मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

गाडी हलली तसं मी बॅगेतून पुस्तक वाचायला काढलं. उद्या माझा नागपूरच्या एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. गेल्या वर्षभरापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. सहा महिन्यापुर्वी वडिलांनी तब्येतीच्या कारणांमुळे रेल्वेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून मला नोकरी मिळवण्याचं जास्तच टेंशन आलं होतं. वडिलांच्याच पासवर मी सेकंड ए. सी. चं रिझर्वेशन करुन नागपूरला निघालो होतो. पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती. माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते.

नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बॅगा घेऊन आत चढला. माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बॅग ठेवली. तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली. तिला पाहीलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाॅड! काय सुंदर होती ती!

” कुठं जाताय? ” तो तरुण मला विचारत होता.

“नागपूरला “मी शुध्दीवर येत म्हंटलं.

” थोडं लक्ष ठेवाल का? मिसेस गोंदीयाला जातेय. एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे “

तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.

” हो ठेवेन की. त्यात काय विशेष! “

मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली. गाडी निघाली तसा तो उतरुन गेला.

” गोंदियाला पोहचली की फोन कर ” खिडकीबाहेरुन तो तिला म्हणाला.

” हो करते ” असं म्हणून तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं. समोरच्या बर्थवर तिनं किरकिर करणाऱ्या मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली. माझी नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती. खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती. मी माझ्या काॅलेजच्या मुली आठवून पाहील्या. त्यातली एकही तिच्या जवळपासही जाणारी नव्हती. तिचे डोळे, नाक, ओठ, त्वचा, केस फारच सुरेख होते. विशेष म्हणजे तिनं मेकअपही केलेला दिसत नव्हता तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती. माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती. बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे. पण तिची फिगर अतिशय सुरेख होती. मनात विचार आला, स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का? की हिच्यापेक्षा जास्त? नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.

मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो. ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती. मुलाला बाटलीने दुध पाजतांना, त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती. गाणी म्हणत होती. अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.

एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं. तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली. नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती. जांभळ्या साडीत ती अप्रतिम शब्दही कमी पडावा इतकी सुंदर दिसत होती. पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा, भडकपणा नव्हता. घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती. काॅलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं. आणि आजही तिला पाहिल्यावर प्रत्येक पुरुष वेडा होत असेल यात मला शंका वाटत नव्हती. ती जर विवाहित नसती तर कदाचित मीसुद्धा तिच्या प्रेमात पागल झालो असतो. तिचा नवराही तोडीसतोड देखणा होता म्हणून तरी बरं नाहितर इतक्या सुंदर बायकोला सांभाळणं ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही हे मला जाणवत होतं.

मी हातातलं पुस्तक वाचायचं सोडून तिच्याकडेच वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती.

आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो. भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बॅगेतून डबा काढून जेवण केलं. साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा. तिनं बॅगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.

“या जेवायला”

अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम गडबडून गेलो.

” मी आताच जेवलो बघा “

ती सौम्य हसली. मग म्हणाली

” हो पाहिलं मी. हे स्वीट तरी घ्या ” एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली. मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं. खरं म्हणजे मी दिसायला बरा असलो तरी इतक्या सुंदर बाईशी स्वतःहून बोलण्याची माझी हिंमतच झाली नसती.

” नागपूरला रहाता? “

तिनं जेवता जेवता विचारलं.

” नाही. इंटरव्ह्यूला चाललोय “

” कोणत्या कंपनीत? “

मी कंपनीचं नाव सांगितलं.

” इंजीनियर आहात? “

” हो मी बी. ई. केलंय केमिकल मध्ये ” मी जरा अभिमानानेच सागितलं.

” मी सुध्दा इंजीनियरच आहे ” ती म्हणाली. “एम. ई. केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये”

मी वरमलो. माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.

” मग जाॅब करताय कुठे? ” मी विचारलं

” नाही. करायची खुप इच्छा होती. पण एम. ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं. “

” मिस्टर काय करतात तुमचे? ” मी थोडं इर्ष्येने विचारलं.

” ते सुध्दा इंजीनियर आहेत. एम. एस. केलंय अमेरिकेतून आणि आता फॅक्टरीज सांभाळतात. “

” फॅक्टरीज? “

” हो. नाशिकमध्ये आमच्या तीन फॅक्टरीज आहेत आणि पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फॅक्टरीज आहेत. अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात “

बापरे! मी गार झालो. एवढं प्रचंड साम्राज्य असलेल्या धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो. तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी अक्षरशः दरिद्री होतो. माझ्यासारखे अनेक इंजीनियर्स तिच्या फॅक्टरीत पगारी नोकर असतील. तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती. कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.

” तुम्ही एकट्याच जाताय? नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं? “

एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं.

“का? कशासाठी? नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं. गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच. एका रात्रीचा तर प्रश्न होता. तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं. तसं कारनेही जाता आलं असतं पण रेल्वे प्रवास सगळ्यात सेफ. नाही का? “

” तरीपण कुणीतरी.. …. “

“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कॅनडाचा पी आर…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ कॅनडाचा पी आर ☆ प्रा. भरत खैरकर 

कॅनडाचं अल्बर्टा राज्य आणि त्यामधील अँडमिंटन शहरापासून साधारण चार तासाच्या अंतरावर असलेलं हायपेरी हे तीन हजार लोक वस्तीचं गाव! त्या ठिकाणी असलेल्या बर्फाळ प्रदेशातील एका  कारखान्यामध्ये लॉजिस्टिकचे काम बघणारा सुधीर आपल्या रूमवर परतला. तेव्हा त्याला कॅनडा सरकारचं एक पत्र आलं होतं. त्याने ते उघडून बघितलं तर तो त्याचा पीआर होता… म्हणजे परमनंट रेसिडेन्शिअल परवाना होता…

सहा वर्षांपूर्वी कोरोनाआधी सुधीरच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते… त्याला कारणही तसेच होते… पुण्यातील एका नामांकित वाहन बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुधीरचे वडील अकाउंटंट होते… रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी सर्व पैसा शेअर बाजारात गुंतवला होता… सुधीरच्या आईला किंवा सुधीरला न सांगता! त्यांनी घरातील सोन्यावरही कर्ज काढले होते… आणि कसे कोण जाणे? ह्या सगळ्यामध्ये ते फसले! आणि त्यांचे सगळे पैसे बुडीत झाले… ही गोष्ट बायकोला किंवा मुलाला कशी सांगावी? ह्या विचाराने त्यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला…

त्यानंतर सुधीरच्या आईने तडकाफडकी निर्णय घेऊन सुधीरला कॅनडाला एम एस करण्यासाठी  पाठविले होते… त्या करता तिने उरलेसुरले सगळे पैसे उपयोगात आणले होते… आता  सुधीर मागील पाच वर्षापासून आईपासून दूर होता… कॅनडामध्ये एम एस केल्यानंतर कायमचा नागरिकत्व मिळावं, यासाठी तो प्रयत्न करीत होता… सुरुवातीला टोरांटो सारख्या मोठ्या शहरात असल्याने… त्याचे एक-दोन वर्ष तसे वाया गेले… कारण शहरी भागात पी आर लवकर मिळत नाही असे त्याला नंतर समजले… म्हणून त्याने टोरांटोपासून लांब अल्बर्टा स्टेटमध्ये असलेल्या हाय पेरी या खेडेगावात नोकरी स्वीकारली होती… इथे येऊन त्याला जवळपास तीन वर्ष तरी झाली होती… त्याचा मनमिळावू स्वभाव… सर्वांना मदत करण्याची वृत्ती… कामसूपणा… आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आईची स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द… ह्या गोष्टीमुळे तो रात्रंदिन कष्ट करायचा… त्याच्याच वयाची इतर मुले क्लब, पार्टी, सॅटर्डे नाईट, इत्यादींमध्ये गुंतून राहायची… पण सुधीर मात्र ह्या गोष्टीपासून लांब राहायचा…

हाय पेरीचा भाग संपूर्णतः बर्फाच्छादित असतो… या ठिकाणी फार थंडी असते… अशी ऊनही असते… उणे 20 डिग्री तापमान या ठिकाणी असतं… अशा वातावरणात इथल्या कंपनीमध्ये कारखान्यामध्ये इंटरशिप करणारी… काम करणारी मुले… पुन्हा पार्टटाइम म्हणून इथल्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये वेटर किंवा वेटरेस म्हणून कामे करतात… ह्या मुलांमध्ये बरीचशी चायनीज, फिलिपिन्स, इंडियन, त्यातही पंजाबी मुलामुलींचा भरणा अधिक आहे… आपापल्या देशांमध्ये आई-वडिलांच्या छत्राखाली राहणारी ही मुले इथे मात्र काबाडकष्ट करीत असतात… आणि हा सगळा आटापिटा केवळ पीआर मिळावा म्हणून असतो…

तीन वर्षांपूर्वी टोरांटोवरून जेव्हा अल्बर्टाला यायचे होते… तेव्हा गुगल मॅप नुसार रशिया नंतर कॅनडा हा जगातला दुसऱ्या नंबरचा विस्तारलेला देश आहे हे सुधीरला समजले. तेव्हा तर सुधीरने जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास त्याच्या कारने  केला होता… त्यासाठी त्याला चार दिवस लागले होते… एवढे दिवस तो एकटाच कार चालवत होता… पण टोरंटो आणि हायपेरीच्या वातावरणात खूप फरक असल्याने म्हणजेच हा प्रदेश बर्फाळ असल्याने या ठिकाणी कार चालविणे कठीण असते. तिथल्या हायवेवर नियमानुसार गाडी चालवतांना १२० च्या गतीने चालवावी लागते… पण सुधीरला बर्फावर त्या पद्धतीने चालविण्याची सवय नसल्याने त्याची स्पीड कमी झाली… त्यामुळे पोलिसांनी मागून येऊन त्याला त्याबद्दल विचारणा केली… तेव्हा त्याने खरे कारण सांगितले की, ” मी पहिल्यांदा बर्फावर किंवा बर्फाच्या रस्त्यावर गाडी चालवत आहे आणि मला ती सवय नाही मुळे मी स्पीड कमी केली”… हे ऐकून त्या पोलिसांनी स्वतः ती कार चालवत सुधीरला हायपेरीपर्यंत पोचवले होते.

ग्रामीण भागात काम केल्याने पीआर लवकर मिळतो. असे त्याने ऐकले होते… शिवाय त्या त्या भागातला पीआर  कोटा सुद्धा ठरलेला असल्याने शहरी भागाच्या तुलनेत ह्या ठिकाणी नंबर लागण्याची संधी जास्त असते हे त्याला आता लक्षात आले होते… त्यामुळेच अख्ख्या हायपेरीमध्ये दर महिन्याला एक दोन एक दोन नंबर पीआर साठी लागायचेच… आणि अलीकडेच त्याचा नंबर आलेला होता… ही आनंदाची बातमी आपल्या आईला देण्यासाठी सुधीर अधीर झाला होता… त्याने लगेच पुण्याला भारतात फोन लावला… आईला पीआरची गोड बातमी सांगितली… आणि आता तुझ्यासाठी सुनबाई बघ किंवा मग  इकडचीच  कॅनडाची एखादी बघतो… असं मनात आईसोबत आनंदाने बोलत राहिला…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ त्याग… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

माझं नाव विवेक शर्मा आहे. मी ३२ वर्षांचा आहे. जेव्हा लोक मला विचारतात की मी काय करतो, तेव्हा मी सांगतो की मी किराणा दुकान चालवतो. ते हसतात, कारण त्यांना माहीत आहे की मी आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये सुवर्णपदक विजेता आहे, आणि माझ्या कपाटात अजूनही सॅन फ्रान्सिस्कोमधील एका कंपनीचं ऑफर लेटर आहे, ज्यात वर्षाला २, ४०, ००० डॉलर्स पगाराचा उल्लेख आहे. मी ते पत्र कधीच फाडलं नाही, पण त्याचा वापरही कधी केला नाही.

ही गोष्ट १९९८ साली, कानपूरच्या किडवाई नगरमध्ये सुरू होते. दोन खोल्यांचं घर, ज्याच्या वरच्या मजल्यावर पत्र्याचं छप्पर होतं. माझे वडील रेल्वेत कारकून होते आणि माझी आई शिकवणी घ्यायची. मी एकुलता एक मुलगा होतो. माझ्या वडिलांचा पगार ८, ००० रुपये होता. माझ्या आईची शिकवणीचं उत्पन्न २, ००० रुपये होती. आम्ही मध्यमवर्गीयही नव्हतो, तर निम्न मध्यमवर्गीय होतो.

पण माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं: की त्यांच्या मुलाने एक महान माणूस बनावं. त्यांनी मला कधीच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला सांगितलं नाही. ते सहजच म्हणाले, “बाळा, तुला हवं तितकं शिक; पैशांची चिंता करू नकोस. “

मी शिकत राहिलो. मला दहावीत ९५% आणि बारावीत ९७% मिळाले. कोचिंगची फी १ लाख होती. माझ्या वडिलांनी त्यांचा पीएफ काढला. माझ्या आईने तिच्या बांगड्या विकल्या. मी कोटाला गेलो. मी दोन वर्षे पंख्याखाली बसून, डासांकडून चावून घेत अभ्यास केला. २०१२ मध्ये निकाल लागला, अखिल भारतीय रँक (AIR) १४७. आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स.

ज्या दिवशी पत्र आले, त्या दिवशी माझ्या वडिलांनी मिठाईचा बॉक्स आणला आणि तो संपूर्ण परिसरात वाटला. माझी आई रडली. ती म्हणाली, “आता माझा मुलगा अमेरिकेला जाईल. “

मी आयआयटीमध्ये यशस्वी झालो. कोडिंग, हॅकेथॉन, इंटर्नशिप. तिसऱ्या वर्षी गुगलमध्ये समर इंटर्न, १ लाख स्टायपेंडसह. माझ्या पहिल्या पगारातून मी वडिलांना फोन आणि आईला वॉशिंग मशीन घेऊन दिली. माझे वडील फोनवर म्हणाले, “बाळा, आता मी निवृत्तीनंतर आराम करेन. “

माझ्या शेवटच्या वर्षात प्लेसमेंट. मी रात्रंदिवस तयारी केली. डिसेंबर २०१५ मध्ये, सॅन फ्रान्सिस्कोस्थित, स्ट्राइपसारख्या एका पेमेंट स्टार्टअप कंपनीने माझी मुलाखत घेतली. चार फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत, सीटीओ (CTO) म्हणाले, “आम्हाला तूच हवा आहेस. ” ऑफर आली: $२४०, ०००, H1B व्हिसा, स्थलांतराची सोय.

मी हॉस्टेलमधील माझ्या मित्रांना हे आनंदातिरेकाने ओरडून सांगितले. त्या रात्री मी माझ्या वडिलांना फोन केला. वडील शांत राहिले, मग म्हणाले, “बाळा, ही खूप मोठी गोष्ट आहे. ” आई म्हणाली, “तुझा पासपोर्ट बनवून घे. “

मी ऑगस्ट २०१६ मध्ये रुजू होण्यासाठी तिकिटांच्या उपलब्धतेचा शोध सुरू केला.

मार्च २०१६ मध्ये मी होळीसाठी घरी आलो. वडील अशक्त दिसत होते. त्यांना खोकला येत होता. मी म्हणालो, “डॉक्टरला दाखवा. ” ते म्हणाले, “काही नाही, फक्त सर्दी आहे.” आईसुद्धा थकलेली होती. मला वाटले हे फक्त म्हातारपणामुळे असेल.

एप्रिलमध्ये मला आईचा फोन आला. वडील चक्कर येऊन पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये होते. मी तिथे धावत गेलो. डॉक्टर म्हणाले, “फुफ्फुसांचा संसर्ग आणि हृदयाचा त्रास आहे. अँजिओप्लास्टी करावी लागेल. ” खर्च ३ लाख रुपये होता.

माझ्या वडिलांचा वैद्यकीय विमा होता, पण त्यात फक्त अर्धाच खर्च समाविष्ट होत होता. मी माझ्या इंटर्नशिपचे २ लाख रुपये काढले. ऑपरेशन झाले. वडील वाचले.

मी माझ्या अंतिम प्रकल्पासाठी मुंबईला परत गेलो. मे महिन्यात, मी पुन्हा फोन केला. आईला अधूनमधून चक्कर येऊ लागली होती. तिला स्तनाच्या कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्याचे निदान झाले. डॉक्टर म्हणाले, केमो सुरू करावे लागेल, सहा वेळा, प्रत्येक वेळेचा खर्च ८०, ००० रुपये. एकूण ५, ००, ००० रुपये, आणि नंतर शस्त्रक्रिया करावी लागेल.

मला धक्काच बसला. माझे वडील सेवानिवृत्त होते, त्यांना १२, ००० रुपयांचे निवृत्तीवेतन मिळत होते. घरातली सगळी बचत संपली होती. मी मित्रांकडून उसने पैसे घेतले आणि १, ००, ००० रुपये मिळवले. बाकीचे पैसे?

जून महिन्यात, मी घरी बसलो होते, हातात ऑफर लेटर होते. व्हिसाची मुलाखत १५ जुलैला होती. विमानप्रवास १० ऑगस्टला होता. माझ्या आईची पहिली केमो २० जूनला होती.

मी माझ्या वडिलांना म्हणालो, मी कर्ज घेईन. माझे वडील म्हणाले, “कोण फेडणार? मला घर गहाण ठेवावं लागेल. ” मी म्हणालो, “मी ठेवीन. ” माझे वडील म्हणाले, “हे घर तुझ्या आईचं आवडतं आहे. “

त्या रात्री, मी छतावर बसलो होतो. आकाशात एक विमान उडत होतं. मला वाटलं, “हे विमान मला घेऊन जाईल. ” त्याचवेळी, माझी आई खाली वेदनेने विव्हळत होती.

मी माझ्या मार्गदर्शकाला ईमेल केला, “मी रुजू होणं सहा महिन्यांसाठी पुढे ढकलू शकतो का? ” उत्तर आलं, “सॉरी विवेक, आम्हाला आत्ता लोकांची गरज आहे. हवंतर तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करू शकता. “

मी पुन्हा ईमेल केला, “आताच येण्याचा प्रयत्न करतो. “

१४ जुलैची रात्र. उद्या व्हिसाची मुलाखत. परवा आईची दुसरी केमो. वडील औषध आणायला गेले होते. जेव्हा ते परत आले, तेव्हा औषधाची चिठ्ठी खाली पडली आणि त्यांना ती उचलायला वाकता येत नव्हतं. मी ती उचलली. तेव्हा मला जाणवलं, जर मी निघून गेलो, तर हे दोघे कसे जगतील? बाबा सेवानिवृत्त आणि आजारी आहेत. आईची केमोथेरपी चालू आहे. भावंडं नाहीत. मदतीला कोणी नातेवाईक नाहीत. तिला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाईल, तिची औषधं कोण आणेल, रात्री तिला पाणी कोण देईल?

