मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिशोब काय ठेवायचा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ हिशोब काय ठेवायचा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

(३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. त्या निमित्ताने ही विशेष कविता…)

हिशोब काय ठेवायचा

रिटर्न काय मागायचा! 

……

अनंत काळाच्या अखंड ओघात

आपल्या अल्पशा आयुष्याचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

जीवनाने भरभरून दिले.

जे नाही मिळाले त्याचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

मित्रांनी अलोट प्रेम दिले

मग शत्रूंनी दिलेल्या त्रासांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

मधुर आठवणी इतक्या आहेत

मग काही कटु अनुभवांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

मिळाली कौतुकफुले कैकवेळा जनांकडून

मग बोच-या काट्यांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

उगवणारा प्रत्येक सूर्य प्रकाशमान.

मग रात्रीच्या अंधाराचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

आनंदाचे दोन क्षण पुरे जगायला.

मग उदासवाण्या क्षणांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

चंद्र शीतल, आल्हाददायक.

मग त्याच्यावरील लांछनांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

नुसत्या आठवांनीही होते मन उल्हसित.

मग कुणी भेटल्याचा अन् न भेटल्याचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! llll

 

काही तरी चांगलं आहेच प्रत्येकामध्ये.

मग किरकोळ दोषांचा…

हिशोब तो काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा! ll१०ll

 

नाही ठेवला हिशोब, नाही लिखापढी

आहे त्याच्यापाशी, ‘चित्रगुप्ताचीचोपडी

हिशोबून सारे, त्याने ठरवायचे…

वसूल करायचे की रिटर्न द्यायचे! ll११ll

*नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा! *

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

 – – – अंगातली मस्ती कधी उतरणार

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉलमध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरियामध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्समध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात-आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात! पराक्रम दाखवण्याच्या नादात एक्स्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल.

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं, त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाईक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको?

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रेमाच्या अनेक व्याख्या अनेकांनी केल्या असतील….! प्रेम ही भावना अशी आहे की ती तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवते….!

संत स्वतः जगावर खरे प्रेम करतात आणि आपल्याला प्रेम कसे करावे हे शिकवतात….!

दुसऱ्याचे अत्यंतिक कल्याण व्हावं, त्यासाठी आपण काही कष्ट/कृति आनंदाने करावेत आणि ईश्वराच्या कृपेने त्यात यश मिळाले तर दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदित व्हावे, दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावे, त्याच्या दुःखात त्याच्या मनावर फुंकर मारून, त्याच्या दुःखाची जाणीव कमी करण्याचा प्रयत्न आपण निरपेक्ष वृत्तीने करावा….!

…. याला प्रेम म्हणता येईल….!!

आपण आपल्या कुटुंबातील, परिवारातील सर्वांवर अशा प्रेमाचा वर्षाव करावा….! जगावर प्रेम करणे म्हणजे देवावर प्रेम करणे, कारण या साऱ्या सृष्टीचा मालक भगवंत आहे….!

लेकरावर प्रेम केले, त्याचे कौतुक केलं की नकळत त्याचा आईला आनंद होतो….

प्रेम जगावर करावे, फक्त त्यात पडू नये…!! “

कारण.. प्रेम करायला पैसे लागत नाही, पण प्रेम दाखवायला पैसे पुरत नाहीत… हे लक्षात असावे.

सर्व संत सांगतात,

*देवावर प्रेम करायला शिकायचे (भक्ति करायला शिकायचे असेल…..) तर आपल्या जवळच्या माणसांवर विनाअट (त्यांचे गुण अथवा दुर्गुण न पाहता…) प्रेम करण्यास सुरुवात करावी…! *

*देवाने दिलेल्या माणसांवर निर्व्याज, निर्मम प्रेम करायला शिकलो की देवावर आपसूक प्रेम बसेल…! *

*मग, आपण म्हटलं तरी तो देव आपल्याला सोडणार नाही….. *

असे *निर्व्याज, निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम करणारा एखादा मनुष्य आपल्या आयुष्यात असावा अशी प्रार्थना मी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी करत आहे. *

आपण प्रयोग करून पाहू….

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सध्या चालू असलेल्या भारत इंग्लंड ची मॅच, मी माझ्या वडिलांबरोबर बघत होते. शेवटच्या बाॅलवर सिक्स गेला. व त्या एका बॉलमुळे म्हणा किंवा सिक्स मुळे म्हणा आपण हातातोंडाशी आलेला मॅच हारलो.

त्या नंतर त्यावर चर्चेला रंग चढला. जो तो आपापल्या बुद्धी नुसार, त्या एका बाॅलवर आपली प्रतिक्रिया देण्यात दंग होता. चर्चेला उधाण आलं होतं. प्रत्त्येक जण या क्षेत्रातील expert असल्यासारखे विश्लेषण करत होता.

बॉल असा फेकला असता तर, पिच कसं आहे?? त्याप्रमाणे बॉल फेकायला पाहिजे होता. या मोमेंटवर कोणी फुल टॉस बॉल फेकतो का?? वगैरे वगैरे  अंतरराष्ट्रीय स्टेजवर बसलेले कॉमेंटेटर्स तर आपले गहन विचार मांडत होते. जूने उदाहरण देऊन यावर चर्चा करण्यात गुंग होते. काय आणि कसं करायला हवं होतं?? यावर ‘expert comments ‘ देण्यात प्रत्येकाने स्वतः ला झोकून दिलं होतं. क्रिकेट प्रेमी तर पार कोलमडले होते.

मी बाबांना विचारलं, हे सर्व बरोबर बोलताहेत का?? मला मॅच बघायला आवडत, पण खूप बारीक सारीक डिटेल्स काही कळत नाही. डिस्कस करता येत नाही.

तेंव्हा बाबा म्हणाले,  

हा बॉलरही इंटरनॅशनल प्लेअर आहे. बरेच मॅचेस खेळलेला आहे. तो प्रत्यक्ष फिल्ड वर आहे. त्यानेही काही तरी विचार बॉलफेकण्यापुर्वी केलाच असेल ना. त्यालाही हे “एक बॉल पाच रन्स ” हे समीकरण माहित होतं, त्यालाही जिंकायचीच इच्छा होती. ते त्याच्या करिता आणि टीम करिता सर्वच दृष्टीने आवश्यक होतं. महत्वाचे होते. आणि फायद्याचेही होत. मॅच विनर/ फिनिशर म्हणून त्याच्यावर शिक्का लागला असता. तर, त्याची ‘ IPL’ मध्येही किंमत वाढली असती. जाहिराती मिळाल्या असत्या.

“जैसा परफोर्मेंस वैसी प्राइस मिलती हैं।” बॉल फेकण्याआधी कॅप्टन व त्याचे डिस्कशन ही झाले होतेच.

पण यावेळेस निशाणा ठिकाणी लागला नाही. हे खरय. त्याने जो विचार करून बॉल फेकला, तसं झालं नाही. बॅट्समनला पण जिंकायचं होत, त्यांच्यासाठी पण एकच चान्स होता, त्याने शेवटच्या बॉलवर आपले प्राण लावले, शक्ती लावली, तो सफल झाला.

यात चूक कोणाचीच नाही. असं होतच.

“कोशीश करना हमारा कामं है, हारजीत तो परिणाम हैं ”

दोघांनी आपापल्या दृष्टीने बरोबरच विचार केला. सिक्स च्या जागी तो कॅच आउट झाला असता. कदाचित स्टंप्स उडाले असते. तर बाजी पालटली असती.

आयुष्यातही असच होत असत. किती तरी निर्णय आपण घेत असतो. प्रश्न / समस्याच्या degree of difficulty, नुसार आपण त्यावर विचार करतो, कधी दुसऱ्या कोणाबरोबर विचार विमर्श ही करतो. प्रत्येकाला आयुष्यात जिंकायचेच असते. कोणालाही हार, नुकसान नको असते. प्रत्त्येक जण धावायचाच प्रयत्न करतो, पडायचा करत नाही. पण प्रत्त्येक वेळेस आपल्या मनासारखे होतेच असं नाही. निर्णय घेताना परिस्थिती वर खूप विचार करूनही कधी कधी नुकसान होतेच. हार होते, निर्णय चूक घेतला, हेही सर्व नंतरच कळत. घटना घडून गेल्यावरच कळत. शेअर्स मध्ये नुकसान झाले. घराचे बुकिंग झाल्यावर बिल्डरने धोका दिला, पैशाची गुंतवणूक चूक जागी झाली. हे सर्व नंतरच कळत. प्रयत्न शेवटपर्यंत जिंकायचाच असतो.

हार की जीत मॅच झाल्यावरच कळत.

यालाच नशीब म्हणतात का??

प्रत्त्येक निर्णय विचार पूर्वक घेतल्यानंतर ही असं का होतं??

परिस्थिती बदलली की निर्णयही बदलतात.

वेळ कधी कशी येईल?? सांगता येत नाही. रात्री रामाला राज्य द्यायचा निर्णय झाला होता, परंतु सकाळी वनवास मिळाला.

“अपेक्षा घेऊन सुरू केलेला प्रत्येक दिवस अनुभव देऊनच जातो, मग तो देवमाणूस असो नाहीतर सामान्य माणूस असो. “

निसर्गाच्या नियमानुसार बदल होत असतात. आयुष्यात ही बदल होत असतातच. बालपण, तारुण्य, म्हातारपण या वेगवेगळ्या फेज मध्ये खूपदा गणित बदलत, समीकरण बदलतात. तेंव्हा त्याप्रमाणे आधी घेतलेले निर्णय कधी विचार पूर्वक तर कधी नाइलाजाने बदलावे लागतात. म्हणून निर्णय घ्यायचेच नाही असं नाही. पण लवचिकता ठेवावी. जेवढ लवचिक राहाल तेवढं चांगलं.

खूपदा लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर आपण चर्चा करतो. जोपर्यंत आपल्यावर एखादी ‘तशी’ वेळ येत नाही. तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी चे गांभिर्य कळत नाही.

घरचा प्रमूखाला तर नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्या निर्णयावर तर घरच्यांच्या बऱ्याच गोष्टी/ भविष्य अवलंबून असतात. प्रमूख नेहमी परिवाराच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतो. पण ते नेहमी बरोबरच सिद्ध होत, असं नाही.

घरच्या प्रमूखाची स्थिती घरावरील पत्र्याच्या शेडसारखी असते, जो ऊन, पाऊस, वादळ, वारा सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो. आयुष्यात येणारे उतार चढाव सर्वांना तोंड देतो. आपल्या क्षमतेनुसार निर्णय घेतो. पण त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की,

“हा खूप आवाज करतो. ” नेहमी सर्व खुश असतातच असं नाही.

घरच्यांना बरेच निर्णय पटत नाही. कदाचित चूकतही असतील. पण जाणूनबुजून कोणी नुकसान करण्यासाठी चूकीचे निर्णय घेत नाही.

कदाचित नशीबात तेच लिहिले असते. म्हणून तसे निर्णय घेतले जात असावेत.

“अकल कितनी भी तेज़ हो, नसीब के बिना  जीत नहीं सकते ।”

म्हणतात ना,

” देवाला हसवायचे असेल तर त्याला आपला प्लान सांगावा, तो म्हणे गालातल्या गालात हसतो. ” त्याने आधीच आपले आयुष्य ठरवून ठेवलेले असते, त्याचे सर्व निर्णय घेऊन झालेले असतात.

“कोई चाहें कितना भी सोच ले,

आखिर में हुकुम का इक्का कुदरत ही फेंकती हैं।”

निर्णय चूकला तर वाईट वाटणे सहाजिकच आहे. पण (guilt) अपराधीपणाची भावना नसावी.

कधी कधी न ठरविलेल्या/ अपेक्षा नसलेल्या गोष्टी सहज घडतात/मिळतात. तर कधी खूप विचार करून घेतलेले निर्णय अपेक्षेप्रमाणे, मनासारखे नसतात. यालाच बहुतेक नशिबाचे खेळ म्हणतात.

म्हणूनच म्हणतात,

दैव जाणिले कुणी???

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर

जागतिक जल दिन हा २२ मार्चला असतो. हे निमित्त साधून आपल्याला हा दिवस अगदी रोज म्हणजे रोज साजरा करायचा आहे.

जलदेवता प्रसन्न असेल तर शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि रोग आणि आजार हे कायम लांब राहतात. जलदेवतेला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाणी वाया न घालवणे आणि पाण्याचा योग्य उपयोग करणे.

 ——–

सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याचे महत्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्याकरता जगभरात दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.

जगप्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांनी जागतिक जल दिन साजरा करण्याची संकल्पना सर्वप्रथम जागतिक मंचासमोर मांडली आणि यूएनओ च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला.

आपण पाणी वाया घालवणं म्हणजे कुणालातरी तहानलेले ठेवणं, इतका सोपा आणि साधा विचार जर आपण प्रत्येकाने केला, तर कुठल्याही खेड्यात / गावात / शहरात पाणीटंचाईवर मात नक्कीच होऊ शकते. म्हणूनच म्हणतात पाणी वाया न घालवणे हे एक सोपं आणि साधं पुण्य मिळवण्याचं साधन आहे.

सर्वसाधारणपणे घराघरांमध्ये पाण्याचा वापर असा होतो – आंघोळ, टॉयलेट, भांडी घासणे, कपडे धुणे, वॉश बेसिन चा वापर, बाल्कनी मधल्या कुंड्यांना पाणी, बाल्कनी धुणे, कार स्कूटर धुणे, घराभोवती असलेल्या झाडांना पाणी घालणे, घरा भोवतीची फरशी धुणे, वगैरे वगैरे.

या प्रत्येक हालचालीचा प्रत्येकाने एक त्रयस्थ म्हणून जर आढावा घेतला, आणि सगळ्यांच्या आढाव्यांची गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की आपण घरातला प्रत्येक जण जेवढे पाणी वापरतो त्यापैकी ८० ते ८५ टक्के पाणी हे वाया जात असते आणि फक्त १५ ते २० टक्के पाण्याचा खरा आणि आवश्यक वापर होत असतो. हे कसं काय ते आता बघू – 

घरामध्ये काहीही वाया जाऊ नये याबद्दल घरातल्या स्त्रिया नेहमीच सजग असतात.

म्हणून विचार केला, घराघरांमध्ये पाणी कसे वाया जाते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींना फोन करून त्यांचे विचार / अनुभव विचारावे.

काल दिवसभरात शाळेतल्या मैत्रिणी /कॉलेजमधल्या मैत्रिणी/ वाचक मैत्रिणी यांना भरपूर फोन केले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची गोळा बेरीज ही अशी –

१) आंघोळ / शॉवर – बहुतेक घरांमध्ये आंघोळ पूर्ण होईपर्यंत शॉवर सुरूच असतो. अंगाला साबण लावताना किंवा शरीर स्वच्छ करताना शॉवर नक्कीच बंद करू शकतो. किती पाणी वाया जात असते याचा अंदाज घ्या.

२) टॉयलेट – टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करणे नक्कीच गरजेचे असते. पण लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश टॅंक एवढ्या पाण्याची गरज नसते. आपण बाजूला नळाखाली छोटी बादली ठेवू शकतो आणि ते पाणी ओतू शकतो. किंवा ड्युएल सेटिंग चा फ्लश टॅंक घेऊ शकतो. एकदा थोडा खर्च होईल पण पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल. यामुळे जे पाणी वाचेल ते कल्पनेच्या बाहेरचे असणार आहे.

३) भांडी घासणे – भांडी घासताना नळ सुरूच असतो आणि पाणी वाहत असते. नको असेल तेव्हा नळ नक्कीच बंद करता येतो. भांडी धुताना मोठ्या भांड्यात जे पाणी जमा होते ते झाडाच्या कुंड्यांना नक्कीच घालता येते.

४) वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणे – आपण ऑटो सायकल सिलेक्ट करतो, कपडे टाकतो आणि मशीन सुरू करतो. कपडे थोडे असले तरी मशीन भरपूर पाणी घेते आणि ते सगळे गरजेचे नसते. कपडे बघून आपण low, minimum, medium वगैरे नक्कीच सिलेक्ट करू शकतो आणि पाणी वाचवू शकतो.

५) वॉश बेसिन चा वापर – सकाळी उठल्यावर दात घासण्याकरता, काही खाल्ल्या नंतर तोंड धुण्याकरता, चेहरा धुण्याकरता बहुतेक सगळ्याच घरांमध्ये बेसिन वापरले जाते. आपण बेसिन पाशी जातो नळ पूर्ण उघडतो आणि नंतर मग दात घासणे /चुळा भरणे / नाक स्वच्छ करणे/ घसा स्वच्छ करणे, हे सगळे आपण करतो आणि नंतर शेवटी नळ बंद करतो. आणि नळाची धार पूर्ण वेळ मोठी असते. म्हणजे ५ टक्क्याचा खरा वापर होतो आणि ९५ टक्के पाणी वाया जाते.

पाणी कसं वाचवता येईल – बेसिनच्या खाली एक कॉक असतो. तो पूर्ण बंद करायचा आणि अगदी थोडासा उघडायचा. आता बघा बेसनची धार अगदी बारीक होईल. हातावर पाणी घेऊन सगळ्या क्रिया करण्याकरता ही धार अगदी पुरेशी असते. बेसिन जवळ असताना डावा हात नळावर ठेवायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा नळ सुरु आणि इतर वेळा बंद. बघा किती पाणी वाचेल. पाणी वाचवायचं म्हणून काहीही खाल्ल्यानंतर ८ – १० चूळा भरण्याचं मात्र टाळू नका.

(चुळा का भरायच्या याकरता माझा लेख वाचा – चूळा भरूया आणि निरोगी राहूया)

६) बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी- बाल्कनी मध्ये छोटी छोटी फुल झाडं, तुळस, गवती चहा, वगैरे लावण्याची बहुतेकांना आवड असते आणि ती छानच आहे. कुंडीतल्या झाडांना अगदी थोडं थोडं पाणी लागतं. बहुतेक जण आतल्या नळापासून एक पाईप आणतात आणि तो एका कुंडीत सोडतात. कुंडी भरून वाहायला लागली की दुसऱ्या कुंडीत..

ओव्हर फ्लो झालेले पाणी बऱ्याच सोसायटींमध्ये ग्राउंड लेव्हल ला चालण्याच्या पॅसेज मध्ये वाहतांना दिसते. आणि हे सगळे पाणी वाया जात असते.

७) बंगले वजा सोसायट्यांमध्ये झाडांना पाणी – बहुतेक जण पाईपनी सगळ्या झाडांना भरभरून पाणी देत असतात. आणि नंतर ते पाणी इतके जास्त होते की गेटमधून बाहेर पडून ते पाणी रस्त्यावर वाहायला लागते. काहीजण पाण्याच्या फवाऱ्याने आपल्या कंपाउंडचं गेट पण धुतात. काहीजण घरासमोरचा संपूर्ण रस्ता त्यावर पाणी मारून गारवा येण्याकरता पाण्याने ओला करतात.

८) कार / स्कूटर धुणे – बऱ्याच घरांमध्ये कार स्कूटर धुताना, पाण्याचा नळ पूर्ण उघडा असतो, आणि कार स्कूटर ची अक्षरशः धुलाई होत असते. पाण्याचा पाईप पंधरा एक मिनिट तरी सुरू असतो. जमिनीवर पाण्याचे लोट वाहत असतात. खरंतर कायमस्वरूपीच हे धुणे आपण टाळू शकतो किंवा अगदी प्रमाणात अधून मधून करू शकतो. गाडीची काच ओल्या फडक्याने पुसता येते आणि इतर भाग कोरड्या फडक्याने पण पुसता येतो.

९) घराभोवतीची फरशी धुणे – बहुतेक बंगल्यांमध्ये भोवतालची फरशी भरपूर पाण्याने धुणे हा रोजचा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी फरशी वरचा पालापाचोळा पाण्याच्या प्रेशरने ढकलत ढकलत गेटच्या बाहेर ढकलतात. खरंतर फरशांची अशी धुलाई नक्कीच टाळायला पाहिजे. खराट्याने फरशी झाडली तरी स्वच्छ दिसते. आणि कचरा पण गोळा करता येतो

१०) आजकाल सगळीकडेच उंच उंच इमारती होत आहेत आणि छतावरती सोलर वॉटर हिटर असतात. खालच्या कुठल्याही मजल्यावरच्या लोकांनी जर बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडला तर आधी उभ्या पाईपलाईन मधे असलेले एक ते दीड बादली गार पाणी येते आणि नंतर गरम पाणी यायला सुरुवात होते. आधी आलेले गार पाणी बाथरूम मध्ये ओतले जाते. यावर काहीतरी टेक्निकल सोल्युशन काढणे नक्कीच गरजेचे आहे पाणी वाचवण्याकरता.

११) एका मैत्रिणी नी तिचा एक अनुभव सांगितला –

मैत्रीण : अरे, काल मी चक्क पाण्याशी बोलले.

मला काही अर्थ लागेना, म्हणून मी म्हणालो, बाईसाहेब सगळं ठीक आहे ना!

मैत्रीण : अरे खरं तेच सांगतेय. त्यादिवशी मी संध्याकाळी फिरायला वेगळ्या रस्त्याने गेले होते. दोन्ही बाजूला बंगले आणि मधून रस्ता. थोडं पुढे गेले आणि रस्त्यावर पाणी वाहत होतं. आपण पाण्याला जल देवता म्हणतो. त्यामुळे पाण्यावर पाय देऊन पलीकडे जाणे मनाला पटत नव्हते. म्हणून मी कुठे कोरडा भाग आहे का ते बघत होते. तेवढ्यात मला एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज ऐकायला आला. मी इकडे तिकडे बघितले पण कोणीच नव्हतं. आणि लक्षात आलं की पाण्यामध्येच काहीतरी चेहरा दिसतोय आणि तिथून आवाज येतोय.

पाणी : मी पाणीच बोलतोय. तू या भागात पहिल्यांदाच आलेली दिसतेयस. पाण्यावर पाय देऊन जा काही हरकत नाही. आणि पुढे चालताना तुला बऱ्याच ठिकाणी पाण्यावर पाय ठेवून जावे लागणार आहे, कारण खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत असणार. आणि हे रोजचेच आहे.

मैत्रीण : मी मागे फिरते आणि दुसरीकडून जाते

पाणी : अगं रस्त्यावर असे वाहायला आणि वाया जायला मला पण आवडत नाही. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते त्यामुळे पर्यायच नसतो. आम्हाला तेव्हा रस्त्यावरून वाहावेच लागते. पण इतर वेळा गरजूंच्या तोंडचे पाणी काढून रस्त्यावर वाहणे मला पण पटत नाही. बट नो चॉईस.

मैत्रिणीने खाली वाकून पाण्याला नमस्कार केला आणि ती पुढे गेली.

पाणी कुठे कुठे वाया जाऊ शकते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींनी त्यांची छान छान ऑब्झर्वेशन्स आणि उपाय मला कळवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचे संकलन मी या लेखात केले आहे. हेतू हाच की सगळ्यांनी जर विचारपूर्वक पाण्याचा वापर केला तर पाणीटंचाई कुणालाही जाणवणार नाही, तहानलेले कोणीही राहणार नाही.

जागतिक जलदिन हा आपण सगळ्यांनी खरंतर रोजच अमलात आणायचा आहे. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो.

पाण्याला आपण जलदेवता म्हटलं तर आपण नक्कीच पाणी कुठेही आणि कधीही वाया घालवणार नाही. आणि पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही.

डॉक्टर माधवराव चितळे यांच्या या संकल्पने करता त्यांचे खूप खूप आभार आपण सगळेजण मानूया.

पाण्याच्या पंपाचा ज्यांनी शोध लावला त्यांचे पण आपण आज आभार मानूया. त्यांच्या शोधामुळेच आज आपल्या घराघरात, उंच उंच मजल्यांवर लांब लांब अंतरावरून पाणी येत आहे. शोधणारे जनक आहेत –

 French born inventor – Denis Papin.

ब्रह्मदेवांना पण आपण आजच्या दिवशी एक प्रार्थना नक्कीच करूया – कलियुग संपल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन सृष्टीची निर्मिती कराल तेव्हा समुद्राचे पाणी पण नदीच्या पाण्याप्रमाणेच गोड करावे. म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी राहील. टंचाई कधीच भासणार नाही.

रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिताना जलदेवतेला नमस्कार करायचा, आणि मनात मनन करायचं की मी आज कुठल्याही प्रकारे पाणी वाया घालवणार नाही.

 ll जय जलदेवता ll

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खिडकीतून दिसलं… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ खिडकीतून दिसलं… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

दोघेही तावातावाने गाडी जवळ आले. त्याने उजवीकडचे आणि तिने डावीकडचे दार जोरात उघडले. दोघेही एकमेकांशी रागारागाने बोलत होते. घरातून निघतानाच त्यांच्यात कुठल्यातरी कारणाने प्रचंड मतभेद होऊन वाद झालेला असणार. कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनीही सीट बेल्ट खसाखसा लावले. त्याने गाडी सुरू केली. त्याच्या मनातल्या रागामुळे गाडीही ‘घूमघूम” आवाज करतच सुरू झाली. अत्यंत वेगाने पार्किंग मधले वळण पार करून गाडी फाटकाबाहेर पडली.

खिडकीतून हे सारं पहात असताना माझा जीव कमालीचा धडधडत होता. इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत गाडीत सुद्धा ही दोघं भांडतच राहतील का? त्यांचं भांडण विकोपाला गेले तर? त्याचा स्टीअरींग वरचा कंट्रोल गेला तर? समोरून येणारा एखादा जड ट्रक त्याला दिसला नाही तर? काय होईल या विचाराने मी मात्र घामाघूम झाले.

का भांडली असतील ही दोघं? काय बिनसलं असेल असं त्यांच्यात?

दोघेही करिअर माइंडेड तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. आर्थिक दृष्ट्या संपन्न. इतक्या लहान वयात या क्लास्ड सोसायटीत तीन बीएचकेचा त्यांचा फ्लॅट, गाडी, हाय फाय जगणं. यश, कीर्ती पैसा सारं काही. भांडणाचा नक्की विषय काय असेल? त्याला मुल हवं असेल. हिला नको असेल. जबाबदारी कोणी निभावायची? वेळ कोणाकडेच नाही मग “मीच का? ” असा प्रश्न उपस्थित झाला असेल मग त्यातून दोघांचे पराकोटीचे इगोज!

किंवा तिला प्रमोशन मिळालं असेल, नव्या संधी तिच्यापुढे आरतीचं ताट घेऊन उभ्या असतील. पुन्हा एकदा अंतस्थ धुमसणारा द्वेष, मत्सर, चढाओढ. जोडीदाराचे यश पचवण्यासाठीचं मानसिक औदार्य नसणं वगैरे वगैरे किंवा असं असेल का? त्याचे वृद्ध आई-वडील, ती एकुलती एक म्हणून तिच्यावर असलेली तिच्या आई-वडिलांची नैतिक जबाबदारी, शिवाय तिच्याकडून अपेक्षित असलेल्या सामाजिक रीती परंपरेचं ओझं? मग त्यात पुन्हा “मीच का? ” या प्रश्नानं डोकं बाहेर काढणं?

दिवसभर खिडकीतून पाहिलेल्या भांडत जाणाऱ्या या सुंदर तरुण जोडप्याचा विचार मी करत बसले. स्वतःला त्यांच्या वादांची कारण शोधण्यात गुंतवून घेतलं आणि शिणवूनही घेतलं. लगेच मला माझ्या ज्येष्ठ असण्याचा अधिकार वाटू लागला. आज कालची पिढी म्हणजे अक्रस्ताळीच, डोक्यात राग घालणारीच. “एक घाव दोन तुकडे” नात्यांची तोडमोड क्षणात करणारे. यांना कुणीतरी मोठेपणाच्या नात्याने समजावले पाहिजे, “अरे! संसार म्हणजे तडजोड. एकमेकांना समजून घेणं. घ्यावी लागते माघार कधीतरी आणि घ्यावी की, थोडी वाट पाहावी, शब्दांचे विखारी बाण एकमेकांवर त्वरित सोडण्यापेक्षा मौन बाळगावं, थंडपणे समस्येची उकल करावी. ” बोलेन मी त्यांच्याशी.

संध्याकाळपर्यंत हीच टकटक माझ्या डोक्यात.

मोकळी हवा येण्यासाठी पुन्हा बंद खिडकी उघडली. तिन्ही सांजा उतरल्या होत्या. लोक घराकडे परतत होते आणि मी चकित होऊन पहातच राहिले. सकाळची ती भांडणारी दोघं आता मात्र हसत खेळत गाडीतून उतरली. भरपूर शॉपिंग केलेलं असावं. एकमेकांच्या हातातलं सामान दिलं घेतलं आणि हातात हात घालून, हवेचे मंद झोके अनुभवत थट्टा मस्करी करत ते लिफ्टपाशी गेले.

माझ्या मात्र दिवस विनाकारण खराब गेला होता पण आता या क्षणी मनातून मीही विसावलेच होते की! मनातल्या मनात त्यांच्या सुखी सहजीवनासाठी मी प्रार्थनाही करून टाकली.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्नेहलता गाडगीळ ☆

स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्नेहलता गाडगीळ ☆

वेळेवर उठण्यापासून वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..

बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्ली पासुन दिल्ली पर्यंत सगळ्या विषयावर खाडखाड बोलु शकतो…

त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजुनच वाढतो.

बारकाईने विचार करा…

साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण भात भाजी पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्ना बद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…

 

या भाजीत हे व्हिटामीन..

पोळीत एवढ्या कॅलरी..

सॅलड पाहीजेच..

गोड नको रे बाबा…

हे तेल असं ते तेल तसं…

१०००० पावलं चाललंच पाहिजे..

 

फलाणं आणि बिस्तानं…

अरे दोन घास ताटात आलेत ते खायचे नाही नीट आणि शंभर नाटकं…

 

शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… हे सुत्रं नाहीच हल्ली…

 

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचय… तरुणच रहायचय… तरुणच दिसायचय… कशासाठी…???

तरुण मुलांना दिसु द्या कि तरुण.. तुमचं तरुणपण झालय ना जगुन… आपण काय अश्वत्थामा आहोत का??? पृथ्वीवरच कायम रहायला..

 

Accept the reality… and live your life happily.

 

मी एक अति छोटी व्यक्ती आहे

जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही..

असं रोज स्वतःला सांगितलं तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.

 

फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…

 

काही दिवसांपूर्वी मी असंच खुप ज्ञानाचा विस्तार केला होता… माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं कि या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय 

मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केल्या आणि आता खुssss प बरं वाटतय..

 

आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करतो… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सुत्रं आहे सध्या…

 

तुम्हाला एक गंमत सांगतो…

नविन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…

राहु खराब… केतु खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…

म्हटलं हे ऐकुन वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा…

 कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडुन…

 

आता मस्त वाटतंय..

 

रोजचं जेवण… रोजची झोप.. रोजची आवराआवर… रोजचं रुटीन याचा ताण घेऊ नका…

तुमच्या सोयीने ते करा… आणि मनापासुन केलेलं कधीही अपाय करत नाही… त्याचा उपयोग चांगलाच होतो..

 

घेऊ नका ताण आणि जगणं करा छान..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप… ☆ त्रिशला शहा ☆

त्रिशला शहा

??

☆ निरोप… ☆ त्रिशला शहा 

“निरोप कसला माझा घेता

जेथे राघव तेथे सीता”

… गीतरामायणातील अतिशय ह्रद्य असे, श्रीराम वनवासात जाताना आपल्या प्रियेचा निरोप घ्यायला सीतेच्या कक्षात येतात तेव्हा सीतेच्या तोंडी असलेले हे गाणे.

 निरोप, एक साधा तीन अक्षरी शब्द, पण या एकाच शब्दामध्ये अनेक भावभावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. एक प्रकारची हुरहुर, करुणा, वैषम्य, स्नेह, आनंद मनात साकारत असते. निरोप देणे म्हणजे नव्याचे स्वागत करणेही असते म्हणूनच काही वेळा निरोप देणे म्हणजे आनंद साजरा करणे असते.

 आत्ताच पहा नं, आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय आणि नविन वर्षाचे स्वागत करतोय. हा अतिशय आनंदाचा क्षण कारण फाल्गुन अमावस्येचा अंधार संपून चैत्राची नवी पहाट येते तेव्हा गुढ्या तोरणे उभ्या करुन आनंदोत्सव साजरा करतो.

 तीस-पस्तीस वर्षे नोकरी करुन योग्य वयात सेवानिवृत्ती घेताना निरोप समारंभ होतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः साठी जगण्याची ही एक संधीच असते. घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना परत या असा आग्रहही असतो. एकाद्या सुंदरशा समारंभाचा शेवट आभार मानून करताना त्या समारंभाच्या यजमानांचा निरोप घेऊन आपण घरी परततो. लग्नात मुलीला सासरी पाठवताना तिला निरोप देताना घरच्या सगळ्यांना च भावना आवरता येत नाहीत. मुलीचे मनही कातर होतेच, हे जरी आनंदाश्रू असले तरी त्यातील निरोपाची भावना मनाला हुरहुर वाटणारीचं असते.

 सहलीला जाताना मन अगदी आनंदाने भरून येते पण परतीचा प्रवास कधीतरी सुरु करावाच लागतो मग त्या उधाणलेल्या लाटा असोत, दरीडोंगर असोत किंवा एखादी मस्त बाग असो, निसर्गाच्या अद्भूत नजाऱ्याचा देखावा असो या साऱ्याला टाटा बायबाय करून आपल्या कर्तव्याच्या जगात परत यावचं लागते. एखाद्या सुंदरशा मैफिलीची सांगता करावीच लागते.

निरोप घेण्याचा आणि देण्याचा अतिशय ह्रद्य प्रसंग म्हणजे देशावरच्या सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला निरोप देण्याचा. आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्या जवानाचे मन कातर होतेच पण भारतमातेच्या रक्षणासाठी मन सीमेवर धावही घेते. घरच्यांची पण अवस्था यापेक्षा वेगळी नसते.

 दहावीच्या निरोप समारंभात लहानपणापासून शिक्षण घेत आलेल्या शाळेचा निरोप घेताना त्या विद्यार्थ्यांना भावना अनावर होतातच पण पुढील शिक्षणासाठीची भरारी घेताना मन आतुरलेले असते.

 म्हणूनच निरोप देणे म्हणजे नविनच्या स्वागतासाठी सज्ज होणे. इथे कुठेही भावनेला महत्व उरत नाही हेचं खरे.

 

© त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गावजत्रा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ गावजत्रा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातील गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. 

रब्बीची पिके घरी येवून पडलेली असतात. बुरुडाकडून आणलेल्या, गोमयाने अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्यांच्या कणग्यांची पोटे नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून, वर राख आणि शेणांनी ती तोंडे लिंपली जातात. आता अश्विनापर्यंत तोंडे बंद!

उरलेल्या धान्यांच्या खरेद्या-विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडे आनंदीआनंद असतो. मुलं, नातवंडांना नवी कापडं, नातींना परकर-पोलकी- गवानं, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना, लेकींना लुगडी-चिरे-चोळ्या घ्यायच्या असतात. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागही करायची इच्छा असते घरधन्याची. 

गावातील सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तने होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठूभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहाने पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा-दवण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढे आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, आनंदी आनंद असतो.

आमच्या माळशिरस (भुलेश्वर) गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बारशीला (चैत्र शु. द्वादशी) असतो. सकाळी सहा वाजता ग्रामदैवत, ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, सात वाजता गावातील भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वरला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर (शिवपिंडीवरील दंडगोलाकार शाळिग्राम) जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री साठेआठला गावात छबिना निघतो. ढोल-लेझिम पथके नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालके नवी वस्त्रे लेऊन, नटूनथटून सहभागी होतात.

गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हाटेले इ. फिरत्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटलेली असतात. बाया घोळक्याने बाजारात फिरत, हसंत खिदळत, कलकल करीत खरेदी करीत असतात. एक लेकरु कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलंत घरंगळंत चालल्यासरखं चाललेलं, गर्दीतून चाँवचाँव करीत वाट काढीत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ, गारेगार घेत असतात. 

जत्रेच्या निमित्ताने घरोघरी सोयरेधायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी, पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढले जाते. सारा दिवस धामधुमीत जातो. 

या दोन-चार दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू कन्या-पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी, टेहाळणी काही धूर्त, चाणक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य, आनुरूप सून-जावई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सूतोवाच्य करून ठेतात, जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे आणि जमीन, घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोईने संपन्न होतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे चैत्र शु. त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजने होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रिडा नैपुण्याचे प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यांच्यावर कौतुक म्हणून रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोरा-टोरांच्या, प्रेक्षकांच्या उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमधे विजेत्याला रोख रकमांची पारितोषिके दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरील मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादे लोकनाट्य (तमाशा) रंगते.

नमन, गण-गौळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल व लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरील आपले प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदकारीला प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून, डोईचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्विअर्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो, प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेले लोकनाट्य पहाटे पहाटे संपते. गावकरी पुढील वर्षभर पुरेल येवढ्या आनंदाची साठवण मनात करीत आपापल्या घरी परततात.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा असे म्हणतात. पण संकल्प हा संकल्प च रहातो हा आपला अनुभव आहे. असे का घडते यावर थोडे चिंतन केले तर जाणवते आपण काही तरी वेगळे करु किंवा काहीतरी वेगळे मिळवू असा मनात विचार करुन आपण संकल्प करतो हे जाणवले. मग काहीतरी विशेष भले ही ते छोटे का असेना करावे असे वाटते इथेच आपली खरी चूक होते. काहीही वेगळे न करता आहे तेच जर सातत्याने केले तरी समाधान मिळते. 

सण समारंभ उत्सव साजरा करण्यामागे आनंद मिळणे ही भावना असते. सणाच्या दिवशी करण्यात येणारी विशेष तयारी ती फक्त एक दिवस न करता दैनंदिन जीवनातच थोडं थोडं करत गेलो तर रोजच तो आनंद मिळणार नाही का? (जर त्या दिवशी तो मिळतो हा अनुभव आहे तर रोजही मिळणारच! ) 

उदा. गुढीपाडवा पहाटे उठणे, रांगोळी काढणे, तुपाचा दिवा लावणे व रामरक्षा या मूलभूत गोष्टी रोज केल्या तर त्याची शिस्त मनाला शरीराला लागेल व रोज व गुढिपाडव्याला मुहूर्तावर गुढी उभारल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल. दैनंदिन व नैमित्तिक गोष्टी एकात एक मिसळतील व समाधान सतत मिळेल केवळ सातत्याने!

नैमित्तिक तर करायचेच मुहूर्तावर पण त्यातील मूलभूत गोष्टी करुन त्या शिस्तीत जीवन जगले तर वर्तमानाचाही आनंद घेता येईल. 

आनंद समाधान केवळ एका विशिष्ट क्षणी कसे असेल. 

वर्तमानात जगण्यासाठी सातत्य व शिस्त लागतेच तर त्या मुहूर्तावरील आनंद शाश्वत असेल. 

करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा

।श्रवणनयनजं वा मनसं वपराधं” ।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।

जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥

पवित्र विचार, पवित्र वातावरण, दिवा लावणे स्तोत्र म्हणणे या नित्याच्या गोष्टी मनापासून, सतत करत करत नैमित्तिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहज वागणे शक्य करणे म्हणजे हा संकल्प नसून सहजता ठरेल. ही सहजताच ताण न देता खरे समाधान देणारी ठरू शकते.

आचार्य म्हणतात जे जे कृत्य करू ते सगळे भगवंताच्या साक्षीने केले तर तीच त्याची सेवा ठरते. वेगळं काही करण्याच्या नादात सहजता निसटते व‌ वर्तमानातील आनंद न मिळता संकल्प हा ताण ठरतो व तो पूर्ण होत नाही. 

आचार्य तर म्हणतात ईश्वरसाक्ष जीवन असेल तर निद्रा सुद्धा समाधी ठरेल. यावर मनन केल्यास साधेपणा व नैसर्गिकताच आपले समाधान आहे. 

संकल्प म्हणजे रोजचेच वागणे सहज केले तर वेगळाच अनुभव मिळू शकेल असे वाटते.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares