☆ “आठवणी अंगाराच्या” – लेखक : विश्वास विनायक सावरकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आठवणी अंगाराच्या
लेखक : विश्वास विनायक सावरकर
पृष्ठे : १९८
मूल्य : ३००₹
आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे – –
तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.
त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.
त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.
तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.
वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.
– – लेखक विश्वास सावरकर
एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.
या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय. ‘
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज..’ – मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
(The Hidden Life of Trees)
मूळ जर्मन लेखक : पीटर वोलेबेन (Peter Wohlleben)
मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर
हे एक अत्यंत रंजक आणि डोळे उघडणारं पुस्तक आहे. आपण झाडांना फक्त लाकूड किंवा सावली देणाऱ्या निर्जीव वस्तू समजतो, पण हे पुस्तक झाडांच्या एका विलक्षण आणि गूढ जगाची सफर घडवून आणतं.
पुस्तकाचा मूळ गाभा आणि विषय
पीटर वोलेबेन यांनी आपल्या अनेक वर्षांच्या वनपाल (Forester) मधील अनुभवावरून हे पुस्तक लिहिले आहे. झाडं केवळ उभी नसतात, तर ती एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्यातही ‘भावना’ असतात, हे त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.
प्रमुख आकर्षणे
झाडांचे सामाजिक जाळे हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. जंगलातील झाडं जमिनीखालील बुरशीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेली असतात. या नेटवर्कद्वारे ती अन्न, पाणी आणि धोक्याचे संदेश एकमेकांना पाठवतात.
एकमेकांना मदत करणे
जर एखादे झाड आजारी असेल किंवा त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर शेजारील झाडं त्याला मुळांद्वारे पोषण पुरवतात.
मातृवृक्षाची भूमिका करतात. जंगलातील सर्वात जुनी आणि मोठी झाडं ही ‘आई’ सारखी काम करतात. ती आपल्या लहान रोपट्यांचे संरक्षण करतात आणि त्यांना वाढण्यास मदत करतात. इतके दिवस माणसे, प्राणी हेच फक्त असे करतात असे वाटत होते.
धोक्याची सूचना देणे
एखाद्या झाडावर कीटकांचा हल्ला झाला, तर ते झाड हवेत विशिष्ट गंध सोडते. हा गंध ओळखून आजूबाजूची झाडं स्वतःच्या पानांमध्ये विषारी द्रव्ये तयार करतात जेणेकरून कीटक त्यांना खाणार नाहीत.
पुस्तकाची बलस्थाने
सोपी आणि ओघवती भाषा! लेखकाने अत्यंत गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय (उदा. वनस्पतीशास्त्र) अगदी साध्या आणि रंजक भाषेत मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकालाही ते सहज समजते.
संवेदना जागृत करणारे हे पुस्तक वाचल्यानंतर झाडांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. झाडं ही सजीव आणि सामाजिक प्राणी आहेत, याची जाणीव तीव्रतेने होते.
वैज्ञानिक पुरावे
लेखकाने केवळ काल्पनिक गोष्टी सांगितलेल्या नाहीत, तर प्रत्येक दाव्याला विज्ञानाचा आणि संशोधनाचा आधार दिला आहे.
– – काही समीक्षकांच्या मते, लेखकाने झाडांचे खूप जास्त ‘मानवीकरण’ केले आहे. म्हणजे झाडांना माणसासारख्या भावना असतात (जसे की दुःख, आनंद, भीती) हे मांडताना वैज्ञानिक भाषेऐवजी लेखकाने काहीशी भावनिक भाषा वापरली आहे. पण ते आवश्यक वाटते. त्यामुळे झाडांच्या भावना अधिक प्रभावीपणे लक्षात येतात.
पुस्तकात काही मुद्दे परत परत आले असले तरी ते त्या ठिकाणी आवश्यक वाटतात.
‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ हे केवळ निसर्गप्रेमींसाठीच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने एकदातरी वाचायला हवे असे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला निसर्गाशी पुन्हा जोडते आणि पर्यावरणाचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे पटवून देते.
थोडक्यात सांगायचे तर, जर निसर्गाची रहस्ये जाणून घ्यायला आवडत असतील आणि एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर जेव्हाही एखाद्या जंगलातून किंवा झाडांच्या जवळून जायची वेळ येईल, तेव्हा त्यांच्यातील शांत संवाद नक्कीच जाणवेल.
हे पुस्तक वाचून जंगलात जाण्याची तीव्र इच्छा होते. आपण ज्या नैसर्गिक हालचाली समजतो, किंवा वाऱ्याने हलणे समजतो, त्यामागील अर्थ हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतात. फारच छान पुस्तक आहे.
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘स्वभाव – विभाव ’ – लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : स्वभाव – विभाव
लेखक: डॉ. आनंद नाडकर्णी
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव’ हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्रासारखा गंभीर विषय सामान्य माणसाला समजेल अशा रसाळ भाषेत मांडलेला एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. माणसाचा स्वभाव कसा घडतो आणि त्यात बदल करणे शक्य आहे का, यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.
पुस्तकाचा गाभा म्हणजे स्वभाव आणि विभाव
डॉ. नाडकर्णी यांनी या पुस्तकात मानवी व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत.
स्वभाव म्हणजे जी आपली मूळ वृत्ती आहे, जी आपल्याला अनुवंशिकतेने किंवा संस्कारांनी मिळते.
विभाव म्हणजे स्वभावाचे प्रकटीकरण किंवा आपण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद.
शास्त्रीय मांडणी: लेखकाने यात ‘REBT’ (Rational Emotive Behavior Therapy) म्हणजेच ‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’चा आधार घेतला आहे. क्लिष्ट मानसशास्त्रीय संज्ञा न वापरता अत्यंत सोप्या उदाहरणांतून त्यांनी मानवी मनाचा नकाशा मांडला आहे.
स्वयंमदतीसाठी मार्गदर्शक असणारे हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, तर ते ‘कृती-प्रवण’ आहे. स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखून ते कसे सुधारता येतील, याचे मार्गदर्शन यात मिळते.
नात्यांची समज उलगडून दाखवताना केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचा स्वभाव समजून घेतल्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील तणाव कसे कमी होतात, हे यात प्रभावीपणे सांगितले आहे.
पुस्तकात काही काल्पनिक पात्रांच्या संवादांतून प्रश्न-उत्तर स्वरूपात विषय मांडला आहे, ज्यामुळे वाचक त्या विषयाशी सहज जोडला जातो.
*पुस्तकाची बलस्थाने*
ओघवती भाषा: डॉ. नाडकर्णी स्वतः एक उत्तम लेखक आणि नाटककार असल्याने त्यांची मांडणी नाट्यात्मक आणि ओघवती आहे.
वास्तववादी दृष्टिकोन: स्वभाव पूर्णपणे बदलता येत नाही, पण तो ‘मॅनेज’ करता येतो, हा व्यावहारिक विचार लेखकाने दिला आहे.
दैनंदिन उदाहरणे: राग, भीती, मत्सर, न्यूनगंड यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुस्तकातील उदाहरणे खूप उपयुक्त ठरतात.
निष्कर्ष
“आपण जसे आहोत, तसेच आपण का आहोत?”
या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येकाने ‘स्वभाव-विभाव’ वाचायला हवे. स्वतःला बदलण्याची इच्छा असलेल्या आणि मानसिक स्वास्थ्य जपणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एका ‘दीपस्तंभा’सारखे काम करते.
जर स्वतःच्या वागण्यातील ‘पॅटर्न’ समजून घ्यायचा असेल आणि आयुष्यात अधिक समतोल हवा असेल, तर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे.
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दोन पुस्तके – १) “ कथा धार्मिक प्रथांच्या “ २) “ जीवनप्रवास – लेखक : प्रा. देवबा पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
दोन पुस्तके : १. कथा धार्मिक प्रथांच्या २. जीवनप्रवास
लेखक. : प्रा. देवबा शिवाजी पाटील. खामगाव.
९४२०७९५३०७
प्रकाशक. : १. नावीन्य प्रकाशन, पुणे
२. कृष्णायन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या. : ७८, १२०
किंमत. : रु. १५०/. व रु. २००/- अनुक्रमे
कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.
प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये काव्यसंग्रह, धार्मिक रचना, देशभक्ती, निसर्ग, स्त्री विषयक काव्य, कथासंग्रह, बालकुमार व युवा साहित्य अशा विविधांगी साहित्याचा समावेश आहे. धर्म, परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून कुमारांना समजेल असे लेखनही त्यांनी केले आहे. नुकतीच त्यांची दोन पुस्तके वाचनात आली. या पुस्तकांचा वाचकवर्ग भिन्न असला तरी लेखकाची मूळ विचारधारा पक्की असल्याने, एकाच नदीचे दोन प्रवाह वाहत असावेत तसे हे लेखन झालेले दिसते. पहिले पुस्तक आहे ‘ कथा धार्मिक प्रथांच्या ‘ व दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास ‘. या दोन्ही पुस्तकांना स्वतंत्रपणे समजून घेऊ.
१)कथा धार्मिक प्रथांच्या
हे पुस्तक बाल व किशोर वयोगटातील वाचकांसाठी आहे. त्यामुळे आपण वाचावे की नाही असा संभ्रम पडतो. पण काही पाने वाचल्यावर लक्षात येते की यातील खूपसे आपल्यालाही माहित नाही. म्हणजे विषय समजून घेण्याच्या बाबतीत आपण अजून ‘ बाल ‘ च आहोत. त्यामुळे फक्त बालकांनीच नव्हे तर पालकांनीही वाचावे असे हे संस्कारक्षम पुस्तक आहे.
या पुस्तकात रत्ना हे तेरा चौदा वर्षांच्या मुलीचे मध्यवर्ती पात्र आहे. ती हुशार व जिज्ञासू आहे. त्यामुळे तिला सारखे प्रश्न पडत असतात. या प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवीत. ती माहिती न कंटाळता द्यायला हवी. हे काम करते रत्नाची आजी. रत्ना आणि तिची आजी यांच्यातील प्रश्नोत्तरातून घडणारा संवाद म्हणजे या ज्ञानदायी कथा !
कोणते प्रश्न पडतात बरे रत्नाला ? रोजच्या जीवनात ती जे पाहते, कुटुंब व समाजात जे जे दिसते त्या सर्वाविषयी तिला प्रश्न पडत असतात. धार्मिक आचरण करत असताना केवळ परंपरा म्हणून आचरण न करता त्यामागचे शास्त्र व विज्ञान समजून घेतले पाहिजे हे अत्यंत तळमळीने सांगण्यासाठी लेखकाने हा शंका निरसनाचा मार्ग निवडला आहे.
रत्नाला जे समजत नाही ते ती विचारते आणि तिला मिळणा-या उत्तरातून आपले ज्ञान वाढत जाते. उपासना म्हणजे काय ? स्तोत्रे, आरत्या का म्हणायच्या ? संकल्पयुक्त पूजा कशी असते ? देवाचा प्रसाद का घ्यायचा ? गोमूत्र, गोमाता, सडा, रांगोळी, स्वस्तिक, फुले, दुर्वा, सुपारी, बेल इत्यादी विषयीं तिला कुतूहल आहे. त्यामुळे ‘ हे सर्व कशासाठी ? हा प्रश्न तिला पडतो. यासारख्या शंका दूर करतानाच लेखकाने शंख, शंखध्वनी, कापूर, समई, श्रीफळ, प्राणप्रतिष्ठा,
मंदिरातील कासव, नंदी, घंटा, आचमन, अशा धार्मिक क्रियांशी संबंधित अनेक वस्तू व प्रथा यांचे वैज्ञानिक संबंध समजावून दिले आहेत. यावरुन आपल्या लक्षात येईल की धार्मिक प्रथांच्या या संबंधी सर्वांच्याच मनात ज्या शंका असतात किंवा काही प्रमाणात अज्ञान असते ते नात व आजीच्या संवादातून दूर होते.
म्हणूनच हे पुस्तक फक्त बालकांचे नसून पालकांचेही आहे. कुटुंबातील सर्वांनी संवाद साधून समजून घ्यावे असे हे पुस्तक आहे.
२) प्रा. पाटील यांचे दुसरे पुस्तक आहे ‘ जीवनप्रवास‘.
जीवन प्रवास हा ललित लेख संग्रह हातात घेण्यापूर्वी प्राध्यापक देवबा पाटील यांचा आणि माझा काहीही परिचय नव्हता. त्यांनी विविध प्रकारचे विपुल लेखन केलेले असले तरी माझ्या वाचनात ते फारसे आलेले नव्हते. परंतु जेव्हा जीवनप्रवास हा लेखसंग्रह माझ्याकडे आला आणि तो मी वाचायला वाचायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्राध्यापक पाटील हे जीवनाकडे अत्यंत गंभीरतेने आणि सूक्ष्मतेने पाहणारे लेखक आहेत. वाचन, मनन आणि चिंतन या तीनही पायऱ्या पार केल्या नंतर सरस्वतीच्या मंदिरात त्यांनी शब्दांची जी पूजा आरंभली आहे ती अत्यंत विलोभनीय आणि सर्व वाचकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. विचार प्रवर्तक, बोध प्रधान, स्फूर्तीदायक लेखांचा हा संग्रह म्हणजे लोकांना उपदेश करण्याची भूमिका नसून उलट आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे, जे काही विचारांचे संचित आहे ते इतरांना वाटून द्यावे एवढा एकच उद्देश त्यांनी आपल्या सर्व लेखनामागे ठेवला आहे त्यामुळे ‘शहाणे करून सोडावे सकल जन ‘ हीच त्यांची भूमिका आहे.
या लेख संग्रहातील पहिला लेख ‘जीवन प्रवास ‘ या शीर्षकाचा आहे. या लेखाचे बारकाईने वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल की जीवन जरी एकच असले तरी त्याकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन किती भिन्न भिन्न प्रकारचा असू शकतो. जीवनाला ते ओबडधोबड रस्ता म्हणतात तर त्याच जीवनाला त्यांनी धुळीने बरबटलेला रस्ता असेही म्हटले आहे. हा रस्ता चालल्यानेच संपतो. थांबण्याने नाही. रस्ता चुकला तरी आंतरिक विवेकशक्ती माणसाला योग्य मार्गावर आणून सोडते. आपल्या अंगावर धूळ उडणार नाही याची काळजी घेऊन रस्ता चालत राहायचे असते. जीवनाकडे ते अनेक दृष्टीने पाहतात. कधी जीवन त्यांना आगगाडी वाटते, तर कधी जीवन म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे असे वाटते. माणूस आशेच्या रुळावरून धावत असतो, निराशेचा धूर सोडत असतो आणि सहानुभूतीच्या स्टेशनवर थांबत असतो. बुद्धिबळातील सोंगट्यांप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरुष आपापल्या आखून दिलेल्या मार्गाने प्रवास करत असतात त्यांना त्यांच्या मर्यादा ही महित असतात. जीवनात प्रतिकूल आणि अनुकूलतेच्या लाटा येतच असतात. त्यामुळे जीवन हे सागरा सरखे आहे असे लेखकाला वाटते. आयुष्यभर तडजोड करत करत जीवन जगावे लागते. त्यामुळे कधी ते तारेवरची कसरत आहे असे वाटते. परंतु त्याच वेळेला जीवन हा एक रंगत जाणारा खेळही आहे. कधी आक्रमक व्हायचे, कधी माघार घ्यायची याचे भान ठेवून खेळल्यास हा खेळ रंगत जातो. सकारात्मकता आणि आशावादी दृष्टिकोन, सामुदायिक जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव, संकटांना सामोरे जाण्याची तयारी, जीवनाचा उद्देश ओळखून तो गाठण्याची तयारी या सर्वावर जीवनाचे यश अवलंबून असते. तीन खंडांच्या या जीवन पुस्तकातील प्रत्येक खंड महत्त्वाचा असतो. आपला स्वच्छ व सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनातील आनंद टिपत जाण्याची वृत्ती यावरच या तीनही खंडांचे यश अवलंबून असते. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा हा व्यापक दृष्टिकोन उपदेशात्मक नसून मित्रत्वाच्या नात्याने केलेला सुसंवाद आहे असे म्हटले तर अगदी योग्य ठरेल.
आयुष्यातील कर्तव्य कर्म याविषयी ही लेखकाने विचार व्यक्त केले आहेत. कर्तव्य आणि हक्क सदैव सोबतच चालत असतात. प्रत्येकाला कर्तव्ये ही करावीच लागतात. जबाबदारी पेलावी लागते. परंतु कर्तव्य पालन करत असताना ईश्वराचे स्मरण ठेवून केले गेले तर हे देवाचेच काम आहे ही श्रद्धा मनात उत्पन्न होऊन कर्तव्य अगदी सहजपणे पार पाडले जाते. प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कर्म केले तर आपल्या कर्माचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत हे प्रत्येकाने जाणून असावे.
प्रयत्न व कष्ट हा प्रत्येकाच्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे असे ते म्हणतात. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. यासाठी त्यांनी मुंगी, मधमाशी, छत्रपती शिवाजी महाराज अशी वेगवेगळी उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटवून दिला आहे. परंतु आंधळेपणाने कष्ट न करता कामाचे व आपल्या उद्दिष्टाचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. कामाच्या सूत्रबद्ध आराखडा असेल आणि आपल्या कामावर आपली श्रद्धा असेल तर यश नक्कीच मिळते. काम करण्याची वृत्ती असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अनुभव आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालून आणि मेंदूला सतत ताजेतवाने ठेवून आनंदाने कष्ट करत गेल्यास यश हे हमखास मिळतेच.
या ठिकाणी पहिल्या काही प्रकरणांविषयी सविस्तरपणे लिहिले आहे. उद्देश एवढाच की प्रा. पाटील यांचे लेखन किती वैचारिक आहे व वाचकांना ते कसे उपयुक्त ठरु शकते याची कल्पना यावी. यापुढील सर्व प्रकरणे ही जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पाडणारी आहेत. माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू, त्यातील गुणदोष, मनोबल व चारित्र्य यांचे महत्त्व, सद्वर्तन व सद्विचार यांची आवश्यकता, मैत्री, पैसा, ताणतणाव, वाचन, मानसिक व शारीरिक आरोग्य व विश्रांती, धर्म, श्रद्धा, पूजा, प्रार्थना, समाजशीलता अशा सर्व बाजुंनी जीवनाविषयी विचार करून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत ते व्यक्त करण्यात प्रा. पाटील यशस्वी झाले आहेत. या शिवाय एका प्रकरणात त्यांनी जीवनोपयोगी गोष्टींची चर्चाही केली आहे.
प्रत्येक लेख वाचताना लक्षात येते की त्या त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करुन मग लेख लिहिलेला आहे. उदाहरणार्थ, ‘ मनाचे सामर्थ्य ‘ हा लेख पाहू. हा लेख लिहीताना मन म्हणजे काय, मेंदूची कार्यपद्धती कशी असते, मन प्रसन्न का असले पाहिजे, मनाचा शरीराशी काय संबंध आहे, अंतर्मन व बहिर्मन म्हणजे काय, ते कसे कार्य करते, मन आणि विचार, इच्छाशक्ती यांचा काय संबंध आहे, मनाची चंचलता, मनाचा वेग तरीही ती एक शक्ती कशी आहे, अशा सर्व बाजुंनी मनाचा विचार करुन मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी काय करता येईल या विषयीही त्यांनी चर्चा केली आहे. अन्य लेखांच्या बाबतीतही असेच अभ्यासपूर्ण लेखन दिसून येते.
प्रा. पाटील यांच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखणीतून सुविचाराप्रमाणे अनेक चांगली वाक्ये बाहेर पडली आहेत. संकटे ही पुरुषार्थाची संधी असतात, कर्तव्य हा शास्त्राचा धर्म आहे तर प्रेम हा अंत:करणाचा धर्म आहे, सदाचाराविना जीवन म्हणजे होकायंत्राविना प्रवास करणारे जहाज, मैत्री म्हणजे सहवासाची सुरेल मैफिल असते, नशिबाचे कुलूप उद्योगाच्या किल्लीनेच उघडते यासारखी वाक्ये त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन घडवतात.
‘जीवनप्रवास ‘ हा लेख संग्रह तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त ठरणारा आहे. किंबहुना जीवनाचा प्रवास करणा-या प्रत्येकाने क्षणभर थांबून, या संग्रहातील लेखांचे वाचन करुन पुन्हा प्रवास चालू ठेवला तर पुढचा प्रवास अधिक सुखकर होईल यात शंकाच नाही.
‘कथा धार्मिक प्रथांच्या ‘ आणि ‘ जीवनप्रवास ‘ ही दोन्ही पुस्तके वाचकांच्या ज्ञानात भर घालून सद्विचाराला प्रवृत्त करणारी आहेत.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ऐवज एक स्मृतिबंध” – लेखक : अमोल पालेकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
०`पुस्तक : ऐवज एक स्मृतिबंध
लेखक : अमोल पालेकर
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे
संपर्क : ८०८७२८८८७२
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे हे आत्मचरित्र वाचायला घेतले तेव्हा वाटले होते की, या चरित्रात त्यांच्या चित्रपटीय आणि नाटकीय आयुष्यात घडलेल्या घटनांची तसेच पडद्यामागच्या अनेक गोष्टींची चटकदार माहिती आपल्याला वाचायला मिळेल. पण पालेकरांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट आणि नाटकांनी जसे धक्के दिले तसेच या पुस्तकाने पालेकरांचा एक वेगळाच पैलू समोर आणला. जी सृष्टी माणसाला प्रसिद्धी वलयात गुंगवून टाकते त्या सृष्टीत राहून प्रसिद्धीचा झोत सातत्याने असूनही जमिनीवर राहून विचार करणारी अमोल पालेकरांसारखी माणसे थोडीच असतात, असे हे पुस्तक वाचून लक्षात आले. प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करत प्रेक्षकानुनयापासून दूर राहत ते त्यांचे मनवांच्छित काम करत राहिले. म्हणूनच जगराहाटीपेक्षा वेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि नाटक करण्याचे धाडस त्यांच्या अंगी आले. हे करत असताना वेळोवेळी त्यांनी स्वतःचेही परखड आत्मपरीक्षण कसे केले ते खालील परिच्छेदावरून स्पष्ट होते.
“मी कोण हा प्रश्न अॅरिस्टॉटल, फ्रॉईड, देकार्त (Aristotle, Freud, Descartes) ह्यांसारख्या विचारवंतांपासून ते पार विसाव्या शतकातल्या ‘4E दृष्टिकोना ‘पर्यंत तत्त्वज्ञ, मानसतज्ञ, साहित्यिक अशा अनेकांनी, तसंच विचार करू शकणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाने किसून काढला आहे. मीही त्यातलाच एक! आत्मभान ते 4Es (embodied, embedded, enactive & extended cognition) म्हणजेच जगताना नेणिवेमध्ये शोषला गेलेला भोवताल डचमळून वर येताना, स्वतःच्या जागृत अवस्थेत मिसळत ‘मी’ स्वतः बनतो. माझी ‘जाणीव-नेणिवेतली समज’ ते ‘माणसं परिसर निर्जीव गोष्टींशी संलग्न असलेलं माझं अस्तित्व’, अशा दोन प्रवाहांच्या निर्मितीला ऐंशी वर्षांचा मी साक्षीदार आहे. मार्क्स-लेनीन यांनी संबोधलेलं ‘वस्तुनिष्ठ वास्तव’ असो वा सार्थच्या अस्तित्ववादात संबोधलेल्या ‘मानवी आकस्मिकता’ असोत, त्या सगळ्यासकट ‘मी’ तयार झालो आहे. “
“या सगळ्या परिसरात ‘मी’ चाचपडत असतो. त्या चाचपडण्याची जाणीव होते, विशेषतः एखाद्या रात्री झोप लागली नाही की अंधारात स्वतःकडे बघत असताना! म्हणजे मी आडवा पलंगावर – नजर वर छताकडे; त्याच छतावर मला उलटा करून समांतर तरंगत ठेवला – नजर माझ्या शरीराकडे. माझ्याकडे बघत तरंगणाऱ्या माझ्या शरीराला जितका ‘मी’ समजलो असेन तितका कदाचित मला स्वतःलाही समजलेला नाही. उलटसुलट विचार, पानी-कम-चायच्या चालीवर कौतुक-कम-टीका, भीती, असुरक्षितता, आनंद, प्रेरणा, नैराश्य, गडद, फिका आणि त्याच्या अधलंमधलं सगळं… काय काय त्याने टिपलं असेल माझ्यातलं!”
“सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातले बदल घडत असताना तो निरखत असेल. भोवताल बदलत राहतो तसा मीही बदलत राहतो. मला मात्र बदल होत असताना पकडता येत नाहीत. काही वर्षांनी मागे वळून पाहताना कधीकधी झालेले बदल लक्षात येतात. सतत सावध असणं वा राहावं लागणं हा शाप आहे माझ्या मते. त्या जागृत अवस्थेतून आलेली अस्वस्थता, भीती शरीरासोबत गारठून जाते. त्याच अस्वस्थतेतून रात्री डचमळ होत राहते. विशेषतः मागच्या दशकात गारठून राह्यलेली अस्वस्थता विरघळतच नाही… I feel I’m fossilized. आजूबाजूला इतकं सगळं बदललंय म्हणजे रस्ते-पूल उड्डाण मार्ग इमारती-बोगदे; तशीच माणसं मला माहीत असलेली, नसलेली, जवळची, लांबची, न दिसणारी… सगळीच बदललेली. जहरी, विष प्यायलेली माणसं नंगानाच घालत आहेत; ते विष दुसऱ्याकडे नुसतं बघूनही पसरत जातंय… एखाद्या साथीच्या विषाणूसारखं. माझ्यात ते शिरू शकत नाही कारण मी स्वतःला जपतो आहे, माझ्याभोवतीचा तो बर्फ अजूनतरी अभेद्यच राह्यला आहे. पण माझी आतली घुसमट इतकी विलक्षण आहे की माझ्यातल्या उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडमुळे माझ्याच ठिकऱ्या होऊन मी बर्फाबाहेर येईन असं वाटण्याइतकी वेळ आली आहे. “
“एवढं कसं काय सगळं बदललं? का बदल जोखण्यात मी नाकामी राह्यलो? चाकूने भोसकून, खून करून पाण्यात लोटून दिलेल्या प्रेतातून लाल रक्त पृष्ठभागावर पसरत राहावं, तसा पाण्याचा लांबवर पसरलेला पृष्ठभाग केशरी दिसतोय. तो पसरत सगळी झाडं, डोंगर, दऱ्या, आभाळ एकरंगी करत समुद्राकडे झेपावतोय. पंचमहाभूतंच केशरी झाली तर माझ्या ठिकऱ्या होणंच इष्ट. मात्र त्या ठिकऱ्या काळ्या रंगाच्या असू देत. संपतानाही निषेधाची नोंद घेतली जावी – इतिहासाने नाही तरी तरंगत माझ्या पार्थिवाकडे बघत असलेल्या ‘तो’ने!” (पृष्ठ क्रमांक ८९-९०)
सोपं नसतंच असं स्वतःचं परखड निरीक्षण करून स्वतःला सोलण्यात! महात्मा गांधींनी जसे सत्याचे प्रयोग केले आणि स्वतःविषयीचं नागडं सत्य जगासमोर ठेवलं, त्याचप्रमाणे या पुस्तकात पालेकरांनी स्वतःविषयी पडखड परीक्षण करून त्यांच्या कमतरतांनाही तेवढ्याच निरपेक्षपणे जगजाहीर केलं आहे. हे पुस्तक नुसतेच स्मरणरंजन नसून एका सामान्य माणसाचा उत्तुंग व्यक्तिमत्वात रुपांतरीत होत जाणारा वैचारिक प्रवास आहे. वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कुठलाही आडपडदा न ठेवता तेवढ्याच स्वच्छपणे मांडणे हे क्वचितच आत्मचरित्रांमध्ये दिसून दिसून येते. हे इंद्रधनुष्य अमोल पालेकर यांनी या पुस्तकात लीलया पेलले आहे. त्याबद्दल त्यांना standing ovation च द्यायला हवे. वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही, बोजड वाटणार नाही, शब्दबंबाळ होणार नाही आणि पाल्हाळीकही वाटणार नाही, एवढ्या कुशलतेने एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे अशा पद्धतीने हे चरित्र उठावदार झालेले आहे. अमोल पालेकरांनी त्यांचे विचार एवढ्या अप्रतिमरीत्या शब्दबद्ध केलेले आहेत की प्रत्येक वाचकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लक्ष्मी पांडा यांची कथा ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील (INA) सर्वात लहान वयाच्या गुप्तहेराची (spy) थरारक आणि सत्य कहाणी आहे.
दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेश होरपळून निघत असताना चौदा वर्षांची लक्ष्मी तिच्या आई-वडिलांना गमावते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला भारताला स्वतंत्र करण्यासाठी, अथक प्रयत्नांनंतर ती आझाद हिंद फौजेच्या ‘झाशीची राणी’ पलटणीत भरती होते… वयाने सगळ्यात लहान सैनिक म्हणून…!
ही धाडसी मुलगी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल हेर होण्यापर्यंत मजल मारते. लहानखुऱ्या चणीची लक्ष्मी आपल्या हुशारीच्या जोरावर, अनेक अडथळे पार करत ब्रिटिशांच्या छावणीपर्यंत पोचते…महत्त्वाची माहिती गोळा करण्याच्या मोहिमेवर…!
या मोहिमेत ती कधी मोठ्या संकटांतून वाचते, तर कधी तिला अत्यंत भीतिदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण ती देशासाठी लढत राहते…
या प्रवासात तिला स्वतःच्या खंबीरपणाची, चिवटपणाची आणि धाडसाची नव्यानेच ओळख होते…
काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वयाने सर्वात लहान हेराची, तिच्या धाडसाची, तिच्या त्यागाची, तिच्या संघर्षाची…
लक्ष्मी पांडा हिची प्रेरक कहाणी…
ही कथा एका अशा विस्मृतीत गेलेल्या नायिकेची आहे, जिने बालपणीच युद्धाची भीषणता अनुभवली आणि देशासाठी स्वतःला वाहून घेतले.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आजकाल मला मोबाईल वरच्या वाचनाचा खूप त्रास होतो. त्यामुळे मी लायब्ररी लावली. मी या वेळेला पुस्तक बदलायला गेले तो उज्वलाताई केळकर यांनी अनुवाद केलेले ‘कण कण जीवन’ हे पुस्तक दिसले. दिसल्याबरोबर मी उचलले. खरोखर अप्रतिम कथांचा अनुवाद केलेला आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखकाची प्रत्येक लघुकथा उत्तम आहे. उज्वलाताईंच्या कथा सुद्धा अतिशय उत्तम आहेत.
उज्ज्वला केळकर
वाचन सुरू असताना कामासाठी उठल्यानंतर मध्ये पुस्तक खाली ठेवून देखील वाचता येतं त्यामुळे मला कथा संग्रह नेहमीच खूप आवडतो.
या संग्रहाची सुरुवात घनश्यामजी अग्रवाल यांच्या कथांनी झालेली. खरंच प्रत्येकच कथा छानच आहे. नमुन्या दाखल एक कथा सांगते, ‘ तिचा आतला आवाज’.
– – – डॉक्टरी इलाज पूजापाठ गंडेदोरे करून थकलेलं जोडपं शेवटी अनाथालयात मुलगा दत्तक घ्यायला जाते. एक मूल ते जोडप्याला आवडतं. मॅनेजरही म्हणतो की मुलगा खूप छान आहे घ्या तुम्ही दत्तक! काही दिवसांपूर्वी एक जोडपं इथे आले होते. त्यांना पण हे बाळ खूप आवडले होतं मुलात कुठलीच खोट नव्हती त्याला घेऊन जाणारच होते परंतु त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पत्नी गर्भवती आहे त्यामुळे दत्तक घेतले नाही. दत्तक घेता घेता या जोडप्याला पण आशा वाटते टशकी कदाचित आपलं पण असंच होईल. आणि ते दत्तक घ्यायचं तात्पुरतं रहित करतात व त्या मॅनेजरला सांगतात की आम्ही पण हेच मूल घेणार. पण एक महिन्यानंतर! कारण त्यांना पण आशा वाटलेली असते की या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवल्याबरोबर आपल्याही घरात मूल येऊ शकेल याची. परंतु तसं काही घडत नाही आणि शेवटी ते त्या मुलाला दत्तक घेतात आणि त्या आईचा आतला आवाज मात्र सांगत असतो की मी याची खरी आई नाहीये कारण तसं असतं तर मी स्वतःचे मूल होण्याची आशा वाटली होती त्याही वेळेला या मुलाला दत्तक घेऊनच घेतले असते. अशा प्रत्येकच कथेतून खूप काहीतरी सांगितलेलं आहे. सगळ्याच कथा खूप छोट्या असल्या तरी देखील! त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवतात.
त्यानंतर, ‘भावना वर्मा सरकार’, ‘रामनिवास मानव’, ‘अतुल मोहन प्रसाद ‘, डॉ. राजेन्द्र साहिल, ”नज्म सुभाष, ‘ सिमर सदोष ‘, राजेंद्र परदेशी, श्रीराम ठाकूर दादा, वीरेंद्र नारायण या सर्वांच्याच कथा अतिशय उत्तम! या सर्वांच्याच कथांमधून मानवी स्वभावाचा एक एक स्वार्थी पैलू उलगडलेला आहे. कथा खूप छोटी परंतु आशय मोठा घेऊन येणारी अशी प्रत्येकच कथा आहे. या प्रत्येक कथेमधून मोठी कथा जन्माला येऊ शकेल इतकं सार त्या कथांमध्ये भरलेलं आहे. पूर्ण पुस्तक मुळातूनच वाचायला हवं. कथा कितीही सुरेख असल्या तरी प्रत्येकाचा आढावा घेणं शक्य नाही. वाचकांची उत्सुकता पण संपते त्यांनी.
शेवटी उज्वला ताईंच्या कथा आहेत. सगळ्याच कथा सुंदर आहेत. पहिलीच ‘एका स्वप्नाचा अंत’ ही तर अतिशय सुंदर आहे. आजच्या वास्तवला धरून.
दंगल घडवून आणणाऱ्याला कळतं की एक आतंकवादी मारल्या गेला आहे. त्याला हायसं यासाठी वाटतं की, ज्यांनी प्रत्यक्षपणे आतंकवादात सहभाग घेतला त्याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मग आपणच आतंकवाद घडवून आणला याचा पुरावाच मागे उरला नाही. याचा त्याला आनंद होतो आणि तो ठरवतो की आता दंगा नव्याने सुरू झाला की कम्प्युटरच्या दुकानावर आपण डल्ला मारायचा कारण त्याच्या मुलाला कम्प्युटर हवं असतं. पण थोड्याच वेळात त्याला कळतं की आपला मुलगा पण आतंकवाद्यांसोबत मारला गेलाय. हे कळल्यानंतर मात्र त्याला ऐकता ऐकताच भोवळ येते. म्हणजे आतंकवाद घडवून आणताना दुसऱ्याचं कुणी गेलं तर त्याचं काही वाटत नाही पण आपला मुलगा मारला गेला आहे म्हटल्यानंतर ते दुःख मात्र तो सहन करू शकत नाही. अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट.
त्यांचीच, ‘दुहेरी फायदा’ही गोष्ट पण खूप आवडली. भ्रष्टाचाराची लस देण्याच्या अभिनव कल्पनेतून गोष्ट सुंदर रंगवली आहे. मूळातूनच ती वाचावी.
कथासंग्रहातील आपल्याला कधी एखादी कथा आवडते तर एखादी आवडत देखील नाही. परंतु मी मनापासून सांगते, मला यातील प्रत्येक कथा सारखीच आवडली.
उज्वला ताई धन्यवाद! इतकं सुंदर पुस्तक आम्हाला तुमच्या अतिशय सुंदर अनुवादामुळे वाचायला मिळालं. तुमच्या पण कथा खूप आवडल्या.
परिचय: सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समिधा” – (आत्मकथन) – लेखिका : साधनाताई आमटे – परिचय : रंजना देशपांडे ☆ शब्दांकन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(५ मे हा आदरणीय कै. साधनाताई आमटे यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने समिधा या त्यांच्या आत्मकथनाबद्दल)
पुस्तक : समिधा (आत्मकथन)
लेखिका : कै. साधनाताई आमटे
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८५
सत्य हे अद्भुत असूनही अतर्क्य, कल्पनेहूनही रंजक व वास्तवाच्या घटनांमधून तावून सुलाखून निघाल्यानंतर ते साधे, सरळ, प्रांजळ, नर्मविनोदी, पारदर्शक आत्मकथन इतके सुंदर असू शकते की ते वाचकाला खिळवून ठेवते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साधनाताई आमटे यांचे “समिधा” हे आत्मकथनपर पुस्तक.
हे पुस्तक फक्त १८५ पानांचे आहे. परंतु या पानांमध्ये भरलेला अनुभव साऱ्या विश्वाला व्यापून राहण्या एवढा प्रचंड आहे याची जाणीव पुस्तक वाचल्यानंतर येते. पुस्तकाचे सामर्थ्य जसे त्या आत्मकथनामागील प्रांजळ व अद्भुत अनुभवांचे आहे, तसेच ते अद्भुत उत्तम रीतीने शब्दबद्ध करणाऱ्या श्री सीताराम प्रभू यांचेही आहे. पारंपरिक अर्थाने ही आत्मकथा नव्हे आणि आत्मचरित्रही नव्हे. हे आहे जीवनानुभवांच्या आठवणींचे संकलन.
या जीवनयात्रेची सुरुवात होते तीच मुळी नागपुरातील घुले शास्त्री पासून. शिवकालीन गंगाधर भट्टांचे वंशज घराणे, सनातनी धार्मिक जुन्या परंपरांना चिटकून असलेले. साधनाताई दहा वर्षाच्या असताना वडील वारले आणि सर्वात धाकट्या दोन महिन्याच्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी साधनाताईंवर पडली. त्या वयापासून त्यांच्या मातृत्वाच्या भूमिकेचा विकास झाला आणि पुढील आयुष्यात हजारो कार्यकर्त्यांची माता म्हणून जीवनातील एका गावी कार्याचा पाया रचला गेला.
त्यांच्या बालपणीच्या जीवनाकडे पाहिल्यास त्यांच्या स्वभावातील भावुकता, वैचारिकता व कर्तव्य कठोरता यांचा उगम त्याच्यावरील संस्कारातून झाला हे निश्चित.
बाबा आमटे यांचे त्यांच्या घरचे आगमन आणि नंतर त्यांच्या भावविश्वात व त्यांच्या जीवनातील प्रवेश हा सारा अनुभव योगायोगाचा व अतर्क्य असा आहे.
कोणी एक संन्यस्त वेषधारी ब्रह्मचारी त्यांचे घरी येतो काय! त्यांच्या इंदूला पाहिल्यावर त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा विरघळून पडते काय! अन ते या मुलीला मागणी घालतात काय! सारेच अतर्क्यआहे. खरे तर या संन्यासी सुखवस्तु घराण्यातील त्या काळी सुद्धा घरदार, शेतीवाडी, बंगला, मोटार व इतर सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना, वकिलीचे शिक्षण झालेले, चांगली मानाची नोकरी असताना सुद्धा या मुलाने हा मार्ग का पत्करला असेल याची या मुलीला काही कल्पना नसते. परंतु तो काही देशकार्य करतो आहे एवढीच जुजबी माहिती या इंदूला होती.
लग्न ठरल्यानंतर बाबांशी झालेला पत्रव्यवहार व इतर घटना प्रत्यक्ष वाचणे हा एक अनोखा अनुभव ठरावा.
चोरांशी झालेल्या झटापटीत अंगावर झालेल्या सुऱ्यांच्या जखमांमुळे ठिकठिकाणी बँडेज बांधलेला नवरदेव बोहल्यावर पाहण्याचा प्रसंग कल्पनेपेक्षाही विलक्षण ठरावा. तरीही संपूर्ण नास्तिक व स्वतःच्या कार्यावर अमाप श्रद्धा, कार्य सामर्थ्यावरील निस्सिम विश्वास असलेला पती व परमेश्वरावर असीम श्रद्धा असणारी पत्नी यांच्या संसाराचा प्रवास जाणून घेणे खूपच उद्बोधक आहे यात शंका नाही.
पेशाने वकील असलेले बाबा आमटे समाजसेवेचे व्रत अंगीकारून म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष, अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हरिजन आदिवासी लोकांना त्यांच्या माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्ते झाले.
त्या काळात श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कल्पनेतील ‘श्रमाश्रम’ नावाचा समाजकार्याचा प्रयोग, प्रकृती अस्वास्थ्य व आर्थिक तंगीमुळे मध्यावर सोडून देणे भाग पडले. अशा बिकट परिस्थितीत त्यांचा पहिला मुलगा प्रकाशचा जन्म झाला.
परंतु त्या नंतरच्या एक दोन वर्षातील आर्थिक तंगी व प्रकृती अस्वस्थ असूनही या काळात सुद्धा एका नव्या समाजसेवेच्या प्रकल्पाचा विचार या दांपत्याने कसा केला असेल हे समजणे तर्कशास्त्राच्या पलीकडेच आहे.
एका विलक्षण योगायोगाने घडलेल्या लहानशा प्रसंगाने या दांपत्याचे सर्व जीवनच पालटून टाकले आणि महारोगी सेवा समिती या महान प्रकल्पाचा जन्म झाला.
स्वतःच्या जगण्याची भ्रांत असलेल्या, स्वतःची प्रकृती वरचेवर त्रास देत असताना एक ते दीड वर्षाचा मुलगा, त्याचा सर्व सांभाळ आईच्या ममतेने करीत महारोग्यांच्या सेवेचे कार्य आरंभणारा हा महापुरुष आणि साधनाताईंच्या स्वतःच्या आजारपणामुळे पतीची होणारी ओढाताण. असहाय्यपणे पहात क्षयरोगाशी झुंज देणारी पत्नी हा अनोखा संसार कोणाच्याही कल्पनेत सुद्धा बसणारा नाही.
अशाही परिस्थितीत रोगाशी यशस्वीपणे लढा देऊन, सद्य आनंदवन म्हणून ज्ञात असलेल्या शहरी वस्तीपासून दूर अशा एका झुडपी जंगलात मिळालेल्या एका ओसाड जमिनीवर हे पती-पत्नी, लहान मुलगा व सहा महारोग्यांसह येतात. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धिमत्ता व प्रभावी शब्द एवढ्याच सामर्थ्यावर आनंदवन नावाचे नंदनवन फुलवितात. हा इतिहास वाचताना डोळ्यातून झरणारे अश्रू वाचकाला आवरता येत नाहीत.
या सर्व कार्यामध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता व पतीचा संतापीपणा जपत, मुलांवर सुसंस्कार करत, सर्व टप्प्यांवर सक्रियपणे सहभागी होत आपल्या पतीच्या कार्ययज्ञात स्वतःची आहुती देणारी ही समिधा, आपल्या मनातील एक कोपरा केव्हा काबीज करते हे समजत सुद्धा नाही.
आनंदवनाची उभारणी व विकास होत असतानाच साधनाताईंची प्रकाश व विकास ही मुले मोठी होत होती. स्वतःच्या मुलांना शहरी शाळेत न घालता कामगार व मजुरांची मुले ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत याही मुलांचे शिक्षण करण्याच्या विचारांमध्ये त्यांच्या स्वतःच्या संस्कारांवरील विश्वासाचे दर्शन होते. निर्भयता, आत्मविश्वास व इतरांवर संस्कार करण्याची क्षमता या त्रिसूत्रीतून बाबांनी कार्यकर्त्यांची आनंदवनातील मानसिकता घडविली. परंतु स्नेह, समानता, प्रेम, सहिष्णुता इत्यादी कोमल भावांमधून एक अतूट भावबंध निर्माण करून कार्यकर्त्यांच्या मनात शाश्वत नात्याची गुंफण करून साधनाताईंनी बाबांच्या कार्याला एक वेगळेच परिमाण बहाल केले. हे वेगळे परिमाण घेऊन आजही आनंदवन एका अनोख्या भावविश्वासाचे प्रतीक बनले आहे.
महारोग्यांना सामान्य माणसाचे जीवन बहाल करताना नुसते जगणे मिळवून देण्याबरोबरच भावविश्व ही फुलविण्याचे काम बाबांचा विरोध असतानाही तो मोडून काढून साधनाताईंनी केले. स्वतःच्या मतांबद्दल आग्रही राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रसंगी पतीच्या मताविरोधात भूमिका घेऊन ती भूमिका निभावण्याचं त्यांचं धैर्य लोकविलक्षणच.
सहा कुष्ठरोग्यांसह एका ओसाड जमिनीवर, समाजसेवेच्या माध्यमातून कुष्ठरुग्ण सेवेची वसाहत उभी करून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा उभ्या करण्यापर्यंतचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांना नवीन साहसाचे धुमारे फुटले नसतील तरच नवल आणि बाबांच्या वाणीने एक नवा एल्गार उच्चारला. “निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे. कारण तीच आहे जन्मदात्री साऱ्या भविष्याची”.
अशा नव्या भविष्याच्या स्वप्नांसाठीही तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केले गेले. साधनाताई म्हणतात, “आपल्या बुद्धीचा कस श्रमाच्या माध्यमातून जो पडताळून पाहतो तोच कार्यकर्ता. तो बुद्धिजीवीही असावा आणि श्रमजीवीही तर असावाच असावा. ” या आवाहनाला प्रतिसाद देत युवक बिरादरीच्या माध्यमातून श्रमसंस्कार छावण्यांना प्रतिसाद देत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक तरुण उत्साही कार्यकर्ते या अभियानात सामील झाले. परंतु इतके सर्व होत असताना या सर्व कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था करण्याबरोबरच त्यांचे मन आणि भावना जपण्याचे कार्य करणाऱ्या धीरोदात्त साधनाताईंची प्रतिमा एवढी मोठी दिसते की ती साऱ्या भाव विश्वाला व्यापून राहते.
एक प्रकल्प पूर्णत्वास आणतानाच दुसऱ्या प्रकल्पाची शून्यातून सुरुवात. पुन्हा कष्ट, जिद्द व अपरंपार दृढविश्वास याच भांडवलावर परत तीच जीवनाची संघर्षमय चाकोरी.
त्यातूनच पुढे आनंदवन, सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, गोकुळ असे एकामागून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प उभे राहत गेले. समाजकार्याची एक एक नवी परंपरा निर्माण करणारे हे प्रकल्प या माउलीच्या असीम त्यागाची महती गातात.
स्वतःची उच्चशिक्षित मुले सुना, नातवंडे यांनाही या कार्यात झोकून देताना पाहून अत्यानंदाने कृतकृत्य भावनेनेसर्व व्यवस्था त्यांच्यावर सोपवून बाबा व साधनाताईंनी पुन्हा नर्मदेच्या काठी एकांतवास पत्करून पुन्हा कष्टमय जीवनाची साथ सोडली नाही. नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग व प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाईलाजाने त्यातून घ्यावी लागलेली माघार. यामुळे काहीसे व्यथित होऊन परंतु स्वतःच्या कार्याच्या प्रगतीने समाधान पावत आपले जीवन सार्थकी लागल्याच्या भावनेने हे आत्मकथन संपते. पण हिमालयापेक्षाही उत्तुंगतेच्या दर्शनाने भारावलेला वाचक अंतर्मुख होतो.
अंतर्मुख होऊन विचार करायला लागल्यावर आजची तरुण मुलामुलींची विचारधारा व त्यांची मानसिकता थोडी तरी बदलण्याचे सामर्थ्य या पुस्तकात नक्कीच आहे हे जाणवते.
साधनाताईंनी अग्निदिव्य म्हणावीत अशा प्रसंगातून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य टिकवले. बाबा आमटे व साधनाताईंच्या स्वभावातही आपणास विरोधाभास जाणवतो. त्यांनी बऱ्याच वेळेला पत्नीच्या होरपळीकडे डोळेझाक केली तरीसुद्धा बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी आयुष्यभर साथ दिली. हे सर्व आपल्या तरुण पिढीने नक्कीच अभ्यासण्यासारखे आहे. साधनाताई व बाबा आमटे यांचे सहजीवन म्हणजे एका समृद्ध सहजीवनाचा नमुनाच आहे.
सहजीवनातील यशस्विता ही एकमेकातील अहं आड न येता दोघांनीही एक एक पायरी खाली येऊन सहजीवनातील आनंद फुलवण्यात आहे. पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात आनंदी समाधानी असतील तर त्या कुटुंबातील वातावरणही उत्फुल्ल, कुटुंबातील नातेसंबंध निकोप, मोकळे व मैत्रीपूर्ण राहतात. मुलेही समृद्ध वातावरणात राहतात व पहिल्या पिढीपेक्षाही दुसरी पिढी काकणभर जास्तच चांगले कार्य करण्याकडे प्रवृत्त होतात.
हे सर्व अभ्यासल्यावर असे वाटते, काळ कोणताही असो, पूर्वीचा असो की आजचा असो. मुलांवर निकोप संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या पालकांमध्ये असणे हे गरजेचे आहे. साधनाताईंची तिसरी पिढीही आजच्या काळातीलच नाही का? त्यांची तिसरी पिढीही आत्ताच्या वातावरणातही सुसंगत असेच जीवन जगताना दिसत आहे. ते साधनाताईंच्या समृद्ध विवेकशील संस्कारांमुळेच.
हेच नाही का साधनाताई व बाबा आमटे यांच्या समृद्ध व उत्तम सहजीवनाचे फलित?
☆ ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : आनंदयात्री रवींद्रनाथ
लेखक : श्री. विश्वास देशपांडे
प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्स, पुणे.
हे पुस्तक हातात घेतल्यावर ज्याकडे आधी लक्ष जाते ते म्हणजे त्याचे आकर्षक मुखपृष्ठ आणि रवींद्रनाथ यांचा गूढ, गहन वाटणारा परंतु शांत, निश्चयीपणा दर्शविणारा फोटो आणि ‘एकला चालो रे’ हे वाक्य.. जे जे अतिशय अर्थपूर्ण आहे. आकर्षक रंगातील मुखपृष्ठ व प्रस्तावनेतील मोजकी वाक्ये घेऊन सजलेले मलपृष्ठ.. जे पुस्तक उघडण्यापूर्वीच त्याची व्यापकता दर्शवतात. त्यानंतर पुस्तकातील ‘अर्पणपत्रिका – ज्या दोन आनंदयात्रींना समर्पित केली आहे, त्यांच्या फोटोसह दिसते प्रस्तावनेच्या शेजारील पानावर रवींद्रनाथ यांचा जो फोटो आहे, त्यातील डोळे फारच बोलके व संदेश देणारे आहेत. मा. डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रस्तावना पुस्तक व लेखक यांच्या विषयी अत्यंत महत्वाची माहीती सांगते. आवर्जुन वाचावी अशी सुलभ भाषेतील प्रस्तावना! त्यानंतर मा. लेखक यांचे मनोगत वाचायला मिळते. मनोगत वाचताना लेखकांचा प्रामाणिकपणा, ऋणनिर्देश विशेष जाणवतात. पुस्तकाइतकेच वाचनीय हे मनोगत आहे.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
पुढील पानावर जी अनुक्रमणिका वाचायला मिळते, ती बघून थोडे आश्चर्य वाटते, जर पुस्तकच ‘रवींद्रनाथ’ यांच्याविषयी आहे, तर अनुक्रमणिका का दिली असेल? परंतू ती वाचल्यावर लक्षात येते, हे तर त्यांचे विविध पैलू आहेत. त्या त्या लेखात त्या त्या पैलूचे दर्शन घडते.
कौटुंबिकपार्श्वभूमी – रवींद्रनाथ कसे घडले, त्यांच्यावर कोणते संस्कार झाले हे समजण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूती अत्यंत महत्वाची ठरते. नव्यातील चांगले स्वीकारणे व जुन्या कालवाहय गोष्टींचा त्याग या साठी लागणारा डोळस विवेक या कुटुंबात होता. इंग्रज प्रवाहात वाहून. न जाता स्वयंप्रज्ञ वागणे कसे असावे हे वाचणे महत्वाचे आहे.
समृद्धसांस्कृतिकपार्श्वभूमी – सगळे कुटुंब विविधकलांचे भोक्ते होते. व प्रत्येक व्यक्तीजवळ कोणतीतरी कला होतीच. हेच संस्कार रवींद्रनाथ यांच्यावर झाले.
व्यक्तिमत्वाचीजडणघडण – यालेखात त्यांच्या मनावर उत्तम संस्कार कसे घडले आणि शांतीनिकेतन विषयी महत्वाची माहिती गोष्ट रूपाने समोर येते. हे पालकांनी आवर्जून वाचायला हवे.
शांतिनिकेतनच्यास्थापनेमागीलविचार – रवींद्रनाथ यांचे विचार कसे घडत गेले, अनुभवातून ते काय व कसे शिकले शाळेविषयीचे त्यांचे मत आणि त्यातून आकाराला येणार विचार लक्षात येतात.
रवींद्रनाथांच्याजगणंआनंदीकरणाऱ्याशैक्षणिकसंकल्पना -मानव चराचराचे कल्याण व्हावे, असे शिक्षण निसर्गातून मिळावे अशा शैक्षणिक संकल्पना वाचायला मिळतात. अर्थात वेगळे काही करणाऱ्याला विरोध असतोच. तो इथेही झालेला दिसतो
शांतिनिकेतनचीस्थापना:- आलेल्या अडचणी, संकटांची मालिका असूनही त्यांचा ठाम निर्धार दिसतो.
आनंददायी शांतिनिकेतन – जीवन व शिक्षण हातात हात घालून चालले तर शिक्षण किती आनंददायी होते हे सांगणारे अनेक मौलिक विचार, प्रसंग व अनुभव यातून समजतात.
शिक्षणाचंमाध्यममातृभाषा – यात मातृभाषेचे महत्त्व सांगणारे विचार व त्याप्रमाणे केलेले आचार दिसतात. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मातृभाषेतून भाषण करणे हे वेगळेपणाचे वागणे, आणि माणसात तफावत पडण्याची कारणे समजतात.
कमालीचासाधेपणाआणिमनाचीश्रीमंती – माणसे जोडण्याची कला रवींद्रनाथांना अवगत होती. त्यातूनच अनेक ऋषीतुल्य व्यक्ती शांतिनिकेतन मध्ये येत असत. त्यातून प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. त्यांच्या या संस्थेत साधेपणा व सौंदर्य जपले जात होते. सोन्यापेक्षा फुलातील सौंदर्य समजावून दिले जात होते
सहजताहारवींद्रनाथांच्याशिक्षणाचाप्राण– सहजता केंद्रस्थानी ठेवून ही पुस्तक निर्मिती लेखकांनी केली आहे.. सहजता आणि शिक्षणमूल्य एकत्र कसे परिणामकारक होतात ते त्यांनी दाखवून दिले.
टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी सुंदर व हळवी कहाणी बरेच काही शिकवून जाते. नाते उदात्त कसे असावे, प्रेरणादायक कसे असावे हे आवर्जून वाचावे.
बहुमुखीप्रतिभा :– घरातील वातावरणाच्या आनंदलहरी मुलांवर किती सकारात्मक परिणाम करतात आणि परिणामस्वरूप मुले किती प्रतिभासंपन्न होतात… हे लक्षात येते.
कवितेशीमैत्री– वाचत असताना त्यांच्या कवीमनाची ओळख होते. हेच कवीमन विविध प्रसंगी कवितेतून व्यक्त होते. अगदी मृत्यूपूर्वी काही अर्धा ते पाऊण तास त्यांनी मृत्यूवर कविता केली होती. विविध कवितांमधून त्यांचे स्वभाववैशिष्ट्य समजते.
नाटककाररवींद्रनाथ – शिक्षण घेत असताना विविध साहित्यकृतींचा अभ्यास करत विसाव्या वर्षी त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ नाटक लिहीले.
रवींद्रद्रनाथांचीअपारंपरिकलेखनशैली – त्यांनी स्वतःची शैली विकसित केली. टीका सहन केल्या. अनुभवलेला निसर्ग कवितेतून प्रगट झाला.
विश्वकवीरवींद्रनाथ– त्यांनी साहित्य, कला अशा सगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांचा ‘गीतांजली’ काव्यसंग्रह त्यांनी परमेश्वराला अर्पण केला आहे. याने त्यांचे नाव विश्वात पोहोचले. ते जसे व्यक्त झाले तसेच जगले.
अष्टपैलूसाहित्यिक– त्यांचे सगळेच साहित्य असे आहे की कोणतेही पान उघडावे आणि रवींद्रनाथांना भेटावे.
सर्वातमोठीदेणगी– ‘जन गण मन’.. त्याचे महत्व व त्यामागील रोचक सत्य लक्षात येते.
रवींद्रनाथांचीअफाटआणिविस्मयकारककाव्यसृष्टी -त्यांच्या विविध कविता, त्यातील अर्थ, हेतू हे सगळे या पुस्तकातून समजते.
कथाकाररवींद्रनाथ – कवितेचे माध्यम व्यक्त होण्यासाठी अपुरे वाटले तेव्हा त्यांनी इतर कलांचा अवलंब केला. आणि कथा वास्तवातून आलेल्या.. काबुलीवाला तर परिचित आहेच. अशा काही कथा व त्याची थोडक्यात आशय रुपाने माहिती या पुस्तकातून समजते.
स्त्रीपात्रप्रधानकथा – स्त्रियांचे भावनाविश्व व स्त्रीची प्रतिमा उजळून टाकणारं लेखन!
आणखी एक कथा- नष्टनीड- विविध भावभावनांचे कंगोरे विविध प्रसंगातून वाचायला मिळतात. यातील सर्व व्यक्तीरेखा मात्र सुसंस्कृत, समंजस आहेत. या सुंदर कथेत संयम जागोजागी दिसतो.
कादंबरीकाररवींद्रनाथ – त्यांच्या विविध कादंबऱ्यांचा आढावा, तसेच आणखी काही कादंबऱ्या यांचा परिचय या पुस्तकातून होतो.
नाटककाररवींद्रनाथ– म्हणजे नाटक सृष्टीचा तारणहार म्हणता येईल. त्यांनी नाटकांचे सर्व प्रकार हाताळले. यातून त्यांचे बहुश्रुत व्यक्तिमत्व दिसते. विषयाला कलाटणी देणाऱ्या नाटकांचा आढावा या पुस्तकात वाचायला मिळतो.
रवींद्रसंगीत – म्हणजे एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदयच. कुटुंबातील वातावरणामुळे संगीताचा कान तयार झाला. संगीताची जाण, पारंपारिक लोकसंगीत व व्यासंग यातून रवींद्रसंगीताची अलौकिक निर्मिती घडली. त्यातील गीतांच्या चाली, संगीत, शब्द यांची सुरेल गुंफण सांगणारा एक अलौकिक प्रवास वाचकाला वाचायला मिळतो. त्यांच्या संगीतात झालेला बदल, त्याचे टप्पे, त्यात असलेले भावनांचे प्रतिबिंब, रवींद्र संगीताचे वेगळेपण, ते लोकप्रिय असण्यामागील कारणे, आणि वेगळ्याच ट्रान्समध्ये नेणारी त्यांची गीते!.. सगळंच अचंबित करणारं आहे.
रवींद्रनाथांचीपत्रे – इतर साहित्याप्रमाणे यातही विविधता व वास्तविकता दिसून येते. या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत हे वाचून फारच आश्चर्य वाटले. काही पत्रे व त्यातील मजकूर आजच्या काळातही लागू पडतो. तर काही पत्रे खूपच मार्गदर्शक आहेत. सर्वच पत्रे अत्यंत वास्तव व पारदर्शक आहेत. उदा.
‘ सुखदुःख सर्व मार्गावरच असतात पण शांती केवळ मोठ्या रस्त्यावरच असते ! ’
चित्रकाररवींद्रनाथ – त्यांना विविधतेची किती ओढ होती हे पुढील वाक्यातून समजते. ‘ शब्द मला संतुष्ट करत नाहीत. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. असे म्हणून ते चित्रकलेकडे वळले. त्यावेळी त्यांचे वय ६५ होते, यावेळी त्यांनी या कलेची आराधना करून त्यात प्राविण्यही मिळवले.
नृत्यकलेचेपुनरुज्जीवन – नाटकातील नृत्याचे महत्व टागोरांच्या लक्षात आले होते. भारतातील नृत्य परंपरा त्यांना खुणावत होती. आणि तीही आत्मसात करून त्यांनी ५६ या वर्षी एका नाटकात नृत्य सुद्धा सादर केले होते. त्यांच्या मते नृत्य म्हणजे संपूर्ण शरीर बोलते. प्राचीन नृत्यकलेला आधुनिकतेची जोड देऊन
विकास घडवून आणला. याही क्षेत्रात त्यांचे प्राविण्य दिसते.
भारतीयसंस्कृतीचेप्रतिनिधीरवींद्रनाथ – विविध देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरलेली होती. त्या प्रत्येक देशात विविध अभ्यास केला. ‘घरटे व पिंजरा’ यातून त्यांनी रुपकातून तांत्रिक विकास आणि नैसर्गिक गोष्टी यातील फरक दर्शवला आहे. त्यांच्या साहित्यामुळे त्यांना ‘तत्वज्ञ’ अशी मान्यता मिळाली.
मानवतावादीधर्माचासाक्षात्कार – ईश्वराची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे कोणताही भेद न करता मानवाची सेवा करणे… या विषयीचे रवींद्रनाथांचे मौलिक विचार आपण वाचू शकतो.
शांतिनिकेतनतेविश्वभारती– शांतिनिकेतन ही गुरुकुल पद्धतीच्या धर्तीवर शिक्षण देणारी संस्था ते विश्वभारती विद्यापीठ हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.
श्रीनिकेतनचीस्थापना – स्थानिक कला व हस्तकला यांना उत्तेजन देणाऱ्या या मोठ्या सांस्कृतिक केंद्राची स्थापना करून त्यांनी स्थानिक समाजाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून मोठेच काम केले.
सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी – त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांना परिचित वाटणारी व सहजसोपी वाटणारी ‘सहजपाठ पाठ्यपुस्तके’ यांची निर्मिती केली.
कर्मयोगीरवींद्रनाथ– ‘बोले तैसा चाले’ या प्रमाणे वर्तन असणाऱ्या रवींद्रनाथांची या पुस्तकातून छान ओळख होते.
गुरुदेवांचीसजीवशिल्पे– कोणतेही काम सौंदर्यदृष्टी ठेवून केले तर ते चांगले होते… या विचारातून त्यांची विविध शिल्पे कशी सजीव आहेत याची माहिती लेखकाने दिली आहे.
गुरुदेवांचीराजकीयविचारसरणी – राष्ट्रकारण व विश्वकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे त्यांचे मत होते. हीच भावना त्यांच्या कृतीमागे होती. अवघे जग एकच कुटुंब व्हावे अशी त्यांची प्रामाणिक भावना होती.. जी लेखकाने नेमकी टिपली आहे.
मैत्रीपर्व : यात जगातील विविध माणसांबरोबर मैत्रीपर्वाच्या निमित्ताने मैत्रीचा धागा कसा टिकवून ठेवला होता ते लेखकांच्या शब्दातून नीट समजते..
देखणादेहांततो: यात त्यांच्या शेवटच्या दिवसातील आयुष्य व कार्य या पुस्तकात आपण वाचू शकतो. यातील त्यांची वाक्ये खूप महत्वपूर्ण शिकवण देतात.
दिव्यत्वाचीजेथेप्रचिती – यात रवींद्रनाथांच्या वेगळ्या विचारांची – आचारांची कारकीर्द आपण वाचू शकतो.
गुरुदेवांचेसंस्मरणीयविचार – यात त्यांचे काही अनमोल विचार आपल्याला वाचायला मिळतात.
मान्यवरवाचकांच्याप्रतिक्रिया – हे नक्कीच या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणायला हवे. पुस्तक प्रसिध्द होण्यापूर्वी या लेखमालेवर ज्या प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत ज्याही येथे वाचायला मिळतात.
शेवटी संदर्भग्रंथाची सूची लेखकाच्या मनाचा प्रामाणिक पारदर्शीपणा दर्शवते. एकंदरीत खूप सखोल माहिती व रवींद्रनाथ यांचे जीवनकार्य या पुस्तकात वाचक वाचू शकतो. आणि याचे श्रेय लेखकांच्या या अभ्यासपूर्ण लेखनाला व त्यांच्या लेखनशैलीला आहे हे आवर्जून सांगायलाच हवे.
– – प्रत्येकाच्या संग्रही असावेच असे हे पुस्तक नक्कीच आहे.
(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ )
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नुकताच अक्षरशिल्प प्रकाशनातर्फे (शेगाव) प्रकाशित झालेला “तिच्या कथा” हा नवोदित लेखिका सौ. मानसी म्हसकर, वडोदरा यांचा लघुसंग्रह वाचनात आल्या. लेखिका मराठी असल्या तरी गुजराथ स्थित आणि गुजराथी भाषेचा पगडा असूनही त्यांनी मायबोलीत आत्मीयतेने केलेलं सुंदर मराठी लेखन वाचून मी खरोखरच प्रभावित झाले.
या कथासंग्रहात दहा कथा आहेत. आणि पुस्तकाच्या शीर्षकानुसार त्या सर्व कथा “तिच्या कथा” आहेत. स्त्रीवादी कथा आहेत. विषयात आणि कथा उलगडण्याच्या पद्धतीत मात्र वैविध्य आहे. एकदा पुस्तक वाचायला घेतले की ते संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवावेसेच वाटत नाही हा या पुस्तकाचा पहिला यशाचा टप्पा.
१ द्वंद्वही यासंग्रहातीलपहिलीचकथा.
एक वेगळाच विषय.
एक मुलगा, आपण “गे” असल्याचा आणि एका मुलाच्या प्रेमात असल्याचा आणि त्याच्याशी लग्न करण्याचा त्याने घेतलेला धक्कादायक निर्णय त्याच्या आईला प्रांजळपणे सांगतो आणि तिथूनच आईच्या मनातलं द्वंद्व सुरू होतं. मातृत्व की समाज, निसर्ग की समाजाचे नियम या विचारात अडकतं. आईच्या मनातला हा विदारक, भावनिक आणि निर्णयात्मक प्रवास अत्यंत प्रभावीपणे लेखिकेने वर्णिला आहे.
२ माणुसकी
ही एक भयकथा आहे म्हणायला हरकत नाही. कथेतला नायक एका भयाण काळोखी रात्री सायकलवरून घरी चाललेला असतो. घरी त्याची मुलगी आजारी असते. तिच्याच विचारात चालला असताना एक गूढ घटना घडते आणि आपण एका भूताला घेऊन सायकल वरून प्रवास करत आहोत याची जेव्हा त्याला जाणीव होते त्यानंतर कथेला एक वेगळं वळण मिळत जातं. मनाला खिळवून ठेवणारी ही कथा आहे.
३घटना
ही कथा खरोखरच तशी रहस्यमयच आहे. अविश्वासनीय घटना यात घडलेल्या आहेत. शेवट नकारात्मक आहे. घटनाक्रम, त्याविषयीचे वर्णन वगैरे पद्धतशीर असले तरी एकंदर ही कथा मनाची पकड घेत नाही.
४याचसाठीकेलाहोताअट्टाहास
कथा खूप सुंदर. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी नवसासायासाने झालेल्या मुलाला वाढवताना केलेले अवास्तव लाड, त्याच्या चुकांवर घातलेली पांघरूणं आणि परिणामी “आपण काहीही केले तरी आपली आई आपले संरक्षण करेलच” या घमेंडखोर मानसिकतेमुळे मुलात बळावलेली गुन्हेगारी वृत्ती आणि त्यातूनच त्याच्याकडून एका कोवळ्या मुलीवर झालेला अत्याचार अखेर आईच्या डोळ्यावर बांधलेली प्रेमाची पट्टी सोडवण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याच क्षणी आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवण्यात आपल्यातली आई कमी पडली याची जाणीव तिला होते. समाजात घडणाऱ्या नीच घटनेवर या कथेत, लेखिकेने अतिशय प्रभावी भाष्य केले आहे. आई-पणाच्या हळवेपणातून बाहेर येऊन घेतलेला तिचा निर्णय म्हणजे या कथेतून दिलेला एक सुंदर संदेश ठरतो.
५अर्जुनाचेझाड
ही कथा सुद्धा खूप छान आहे. छान लिहिली गेली आहे. आजी- नातीतल्या, झाडांची माहिती देण्यानिमित्त सुरू झालेल्या संवादापासून ते थेट “आजीचा बटवा” या आयुर्वेदिक औषध उद्योगापर्यंत पोहोचलेल्या विद्या नावाच्या एका महिलेची ही यशस्वी कहाणी आहे, लेखिकेने ही कहाणी अतिशय सुंदर रंगवली आहे. आजी नात आणि अर्जुनाच्या झाडावरचे फूल यांच्या मधल्या भावनिक नात्यांची सुरेख गुंफण लेखिकेने या कथेत केली आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांचे महात्म्यही मांडलं आहे.
६परतफेड
परतफेड ही कथा दीर्घ आहे. ५ भागात लिहिलेली आहे. विवाहबाह्य संबंधावर असलेली कथा असूनही यात कुठेही अश्लीलपणा नाही. लेखिकेने एका ठराविक संस्कृतीच्या चौकटीत नायिकेच्या मनाचे विश्लेषण सुंदर पद्धतीने केले असल्यामुळे न पटणाऱ्या बाबीही वाचकाला स्वीकारणे भाग पडते, “असंही असू शकतं, होउ शकतं असा विचार मनात येतो. एकंदर विषयानुसार कथानकाची मांडणी सुरेख झालेली आहे.
७कादंबरी
अतिशय सुंदर कथा. एका स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची, सकारात्मक आणि सुखांत कथा.
आवडलेलं वाक्य— वास्तुशांती फक्त घराची नसते मनाची ही करावी लागते
८स्वीकार
छानच कथा. सासू- सुनेच्या सुरुवातीच्या दुराव्याची आणि नंतर वात्सल्यात रूपांतर झालेल्या सुंदर नात्यांची गुंफण या कथेत वाचायला मिळते. गैरसमजुतीमुळे नात्यात कसा दुरावा निर्माण होऊ शकतो हे लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडलेले आहे. त्याच नात्यात गोडवा निर्माण होतानाचं लेखन अगदी स्वाभाविकपणे आणि भावूक शैलीत त्यांनी केलेलं आहे. या कथेत मांडलेली सासु-डे आणि सून-डे ही कल्पनाही आवडली.
९बसक्रमांक१०८
आई-वडील बहिणींची जबाबदारी स्वीकारत लग्न करायचं राहून गेलेल्या एका स्त्रीची ही कहाणी आहे. रोज बस क्रमांक १०८ मधून लोकल प्रवास करताना भेटणारी माणसं टिपण्याचा, त्यांच्या अंतरंगात शिरून अथवा त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून, तिच्या हातून चक्क कथा निर्मिती होते. तिच्या कथा सर्वत्र वाचल्या जातात. तिच्या कथांना पुरस्कारही मिळतात आणि या माध्यमातून तिला आनंदी जीवन जगण्याचा एक मंत्र मिळतो. लहानसं साधंच कथानक पण त्यातली वास्तवता लेखिकेने रंजकतेने मांडली आहे. कथा नक्कीच वाचनीय आहे.
१०रिकामीघागर
ही कथा वाचताना मन खरोखरच विदीर्ण होतं. त्याचबरोबर या कथेतून, स्त्रिया एकत्र आल्या तर काय चमत्कार घडवू शकतात असा महत्वपूर्ण संदेशही लेखिकेने दिला आहे.
एक गाव, गावाभोवती वाहणारी नदी आणि पाणवठ्यावर जमणाऱ्या, आपापली दुःखे मनात घेऊन पाणी भरण्याच्या निमित्ताने नदीकाठी जमून मनाला हलकं करू पाहणाऱ्या गावातल्या महिला. त्यांच्यातलीच एक विधवा कुंदा नावाची महिला. एक दिवस एका नराधमांकडून तिच्यावर अतिप्रसंग होतो त्यातूनच तिला दिवस राहतात आणि त्यानंतरचा कुंदावहिनीचा संघर्ष, निर्णय आणि त्या निर्णयास एकजुटीने साथ देणाऱ्या तिच्या सख्या.. रिकामी घागर नावाचे आंदोलन उभारून गाव पंचायतीचा निर्णय कसा बदलायला लावतात याची काळीज फाडणारी ही कथा आहे.
रिकामी घागर हे स्त्रीच्या मातृत्वासाठी वापरलेलं रूपकात्मक शीर्षकही खूप बोलकं आहे.
एकंदर हा दहा कथांचा सुंदर संग्रह.
मा. मानसी म्हसकर यांनी विविध विषयांच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यथा मांडत त्यावर उपायही सुचवत वाचकांना विचार करायला लावले आहे.
लेखिकेची साधी, सरळ, ओघवती भाषाशैली, वर्णनात्मक लेखन पद्धती, मनोविश्लेषणात्मक लेखन क्षमता, कथानकाची सुयोग्य मांडणी हे प्रत्येक कथेचं वैशिष्ट्य ठरतं. त्यातून त्यांची संवेदनशीलता आणि वैचारिकता जाणवते.
पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या तिच्या कथा आहेत पण यातली ती कणखर आहे, जिद्दी आहे, चिकाटीची आहे कोसळणारी नाही आणि खरोखरच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साकारलेल्या झाडासारखीच वादळ वाऱ्याशी, ऊन पावसाशी झगडत, तिच्याच मातीत पाय घट्ट रोवून उभी आहे. निर्णयक्षम आहे. हे सुंदर मुखपृष्ठ लेखिकेचे चिरंजीव शालीन म्हसकर यांच्या कल्पनेतून साकारलं आहे.
मा. प्रसाद देशपांडे यांनी या संग्रहाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. त्यांच्या मतानुसार खरोखरच स्त्रीच्या भावनांचे, नात्यांचे, आणि निर्णयांचे अनेक स्तर या कथांतून उलगडले जातात.
मानसीताई, मनोगतात तुम्ही म्हटलंय, ”स्त्रीमनातील भावविश्व आणि तिच्या निर्णय क्षमतेचा प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. ”
मानसीताई! तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला आहे.
मलपृष्ठावर शालीनने व्यक्त केलेले आई विषयीचे अभिमानाचे उद्गारही मनाला भिडतात.
अभिनंदन मानसी! आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