मी सकाळी व्हिसाची मुलाखत रद्द केली. कंपनीला ईमेल केला, “ऑफरबद्दल धन्यवाद. कौटुंबिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे, मी रुजू होऊ शकत नाही. “

मित्रांनी फोन केला, “तू वेडा झाला आहेस का? तू १ कोटी ६० लाख रुपयांची नोकरी सोडत आहेस. ” 

मी म्हणालो, “हो. “

मी आईला हे सर्व सांगितलं नाही. मी बाबांना सांगितलं. ते गप्प राहिले, मग म्हणाले, “बाळा, तुझं करिअर. ” मी म्हणालो, “मी माझं करिअर पुन्हा उभं करेल, पण जर आत्ता गेलो तर तुम्ही पुन्हा मला दिसणार नाहीत. “

मला कानपूरमध्ये नोकरी मिळाली. एका स्थानिक सॉफ्टवेअर कंपनीत, पगार ३५, ०००. मी रुजू झालो. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ ऑफिस, संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये. केमोथेरपी दरम्यान आईचे केस गळाले आणि ती रडली. मी तिच्यासाठी एक विग विकत घेतला. मी बाबांना त्यांची औषधं वेळेवर दिली. २०१६ ते २०१८, अशी दोन वर्षे निघून गेली. आईची शस्त्रक्रिया झाली आणि ती बरी झाली. कॅन्सर नियंत्रणात आला. बाबांची तब्येत स्थिर झाली. पण पैसे संपले. माझ्यावर ७ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

२०१८ मध्ये कंपनी बंद झाली. मी बेरोजगार झालो. मी इतर ठिकाणी मुलाखती दिल्या आणि बंगळूरुहून १८ लाख रुपयांची नोकरीची ऑफर आली. पण मी नकार दिला. माझे वडील म्हणाले, “जा, बाळा. ” मी म्हणालो, “मी आता जाऊ शकत नाही. माझ्या आईला दर तीन महिन्यांनी तपासणीची गरज असते, तुम्हाला मधुमेह आहे. तुमची काळजी कोण घेणार? “

माझे मित्र म्हणाले, “तू तुझं करिअर खराब करत आहेस. ” मी म्हणालो, “हे करिअर माझं आहे आणि आई-वडीलही माझेच आहेत. “

मी माझ्या घराखाली, वडिलांच्या नावाने ‘शर्मा जनरल स्टोअर’ नावाचं एक छोटं दुकान उघडलं. मी माझा कॉम्प्युटर तिथेच ठेवला आणि डाळी व तांदूळ विकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मला लाज वाटली. मी एक आयआयटीयन होतो. मग एक काकू आल्या आणि म्हणाल्या, “बाळा, तुझ्या आईने मला शिकवलं आहे. तू दुकान उघड, आम्ही इथूनच खरेदी करू. “

हळूहळू दुकान भरभराटीला आलं. मी सकाळी ६ वाजता घाऊक बाजारात सामान आणायला जायचो, दिवसा खरेदी करायचो, रात्री फ्रीलान्स कोडिंग करायचो आणि ५०० डॉलर्समध्ये एक वेबसाइट बनवली.

२०१९ मध्ये, माझी आई पूर्णपणे बरी झाली होती. डॉक्टर म्हणाले, “सर्व काही ठीक आहे. ” त्या दिवशी, मी दुकान बंद करून मंदिरात गेलो. मी प्रसाद अर्पण केला. जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले, “बाळा, तू आमच्यासाठी सर्व काही सोडून दिलंस. ” मी म्हणालो, “मी सोडलेलं नाही, मी फक्त बदललं आहे. “

२०२० चा लॉकडाऊन. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली. लोकांना किराणा सामानाची गरज होती. मी घरपोच डिलिव्हरी सुरू केली. मी सायकलवरून जाऊ लागलो. बाबा हिशोब सांभाळायचे. आई पॅकिंग करायची. त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही २ लाख रुपये कमावले. मी कर्जाची अर्धी परतफेड केली.

२०२१ मध्ये, मी माझ्या दुकानाच्या बाजूलाच मुलांना कोडिंग शिकवण्यासाठी एक छोटा कॉम्प्युटर क्लास सुरू केला. त्याची फी महिन्याला ५०० रुपये होती. २० विद्यार्थी आले. मला पुन्हा माझं आवडतं कोडिंग करायला मजा येऊ लागली.

२०२२ मध्ये, अंश नावाच्या ए विद्यार्थ्याने, जो माझ्याकडे शिकला होता, राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले. बातमी आली, “कानपूरच्या एका आयआयटीयन किराणा दुकानदाराकडून शिकून  विजय मिळवला. ” तो लेख व्हायरल झाला.

त्याच आठवड्यात, मला स्ट्राइपच्या त्याच सीटीओकडून एक ईमेल आला. त्यांनी लिहिले होते, “विवेक, मी तुझी स्टोरी पाहिली. आम्ही भारतात ऑफिस उघडत आहोत. तुला रिमोट पद्धतीने, पार्ट-टाइम, एका शैक्षणिक उपक्रमाचे नेतृत्व करायला आवडेल का? “

मी हो म्हटले. आता मी सकाळी दुकानात, दुपारी क्लासमध्ये आणि संध्याकाळी यूएस टीमसोबत काम करतो. पगार डॉलर्समध्ये नाही, पण तो प्रचंड आहे.

गेल्या महिन्यात, माझ्या वडिलांनी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली. मी एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. तेच मित्र आले होते, जे म्हणायचे की वडिलांनी माझे करिअर खराब केले. माझे वडील माईक घेऊन म्हणाले, “माझा मुलगा अमेरिकेला गेला नाही, पण तो माझ्यासोबत राहिला. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याने माझा हात धरला होता. जेव्हा त्याच्या आईचे केस परत आले, तेव्हा त्याने तिच्या केसांच्या वेण्या घातल्या. बाळा, बरेच लोक करिअर घडवतात, पण त्यातले काही मोजकेच यशस्वी होतात.”

माझी आई हळू आवाजात म्हणाली, “मला ते ऑफर लेटर अजूनही आठवतंय. तू ते कपाटात का ठेवलंस? “

मी म्हटलं, “जेणेकरून मी काय मागे सोडलंय याची मला आठवण राहील. ” 

ती म्हणाली, “तू सोडलं नाहीस, तू निवड केलीस. “

आज मी दुकानात बसलो आहे. माझ्यासमोर शाळेची मुलं कँडी विकत घेत आहेत. माझ्या लॅपटॉपवर कोडिंग चालू आहे. बाबा माझ्या शेजारी वर्तमानपत्र वाचत आहेत आणि आई काउंटरवर बसली आहे.

कधीकधी रात्री, मी ते ऑफर लेटर बाहेर काढतो. २४०, ००० डॉलर्स. मग मला आईचं हसणं ऐकू येतं आणि बाबांचा खोकला थांबलेला असतो. समजलं. आणि मी ते पत्र परत ठेवून देतो.

लोक विचारतात, मला त्याचा पश्चात्ताप होतो का? मी खरं सांगतो, पूर्वी व्हायचा. जेव्हा मित्र बंगळूरुमधून, अमेरिकेच्या सहलींचे फोटो पोस्ट करायचे. आता तसं होत नाही. कारण मी माझ्या करिअरचा बळी दिला नाही, उलट मी त्याला एक नवीन ओळख दिली. माझं करिअर आता फक्त कोडिंग नाही, तर ती एक काळजी आहे.

मी माझ्या आई-वडिलांसाठी अमेरिका सोडली, पण त्यांच्यासोबत आयुष्य जगलो. मला रोज सकाळी माझ्या वडिलांना चहा द्यायला आणि माझ्या आईचे पाय दाबायला मिळतात. हे काही २. ४ कोटी रुपयांनी मिळत नाही.

जर मला पुन्हा संधी मिळाली, तर मी तेच करेन. माझा व्हिसा रद्द करेन, नोकरी सोडेन आणि एक दुकान उघडेन. कारण काही त्याग हे नुकसान नसतात; ती प्रेमातील गुंतवणूक असते.

आणि आज, जेव्हा एखादं मूल विचारतं, “दादा, आयआयटी पूर्ण केल्यावर दुकान का उघडलं? ” तेव्हा मी हसून म्हणतो, “कारण माझ्या आई-वडिलांची माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि मी त्यांचा पूर्णवेळ सीईओ आहे. ” 

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “Just Good Friends” (अनुवादित) – इंग्रजी लेखक : जेफ्री आर्चर ☆ स्वैर अनुवाद – डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ “Just Good Friends” (अनुवादित) – इंग्रजी लेखक : जेफ्री आर्चर ☆ स्वैर अनुवाद – डॉ मकरंद पिंपुटकर 

इंग्लंडमधील माझी व रॉजरची कहाणी…

किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं तर बेडरूमच्या पडद्यामागे साधारण उजाडत होतं आणि शेजारी उघडाबंब रॉजर अजून घोरत होता. माझ्यासारखा व्यायाम केला तर त्याची ढेरी कमी होईल हे त्याला मी सांगून सांगून थकले होते पण व्यायामापेक्षा बीअरच त्याला जास्त पसंत होती, मग पोट वाढणार नाही तर काय होणार?

अर्थात या बीअरमुळेच माझी व त्याची भेट झाली होती हे मला विसरून चालणार नाही. मी ज्या बारमध्ये असे त्या “जिन and टॉनिक” बारमध्ये त्याचं नेहमी येणं असे. दिसायला चार चौघांसारखाच पण कमालीचा साधा व सरळ.

काऊंटरमागच्या माझ्या ठरलेल्या जागेवरून मी त्याच्याकडे एकटक बघत रहात असे. माझा जीव जडला होता त्याच्यावर – एकतर्फीच हं. त्याने कधी मान वर करून माझ्याकडे पाहिलेही नाही. पण मी आशा सोडली नाही कधी.

मग त्याच्या आयुष्यात नटमोगरी fake फर कोट घालणारी एलिझाबेथ आली. आमच्या बारमधलं एलिझाबेथबद्दलचं सगळ्यांचंच मत चारचौघांत सांगण्यासारखं; छापण्यासारखं नव्हतं. या प्रकरणाचा शेवट दु:खदच होणार याबद्दलही सगळ्यांचं एकमत होतं.

मला दहा वेळा वाटलं की तिच्याबद्दल सगळं सगळं रॉजरला सांगावं पण मला तिचा मत्सर वाटतो म्हणून मी चहाड्या करतीये असे तो म्हणणार याची मला खात्री होती आणि माझा धीर झाला नाही हेच खरं.

मोजून २० दिवसांत हे लफडं संपलं. मला exact माहितीये कारण प्रत्येक दिवस मी मोजत होते. आमच्याच बारमध्ये त्यांचं वाजलं. ती त्याला फडाफडा बोलली आणि ताडताड निघून गेली. या वेळी मात्र मी मागे हटली नाही. जनाची मनाची सगळी लाज कोळून प्यायले आणि सरळ जाऊन त्याच्या टेबलवर शेजारच्या खुर्चीतच जाऊन बसले.

तो काही बोलला नाही पण मला उठून जा असंही म्हणाला नाही. पण मग जेव्हा मी त्याच्याकडे बघून माझ्या पापण्या जेव्हा दिलखेचकपणे उघडमिट उघडमिट केल्या तेव्हा मात्र त्याच्या ओठावर एक हलके स्मित झळकले. माझ्या गालावर त्याने हलकेच हात फिरवला. माझ्यातर काळजाचा ठोकाच चुकला. आंखोही आंखोमें इशारा हो गया – आणि मी सरळ त्याच्याबरोबरच बारमधून निघाले आणि त्याच्या घरीच move in झाले.

सुरुवातीला काही दिवस तो एलिझाबेथच्याच आठवणीत होता – मला जाणवत होतं. ती सुंदर असेलही पण तिचा फर कोट duplicate होता. मी श्रीमंत नसेनही पण माझ्या आईने माझ्यासाठी दिलेला अस्सल golden fur coat होता. माझं त्याच्या घरी असणं त्याला आता अंगवळणी पडू लागलं and soon even the memories of Elizabeth were history.

दर सकाळी तो माझ्यासाठी दूध आणि त्याचा बेड टी घेऊन यायचा आणि आमची सकाळ सुरू व्हायची. मला फारसं धड जेवण बनवता यायचं नाही पण रॉजरनेही तसा कधी आग्रह धरला नाही. मला मासे आवडतात म्हणून तोही आता मासे खाऊ लागला होता. आठवड्यातून एक दोनदा तरी आम्ही “जिन and टॉनिक” मध्ये जायचो. मला रॉजरबरोबर पाहून तिथल्या barmaids च्या डोळ्यातील असूया मला स्पष्ट दिसायची. “एलिझाबेथ गेली आणि हिने तिची जागा पटकावली. काय पाहिलं यानं तिच्यात कोण जाणे! ” मुद्दामहून मला ऐकू येईल अशा comments मारल्या जायच्या. मीही तितकीच रॉजरला बिलगायचे आणि तोही सगळ्यांदेखत मला जवळ घ्यायचा – कुरवाळायचा. दुनिया जले तो जले!

रॉजरने कधी मला माझ्या भूतकाळाविषयी विचारलं नाही आणि मीही स्वत:हून काही सांगितलं नाही. तो त्याच्या रुटीननुसार ऑफिसला जायचा आणि मग माझंच घरात साम्राज्य असे. तो निघेपर्यंत मी जरी पलंगावर लोळत पडले तरी त्याची तक्रार नसे.

आरशासमोर बसून आपली छबी न्याहाळत बसणे हा माझा आवडता timepass होता त्यात तासन तास कसे जायचे हेही मला कळायचे नाही. त्याची यायची वेळ होइपर्यंत मी छान तयार होऊन दारातच त्याच्या स्वागताला तयार असायचे. त्याच्याभोवती रुंजी घालायचे, आळोखे पिळोखे देत लाडिकपणे त्याच्या मांडीवर बसायचे – त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर – ” मी ” असं अगदी बेधडक सांगावसं वाटायचं. सगळं कसं अगदी छान चाललं होतं.

नाही म्हणायला गेले काही दिवस शेजारच्या बंगल्याच्या छतावरून एक काळुंद्रा बोका माझ्याकडे सारखा रोखून बघतोय असं मला जाणवतंय. रॉजर आधीच्या माझ्या बॉयफ्रेंडबद्दल तर त्याला माहित नसेल ना? बिन लग्नाची माझी pregnancy आणि माझ्या जुळ्या मुली – यांच्याबद्दल तर त्याला कळलं नसेल नाही ना? मला रॉजरला गमवायचं नव्हतं.

आज तर रॉजर कामावरून येतानाच त्या काळुंद्र्याने रॉजरला गाठलं, त्याच्या पायात पायात करून माझ्या चहाड्या करायचा प्रयत्न केला पण रॉजरने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मी जशी आहे तशी त्याला आवडत होते, त्याला माझ्या भूतकाळाविषयी interest नव्हता. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू.

तो दार उघडून आत येताच मी त्याला सामोरी गेले. नेहमीप्रमाणे त्याने माझ्यासाठी बशीत दूध ओतले. मी त्याच्याकडे रोखून पाहिले, त्याच्याबरोबर टेबलावर पहिल्यांदा बसले तेव्हासारखी डोळ्यांची उघडमिट उघडमिट केली, जीभेने लपालपा दूध पिऊ लागले, माझी सोनेरी शेपुट फेंदारून मी – त्याची लाडकी मनीमाऊ – त्याच्याकडे एकटक पाहत होते.

आम्ही मांजरी फक्त रागवलो कीच शेपुट फेंदारतो असा एक सर्वत्र मोठा गैरसमज आहे! We are friends – Just Good Friends!

मूल इंग्लिश लेखक : जेफ्री आर्चर 

स्वैर अनुवाद : डॉ. मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हिरव्या बांगड्या…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

☆ “हिरव्या बांगड्या” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

काळे आजींना भेटायला मी जात असते. काका गेले तेव्हापासून आजी जरा नरम गरम असतात. रात्री सोबतीला एक बाई झोपायला येते. दिवसा दोन बायका येऊन जाऊन कामाला येत असतात. त्यांना एकच मुलगी आहे. ती जवळच राहते. त्या तिला तायडी म्हणतात. ती दिवसातून एकदा तरी येऊन जाते.

खरंतर आईला तिच्या घरी घेऊन जायला ती तयार आहे. जावई पण “या माझ्याकडे रहायला” म्हणतो आहे. पण त्या म्हणतात “अजून मला होत आहे तोपर्यंत मी एकटी राहते. नंतर तुमच्याकडेच येणार… “

मला एकदा म्हणाल्या, “अगं असं लेकीच्या सासरी नको वाटतं ग.. मी गेले की त्यांचं सगळं आयुष्य बदलेल.. “

आजी शहाण्या आणि समंजस आहेत.

अशीच त्या दिवशी आजींकडे गेले. खुर्चीवर बसणार तर त्या म्हणाल्या, “अग नीता, आधी इथं माझ्याजवळ कॉटवर ये. “

गेले…

माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, “अगं किती सुरेख हिरव्या बांगड्या घातल्या आहेस… घालाव्या ग.. बघायला किती छान वाटतंय बघ बरं… “

आजींना खरं ते सांगितलं. म्हटलं.. “काल कपाट आवरताना दिसल्या म्हणून अशाच घातल्या. हल्ली रोज काचेच्या बांगड्या घालते असं नाही. “

“तुला सांगु, मला तर हिरव्या बांगड्या फार आवडायच्या… “

“आवडायच्या म्हणजे.. आता नाही आवडत?”

“अग असं काय विचारतेस?

हे गेले.. आता कुठलं हिरव्या बांगड्या घालणं नशीबात… “

“पण हिरव्या बांगड्यांचा आणि काकांचा काय संबंध?”

“मी काय म्हणते तुला समजलं नाही. “

“कळलं मला… तुम्ही लग्नाआधी हिरव्या बांगड्या घालत होता?”

“हो… “

“मग तेव्हा कुठे काका होते?”

“अग पण ते वेगळं… “

“वेगळं कसं?”

“अग सवाष्णीच लेणं.. मी कसं घालू?” हे बोलताना आजींचे डोळे भरून आले होते..

“थांबा, तुम्हाला सांगते… आत्मा अमर आहे. मृत्युनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा मरत नाही. आवडत्या व्यक्तीभोवती तो फिरत असतो… त्याचं काय चाललं आहे ते बघत असतो. हे आपण वाचलं आहे की नाही?… “

“हो… मग त्याचा ईथं काय संबंध… “

तुमची तायडी, तिची मुलं.. मार्गाला लागली आहेत. आता काकांचा आत्मा दुसरीकडे नाही तर तुमच्या भोवतीच फिरत असणार.. तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्या तर काकांच्या आत्म्याला आनंदच होईल.. तुमचा आनंद तोच त्यांचा आनंद… “

“अगं पण समाजाचं काय?”

“कुठला समाज?” असं म्हटल्यावर त्या विचारात पडल्या.

म्हटलं, “तुम्हाला भेटायला येणारे लोक हा समाज? त्यांचं तुमच्या हाताकडे लक्ष तरी असतं का?”

“हो ग… तू म्हणतेस ते पटतंय बघ.. आणि आजकाल फारसं कोणी घरी येत ही नाही. त्यांचंही बरोबर आहे.. प्रत्येकजण आपापल्या नादात.. ज्याला त्याला आपला संसार, नोकरीधंदा आहे, त्यांना कामही असतात ग.. “

सत्य आहे ते आजींनी स्वीकारलं होतं. हे सांगताना त्यांचा आवाज शांत होता. हळुवारपणे त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं… “घालावीशी वाटते ना हिरवी बांगडी, तर घाला.. “

“नको ग नको… ” आजी अगदी घाईने म्हणाल्या…

“आहेत का तुमच्याकडे?”

“हो समोरच्या कपाटात डबा आहे, त्यात आहेत. “

मी डबा आणून दिला. त्यातल्या हिरव्या बांगड्या काढून हातात घेऊन त्या बसल्या होत्या. डोळे भरून आले होते…

संस्कारांच्या दबावाचा एक खोल ठसा वर्षानुवर्ष मनावर कोरलेला असल्याने त्यांना बांगड्या घालायचे धैर्य झाले नाही.. रूढी परंपरा मोडणं इतकं सोपं नसतंच…

त्याची मूळं मनात खोल घट्ट रुतून बसलेली असतात…

“राहू दे.. नकोच… ” असं म्हणत त्यांनी हळूच बांगड्या डब्यात ठेवून दिल्या.

निघताना त्यांनी परत माझे हात हातात घेतले.. माझ्या पोटात तुटत होते.. डोळे भरून आले होते.. घरी आले तरी आजीच दिसत होत्या…

मध्यंतरी एका लग्नघरी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. तिथे कासारीणबाई सहजपणे म्हणाल्या,

“या हिरव्या रंगाच्या बऱ्याच प्रकारच्या बांगड्या आणलेल्या आहेत. आणि “तशा” बायकांसाठी या ईतर रंगाच्या पण आहेत… “

म्हणजे बदल करायचं मनात असेल तरीसुद्धा… समाज तुम्हाला त्या रुढीची आठवण करून देत राहतो. हे असे विचार लगेच पुसले जातच नाहीत…

आठ दिवसांनी आजींचा फोन आला. “नीता भेटायला येशील का… ” 

गेले… बांगड्यांचा डबा उशी जवळ होता.

“ये ग ये… तुझीच वाट पहात होते… “

त्या लगेच सांगायला लागल्या.. “तू सांगितलेल्या गोष्टींवर मी विचार केला, मग पटलं मला… तु म्हणतेस ते खरं आहे… आता मी काय गंमत करते माहित आहे? कोणी नसलं की मी बांगड्या हातात घालते… अगं पहिल्यांदा घातल्या तेव्हा तर इतका आनंद झाला म्हणून सांगू?लग्नाचा चुडाच आठवला… ” हे सांगताना त्यांचे डोळे चमकत होते…

पुढे म्हणाल्या, “आता मनात आलं की घालते… पण कोणी नसताना… परवा तर काय झालं… तायडी लॅचकीनी दार ऊघडून आली की अचानक, आणि हातात बांगड्या तशाच… पण तिचं माझ्या हातांकडे लक्ष गेलंच नाही, चांगली दोन तास होती… “

“बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही?”

“हो ग… “

“आज तुला घालून दाखवते. “

आजींनी आठ-आठ बांगड्या हातात घालून हात पुढे केला…

अपार आनंद चेहऱ्यावर होता.. आज आजींचे डोळे हसत होते…

त्यांचे सुरकुतलेले हात मी हातात घेतले… म्हटलं, “आज काकांचा आत्माही हसत असेल… बायकोला खुष बघून… “

“ईश्य… ” म्हणताना आजी मस्तपैकी लाजल्या… त्याचं वर्णन शब्दात करूच नये…

असा सहज ओसंडून वाहणारा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसला की मी समाधानी असते… असा निरपेक्ष आनंद वाटत राहावा…

खरं सांगू… त्यासाठी खूप काही करावं लागत नाही…

एके दिवशी तायडी माझ्यासाठी डझनभर हिरव्या बांगड्या घेऊन आली… “नीता मावशी… ” म्हणताना तिचे डोळे भरून वहात होते… “अग आता आईला बांगड्यांच्या नादच लागला आहे.. त्यामुळे हल्ली आई खूप आनंदात असते… ”

© नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृतार्थ…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ कृतार्थ… ☆ प्रा. भरत खैरकर 

 सेवानिवृत्त कमांडर विश्वास त्यांच्या बुलढाण्याच्या आलिशान आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बंगल्यावर निवांत आरामखुर्चीत बसलेले होते. एकंदर २६ गुंठ्यामध्ये असलेला तो भव्यदिव्य बंगला.. आज जवळपास साडेपाच कोटी रुपये किमतीचा आहे. शहरांमध्ये त्यांना मान आहे.. सामाजिक कार्य आणि सिंबोयसिस क्लबच्या माध्यमातून त्यांनी शहरातील जेष्ठ आणि सुशिक्षित व्यक्तींचा गोतावळा आपल्याभोवती जमा केलेला आहे.. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, नामांकित डॉक्टर, वकील, समाजसेवक, इत्यादींचा समावेश आहे. हा क्लब नेहमी नावीन्यपूर्ण गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेतो.. त्यांच्याशी परिचित होतो.. ह्या सर्वांमध्ये कमांडर विश्वासचा खूप मोठा वाटा आहे.. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे.. आणि नौदलाचा अनुभव तर विचारायलाच नको.. एकापेक्षा एक मजेदार किस्से त्यांच्याकडे आहेत.. त्यामुळे सहजच कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षिली जाते..

 आपल्या कृतार्थ जगण्यामागे त्याच्या माध्यमिक शाळेचा जास्त प्रभाव असल्याचे ते सांगतात.. चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम आणि विदर्भात पाचवा नंबर आलेल्या विश्वासला चिखलदरा येथील सरकारी पब्लिक स्कूलमध्ये वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला होता.. विश्वासचे वडील शिक्षक असल्याने चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण तसे घरीच झाले होते.. बाबांनी त्याचे नाव चौथ्या वर्गातच नोंदविले होते. विश्वास आधीपासूनच चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता.. वस्तिगृहात थोडा उशिरा प्रवेश झाल्याने पंधरा-वीस दिवसाचा अभ्यास बुडाला होता.. तो होमवर्क बाकी असल्याने.. जुनी मुले आकसापोटी त्याला कुठलीही वही, बुक देत नव्हते.. शिवाय शाळेमध्ये जिल्ह्याचे कलेक्टर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी.. नव्याने आलेल्या विश्वासची निवड प्राचार्यांनी केली होती.. ह्या गोष्टीचा रागही इतर मुलांमध्ये होता.. स्वागत करणाऱ्या मुलाला फुलपॅंट असावी म्हणून.. खुद्द प्राचार्यांनी आपल्या मुलाची फुलपॅन्ट विश्वासला दिली होती.. त्यामुळे तर इतर मुलांचा अधिकच जळफळाट झाला होता. त्या कार्यक्रमात “अध्यक्ष महाराज… ” अशी विश्वासने भाषणाची सुरुवात केली होती.. तेव्हापासून सर्व मुले त्याला “अध्यक्ष महाराज” म्हणूनच चिडवायची..

 काही दिवसानंतर गॅदरिंग झालं. त्यामध्ये “जानकीबाई” नावाचा “लेडीज रोल” करायचा होता.. विश्वासने स्वतःहून ” हो” म्हटले.. नाटक झाल्यानंतर मात्र सर्वांनी “जानकीबाई.. जानकीबाई.. ” म्हणून विश्वासला खिजवायला सुरुवात केली. मग मात्र चिडवणाऱ्या सर्वांना तो एकसाथ बडवत सुटला.. त्यामध्ये मोठ्या वर्गाची ही मुले होती!

… त्यातील एका मुलाने प्राचार्यांकडे तक्रार केली की, ” सर मला विश्वासने मारलं. “

 तर प्राचार्य म्हणाले, “तो कुठल्या वर्गाचा मुलगा आहे?”

 ” सर तो पाचवीचा मुलगा आहे. ” 

“आणि तू कुठल्या वर्गाचा आहे? “

“सर मी सातवीतला आहे!” 

“अरे तरीही तू पाचवीतल्या मुलाचा मार खाल्लास? जाऊन मार त्याला परत!” प्राचार्य सर त्याला बोलले.

 असा हा प्राचार्याच्या छत्रछायेखाली वाढलेला विश्वास जशास तसा अशा स्वभावाचा, शरीराने आणि मनाने बळकट बनला होता. तेव्हाच त्याने बारावीनंतर आपण नेव्हीमध्ये जायचे हा बेत केला होता. त्यासाठी त्याने पुणे गाठलं होतं.. नेव्हीसाठी पोहणे अत्यंत आवश्यक आहे.. म्हणून मोरवाडीजवळील टाटा मोटर्सच्या स्विमिंग पूलामध्ये त्याने रितसर पोहणे शिकून घेतले होते. तो पोहण्यामध्ये एवढा तरबेज झाला होता की एकदा तर त्याने “कोचिंग ते लक्षद्वीप” असा शिडाच्या जहाजातून प्रवास केला होता.. त्यामुळे त्याची समुद्राची भीती गायब झाली होती.

 नेव्हीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर उत्तरोत्तर प्रमोशन घेत विश्वास कमांडर या पदापर्यंत पोहोचला.. आपल्या कार्यकाळात त्याने नेव्हीमध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबविले.. विश्वास हा उत्तम कवी, लेखक, नाटककार, कलावंत, असल्याने तो सतत विविध उपक्रम नेव्हीच्या लोकांसाठी राबवत होता. त्यातून वाढलेला लोकसंग्रह आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती विश्वासला नेहमीच इतरांपासून ठळक दर्शवित होती.. विश्वासच्या ह्याच कर्तबगारिमुळे त्याला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपर्यंत नेव्हीच्या माध्यमातून पोहचता आले होते.. तरीही ह्या गोष्टीचा अभिमान आपल्या डोक्यात जाऊ न देता, विश्वासचे पाय जमिनीवरच होते.. त्यामुळे तो अधिक लाडका झाला होता..

 सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी करावे, म्हणून “राजकारण करायचे कां?” हे विचारायला विश्वास त्यांचे आध्यात्मिक गुरु रविशंकर यांना भेटायला बेंगलोरला गेला होता. मात्र त्यांनी “तू इलेक्शनला उभा राहू नकोस?” सांगितल्यावर परत गावाला येऊन सिम्बॉयसिस क्लबची स्थापना केली होती..

 विश्वासचा मुलगा आणि सुनबाई दोघेही नेव्हीमध्ये कमांडर आहेत.. हे दोघेही विश्वासचा वारसा चालवत भारतीय नौदलाची सेवा करत आहेत.. त्याने आपला बंगला बांधला तेव्हा, त्याच्या गुरुने एक उपदेश केला होता. “देणा-याकडे भरपूर आहे. तो भरभरून देतो.. फक्त आपली पात्रता तेवढी असली पाहिजे.. जसे की समुद्रामधून तुम्ही पाणी वाटी, मग किंवा बकेट कशा पद्धतीच्या.. पात्रातून काढता त्यावर तुमचा पाणीसाठा ठरतो. मात्र समुद्राला काही फरक पडत नाही.. त्यामुळे आपण आपले पात्र वाढविले पाहिजे. मोठे केले पाहिजे. ” हे आठवून विश्वासने निवांत खुर्चीत बसून डोळे मिटून घेतले होते.. आणि समोरच्या बंगल्याकडे पाणावलेल्या डोळ्याने बघत होता.

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परतफेड ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ परतफेड… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद महेशला कधी वाटला नाही. कारण, घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा दवाखान्याकडे जावे लागे.

घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ-मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, “आता लौकर पळ, नाही तर डॉक्टर जातील. ” दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे.

मग रस्त्यातच पोह्यांचा एकेक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती, आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर त्याला एकदाही मिळाले नव्हते.

महेश देवळापाशी आला. त्या ठिकाणी सूमंत पाठकचे किराणा मालाचे दुकान होते. महेश जवळ आल्यावर सुमंत पाठकने त्याला हाक मारली, व म्हटले “अरे शिंच्या, काय सामान घेऊन जाताना धाड होत नाही. पैसे कोण? तुझा बाप देणार आहे की काय ?”

महेश एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, “बाबा तर आजारी आहेत. आईला विचारुन सांगतो. “

पाठक खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या, आणि तो फार दारू पितो अन गांजा ओढतो हे सगळ्यांना माहीत तर होतेच. पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, “काय खेळ चालवलात की काय ? उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन. “

पाठकने नंतर हात उगारला व महेशच्या सणसणीत थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले, व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला.

आई त्याची वाट बघत होती. पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, “काय झालं… ? सगळं सांग मला. “

महेशने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले, “आज दवाखाना नको. मघाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस. ” ती कपाटाकडे गेली व एक-दोन डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काही तरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, “मी येथेच गाडगीळां कडे जाऊन येते. “

महेशने समोरच्या चहा-पोह्यांकडे पाहिले. किती तरी दिवसांनी त्याला कट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरुन गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला.

गाडगीळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि तेथल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या.

थोड्या वेळाने आई परत आली. चहा-पोहे तसेच पाहून तिने महेशकडे पाहिले. पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली आणि बाबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, “अहो, मी दहा मिनिटांत परत येते मारुतीला जाऊन”. तिने बाहेरच्या दाराला नुकतीच कडी लावली व महेशला म्हटले, “चल माझ्याबरोबर. ” 

महेशने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, “तुझी जोडवी राहिलीच की गंऽऽ… ” जोडवी घातल्याखेरीज आई कधी बाहेर जात नसे आणि तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे.

मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यांतील जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, “हं… आता चल. “

आई पाठकाच्या दुकानात आली. पाठक रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी पाठक तिच्या एवढा उंच दिसत होता.

“पाठक ऽऽ… तुमचे किती पैसे द्यायचे आहेत ?” तिने शांतपणे विचारले. “पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना ? त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना ?”

“म्हणालो म्हणून काय झालं… ? मऊ लागलं म्हणून काय कोपरानं खणायचं काय… ?”

पाठक छद्मीपणे म्हणाला,

“तुमची बाकी नऊ रुपये आहे ?” आईने नोटा काढल्या व एकेक पुन्हा मोजून त्या पाठकला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुर्मीने म्हटले, “बाकी चुकती झाली. आता यापुढं उधार मिळणार नाही. ” 

“सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही” आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला व फाडकन सूमंत पाठकाच्या मुस्काटात दिली. काडऽऽक्कन आवाज आला.

पाठक खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावर दोन बायका शाल पांघरून मारूतीला चालल्या होत्या, त्या तेथेच थबकल्या. एक माणूस सायकली वरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिऱ्हाईके तर एकदम गप्पच झाली, आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच दोरा फिरवू लागला.

“अरे हरामखोरा, तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली. ” आई कडाडली, “आणखी एक लक्षात ठेव. पुन्हा जर मूलाच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढं पाडीन आडवं मूर्दाडा… लग्नाआधीपासूनच मी ब्लॅकबेल्ट चँम्पियन होते लक्षात ठेव. माझा एक तडाखा म्हणजे तू मेला समज. “

आई तितक्याच शांतपणे फळी वरून खाली उतरली व महेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. “आता घरी जाऊन चहा तापवून देते. मग कट्ट्यावर बसून पोहे खा. “

महेश त्या विचाराने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेषच ऐट वाटली…

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “देणगी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “देणगी…” ☆ श्री मंगेश मधुकर

देणगी लंच ब्रेकनंतरच्या सुस्तावलेल्या वेळेत ऑफिसचा लँडलाईन वाजायला लागला… कुणीच जागचं हललं नाही म्हणून मग नाईलाजानं फोन घेतला.

“नमस्कार!! ”_

“हॅलो, xxx xxx सामाजिक संस्थेत फोन लागलाय का? ”

“हो, बोला… काय काम होतं? ”

“संस्थेला देणगी द्यायचीय. कुणी घरी येऊ शकेल का?”

“सर, तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. डिटेल्स पाठवतो.”

“अहो, मी म्हातारा माणूसयं. ऑनलाइन-फिनलाईन काही समजत नाही. घरी येत असाल तर देतो, नाहीतर सोडून द्या…”

“ओके, सर… मी स्वतः येतो. पत्ता सांगा…” 

दुपारी चार वाजता दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बेल वाजवल्यावर दोन दारांपैकी एक उघडलं. ओळख सांगितल्यावर आजोबांनी दुसरं लोखंडी दार उघडून घरात घेतलं.

“बसा… माफ करा तुम्हांला त्रास झाला. ” पाण्याचा ग्लास पुढं करत आजोबा म्हणाले.

“असं काही नाही. इट्स ओके. आमचं कामच आहे. तुम्ही मदत करताय हे महत्त्वाचं!”

“संस्थेच्या कामाविषयी थोडी माहिती देता येईल का?”

“अवश्य…” मी माहिती सांगायला सुरुवात केल्यावर आजोबांचे प्रश्न सुरू झाले… पुढचा अर्धा-पाऊण तास यातच गेला. आजोबांचं समाधान झाल्यासारखं वाटलं. तोपर्यंत चहा आला.

“तुमच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून आजपासून दर महिन्याच्या याच तारखेला देणगी द्यायचीय. एकच विनंती की इथं येऊन चेक घ्यावा लागेल. ”

रेग्युलर डोनेशन मिळणार म्हणून खूश झालो.

“काळजी नको. दरवेळेला मीच येईन. प्रॉमिस” चेक हातात घेत म्हणालो.

नवीन डोनर आणला म्हणून ऑफीसात आपला भाव वाढणार. कौतुक होणार, अशा कल्पनेच्या भराऱ्या मारणारं माझं विमान चेकवरची रक्कम पाहून धाडकन जमिनीवर येऊन पंक्चर झालेला टायरसारखा चेहरा झाला… आजोबांनी फक्त अकरा रुपयाचा चेक दिला होता!  खूप चिडचिड झाली तरी नॉर्मल रहायचा प्रयत्न करत होतो.

“देणगीची पावती?” आजोबांनी विचारलं.

“पोस्टानं पाठवतो. ”

“कशाला उगीच खर्च करता? पुढच्या महिन्यात चेक न्यायला याल तेव्हा दिली तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर द्या. दर महिन्याला आठवणीसाठी फोन करेन.” 

इच्छा नसताना मी मान डोलावली. पंधरा किलोमीटर अंतर तुडवत आलो. तासभर तोंड वाजवलं आणि हातात काय पडलं तर अकरा रुपये! मनात विचित्र असं फिलिंग होतं. निघताना आजोबांनी तोंडभर हसून निरोप दिला.

पुन्हा तासभर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोचलो. झालेला प्रकार कळल्यावर सगळे खो खो हसायला लागले. त्यानंतर दोन दिवस ‘माझं डोनेशन’ हा ऑफिसमध्ये चर्चेचा विषय होता. त्यावरून चिडवाचिडवी सुरू होती. प्रत्येकी अकरा रुपये काढून चहा-बिस्किटची पार्टी झाली. नंतर कामाच्या गडबडीत डोनेशनचा विषय मागे पडला. सगळे आपापल्या कामात गुंतलो.

काही दिवसानंतर कामात असताना मोबाईल वाजला… अनोळखी नंबर पाहून दुर्लक्ष केलं पण त्याच नंबरवरुन पुन्हा पुन्हा कॉल येत होता म्हणून फोन रिसिव्ह केला.

“मी xxx xxxx बोलतोय. ओळखलं का? मागच्या महिन्यात देणगीसाठी आला होतात.”

“हं, बोला आजोबा…” तुटकपणे म्हणालो.

“आपलं बोलणं झाल्याप्रमाणं आठवणीसाठी फोन केलाय… उद्या चेक घ्यायला आलात तर बरं होईल.”

दुसऱ्या दिवशी तीच परवड सहन करत अकरा रुपयांचा चेक घेऊन आलो. पुन्हा ऑफिसमध्ये मनोरंजनाचा भाग झालो. प्रत्येक महिन्याला हा प्रकार सुरू झाला. आजोबांचा फोन आला की जाऊन अकरा रुपयांचा चेक आणायचा, हे नवीन रुटीन झालं. नंतर नंतर तर चेक न बघताच बॅगेत ठेवायला लागलो.

आठ महिने हाच प्रकार चालू होता. ऑफिसमधल्यांनी जाऊ नको सांगितलं. खूपदा वाटलं की आजोबांना स्पष्ट सांगावं की परवडत नाही, परंतु स्वतःला आवरलं, कारण सामाजिक कामात डोनेशनचा एक रूपयासुद्धा अमूल्य असतो.

मोठी रक्कम देत नसले, तरी आजोबांचा संस्थेवरचा विश्वास बहुमोलाचा होता. म्हणूनच कितीही त्रास झाला तरी महिन्यातून एकदा होणारी भेट चुकवायची नाही हे मनाशी पक्कं केलं. चिडचिड कमी झाली. दर महिन्याला होणाऱ्या भेटीत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आजोबांशी छान स्नेह जुळला.

—*—

ऑक्टोबर महिना… धो धो पाऊस पडत होता. आजोबांचा चेकसाठी फोन आल्यावर घरी गेलो.

“माफ करा, माझ्यामुळे तुम्हांला एवढ्या पावसात यावं लागलं.”

“काही प्रॉब्लेम नाही.”

थोडंफार बोलणं झाल्यावर आजोबांनी चेक दिला. न पाहता बॅगेत ठेवून मागच्या देणगीची पावती दिली. पुन्हा पावसात गाडी दामटत ऑफिसला आलो. अकाऊंटला चेक देऊन लॅपटॉपवर काम करत बसलो. तितक्यात मित्र धावत आला… 

“मित्रा, अभिनंदन, पार्टी पाहिजे! ”

“कशाबद्दल? ”

“जसं की तुला माहीतच नाही! ”

आमचं बोलणं ऐकून बाकीचे टेबलाभोवती जमा झाले.

“काय आणि कशाबद्दल बोलतोयेस. काही कळत नाही. जरा नीट सांग. ”

“म्हणजे आजोबांनी दिलेला चेक बघितला नाहीस? ”

“त्यात काय बघायचंय. सगळं तर माहितेय. ”

“धन्य आहे तुझी… हे बघ! ”

चेक हातात घेतला आणि डोळेच विस्फारले… आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. चेकवर रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये!  

सगळ्यांनी मोठा जल्लोष केला. जो तो माझं अभिनंदन करत होता. मी फक्त चेककडे एकटक पाहत होतो. अनपेक्षितपणे भला मोठा आनंद मिळतो तेव्हा शब्द मुके होतात. माझीही अवस्था तशीच झालेली. खूप भावुक झालो. टचकन डोळ्यात पाणी आलं. ताबडतोब आजोबांना फोन केला पण उचलला नाही म्हणून डायरेक्ट घरी गेलो.

“अरे वा, तुम्ही परत…? ” नेहमीप्रमाणं प्रसन्न हसत आजोबांनी स्वागत केलं.

आधी वाकून नमस्कार केला.

“एवढं मोठी रक्कम…!! खूप, खूप खूपच धन्यवाद! ”

“उलट मीच तुमचे आभार मानतो आणि माफ करा. ”

“कशाबद्दल? ”

“तुम्हांला खूप छळलं. माझ्याविषयी आलेला राग कधी दाखवला नाहीत. इतरांपेक्षा वेगळे आहात. ”

“थॅंक्यू! ”

“मोठी देणगी द्यायचीच होती, पण कुणावरही पटकन भरवसा ठेवता येत नाही. खरं काम करणारे कोण अन् नुसता देखावा करणारे कोण, हे ओळखणं फार अवघड झालंय! आजकाल प्रत्यक्ष कामापेक्षा चकाचक प्रेझेंटेशन करून डोनेशन मिळवायचं हा नवीन ट्रेंड आलाय. ”

“शंभर टक्के बरोबरयं. यात प्रामाणिकपणे काम करणारे बाजूला पडतात. ”

“पण चांगलं काम कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करता येत नाही. गरजेच्या वेळी तळमळीनं काम करणारेच उपयोगाला येतात. ”

“मनातलं बोललात.”

“सामाजिक काम अजिबात सोप्पं नाहीये. गरीब, गरजूसाठी काम करताना स्वभावात लवचिकपणा आणि प्रचंड संयम असावा लागतो. तो तुमच्याकडे आहे. तो तपासण्यासाठी परीक्षा घेतली, त्यात पहिल्या नंबरनं पास झालात. म्हणून हे बक्षीस. शाबास! ”

आजोबांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. फक्त “थँक्यू, थॅंक्यु” म्हणत राहिलो.

निरोप घेताना पुन्हा एकदा आजोबांना नमस्कार केला.

“खूप खूप आशीर्वाद! असंच छान काम करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो…!! आणि हो, दर महिन्याला नेहमीचा चेक घ्यायला यायचं… ती प्रथा बंद करायची नाही.” अकरा रुपयाचा अजून एक चेक पुढे करत आजोबा मिश्किलपणे हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक साधं कौतुक…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? जीवनरंग ?

☆ “एक साधं कौतुक…तृप्ती देव

 – – एक जादुई शब्द…

“अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून, ” सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहॆ ते पण लावून ठेव.

“हो आई, लक्षात ठेवलंय. “

सुनबाईने सौम्य हसून उत्तर दिलं.

ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण, नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.

पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं.

नविन जवाबदाऱ्या. नविन घर सगळ व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळ नवन.

त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —

“मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं. “

ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलं.

तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,

“सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा. “

सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले.

“म्हणजे… खरंच? “

“हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती. “तूझ्या हाताला चव आहॆ. तुझी आई सुगरणच आहे ना?

ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.

पहिल्यांदा, एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं.

त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं.

“माझं काम कुणीच ओळखत नाही, ” ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.

त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांच्या पाठ थोडी वाकली होती, सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली.

“आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझा तर दमछाक होतो, पण तुमचं हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे. “

सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या.

“अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीये. “

“सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं. “

सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.

त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला.

“घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस. “

कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला. सुनबाईने एक दिवसशेजराच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,

“इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस! “

तो थोडा गोंधळला. पण हसला. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.

दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या.

मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं.

सासूबाईंनी भांडं हातात घेत म्हणाल्या,

“तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे ह्या रंगांत. “

ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं.

ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, “तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असं आहे! “

आणि एक संध्याकाळ…

सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते.

अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं…

सुनबाईच्या एका वाक्याने —

“बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल! “

त्यांनी खळखळून हसत पेन उचलला,

ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली.

हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…

जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं.

जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.

जिथं प्रत्येक वाक्यात “मी सांगितलं होतं” ऐवजी, “मस्त केलं! ” असं ऐकायला यायचं.

घरात एक नवीन वळण आलं होतं.

घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं.

एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा.

सासूबाई म्हणाल्या,

“सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगते का? “

“सांगा ना आई! “

“मी लग्न होऊन ह्या घरात आले, तेव्हा तुझी आजचे सासू म्हणजे माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचं नाही म्हटलं. “

“मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना? “

“नाही गं. तेव्हा असं वाटायचं – ‘आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको. ‘ पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता. “

सुनबाई शांत झाली.

सासूबाई पुढे म्हणाल्या,

“म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं. “

त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं:

“कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे…

ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे. “

काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या.

“ताई, माझी गोजिरी कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीये. ऐका ना. “

गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली,

“अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस. “

मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली.

सुनबाईने तिला जवळ घेतलं.

“अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच, छान वाटली. “

गोजिरीचे डोळे चमकले.

सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –

“बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय. “

त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –

“तू छान केलंस…”

“अगदी बरोबर वेळेवर आलास…”

“आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”

“तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”

कौतुकाचं ते वातावरण…

कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची.

कारण त्या घरात आता “कौतुक” ही नित्यनेमाची परंपरा झाली होती. “कौतुक – एक जादुई शब्द…”

कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही.

कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं.

एक साधं “वा! “, “छान केलं! “, “तुझ्यामुळे जमलं! ” असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं.

ते शब्द नसतात… ते आश्वासक साक्षी असतात —

म्हणून जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात. ते दोनच शब्द. जगणं बदलतं.

माणूस फुलतो.

कारण कौतुकाचा तो क्षण…

तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो — हलकासा, पण खोलवर उमटणारा क्षण असतो.

 

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सार्थक… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ?

☆ सार्थक… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(मुली म्हणून, मुलगा म्हणून कोणती कर्तव्ये केली बाकीच्यांनी?अर्थात आमची अपेक्षाच नाहीये रे. पण मग या जगात तू एकटा पडशील. नाही मांडलास संसार की नाही केलंस लग्न. कोण घेईल तुझी काळजी बाबा पुढे?काही नाही तर तू वाडा विकून टाक आणि बदली घे करून शहरात. तुझं तू ठरव. पण आता यात बदल होणार नाही. मी याच्या चार कॉपी काढून घेईन आणि आमच्या पश्चातच तू तुझ्या भावंडाना त्या दे. ”, नाना थकून बोलायचे थांबले. ) – इथून पुढे – – 

माई जवळ आल्या. ” हे बघ माधवा. नाना बरोबर बोलत आहेत. आम्ही खरोखरच उताराला लागलेली माणसे. काही भरवसा नाही आमचा. हे मृत्युपत्र माझ्याही संमतीनेच केलंय.

माधव हसला. ” माई, नुकतीच पासष्टी झाली तुझी. काही म्हातारी नाही झालात दोघे. मी तर म्हणतो आता तुम्ही छोट्या छोट्या यात्रेला जात जा. लहान, आठ दिवसाच्या. कधी कुठेच जायला नाही मिळालं तुम्हाला. माझा मित्र काढतो अशा छान ट्रिप्स. ”

माधवने हट्ट करून नाना माईना अष्टविनायक सारख्या छोट्या ट्रीपला पाठवलं. केवढा आनंद झाला त्या दोघांना. बाहेरचे जगच न पाहिलेल्या त्यांना फार अप्रूप वाटलं त्या ट्रिपचं.

भेटेल त्याला सांगत बसले माई नाना. काय सुंदर हो ती ट्रिप. काय व्यवस्था, जेवण चहा नाश्ता सगळं हातात.

आमच्या माधवामुळे घडलं हो अष्टविनायक दर्शन. ”

– – आता नाना माई अशा आठ दहा दिवसांच्या सहलीला जाऊ लागले. कधीकधी शेजारचे काका काकू पण त्यांच्या बरोबर जात. खूप आवडे त्यांना सगळ्याना हा बदल.

यावेळी आता केदारनाथची मोठी ट्रिप होती. शेजारच्या काका काकूंना काही अडचणीमुळे जमणार नव्हतं.

“ त्या केदारनाथच्या मनात मला बोलवायचं नाहीये. ” काकू हळहळून म्हणाल्या

अगदी आनंदात सगळे वीस यात्रेकरू निघाले. ग्रुप लीडर म्हणाला, ”काही काळजी करू नका. आम्ही आहोत. कळवत राहू सगळा वृतांत. ”

दुर्दैवाने केदारनाथजवळ भयंकर पाऊस पडला, कडे कोसळले आणि ही बस दरीत कोसळली. एकही माणूस वाचला नाही. हे वृत्त टीव्ही वर दाखवले. हीच बस जी नाना माईना घेऊन जात होती. नाना माईंचे मृतदेह सुद्धा दुर्दैवाने सापडले नाहीत. सगळेच्या सगळे बसमधले लोक वाहून गेले आणि दगावले.

माधवच्या शोकाला पारावार राहिला नाही. त्याने ताबडतोब बहिणींना बोलावलं. भावाला परदेशी फोन करून येण्यास सांगितलं. सुरेश आला नाही पण बहिणी मेव्हणे आले. सगळे संस्कार झाल्यावर चार दिवसांनी गेले आणि म्हणाले आता बारावा तेराव्यालाच येऊ. सुरेश पण येतोय ना? “

माधव काहीच बोलला नाही. तेराव्या दिवशी पुन्हा सगळे जमले. सर्व पार पडलं आणि सुरेश म्हणाला,

“ माधव हे बोलायची ही वेळ नाही पण मला इतक्या लांबून पुन्हा पुन्हा यायला जमणार नाही.

आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की हा वाडा विकून टाकायचा. आणि शेत सुद्धा. पैसे वाटून घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. तू दुसरीकडे फ्लॅट बघ आणि शिफ्ट हो. गिऱ्हाईक पण तयार आहे लगेचच व्यवहार करायला. ”

माधवने बहिणी आणि दोन्ही मेव्हण्याकडे बघितलं. बेरकीपणे ते बघत होते. हे सगळे आधी भेटले आहेत आणि सगळं ठरवूनच सुरेश बोलतोय हे माधवच्या लक्षात आलं.

तो म्हणाला, “ हरकत नाही. पण आपले जोशी वकील आत्ता येतीलच. बघूया ते काय म्हणतात. ”

“ ते कशाला हवेत?काय संबंध त्यांचा? “ सुरेश म्हणाला.

“ समजेल, ते आले की. ” माधव शांतपणे बोलला.

 जोशी वकील आले.

”बसा बसा. ”

“ झालं ते वाईट झालं. नाना माझे फार जवळचे मित्र हो. शहाणा माणूस बरं. ” बोलता बोलता त्यांनी चार कॉप्या प्रत्येकाच्या हातात ठेवल्या.

“ हे माई नानांचे मृत्युपत्र. तुम्ही हे माझ्यासमोर वाचा. हे अर्थात रजिस्टर केलंय त्यामुळे संशयाला जागाच नाही. सुरेश, तू मोठ्याने वाच. ” 

“काय?माई नानांनी मृत्युपत्र केलं होतं?आम्हाला कसं माहीत नाही?”

– – जोशी शांतपणे म्हणाले, ”तुम्हाला कळवायला तुम्ही इथे फिरकत तरी होतात का?किती वर्षात तू आला नाहीयेस भारतात?आणि काय ग कुमुद कुसुम, कितीवेळा आले माईंनाना तुमच्या घरी? कधी सांगणार ते तुम्हाला?” – जोशी शांतपणे म्हणाले. “ ते सोडा. आत्ता तर समजतंय ना?”

सुरेश मृत्युपत्र वाचत गेला. वाचता वाचता त्याचा चेहरा लालबुंद झाला. या माधवला सगळा वाडा आणि शेत पण? मला फक्त पन्नास हजार? वर लिहिलंय की डॉलर्समध्ये कमावणाऱ्या मुलाला याची काय गरज असणार?पण आईबापांची भेट असू दे… आणि निम्मे निम्मे दागिने कुमे तुला आणि कुस्मे तुला. वावा. काय ही वाटणी आहे. मी कोर्टात जाईन. ”

जोशी वकील हसले. ” जरूर जा कोर्टात. नानाला ही सगळी कल्पना होतीच म्हणून त्याने अगदी कायदेशीररीत्या हे कागदपत्र केले आहेत. जायचे तर जा कोर्टात. फक्त वेळ आणि पैसा वाया जाईल आणि हाती काहीही येणार नाही. आणि काय तुम्ही मुलं रे?आईवडिलांवर जराही प्रेम माया नसणारी मुलं काय उपयोगाची? मी बघत होतो ना.. एकट्या माधवने निरपेक्षपणे माई नानांना संभाळलं. त्यांच्यापासून दूर जावं लागेल म्हणून त्याने प्रमोशन्स नाकारली. भाग्यानेच मिळतो असा मुलगा… आणि काय ग मुलींनो, आज आईबाप गेल्यावर आलात हो?सगळं हक्काने घेतलेत की पुष्कळ. कुठे कमी पडले आईबाप ? केली की रीतसर बाळंतपणे सोने नाणे देऊन त्या त्या वेळी. आणि हा माधव कमी राबला नव्हता त्याही वेळी. पण समजून घ्यायचंच नाही ठरवल्यावर मी तरी काय बोलणार?.. हे बघा, माझं काम झालंय. माधव, तू निर्णय घे. हे सगळं तुला तुझ्या आईवडिलांनी प्रेमाने दिलंय. त्याचा विनियोग तू तुला हवा तसा कर. ”

– – जोशी वकील निघून गेले. न बोलता सगळी भावंडे उठून चालती झाली.

माधवला अतिशय वाईट वाटलं. आपले माई नाना किती हुशार होते आणि आपल्या मुलांना ते किती नीट ओळखून होते हे पुन्हा जाणवलं त्याला.

याही गोष्टीला चार वर्षे झाली. भावंडे पुन्हा फिरकली नाहीत. आता हे संबंध तुटल्यातच जमा होते.

माधवने वाडा शेती विकून टाकली. त्या भरभक्कम रकमेत त्याला पुण्यात सुंदर फ्लॅट विकत घेता आला त्याने आपली बदली पुण्यात करून घेतली.. शिवाय त्याने बँकेत बरीच रक्कम गुंतवली.

जोशी वकील त्याच्या सतत संपर्कात होते.

” जोशीकाका, येत जा पुण्याला. मला तुमच्याशिवाय कोणी नाही आता जवळचं. ”

.. काका हसले. ” थांब. येईलही कोणी जवळचं. तुला आपलं म्हणणारं. सरळच विचारतो. करतोस का लग्न?आहे एक छान तुला योग्य मुलगी… थांब हं.. निशा अगं ये आत.. ही निशा. माझी मानलेली मुलगी. तुझ्याइतकीच मला जवळची आणि प्रिय आहे. हिचेही आईवडील फार लवकर गेले. एकटी पोर आहे बरं जगात. आणि मोठी जिद्दीची आहे बरं. माझ्या मित्राचीच मुलगी आहे ही. पुण्यात नामवंत शाळेत शिक्षिका आहे. पण बघणारं कोणीच नसल्याने लग्न राहून गेलं पोरीचं. बघा.. भेटा एकमेकांना चार वेळा. हेही व्हायचं असलं तर होऊ दे माझ्या हातून. ”

माधव बघतच राहिला. निशा छान हसत होती त्याच्याकडे बघून.

“ हे बघ माधव.. आपण आता पन्नाशीला आलोय. मला तू आवडलास. तुला मी पसंत असले तर लग्न करायला माझी हरकत नाही. ”

.. ही छान स्मार्ट हसरी मुलगी माधवला एकदम आवडूनच गेली.

निशा म्हणाली, ” हवी तर माझी सगळी चौकशी तू माझ्या प्रिन्सिपल मॅडमकडे करू शकतोस. ”

माधव म्हणाला, “ जोशीकाकानी तुला आणलीय ना, मग बास. ते मला नानांच्या जागीच आहेत निशा.

हे माई नाना असताना व्हायचे योग नव्हते ग. किती आनंद झाला असता त्यांना. ” 

” हो. ते दोघे असतांना खूप पूर्वी मला जोशीकाकांनी तुझ्याबद्दल विचारलं होतं रे. पण मीच नाही म्हणाले. माझं पुण्यातलं घर आणि नोकरी सोडून मला तुमच्या गावाला यायचं नव्हतं. मग जोशीकाकांनी तुम्हाला पुढे विचारलं नाही. तेव्हा आपले योग नव्हते असं म्हणूया. आता होतोय उशीर म्हणा, पण तुझी हरकत नसेल तर आपण करूया लग्न. ” निशा म्हणाली

माधव आणि निशा खूप वेळा भेटले. आपलं एकमेकांशी नक्की पटेल, आपले विचार आवडीनिवडी खूप जुळतात हेही लक्षात आलं माधवच्या. तिच्या सहवासात वेळ कसा मजेत जातो आणि तिलाही आपण आवडतो हे लक्षात येऊन सुखावला माधव.

…. चार महिन्यांनी निशा आणि माधवने रजिस्टर लग्न केलं. जोशीकाका आणि निशाच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम साक्षीदार म्हणून उपस्थित होतेच.

“माधव, फार सुरेख कर्तृत्ववान बायको मिळालीय हो तुम्हाला. माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे निशा. तुमचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. ” डोळे पुसत मॅडम म्हणाल्या.

“ काका “ म्हणत गहिवरून माधवने जोशींकाकांना मिठीच मारली.

“ माझं सगळं भलं तुमच्याच हातून व्हावं असंच नियतीने ठरवलंय काका. आशीर्वाद द्या”. दोघे काकांच्या पायाशी वाकले.

“ लक्ष असू द्या काका. आणि हक्काने तुमच्या या मुलांकडे येत जा. ”

.. डोळे पुसून जोशींकाकांनी त्यांना जवळ घेतले आणि तोंडभर आशीर्वाद दिला… “ नांदा सौख्यभरे. ”

समाप्त

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares