मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “बिकट वाट” – लेखिका – सुश्री नीती बडवे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆

सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

स्व परिचय 

शिक्षा – M. A., B. Ed., M. S. W., Y. C. B. Yoga level 2. (सेवानिवृत्त)

मला वाचनाची व लेखनाची आवड सुरवाती पासूनच आहे. मी पुस्तक वाचले की त्या माझा अभिप्राय विषयी लिहतेच. मी गेली 15 वर्षे योग व प्राणायामचे क्लास घेते आहे. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची पद्धत समजून घेतली आहे.त्या पद्धतीने मी स्वतः सामाजिक काम करते आहे.

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “बिकट वाट” – लेखिका – सुश्री नीती बडवे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक – बिकट वाट

लेखिका – सुश्री नीती बडवे

प्रकाशक – साधना प्रकाशन

पृष्ठे – ११२  मूल्य- 150 रु.

परिचय : सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

बिकट वाट… – सहा महिलांचा जीवनसंघर्ष – सुश्री नीती बडवे

नीती बडवे या पुणे विद्यापीठात जर्मन भाषेचे अध्ययन-अध्यापन करत असताना, त्यांनी जर्मन भाषिकांना आपल्या नजरेतून भारतातील सर्वसामान्य बायकांच्या मानसिक बळाच्या आणि अंतरिक शक्तीच्या गोष्टी जर्मन भाषेतूनच सांगण्याच्या निमित्ताने एक प्रकल्प हाती घेतला. त्यांनी ठाणे – रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या मुलाखती घेतल्या.त्या अगोदर जर्मन भाषेत प्रसिद्ध केल्या. नंतर या मुलाखती मराठीतून बिकट वाट…….सहा महिलांचा जीवन संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवल्या आहेत. यामध्ये एकूण सहा महिलांच्या मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येकीची कहाणी वेगळी. पण जगण्याची आणि जगवण्याची जिद्द, कोणत्याही संकंटा समोर हतबल न होता लढा देण्याची हिंमत मात्र सारखीच. अशा या माझ्या मैत्रिणी जीवनात यशस्वी झाल्या आहेत.

सुभद्राबाई चार बहिणी व भाऊ. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यामुळे शाळे ऐवजी वडिलांसोबत अगदी लहानपणापासूनच हातात कोयता घेऊन कामावर जावे लागे.लहान वयातच ज्या व्यक्तीला पहिली पाच मुलं आहेत पत्नी देवाघरी जाऊन महिनाच झाला आहे. अशा व्यक्तीशी  सुभद्राबाईचा नाईलाजाने  विवाह झाला.    सासरीही परिस्थिती अशीच नवरा रोज कामाला जायचा आणि सुभद्राबाई  घरातल्या पाच मुलांचा सांभाळ करायची. थोड्या दिवसांनी तिलाही दिवस गेले. ती गरोदर असतानाच सासूने त्यांना घराबाहेर काढले. रहायला जागा नाही, खायला कांही नाही. वडील चार दिवस पुरेल इतके सामान देऊन गेले. चार दिवसांनी ही नऊ महिन्याची गरोदर असूनही रोजगाराला जाऊ लागली. घरातून बाहेर काढल्यानंतर आठव्याच दिवशी बाळंतपण झालं  मुलगा झाला. घर म्हणजे अडोसा फक्त. तिने पाचव्या दिवशी कुटुंबनियोजन ऑपरेशन करून घेतले.तिच्या सावत्र मुलीने की जी फक्त नऊ वर्षाची होती तिने आईचे पाच आठवडे बाळंतपण केले. घरात खाण्यापिण्याची वानवाच असल्यामुळे ती  घरी बसून  गोधडी शिवू लागली. एक गोधडी शिवली की १००₹ मिळायचे. त्यातून ती पैसे साठवू लागली.असंच सुभद्राबाईला एका मैत्रिणी कडून महिला गट व हॅलो या सामाजिक संस्थेची माहिती मिळाली. त्यातून ती बचत गटाशी जोडली गेली व बचत करू लागली. तेही नवऱ्याला न समजता. एक दिवस नवऱ्याला आर्थिक अडचण आल्यामुळे त्याने बायकोकडे मला कुठूनही पैसे आणून दे अशी मागणी केली. यावेळी तिने आपल्या नवऱ्याला या बचत गटाविषयी माहिती दिली. नवऱ्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने तिला बचत गटाच्या सभेंना हजर राहण्याची परवानगी दिली. प्रथम या बचत गटातून पाचशे रुपये कर्ज घेऊन गाय विकत घेतली व तिथून त्या दोघांच्या लघु उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कांही दिवस गाई घेणं विकणे, नंतर गोबर गॅस त्यावर चालणारे शेवया मशीन, तेल घाणा असे उद्योग सुरु केले. आपल्या सोबतच इतरांनाही यासाठी प्रोत्साहन दिले. कर्ज काढणं, वेळेत फेडणे, नवनवीन छोटे व्यवसाय, उत्पादित मालाची विक्री हे सर्व त्या करू लागल्या.. हे करत असताना अडचणी तर नेहमीच येत राहिल्या. अडचणी धीराने, संयमाने सोडविल्या . लहान वयात लग्न झाले. निरक्षर तरीही, सगळ्यांना आपलं मानून नेटाने आपला संसार केला आणि इतर मैत्रिणींचेही संसार उभी करणारी सुभद्राबाई.

अक्कलकोट तालुक्यातील दहीठण या गावची  नागिणी सुरवातीला 11 वी पर्यत शिक्षण झाले. पुढे शिक्षणाची इच्छा असूनही न शिकता आलेली नागिणी. 11 वी नंतर मात्र तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध मामाशी लग्न लावून दिले.सुरवातीला शेतमजूर  नंतर पुण्यात हमालीचे काम मिळाल्याने तो नगिणीला घेऊन पुण्याला गेला. हमाली करत असल्यामुळे एखाद्या गाडी सोबत तो चार -आठ दिवस बाहेरच असे. नागिणीला आपण रिकामं बसून वेळ घालवतो आहे. या विचाराने ती सतत नाराज असे. दोन वर्षांनी ती गरोदर असल्यामुळे बाळंतपणासाठी माहेरी आली. मुलगी झाली ती आपल्या बाळाला घेऊन पुन्हा पुण्याला न जाता सासू जवळच राहिली. आता सासरी ती, तिचं बाळ, सासू, व अपंग दिर की त्याच सर्व करावे लागे. तरीही ती सासरीच राहिली. थोडया दिवसांनी नवराही गावीच येऊन काम करू लागला. तेवढ्यात दुसरे मुलही झाले.पण इकडे नवऱ्याची तब्बेत सतत बिघडू लागली.त्यामुळे तो अधिक अधिक खंगत गेल्याने तो घरीच बसून असे. एक दिवस हॅलो फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना शिकलेली महिला हवी होती, की जी घरोघरी जाऊन आरोग्या संबधी माहिती देऊ शकेल. म्हणून गावकरी तिला घरी बोलवायला आले.कारण पुर्ण गावात ती एकटी शिक्षित महिला होती. ती त्या सभेला गेली पाठोपाठ नवराही गेला आणि जेंव्हा तिला कार्यकर्त्यांनी या कामासंबंधी विचारले तेंव्हा ती गोंधळून गेली. पण नवऱ्याने ती हे काम करेल म्हणून सांगितले.तेंव्हा तिलाही आश्चर्य वाटले.कारण घरी मुलं लहान, दिर अपंग, नवरा कामावर जात नाही आणि तिला प्रशिक्षणासाठी  तीन आठवड्यांसाठी  शहरात जावे लागणार होते. नवऱ्याच्या सहकार्यामुळे तीने तो कोर्स पूर्ण केला. त्या कोर्स मध्ये तिला शरीर रचना, व्याधी, औषधं याची माहिती मिळत होती. त्यामुळे ती नवऱ्याच्या आजराविषयी सजग झाली.  कोर्स पुर्ण करून आल्याबरोबर नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. तिने डॉक्टरांना  मी भारत वैद्य हा कोर्स केला असल्याचे सांगितले. डॉक्टरनी नवऱ्याची रिपोर्ट पाहून कांही न बोलता तिच्या हातात एड्स माहिती पुस्तिका दिली. तिची शंका खरी ठरली. तिच्या वयाच्या २१ व्या वर्षी तिला वैध्यव्य आले. ती दुःखी, निराश झाली.त्याचवेळी फाउंडेशनचे लोक तिच्या मदतीला आले. तिला सोबत घेऊन ते  वस्तीवर जाऊन सर्वे करू लागले. हे काम नागिणी मनापासून करू लागली. फाउंडेशनच्या लोकांसोबतच आनंदवनला गेली. तिथल्या लोकांच्या कामाच्या पद्धतीने ती भारावून गेली. तिथून परतल्यावर कामाला लागली. पण नवरा एड्सने गेल्यामुळे लोक तिला टाळू लागले, तिच्याकडून औषधं घेत नसत.  शिवाय ऐन तारुण्यात आलेलं वैध्यव्य यामुळेही तिला त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणीवर मात करून ती भारत वैद्य कामात यशस्वी ठरली. त्यानंतर महिला बचत गट तयार केले.गावाला २००१ चे स्वच्छता अभियानचे बक्षीस मिळवून दिले. दारूबंदी वरतीही काम करते.. नर्सिंग कोर्स केला. या सगळ्यातून मिळणार मानधन अत्यंत तुटपुंज तरीही आपल्या बांधवांसाठी काम करतो याचे समाधान नागिणीला आहे.अशी समाजबांधवांसाठी धडपडणारी नागिणी.

नीरा ही दहावी नापास. वरसई गावची ठाकर जमातीतील. वडील एका शिक्षकाच्या घरी काम करत होते. त्या शिक्षकांच्या सांगण्यावरून  त्यांनी नीराला शाळेत घातले. तिच्या सोबत तीन मुलीही शाळेत जाऊ लागल्या. ती आश्रम शाळा असल्याने तिथेच राहण्याची सोय देखील होती. पण मुलींना घर सोडून रहायची सवय नसल्याने त्या सतत घरी पळून येत. निराच्या आजोबांनी मात्र नीराला एकटं वाटू नये म्हणून एकांच्या घरीच ठेवले. त्यामुळे नीरा नियमित शाळेत जाऊ लागली. आठवी ते दहावी पर्यंत तिला दररोज आठ कि.मी. चालत जावे लागे.  नीराला दहावी पास होता आलं नाही याची खंत आहे.पण  कांही तरी काम करण्याची इच्छा असल्याने ती अंकुर या सेवाभावी संस्थेची जोडली गेली. तीने समजसेविका प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे तिला बरेच काही शिकता आलं. सुरुवातीला संस्थेने तिच्यावरती तीस झोपड्यांच्या ठाकरवाडीची जबाबदारी दिली. कांही दिवसांनी आणखी पाच वड्यांची जबाबदारी दिली.  तेथील वाड्यावस्त्यावरील मुलांना शाळेत जाण्याची प्राथमिक तयारी करून घेण्यासाठी अंगणवाडी निर्माण करणे. हे अवघड काम सहज तिने केले. यानंतर तिने वाड्यावस्तीवरील लोक भारताचे नागरिक आहेत हे सिद्ध केले. वाडीचं अस्तित्व कायद्याने मान्य करून घेतले. वाडया जवळच्या पंचायत क्षेत्राला जोडून घेतल्या. आदिवासी बांधवांना जमिनीवर त्यांचा हक्क  मिळवून दिला . वस्तीवरील सर्व लोक अशिक्षित असल्यामुळे सर्व तिलाच करावे लागत होते.त्यासाठी सर्वे करणं, फॉर्म भरणं, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं. प्रसंगी मंत्रलयात जाऊन तिने आपल्या बांधवाना न्याय मिळवून दिला. अशी ही दहावी नापास नीरा. सुरवातली बोलण्यात आत्मविश्वास नव्हता. अनुभवाने आत्मविश्वास मिळवून कलेक्टर, आमदार, मंत्री यांच्या समोर समाजाच्या समस्या मांडून त्या सोडविल्या.

तर अशा या सहा महिलांची कहाणी वेगवेगळी. प्रत्येकीचे संसार गाणे निराळे पण तरीही स्वतःसाठी व समाज बांधवांसाठी झटण्याची धडपड मात्र सारखीच. कमी शिक्षण, शहरी समाजाचा संपर्क कमी, भाषेतील फरक तरीही यांनी निडरपणे परिस्थितीशी संघर्ष केला आणि त्या यशस्वी ठरल्या. अशा या जिद्दी महिलांविषयीचे हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारे असल्याने सर्वांना वाचनीय असेच आहे.

लेखिका – सुश्री नीती बडवे

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “वेध सामाजिक जाणिवांचा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “वेध सामाजिक जाणिवांचा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

काळी जमिन••• त्यात नवीन अंकुरलेले एक रोपटे••• या रोपट्याला पाणी देणारा एक हात••• एवढेच चित्र. 

पण पाहताक्षणी विचाराच्या रोपट्याला तरतरी आली एवढे खरे.त्याकडे पाहून अनेक विचार मनात तरळून गेले.

०१) सध्या सगळीकडे प्रदुषण वाढले आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. मग अशावेळी पर्यावरण पूरक काही कार्य करायला हवे आणि झाडे लावली पाहिजेत हे तर सुचवायचे नसेल?

०२) नुसते झाडे लावली पाहिजेत असे नव्हे तर तसा संकल्प केला पाहिजे. मग हा संकल्प हातावर पाणी सोडून केला तर त्याला अर्थ प्राप्त होतो. तसा संकल्प केला आहे हे सूचित करायला म्हणून हातावर पाणी सोडले आहे असे देखील हे सूचित करते.

०३) बरं ! संकल्प करताना पाण्याचे महत्व किती आहे हे जाणून पाण्याचा एक एक थेंब अनमोल आहे याची सामाजिक जाणिव आहे म्हणून हातावर सोडलेले संकल्पाचे पाणी देखील वाया न घालवता ते छोट्याशा रोपट्यावरच सोडून सामाजिक जाणिव आणि रोपट्याचे जीवन दोन्ही जपले आहे.

०४) कोणतेही रोपटे ••• ते जर वाढवायचे असेल तर त्याची उचित काळजी घेतलीच पाहिजे. मग रोपटे लहान असल्याची जाणिव ठेऊन त्याला जगवण्यासाठी हा हात तयार आहे हे सांगायला हात आहेच. पण हातावर पाणी सोडून हळूहळू ते पाणी रोपट्याला दिले तरच ते छान तग धरू शकते हा निसर्ग नियम आहे .त्याची आठवण ठेऊन आत्मियतेने प्रेमाने रोपटे वाढवले पाहिजे हे कृतीतून दर्शवले आहे.

०५) रोपटे हे नव्या पिढीचे आणि हात हे जुन्या पिढीचे प्रतिक मानले तर त्याला संस्काराचे पाणी दिले तर रोपटे व्यवस्थित वाढते ही कौटुंबिक भावना देखील यातून व्यक्त होते.

०६) आज उंगली थामके तेरी तुझे चलना मैं सिखलाउँ। कल हाथ पकडना मेरा जब मैं बूढा हो जाउँ। हीच भावना ते रोपटे वाढवणार्‍याच्या मनात आहे. कदाचित  आज तू मोठा व्हावेस म्हणून मी तुला पाणी देत आहे. पण मी जेव्हा म्हातारा होईन तेव्हा तुझ्या पारावर बसेन तुझ्या शितल छायेखाली बसून मी आनंदी होईन. तुझ्या अंगावरचे पक्षी पाने फ़ळे फुले माझे दु:ख कमी करतील. एवढेच नव्हे तर किमान भूक भागवण्याची सोय माझी होईलच पण इतरांनाही त्याचा उपयोग होईल. एवढा उदात्त विचार, आशावादही त्यात दिसतो.

०७) हे रोपटे पाण्यामुळे तरतरीत तर झालेले दिसत आहेच पण या उपकाराची फेड मोठे होऊन मी छत्र होऊन नक्कीच तुमच्या उपयोगी पडेन हे दिलेले मूक अभिवचन यातून स्पष्ट होते.

०८) सगळीकडे सिमेंट जंगल होत असताना काळी आई विकण्याचा कल असताना काळी आई जपली पाहिजे या जाणिवेतून या काळ्या आईला पर्यायाने सगळ्यांना धन धान्य देणार्‍या या सोन्याच्या तुकड्याला जपण्यासाठी आलेला हा मदतीचा हात आहे.

०९) जमिन म्हटले की शेतकरी आलाच. मग त्याच्याही काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेला हा हात आणि वाचा फोडण्यासाठी आलेले हे झाड आहे असे सुचवायचे असेल.

१०) माणसाचे आयुष्य हे झाडासारखे असते. कितीही खाचखळगे अडचणी असलेल्या जमिनीवर जन्म झाला तरी वडिलधार्‍यांच्या मदतीच्या हाताचा मान राखत आपण स्वत: स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिले पाहिजे आणि इतरांच्या उपयोगी पडले पाहिजे. झाडाचा एकही भाग कधीच वाया जात नाही हा गुणही चाणाक्ष लोकांनी अंगिकारायला हवा. असे पण हे चित्र सांगते.

११) अजून अवलोकन करत असताना वेध सामाजिक जाणिवांचा हे नाव बघताना वेध शब्दच मनाचा प्रथम वेध घेतो. आणि हा वेध सामाजिक जाणिवांचा आहे याची जाणिव करून देतो.

१२) मग एक कल्पक विचारही आला, हे झाड सैनिक, पोलीस, डॉक्टर, वकिल अशा अनेक पेशातील व्यक्तींचे प्रतिक मानले तर त्यांची कामाप्रती असलेली आस्था प्रेम हे जाणून त्याच्या उदात्त कार्याची भावना याचे भान सगळ्यांनी ठेऊन त्यांच्यासारखे कार्य करताना आपल्या स्वार्थावर पाणी सोडले पाहिजे. 

१३) किंवा स्वार्थावर पाणी सोडले तर परमार्थाच्या रोपट्याचे झाड होऊन जीवन कृतार्थ करू शकतो हा अध्यात्मिक अर्थ पण निघू शकतो.

जेवढे जास्त अवलोकन करू तेवढे जास्त अन्वयार्थ या चित्रातून निघतात. या पुस्तकाचे लेखक श्री अरूणजी बोर्‍हाडे यांच्या कार्याशी निगडीत आणि स्वत:च्याही असलेल्या समाजाप्रतीची कळकळ आणि कृती स्पष्टपणे उलगडणारे हे चित्र निर्मिती पब्लिक रिलेशन्स यांनी तयार केले आणि दुर्गभान प्रकाशनने ते मुखपृष्ठ म्हणून स्विकारले आणि लेखक अरुणजी बोर्‍हाडे यांनी पण त्याची निवड केली म्हणून सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माई” – लेखक – श्री संजय अनंत कुलकर्णी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “माई” – लेखक – श्री संजय अनंत कुलकर्णी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – माई

लेखक – संजय अनंत कुलकर्णी

प्रकाशक – रावा प्रकाशन

पृष्ठे – १६४  मूल्य- 310 रु.

नुकतंच एक पुस्तक वाचलं, ’माई’. हे छोटंसं चरित्र आहे. पुस्तक छोटं आहे, पण पुस्तकाची नायिका मोठी आहे. तिचं व्यक्तिमत्व महान आहे. ‘सामान्यातली असामान्य’ असं तिचं वर्णन लेखकाने केले आहे. आणि पुस्तक वाचलं की आपल्यालाही हे विधान पटतं. माई म्हणजे कृष्णा त्र्यंबक कुलकर्णी. पुस्तकाचे लेखक संजय कुलकर्णी हे माईंचे नातू. संजयजींनी या पुस्तकात साक्षात माई वाचाकांच्या डोळ्यापुढे उभी केली आहे. लेखकाची भाषा साधी, सोपी आहे, त्यामुळे पुस्तकाला  गतिमानता प्राप्त झाली आहे.  पुस्तक वाचायला घेतले, की कधी वाचून पूर्ण होते, ते कळतही  नाही. लेखन खुसखुशितही झाले आहे.

या पुस्तकामागची प्रेरणा करोनाची साथ आहे, असं सांगितलं, तर आश्चर्य वाटेल. या वेळच्या लॉक डाऊनच्या काळात  अख्खा देश घरात  बंदिस्त झाला होता. आता घरात बसून करायचं काय? संजयजींनी विचार केला, आपल्या  आजी-आजोबांच्या आठवणींचं संकलन करू या.  मग त्या आठवतील तशा त्यांनी लिहिल्या व व्हाटस अपवरून नातेवाईकांना पाठवल्या. त्यांना लेखन आवडले. मग माईंचा जीवनप्रवासाचा सिलसिला व्हाटस अपवरून सुरू झाला. मग नातेवाईकांनी ते लेख परिचितांना आणि परिचितांनी ते आपल्या नातेवाईकांना पाठवले. यातून हे लेख जगभर पसरले. नंतर लोकाग्रहास्तव त्याचे पुस्तक निघाले. ते पुस्तक म्हणजे ‘माई.’ रावा प्रकाशनने अतिशय देखणे असे हे पुस्तक छापले आहे. माई रहात असलेल्या केसरी वाड्याच्या पार्श्वभूमीवर ठळक असे माईंचे छायाचित्र, असे अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे. कागद चांगला, प्रिंटिंग स्वच्छ आणि  निर्दोष आहे.    

माई म्हणजे पूर्वाश्रमीच्या कृष्णा सिधये. त्यांना दोन बहिणी आणि  दोन भाऊ. त्यांचे  वडील भटजी होते. त्यांचा  जन्म १९०६ साली झाला. त्या काळात मुलींनी शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. १०व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि ११व्या वर्षी त्यांना वैधव्य आले.  त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या केशवपनाची तयारी सुरू झाली. तेव्हा माई सासरहून, आपली मैत्रीण तारा  नाबरकडे पळून आल्या. तिचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी तिला आसरा दिला. तिने पुनर्विवाहाचा विचार बोलून दाखवला ही त्या काळातील बंडखोरीच होती. केशवपनाला नकार दिल्याने वडलांनी तिला घरी ठेवून घेतले नाही. कारण गावाने त्यांना वाळीत टाकले असते आणि त्यांचा जो भिक्षुकीचा व्यवसाय होता, तोच बंद पडला असता.  पुढे त्या मालवणला प्राथमिक चौथी इयत्तेपर्यंत शिकल्या.

त्याकाळी राष्ट्रीय कीर्तनकार असलेले विनायकबुवा पटवर्धन यांना ताराच्या वडलांनी कृष्णेसाठी स्थळ बघायला सांगितले. ते कीर्तन-प्रवचन करत धुळ्याला गेले असता, त्यांना वकील त्र्यंबक कुलकर्णी यांच्याविषयी माहिती कळली. त्यांची पत्नी आजारपणामुळे दिवंगत झाली होती. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा मुकुंदा व लग्नाची मुलगी होती. विनायकबुवा त्यांच्या घरी गेले. वडीलधा-यांशी कृष्णेविषयी बोलले. त्यांना पसंत पडल्यावर मुलीकडून होकारही कळवला. मग कृष्णा एकटीच त्यांच्याबरोबर मालवणहून धुळ्याला गेली. त्या काळात हा धीटपणाच म्हणायला हवा. त्यानंतर  ‘सरदारगृहात’ सुधारणावादी कार्यकर्त्यांपुढे त्र्यंबक आणि कृष्णा यांचा पुनर्विववाह झाला. पुढे, समाजात ही जोडी, माई व भाऊ म्हणून सुप्रसिद्ध झाली.

माईंचा पुनर्विववाह कायदामान्य असला, तरी तो समाजमान्य  नव्हता. पुनर्विववाहाकडे सगळे हेटाळणीनेच बघत. माईंनी विचार केला, की लोकांना घाबरून मी घरात बसले, तर रांधा, वाढा, उष्टी  काढा , एवढंच माझं आयुष्य होऊन राहील. मग त्यांनी बाहेर पडायला सुरुवात केली. बाहेरची कामे स्वत: करायची, असे त्यांनी ठरवले. त्या घरच्या बग्गीतून बाजारात जात, तेव्हा, रस्त्यात लोक दुतर्फा उभे आहून त्यांच्याकडे टकमका बघत. घरातल्या खिडक्यात बायका, पुरुष उभे राहून तांच्याकडे बघत. बाईने बग्गीतून जाणे, ही त्या काळात क्रांतीच होती. सोवळ्या बायका तर त्या गेलेल्या वाटेवर पाणी शिंपडून पुढे जात. गावात त्यांच्याबद्दल अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र भाऊंच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यांना टाळताही येत नसे. गावातल्या बायकांचा  विरोध कमी करायला त्यांनी एक वेगळाच विचार केला. गावातल्या मेहता या  दुकानदाराकडून त्यांनी लुगडी आणली व ती विकायला सुरुवात केली. हळू हळू बायकांच्या  विरोधाची धार बोथट झाली. घरात बसून व्यवसाय करायची माईंची ही सुरुवात होती. पुढे त्या चांदीवर सोन्याचे पाणी दिलेले मोत्याचे दागिनेही विकू लागल्या. त्यांना मोत्याची चांगली पारख होती.

१९३१ साली माईंना दिवस गेले. माईंनी, त्यावेळी माहेरी जाण्याचा विचार केला. बाकीचे नको म्हणत असताना, माई आठव्या महिन्यात धुळ्याहून सावंतवाडीला एकट्या आल्या, पण गाव वाळीत टाकेल, या भयाने  माईंच्या वडलांनी माईंना  घरात घेतले नाही. माई डगमगल्या नाहीत.  त्या दुसर्‍या इवशी राजवाड्यावर  गेल्या, राणीसाहेबांना आपली सगळी हकीकत सांगितली आणि त्यांचं पहिलं बाळंतपण राजवाड्यात झालं. केशवपनाला विरोध, सासरहून पळून येणं, पुनर्विवाह, बाळंतपणाच्या वेळी, वडील घरात घेत नाहीत, म्हंटल्यावर राणीसाहेबांशी बोलून आपली अडचण सांगणे अशा अनेक प्रसंगात त्यांचा धीटपणा, बंडखोरपणाही दिसून येतो.

भाऊंची वकिली चांगली चालत होती. सगळं कसं छान चालू होतं. १९४८ साली गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर  झालेल्या जाळपोळीत भाऊंचा वाडा आणि भाऊंची सारी मालमत्ता जळून नष्ट झाली. भाऊ संघाचे असल्याने त्यांना तुरुंगात टाकले गेले. माई मुलांना घेऊन चाळीसगाव, पाचोरे, जळगाव करत पुण्यात पोचल्या. भाऊही तूरुंगातून सुटून पुण्याला आले. जयंतरावांनी भाऊंना केसरीवाड्यात राहायला जागा दिली. टिळकांच्या घरात राहायला मिळालं, म्हणून भाऊंना धन्यता वाटत होती.  टिळकांच्या कार्यालयातच भाऊंचे कार्यालय होते. हळू हळू वकिलीत त्यांचा चांगला जम बसला आणि माईंची पुण्यातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. लेखक  म्हणतात्त,, १९४८, ते १९८८, ही तिची चाळीस वर्षांची वाटचाल खूप प्रेरणादायक होती.

माई विवाह मंडळ चालवत. तो त्यांचा शौकच होता म्हणा ना! विवाह मंडळ नि:शुल्क होतं. पदरमोड करून ते त्या चालवत. पत्रव्यवहार माईंच्या खर्चाने होई. दाखवण्याचा कार्यक्रम अर्थात चहा-पोहे वगैरे केसरी वाड्यातच होई. अशी असंख्य लग्ने त्यांनी जमवली. त्यांची मुलगी शशीकला व मुलगा अरविंद यांची लग्ने या मंडळामार्फतच जमली.

मंगलाचे अरविंदचा मित्र श्रीकांतवर प्रेम होते, पण त्याच्या वडलांचे म्हणणे, मुलींची लग्ने झाल्यावर याचे लग्न करायचे. त्यासाठी मंगल आणि हो, माईसुद्धा सात वर्षे थांबल्या. मुकुंदाचा प्रेमविवाह. त्याची प्रेयसी हेमा कर्णिक सी.के.पी. मांस – मच्छी करणारी आणि खाणारी. पण कडक सोवळं असलेल्या माईंनी या लग्नाला मान्यता दिली. इतकंच नाही, तर इंदूताई टिळकांची वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणारी ‘अन्नपूर्णा म्हणून संस्था होती. या संस्थेतर्फे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायलाही शिकवत. माई या वर्गांना आवर्जून जात. एकदा एक शेफ तिथे चिकन बनवायला शिकवणार होता. माई याही वर्गाला उपस्थित होत्या. मुलाने त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘अरे, हे नवीन काय आहे, ते शिकायला नको? उद्या तुम्हीच म्हणालात, ‘मला नॉनव्हेज खायचय’, तर मला मेलीला करता यायला नको?’ त्या चिकन करायला शिकल्या, इतकंच नव्हे, तर पुण्यात एकदा चिकन बनवण्याची स्पर्धा होती, तेव्हा माईंनी त्यात  भाग घेऊन चक्क पाहिला नंबर मिळवला होता.

माईंचे घर म्हणजे गोकुळ होते. त्यांना  तीन मुले, पाच मुली व बावीस नातवंडे होती. थोरली विमल. त्यांचे चिरंजीव संजय कुलकर्णी हे या पुस्तकाचे लेखक. लेखक म्हणतात, ‘नातेवाईकांचे परिचित आणि परिचितांचे नातेवाईक असे सगळे  माईंच्याकडे आश्रयाला असत.’ नात्या-गोत्याचे लोक त्यांच्याकडे असत, असे म्हणताना, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना गोत्यात  आणणारेही लोक असत. त्यांच्याकडे कुणी शिक्षणासाठी, कुणी नोकरी मिळवण्यासाठी, कुणी नोकरी मिळाल्यावर जागा मिळेपर्यंत असे आलटून पालटून अनेक लोक रहात.

माईंच्या घरात  चहाचे आधण कपाने नाही, पातेल्याने  ठेवले जाई. एक मुलगी दिवसभर चहाची भांडी विसळायला असे. या चहात, कामवाली, केरवाली, भाजीवाली, बंबफोड आणणारा हमाल, पोस्टमन, भाऊंचे अशील असे अनेकानेक असत.

वधूवर सूचक मंडळाचे आणि माईंच्या मोत्याच्या व्यापाराचे व्यवस्थापन कसे होते, हा भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. अतिशय खुसखुशीतपणे आणि दिलखुलासपणे लेखकांनी ही माहिती लिहिली आहे. ती काही चार-सहा ओळीत वर्णन करण्यासारखी नाही.  १९७८ साली संधिवातामुळे माईंचे हात-पाय चालेनासे झाले. त्यांचे उभे रहाणे  बंद झाले. तरीही माईंचा मोत्याचा व्यापार चालू  होता. त्या खुरडत खुरडत चालत. तसाच जिना उतरत वाड्याच्या अगदी दाराशी रिक्षा लावली जाई. त्या मोती चौकात जात. दुकानाच्या मालकाला रिक्षाशी बोलावत आणि व्यवहार करत. जवळ जवळ शेवटपर्यंत त्यांचा हा व्यवसाय चालू होता. हाही भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. माईंच्या शारीरिक गुढग्यांनी त्यांच्या मानसिक गुढग्यांपुढे गुढगे टेकले. माई विमा एजंटही होत्या. त्यांची दोन बॅंकांमधून खाती होती. देण्या-घेण्याचे व्यवहार चेकने त्या करत. त्याबाबतच्या अनेक डायर्‍यांतून त्यांच्या नोंदी असत.

माईंबद्दल लिहावं, तेवढं थोडंच. सगळं लिहायचं झालं, तर पुस्तकावरचं पुस्तक होईल. माईंच्या बोलण्यात ‘मेले’ किंवा ‘मेल्या’ हे  खास शब्द असत. वाक्याची सुरुवात किंवा शेवट या शब्दांनी होत असे. ‘बस रे मेल्या’ किंवा ‘तेवढी डायरी काढ ग मेले’, ’एवढं पत्र टाक रे मेल्या’, वगैरे… वगैरे… या मेले’ किंवा ‘मेल्या’मध्ये माईंचा लडिवाळ मायाळूपणा होता. लेखक म्हणतात, ‘माई सामान्यातली असामान्य होती.’ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जसा पुढच्या पिढ्यांवर उमटला, तसाच त्यांच्या संस्काराचा वारसाही त्यांना मिळाला, तो कसा हेही लेखकाने स्पष्ट केलय.

माईंबद्दल इथे थोडंसं लिहिलं. खूप काही लिहायचं राहीलंही आहे. वाचकांनी ते पुस्तकातच वाचावं आणि माईंना पूर्णपणे जाणून घ्यावं.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 e-id – [email protected]

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मनाचा गूढ गाभारा… (मराठी गझल संग्रह) – कवी : अभिजित काळे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मनाचा गूढ गाभारा… (मराठी गझल संग्रह) – कवी : अभिजित काळे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

कवी : अभिजीत काळे

प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर २०२३. 

प्रकाशक : गझल पुष्प प्रकाशन

पृष्ठ संख्या :१३२.

मूल्य :२२० रूपये. 

२६ नोव्हेंबर २०२३ ची सकाळ ! पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात लगबग सुरू होती. निमित्त होते गझल पुष्प या गझलप्रेमींच्या संस्थेच्या ५व्या वर्धापन सोहळ्याचे! याच दिवशी या सोहळ्याच्या शिरपेचात, सावळ्या निळाईचं मोरपंखी पीस खोवलं गेलं! अभिजीत काळे, सगळ्यांचा अभिदा… यांच्या १०१ गझला समाविष्ट असलेल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटात पार पडले. आणि उघडला तो बहुप्रतिक्षित  मनाचा गूढ गाभारा…. मी ही मग त्या गाभार्‍यात प्रवेश करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा नजर पडली ती संग्रहाच्या मुखपृष्ठावर आणि पुस्तकाच्या शीर्षकावर..

मुखपृष्ठ हे चेहरा असते पुस्तकाचा ! ते पुस्तकाचे व्यक्तीमत्व आणि वेगळेपण घेऊन येते. पुस्तकांतील विचार आणि जाणिवांचा आशय एकवटलेला असतो तिथे! या संग्रहाच्या मुखपृष्ठावरील दिवटीतली तेवणारी ज्योत, तिची आसपास पसरलेली द्युती, तेजोवलय, त्याची आभा, आणि विविध रंगछटा दर्शवणारी त्या ज्योतीभोवतीची प्रभावळ.. सगळंच मन आणि नयन दोन्ही शांतविणारे!! काहीतरी गूढ, अगम्य किंवा अज्ञात, नेणीवेकडून जाणीवेकडे जाणारी वाट दाखविणारे! ते वलय आणि त्यांतल्या विविध रंगछटा, म्हणजे जणू काही… मनातील विचार तरंग, लहरी, ज्या विविध व्यक्ती, प्रसंग, घटना, परिस्थिती यानुरूप आलेले.. प्रवृत्ती, प्रकृती, विकृती आणि संस्कृती चे अनुभव.. यांचेच प्रतिबिंब असावे. कधी दाहक, कधी शीतल, कधी तेजाळलेले, कधी अगम्यत्वाने गूढ!! ही सगळी वाटचाल सुरू झाली ती दिवटीच्या  प्रकाशाच्या साक्षीने आणि मनाचा गाभारा आत्मतेजाने उजळून निघावा या पूर्ततेसाठी!! 

एकेक गझल, तिच्यातले शेर वाचत जावे तसतसे.. डॉ. शिवाजी काळेंनी मलपृष्ठावरील पाठराखणीमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त करतांना लिहिलंयं तसंच.. आपल्याला त्याच्या खयाला मागचा खयाल उमजत जातो, उमगत जातो. आणि कितीतरी वेळा तर तो  खयाल आपल्याच मनातल्या खयालांशी जुळणारा वाटतो. आपल्याच अनुभवांचं प्रतिबिंब त्यात परावर्तित झालेलं वाटतं. आणि मग ती गझल त्याच्या मनातून आपल्या मनात उतरून कधी आपलीच होत, आपलेच मन विचार, अनुभव, जाणीवा लेऊन उभी ठाकते ना… हे कळंतंच नाही!! 

अभिजीतचा एक शेर आहे… 

‘मन ‘कोणाच्या कधी समजले काय मनाचे व्याप जगाला?

मनात उतरायचे दादर ज्ञात कुठे अद्याप जगाला!!! — 

पण तरीही मनाच्या गाभाऱ्यात उतरून गूढ, मन की बात, मनीचं खास गुज जाणून घेण्याचा हा प्रयत्न! 

अभिजीत ने आपल्या गझलांमध्ये..

कधी न जन्म घेतला कधीच मी न संपलो

मना तुझ्या मुळेच मी अनेक रंग रंगलो!

असं म्हणत.. जीवनानुभवांचे अनेक रंग, छटा,शब्दकुंचल्याने रेखाटल्या आहेत. 

मानवी नातेसंबंध, दुरावत चाललेली नाती, वाढत चाललेली दरी, त्यांतून झालेल्या यातना, विरहवेदना, तो बोचणारा सल, आणि त्यातून ही मनाने खचून न जाता, सुचवलेले मार्ग, आणि तटस्थ, स्थिरावलेलं मन.. अतिशय सुंदर शब्द बद्ध केलयं..

एकेक जात असता दु:खांत साथ सोडून,

शोधू कुणा कुणाला राखेत आठवांच्या?

आणि

डोह माझा असे खोल ‘मन’ राखुनी

तळ स्वतः शोधता आवडू लागलो!

असं म्हणत गझलकार अभिदा, नात्यांचं गणित अगदी लीलया सोडवंत सांगतोयं..

प्रेम ज्या नात्यांत नाही, ती खुजी नाती नकोतच

स्निग्धता मैत्रीत ओतू, स्नेह भरली साय निवडू!!

आणि मग हे नातं, हा स्नेह, हे प्रेम वृद्धिंगत व्हावं, तुटलेली नाती जुळावीत म्हणून दाखवलेला मनाचा मोठेपणा, समावेशक वृत्ती ची खोली जाणवेल अशी ही गझल, त्याच्यातील मानवतेच्या संवेदनांची उंची दाखवून देते.., असेच वाटते..

ये माझ्या फांदीवरती, तू घरटे बांध म्हणालो

तुटलेले नाजूक धागे प्रेमाने सांध म्हणालो!!

 ती चं सौंदर्य वर्णन करणारी गझल बघा..

 कसे शब्दांत बांधावे तुझे सौंदर्य मोहकसे?

रूपाच्या पैल ते असणे तुझे मी पाहतो आहे!

यातलं रूपाच्याही पलीकडे असलेलं अंतरंगातील सौंदर्य ज्याला दिसलं तोच खरा द्रष्टा!! शेरातून रूप-अरूप, सगुण-निर्गुण याला स्पर्श केला गेलायं असही दिसतंय! 

पुस्तक वाचन, अक्षरब्रह्माची ओढ, आवड कमी होत चालली आहे, ही खंत अशी व्यक्त झालीये बघा…. 

लिहिणा-यांनो थांबा थोडे पहा सभोती

माणसातला  वाचक बहुधा मरून गेला!!

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍या आणि स्तुती पाठकांनी केलेल्या स्तुतीने हुरळून जाणार्‍यांना खडा सवाल करीत विचार करायला लावणारा शेर बघा..

कुणी जराशी स्तुती करावी 

आभाळावर चढतो आपण

तसेच,’ मलाच सारे कळते ‘ म्हणतो ..  कुठे स्वतः ला कळतो आपण?

मागे पडत चाललेला गाव आणि गावाकडची माणसं, त्या आठवणी..याची ही आठवण मनाच्या गाभाऱ्यात खोल साठवून ठेवलीये. तिची स्पंदने जाणवणारे.. वानगीदाखल शेर बघा..

वाहून भूक नेते शहराकडे जथा

 गावास आठवंत मग माणूस संपतो

आणखी एक शेर..

 नभाला बाप माय भुई म्हणतो

 घरी जाऊन खूप दिवस झाले!

फक्त दोन ओळीत.. येवढा अर्थ सामावण्याची जादूच केलीयं की प्रत्येक गझलेच्या एकेका शेरात! 

आखर थोरे, अर्थ अमित! असा गागर में सागर भरलायं! या पुस्तकाच्या गझलसागरात, आपण जितक्या वेळा अवग्रहण करू, तळ आणि खोली गाठायचा प्रयत्न, कसोशी करत राहू ना.. तेवढ्या अर्थ भरल्या पाणीदार मोत्यांनी भरलेली ओंजळ घेऊन आपण बाहेर येऊ. 

अभिजीतच्या या मनाच्या गाभाऱ्यातलं गूढ उकलणं सहज सोपं नाही. त्याच्या काही गझलांना अध्यात्माची किनार आहे. त्या अंगानेही त्यांची उंची गाठायचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्या संग्रहाच्या शीर्षक स्थानी विराजमान झालेले सार्थक शब्द त्याच्या आध्यात्मिक टच चा बाज राखणारेच सिद्ध होतात, तो लिहितो.. 

मनाचा गूढ गाभारा भरावा शून्य शब्दांनी

उगा कां सोंग भक्तीचे धरावे मूढ गात्रांनी!

इंद्रिय सुखाच्या मागे धावून त्याच्या पूर्ततेसाठी केलेली भक्ती त्याला मान्य नाही. त्याला एकांतातली, शब्द विरहित, विचार विरहित, तादात्म्य पावलेली समाधी अवस्था अपेक्षित असावी असे दिसते. 

म्हणूनच त्यानेच एका गझलमध्ये हे गूढ उकललंयं असं वाटत!

शांततेला शब्द हृदयाचा कळावा एकदा

स्पंदनांचा नाद कानी साठवावा एकदा!

याच गझलेत तो लिहितो,

शब्द स्पर्शाने कुणी ओळख कशी घ्यावी तुझी?

नेणिवेला निर्गुणाचा लाभ व्हावा एकदा

मनाच्या गूढ गाभाऱ्यातला हेच ते.. शांततेच्या मौनातलं अनादी तत्व आणि हाच तो अनाहत नाद अपेक्षित असावा गझलकाराला असे वाटते. 

म्हणूनच तो म्हणतोयं..

सावलीच्या आंतला काळोख जाळू या

चल उजेडाचा जरा पाऊस पाडू या!

अशा विविधांगी, अनेकविध विषयानुरूप रूप, रस, रंग आणि अर्थ गंध भरलेल्या विचार रंगछटा आणि त्यांतलं सौंदर्य जाणून घ्यायचे असेल तर मनात उतरायचे दादर उतरून च या गाभार्‍यात प्रवेश करायलाच हवा एकदा, हीच मनिषा! यातल्या प्रत्येक गझलेतला एकेक शेर म्हणजे.. देता किती घेशील दो कराने? असे व्यक्ती परत्वे विविध अर्थ देणारा! शोधा म्हणजे सापडेल!! 

सांगता करतांना.. अभिजीतला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा आणि आशिर्वाद देते आणि त्याच्याच एका शेरात, मला माऊलींच्या पसायदानाचा स्पर्श भासला, तीच लोकमंगलकारी प्रार्थना जाणवली.. त्या ओळी उद्घृत करते..

पोचली जर प्रार्थना ही ईश्वरा कानी तुझ्या, 

ज्यांस जे काही हवे ते सर्व तू मिळवून दे !! …. 

परिचय – प्रा. भारती जोगी

पुणे

मो ९४२३९४१०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “मनाचा गूढ गाभारा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “मनाचा गूढ गाभारा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतेच म्हणजे २६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेले  मनाचा गूढ गाभारा पुस्तक हातात पडले आणि मुखपृष्ठ पहातच राहिले. 

गर्द हिरवट रंगावर एक दिवटी, त्याचा प्रकाश आणि वर असलेले मनाचा गूढ गाभारा हे शब्द. बस्सऽऽऽ एवढेच चित्र! पण किती बोलके आहे•••

०१) गाभारा या शब्दातून देवालय प्रेरित होते आणि मग त्या दृष्टीकोनातून बघितले तर गाभार्‍यातील अंधार हा कधीच काळा नसतो तर तो कधी निळा कधी हिरवा असा मोरपंखी असतो. तोच भाव या रंगातून प्रेरित होतो आणि अशा गाभार्‍यात पेटणारी नव्हे तर तेवणारी ही दिवटी गाभारा उजळून टाकत आहे. हा प्रकाश सूर्य वलयासारखा शाश्वत आहे आणि त्याची आभा ही एक सकारात्मकता एक चैतन्य देणारी आहे.

०२) नंतर विचार करता मनाचा शब्द गाभार्‍यातून घुमतो आणि मग हा गाभारा हा अंतरात्म्याचा आहे त्यातील भाव कधीच लवकर स्पष्ट होत नसतात आणि या गूढतेवर दिवटीची तेजोवलये पडली तर मनातील गर्तता सकारात्मकतेने चैतन्याने उजळून स्पष्ट होऊ लागते.

०३) ही दिवटी नीट पाहिली तर ही साधी पणती नसून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीवर असलेल्या दिवटीसारखी आहे. त्याच ज्ञानशक्तीचे रूप घेऊन आलेली आहे आणि हा ज्ञानप्रकाश गूढ असला तरी गीतेतील जीवनाचे सार सांगून अर्जूनाला नैराश्येच्या तमातून बाहेर काढणार्‍या कृष्णवर्णिय आभा सारख्या सदोदित उर्जा देणारा आहे.

०४) मनाचा गूढ गाभारा या अक्षरांकडे नीट पाहिले तर गाभारा हा शब्द केशरी आणि पिवळ्या रंगात आहे. त्या रंगातच गाभारा हा अंधारी नसून तेजाने भरलेला आहे असे सांगितले आहे. गूढ शब्द पिवळ्या रंगात आहे. म्हणजे ही गूढता आता प्रकाशमय होईल हा संकेत दाखवते. हा रंग सोन्याचा असल्याने शुद्ध सोन्यासारखे मौलिक काही या गाभार्‍यातून येणार आहे असे सुचवते. किंवा रस्त्यावरिल सिग्नलमधे असणारा पिवळा सिग्नल जसे लाल रंगाचा धोका जाऊन पुढचे लवकरच सुकर होईल त्यासाठी तयार रहा अशी सूचना देत असतो आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करा सांगतो तसेच गूढ आता बोलून सगळे स्पष्ट होईल सुचवते. नंतर मनाचा शब्द बघितला तर सगळे मळभ जाऊन सारे काही हिर्‍यासारखे चमचमणारे सफेद रंगातील विचार असणार आहेत. ते अगदी स्पष्ट असणार आहेत. हे सुचवते.

०५) सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले आणि यापुस्तकाच्या लेखकाचे नावही किती समर्पक आहे असे वाटले. अभिजीत काळे•••

अभिजीत म्हणजे कृष्ण ; जो अंतर्मनातील  गूढार्थ वाचक अर्जूनाच्या मनापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले याची अनुभूती देणार आहे. 

किंवा काळ्या गर्ततेवर सदा विजय मिळवून अजेय राहणारे असे अभिजीत काळे मनातील गाभार्‍याचे रहस्य उलगडणार आहेत.

०६) पुस्तकातील अंतरंगाशीही तादात्म्य साधणारे हे चित्र आहे. हे पुस्तक १०१ गझलांचा संग्रह आहे. गझल म्हणजे उला आणि सानी मिसर्‍यांनी दोन ओळीतून मोठा अर्थ सांगणारी शेर रचना. तर हे चित्र म्हणजे मनाचा गूढ गाभारा या शब्दांचा उला मिसरा आणि चित्राचा सानी मिसरा या शेरात लपलेला तेजोमय गर्भितार्थ सांगू इच्छितो.

०७) लेखक अभिजीत काळे यांना मी ओळखत असल्याने त्यांचा संस्कृत सुभाषिते अध्यात्म यांचाही मोठा अभ्यास असल्याने ती केशरी सात्विकता, ती सत्यता प्रखर असूनही मंद आणि शीतल प्रकाशाप्रमाणे मनापर्यंत घेऊन जाणारी गूढ असले तरी सहज सोप्या शब्दांनी तेजोवलयाप्रमाणे परावर्तित होणारी शब्दरचना घेऊन येणारी गझलरचना सकारात्मकतेच्या आभेला स्पर्श करणार असल्याची ग्वाही देते.

०८) अंतरंगात डोकावल्यावर समजते की गझलकार अभिजीत यांनी ‘मन’ हे तखल्लुस ( टोपणनाव) घेऊन गझल लेखन केले आहे म्हणून त्या नावाचा लिलया उपयोग करून घेत गझलसंग्रहाला नाव दिले आहे. या अर्थाने देखील मग अर्थाला नवे आयाम लाभतात आणि ‘मनाच्या’ गूढ गाभार्‍यातील रहस्य जाणून घ्यायला आपले मन सज्ज होऊन अंतरंगात डोकावलेच पाहिजे असे वाटून केव्हा गझलेच्या प्रवाहात न्हाऊ लागतो हे कळत नाही.

असे छोटा पॅकेज मोठा धमाका असणारे मुखपृष्ठ अभिजीत काळे यांच्याच संकल्पनेतून श्री सुरेश नावडकर, श्री शिवदादा डोईजोडे, श्री साईनाथ फुसे यांनी चितारले आणि प्रकाशक गझलपुष्प पिंपरी- चिंचवड यांनी स्विकारले याबद्दल सगळ्यांचे मन:पूर्वक आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशाशी जडले नाते… सुश्री विद्याताई माडगूळकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ आकाशाशी जडले नाते… सुश्री विद्याताई माडगूळकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

लेखिका : विद्याताई माडगूळकर

प्रकाशिका – सौ. शीतल श्रीधर माडगूळकर

गदिमा प्रकाशन, ‘पंचवटी’,११ पुणे -मुंबई रस्ता, पुणे. – ४११ ००३

—आत्मचरित्र कै. विद्याताई माडगूळकर, जन्म- 1925, मृत्यू- 1994.

हे आत्मचरित्र विद्याताई माडगूळकर यांनी लिहिले. परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर शितल माडगूळकर यांनी प्रसिद्ध केले हे पुस्तक 14 डिसेंबर 1996 रोजी प्रसिद्ध झाले. त्याबद्दल सौ. शीतल यांना खूप खेद वाटतो.

‘प्रिय कविराज…. तुम्ही आणि मी लावलेल्या वडाचा विस्तार आता खूपच फोफावला आहे…. अशी सुरुवात करून… शेवटी ‘तुमची मंदी’ या शब्दात पुस्तकाची सुरुवात होते.

सुरुवातीला विद्याताईंनी आपल्या माहेरच्या कुटुंबाविषयी माहिती दिली आहे. त्यांचे घराणे अस्सल कोकणातले! त्यांचे माहेरचे आडनाव पाटणकर असे होते.

पोटापाण्यासाठी हे कुटुंब सांगलीला येऊन हरिपूर येथे स्थिरावले. विद्याताईंचे वडील लहान असताना मामांबरोबर रत्नागिरीला गेले, नंतर ते कोल्हापूरला आले व तिथून पुढे सांगली जवळ हरिपूरला त्यांच्या स्वतःच्या घरी आले. ते जुने घर स्वच्छ करून ते तिथेच राहिले. त्यांचे लग्न कृष्णाबाई नातू यांच्याशी झाले व तीच पाटणकर यांची पत्नी ‘भागीरथी’ झाली. गदिमांच्या पत्नीचे माहेरचे नाव पद्मा पाटणकर असे होते.

एक डिसेंबर 1925 या दिवशी गदिमांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.

विद्या ताईंचा जन्म ही कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण कोल्हापूर मध्ये आनंदात गेले. या बालपणीच्या काळाचे खूप छान वर्णन विद्याताई म्हणजेच गदिमांच्या पत्नी, यांनी केले आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणी शीतलताईंनी एकत्र करून हे आत्मचरित्र पर पुस्तक लिहिले आहे.

त्यामुळे विद्याताईंच्या शब्दातच ते पुस्तक लिहिले गेले आहे. विद्याताई म्हणतात,’ त्यांचा आवाज चांगला होता. त्या गाणे छान म्हणत असत. परंतु लग्नानंतर मात्र त्यांचे गाणे म्हणणे बंद झाले.’

१९४० साली त्यांची गदिमांशी ओळख झाली. ते औंध संस्थानातून आले होते. ही त्यांची पहिली भेट होती. पुढे रंकाळा तलावावर फिरताना त्यांच्यातील प्रेम कमळ फुलले आणि दोघांच्यातील प्रेम वाढीस लागले. इतक्या जुन्या काळातील या प्रेमप्रकरणाची माहिती पद्माताईंनी(नंतरच्या विद्याताई)खूप छान सांगितली आहे आणि शीतलताईंनी ते छान शब्दबद्ध केले आहे. देशस्थ -कोकणस्थ असा हा विवाह संबंध होता.

लग्नानंतर माडगूळ ला जाणे, तेथील गृहप्रवेश तसेच गदिमांच्या सर्व लहान भावांचा परिचय या गोष्टींची माहिती कळते. गदिमा गाणी लिहू लागल्यानंतर त्यांचे कोल्हापूर येथे जाणे- येणे वाढले. एकत्र कुटुंब होते पण माडगूळ ला जाऊन येऊन कविराज राहत असत. विद्याताई त्यांना “कविराज” म्हणत. कोल्हापूरला लता मंगेशकर, भालजी पेंढारकर या सर्वांशी त्यांचा परिचय होता. मध्यंतरीच्या काळात विद्याताईना मोठा आजारही झाला होता. तेव्हा गदिमांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. नंतरच्या काळात विद्याताईंनी कोल्हापूर, मग मुंबई आणि नंतर पुणे अशा तीन ठिकाणी संसार मांडला होता.पुण्यातील ‘पंचवटी’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते.गदिमांच्या प्रत्येक चित्रकथा ते विद्याताईना प्रथम वाचून दाखवत असत. विद्याताईंवर त्यांचे खूप प्रेम होते. सुरुवातीच्या काळात विद्याताईना गदिमांच्या संसारात खूप हाल, कष्ट भोगावे लागले. गदिमांना माणसे गोळा करण्याची आवड होती. घरातील परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे विद्याताईना असेल त्या पैशांमध्येच घर संसार चालवावा लागत असे. तसेच माडगूळकरांचे कुटुंब ही मोठे होते, त्यामुळे शेती मध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात माडगूळ येथील घर  चालवावे लागत असे.

नंतर बाबूजींबरोबर (सुधीर फडके)

गीत रामायणाचे कार्यक्रम सुरू झाले, तसेच चित्रपटामुळे थोडाफार पैसा हातात खेळू लागला आणि.त्यांना चांगले दिवस आले.विद्याताईंना बेबी, लता, श्रीधर, आनंद, शरद अशी मुले होती. पुण्यात आल्यावर मुलांना शिक्षणासाठी चांगली शाळा व कॉलेज मिळाले. 1951 साली प्रपंच तर वाढला पण कामे नाहीत अशी स्थिती होती. पण लवकरच पुन्हा लिखाण चालू झाले. महिन्यां मागून महिने, वर्षे जात होती. 1953 साली वाकडेवाडी जवळ स्वतःचे घर घेतले. पु.भा. भावे गदिमांचे जवळचे मित्र होते. दोघांचाही स्नेह कसा होता, याबद्दलही विद्याताईंनी खूप छान प्रसंग वर्णन केले आहेत.गीत रामायणाच्या काळात सर्व परिस्थिती सुधारली. पुस्तक वाचताना आपण त्यात इतके रंगून जातो की तो क्षण ,ते प्रसंग जगत असतो. एका थोर लेखकाच्या पत्नीचे हे आत्मकथन आहे. ते अतिशय साध्या शब्दात पण ओघवते मांडले आहे.गदिमांना भरपूर सन्मान मिळाले आणि कुटुंबाला चांगले दिवस आले.

त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे ज्या पारखे कुटुंबात त्यांची मुलगी दिली होती, त्या कुटुंबातील तिघांचा एक्सीडेंट मध्ये झालेला मृत्यू! गदिमांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता! गदिमांचे एक मोठे ऑपरेशन झाले आणि त्यांचे एक फुफ्फुस काढले होते. 14 डिसेंबर 1977 या दिवशी संध्याकाळी गदिमांचा मृत्यू झाला.

जगाला आनंद देणारा ‘महाराष्ट्राचा वाल्मिकी’ काळाच्या पडद्याआड लोपला होता. आकाशाची जडलेले विद्याताईंचे नाते संपले होते.

विद्याताईचे दुःख खूपच मोठे होते.

मुले, सुना, नातवंडे यांच्या सहवासात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांतपणे घालवले.

या पुस्तकात गदिमांच्या आयुष्याचा पूर्ण आलेख उलगडला गेला आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणींना एकत्र करून त्यांचे हे आत्मचरित्र शीतलताईंनी 1996 साली आपल्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिले.. वाचनीय असे हे आत्मचरित्र आहे. गदिमां बद्दल आपल्याला असणारा आदर या पुस्तकाच्या वाचनाने अधिकच वाढतो.

परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ललिताक्षरं… लेखिका – डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, सुश्री वासंती वर्तक : संपादन – संपदा जोगळेकर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆

सुश्री वीणा रारावीकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ ललिताक्षरं… लेखिका – डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, सुश्री वासंती वर्तक : संपादन – संपदा जोगळेकर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆

पुस्तक – ललिताक्षरं (ललितलेखनाचा खजिना)

लेखिका – डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, सुश्री वासंती वर्तक

संपादन – संपदा जोगळेकर कुलकर्णी

प्रकाशक – ग्रंथाली

पृष्ठ संख्या – १८३

मूल्य – ३५० रुपये

पद्य आणि गद्य यातील विविध रुपांचा समन्वय साधत स्वतःचा वेगळा बाज निर्माण करणारे ते ललितलेखन किंव ललित गद्य. म्हटले तर नियमात बसणारे, नाही तर नियम बाह्य (फॅारमलेस फॅार्म). याची वैभवशाली परंपरा लाभलेली मराठी भाषा. ललितलेखनातील इरावतीबाई कर्वे, दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके या त्यातील काही प्रतिभासंपन्न लेखिका.

असाच एक ललितलेखनाचा खजिना घेऊन आल्या आहेत, चार लेखिका. डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, वासंती वर्तक. चार वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखिकांनी एकत्र मिळून लिहिलेला  ‘ललिताक्षरं’ हा ललित संग्रह. या संग्रहात प्रत्येक लेखिकेचे विविध विषयांवरील अकरा ललितलेख आहेत. आणि एका रेखाचित्रावर आधारीत शेवटचा बारावा लेख. असे या पुस्तकाचे स्वरुप. लेखिका संपदा जोगळेकर यांनी ठाणे आर्ट गिल्ड यांच्या सहाय्याने अशा प्रकारचा प्रयोग केलेले हे चौथे पुस्तक. त्यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

सुप्रसिध्द लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक. ललितलेख म्हणजे काय हे सांगत त्यांनी प्रस्तावनेला सुरवात केली आहे. आणि पुढे जाताना प्रत्येक लेखिकेच्या लेखांबद्दल उहापोह केला आहे. यातूनच पुस्तकाचे एक चित्र वाचकाच्या मनात तयार होते. पुस्तक वाचताना मनात रेखाटलेल्या या चित्राला मूर्त स्वरुप प्राप्त होते. आणि त्याचप्रमाणे “Look deep into the nature and then you will understand everything better” अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या या वाक्याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण प्रत्येक लेखिकेची निसर्गाबद्दलची अनामिक ओढ. त्यातून प्रकट होणारी संवेदनशीलता, तरल भावना, आयुष्याकडे बघायचा एक आशावाद  या लेखांमधून अनुभवायला मिळतो.

स्त्री म्हणून जगताना रोजच्या आयुष्यात घडणारे साधे – साधे प्रसंग. त्याची तितक्याच सहजसोप्या शब्दात केलेली मांडणी. सकाळच्या ताज्या दूधाचा चहा किंवा बाहेरून येताना मुलांसाठी काहीतरी घरी न्यायला हवे, याची मनातली खूणगाठ. सर्व स्त्रीवर्गाचा अनुभव सारखाच. म्हणूनच हे पुस्तक आपल्या मनाला अलवारपणे भिडते.

‘‘शो’ की स्पर्धा’, शेजार, ‘पार्टी’ किंवा ‘‘न्यूड’ सारखे लेख सामाजिक प्रश्नावर भाष्य करतात. आणि वाचकाला विचार करायला लावतात.

सध्याच्या जीवनात माणसा-माणसामधील संवाद कमी होऊ लागला आहे. अशावेळी वसुधाताईंनी आपल्या लेखातून, मनामनाचा निःशब्द संवाद अधोरेखित केला आहे. त्यातून मिळणारा आनंद, आधाराचा अनुभव  त्यांनी यथोचित मांडला आहे.

मॅनेक्वीनचे किंवा बोगनवेलचे आत्मवृत,असे निबंधपर विषय. तरीही त्यातून प्रकट होणाऱ्या भावना वाचकाला गुंतवून ठेवण्यात चारुशीलाताई यशस्वी झाल्या आहेत. 

बोडण, अनोखे रक्षाबंधन, मोठी रेघ अशा लेखांमधून लघुकथेचे रुप समोर येते. अनोखे रक्षाबंधन मध्ये ‘रक्षाबंधन कोणाचे’ याचे गुपित शेवटपर्यंत ताणत, विजयाताईंनी लेखात रंगत वाढवली आहे. 

लेखाच्या सुरवातीला प्रवासाची एक साचेबंद व्याख्या वासंतीताईंनी मांडली आहे. अन् या प्रवासाचा शेवट होतो तो मदतीची अन् संस्कारांची साखळीमधील एका व्यापक अर्थाने.

चौघींचेही लेखन अनुभवसिध्द आहे. त्यातून जीवनाकडे बघण्याचा त्यांचा तयार झालेला एक व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणूनच त्यांच्या लेखांमधून त्या वैश्विक सत्य सहजपणे सांगून जातात.

प्रत्येकीचा शेवटचा लेख त्रिशूळाच्या रेखाचित्रावर आधारीत आहे. या त्रिशूळावर डमरू, कमळ, ॐ, रुद्राक्षाची माळ असे सर्व रेखाटले आहे. शंकराच्या हातातील त्रिशूळापलीकडे जाऊन प्रत्येकीने आपापली कल्पनाशक्ती पणाला लावली आहे. या प्रत्येक चिन्हाचा प्रत्येक लेखिकेने एक वेगळा अर्थ आपापल्या लेखात उमटवला आहे.

वासंतीताईंना हा त्रिशूळ कॉलेजमधील एका मुलाच्या दंडावर टॅटू म्हणून आढळतो. पण त्यामध्ये त्यांनी फक्त फॅशन बघितली नाही. तर त्यामधून विविध समजूती किंवा संस्कृतीमधून प्रकट होणारे त्रिशूलाचे नवीन अर्थ शोधले. विजयाताईंना आत्मविश्वास, निर्भरता याचा हा त्रिशूळ असुरक्षित महिल्यांच्या हाती मिळायलाच हवा असे वाटले. चारुशीलाताईंना या त्रिशूळावरून बंगाली समाजाची दुर्गा पूजा आठवली. व त्यात त्यांना  एकाचवेळी तांडव आणि लास्य नृत्य याचा संगम दिसू लागला. वसुधाताईंना मात्र परमवीर चक्र मिळालेल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकाची आठवण झाली. अशा प्रत्येकीच्या विविधांगी कल्पना.

ग्रंथाली प्रकाशित या पुस्तकाच्या नावाला व अर्पण पत्रिकेला साजेसे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी रेखाटले आहे.

मराठी भाषेची आणि ललित लेखनाची समृध्दी अनुभवायला, निसर्ग व मानवामधल्या अनुबंधाची अनुभूती घ्यायला, आपल्या रोजच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन लेखिकेच्या लेखणीतून वाचताना येणारा पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी, हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे.

परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर

चर्चगेट, मुंबई

मो – ९८१९९८२१५२, ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक सुंदर खिडकी वजा दरवाजा••• त्यातून कुतुहलाने बाहेर डोकावणारी स्त्री••• मागे स्वयंपाक घरातील दिसणारी मांडणी•••

बस एवढेच चित्र. पण त्याच्या मोहक सौंदर्याने लक्ष वेधून घेते आणि काही क्षण तरी निरिक्षण करायला भाग पाडते.

नंतर दिसते ते चित्राच्या खाली असलेले पुस्तकाचे शिर्षक••• ‘चाकोरीतल्या जगण्यामधून ‘.

मग लगेच विचारचक्र फिरू लागते आणि चित्राचा वेगळा अर्थ उमगतो की स्त्री••• जी संसाराच्या चाकोरीत अडकली आहे, तिलाही संसाराच्या पलिकडच्या जगाचे कुतूहल आहेच की! त्याच कुतुहलाने ती बाहेर डोकावून बाहेरच्या जगाचा अंदाज घेत आहे•••

नीट पाहिले तर तिचा संसार  म्हणजे तिचे स्वयंपाकघर हे मुख्य असले तरी सध्याची परिस्थिती पहाता ती चूल आणि मूल यामधेच गुरफटून न रहाता संसाराला मदत म्हणून या चौकटीतून बाहेर पडून काही करण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठी तिचे एक पाउल बाहेर पडले पण आहे .

जरी तिचे एक पाऊल बाहेर पडले असले तरी अवस्था मात्र नरसिंहासारखी द्विधा झाली आहे. ना धड घरात ना धड बाहेर••• ना मुक्त ना बांधलेले तरीही या उंबरठ्याशी जगडलेले••• 

स्त्रीने कितीही बाहेर पडून स्वर्ग हाती घेतले तरी तिला आजही घरचे सगळे बघावेच लागते. ती कोणत्याही कारणाने घराच्या चौकटीच्या बाहेर आली तरी सरड्याची धाव कुंपणार्यंत तसे काहीतरी तिच्या बाबतीत होते आणि घर , घराचा उंबरठा हे तिचे मर्मस्थानच बनते.

हे प्राधान्य असले तरी आजकालची स्त्री ही घराच्या चौकटीतून बाहेर पडू लागली आहे हे वास्तव स्पष्टपणे दिसते.

नीट पाहिले तर या चौकटीवर धावदोर्‍याची टीप दिसते आणि यातूनही बरेच अर्थ प्रेरित होतात. स्त्रीचे आयुष्य हे घरचे बाहेरचे ऑफिसचे सणवार पाहुणेरावळे यामधे धावतेच झालेले आहे .तीच तिची चाकोरी बनली आहे.

अजून विचार केला तर वाटते स्त्रीचे आयुष्य बाहेर वेगळे असले तरी तिच्या भावना या  धावदोरा घालून घराच्या चौकटीतच शिवल्या गेल्या आहेत.

अशा अनेक स्त्री समस्यांना वाचा फोडणारे हे चित्र. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरील हावभावामुळे स्त्री व्यथेतून मोकळी होऊन आपले विश्व मी निर्माण करीन. चौकटी बाहेर जाऊनही चौकटीची मर्यादा मान हे जपून संसार फुलवेन या आत्मविश्वासाचे द्योतक वाटते . 

अर्थातच या नावामुळे आणि त्यातील गर्भितार्थामुळे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायची ईच्छा होतेच.

ईतके साधे चित्र पण कल्पकतेतून त्याला विविध आयाम द्यायच्या कसबतेमुळे मनाचा ठाव घेते .त्याबद्दल मुखपृष्ठकार नयन बारहाते, संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नीता,नितीन हिरवे आणि लेखिका सविता इंगळे यांचे मन:पूर्वक आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फिनिक्स” – लेखिका – सुश्री  गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “फिनिक्स” – लेखिका – सुश्री  गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे  नाव – फिनिक्स

लेखिका – गौरी गाडेकर

प्रकाशक – नीता बुक एजन्सी

पृष्ठे –२२२   मूल्य – ४०० रु.         

गौरी गाडेकर या एक प्रथितयश कथालेखिका आहेत. त्यांचा कथालेख संख्यात्मकदृष्ट्या जसा चढता वाढता आहे, तसाच तो गुणात्मकदृष्टयाही चढता वाढता आहे. मोजकंच परंतु दर्जेदार कथालेखन त्यांनी केलं आहे. त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत आणि बहुसंख्य कथा मध्यवर्गीय जीवनावर आधारलेल्या आहेत, पण त्या साचेबंद नाहीत. एक वेगळं अनुभविश्व, वेगळा आशय आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं. त्यांच्या नातं या अगदी पहिल्या संग्रहापासून त्यांच्या कथांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्यांच्या कथा आधी मासिकात प्रकाशित झाल्या आणि नंतर पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला आल्या. नातं, आऊटसायडर, सहज व इतर; तिसरं पुस्तक, हनिमून आजी आजोबांचा आणि यानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे फिनिक्स. या शिवाय वादळातील दीपस्तंभ, मृत्यूवर मात, लिंकन ऑन लीडरशिपही ही त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.

इथे मी विचार करणार आहे, तो ‘फिनिक्स’ या कथासंग्रहाचा. ‘फिनिक्स’ हे मिथक आहे. आपल्याच राखेतून ‘फिनिक्स’ पक्षी पुन्हा भरारी घेतो, असा लोकसमज आहे. इथे हे रूपकही आहे. जीवनातील निराशा, वैफल्य, औदासिन्य यांची राख बाजूला सारून पुन्हा उभारी घेणं, जीवनेच्छा बलवती होणं, आशा, उमेद वर्धिष्णू  होणं, हेही ‘फिनिक्स’ पक्षाने राखेतून भरारी घेण्यासारखं आहे, नाही का?  संग्रहातील काही कथांमध्ये असे दिसते.

संग्रहातील  पहिलीच कथा ‘फिनिक्स’. त्यावरूनच संग्रहाचे नाव दिले गेले आहे, ‘फिनिक्स’. लेखिकेने, बर्‍याच दिवसांपूर्वी ‘फिनिक्स’ नावाची कविता लिहिली होती. नामसाम्यामुळे ती कविता, लेखिकेने सुरूवातीला दिली आहे. अतिशय सुरेख पण दुर्बोध अशी ही कविता आहे.

विविध रगांच्या विविध स्वभावाच्या, विविध वर्तनाच्या व्यक्तिमत्वांनी त्यांचं कथाविश्व गजबजलेलं आहे. यातील पहिलीच कथा ‘फिनिक्स ‘ अभय तिचा नायक. शाळेत यशस्वी त्याच्या वर्गात येतो आणि नाटकात राजा होण्याची त्याची संधी हुकते. टिपटॉप रहाणारा यशस्वी. अभ्यासात पुढे. परीक्षेत जास्त मार्क. तो कधी मुद्दाम अभयला त्रास देत नाही. पण त्याच्या अस्तित्वाचं दडपण अभयवर येते. त्याचा आत्मविश्वास हरवतो. त्याच्यात न्यूंगंड निर्माण होतो. त्यात पुढे दोन वेळा त्याचं लग्नं मोडतं. इंद्राणीशी साखरपुडा होतो. ती तो मोडून चार दिवसात यशस्वीशी लग्न करते. मग अभय लग्नच करत नाही. बँकेत नोकरीला लागतो. बँकेत कॉम्प्युटर येणार, कळल्यावर आपल्याला जमणार नाही, म्हणून व्ही.आर.एस. घेतो.

त्याच्या चुलत बहिणीच्या सांगण्यावरून एका निवांत गावच्या एका रिझॉर्टमध्ये तो येतो. तिथलं शांत, निवांत वातावरण  त्याला आवडतं. एकदा फिरून येताना तो तिथल्या एका वृद्धाश्रमाजवळ येतो. तिथे त्याला यशस्वी आणि त्याचा मुलगा भांडत असलेली दिसतात. त्याची बायको नुकतीच पाच-सात दिवसापूर्वी गेलेली असते. मुलगा त्याचं रहातं घर विकून टाकतो. त्याला वृद्धाश्रमात राहायचं नाहीये, पण मुलगा सक्ती करतोय. अभयच्या लक्षात येतं, ‘बायको गेली. मुलगा, सून, नात असूनही तो एकटा आहे. ना राहायला हक्काचे घर, ना स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अभयला वाटतं, यशस्वी हरला, आपण जिंकलो. ही जाणीव त्याला आंतरिक उभारी देते. परतताना त्याला कॉम्प्युटर इंस्टिट्यूट लागते आणि त्याला वाटतं, आत जाऊन बघूयात तरी. ज्या  कॉम्प्युटरच्या धास्तीने त्याने बँकेतील नोकरी सोडलेली असते, ती गोष्ट त्याला करून बघविशी वाटते. इथे त्याच्या मनाने उभारी घेतलेली असते, गेलेला आत्मविश्वास परत येतो, म्हणून कथेचा नाव ‘फिनिक्स’.

‘हक्काचे घर’ ही कथासुद्धा कथानायकाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या भरारीने ‘फिनिक्स’च्या कल्पनेशी जवळीक जोडते. प्रमोद त्याचा दादा आणि वाहिनी चाळीतल्या एका खोलीत रहात असतात. फ्लॅटमध्ये राहायचे वाहिनीचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही शक्य नाही. तेव्हा वाहिनी ठरवते, जो फ्लॅट देईल, त्याच्या मुलीशीच दिराचे लग्न करायचे. अर्थात प्रमोदला हे मान्य नाही. गावची मुलगी सांगून येते, तेव्हा, तो पळून जाऊन तिच्याशी लग्न करतो. तिथे सासरच्या घरी दोन खोल्या भाड्याने घेऊन रहातो. सासर्‍याच्या दुकानात काम करतो. गावच्या लोकांचा गरजेच्या वेगवेगळ्या वस्तू दुकानात ठेवतो. दुकानाची भरभराट त्याच्यामुळे होते. पुढे तो स्वत:चे स्वतंत्र दुकान काढतो. संधी मिळताच एक जुना बंगला विकत घेतो. त्याला थोडी डागडुजी, रंगारंगोटीते करतो. बंगला नवा होतो. वास्तुशांतीला दादा- वहिनींना आणतो. सहा  खोल्यांचा बंगला पाहून दोघेही खुश होतात. थाटात वास्तुशांत होते. दादा आजारी असतो. रात्री तो जातो. बंगल्यात राहण्याचे नाही, पण स्वत:च्या हक्काच्या घरात मरण्याचे त्याचे स्वप्न पुरे होते. प्रमोद म्हणतो, ‘डोक्यावर छप्पर मिळालं, पण नियतीने डोक्यावरचं छत्रच काढून घेतलं.’

विविध प्रकारच्या आणि नमुन्याच्या व्यक्ती या संग्रहात आपल्याला भेटतात. सासूच्या (कुसुमच्या) कथा आपल्या नावावर देणारी सून (प्रिया) इथे आहे. (गुपीत) तुझा खोटेपणा मी जगासमोर आणीन, असं कुसुम म्हणताच ती उपहासाने म्हणते, ‘कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? मी सांगीन माझंच हस्तलिखित यांनी चोरलं.’ मी आता कथा लिहिणारच नाही, असं कुसुम म्हणते, तेव्हा प्रिया उद्दामपणे म्हणते, जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाच्या असाल, तोपर्यंतच इथे मुलाजवळ, नातींजवळ राहू शकाल, नाही तर तुमची गावी रवानगी होईल. शेवटी कुसुमला नावापेक्षा, मुला-नातींचा सहवास महत्वाचा वाटतो आणि ती म्हणते, ‘हे गुपीत गुपीत ठेवण्यातच सगळ्यांचं हीत आहे.’  

कुणाच्या खांद्यावर’ मधील नायिका ज्योती आपल्या प्रियकराच्या मुलांचं सांभाळ करायचं ओझं आपल्या खांद्यावर घेते. त्यांची आई होऊन त्यांना वाढवते. मोठं करते. प्रकाश आणी ज्योती लग्न करणार असतात, पण त्याची अम्मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रकाशचं लग्न, गावातल्या चित्राशी करतात. पुढे त्यांना दोन मुले होतात. एका अपघातात प्रकाश आणि चित्रा दगावतात. मग प्रकाशची आई ज्योतीला बोलावते. तिच्यावर अन्याय झाला म्हणून तिची क्षमा मागते आणि प्रकाशच्या मुलांना सांभाळ म्हणून सांगते. अन्यथा आपल्याला या वयात ही जबाबदारी पेलणार नाही. मुलांना अनाथाश्रमात ठेवावं लागेल, असं म्हणते. आपल्या प्रकाशची मुले अनाथाश्रमात वाढणार, हा विचार ज्योतीला सहन होत नाही आणि ती मुलांची आई होते. दीपिकाचे लग्न होते. नीरव प्रणालीशी लग्न ठरवतो. मग ती प्रणालीला सगळी हकिकत सांगते. प्रणालीही सासूसारखी जगावेगळीच. ती नीरवला सुचवते, ‘तुमची जबाबदारी आता संपलीय, आता तरी त्यांना स्वत:चं आयुष्य जगू दे. आपण त्यांच्यासाठी योग्य जोडिदार शोधू या.’

‘सेवाव्रती’ ही आल्हाद आणि प्रसाद या भावांची गोष्ट. प्रसाद आदिवासींसाठी कार्य करतोय. त्याला ‘सेवाव्रती’ पुरस्कार मिळालाय, पण खरा ‘सेवाव्रती’ आल्हाद्च कसा आहे, हे लेखिकेने कथेत रंगवलय. कथेच्या शेवटी आल्हादच्या सोडून गेलेल्या बायकोचा अपर्णाचा फोन येतो, ती म्हणते, ‘ प्रसादला पुरस्कार मिळाला… आनंद झाला. पण मला वाटतं, सेवाव्रती…खरे सेवाव्रती तुम्ही आहात. खूप चांगले आहात तुम्ही …. सामान्य माणसांना पेलवणार नाही, एवढे चांगले …..म्हणूनच मलाही…’  

लोळा-गोळा झालेल्या मुलाला त्याचे कपडे काढून उन्हात-पावसात त्याला सार्वजनिक ठिकाणी झोपवून स्वत: निवांत सावलीत बसणारा, त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारा स्वार्थी बाप इथे आहे. (गोळा). कडक शिस्तीची, कर्तव्य कठोर, तत्ववेत्ती प्राध्यापिका इथे आहे. एका क्षणी तिला जाणीव होते, ‘आपण ज्याला विजय समजत होतो, ती प्रत्यक्षात शिक्षा होती एकांतवासाची. नातलगांपासून दूर,  भाव-भावनांच्या, प्रेमस्नेहाच्या खिडक्या नसलेल्या एका अंधार कोठडीत कैद होतो आपण’ ही जाणीव तिला होते. आपल्या नातवाचंही भविष्य असं घडू नये, या विचाराने ती बदलते. 

‘स्त्रीणाम् भाग्यम्’ मध्ये आरतीच्या दोन मैत्रिणींच्या कथा आहेत.  दोघींचा जीवन प्रवास परस्पर विरुद्ध दिशेने होतो. दोघी तिच्या चौथीच्या वर्गातल्या मैत्रिणी. . तज्ज्ञा देखणी, हुशार,, टिपटॉप रहाणारी, श्रीमंत. तर सुभद्रा गरीब. बावळट, आजागळ. तज्ज्ञाला बारावीत मार्क कमी मिळतात. ती डॉक्टर होण्याचे वडलांचे स्वप्न भंग होते. मग ती तिला सहानुभूती दाखवणार्‍या  मुलाशी लग्न करते. मग गरिबी तिच्या गळ्यात माळ घालते. आरतीला ती अनेक वर्षांनी भेटते, तेव्हा ती अगदीच बावळट, आजागळ अशी दिसते. याउलट वर्गात बावळट, आजागळ दिसणारी सुभद्रा, संधी मिळताच फिनिक्सप्रमाणे भरारी घेते. आपलं व्यक्तिमत्व सुधारते. शिकते. पुढे चटपटीत एअर होस्टेस होते. दोघींचा दोन दिशांना होणारा प्रवास लेखिकेने छान रंगवलाय.

पत्नी अपघातात गेल्यानांतर, तिच्या डायर्‍या वाचल्यावर आपण तिच्या मनाचा, इच्छांचा विचार केला नाही, तिला सतत गृहीत धरले, यामुळे पश्चत्तापदग्ध झालेला पती ‘तू बोललीच नाहीस’मधे भेटतो, तर ‘एकुलती’ मध्ये सतत स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी केतकी किरकोळ कारणावरून कार्तिकला घटस्फोट द्यायचं ठरवते, अन वडलांच्या आजारपणात कार्तिकने केलेली धावपळ, त्यांची सेवा-सुश्रुषा यामुळे तिचं मतपरिवर्तन होतं. अशा अनेक विविध रंगांच्या, स्वभावाच्या,  विविध वर्तन करणार्‍या व्यक्ती यातील कथांमधून भेटतात.

कथासंग्रहातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातील संवाद चटपटीत आहेत. हे संवाद आणि घटना-प्रसंगांचं यथार्थ वर्णन, यामुळे त्या त्या व्यक्ती आणि ते ते प्रसंग साक्षात डोळ्यापुढे उभे रहातात.

पुस्तक अतिशय वाचानीय आहे. सर्वांनी वाचून यातील कथांचा आनंद घ्यावा.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “मंतरलेले दिवस” – लेखक – ग. दि. माडगूळकर ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मंतरलेले दिवस” – लेखक – ग. दि. माडगूळकर ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

मंतरलेले दिवस हे खरं तर गदिमा च संक्षिप्त आत्मचरित्र म्हणू शकतो.. अर्थात संक्षिप्त च.. कारण गदिमा हे येवढ्या छोट्या पुस्तकात सामावू शकत नाहीत.. गदिमा.. गदिमा.. म्हटल की आठवतात गीत रामायणाचे मनाला भिडणारे शब्द..पण गीत रामायण ही एक कलाकृती झाली. अशा शेकडो कलाकृतींमध्ये गदिमा स्वतःच नाव अजरामर करून गेलेले आहेत हे जाणवत ते हे मंतरलेले दिवस वाचताना.. गदिमा हे मराठी साहित्य सृष्टीला फक्त साहित्यच नाही तर चित्रपटसृष्टीलाही पडलेलं एक अभिजात स्वप्न.. ह्या स्वप्नाने मराठी माणसाला एक नवी ओळख दिली.. नवा संस्कार दिला.. येवढंच नाही तर मराठीचा झेंडा पार अटकेपार पोहचवला.. खरचं गदिमा.. सुधीर फडके ह्यासारखी माणसं म्हणजे दैवी अंशच म्हणावी लागतील ज्यांच्या वर सरस्वती मातेचा आशीर्वाद होता,.. लक्ष्मी काही काळ न्हवती पण त्याची कधी ह्या लोकांना पर्वा न्हवती, ते वेगळ्याच धुंदीत जगले आणि अजरामर झाले..असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटेवर चालून सुद्धा गदिमांनी अनेक अजरामर असे मराठी चित्रपट दिले..त्यांच्या रूपाने मराठी साहित्य, तसेच चित्रपट सुष्टीला एक वैभवशाली पर्व दिले हे मात्र निश्चित..मंतरलेले दिवस ह्या पुस्तकात एकूण अकरा प्रकरणं आहेत आणि ह्यातल्या प्रत्येक प्रकरणातून गदिमांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय..मंतरलेले दिवस हे पहिलंच प्रकरण.. आपल्याला अगदी खिळवून ठेवत..ह्यात वयाच्या सोळा सतरा वर्षातील गदिमा आपल्याला भेटतात..दक्षिण साताऱ्यातील कुंडल सारख्या छोट्याशा गावातील अनेक घटना वाचून आपण एकदम खिळून जातो..स्वातंत्र्यापूर्वी चा तो काळ आणि स्वातंत्र चळवळ अगदी शिगेला पोहचलेली.. अशातच आपण ही देशासाठी काही तरी केलं पाहिजे ह्या विचाराने गदिमा झपाटले आणि घर सोडलं आणि एका गांधी सेवसंघाच्या आश्रमात दाखल झाले पण तिथून लवकरच पळू काढला आणि भटकू लागले.. त्यात मॅट्रिक नापास झाले आणि अजूनच वाईट दिवस आले काही दिवस उदबत्या विकल्या.. अशा अपार कष्टातून जात असताना सुद्धा देशासाठी काहीतरी करायची उर्मी शांत बसू देत न्हवती..अशातच त्यांनी समवयस्क आणि समविचारी मंडळी सोबत घेऊन गावाबाहेरच्या एका पडक्या अंधाऱ्या मंदिरात त्यांनी एक अड्डा सुरू केला.. जवाहिराश्रम.. इथेच बसून ते अनेक देशभक्तीपर कविता, भाषण देऊ लागले लवकरच ते गुरुजी नावाने ओळखले जाऊ लागले.. देशार्थ जगेन | देशार्थ मरेन |  देशार्थ करीन.. सर्व दान अशा रचना बनू लागल्या.. आणि आपल्यात लेखनशक्ती आहे ह्याचा साक्षात्कार ही इथेच झाला..व्यायाम शाळा, प्रौढ शिक्षण असे अनेक उद्योग ह्या ग्रुप तर्फे केले जाऊ लागले.. घरी फक्त खायला जाण्या इतपत संबंध उरला..इथेच त्यांनी अनेक पोवाडे लिहिले.. शंकर निकम त्या पोवड्याना चाली देऊ लागला.. पण घरचे दारिद्य्र आणि गरिबी ह्यामुळे नोकरी शोधण्यासाठी हे सगळं सोडून.. कुंडल सोडून जाणं भाग होत.. पण कुंडल मधले हे दिवस वाचताना अंगावर शहारा येतो..त्यानंतर कोल्हापूर मधील हंस पिक्चर मधील चार वर्षांची नोकरी..HMV मधील व्यवहार हे सगळ ह्या लेखात वाचायला मिळत..ह्याचं काळात गदिमांच लग्न होत.. ते म्हणतात मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली..लग्न झालं आणि कोल्हापूर चित्रपट धंदा बसला.. दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत..बायकोच्या माहेरी हून येणाऱ्या डब्यावर दिवस काढले.. अशातच गदिमाचे अनेक पोवाडे प्रसिद्ध झाले..इथेच सुधीर फडके साठे आणि मंडळी भेटली.. अनेक क्रांतिकारी प्रत्यक्ष संपर्कात आले.. काही तर ह्यांच्या छोट्याशा रूमवर राहिले.. हे अनेक असे रोमांचित करणारे किस्से पहिल्या भागात आहेत.. दुसऱ्या भागात गदिमा आणि त्यांना मिळालेला केंद्र सरकार साहित्य अकादमी पुरस्कार आणि तो घेण्यासाठी झालेली दिल्लीची वारी, बायकोचं आजारपण, बायको सोबत दिल्ली दर्शन तिथे भेटलेले मुस्लिम कुटुंब, त्या घरातील मुस्लिम स्त्रीशी झालेला परिचय.. तिचं आशीर्वाद देणं आणि अचानक तिची आत्महत्या.. अशा अनेक घटनांचा लेखाजोखा आपल्याला एक अज्ञात अंगुली लिहिते मध्ये वाचायला मिळते..त्यानंतर.. मोहरलेला कडुनिंब मध्ये गदिमांच्या कवी मनाचं दर्शन होत.. त्या काळी त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आणि त्यांच्या आठवणी म्हणजे मोहोरलेला कडुनिंब..त्यानंतर माझा यवन मित्र मध्ये एका मुस्लिम मित्राची ओळख आणि त्याने केलेला विश्वासघात वाचून आपण व्यथित होतो.. बामणाचा पत्रा.. मध्ये चित्रपट कथा लिहिण्यासाठी जेंव्हा निर्माते हात धुवून मागे लागतं तेंव्हा गदिमा पूण्या मुंबैतून पळ काढून माडगूळ ला येत.. येताना दोन चार मित्र सोबत असतच..माडगूळ मध्ये घरात त्यांचा पाय राहतच नसे.. शेतात केलेली खरतर गुरांसाठी केलेली एक झोपडी तिथे जाऊन राहिल्याशिवाय गदिमां ना काही सुचत नसे.. आणि ह्या झोपडीवर असलेल्या पत्र्या मुळेच अख्खा गाव ह्याला बामनाचा पत्रा म्हणून ओळखत असे.. गदिमा च वास्तव्य जो पर्यंत तिथे असे तोपर्यंत त्या जागेचे अगदी रूपच पालटून जाई.. ह्याचे अगदी मनोहारी वर्णन आपल्याला ह्या लेखात पाहायला मिळते..त्यानंतर.. पंतांची किन्हई..ह्यात किन्हई गाव.. तिथे लेखकाने घालवलेले दिवस.. त्या गावाचे सौंदर्य, पंचवटी तिथले अनुभव वाचलेच पाहिजेत असे आहेत…त्यानंतर वेडा पारिजात.. हा लेख मला खूप भावला का ते मात्र सांगत नाही कारण तुम्ही वाचणार आहातच.. पुढचा लेख.. औंधचा राजा.. ह्यात औंध संस्थान आणि तिथले कारभार ह्याची थोडक्यात पण सुंदर अशी माहिती आहे.. लुळा रस्ता हा पुढचा लेख.. ह्यात भेटते ती एक सामान्य भाजी विकणारी सखू.. आता तिने अख्खं एक प्रकरण व्यापल आहे म्हणजे काहीतरी खास नक्कीच असणारं आणि जे आहे ते स्तंभित करणारं आहे हे मात्र नक्की..तेंव्हा जरूर वाचा… पुढचा लेख.. नेम्या.. नेम्या हे लाडाच नावं.. पण ह्या मित्राने गदिमांवर केलेले निस्सीम प्रेम आणि मैत्री ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे नेम्या.. मैत्री, विश्वास ह्याच्या पलीकडची परिभाषा म्हणजे नेम्म्या.. आणि शेवट दिवा लावा कोणीतरी.. दिवा लावा कोणीतरी ही अंथरुणावर पडलेल्या गदिमांच्या वडिलांचे क्षीण आवाजात शब्द.. पण ते का म्हटलेत हे मात्र तुम्हाला पुस्तकातच वाचावे लागतील.. ह्या नंतरची काही पानं गदिमांचे चित्रपट, त्यांच्या कथा, कादंबरी आणि अजून लेखन साहित्यांची एक संक्षिप्त सूची आहे.. अगदी कोणत्या वर्षात कोणती कथा लिहिली हे ही इथे स्पष्टपणे कळते..

हे पुस्तकं वाचत असताना मला सतत जाणवलेल्या काही गोष्टी सांगते.. गरिबी, दारिद्र्य, अनेक संकट, कठीण परिस्थिती, उपाशी रहायला लागलं म्हणून वाटणारी खंत.. हे गदिमांच्या तोंडून आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाही किंवा त्यांनी कुठे ही ह्याचं प्रदर्शन मांडलेले नाही.. कुठेही परिस्थिती ची तक्रार नाही.. जे दिवस आले ते आनंदाने जगले बास ही एकच गोष्ट सतत जाणवत राहते.. इतकी महान व्यक्ती जेंव्हा हातात झाडू घेऊन महारवाडा साफ केल्याचं अगदी अभिमानाने लिहून ठेवते तेंव्हा  जातीव्यवस्था वगैरे शब्द किरकोळ वाटू लागतात.. एक मुस्लिम मित्र चार पाच वर्षां च कठोर परिश्रम करून बनवलेले काम घेऊन पसार होतो तेंव्हा ही गदिमांची शांती ढळत नाही किंवा तोंडातून एकही उणा शब्द निघत नाही उलट त्यांना तो कधीतरी परत येईल ह्याचा विश्वास वाटतो.. तेंव्हा आपण स्तिमित होऊन जातो.. असे अनेक प्रसंग हे पुस्तकं वाचताना आपल्याला वारंवार येतात.. अर्थात शेवटी एवढच म्हणेन हा अभिप्राय म्हणजे एक चमचाभर पाणी आहे त्या महान महासागराचे ज्याने अख्या मराठी सृष्टीला अभिजात मराठीचे सौंदर्य दाखवले.. स्वप्न बघायला  शिकवले, देशभक्ती, देवभक्ती, प्रेम, तिरस्कार ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक माणूस बनून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला अशा ह्या गदिमांना माझा त्रिवार प्रणाम..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print