मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अखेरचा हा तुम्हा दंडवत… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों… कित्येक वर्षांपासून आमची मुळंपाळं या भूमीच्या गर्भात खोल खोल रूतून भक्कमपणे रूजली गेल्यामुळे ही डेरेदार वृक्षराजी आपल्या थंडगार सावलीची शाल या आजूबाजूच्या परिसरावर पसरून बसली होती… पावसाचं पाणी नि जमिनीतली पोषणमुल्ये यावरच कोवळ्या अंकुरापासून जी जीवनाची वाटचाल सुरू केली म्हणतोस ते आजतागायत परिपक्वतेचा वटवृक्षाचा पार होईपर्यंत… सारं काही निमुटपणाने, अबोलपणाने, अचल राहून साक्षीत्वाने वर्तमान जगत नि जागता राहीलो… माझ्या अपेक्षाचं ओझं मी माझ्याच खांद्यावर वावगत राहीलो पण त्याच वेळी तुमच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षांना मात्र भरभरून फळ देत गेलो… हीच काय ती माझी निरपेक्ष नि :स्वार्थ सेवा मी म्हणजे आम्ही तुमची करत आलो… प्रतिकूल उन्हाळ्याच्या संघर्षाचे चटक्यांनी जेव्हा तुमचे तन नि मन भाजून निघायचे तेव्हा त्या तापलेल्या देहाला नि मनाला माझ्या सावलीत थंडावा लाभायचा… गार वाऱ्याची झुळूक ताजतवानं करून जाताना पुन्हा जोष भरायची… आणि पुढे तुमची वाटचाल सुरू व्हायची… तप्त झालेली ती अवतीभवतीची जमिन देखील माझ्या सहवासात असल्याने समाधानी आनंदी राहयची.. मला तेव्हढाच तीचे अल्पांशाने का होईना पण ऋण फेडल्याचा हलकेपणा वाटून जाई… पण ते ऋण कधीही न फिटणारे आहे याची मला पूर्ण कल्पना असायची… कर्तव्यपूर्तीचं समाधान लाभत असे अश्यावेळी… जीवन रहाटचक्रानूसार आमच्यातला कुणी वयोमानानुसार वाळून जरठ होत असे तेव्हा वठलेल्या खोडाला मग वाळीत टाकलेला एकाकीपणा जाणवत जाई… तर कधी निर्सगालाच दया येऊन तो मुळासकट मग उन्मळून टाकी… तेव्हा क्षणाचं वाईट तर वाटायचं पण त्यावेळी असही वाटायचं आपल्याच सावलीच्या पदराखाली वाढीस लागणारी ती लहान मोठी झाडं यांच्या पुढच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आपण जागा करून द्यायची नाही तर मग कुणी… आणि त्या नवोदितांना स्व:ताच्या बळावर कधी फुलावे, बहरावे.. परावलंबित्व असण्यापेक्षा स्वाल़ंबी असणे अधिक गरजेचे नाही का.. असा सर्वहिताचा विचार करून आपली जागा मागच्यांना रिकामी करून देऊ लागलो… पण कर्तव्यात एव्हढी म्हणून कसर सोडली नाही.. ते तहहयात निभावत गेलो… कालानुरूप सगळ्या जगाचा चेहरामोहरा बदलत गेला… तुम्ही निरकुंश सत्ता सगळ्यावर चालवत गेलात तरीही आमच्या शिवाय तुमचं जगणं शक्य नव्हतचं… या गोड भ्रमात आम्ही गाफि़ल राहिलो आणि आणि तिथेच पहिली कुर्हाड आमच्या मुळावर तुम्ही घातलीत… का तर सुखाच्या समृद्धीचा राजमार्ग निर्वेध करण्यासाठी आमची कत्तल करण्याशिवाय तुमच्यापुढे दूसरा पर्याय नव्हता… अगदी निष्ठूरपणे नि असहिष्णुतेने आमचा गळा घोटलात… पण खरं सांगू तुम्ही आम्हाला नव्हे तर तुम्ही स्वतःलाच उध्वस्त करत गेलात… जंगल, रान झाडे झुडपे नाहीशी केलीत आणि उघडा बोडका कातळ वांझ माळरान निर्माण केलात… मैलोगणती अंतर टप्यात आले खरे पण तुमच्या हृदयातील ममतेचे अंतर मात्र दूरावत गेले… उद्या आम्हाला इथून गच्छंती करण्यात येणार आहे.. तेव्हा पुन्हा काही आम्ही असे तुमच्या कुणाच्याही दृष्टीला पडणार नाही… इतकचं काय तुमच्या भावी पिढ्यांच्या स्वप्नातही आम्ही दिसणार नाही… तेव्हा बघून घे रे एकदा आम्हाला आणि सांगशिल इतरांनाही बघून घ्या म्हणावं आता आजच्या घडीला आम्हाला… उद्याचा काहीही भरवंसा देता येत नाही गड्यानों…

अखेरचा हा तुम्हाला दंडवत.. सोडोनि जातो गाव…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # युद्धाची झळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # युद्धाची झळ… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हं हं हं! उगाच चोची आ वासून उघडू नका… मी जे चोचीत धरून आणलयं ते तुमच्यासाठी नाही… ती पुढच्या दिवसांची बेगमी करून ठेवायची आहे… तुम्ही आता काही लहान राहिलात नाही की घरट्यात बसवून तुम्हाला जेवायला नि खायला चोचीने भरवायला पाहिजे… जरा घरट्याबाहेर पडून बघा… स्वत:च्या पंखाच्या ताकदीचा अदमास घ्या… आकाश पंखावर तोलता येतयं का पहा… बाहेरच्या वातावरणात विचरून पहा म्हणजे तुम्हाला कळेल… कि अन्न शोधणं म्हणजे किती दिव्य असते ते… त्यात हे युध्याचे दिवस सुरू झाले आहेत… इंधन तुटवडा निर्माण झाला असल्याने माणसांचा लोंढा आता जंगलातली तशीच रस्यावरची झाडं सरपणासाठी तोडायला लागला… म्हणजे आपल्या घरट्यावरच गदा आली आहे… आधी भक्कम नि सुरक्षित निवाऱ्याची सोय बघायला हवी.. आणि त्यानंतर आपलं अन्न शोधायाला बाहेर पडणं गरजेचं आहे.. जंगलच आता ओकंबोकं झाल्यानं तिथं मिळाणाऱ्या आपल्या अन्नाची पुरी वासलात लागलीय… तिथं इतर भुकेजलेली गिधाडं, डोमकावळे तर दबा धरूनच बसलेत. आपल्यासारख्या दुर्बळ पक्षी इकडे फिरकला तर त्याचाच चट्टामट्टा कधी करतोय याकडे काकदृष्टीने टेहळणी करत बसलेत… शहरात पूर्वी रस्त्यावर राजरोसपणे उघड्यावर अन्न टाकून देत होते ते देखील आता बंद झाले आहे… काही तुरळक हाॅटेल उघडी दिसतात आणि त्यात मुंग्या च्या रांगा लागतात तश्या त्या माणसांच्या रांगा लागून त्यांचे अन्न घेताना दिसतात… एक एक शित आता तिथं फार मोलाचं ठरत असल्याने अन्न वाया घालवत नाहीत.. त्यामुळे तो ही अन्न मिळविण्याचा मार्ग आता जवळपास बंद होत आलाय… आधीच प्रदूषणामुळे हवा दूषित झालीच आहे. त्यात या युद्धाची भर पडल्याने ते दारूगोळा नि रासायनिक धूरांची भर पडल्याने जगायला आवश्यक असा प्राणवायू सुध्दा संपत आला आहे… कडक उन्हाळा तर चांगलेच भाजून काढतोय.. पाण्याचे पाणवठे कोरडे ठाक पडले असल्याने पिण्याचे पाणी पण मिळणे दुर्लभ झाले आहे… पाणी नाही, अन्न नाही, निवारा नाही… अश्या स्थितीत आपलं जगणं मुश्किल होऊन बसलयं… जिथं माणसांनाच त्यांच्या जगण्याची चिंता लागून राहिलीय तिथं ते आपल्या सारख्या छोट्या पक्ष्यांचा विचार तरी कसा बरे करतील… सहानुभूती आता नावालाही सापडत नाही… भूतदयेचं थडगंच बांधले गेलयं… बरं स्थलांतर करून प्रश्न सुटेल असे काही वाटत नाही… कारण हे साधं युद्ध दिसत नसून जागतिक युद्ध सुरू झालयं असचं वाटतयं आणि त्याची व्याप्ती ही हळूहळू दिवसागणिक अधिक विस्तार पावून अधिकाधिक युध्दाची तीव्रता वाढत जाणारी आहे… एक प्रकारे तिसरं महायुद्ध सादृश्य असं त्याचं रूप दिसू लागलयं…

तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी ओळखून सगळ्या जीवनावश्यक गोष्टींची बचत करत चला… जितकं बाहेरून अन्न व इतर गोष्टी आणता येतील त्या आणून त्याचा उद्यासाठी संग्रह करत चला… युध्द कधी थांबेल याची शाश्वती देता येत नाही… आणि आज मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी उद्या बाजारात मिळतीलच याची खात्री नाही… तेव्हा एक से भले दो.. दो भले तीन और तीन से भले चार कार्याला जुंपून घेऊया… तरच उद्याचं जिणं जगता येईल… अन्यथा…

आपल्या स्वार्थासाठी तिकडे माणसांनी माणसांशी युध्द सुरू केलेय… त्याची त्यात आहूती ही पडत आहेच.. पण त्या युद्धाची नाहक झळ मात्र आपल्याला सुध्दा बसल्यामुळे आपलंही जगणं धोक्यात आलं आहे… “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#… आता कोठे धावे मन… तुझे चरण चूकलेची आज… #

मघा पर्यंत आम्ही साथ दिली तू विकत घेतलेल्या त्या दोन वर्षापासून… किती झिजलो दिवसरात्री झाली कातड्याची कि रे चाळण… परी तुझ्या चरणांची झीज नाही होऊ दिली… आजवरी अखंडीत केला कि रे त्यांचा सांभाळ… मग आज अचानक काय झाले तुझे वदन ते हिरमुसले… नाही पटली का आमची तुला ही चरणसेवा… अश्या एकांत जागी तू आम्हाला असा तोडूनी सोडून जावा… का नाही पाहशी मागे वळूनी एकवार प्रेमाने… ती तुझी दृष्टीची आस मनी आमच्या खुळ्या आशेने अंकुरते… कोण येईल नि कधी, कसा येईल या निर्जन ठिकाणी आणि आम्हाला असे बेवारस पडलेले पाहून द्रवेल का त्याच्या अंतकरणी आपुलकीचे पाणी… अहाहा अहाहा किती सुंदर छान मुलायम कातडी जोडे.. हे या आडवाटेला कसे बरे येऊन पडले… का त्या चरणांना यांचा विसरच पडला आणि या जोड्यांना त्याचा कायमचा विरहच घडला… पाहूया येतात का मम चरणांना… बसले ठिकठाक तर नेऊ सोबत नाही तर ठेवू इथेच जसे होते तैसेच…

ते बिचारे जोडे आजही बरेच दिवस झाले आहेत त्यांच्या साईजचा चरणद्वयाच्या प्रतिक्षेत बसले आहेत… ते पाय इकडे येतील नि आपला हा वनवास संपेल… पण हळूहळू ती आशा आता मावळत गेलीय… निरर्थक आशेकडे डोळे लावून बसले खरे त्या जोड्यांना आता काळवंडलेपणाने चांगलेच घेरलेय… धुळ मातीची पुटं चढून कातडं आता निबर झालयं.. सुरकुत्यांच्या रेघाने कातड्याला भेगा पडल्यात… तळव्याला भोकं पडलीत… कसरीने भूगा पाडून देहपतन होत गेलाय… नवलाई तर कधीच उडून गेली..

आठवतात कधी तरी त्या जुन्या मोजक्या आठवणी… मालकाने दुकानातून आपल्याला खरेदी केलेला तो क्षण.. सुंदर नक्षी, मऊ मुलायम कातड्याचा आरामदायी चरणांना होणारा स्पर्श पाहून मालक वेडावून गेला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने आपल्याला विकत घेऊन घराकडे गेला… एका समारंभाला जाण्यासाठी त्याने हा नवा घेतलेला जोड्यांत पाय सरकवले पण पण तो जोडा त्या पायांच्या नंबराचा नव्हताच मुळी… आंधळ्या प्रेमाची किंमत मात्र त्याला मोजावी लागली… तरीही दाबून त्याने पायात ते जोडे घालण्याचा अट्टाहास केला.. पाय आकसला नि कातड्याने पायाला चावा घेतला… दुकानी बदलून घेण्यासाठी त्याने प्रयत्न केला पण मुळच्या हवा तश्या डिझाइन मध्ये पुढचे नंबरचे जोडे नव्हते… आणि एकदा विकलेला माल कुठल्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही अथवा बदलून दिला जाणार नाही या सुचनेच्या फलकाकडे दुकानदाराने बोट काय दाखवले मालकाचे बोलणेच खुंटले.. करतो काय बिच्चारा घेऊन जावे लागले त्याला ह्या जोड्याला मग ते घरी घेऊन आला… मालकाच्या डोक्यात सुपिक आयडिया निघाली आणि अनायसे नवा जोडा बदलून मिळतात अश्या सार्वजनिक ठिकाणी जिथे जोडे बाहेर काढावे लागतात अश्या ठिकाणी मालकाने मला कैक वेळा सोडून बदल्यात दुसरे जोडे न्यायचा प्रयत्नही करून पाहीला.. पण प्रत्येक खेपेला तो डाव अयशस्वी झाला… मालकाला खूप राग आला स्वता बरोबर माझाही… पण उकिरड्यावर टाकणे त्याला जीवावर येत होते… आणि आज अचानक त्याने या निर्जन ठिकाणी सोडून आपण अनवाणीपणे जाणे पसंत केले… एकवेळ तू चरणसेवा नाही दिलीस तरी चालेल पण तूझा हा चरणचावा मात्र आधी थांबव… असं सारखं सांगून सांगून मालक थकून तो गेला पण माझ्यात काही बदल न झाला… रागाच्या भरात तडकाफडकी निर्णय त्याने घेतला आणि आता तुम्ही पाहतायना हे असं निर्जनस्थळी एकांती आम्हासी सोडून गेला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आवं दादा या पुलावरून हे काय धावतया म्हनायचं.. आनि तेबी जमिनीवर पाय न लावता असं अधांतरीचं कसं काय पळतया! … “

“अरे बाबानू असं का येड्यावानी इचारतायं? … ती धावती ना तिला या शहराची मेट्रो म्हनत्यात… ती अशीच तुमच्या आमच्या इतकचं काय मोठ्या इमारतीच्या डोक्यावरूनच पळत असती! … तिचा अन जमिनीचा काहीच संबंध येत नाही.. कायमच ती अशी अधांतरी पळत असती.. आताच्या दिवसात या शहराची हु दुसरी जीवनदायीनी हायं बाबानू.. समजलं! … “

… ” असं हायं का? पर अवं दादा पर सहा महिन्याच्या मागं या जागेवर जी झोपडपट्टी व्हती त्यात आम्ही चाळीस पन्नास वर्षं राहत व्हतो.. ते मराठवाड्यात दुष्काळी कामं सुरू झाली म्हणून आम्हाला संमद्याना तकडं काम मिळालं. तवा इकडं घराला कुलूप घालून आम्ही संमदी तकडं गेलो.. सहा महिनं म्हणता म्हणता एक वरीस ततच ठेवून कामं पूरं झाल्यावरच आम्हाला सोडलं… अन इथं येऊन बघतो तर ह्यो मोठा पूल बांधलेला दिसला.. ती पळणारी चकाचक रेल्वे दिसली पन आमच्या झोपड्या काय कुठं नदरलाच दिसनात… अन आमच्या आजुबाजूला राहणारे ते शेजारपाजारचे लोक बी दिसनात… पाक भुईसपाट करून खालनं दोन चार मोठ्ठं रस्तंच बांधलेलं दिसलं… किती मोटारींचा येजा चा गर्दा माप वाढलेलला दिसतूया.. “

“अरे बाबानू आता शहराचा मोठा विकास होऊन राहिलाय… ते सरकारनं स्मार्ट सिटी योजना अमंलात आणायचं ठरवलंय.. तेव्हा सगळ्यात पहिल्यांझुट गदा ही गलिच्छ झोपडपट्टीच्या जागेवर घालण्यात आलीयं… आता शहराचा विकास करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.. सरकारी वटहुकूम निघाला की सगळ्यांना त्याप्रमाणे वागावचं लागतं… त्येला काय इलाज नाही… आता तुमच्या झोपड्या गेल्या आहेत तर तुम्हाला दुसरीकडे जागा शोधायला हवी.. या भागातला समाजसेवका कडं जाऊन भेटा म्हणजे तो तुम्हाला मदत करील… “

“.. नगं नगं आता आम्ही कोणाला भेटाबिट्याच्या भानगडीत पडनार नाही बघा… तो काय शहराचा विकास हुनार आहे म्हनता तो तर हा असा आभाळालाच भिडायला गेल्या सारखाच डोक्याच्यावरनचं जाणारा हाय नव्हं… मगं आम्ही आमच्या झोपड्या पहिल्या होत्या तश्याच या पुलाच्या खाली प्रत्येक खांबाच्या भवतीनं बांधून राहतो.. नाही तरी त्या खांबाच्या बाजुची जमिनीचा काही आता विकास काय होणार नाही… मगं आम्हाला कोणी तिथून उठवणार पण नाही… ते म्युन्सिपालटीवालं साहेब आम्हाला चांगले वळखतात.. आन ते लै दयाळू बी हायती.. झोपडं बांधल्यावर एक डाव त्यांची गाठ घेऊन पानसुपारी केली कि लाईट पानी अन सुलभ शौचालयाची पन सोय लगेच करतात बघा… सरकारला म्हनावं काय तुझा विकासाचा ऊजेड पाडायचा तो वर आकाशापतूर नेऊन पाडनास.. आम्ही इथं भुईवर चटई पसरुन बघत राहतू… “

“अरं बाबानू या विकास करताना तुमच्या सारख्या गोरगरिबांचीच फारच अडचण होत होती… म्हणून तर तुम्हाला सरकारी कामं देतो, चांगला पैका देतो या आमिषावर ओढून च तिकडं मराठवाड्यात लांब नेलं आणि इकडं हा पूल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सोडलचं नाही… काय येतयं का लक्षात काही तुमच्या.. साप पण मेला आणि काठी पण वाचली अशी सरकारनं खेळी केली होती… हं आता तुम्हाला राहायला जागा नाही घर नाही तर तुम्ही तरी काय करणार म्हणा… या पुलाच्या खालच्या जागे शिवाय पर्याय आहे कुठे… शिवाय तुमचा तो म्युनिसिपालिटी चा साहेब आहेच कि तुमच्या मदतीला… नाहीतर त्याने त्याच्या नोकरीत न दिसणारा विकास आता नाही तर कधी करून घ्यायचा… “

“बरयं मी निघतो.. ती मेट्रो जशी धडधड करीत वरनं जाताना दिसली कि मलाही माझ्या छातीत धडधड वाढायला लागते… वयाचा परिणाम आहे बाबा… आकाशाला गवसणी घालणारा विकास बघूनच माझे डोळे दिपून गेले… आता या पुढे अधिक पाहण्याआधी ते लवकरच मिटलेले बरे… “

आणि त्या गावाहून आलेल्या गोरगरीबांनी मेट्रो पुलाच्या खाली खांबाच्या आधारे आपल्या झोपड्या उभा केल्या.. आकाशातून खाली पाहताना चकाचक श्रीमंतीचा थाट दिसत होता आणि त्याच्या सावलीत विसावलेली गरीबी मात्र घाबरून पुलाच्या खांबाला पाली सारखी चिकटून बसली होती…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पाव मण लाकडे + संपादकीय निवेदन – श्री नंदकुमार पंडित वडेर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

📚📖 अ भि नं द न 📖 📚

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांनी आयोजित केलेल्या २०२५ च्या सांगली जिल्हा ग्रंथोत्सवात आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक श्री नंदकुमार पंडित वडेर यांना सुजाण वाचक सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे.

श्री. वडेर यांचे ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक आलेख – “पाव मण लाकडे…”

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # पाव मण लाकडे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आता चुल पेटावयाला एक लाकूड शिल्लक नाही घरात.. स्वयंपाक, चहापाणी, आंघोळीचं गरम पाणी इतकी कामं कधीची खोळंबली आहेत.. चूलच पेटली नाही तर झाला की बट्ट्याबोळ… आणि मोळीवाल्याकडून जर जळणासाठी सरपणच मिळाले नाही तर काय मी आता या चुलीत माझी हाडं टाकावीत कि काय? तुम्ही त्या गॅस एजन्सी च्या दुकानात कामाला जाता आणि रोज शंभर घरा घरातून तो गॅसचा सिलेंडर पोहचता करता… त्यांच्या चुलीची एवढी काळजी घेता पण स्वत:च्या घरची काही काळजी असते का तुम्हाला? … त्या तुमच्या एजन्सी मालकाला सांगून एक गॅस कनेक्शन तरी आपल्य घरी आणायचं होतं तेव्हा… बाई गं सांगून सांगून थकले पण तुम्ही कसले जुन्या परंपरावादीला चिकटून बसलेले… श्रीमंतीचे चोचले गरीबांना परवडणारे नसतात आणि आधुनिक सोयी सुविधांच्या विरोधात कायम तुम्ही उभे… बाकीचे तुमचे सहकारी बघा. टू व्हिलर वरून सगळीकडे गॅस पोहचवतात आणि तुम्ही अजूनही त्या बाबा आदम च्या जमान्यातील जुन्या एटलास सायकल वरून पायाचे तुकडे पर्यंत पॅडल मार मारून एकेक गॅस सिलेंडर पोहचवत राहता.. अश्या दगदगीने किती थकून जायला होतयं तुम्हाला… आम्ही घरातली माणसं तुम्हाला दाताच्या कण्या करून सांगून थकलो पण तुम्ही काही बदलायला तयार नाही… तुमचं आपलं संत तुकारामांच्या सारखं एकच पालुपद.. सगळ्यांच्या भुका भागविण्यासाठी आपण कष्ट घेतले तर त्याचं मोठं पुण्य मिळतं.. भुकेलेल्याला अन्नदान केल्यासारखे… पण त्याची त्यांना त्यावेळी काही होती का कदर… सिंलेडरची डिलिव्हरी करणारा दारात दिसला रे दिसला तर त्याच्यावरच तोंडसुख घ्यायला तयार… काय तर गॅस नोंदवून महिना उलटून गेला आणि आता आणताय होय… काहीतरी मध्ये बरेच काळाबाजार करून वरकड कमाई झाल्यावर तुम्ही नंबराचा द्यायला आलात… आणि आता वर ‘चायपानीची’ अपेक्षा ही असणारच… इकडे आमच्या घरात पोरंबाळं, म्हातारे कोतारे भूकबळीचं तेव्हढे होयाचे राहिले होते… दिवसभर सारखी अशी पळापळ करून सगळ्यांना जर गॅस डिलीवरी वेळ द्यायला काय होतं तुमचं… पण तुमचे नखरे फार वाढलेत… जो वरती ज्यादा ची चिरीमिरी देतो त्याच्या दारी पहिला गॅस जातो… हो का नाही.. अशी शिव्याशापाची बिना कारणाची बोलणी खाऊन मन तुमचं खट्टू होतं. तरीही तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं सोडत नाही…

आणि आता तर ते आखाती युद्धाचा भडका उडाला. त्यात तेल गॅसचा पुरवठ्यावर बंधन आल्यावर दिस ताच इकडे नफेखोरी करणारी सगळी सावजं मंडळीनीं परिस्थितीचा फायदा उचलला नाही तरच नवल… पांढरे बगळे नि खाकी ससाणे बेरक्या जातीची. स्वार्थ नि संधीसाधू गिधाडे सामान्य जनतेला ओरबाडून खायला बसली नाही तरच नवल.. याने त्याच्या नावाने बोंब मारायची आणि त्याने याच्या. तेही फक्त मिडीयासमोर… आणि गरीब बिचारा तो गॅस डिलिव्हरी करणारा मात्र सगळ्यांच्या रोषाला सामोरा गेल्याने उद्रेकाचा बळी होतो… त्याला वेठीस धरून काय साधणार म्हणा.. तो पोटार्थी प्रापंचिक माणूस… लोकांच्या झुंबडी त्या गॅस च्या दुकानी बसते.. मला पाहिजे गॅस आधी अश्या हमरीतुमरी होतात.. डिलिव्हरी मॅनला मध्यला मध्ये चढ्या बक्षिसाची लालूच दाखवून तो गॅस आपल्या घराकडे पळवतात… तेव्हा इतर नाराज आपली निराशेची आरोळी ठोकत राहतात.. पण त्या डिलिव्हरी मॅनचा एक माणूस म्हणून कोणीच कसला विचार करत नाहीत… तहानभूक विसरून तो एकटाच मात्र आपलं प्रामाणिकपणे देशसेवेचे कर्तव्य करतो…

आणि रात्री उशिरा ने जेव्हा तो आपल्या घराकडे निघतो तेव्हा त्याला आपलं घरदारं बायका पोरं सकाळ पासून उपाशी तपाशी राहून आपण वखारीतून पाव मण लाकडाची मोळी कधी घरी घेऊन येतोय याच्याकडे डोळे लावून वाट पाहत असलेले कोमेजलेले चेहरे दिसत असतात.. चारदोन रूपयाची वरकड कमाईतूंन त्यानं शेव फरसाणाचा पुडा सोबत घेतलेला असतो… त्यामुळे जरा तरी घरदार हसतं खेळतं राहील आणि ते बघून आजचा आपला थकवा दूर पळून जाईन… आजचा दिवस तर पार पडला… उद्याचं उद्या काय ते बघता येईल… ज्यानं चोच दिलीय त्यानं त्याच्या चाऱ्याची पण काही ना काही सोय केलेली असती.. तो काळजी घेणारा बसला असताना आपण का म्हणून काळजी करत बसायचं नाही का? हे वचन रोज रात्री झोपताना आपल्या कुटुंबाला ऐकवून दाखवलं कि त्याला शांत झोप लागते…

*

© नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # सीनें में जलन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # सीनें में जलन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#सीनें में जलन… ऑंखों में तूफ़ान… #

…. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं सगळ्या भारतीय सिनेसृष्टीला आणि लोकांच्या हृदयाला जिंकून घेऊन एक अनभिषिक्त सम्राटाचं पद अनेक दशकं गाजवतं राहीला….स्वप्नं बघायची… ती पूर्णत्वास नेताना संघर्ष करायचा… आणि ती स्वप्नं सत्यात उतरावयाची याचा वस्तुपाठच त्याने आजवर केलेल्या शेकडो सिनेमातून तरूणाईलाच नव्हे तर तमाम लोकांना दिला… अन्याय घडो कुठेही.. इट का जवाब पत्थरसे देना… आणि आपल्या साध्या सरळ मार्गी दैनंदिन व्यवहारात जर कुणी आडदांडपणा करून त्रास देत असेल व त्यास दादापुता करूनही ऐकत नसेल तर… खेल तुम्हने शुरू किया तो खत्म हम कर देंगे.. ही अन्यायाविरूद्धची , नाहक पिळवणूकी विरुद्धची लढाई एकट्या खांद्यावर कशी लढायची याचं प्रशिक्षण तो देत गेला… यंग अंग्रीमॅन हा त्याने अशा विविध पैलूंच्या भूमिका साकारून मिळवला तो उगाच नाही… त्याचे खदिरांगासारखे आग ओकणारे डोळे जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आता अन्याय कर्ता, जुलूम कर्त्याची आता काही खैर नाही हे हाणामारी आणि दे दणादण मारपिट पटातून आपल्या दिसून येते…पूर्व सुरीचा हिंदी चित्रपटातील रोड रोमियो ची असलेली नायकाची प्रतिमा त्याने आपल्या कलेच्या अदाकरीने बदलून टाकताना… नायकातली नजाकत आणि शांत डोक्याचा मुत्सद्दी  खलनायक रंगवताना नकारात्मक नायकाचे गुणधर्म जास्त भावतात…काहीवेळा तर त्याच्या नायकाची प्रतिमा आपल्या रसिक मनावर इतकी बिंबली गेली असल्याने त्याने हा खलनायक रंगवला आहे हेच मुळी पचनी पडत नाही…राग जितका टोकाचा त्याला दाखवता आला तितकेच प्रेमाचे, मोहब्बतेचे, इश्काचे नजारे सुध्दा अगदी संयत दाखवून दिले… तो ज्या चित्रपटात असेल त्या चित्रपटातील नायिका त्याच्यावर फिदा होताना पडद्यावर वर दिसायच्या पण पडद्या बाहेर खाजगी जीवनात देखील त्या नायिका ‘ ‘हाय मैं मर  जावाॅं’ करत अपनी जिंदगी न्यौछावर करायला मागे पुढे पाहत नसत… किंबहुना काहींना तर  त्याच्या प्रेमाचा सिलसिला असाच अखंड चालू राहावा असचं वाटल्याने त्यां आजही अतुट प्रेमापोटी त्याच्यासाठी  ‘ नजर लागी सय्या तोरे बंगले पे’ आळवत मैं तुलसी तेरे ऑंगन की बनून राहिल्या… पण आपल्या मनातील ही होणारी चलबिचल मात्र त्याने चारचौघात कधीही चर्चेवर दिसणार नाही याची काळजी घेतली… अफवा, कंडम गाॅसिप के चर्चे तर हर जुबान पर होत राहीले… असा हा हरहुन्नरी  कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहीला… उत्तुंग उंचीवर पोहचला आणि या सम हाच असा एकमेवाद्वितीय राहिला…निसर्गाच्या नि नियतीनेही तशात त्याला असे काही फटकारले तेव्हा तर तो काळाच्या पडद्याआड लुप्त होता होता त्याच्या सतीच्या पुण्याईने  तारले… कलावंताला घडवता येत नसते तर तो घडत जात असतो ,पैदाईशीच असतो..याला आपल्या अलौकिक कीर्तीच्या अंहकाराने छेद देत कलावंत निर्मितीची प्रशाळा आपले सगळे तनमन नि ओतून उभा केली… पण नियतीला ते साफ ना मंजूर होते आणि त्याला क्षणात होत्याचे नव्हते केले… चलती हुई गाडी दलदलमें फस गई… तोपर्यंत यंग अंग्रीमॅन चा करिष्माही संपलेला होता… बाजारू चलनी नाण्यांचा अभिनेत्यांचा  खणखणाट सुरू असल्याने त्याला रोड पतीची अवकळा आली होती… पण इथं  नियतीचे दान त्याला  अनुकूल  असे पडले.. कौन बनेगा.. च्या टि. व्ही.  छोट्या पडद्यावर तो आला.. आणि पुन्हा त्याने आपल्या कलेची झलक दाखवून द्यायला सुरुवात केली.. बघता बघता ती कलावती अधिक जोमाने दौडत निघाली… पुनश्च त्याला उत्कर्षाचे दिवस लाभले… आणि मग खऱ्या अर्थाने म्हणू लागला मेरे पास अब पहलेसे ज्यादा सबकुछ है.. बंगला है, गाडी है,ढेर सारा पैसा है, दौलत है, आज पहले जैसे क्या नही मेरे पास…तुमही बताओ…हां एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची राहून गेली…माझा पहिल्या भरभराटीच्या काळातले अवतीभवतीचे माझे माझे म्हणणारे लोक मात्र माझ्या पडत्या काळात सोडून गेले आणि आता  मधूचा सुवास येताच  माशा पुन्हा घोंगावू लागल्यात… एक गोष्ट माझी मात्र अजूनही तशीच साथ देतेय ती तीस पैश्याची पुत्तूशेठ बीडी कालही होती तशीच आजही माझ्या ओठांवर शिलागावून बसलेली आहे… ना तिची चव बदलली ना तिला माझ्या श्रीमंतीने लाथाडले… म्हणूनच मी तिला जवळ ठेवले आहे… तिच्या मदतीनेच मी माझ्या नैराश्याचा धूर बाहेर सोडत असतो… आणि बीडीचे जळणारे लालचुटूक थोटूकाची ठिणगी मला जगण्याची सतत उर्मी देतं असतं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # तू नाही म्हणू नकोस… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#तू नाही म्हणू नकोस.. #

होकार तुझा ऐकण्यासाठी कान माझे आसुसलेले आपल्या त्या पहिल्या भेटी पासूनचे…

चांदण्याचा गालीचा अंथरून बसला चंद्र केव्हाचा अन शालू कितीएक बदलून गेले रात्रीचे…

कुंतलांच्या चुकार बटांनी ओढून धरला तलम पडदा नयनासमोरी रोखण्या रस्ता तुझ्या भावपूर्ण नजरेचा…

तरीही मौनात दडलेला होकार तो तुझेच भावविभोर बोलके डोळे विसरून नाही गेले तेच सांगायचा…

काय पाहशी मजला तू अशी भावुक नजरेने.. तुझ्या अंतरीच्या खळबळलेल्या लाटांची गाज अधरावरी धडकते…

नकाराचा विकल शब्द झुंजत राही अधर विलगण्यास… परी असमर्थ ठरले थरथर ती ओठांची थोपविण्यास..

सांगायचं काय तुला समजले आहे मला एकही शब्द न बोलता. ,. लपविण्याचा तू केलास कितीही आटापिटा तरीही चेहरा तुझा सारं काही बोलून गेला…

मनात जे आहे बोल एकदा मोकळेपणाने..

अडचणींच्या कोंदणात दडलेल्या होकाराला बोलतेस का जाहीरपणे…

अमुर्त नात्याला मुर्त रूप देण्याचा अवधी जवळी आला.. एक होकार तुझा ऐकण्यासाठी जीव आतुरला…

माझ्या तनमनाला दिठी बसावी तुझ्या होकाराची मिठी.. हिच आहे मनीची आस…

विलंब लाविलास होकार देण्यास तरी माझी त्याला ना नाही..

नाही सांगितलसं तरीही मी समजून घेईन… असतात काही गोष्टी बऱ्याच अडचणींच्या मुक्तपणे बोलता येत नसताना.. होकार देण्याची अडचण तुझी मला समजली.. पण पण माझीही एक हळवी

अट इतकीच कि तू मला कधीच नाही म्हणू नकोस हं!

##

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

कितना हसीन सफ़र है… साथी भी खुबसुरत है ये तो मौसम को भी खबर है…

“… हे देवा काय म्हणून हे कवि असलेलं ध्यान माझ्या नशीबी मारलंस! … त्याला तो निसर्ग, ते चंद्र तारे, निर्झराचे गाणे आणि पौर्णिमेचे चांदणे एव्हढे मिळाले कि त्याच्या कवितेला उधाण येते! … सारे सारे भोवतालचे जग विसरून जातो आणि कवि कल्पनेच्या जगात विहरत बसतो.. ना खाण्या पिण्याची शुद्ध ना घरच्या कामाची, ना घरातल्या माणसांची सुधबूध… सुचलेली कविता जोवर कागदावर उतरत नाही तोवर याची तंद्रीतून बाहेरच येत नाही! .. आपलं नुकतंच लग्न झालयं… दिसायला सुंदर आणि मनमोकळी स्वभाची गोड नि मृदू बोलणारी नवयौवयना बायको आहे… तिच्याशी दोन घटका प्रेमाचा वार्तालाप करायला हवा की नको? … आपण नाही तर तिच्याशी कोण बरे बोलणार? … त्या एकांतातल्या सलज्ज कुजबुजणे आपण दोघांनी शेअर करायचे नाही तर कोण करणार? … आणि आणि हे सगळं त्या मठ्ठ, बथ्थड कविच्या डोक्यात कोण कसं घालणार? … प्रेम होईना तुझ्याने हि का तक्रार सांगायची असते इतरांच्या समोर! … ते काय म्हणतील आपल्याला! … “

“अगं कवि हा सौंदर्याचा भोक्ता असतो ना! त्याच्या कवितेला देखील कुणीतरी प्रेरणा दिली तरच त्याची काव्य प्रतिभा फुलून येते ना! त्याची भावनोत्कटता, त्याचं शब्द प्रभुत्व आणि त्याच्या तरल हळवं संवेदनशील मनात एखादी कल्पना सुचते, रूजते तेव्हा त्याला सृजनशीलतेचा अलौकिक अनुभव येतो… तो सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावीत होतो आणि दिन हो या रात हम रहे तेरे साथ… अशी त्याची झपूर्झा स्थिती होते! … मग तो ना घरचा ना दारचा त्याचं जगंच वेगळं असतं…

आणि काय गं तू आणि तो लग्नाच्या आधीपासूनच काॅलेजमध्ये असतानाच तुमचं जमलं होतं म्हणालीस ना तू.! .. कवि मनाचा आणि सुंदर सुंदर प्रेमभावनेने ओथंबलेल्या कविता रचून तुला तर त्याने आपल्या प्रीतीच्या पावसात चिंब चिंब भिजवून टाकले असंच म्हणायचीस ना तू? … आणि हे तर काहीच नाही तुला तर त्या नवरंग सिनेमातील संध्या सारखं त्याच्या कवितेची तूच तर प्रतिभा असा तुमच्या प्रेमाचा मोठा सन्मानच केला हे ही तूच आम्हाला सांगितलसं ना त्या वेळी! … आम्ही तुला त्यावेळेला सांगत होतोच की बाई गं हे कवि लोक वेडे असतात! … यांचं खरंखुरं प्रेम फक्त त्यांच्या कवितेवरच असतं… या मंडळींना संसार हवा असतो तो त्यांना त्यांची केअरटेकर घेणारं माणूस घरात असावं म्हणून… बाकी या स्वच्छंदी माणसाला काय गं? … पण तू मारे नाक उडवून आम्हाला सांगितलेस कि मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला असं जखडून ठेवेन! माझ्या प्रेमाचं अस्त्र असं सोडेन कि त्याने कविता वगैरे विसरून जाईल आणि माझ्या पदराला सारखं धरून मागं मागं घेऊन जाईन… मग आता काय झालं तुमच्या लग्नानंतर? … का तुझं मोहीनी अस्त्र कुचकामी ठरलं! का तुझ्या प्रेमातलं सामर्थ्य पेबळं ठरलं? … का तू आता त्याची हक्काची लग्नाची बायको झालीच आहेस म्हटल्यावर त्यानं आता जाशी कुठे नवनवीत चोरा सारखं तुला वागवायला लागला! .. त्याचा तुला सांगताही येईना आणि सहन ही होईना त्रास होऊ लागल्यावर सारं आठवलं काय? … पण तुला आता आम्ही काय सल्ला देणारं.? .. तुझं तुलाच सारं निस्तारलं तर पाहीजे… बघ एकेक नव्या नव्या क्लुप्त्या काढून कवि नवरा मुठीत येतोय का पहा… आणि जोवर तुझ्या मनासारखं होत नाही तोवर एकच पालुपद त्याच्याजवळ अष्टौप्रहर गात रहा… आज मी रूसूनी आहे…!!!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # जागते रहो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # जागते रहो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

मालकिन बाई जाग्या व्हा जाग्या व्हा… मध्यान रातीचा चांदवा डोईवर आलाय म्हंजी धनी घराकडं येन्याचा टाईम झालाय… आता येत असत्याल सोसायटीच्या मेन गेटवरून कधी लेफ्ट कधी राईट कडं झुकत.. तो गेटवरचा आगाऊ वाॅचमन बहाद्दूर बारा बेण्याचा हाय.. तो सायबास्नी ततचं आडवून ठूतो आणि सतराशेसाठ वंगाळ वंगाळ प्रश्न इचारून लै बैजार करून सोडतो… सायबास्नी आधीच लै चढलेली आनी त्यात ह्याची चवकशी… इचालरयं काय सायेब उत्तर काय देतात.. कश्याचा कशाला मेळच जमयाचा नाही.. तवा सायेबाचं टकूर सटाकलं मग बोलतात ये लै श्यान्या कोन पिलयं रं तू का मी… मगं माझ्यापेक्षाही तूच लै बडबडतोय कश्यापायी… गपगुमान गेट उघड मला माझ्या घराकडं जायाच़ आहे.. आधीच लै लेट झालाय… त्यात रोजचा हा खुटानात वाढूळ टाईम होतो… अन घरी गेल्यावर आमचा सिलेंडरचा स्फोट होतो… च्यामायला आमच्या पुरूषाची काही बी मर्दानगीची जिंदगीच राहिली नाही… अन तू रं माकड तोंड्या बेन्या.. रातच्याला गपगुमान शेपुट अंगाभवती गुंडाळून डोळं झाकून पडून राहयचं सोडून.. अगदी माझ्या येन्याच्या वेळेलाच जीव तोडून नि घसा फोडून जो भुंकायचा बिगुल वाजवून समंद्या सोसाटीला जाग आणतूस… मला काय चोर समजतोस काय रं तू रोज… इतकी वर्षे इथं राहतूय मला काय अजून बी वळखंना व्हयं रं… ये तू सकाळच्या पारी बटर नि बिसकुट खायच्या येळेला या चौकात… मग दावतू तुला चांगलाच धतुरा… आगाऊ भा*खाव मला वळखंत न्हाई… माजलास गड्या तू… माझ्यापेक्षा मालकिनीची लै काळजी घेतोस… तरीच म्हटलं मी सोसायटीच्या आत शिरतो न शिरतो तोच माझ्या फ्लॅटमध्ये दिवाळी सारखा चकाचक लाईटाचा उजेड कसा काय पडतू… तो तू बिगुल वाजवून मालकिनीला मी आल्याची वर्दी देतूस व्हयं रं… तरी बरं अजून माझं टकूरं ताळ्यावर असतयं… इतकं पिऊन तर्र होऊन बी मी आपल्या घराकडं बरोबरच जातू… अजून एकदा बी दुसऱ्याच्या घराची इतक्या रातच्याला बेल मारून झोप मोड केली न्हाई… अन तशी केली असती तर मला सोसाटीतनं कधीच हाकलला असता… थू तुझ्या कुत्र्या माझ्याशी बेईमानी करतोस अन मालकिनीला इमानदारी दावतोस… अरं तुझ्या मुळीच ती रात्री अपरात्रीला जागं होऊन माझ्याबरोबर भांड भांडून भुस्कट पाडते… अन मला तर त्या वक्ताला डोळ्यावर आलेली झोपेची झिंग नि खंबेवर खंबा संपवून जड झालेल्या डोक्यात चढलेली नशा यातनं काय बी बोलायचं सुधरतचं न्हाई… सारखं आपलं मॅडमला आय ॲम सो साॅरी.. ओके गुडनाईट याच्या पुढं गाडी सरकतच न्हाई… बाहेरच्या बाल्कनीत हा देह जाऊन पडतो तेव्हा निजानंदी तल्लीन होतो… मग दिवसा कधी जाग येते तेव्हा माझी बोलती बंद असते… कान उघडेच असतात नि बायको तिकडून एके फोरटी सेव्हनच्या फैरीवर फैरी झाडत राहते… मी कधीच शहीद झालेला असतो… पण तिचं समाधान काही झालेलं नसतं… आता आजपासून दारूच्या वाटेला जानार न्हाई नि रोज रातच्याला जंटलमन सारखं वेळेवर घराकडं येईन अशी जातमुचलक्यावर सुटका होते… अन रात्र झाल्यावर पुन्हा माझा मी राहतच नसतो.. मी देवदास होऊन जातो नि मन आधीच पोहचलेले असते मागाहून पायही तिकडेच वळतात… चार दिन कि जिंदगी है अपनी तो अपनेही हिसाबसे जियेंगे.. कल हो न हो… म्हणत एकेक जाम का प्याला रिचवत जातो… बार बंद झाल्यावर बाहेर आणून टाकतात मला तेव्हा भानावर येतो अरे बापरे लै रात्र झाली गड्या… गडाचे दरवाजे तर बंद झाले असतीलच… पण त्याशिवाय दुसरा कुठलाच थारा नसल्यानं पुन्हा पुन्हा इथचं यावं लागतयं… काय करणार साली जिंदगीभी ही ऐसी है… जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा… आणि तू कुत्र्या तर माझ्या वाईटावर टपकलेलाच असतो… मी लांबून येतानाचा वास आला कि तू जो केकटायला लागतोस बेंबीच्या देठापासून… घरातनं एकदा बायकोनं कायमचं हाकलून दिल्यावर का मलापन तुझ्यासारखं रस्त्यावर आलेलं बघितलं की तुझं समाधान हुनार आहे असा तर तुझा डावं नसंल ना!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ संधिकाळि या अशा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ संधिकाळि या अशा ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

उतारवयात पुरुष “म्हातारा” होतो,

पण स्त्री “वयस्क” होते

किती साधं वाक्य, पण किती विदारक वास्तव!

आयुष्यभर कुटुंबासाठी झटलेला पुरुष, मुलांचे शिक्षण-लग्न, आर्थिक स्थैर्य याची तजवीज करून, निवृत्तीनंतर मात्र हळूहळू ओझं ठरतो.

छंद, वाचन, कला, मित्रपरिवार, सामाजिक नातेसंबंध नसतील तर त्याची अवस्था अधिकच केविलवाणी होते.

याउलट वयस्क स्त्रीकडे सहानुभूतीने पाहिलं जातं —

पण अनेकदा ती सहानुभूती स्वार्थातूनच असते.

घरकाम, नातवंडांची जबाबदारी, फुकटची मदत!

पूर्वायुष्यातील कर्तृत्वाची पुण्याई म्हातार्‍याच्या फारशी कामी येत नाही…

आणि आयुष्याच्या मध्यावरच संपत्ती वाटून टाकलेली असेल, तर उतारवय अधिकच क्लेशदायक ठरते.

म्हणून मित्रांनो,

▫️विचारल्याशिवाय सल्ले देऊ नका

▫️भूतकाळ उगाळू नका, वर्तमानात जगा

▫️ मित्रांत मिसळा, त्यांच्या संपर्कात रहा

▫️अपेक्षा न ठेवता जगायला शिका

▫️संपत्ती भावनेच्या भरात हस्तांतरित करू नका

▫️मृत्युपत्र स्पष्ट आणि वेळेत करा

▫️सर्वात महत्त्वाचे — पती-पत्नी म्हणूनच नव्हे, तर समवयस्क मित्र म्हणून एकमेकांची साथ द्या.

▫️ नामस्मरण करून आनंदात रहा

नियतीने जे ठरवलं आहे ते घडणारच आहे.

आपल्याला मिळालेल्या जीवनाचा आदर करा…

कारण ते तुमचं, केवळ तुमचंच आहे!

शुभेच्छा! 🙏🏼

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares