाईट हाय? त्यो म्हनं चर्चला घेऊन जातोया मीनाला अन् किरिस्ताची गाणी शिकवतुया! काय बी वाईट न्हाई. समदे देव सारखचं बघ. समदे चांगल्या गोष्टीच करा म्हनतात.. आणि दारू न पिनारा मानूस म्हणजे द्येवच की! छान हाय जावई माजा. ब्येस झालं मीनाचं! ”

दोन दिवसात आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तिचं तिनं स्वत:साठी जे तत्त्वज्ञान बनवलं ते ऐकून सुचेता चकित झाली होती. धर्म बदलला म्हणून मुलीशी नाळ तोडलेले तिचे काका काकू नातवंड झालं तेव्हा जळाबाहेरील माशासारखे तडफडले होते पण त्यांनी लेकीला माफ केलं नाही की नातू बघितला नाही. सतत पूजा पाठ करणारे काका पारशी माणसाशी लग्न केलेल्या लेकीला कधीच क्षमा करू शकले नाहीत..

आणि ही अडाणी गंगू.. दोन दिवसात लेकीला माफ करून मीनाचं कसं चांगलं झालं साऱ्यांना ऐकवत होती. नात झाली तेव्हा लेकीचं बाळंतपण मनापासून करत होती. “ताई, अळवाचे लाडू करू का मीनासाठी” विचारून दोन लाडू सुचेतालाही खायला घालत होती.

गंगूची धाकटी, शलाका, हुशार निघाली. सरकारी कचेरीत कसलीशी नोकरी करत तिनं तिथल्या एका पोलिसाशी लग्न करून गंगूला सुखाचे चार दिवस दाखवले. पण गंगू सुखानं जगायला जन्माला आलीच नव्हती..

किर्तनाला गेलेला तिचा लेक, सदा, हार्ट अटॅक येऊन जागच्या जागीच गेला अन् गंगू उन्मळून पडली. यातून गंगू सावरणार नाही वाटत असताना मुलाचे दिवस करून कामाला आलेली गंगू सुचेताला म्हणाली, “ताई, बरी हायस नव्हं? डोळ्याखाली लई काळं दिसतया.. भांडलीस की काय सायबांशी? ”

“तापातून उठलेय ग गंगू. तुझा सदा गेला कळलं अन त्याच रात्री एकदम ताप भरला मला. माझ्या जीवाला त्याचं जाणं आणि तुझे हाल झेपले नाहीत. ” सुचेता छताकडे बघत होती..

गंगू खिन्न चेहऱ्यानं हसली. “अगं ताई, मानसाची जन्मायची व जायची येळ ठरलेली असतीया. सदा किरतानाला बसला होता! आवडला विठूरायाला. म्हणाला.. चल रे सदा.. हा तयार झाला. आता इतं राहून तरी कुटलं युध जिंकायचय आपल्याला? चांगलं झालं त्याचं. आपल्याला काय आपलं मानूस हवच असतय. मी कंबर कसून उभी आहे बघ सुनेच्या व नातवाच्या पाठीशी…त्या पोरीचं चांगलं झाल्याशिवाय डोळं मिटनार न्हाई मी.. नातू हुशार हाय माजा!

गंगू डोळे पुसता पुसता हसत होती.. माजं आयुष लई चांगलं गेलं बघ. दु:ख आलं नशीबी पन ताई परत्येक दु:खात ना कायतरी चांगलं दडलं होतं बघ. ते मी शोधाया शिकले म्हनून समदं चांगलं झालं.. नरक नरक मंजे काय दुसरं नाई ताई.. जन्माला येऊन दु:खातलं सुख न दिसनं म्हणजे नरक. लई दिलं देवानं! काय बी तक्रार नाही माझी! ”

तिनं हात जोडले. त्या रापलेल्या चेहऱ्यावरून फक्त कृतज्ञता ओघळत होती. देवावर राग नव्हता की नशीबावर राग नव्हता. कुठल्या तोंडानं ती तक्रार नाही म्हणत होती तिचं तिलाच ठाऊक!

महिनाभरात तिच्या कपाळ्यावरच्या अधेली एवढ्या कुंकवाचा धनी पण दारू पिऊन गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नाही. ती त्याच्या तिरडीजवळ शांत बसली होती. मयताला आलेल्या लोकांकडे बघून म्हणाली,

“गेला ते बरं झालं.. दारू तरी सुटली. आपल्या समाजाचा या दारूने लई नाश केलाय.. किती कुंकवं पुसली.. आता तरी शिका आणि सोडा दारू नाहीतर रोज एका मयताला जाऊ आपण सगळे. ” तिचा थरथरणाऱा आवाज तेथील स्तब्धता चिरत गेला. रोज दारू पिणारे काही महाभाग मान खाली घालून उभे होते.. फारशी आशा न ठेवता गंगू काहीबाही बोलत राहिली आणि बाया बापडे ते ऐकत राहिले..

सुचेतानं तिच्या लॅपटॅापकडे बघितलं. एक मेसेज फ्लॅश होत होता. बुध्द तत्वज्ञानाच्या एका कोर्ससाठी ती नाव नोंदवत होती. स्क्रीनवर मेसेज होता..

“बुध्द टिचिंग्ज वर्कशॅाप”

“Be happy not because everything is good, but because you see good in everything”

Register in next 10 mins to save your spot..

गंगू आतून चहा घेऊन आली.

“लई अंधारून आलंय ताई.. चहा घे. काम झालं नव्हं? मुगाची खिचडी टाकू का? खाऊन घे दोन घास! ”

तिनं उठून गंगूला कडकडून मिठी मारली. हे चालतबोलतं तत्वज्ञान समोर असताना तो कोर्स काय नवीन शिकवणार होता? शाळा न शिकलेली गंगू काय बुध्दाकडे कोर्स करायला गेली होती? संकटांच्या सतत धगीतून आणि ती रोज गाणाऱ्या अभंगातून ते तत्वज्ञान साकार झालं होतं!

गंगू गोंधळून गेली होती. ताईला आपल्यासाठी वाईट वाटतंय? गंगू सुचेताची पाठ थोपटत होती..

“ताई, माज्यासाठी नको वाईट वाटून घेऊ. मी छान हाय. तुज्यासारख्या जीवाभावाच्या, नोकर माणसाला समजून घेणाऱ्या म्याडमकडं मी नोकरी करते. उसनं पैसं मागते. काय खाल्लं काय प्यायलं तू कधी काही विचारत नाहीस.. मला धीर देऊन उभं करतेस.. तू आहेस म्हणून बळ येतं पुढचा घाव सोसायला. यापेक्षा काय हवं माणसाला? ”

Every cloud has a silver lining! ते ज्याला बघता आलं त्यानं सारं काही मिळवलं.. कुणाच्या आयुष्यात काळे ढग येत नाहीत? पण त्यामागे लपलेलं इंद्रधनुष्य बघता आलं पाहिजे.. ते बघण्याची इच्छा व सामर्थ्य असावं लागतं.. ते केवळ आपल्या साधनेतून निर्माण होतं! सुचेतानं डोळे पुसले.

लॅपटॅापवरील बुध्दाच्या कोर्सची विंडो केव्हाच बंद होऊन गेली होती.. Expired असा मेसेज दिसत होता..

आकाशात काळे ढग दाटून आले होते.. कधी कोसळेल माहित नव्हतं..

त्या ढगांची चंदेरी कड शोधण्यात सुचेता रमून गेली होती!

(सत्य घटनांवर आधारित)

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा. त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते.) – इथून पुढे —- 

 मैदानात पाणी पोहोचवणे, कर्णधाराचा संदेश देणे आणि मैदानातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन परत येणे हे ठरलेले होते. मग तो दिवस आला जेव्हा संघातील तीन खेळाडूंना एकाच वेळी पेटके यायला लागले. मात्र इतरांचा हा त्रास त्याच्यासाठी संधी बनली. आता मैदानात जायची पाळी त्याची होती आणि ज्या दिवसाची तो गेली कित्येक वर्षे वाट पाहत होता तो दिवस आला. तो नेटवर सतत सराव करीत होता. त्याचे हात चांगलेच स्थिरावले होते. तो इतरांपेक्षा अधिक मेहनत करत होता आणि त्याचे आरोग्यही त्याला चांगल्या प्रकारे साथ देत होते. प्रत्येक खेळाडूच्या कमकुवतपणाची स्थाने त्याच्या मनात घट्ट रुजली होती. शेवटी इतकी वर्षे धीर धरल्याचे त्याला गोड फळ मिळाले.

आतापर्यंत तो इतरांचा जयघोष करीत त्यांना प्रोत्साहित करीत होता, पण आता मैदान त्याच्या जयजयकाराने दुमदुमले होते. पण वर्षानुवर्षांपासून ज्या आनंदासाठी तो अत्यंत आसुसलेला होता, जो आनंद त्याने पूर्णपणे अनुभवला देखील नव्हता, नेमक्या त्याच वेळी एका जबर दुखापतीने त्याला बाकावर तर सोडाच, थेट घरीच बसवले. मात्र याच बाकाच्या कृपेने तो केवळ एक उदयोन्मुख खेळाडूच नाही तर एक लढाऊ व्यक्ती बनला. बाकावर बसून प्रेक्षकासारखा सामना बघणे आणि विरोधी संघाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणे हे दोन संपूर्णपणे वेगळे अनुभव होते. याच संघर्षशील वृत्तीने त्याच्या नशिबाची दारे सताड उघडली. त्या प्रतिक्षेच्या क्षणांत त्याने दाखवलेली संयमी वृत्तीच त्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे संचयित धन बनले. तेव्हापासून आजतागायत त्याने मागे वळून पाहिले नाही. हा बाकच त्याची प्रचंड शक्ती बनली. याच बाकावर बसलेला असतांना तो शगुनला सर्वप्रथम भेटला होता, इथेच शगुनने त्याला तो बाप बनणार आहे, ही गोड बातमी दिली होती आणि याच बाकावर त्याला शगुन गेल्याचे देखील कळले होते. या बाकाभोवतीच त्याच्या आयुष्याचे कित्येक अध्याय लिहिल्या गेले होते, आणि हो! अजून किती लिहिण्याचे शिल्लक होते कोणास ठाऊक!

 तो फक्त कामातून निवृत्त झाला होता, आयुष्यातून नाही. तो अनेक ठिकाणी गेला, पण त्या प्रत्येक ठिकाणी तो बाक हजर असायचा. तो त्याला जणू कांही प्रेमळ साद घालत होता, “ये ना! तुझ्या स्वागतासाठी मी इथेही हजर आहे बरं कां! ” निवृत्तीपूर्वी बाक त्याचा सवंगडी होता आणि आता निवृत्तीनंतर तर तो त्याचा आधारच बनला. त्याच्यासाठी बाक ही निव्वळ चार पायांवर उभी राहिलेली निर्जीव अशी बसण्याची जागा नव्हती. त्याच्या आयुष्यात या बाकाला वेगळाच अर्थ होता. या बाकाच्या प्रत्येक पायाने त्याला किती मोठे योगदान दिले. पहिल्याने व्यवसाय बहाल केला, दुसऱ्याने कुटुंब दिले, तिसऱ्याने त्याला आशेने जगायला शिकवले आणि चौथ्या पायाने त्याचा ध्यास जिवंत ठेवला. अशाप्रकारे, त्याच्या आयुष्यातील आनंदाची प्रसन्न पहाट असो वा दुःखाची कठीण काळरात्र, प्रत्येक प्रसंगी हा बाकच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

 कधीकधी तो एकटाच बसायचा. मग त्याच्या जीवनात शगुनने प्रवेश केला. दोनाचे चार हात झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या आणि मग काय, मुलांसोबत चाराचे आठ हात झाले. दोन्ही मुले मोठी झाली. त्यांना पंख फुटले आणि ते त्यांच्या आसमंतात विहार करायला उडून गेले. पुन्हा एकदा, फक्त ते दोघेच पती-पत्नी असे दोघेच मागे राहिले. काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस हे वर्तुळ पूर्ण करीत शगुन देखील त्याला एकट्याला सोडून निघून गेली, कधीही न परतण्यासाठी! आता फिरून तो शून्यावर येत एकटाच उरला. इकडे तिकडे भटकत जीवनचक्राचे वर्तुळ पूर्ण करीत जिथून सुरुवात केली होती तिथेच तो परत येऊन पोचला. जणू एखादा मूर्ख माणूस आपल्याच घरापासून फारकत घेत दूर दूर भटकून येत परत त्याच घरी येऊन विसावतो. काळाच्या प्रवाहात जुने इमले ढासळत होते आणि नवीन वास्तू बांधले जात होते. अनेक ठिकाणी बाकडे गायबच झाले होते. वयोमानाने थकल्यामुळे आता तो फार दूर जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या मुलांकडे तक्रार केली, “माझी शगुन मला सोडून गेली आणि आता एकाकीपणाच्या या वेदना मला असह्य होत आहेत. ” त्याच्या लाडक्या लेकीने यावर एक कल्पना सुचवली, “बाबा, आता तुमच्या अंगणातच तुमचा आवडता बाक बनवून घ्या बरं. बघा, आपल्या स्वतःचा बाक असला की तुमचे सुख तुमच्याच हाती असेल. हवे तेव्हां आणि हवे तितके बसा, आडवे व्हा, अंमळ एखादी छानशी डुलकी घ्या किंवा मस्त झोप काढा. ” हे ऐकल्यासारशी जणू संपूर्ण जगाचा आनंद एकवटून त्याच्या चेहऱ्यावर झळकला होता. लगेचच एका तयार आरामदायी बाकाची ऑर्डर देऊन तो मागवल्या गेला. त्यावर स्थानापन्न होताच त्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणाले, “ह्यॅ! एवढी लहानशी गोष्ट! हे तुला आधीच कां सुचले नाही? ” 

 मात्र प्रत्यक्षात घडले असे की जसजसे दिवस मंदगतीने पुढे सरकत होते तसतसा त्याचा एकमात्र प्रवास खोलीपासून अंगणातील बाकापर्यंतच सीमित झाला. तरीही हे समाधान होते की, कसा का होईना हा प्रवास सुरु होता. त्याच्या मालकीचा तो बाक भलेही घरात होता तरी त्यावर बसल्या बसल्या तो विचारांच्या वेगवान स्वैर अश्वावर आरूढ होत दूरवर मैलोनमैल फिरून यायचा. वर्षानुवर्षे जपलेल्या आठवणींचे चर्वितचर्वण अनवरत सुरूच असायचे. आणि मग, आपल्या स्वतःच्या बाकावर बसण्याचा अपरिमित आनंद काय वर्णावा! त्यात काय नव्हते! प्रेम-ममता, आदर-सन्मान, संवेदना -धैर्य, मोह-माया सर्व कांही!

 उणीव होती एकच, ती म्हणजे वर्तमान स्वीकारण्याचे धाडस! निष्क्रिय क्षणाची संख्या वाढत वाढत शेवटी असंख्यांवर जाऊन पोहोचली. ते क्षण त्याला टोचून टोचून भयंकर वेदना देत गेले. कधीकधी दगडांचे घासून घासून वाळूत रुपांतर व्हायचे तर कधी वर्षे उलटल्यानंतर त्याच रेतीचे ढीग जमा होत तेच कठोर खडक बनत. इतिहासाच्या पानांचे देखील असेच परिवर्तित होणारे थर असत. सरतेशेवटी, एके दिवशी, त्याच्याच प्रिय बाकावर बसल्या बसल्या तो अनंताच्या यात्रेला निघाला, कधीही परत न येण्यासाठी! निर्जीव बाक तिथेच ठामपणे बसला होता चार पायांवर, कुठल्या तरी अनामिक पथिकाची वाट पाहत! अखेरचे मिटण्यापूर्वी त्याच्या अदृश्य, तरीही सजीव नेत्रांनी बाकाकडे रोखून पाहिले. त्या बाकावर एक धूसर प्रतिमा उमटत होती. त्याने ओळखले! बाकावर तूलीच बसलेली होती!

– समाप्त –

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

आज तूली या त्याच्या नातीची व्हॉलीबॉल संघात निवड झाली. त्याला असे वाटत होते जणू आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे जाते आहे. तो मोठ्या उत्साहाने शेवटचे दोन सामने बघायला गेला, पण प्रत्येक वेळी त्याला त्याची नात बाकावरच बसलेली दिसली. ती कधी तिच्या संघाला प्रोत्साहित करतांना दिसत होती, कधी संपूर्ण संघाबरोबर जयजयकार करताना दिसली, तर कधी संपूर्ण संघात दाटीवाटीने सामील होताना दिसली. त्या निरागस बालिकेला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी तो तळमळत होता. त्याला समाधान याचे वाटत होते की तूली संयमाने आणि संतुलन राखून वागत होती. घरी आल्यानंतरही तिने अजिबात तक्रार केली नाही. त्याला एकाच गोष्टीची भीती वाटत होती की जरी ती काही बोलली नाही तरी तिला मनातल्या मनात या गोष्टीचे शल्य नक्कीच बोचत असणार.

मात्र तूलीला जास्त काळ वाट पाहावी लागली नाही. लवकरच ती खेळू लागली आणि संघातील एक विशेष खेळाडू म्हणून ती ओळखल्या जाऊ लागली. आता मात्र त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. मंडळी, खेळ कोणताही असो, कांही खेळाडू नेहेमीच बाकावर तिष्ठत बसलेले असतातच, आपली पाळी केव्हां येईल याकडे अत्यंत आतुरतेने डोळे लावून बसलेले असतात ते! आजकाल टीव्हीवर क्रिकेट सामने पाहतांना, त्याची नजर मैदानापेक्षा बाकांवर बसलेल्या खेळाडूंकडेच जास्त वळायची. ते कधी मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचे, तर कधी मैदानात खेळणाऱ्या फलंदाजाची बॅट बदलण्यासाठी. कधी तर कर्णधाराचा शीघ्र संदेश देण्यासाठी सुद्धा त्यांना मैदानावर जावे लागे. त्याने आयुष्यभर हेच तर केले होते. खेळ जीवनाचा असो वा मैदानातला, हा बाक त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहिला. एका पतीच्या नात्याने त्याने पत्नीसोबत याच बाकावर बसून प्रेमाचे हितगुज केले. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर जेव्हां तिची साथ सुटली, त्यानंतरही या बाकावर ती कित्येकदा अवचितपणे येत त्याला लगटून बसल्याचा त्याला भास व्हायचा. दोघांचे संभाषण सुरू व्हायचे, अनवरत चर्वितचर्वण असायचे ते!

तो एक पिता होता, साहजिकच कामे आटोपताच फुरसत मिळाल्याबरोबर तो बागेतल्या बाकावर निवांत बसून विश्रांती घ्यायचा. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांचे आयुष्य स्थिरस्थावर होण्याबाबत आणि त्याच्या नातवंडांच्या संगोपनाबद्दल अखंड विचार सुरु असायचे. जणू काही एका मालिकेप्रमाणे एकामागून एक घटनाचक्र त्याच्या नजरेसमोर तरळत असे. या घटना असायच्या कधी वर्तमानातील, कधी भविष्यकालीन तर कधी भूतकाळात घडलेल्या. कांहीही असो, तो एक असा खेळाडू होता ज्याने बाकावर बसून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात केले होते, जणू कांही त्याच्या जीवनात प्रवेश करणारा प्रत्येक बाक त्याच्या प्रत्येक प्रवासाची दशा आणि दिशा ठरवत होता.

निवृत्तीनंतर एक बाक सोडला तर सर्व कांही मागे राहिले! सकाळचे चालणे असो वा संध्याकाळचे, मध्ये अंमळ विश्रांती घेण्यासाठी तो नेहमी बाकावरच टेकायचा. हालचाल करत राहा, थांबा आणि पुढे जा. घराबाहेर पडण्याचे हे लहान सहान प्रयत्नही आता एका लांब लचक प्रवासासारखे वाटायचे. थोडे चालणे, थोडा वेळ उसंत घेणे, तजेला आला की परत पुढे चालणे हे सुरु असायचे. तेव्हां बाकावरील विसावा त्याला नवीन ऊर्जा देत राहायचा, कारण त्याच्या शरीरात ना आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली होती ना मनामध्ये तशी उभारी! तरीही, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन अनुभव देऊन जायचा. प्रत्येक दिवसाचा छोटेखानी प्रवास, एक अनवट अनुभव आणि एक अपरिचित भावविश्व घेऊन अवतरायचा, जणू कांही ही नुकतीच घडलेली घटना आहे.

बाकावर बसताच, त्याच्या भूतकाळातील असंख्य स्मृतींच्या रिळांच्या गुंडाळ्या जणू फ्लॅशबॅकसारख्या उलट्या दिशेनं गोल गोल फिरायला लागत. ती स्थळे, चेहरे, घटनाक्रम… सगळे त्याच्या समोर उभे ठाकायचे. भूतकाळाच्या राखेत दबलेले कित्येक स्फुल्लिंग वाऱ्याची चाहूल लागताच अग्निज्वालेचे रूप धारण करण्यास आसुसलेले असत. दैवदुर्विलास असा की बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतानाही अदृश्य असतात आणि ज्या नसतात त्या सतत आपल्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत गात असतात. कदाचित यालाच आपण म्हातारपण म्हणतो, जेव्हा शरीर आणि मन यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध अधिकच जटिल होत जातात. जणू काही तलम रेशमी धागे एकमेकांत गुंतत आणखीनच विचित्रपणे गुंफले जातात. त्यामुळे पडलेल्या गाठी उलगडण्याऐवजी अधिकच घट्ट होत गुंतागुंतीत भर घालतात आणि त्यांच्यातच विचित्रपणे अडकलेले तन व मन या अस्वस्थतेत भरच टाकीत जाते.

आजही, नेमक्या त्याच गोष्टी जणू त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम त्याच्यासमोर आल्या होत्या. या त्याच गोष्टी होत्या ज्यांना आयुष्यभरासाठी विसरण्याची त्याची इच्छा होती. त्याने त्या गोष्टींपासून सुटका मिळवण्याचा जितका कसून प्रयत्न केला, तितक्याच इर्षेने त्या त्याचा पाठलाग करीत त्याला आयुष्यभर छळत राहिल्या. जीवनातील खडतर काळातल्या आठवणींच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या शुभ्र कापडावर पडलेला अमिट डाग कधीही नष्ट होत नाही कापड फाटेस्तोवर धुतला तरी! कित्येक वर्षे उलटून गेली, पण ती घटना जणू काही आत्ताच घडल्यासारखी ताजी वाटत होती. जेव्हां संघात त्याची निवड झाली, तेव्हां त्याच्या आनंदाला पारावर नव्हता. घरच्या, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आणि गावातील सर्व लोकांच्या आनंदाला उधाण आले होते, अभिमानाने त्यांची हृदये काठोकाठ भरून गेली होती. त्यांच्यापैकीच एक असा मुलगा जन्माला आला होता ज्याने त्यांचे आणि गावाचे नांव गौरवान्वित केले होते. राष्ट्रीय संघासाठी खेळणे ही खरोखरच फारच अभिमानास्पद गोष्ट होती. खेळाडूचा गणवेश घातल्या घातल्या त्याचा फोटो काढल्या गेला. आता सामना सुरू झाला, एक, दोन, तीन. खेळाडूंची मोजणी सुरू होती. पण त्याचे दुर्दैव असे की त्याला खेळण्याची संधी मिळालीच नाही. वाट पाहणाऱ्या बाकावर बसल्या बसल्या तो प्रत्येक खेळाडूचा कमकुवतपणा आणि त्याचे वैशिष्ट्य बारकाईने ओळखू लागला. तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते. 

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोऽऽड चकली…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “गोऽऽड चकली…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

नाॅक नाॅक रेवा…

…. ‘दिवाळी’ रेवाच्या घराचा दरवाजा नाॅक करत होती.

शेवटी आज रेवानं दरवाजा उघडला. काय करणार? प्रोजेक्टची डेडलाईन. रियाच्या एक्झॅम्स.

निखीलच्या टूर्स… कुठल्या तोंडानं ” आली माझ्या घरी ही दिवाळी.. ” म्हणणार?

दुनिया सोचती है, आयटीवाल्यांची काय? रोजच दिवाळी..

जिसकी जलती है जान…. जान दो. आजचा रविवार कारणी लावायचा. तिघांचं अमेझिंग शॉपिंग दोन दिवसांपूर्वीच झालेलं.. अँमेझाॅनवर.. आँनलाईन. हल्ली शाॅपींग काय, दर आठवड्याला चालायचं.

दिवाली तो बहाना है…

कुठल्यातरी कंपनीवाल्या लोकांनी, घराची सफाई करून दिलेली. रियानं तर रेडिमेड किल्लासुद्धा आणून ठेवलाय गॅलरीत. फराळ सुद्धा आँनलाईन आँर्डर करून ठेवलाय. सिर्फ चकली छोड के..

– – खरं रेवा तशी हौशी कलाकार. ही आँनलाईन दिवाळी तिला फारशी आवडायची नाही. सगळं चकचकीत असलं, तरी तो दिवाळीचा आनंद आँफलाईन झालेला.. ईस बार नही.. निदान चकल्या तरी घरी करायच्या. थोडा तरी दिवाळीचा फील यायला हवा.. रेवाला स्वतःची ईनव्हाॅल्व्हमेंट हवी होती, दिवाली सेलीब्रेशनमध्ये. चार दिवस फोनाफोनी चाललेली. निखिलच्या आईनं सांगितलं तसं मिक्श्चर. कालच भाजणी दळून आणलेली.

‘ गुड माॅर्नींऽऽऽग रेवा.. ‘मिशन चकली’ स्टार्टस्. ’ 

स्टीलच्या सोऱ्यातून सहज गोल गोल चकल्या पडू लागल्या… किती सोप्प झालंय…

रेवाला ती लहान असतानाची दिवाळी आठवली. जड लाकडी सोऱ्यातून, दात ओठ खावून चकली पाडणारी, रेवा…, , रिया आणि निखील पण सपोर्टला होतेच. छोटी रिया बटर पेपरवर, गोल गोल चकल्या पाडू लागली… रेवाला लहान झाल्यासारखं वाटलं. रेवा अन् निखिल चकल्या तळू लागल्या. खमंग वास सुटलेला. रेवाच्या हेअरडूवाल्या काही चुकार बटांनी त्यांची जागा सोडलेली. त्या घुंगराली बटांनी, मध्येच रेवाच्या हातांनी, ओल्या भाजणीचं लोशन लावलं. या अवतारात रेवा क्युटच दिसत होती.

.. प्रिन्सेस रियाचंही चकली करतानाचं सेल्फीसेशन झालं. निखिलसे रहा नही गया.. त्यानं पटकन् रेवाचा अन् त्याचा सेल्फी घेतला.

एकंदर प्रोजेक्ट चकलीचं टीम वर्क जोरात चाललेलं… हसत… खिदळत… आत्ता कुठं दिवाली माहौल वाटत होता… टी. व्ही, लॅपटाॅप, सेलफोन सगळे सगळे पडिक झालेले.. खमंग चकलीचा घमघमाट सुटलेला… सऽही दिवाली माहौल क्रियेट झालेला.

बस… रेवाला हेच तर हवं होतं. आता खरं दिवाळी आल्यासारखं, वाटत होतं. निदान चकल्या तरी झाल्या हे बघून, रेवा चकल्यांसारखी खुशखुशीत झालेली.

रियानं पटकन् डिश घेतली. चकल्या ठेवून खायला सुरवात. एकीकडे चकल्या तळणं चाललेलं. दुसरीकडे आँनलाईन चकली खाणं.. बढिया….

जमली.. चकली छानच झालेली. चटक मटक चकली.. रेवा जाम खुश… तिला ही खुशी कोणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटू लागली. आईची सवय आठवली.

…. तिनं पटकन् एक डिश घेतली. पाच सहा चकल्या ठेवल्या. अन् शेजारच्या फ्लॅटची बेल दाबली.

साठेकाकू… रेवाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या… दोघचं दोघं. त्यांचा मुलगा स्टेटस् मध्ये.

गेल्या सात वर्षात सात मिनटंही बोलणं झालं नव्हतं..

रेवाच्या कामाच्या वेळाच… रेवाचं हे असं वागणं.. खरं तर हे फ्लॅटकल्चरमध्ये न शोभणारं… तरीही..

साठेकाकूंनी दार उघडलं. प्रसन्न हसल्या. ‘ हॅपी दिवाली ‘ झालं. काकांनी पटकन् चकलीचा तुकडा मोडत, चकलीचं तोंड भरून कौतुक केलं..

…. रेवा उडत उडत घरी.

चकली गोऽऽड झाल्यासारखी वाटत होती.

पाचच मिनिटात साठे काका- काकू, साजूक तुपातले बेसन लाडू घेवून हजर.

आहाहा… मस्त चव… निखिल, रिया जाम खूष.

“आम्ही पण फार काही करत नाही फराळाचं. रेडिमेडच आणतो. लाडू तेवढे करते. दोघंच दोघं किती खाणार? “

“ पुढच्या वेळी लाडूचं प्राॅडक्शन डबल करा…”.. निखिल हक्कानी नेटवर्कसारखं बोलला.

“ अन् चकलीचंही.. ” साठेकाकांनी टाळी दिली.

मस्त दोन तास गप्पा चाललेल्या. रिया नवीन आजी आजोबांवर जाम खूष. घर भरल्यासारखं वाटत होतं.

आनंदानं ‘दिवाळी’ रेवाच्या घरात शिरली होती.

खरं सेलीब्रेशन. दिवाली का मजा तो ‘सब’के साथ आता है.. अकेलेमें तो सिर्फ फेसबुक पढा जाता है…

रेवानं केलेली चकली.. दिवाळीला गोऽऽड करून गेली… 

!!! हॅप्पी दिवाली!!! सर्वांनाच…

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देशी विदेशी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ देशी विदेशी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’) – इथून पुढे —– 

…. आजोबा अचानक एक दिवस झोपेतच गेले. त्या घरात मग राहिले फक्त माझे आईवडील. मला त्यांनी रत्नागिरीला वसतिगृहात ठेवलं. माझी तीव्र बुद्धी बाबांच्या लक्षात आली होती. मी बोर्डात दुसरा आलो… मग मी मुंबईला गेलो. अतिशय धडपड करून, शिकवण्या करून, कॉलेजच्या मेसचे हिशेब ठेवून, त्या बदली जेवण फुकट मिळे. असा पैसे मिळवत, पूर्ण स्कॉलरशिपवर डॉक्टर झालो. मला आणि माझ्या गरीब आईवडिलांना अभिमान वाटावा असं यश मिळवत गेलो मी.

…. हे मी प्रौढीने नाही सांगत हो, पण ही वाट सोपी नव्हतीच आम्हा कोणालाच. मग मी न्यूरो सर्जरीत एम एस केलं. बँकेचं कर्ज काढलं आणि इकडे आलो. पुन्हा इथे चार वर्षे शिकलो. शेवटच्या वर्षी मात्र गोल्ड मेडल मिळवणारा एकटा भारतीय विद्यार्थी होतो मी.

…. मग मात्र मला अजिबात कष्ट झेलावे लागले नाहीत. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बोलावणी येऊ लागली आणि मी इथे स्थिरावलो. हे शहर फार आवडलं मला. भरपूर पगार सुंदर काम. आता मात्र यशाचे दरवाजे उघडे केले मला देवाने…

…. माझ्याबरोबर माझी सहकारी म्हणून सिल्व्ही होती. अत्यंत गरिबीतून जिद्दीने वर आलेली सिल्व्ही. जमैका सारख्या देशातून आलेली. उपाशी राहून एकवेळ जेवून आपलं शिक्षण पूर्ण करणारी सिल्व्ही. तिलाही न्यूरो सर्जरीची ही फार अवघड ब्रॅंचच हवी होती. ज्यात मुली सहसा जात नाहीत.

पण सिल्व्हीचे यशच इतके उत्तुंग होते की तिला इकडे सहज प्रवेश मिळाला… आम्ही कधीतरी कॅफे टेरियात भेटत असू. लाजरी, अबोल, कायम दडपलेली आणि आपल्या वर्णामुळे सतत कॉम्प्लेक्स बाळगणारी सिल्व्ही फार गुणी होती… कोणात न मिसळणारी, अभ्यासू आणि एकटीएकटी रहाणारी.

…. तो दिवस अजून आठवतो मला… एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मी करत होतो. सिल्व्ही माझी फर्स्ट असिस्टंट होती… निम्मी शस्त्रक्रिया झाली आणि अचानकच मला चक्करआली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. भूल देणारे डॉक्टर, असिस्टंटस् नर्सेस सगळे घाबरून गेले. पेशंट तर अजून भूलीखालीच होता. अजून थोडी शस्त्रक्रिया बाकी होती. मला पटकन उचलून इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं… सिल्व्ही माझ्या जागेवर आली. शांतपणे तिने ऍनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टरांना खूण केली की ‘ ऑल ओके? शाल आय कंटिन्यू? ’

– – तिने ती शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने पार पाडली. अतिशय उत्तम रीतीने तिने ही उदभवलेली परिस्थिती हाताळली. शेवटचे टाके घालताना मात्र सर्व थिएटरने टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं.

.. रोज राऊंड घेत असताना ती मला सगळा फीडबॅक देत होती. तो पेशंट उत्तम बरा झाला. बंद थिएटर च्या दाराआड काय काय होत असते याची कोणाला कल्पना सुद्धा येत नसते.

. तो पेशंट पूर्णपणे बरा होऊन घरी गेला.

…. दरम्यान सिल्व्ही माझ्याजवळ मोकळी होत गेली. सिल्व्ही अनाथाश्रमात वाढली. चर्चच्या ऑर्फनेज मध्ये काढलेले दिवस मला सांगताना तिला अश्रू आवरत नसत. अत्यंत तल्लख बुद्धी घेऊन जन्माला आलेली सिल्व्ही अपार कष्ट करून इथपर्यंत आली. तिची रेखीव चर्या, चेहऱ्यावरचं हुषारीचं तेज मला भुरळ घालू लागलं.

…. एक दिवस मला म्हणाली, “ माझी आई नक्की गोरी आणि वडील आफ्रिकन काळे असतील ना? म्हणूनच मी खूप काळी नाही झाले. आणि हे घारे डोळे पण माझ्या गोऱ्या आईचीच देणगी मला दिलेली. ”.. हसून सिल्व्ही म्हणे. माझ्या पोटात अपार प्रेम दाटून येई या मुलीसाठी.

…. मी या गुणी मुलीच्या चक्क प्रेमात पडलो. सिल्व्हीला मी प्रपोज केलं.

तिने मला पटकन होकार दिला नाही. म्हणाली ” तू इंडियन आहेस ना? तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्या असतात कॅरी…” मला हॉस्पिटलमध्ये करकरेन म्हणता कॅरीच म्हणतात लोक.

.. तर सिल्व्ही म्हणाली “मला पूर्ण आदर आहे इंडियन लोकांबद्दल. पण तुझे आईवडील तयार होणार नाहीत मला स्वीकारायला. आणि तेही सहाजिकच आहे कॅरी. तू तुमच्यासारखी इंडियन मुलगीच बघ. तू जास्त सुखी होशील आणि तुझ्या आईवडिलांनाही सुखी करशील. ”

.. पण मी तिच्या प्रेमात आणि गुणांत आकंठ बुडालो होतो.

.. मी जर भारतात कधीही परत जाणारच नव्हतो तर मला काय फरक पडणार होता सिल्व्ही काळी आहे का गोरी आहे का मिक्स आहे याचा? .. उरला प्रश्न माझ्या आईवडिलांचा. मलाही खूप टेन्शन आलं की कोकणातले दशग्रंथी कर्मठ ब्राम्हण असलेले माझे वडील हे मान्य करतील का? आई काय म्हणेल?

इतर नातेवाईक काय म्हणतील? मी माझ्या आईवडिलांना हे काहीही न सांगता त्यांना अमेरिकेला या असं सांगितलं.

…. शेजारच्या बापू साठेला पैसे पाठवले आणि पासपोर्ट व्हिसा सगळयाला माझ्या वडिलांना मदत करायला सांगितलं. त्यानेही सगळं काही केलं आणि मग मी आईबाबांना तिकीट पाठवलं. बापू साठेने त्यांना मुंबई एअरपोर्टला बसवून दिलं.

– – आईबाबा जन्मात पहिल्यांदा विमानात बसले. मी त्यांना एअरपोर्टवर उतरवून घ्यायला गेलो. मला बघून त्यांना आनंदाने रडूच आलं. माझी मोठी गाडी, घर बघून त्यांना धन्यधन्य झालं. “जिंकलंस रे पोरा. शाबास.! “ बाबांनी पाठीवर हात ठेवून म्हटलं. मला आमच्या कुलदैवताचा नीळकंठेश्वराचाअंगारा लावला.

…. संध्याकाळी आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे सिल्व्ही आली. “. नमस्कार आईबाबा. कसा झाला प्रवास? ” तिने हसतमुखाने विचारलं.

“ ही कोण? “ आईबाबांनी विचारलं.

“ मी सिल्व्ही. ” इंग्लिशमध्ये उत्तर देत ती म्हणाली, “ मी कॅरीबरोबर त्याच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली आम्ही. ” सिल्व्ही म्हणाली.

आईबाबांना तिने तिच्या कारमधून मॉलमध्ये नेलं. सगळं छान दाखवलं. आईला एस्केलेटर मध्ये कसं चढायचं ते दाखवलं. पटापट ग्रोसरी घेतली. आईबाबांना मजा वाटली. तिने त्यांना माझ्या घरी सोडलं आणि ती निघून गेली.

“सारंग ही मुलगी कोण? तू हिच्याशी लग्न तर करणार नाहीस ना बाबा? ही तर धड गोरी नाही की काळी नाही. कशी काय चालणार आपल्या दशग्रंथी घराण्यात? ” बाबांनी क्षणभरही उसंत न घेता विचारलं.

.. त्यांनी बॅगेतून तीन चार फोटो माझ्या पुढे टाकले. “ बघ बघ या मुली. ही परांजप्यांची मेधा, ही भाटे.. डॉक्टरांची अश्विनी. बघ. अगदी योग्य आहेत तुला. उगीच कसले तरी धाडस करू नको बाबा. ”

मला हे सगळं अपेक्षितच होतं.. मी फक्त आईकडे बघितलं. आई हसली. म्हणाली, ” अहो. ठेवा ते फोटो बॅगेतच. या मुली ना, आपल्या कोकणातच ठीक आहेत. त्यांचा इथे निभाव लागणार नाही. ही अमेरिका आहे आणि आपला मुलगा मोठा सर्जन आहे. त्याला या मुलीने किती समर्थपणे मदत केली आणि ते मोठे ऑपरेशन पूर्ण केलं हे सांगितलंय मला सारंगने. कमाल वाटली मला या पोरीची. प्रेम आपुलकी सगळं सगळं आहे हिच्याकडे. शिवाय आपल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून शिकलीय सुद्धा. उगीच खोडे घालू नका. गुंतले आहेत हे दोघे मनानं बरं. ”

“ सारंग, तू खुशाल लग्न कर सिल्व्ही शी. आम्हाला पसंत आहे हो ही मुलगी. अरे, मनं गुंतली आहेत ना तुमची? मग आता मागे नको बघू. नातेवाईक आणि लोकांचा कसला विचार करतोस पोरा? आम्ही इथे आलोच आहोत तर बाबा देतील की विधिवत लग्न लावून. काय हो? काय म्हणता? ”.. आईने मला दिलासा दिला.

.. क्षणभर विचार करून बाबा म्हणाले, “ ठीक आहे रे. तू सुखी तर आम्ही सुखी. खुशाल करा लग्न. पार्वतीबाई, पटलं बरं तुमचं म्हणणं. या मुली इथे योग्य नाहीत. त्या कोकणातच ठीक. इथे ही सिल्व्हीच अगदी योग्य आहे हो. ”

पुढच्या महिन्यात आई बाबांनी आमचं विधिवत लग्न लावून दिलं. आणि ते निश्चिन्त मनाने भारतात परत गेले.

– – डॉक्टर सारंग ही हकीगत आम्हाला सांगत होते. ” मावशी, या निर्णयाचा आम्हा दोघांनाही कधीही पश्चाताप झाला नाही. वीस वर्षे झाली आमच्या लग्नाला. दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी माझी आई अचानकच लहानशा दुखण्याने गेली. आणि मग बाबाही फार राहिले नाहीत. पण मला खूप समाधान आहे की माझं हे वैभव, बायको मुलं बघूनच समाधानाने ते गेले….. मावशी, तुम्हाला त्या लग्नात बघितलं. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या जावयाशी लेकीशी अगदी प्रेमाने बोलत होतात ना, ते बघून मला माझ्या आईचीच आठवण झाली… ती नसती ना तर कदाचित सिल्व्ही पटली नसती बाबांना. पण माझ्या चतुर आईने हे ओळखून माझं लग्न लावून दिलं… काकू खरंच सांगतो.. तुमच्यात माझी आईच दिसली मला. म्हणून मी बोलावलं तुम्हाला… माझी नाळ तर भारताशी पूर्ण तुटलीच आहे आता. माझं तिकडे कोणीच नाही आता. ” डॉक्टर सारंग स्तब्ध झाले.

– – मी त्यांच्या जवळ बसले… ” हे बघ मुला, खूप छान वाटलं तुला भेटून. अशी कर्तृत्ववान मुलं फार कमी असतात रे. खूप चांगलं केलंस तू आम्हाला भेटायला बोलावलंस, मन मोकळं केलंस ”.

…. सिल्व्ही माझ्याजवळ येऊन बसली. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. भाषेपलीकडची भाषा सिल्व्हीला समजत होती… त्या दोघांनी पुन्हा मला वाकून नमस्कार केला.

“ मावशी, फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. माझी आई भेटल्याचं समाधान मिळालं मला. पुन्हा आलात की नक्की नक्की या. ” असं मनापासून म्हणत डॉ सारंग आणि सिल्व्हीने आम्हाला निरोप दिला.

– – नि:शब्द होऊन आम्ही आमच्या घरचा रस्ता धरला.

–  समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देशी विदेशी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ देशी विदेशी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझा मुक्काम होता अमेरिकेत. आता जायची वेळ जवळ आली होती आपल्या घरी भारतात.

अचानक मुलगी म्हणाली, “ आई एका अगदी जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. तू इथे आलेली माहीत आहे तिला. तिने खूप आग्रहाने बोलावलंय तुला. पुढच्या शनिवारी लग्न आहे. आपल्याला जायचंय बरं का. नेहमीसारखं म्हणू नको, माझी ओळख नाही मी येत नाही, तुम्ही जा. तू रुपल शहालाओळखतेस ना? तिच्याच मुलीचं आहे लग्न. बघ तरी, अमेरिकेत आपले लोक लग्न कसं करतात ते. ” 

पुढच्या आठवड्यात निमूट तयार झाले छान साडी नेसून. आणि गेले त्या भव्य पंचतारांकित हॉटेलात लेकीबरोबर.

दारात स्वागताला उभ्या असलेल्या रुपलने मला मिठी मारली आणि म्हणाली, ” आलात आंटी? कित्ती छान वाटलं मला तुम्ही आलात म्हणून. ”

रुपल गुजराथमधून आलेली मुलगी. खूप खूप पूर्वी तिचे आईवडील इकडे आले आणि खूप झगडून इकडे सेटल झाले. रुपल आणि तिचा भाऊ इथेच जन्मले शिकले. उत्तम गुजराथी मराठी हिंदी बोलतात… रुपलची मुलगी चारू बिझनेसमध्ये होती आणि चांगली नोकरी होती तिला.

तिने तिचा नवराही शोधला, सुदैवाने तोही गुजराथी होता. रुपल, तिचे व्याही अगदी हौसेने सगळे लग्नविधी अगदी परंपरागत करत होते.

इकडे आता विधिवत लग्न लावणारे मराठी, गुजराथी गुरुजीही उपलब्ध असतात. मला हे सगळं बघून मजा वाटत होती. एरवी बिझनेस सूट घालणारे वधूवर आता पारंपरिक घागरा चोळी आणि शेरवानीत नटून मिरवत होते. पुन्हा वधूला हे एवढे ढीगभर दागिने.

.. लग्न लागलं आणि मग जेवायची व्यवस्था शेजारीच मोठ्या हॉलमध्ये केली होती. केवढा तो थाटमाट. पाच प्रकारची पक्वान्ने, आणि हे एवढे पदार्थ. निरनिराळे काउंटर्स नुसते ओसंडून वहात होते.

निरनिराळ्या जातीधर्माचे काळे गोरे, मराठी, सगळ्या प्रकारचे लोक तिथे हजर होते आणि सगळा समारंभ आनंदाने एन्जॉय करत होते.

मी मुलीशी मराठीत बोलत असताना अचानक एक साधारण पन्नासच्या दरम्यान वय असलेला गृहस्थ माझ्याजवळ आला.

“काकू, तुम्ही मराठीआहात ना? “ 

त्याने मला विचारलं.

“हो हो. मी पुण्याहून आले. या माझ्या मुलगी जावई आणि नातीला भेटायला. आता मी पुढच्या आठवड्यात परत जाणार भारतात. ”

तो म्हणाला, “ मी बसू का इथे? ” 

“अहो बसा ना. विचारता काय? ” आपली प्लेट घेऊन तो आमच्याशेजारी आला.

” काकू मी डॉ सारंग करकरे. मी न्यूरोसर्जन आहे. इथल्या अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. ” 

– – हे ऐकून जावई मुलगी उठून उभेच राहिले.

“अहो सर, तुमचं नाव चांगलंच ऐकलंय आम्ही. पण प्रत्यक्ष बघितलं नव्हतं कधी तुम्हाला. सॉरी हं. खूप प्रसिद्ध आहात सर तुम्ही. आमच्या ओळखीच्या एका काकांची सर्जरी तुम्हीच केलीय. खूप छान बरे आहेत आता. खूप आनंद झाला तुमची ओळख झाली म्हणून ”… जावई मुलगी अगदी भारावून जाऊन म्हणाले.

सारंग हसून म्हणाले, ”ते सगळं असू दे हो. या मिसेस रुपल शहाच्या काकूंच्या ब्रेन ट्यूमरची मी सर्जरी केली ना म्हणून मी इथे आलो. नाहीतर सहसा मी लग्न कार्य अशा समारंभाला जात नाही. वेळच नसतो हो मला. ”

मुलगी जावई रुपलला भेटायला गेले हे बघून डॉ सारंग म्हणाले, ” काकू, मुद्दाम तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आलो. बोलू का? तुम्ही अगदी माझ्या आईसारख्या दिसता हो. अगदी जणू सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य आहे तुमच्यात. मी मगाचपासून बघतोय तुम्हाला. न राहवून आलो मग बोलायला. ” 

मी म्हटलं ”अहो छानच की मग. खुशाल बोला की माझ्याशी. आई नाही पण मावशी म्हणून तर बोलता येईल ना आपल्याला? ”

सारंगच्या डोळ्यात पाणी चमकलं. “मला प्लीज अरे सारंग म्हणा मावशी तुम्ही. आता तर मावशीच म्हणेन तुम्हाला मी….. तर सांगायची कथा अशी या एका भेटीत संपणार नाही. तुम्ही पुढच्याच आठवड्यात जाताय ना? “.. त्यांनी आपल्या भारी अँपल वॉचमध्ये तारखा बघितल्या, कामाचे शेड्यूल बघितलं… “ परवा. परवा मी संध्याकाळी एकदम फ्री आहे. “

माझ्या जावयाला त्यांनी विचारलं, “परवा तुम्ही दोघे माझ्या घरी मावशींना घेऊन याल का? डिनर करूनच मग घरी जा. प्लीज प्लीज. ” सारंग अगदी मनापासून कळकळीने म्हणाले. मी लोकेशन मॅप पाठवतो. मावशींना घेऊन नक्की याल ना? “

“नक्की येऊ सर. ” जावई म्हणाले.

लग्न समारंभ संपल्यावर आम्ही घरी आलो. तेवढ्यात डॉ सारंगचा लोकेशन मॅप आला.

तो बघून लेक म्हणाली. ”बाप रे. या कम्युनिटीत अतिशय श्रीमंत लोक रहातात. चार गराज, स्वीमिंग पूल, आणि अगदी राजवाड्यासारखी असतात इथली घरं. आणि अतिशय महाग सुद्धा. अर्थात इथले डॉक्टर्स तुफान पैसा कमावतात म्हणून त्यांना शक्य होतं हे. कौतुक आहे ना? आपला एक मराठी डॉक्टर याठिकाणी घर घेऊ शकतो याचं. आई तुझ्यामुळे आमची या डॉ करकरेंशी ओळख होतेय. नक्की जाऊया आपण. ”

मी भारतातून अशीच कोणाकोणाला भेट द्यायला होईल, म्हणून नेलेली श्रीकृष्णाची पितळी मूर्ती आणि खाऊ घेऊन आम्ही ठरलेल्या दिवशी त्यांच्या घरी गेलो.

स्वतः डॉ सारंग अगदी साध्या कपड्यात स्वागताला उभे होते. किती साधे आणि हसतमुख.

“या.. या ना मावशी. ” वाकून नमस्कार करत त्यांनी मनापासून आमचं स्वागत केलं.

मी उत्सुकतेने आत बघितलं. त्यांनी हाक मारली, ” सिल्व्ही, मुलांना घेऊन बाहेर ये ना. ” 

– – आतून आली ती कृष्णवर्णीय स्त्री आणि अगदी पूर्ण तिच्याच सारखी दिसणारी दोन मुलं. असतील तेरा आणि पंधरा वर्षांची, पण ती पूर्ण काळी नव्हती. तर काळा पण तांबूस काळा रंग आणि घारे डोळे होते तिचे. पण केस मात्र अगदी अफ्रोसारखे, कुरळे. मुलांचेही केस तसेच आणि डोळे मात्र पिंगे.

सिल्व्ही इकडे दिसतात तशी मिक्स आफ्रो अमेरिकन असणार. काळे वडील गोरी आई. पण अतिशय बांधेसूद आणि मुलंही अगदी तिच्याचसारखी दिसायला.

“हा मुलगा श्याम आणि ही मुलगी मीरा. ” डॉक्टरानी ओळख करून दिली. ’नमस्ते आजी’ म्हणत अस्खलित मराठीत बोलत दोन्ही मुलांनी आम्हाला वाकून नमस्कार केला.

सिल्व्ही म्हणाली, ”बसा ना. कशा आहात तुम्ही? ”

मी तिच्या तोंडून मराठी ऐकून स्तंभित झाले.

ती हसून म्हणाली, “सारंगने मला मराठी शिकवलं आणि इथे दर रविवारी मराठी शाळा भरते तिथे आमची मुलं जातात. त्यांनाही छान येतं मराठी बोलता”. मुलं आत निघून गेली.

सिल्व्ही म्हणाली “ मावशी, जरा कुकिंगचं बघते हं. ” ती आत गेली.

आम्ही या धक्क्यातून अजून सावरले नव्हतो. अर्थात चेहऱ्यावर तसं आम्ही दाखवलं नाही. तिने दिलेलं सरबत आम्ही घेत होतो.

डॉ सारंग म्हणाले “आरामात बसा. घाई नाही ना जायची? मावशी, मुद्दाम तुम्हाला बोलावलं माझं घर 

दाखवायला आणि माझी कहाणी सांगायला. आम्ही एरव्ही असं कोणात फारसे मिक्स होत नाही. वेळच नसतो हो आम्हाला कामातून. ”

“या सिल्व्ही पण तुमच्यासारख्या डॉक्टर आहेत का? ” मी विचारलं

” हो. ती पण नावाजलेली न्यूरोसर्जन आहे. आम्ही दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतो. ” 

आणि डॉ सारंग सांगू लागले… …

अतिशय हेक्टिक दिवस होता तो. मला आधीचे दिवस अतिशय काम होतेच. त्या दिवशी तर जवळजवळ बारा तास मी उभा होतो. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना थकून गेलो अगदी. ते ऑपरेशन संपलं आणि मी अगदी थकून घरी आलो. पुन्हा पुढचे दोन दिवस मला अशीच प्लॅन केलेली ऑपरेशन्स होती. मी तरुण होतो. झाली त्यालाही आता पंधरा वीस वर्षं. असेन तिशीत मी तेव्हा. खूप उत्साह आणि भारतातून आल्याने स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. माझे बॉस डॉ स्टीफन यांचा मी आवडता शिष्य झालो. खूप शिकलो मी त्यांच्याकडून.

…. मी खरं तर कोकणातला. करकरे कुटुंबाच्या निदान चार पिढ्या तरी पेंढे गावच्या..

रत्नागिरीजवळचं अगदी लहान गाव. शाळा होती ती आधी फक्त सातवीपर्यंत पण नंतर झाली दहावी पर्यंत.. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझे वडील दशग्रंथी ब्राम्हण. थोडीशी शेती, आणि उपाध्येपण हाच उदरनिर्वाहाचा मार्ग. माझे आजोबा सांगायचे की.. माधव.. माझे वडील, अतिशय बुद्धिमान. पण आजोबांना अर्धांग वायूचा झटका आल्याने बिचाऱ्या माधवला सगळी संसाराची जबाबदारी अकाली घ्यावी लागली. आणि नाईलाजाने त्याने घरी असलेले गुरुजीपण स्वीकारले. केवळ नाईलाज. त्याला ही खंत कायम राहिली. आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “ नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर

आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात काहीच पॉईंट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.

आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपर्स ऑलसो’.

आजचा रंग निळा होता. निळ्या रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.

मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?

मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?

मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!

मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!

मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले. कपाटातली दुसरी निळी साडी काढली आणि ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी निळ्या साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.

सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.

दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी निळ्या ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.

रोज सकाळी देवी दर्शन, दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी, अनवाणी बाहेर पडणे, आणि दिवसभर उपास, असे रूटीन सुरू होते. जरा हटके, म्हणून २-३ दिवस छान वाटले. नंतर नंतर, उपास आणि अनवाणी चालणे, याचा त्रास व्हायला लागला. पण आता रेटण्याशिवाय पर्यायच नव्हता.

म्हणता म्हणता नवमी उजाडली. आज गुलाबी रंग होता. आज सुटी घेतली होती. त्यामुळे माझ्या सगळ्या गुलाबी साडया नेसायला, आज भरपूर चान्स होता. सकाळी जरा लवकरच तयार होऊन, देवळात जायला बाहेर पडले. आज मुलीला वेळ नव्हता, त्यामुळे एकटीच होते. देवळात बऱ्याच स्त्रिया दर्शन घेऊन, गाभाऱ्याच्या बाहेर हात जोडून बसल्या होत्या. मी पण पाठ टेकता येईल, अशी जागा बघून, हात जोडून, डोळे मिटून बसले. केव्हा तंद्री लागली समजलेच नाही ~ ~ ~

कोणीतरी डोक्यावर प्रेमानी हात फिरवतय, असा भास झाला. डोळे उघडून बघितलं, तर समोर साक्षात देवी. मी स्वत:ला चिमटा काढायला हात वर उचलला, तर देवी म्हणाली, चिमटा काढून खात्री करण्याची गरज नाही. देवीच तुझ्यासमोर आहे.

देवी : ८ दिवस उपास करून, अनवाणी चालून, खूप दमलेली दिसतेय.

मी : दिवसभर ऑफीसचे काम, नंतर घरचे काम आणि पोटात काही नाही, यामुळे अशक्तपणा वाटतोय आणि अनवाणी चालल्यामुळे टाचा आणि तळवा पण दुखतोय.

देवी : अगं, पण हे सगळं केल्यामुळे मी प्रसन्न होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?

मी : देवीमाते, सगळेच सांगतात. पुर्वीपासूनची तशी प्रथा आहे. हे व्रत केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपले इच्छित प्राप्त होते, असे पण सगळे सांगतात.

देवी : जगामधे असे असंख्य लोक आहेत, की, जे स्वत: करता चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. महिनों-महिने ते अनवाणी चालत असतात, नवरात्रात पण ते अनवाणीच असतात. नवरात्रात अनवाणी चालण्यामुळे, जर मी प्रसन्न होत असते, तर त्यांच्यावर प्रसन्न झाले नसते कां? कित्येक लोकांना, अनेक दिवस एक वेळचे जेवणच नशीब असते, त्यांचे कायमच उपास घडत असतात, त्यांच्यावर मी प्रसन्न झाले नसते कां? तुम्ही लोक जुन्या परंपरा-रूढी आचरणात आणण्यापूर्वी, त्यावर थोडा विचार का करत नाही?

मी : देवीमाते, मग अशा परंपरा तयार कां झाल्या?

देवी : निरनिराळ्या काळांमध्ये, तेव्हाचा संदर्भ लक्षात घेऊन, लोकांचे त्रास दूर करण्याकरता, लोकांना आनंदात ठेवण्याकरता, तेव्हाच्या संतांनी / ज्ञानी लोकांनी उपदेश केलेले असतात. कांही वेळा असे उपदेश, ज्ञानी लोक मुद्दामच देवतांशी / धार्मिक विधिंशी जोडतात, जेणेकरून लोक उपदेशांचे पालन करतील. काळ पुढे पुढे जात जातो आणि संदर्भ मागेच राहतात. काळाप्रमाणे उपदेशांचे भाषांतर बदलत जाते, त्यातले शब्द बदलतात आणि पुढे काय येते तर — नवरात्रात अनवाणी चाला, रोज उपवास करा, रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसा, आणि अशा परंपरा-रुढी तयार होतात. आणि हे कां करा, तर देवीला प्रसन्न करण्याकरता.

नवरात्रात अनवाणी चालण्याऐवजी, जो चप्पल विकत घेऊ शकत नाही, अशा कुणाला, तुम्ही चप्पल देऊन, त्याला अनवाणी चे वाणी (अनवाणी च्या विरूध्द वाणी) केले, तर ते मला आवडेल. नवरात्रात उपवास करण्याऐवजी, एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देऊन, त्याचा उपवास बंद करायला मदत केली, तर ते मला खूपच आवडेल. अशा गोष्टी नवरात्रात करा, दिवाळीत करा, गणपति उत्सवात करा, आणि शक्य असेल तर नेहेमीच करत जा. हीच माझी खरी पुजा समजा, हीच मला नेसवलेली साडी समजा, हाच मला चढवलेला भोग समजा.

नवरात्रात तुम्ही रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसता, हे छानच आहे. नेहेमीच असे कलरफूल रहायला पाहिजे. स्त्री ही प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. निसर्ग जसा रंगांनी भरलेला असतो, तसे मन रंगीबेरंगी ठेवा. जिथे जाल, तिथे आनंद पसरवा, प्रेम पसरवा. तुमचे सौंदर्य तुमच्या कृतिमधून दाखवा, चेहऱ्यावर हास्य ठेऊन दाखवा. त्याकरता अंगप्रदर्शन करण्याची किंवा तू घातले आहेस तसे लो-नेक आणि हाय-बॅक कपडे घालण्याची गरज नाही. स्त्रीयांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्याचे एक कारण आहे, तुमचे वाढते अंगप्रदर्शन! आजपासून आंधळेपणाचे कोणतेहि अनुकरण थांबवा. रूढी-परंपरा-धार्मिकविधि यामधे दडलेला अर्थ शोधा. जे मनाला पटेल, ज्यानी मन आनंदित होईल, ज्यानी इतरांना आनंद मिळेल, अशाच गोष्टी करा. आणि मग अनुभव घ्या, की परमानंद ही काय चीज असते. आणि परमानंद म्हणजेच ईश्वरप्राप्ति.

असे म्हणून देवीनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ~ ~ ~ ~

कोणीतरी मला हलवत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडली. घंटांचा आवाज येत होता. आरतीची वेळ झाली होती. आरती झाली. प्रसाद घेतला. देवीला नमस्कार करतांना असं जाणवलं, की, देवी मंद स्मित करत मला आशिर्वाद देते आहे. देवीनी आज ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला होता.

उद्यापासून कसे वागायचे, कसे रहायचे, याची मनात उजळणी करत, आणि आपल्याला ईश्वर प्राप्ति झालीच आहे, अशा आनंदात घराकडे निघाले.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “13 / 7…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “13 / 7…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

पहिल्यांदाच… गेल्या साडेपाच वर्षांत पहिल्यांदाच.

न सांगता ?.. कधीच नाही.

रोजची सातची गाडी. कराड – चिपळूण. सात वाजता, कराडहून निघणार म्हणजे निघणारच.

अकरा वाजता चिपळूणात पोचायची… चिपळूणला जेवण… तिथनं एक वाजता परत निघायची.

पाच वाजेपर्यंत कराडला परत.

आप्पा कुलकर्णी… ड्रायव्हर. राजू खरमाळे कंडक्टर… आमची जोडी आख्ख्या कराड डेपोत फेमस.

राजूपेक्षा माझी सर्विस बरीच जास्त. जवळपास वीस वर्षे. अजूनपर्यंत एकही अपघात नाही. कृष्णामाईची कृपा….

राजू तसा ज्युनियर. बहुधा दहा बारा वर्षे सर्विस. एसटीच्या सर्विसमधे, आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी, फार कमी लोक पाहिलीयेत. त्यात राजू नं 1. खरंच प्रवाशाला देव मानणारा. एखाद्या म्हातारीला हात देवून गाडीत चढवणार. तिचं बोचकं, स्वतः गाडीत घेणार. चिल्लरला कधी नाही म्हणणार नाही. कुणाचा एक पैसा कधी बुडवणार नाही. जीभेवर साखर. सगळ्यांशी गोड बोलणार. कधी कावणार नाही.

तशी आमची ही जनता गाडी… हात दाखवा, गाडी थांबवा.. राजूनं कुठल्या प्रवाशाला, कधीही नाही म्हणलं नाही. गाडीतल्या पोरीबाळींना, पोटच्या पोरींसारखं जपायचा.

चार वर्षांपूर्वीची गोष्ट.

सोमवारचा दिवस. बाजाराचा दिवस. गाडी खचाखच भरलेली. काॅलेजातल्या पोरी. काही ईरसाल पोरं सुद्धा.

चेकाळलेली… आचकट विचकट बोलणं सुरू झालेलं. राजूनं आडवा उभा झाडला त्यांना. त्यांचा म्होरक्या.

उगाच नडायला बघत होता. म्होरक्यानं फोनाफोनी केली. पुढच्या स्टाॅपवर, त्याचे दहा बारा पंटर, हातात दंडुके घेवून ऊभे.

…. मी केबिनमधूनच ओरडलो,

” राज्या, गाडीतल्या म्होरक्याला सोडू नकोस. मी गाडी घेतो पोलीस स्टेशनला. “

.. राजूला त्या म्होरक्याचीच काळजी.

” नको नको. उगा केस झाली तर, साल बरबाद होईल त्याचं. आईबाप रोज रानात राबतात, अन् याची फी भरतात. याला काय नाही, पण आपण फिकीर करायला हवी. काय हुईल ? पाठीत दोन चार रट्टे बसतील.

बसू देत. ह्यो आणि ह्याची गँग.. समजुतीचे चार शब्द सांगून बघतो. नाहीच भागलं, तर होऊन जाऊ दे धूमशान… सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकला म्हणूनशान आत जातील पोरं. मंग आपला पण नाविलाज आहे… माझी काळजी करू नकोस. रोज तालमीत जातूया. बाप पैलवान होता माजा. माझा जीव वाचवता येतंय मला… जमलंच तर दोन चार रट्टे मीबी घालीन. “

…. म्होरक्याला अक्कल आली. शब्दांचा मार पुरला. प्रकरण मिटलं.

– – तेव्हापासून गाडीत कुठल्याही पोरीला कधीही, कसलाच त्रास झाला नाही.

.. राजूचा दराराच होता तसा. तो स्वतः रहायचाही अपटूडेट. मस्त इन केलेला शर्ट. पाॅलीश्ड बूट. केसांचा मस्त भांग. इस्त्री केलेला युनिफॉर्म.

‘ एवढ्याशा पगारात कसं काय परवडतं ?’ नाहीच परवडत….

“सौतासाठी नाही, यष्टीसाठी आपण अपटूडेट रहायला हवं. प्रवाशी खूष झालं, तर यष्टीचा इन्कम वाढणार. “

.. पदरमोड करून राजू बरंच काही करायचा. सहा वाजता गडी हजर व्हायचा. डेपो गाठून, गाडीची साफसफाई करून घेणार. स्वतःच्या खर्चाने, गाडीला पडदे लावून घेतलेले. ते वेळच्या वेळी धुवून आणायचा. सीडीप्लेयर लावलेला. चार ताजे पेपर, मासिकं. प्रवाशांना वाचण्यासाठी. गाडीत साईबाबांचा फोटो लावलेला. त्याला मस्त हार घालणार. उदबत्ती लावणार. छान भक्तीगीतांची सीडी लावणार. प्रसन्न वाटायचं. पब्लिक खूष.

 

त्याच्यामुळे मीही बदललो. मीही त्याच्यासारखाच अपटूडेट राहतो. पावणेसातच्या ठोक्याला गाडी फलाटावर लागते. सात म्हणजे सात… गाडी झोकात कराड स्टॅन्डहून निघते. प्रवाशांनी खचाखच भरलेली.

…. साहेब, तुम्हाला सांगतो, आमच्या गाडीची या रूटवर बुंगाट हवा आहे. लोक वाट बघत असतात आमच्या गाडीची. डेपोला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देते ही गाडी. निम्मे प्रवाशी आम्हाला दोघांना ओळखतात. पब्लिक जाम खुष आहे आमच्यावर.

म्हणून तर…

साडेपाच वर्ष झाली. आमची ड्युटी फिक्स आहे या गाडीवर.. राजू अन् मी. सख्खे भाऊच जणू.

तेरा मेरा साथ.. आणि आमची कराड – चिपळूण. जाऊ दे जोरात…

आजच काय झालं ? एक तर तेरा तारीख. तसा माझा विश्वास नाही. पण..

…. खूप वेळ राजूची वाट बघितली. खूप वेळा मोबाईल ट्राय केला. उचललाच नाही. शेवटी कंट्रोलरनं बदली कंडक्टर दिला. अन् निघालो..

गाडी नेहमीसारखीच झोकात चाललेली. पण गाडीत ‘जीव’ नव्हता.. नेहमीच्या प्रवाशांनी राजूची आठवण काढली.

काय सांगणार ? आम्हालाच ठावूक नाहीये.. बघता बघता पाटण जवळ येवू लागलं. अचानक माझा फोन वाजला. गाडी साईडला घेवून थांबवली.

कंट्रोलरचा फोन.

” आरं, राजूचा एक्सीडेंट झालाय. ड्यूटीवर येताना गाडी स्लीप झाली. डोक्याला मार लागला. अजून बेसुध आहे. काॅटेजला हलवलाय. “

– – मी हादरलो. थांबून चालणार नव्हतं. डोकं बाजूला काढून ठेवलं. उघड्या डोळ्यांनी, गाडी चालवू लागलो. नेहमीसारखा कुंभार्ली ओलांडला. गाडी चिपळूणात शिरली. अकरा वाजलेले. गाडी फलाटावर लावली. भानावर आलो… 

…. ड्रायव्हरचा ‘माणूस’ झालो. नवीन जोडीदारास म्हणलं,

” तू घे जेवून. मी आलो डेपोत जावून. “

चिपळूण डेपोत गेलो. दत्तमंदिरात शिरलो.

” दत्तगुरू, सांभाळून घ्या.

आमच्या राजूला बाहेर काढा या संकटातून. “

अर्धा पाऊण तास झाला असेल. मला वेळेचं भानच नव्हतं. तसाच दत्तगुरूंपुढे बसलेलो. हातात डबा होता.

हिनं राजूभाऊजींसाठी, खास मटकी डब्यात दिलेली. अन् त्याचाच पत्ता नाही.

फोनची रिंग वाजली. दत्तगुरूंचं स्मरण करत, फोन उचलला.

राजूचा भाऊ फोनवर… 

” सुद्धीवर आले हाईती. शीटीस्कॅन केलं. रिपोर्ट चांगले हाईती. धा टाकं पडलं कानामागं. मगाधरनं मागं लागल्याती. आप्पाला फून लावून द्या म्हणूनशान. घ्या बोला त्याच्यासंगट. “

…. माझे डोळे कुंभार्लीतला धबधबा झालेले. बदाबदा वाहू लागले.

राजू खोल आवाजात बोलू लागला.

” आप्पा करमतंय काय ? आज तारीख काय ?”

“ तेरा सात “.

“ आरं, तेरा साथ असा सोडीन काय ? टाकं काढलं की येतू ड्यूटीवर. तोवर सांभाळून घे. “

…. मला पुढे बोलताच येईना. फोन कट केला. आजची तेरा तारीख मला एकदम ‘शुभ’ वाटू लागली.

पुन्हा एकदा दत्तगुरूंचे आभार मानले. जेवून घेतलं. एक वाजता जोडीदारानं, डबल बेल मारली.

” चिपळूण – कराड” निघाली.

.. कधी एकदा कराडला पोचेन असं झालेलं. हायवेला लागलो.

पुढचा ट्रक… त्याच्या पाठीमागे लिहलेलं.

13 मेरा 7

मी मनात म्हणलं…

” हमेशा रहेगा. राजू आलोच रे मी. “

तुम्हालाही… 13/7…. Have a good day!

(कथा काल्पनिक)

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares