मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित कथा – (१) मुलाचं प्रेम  / (२) माकडाचं स्पष्टीकरण – हिन्दी कथाकार : सुश्री मीरा जैन (३) सन्माननीय वेडा – हिन्दी कथाकार : संतोष सुपेकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१)  मुलाचं प्रेम 

आज हॉस्पिटलमध्ये दाखल केलेली एक आई बहुतेक शेवटचे श्वास मोजत होती. आईची ती तशी अवस्था पाहून तिच्या मुलाला – नवलला अतिशय वाईट वाटत होतं …. आणि हतबल झाल्यासारखंही. केविलवाणेपणाने तो त्याच्या व्हाट्सअप.. फेसबुकवर असणाऱ्या मित्रांना सारखा मेसेज पाठवत होता ….

“ मित्रांनो माझी आई खूप जास्त आजारी आहे. तिला लवकर बरं वाटावं म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची आणि प्रार्थनेची फार फार गरज आहे … “ 

बऱ्याच मित्रांनीही लगेचच आपलेपणाने शुभेच्छांचे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली…. आणि नवल अशा प्रत्येक मेसेजबद्दल धन्यवाद देण्यात गर्क झाला. पण व्हाट्सअप वरच्या एका मित्राने मात्र तो मेसेज वाचल्यावाचल्या आपल्या भावना मेसेजमधूनच व्यक्त करून न थांबता, तडक हॉस्पिटल गाठलं. प्रत्यक्षच जाऊन भेटलं तर नवलला जरा दिलासा मिळेल आणि त्याच्या आईसाठी नक्कीच काहीतरी करता येईल या भावनेने…

तो गेला, नवलजवळ बसला… नवललाही बरं वाटलं… आणि मग त्या मित्राने आईची प्रकृती सुधारण्याचा एक अचूक आणि खात्रीशीर उपाय नवलच्या कानात सांगितला…. पण तो उपाय ऐकून नवलच्या चेहेऱ्यावर पसरलेली चिंता कमी होण्याऐवजी दुपटीने गडद झाली.

त्या मित्राने नवलच्या कानात फक्त एवढंच तर सांगितलं होतं की … “ नवल तू लगेच आत आईजवळ जा, आणि तिच्या कानात फक्त एवढंच सांग की … ‘ आई … तू लवकरात लवकर बरी हो ना … तुझ्यावाचून घर अगदी सुनं सुनं वाटतंय गं! ‘ “ ….

तो मित्र दुसरा तिसरा कोणी नव्हता …. तर वृद्धाश्रमाचा मॅनेजर होता…

मूळ हिंदी कथा : बेटेकी ममता  

लेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(२)  माकडाचं स्पष्टीकरण…

दिवसभर दाणा पाणी शोधत इकडे तिकडे वणवण करत ती चिमणी फिरत राहिली होती. सगळं लक्ष मात्र घरट्यातल्या पिल्लांकडे होतं. संध्याकाळ झाली तशी ती घरट्याकडे परत फिरली. पण आज येतांना तिला नक्कीच काहीतरी वेगळंच जाणवत होतं. गावातली सगळी कुत्री आणि इतर सगळे प्राणीही अतिशय दु:खी दिसत होते …

‘कुठलाच आवाज नाही …. उगीच ओरडणं नाही … भांडणं नाहीत. असं तर कधीच होत नाही … मग आज का असे गप्प झालेले दिसताहेत सगळे.. आणि खूप दु:खी असल्यासारखे? नेमकं काय झालं असेल … आणि तेही एकदम या सगळ्यांच्या बाबतीत? ‘ … आता तिलाच फार अस्वस्थ वाटायला लागलं होतं. घरट्याजवळ येऊन ती झाडावर जराशी विसावली, इतक्यात शेजारच्या फांदीवर तशाच चिंताग्रस्त चेहेऱ्याने बसलेलं चिंटू माकड तिला दिसलं. ती पटकन उडून त्याच्याजवळ जाऊन बसली आणि मनातला प्रश्न त्याला विचारला… 

त्यावर चिंटू म्हणाला.. “ काय सांगू चिऊताई तुला.. अगं आज या गावात कसलं तरी आन्दोलन चाललं होतं. त्यात सात लोकांचा मृत्यू झाला आहे. ” 

“अरे बाप रे.. फार वाईट झालं हे… पण त्यामुळे माणसं दु:खी दिसण्याऐवजी हे प्राणीच जास्त दु:खी झालेले दिसताहेत की. असं का?“

… चिमणीच्या या प्रश्नावर चिंटू माकडाने अगदी सविस्तर उत्तर दिलं…

“आता काय सांगू तुला? काय झालंय की त्या दंगलीत मेलेली माणसं वेगवेगळ्या जातींची आहेत.. एका जातीतली तीन माणसं दगावली आहेत, आणि इतर जातींची प्रत्येकी दोन माणसं दगावली आहेत… का ते माहिती नाही, पण प्रत्येक जातीतली माणसं फक्त आपापल्या जातीतल्या माणसांसाठी दु:खी झाली आहेत … शोक व्यक्त करताहेत. … पण ही सगळी कुत्री आणि इतर प्राणी आहेत ना.. त्यांना त्या सातही माणसांच्या मरणाचं मनापासून दु:ख होतंय… कारण काय माहितीये? .. कारण त्यांना त्या सातही जणांमध्ये ‘ फक्त मनुष्य ‘ दिसतो आहे ना … म्हणून ….

मूळ हिंदी कथा : बंदरका विश्लेषण 

कथालेखिका : सुश्री मीरा जैन, उज्जैन.

—– 

(३) सन्माननीय वेडा – – – 

‘‘काय हो काका… हल्ली सकाळीच असं बागेत आल्यावरच काय होतं तुम्हाला? इथे मॉर्निंग वॉक करत असलेल्या माणसांकडे असे रोजच त्यांचे फोन मागत असता.. ते का? तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने असं वागणं योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? ”… 

.. बागेत अशोकरावांबरोबर चालत असलेल्या अनिलने त्यांना विचारलं… ‘‘आणि मला तर हेच समजत

नाहीये की इथे येतांना तुम्ही स्वत:चा फोन का घेऊन येत नाही? दुसऱ्या कुणाकडे तरी त्याचा फोन

का मागायचा? तुमच्या अशा वागण्यामुळे लोक तुम्हाला वेडा म्हणायला लागलेत, माहितीये का तुम्हाला? ”

‘‘अरे बापरे… असं झालंय का? ” अशोकराव खदखदून हसले. ‘‘म्हणजे मी असं का करतो हे तुमच्याही लक्षात आलं नाहीये का? अहो इथे फिरायला आलेल्या सगळ्या लोकांकडे मी त्यांचा फोन मागतो…खरंय.. पण कशासाठी मागत असेन? मला एखादा फोन करायचा असतो म्हणून? इथे येतांना मी माझा फोन बरोबर आणत नसेन असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाहीये… माझा फोन नेहेमी माझ्याबरोबरच असतो. हा बघा.. पण मी असा विचित्र वागतो त्याचा परिणाम लक्षात आला नाही का तुमच्या? मला घाबरून म्हणा… किंवा माझ्यावर चिडून म्हणा… पण रोज सकाळी इथे फिरायला येणारे लोक हल्ली एकतर इथे त्यांचा फोन घेऊन येतच नाहीत, नाहीतर माझ्या भीतीने फिरतांना आपला फोन खिशातच ठेवायला लागले आहेत… आणि मला हेच तर हवं होतं! ”

‘‘पण असं का व्हायला हवंय् तुम्हाला? ”

‘‘ कारण ऐकायचे आहे? मग ऐका… त्याचं कारण इतकंच की सकाळी सकाळी इथे व्यायाम करायला, किंवा तब्बेत सुधारण्यासाठी म्हणून येणाऱ्या लोकांनी फक्त त्यांच्या आरोग्यावर, शरीर स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करावं… मोबाईलवर नाही असं मला वाटतं. मोबाईलसाठी तर उरलेला सगळा दिवस आणि पूर्ण रात्र असते ना त्यांच्यासाठी! अहो इथे आल्यावर मला नेहेमी असंच चित्र दिसायचं की लोक चालता चालताही त्या फोनलाच चिकटलेले असायचे… फोनवर सतत कुणाशी तरी बोलत असायचे… अगदी व्हिडिओ-कॉलही करत असायचे… आणि त्या नादात चालत असतांना चक्क पडायचेही कितीदा तरी… नाहीतर कुणाला तरी धडकायचे… पाय एकीकडे आणि नजर एकीकडे असंच असायचं ना! ..

… पण आता बघा… सगळे कसे शिस्तीत फक्त आपल्या चालण्याकडे.. पर्यायाने स्वतःच्या शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देत असतात… आणि त्यांच्या स्वत:च्या नकळत या वेड्याचा हेतू पूर्ण करतात. ”… इतकं बोलून अशोकराव पुन्हा तसेच खदखदून हसले… 

… आणि अनिल विशेष आदराने त्यांच्याकडे पहात राहिला…

मूळ हिन्दी कथा: सम्माननीय पागल 

कथाकार : श्री. संतोष सुपेकर, उज्जैन 

मराठी अनुवाद : मंजुषा सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ भूतबंगला… ☆ श्री प्रदीप केळूसकर

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सुन म्हणून आमच्या गावात आली. खरं तर विनायक निलाशी लग्न करणार असा सर्वांचा अंदाज होता कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसें आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नंदाशी लग्न करेल पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले.. पण नंदाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरी बरोबर.

माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली…

‘काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्या बरोबर पाट धरता?

‘आसता बाये एखाद्याचा नशीब.. तेंका होयो तितके बायलो गावातत..

मग मला कळले विनायक च्या आई बाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेंव्हा म्हणाले..

‘नीला म्हणजे चालू पोर ता.. कोणाचेय गाडीवर बसुन जाईत.. मी विन्याक सांगलंय.. त्या पोराक माझ्या घरात हाडू नको..

मी गप्प झालो. शेवटी विनायक चे मंदाशी लग्न झाले.

मंदा दिसायला यथातथाच होती पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली आणि परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आई बाबा खूष होते शिवाय हे सर्व ती खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी निलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्ठामस्करी करणे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली..

‘तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्लात हल्ली?

‘जातंय मधी मधी..

‘त्या नीलाचो मुक्काम अजून आसता म्हणे दुकानात?

‘मी पण बघितलंय.. पण आपण काय शकतो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात?

‘पण आता घरात बाईल आसा मा? पूर्वीचे दिवस वेगळे.. आता सांभाळून वागा..

मी गप्प राहिलो.

गणपतीच्या दिवसात परबाकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्याघरी मदतीला गेलेली. रात्री घरी आल्यावर मला म्हणाली..

‘मंदा गप्पगप्प होती.. त्यान्च्याकडे काम करणारी काशी म्हणत होती..

‘मंदाक अंदाज इलोवा.. कोणीतरी चिठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड आसा, अशी बातमी दिलिया.. त्या दिवसापासून मंदा गप्पगप्प आसा. मंदान आपल्या आईवडिलांका बोलावून आणल्यानं.. तेनी जावयाक जाब विचारलो.. पण विन्यात काय बदल नाय. विन्याच्या आईबाबांनीपण विन्याची खरडपट्टी काढली, पण..

शेवटी मी विन्याचा मित्र म्हणून त्याश्याशी बोलायला गेलो.

‘विन्या.. पूर्वीचे दिवस वेगळे पण आता घरात मंदा आसा.. तेच्याशी लग्न करून तेका घरात आणलंस.. आता त्या निलाचो नाद सोड, त्या नीला पायी तुजो दुकानात लक्ष नाय आणि संसारात पण नाय. लहान गावात असले गोष्टी प्रत्येकाक कळतत आणि तसेच ते तूझ्या बायकोक पण कळले बहुतेक..

‘पण मी बाबांका सांगाललंय, माका मंदाशी लग्न करुचा नाय, तरीपण माझ्या गळ्यात घातल्यानी..

‘पण त्यात त्या मंदाचो काय दोष? तेच्या गळ्यात माळ घातलास मा? असो दोन दगडावर पाय ठेवून मोठया संकटाक आमंत्रण देतंस, या लक्षात ठेव.

दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली, तिचे आईवडील तिला शोधत होते, त्यानी त्त्यांचे सर्व नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली.. पण तिचा पत्ता लागला नाही.. मग लोकात कुजबुज सुरु झाली.. विन्यान नीलाक म्हापश्यात ठेवल्यानं आणि शनिवारी रविवारी आपण तिकडे जाता. आता विन्याचे दुकानात पण लक्ष नव्हते, त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळतं नव्हत्या.. दुकानातील कपाटे खाली दिसू लागली.

पंधरा दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली.

‘मंदा दिवाळीक माहेरी गेला ता परत येऊकच नाय..

मला वाईट वाटतं होते, एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते.

विन्याचे आईबाबा साधी माणसे होती. त्याना विन्याचे वागणे आवडत नव्हते पण.. विन्यापुढे त्त्यांचे पण काही चालत नव्हते, त्यात विन्याचे दुकानावरील दुर्लक्ष त्याना त्रास देत होते.

दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले.

घरी आल्यापासून मंदा गप्पगप्पच होती. विन्याला मंदा घरात असली काय नसली काय फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळतं होते.

मग मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती, त्या निलाचा नाद सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत होती. पण विन्या कुणाला भीक घालत नव्हता. शनिवार रविवार निलाकडे पळत होता.

आणि एके दिवशी.. मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कुटरला किक मारत होतो.. एव्हड्यात परबांच्या घराकडून ओरड ऐकू आली.. मोठमोठ्याने रडणे ऐकू आले.. माझी बायको पटकन घरातून बाहेर आली आणि मी स्कुटर परबांच्या घराकडे जोरात घेतली. मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो.. विन्याची आई मोठमोठ्याने ओरडत होती.. बाबा थरथरत उभे होते.. मंदाने बिष घेतलेले दिसत होते.. तोंडाला फेस आला होता.. माझी बायको पटकन पुढे झाली.. मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले, रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.

हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधी मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली.. मग शवव्हिचेदन.. पोलीस कम्प्लेंट.. विन्याला अटक.. केस सुरु झाली.

मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आली. मंदाच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरख्याली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले असा जबाब दिला. विन्या चार महिने जेलमध्ये राहिला आणि मग जमिनावर सुटला. त्याच्या दुकानाचे बारा वाजलेच होते.

विन्याचे आईबाबा या घरात राहायला घाबरू लागले. तरुण सुनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे असा त्यांचा समज झाला होता. विन्या आता नीलाकडे रहात होता. विन्याच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली, त्यात तिची सुन रडताना दिसू लागली. विन्याच्या बाबांना कुणीतरी रडताना ऐकू येऊ लागले.. त्या दोघांची झोप उडाली.

शेवटी दोघांनी ते घर सोडले आणि ते त्यान्च्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले.

मग जिकडेतिकडे बातमी पसरली.. कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाकुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली.. त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले.

गेले कित्येक वर्षे हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विन्याचे वडील वारले.. मग दोन वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला रहात असलेली नंदा मग गावात आली, त्या बंगल्यात विन्यासह राहू लागली.. तिची मुलगी पाच वर्षांची होती.

नीला या बंगल्यात राहू लागली खरी पण तिची मुलगी सतत आजारी पडू लागली. तिचे शाळेत लक्ष लागेना.. निलाला पण वाटू लागले… मंदाचा आत्मा या घरात वावरतो आहे, तो कुणाला सुख देणारं नाही.. तिने विन्याला सांगून जागा बदलली.

आता लोकांची खात्रीच झाली.

या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही.. त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले.. भुताचा बंगला..

भुताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवरील पाण्याला शेवल चिकटला. कुणी सुद्धा कुणी त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बस स्टॉप होता.. त्याचे पण नाव पडले.. ‘भुताच्या बंगला स्टॉप.

जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता, नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात. विनायकला पैशाची निकट होती.. म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोण जागा विकत घेईना. तो मला सांगायला लागला.. ‘या बंगल्यासाठी गिऱ्हाईक बघ. मी त्याला म्हंटले.. ‘ही जागा भुताची म्हणून प्रसिद्ध झालिया.. आपल्या भागातलो कोण विकत घेऊचो नाय.. कोणी बाहेरचो आपटलो तर बघूया. पुढील दहा वर्षे तो बंगला तसाच होता.. हळूहळू जीर्ण होत चाललेला.

बाबुभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानें होती. त्यांचे या भागावर लक्ष होते. त्यान्च्या मेहुण्यासाठी किरण पटेल याच्यासाठी जागा हवी होती.. जमिनीच्या एका एजेंटने त्यांना ही जागा दाखवली. बाबुभाईना जागा आवडली. पण अनेकांनी त्याना हा “भूतबंगला.. असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भुते येतात असे पण सांगितले. बाबुभाई हसले.. त्यान्च्या लक्षात आले, ही जागा कोण घेणार नाही, मालकाकडे पाडून मागायला हवे.

बाबुभाई विनायकला भेटले. विनायक खूष झाला कारण पहिल्यांदाच कुणी गिऱ्हाईक आले होते. विनायकने किंमत सांगितली त्याच्या निम्याने बाबुभाईनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खूष कारण त्या जागेचे थोडे तरी पैसे मिळाले.

बाबुभाईनी जेसीपी मागविले आणि संपूर्ण बंगला पाडला आणि दणकत बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडावून आणि वरती राहायला मोठा फ्लॅट.

बाबुभाईचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरु केले. भरपूर माल ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वाशी गोड बोलून धंदा बसवीला.

दुकानावरती घरी बायको, मुले राहायला आली. नातेवाईक येतजात राहिले. गाड्या आल्या, ट्रक्स आले.. पातेलांच्या धंद्याला बरकत आली.

पण गावातील जुने लोक अजून ‘पटेलाना मंदाचे भूत दिसते का? याचीच चौकशी करत राहिले.

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन? ) 

इथून पुढे – – 

पती-पत्नीमधील परस्पर समजूतदारपणा, प्रत्येक क्षण एकत्र घालवण्याची त्यांची तळमळ आणि त्यांच्या प्रेमभरल्या संवादाचे रूपांतर कंटाळवाणेपणा, ताणतणाव आणि विवशतेत झाल्यावर एकत्र राहणे देखील एक कठोर शिक्षाच होती. लहानसहान मतभेद स्वाभिमानाशी भिडल्यावर मोठे स्फोट घडवून आणतील हे नक्की होते. आम्हा दोघांमध्ये खूप कांही अस्ताव्यस्त पसरले होते. ते प्रेमाचे शेकडो क्षण आमच्या नात्यातील उसवलेले धागे विणण्यास कधीच आले नाहीत. ते जरी आमच्यात तडजोड करायला पुढे सरसावले असते तरी त्यांचे कांहीच चालले नसते, कारण आमच्यातील दरी आणखी रुंद करणाऱ्या कटू क्षणांनी तिथे आपले साम्राज्य व्यापून टाकलेले होते.

ठीक आहे, माझ्या पत्नीशी माझे वैचारिक मतभेद होते, पण मी तिला कधीही क्रूरपणे वागवले नाही. या संबंधविच्छेदामुळे तिला झालेल्या आघातापेक्षा माझ्यावर कोसळलेला आघात कैकपटीने अधिक होता. तिच्याजवळ निदान बिट्टू तरी आहे, मी मात्र पूर्णपणे एकटा पडलोय. माझ्याच मुलाला मला सोडून जावे लागले. आजवर घटस्फोट हा शब्द मला इतका कडवट आणि विखारी कधीच वाटला नव्हता, जितका तो मला आज डागण्या देत होता. या चार अक्षरी वरवर साध्या भासणाऱ्या शब्दाने माझे स्वतःचे अस्तित्वच माझ्यापासून हिरावून घेतले होते. आज मी माझ्यापासूनच विलग झालो होतो. आपल्या मुलापासून वेगळे होणे आणि वर्षानुवर्षे खपून एक एक काडी जोडून बांधलेल्या माझ्या उबदार घरट्यातून बाहेर पडणे या गोष्टी अशा होत्या, जणू कांही माझ्या आत्म्याला माझ्या देहातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मला सांगण्यात आले होते की जा आणि जशी इच्छा असेल तसे मनस्वीरित्या जग!

त्या सुखद काळी आम्ही एकमेकांना आनंदात ठेवण्यासाठी यादी बनवायचो. आता मात्र त्याच यादीत आरोपांची सरबत्ती केल्या जाऊ लागली होती. तिच्याकडूनही आणि माझ्याकडून देखील. जेव्हां दोन भांडी पोळपाट लाटण्यासारखी प्रेमाने एकत्र नांदत होती, तेव्हां लाटण्याचा वापर आयुधासारखा नव्हे तर पोळ्या लाटण्यासाठी व्हायचा. तेव्हां आम्ही घर परिवाराचे एकत्रिपणे पालनपोषण करीत होतो. मात्र हीच भांडी जेव्हां एकमेकांना भिडून आदळआपट करायला लागली तेव्हां त्या वारंवार आघाताच्या आणि प्रतिघाताच्या माऱ्याने पिचून पिचून त्यांच्या ठिकऱ्या उडाल्या. भांड्यांसारखे घराचे देखील तुकडे होऊन ते दिशाहीन दिसू लागले. वर्षानुवर्षे ज्या प्रेम आणि विश्वासाच्या पायावर आमचे घर ठामपणे उभे होते, त्याचा पायाच आता डळमळीत झाला होता. याची शिक्षा आम्हाला भोगावी लागतेय. मला, तिला आणि माझ्या लहानग्या बिट्टूला देखील!

तिच्याजवळ बिट्टू होता, तिच्या मुखावर हास्य फुलण्याचे हे एक कारण निश्चितच होते. तो तिला नक्कीच प्रसन्न ठेवणार. तो तिला एकटेपणाची जाणीव देखील होऊ देणार नाही. बिट्टू माझी किती आठवण करेल हे मला जाणवत होते. समुद्रकिनारी अवचितपणे माझ्या जवळ आलेले हे मूल कदाचित त्याच्या बाबांना शोधत आले असावे. कदाचित असे नसेलही, पण तरीही माझ्याकडे येण्याचे काही कारण असेल तर, हेच एकमेव कारण असणार याची मला खात्री होती.

हे दुःस्वप्नाहून अति भयानक वास्तव होते. प्रलयंकारी! क्रूर कालगतीने बिट्टूला माझ्यापासून हिसकावून नेले. असा कठोर दंड किती वेदनादायक असतो. या असहनीय पीडेने एका चालत्या बोलत्या जीवनाला पूर्णविराम देत संपवूनच टाकले. माझ्यासाठी तर आता संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत होते. जणू काही माझ्या शरीरातील प्रत्येक भाग अखिल धरणीसह बधिर झाला होता आणि त्यांनी कामाशी असहकार पुकारला होता. त्या माझ्या परमप्रिय घरातून माझे शरीर निघून गेले, पण मी खरोखरच त्यातून बाहेर येऊ शकलो कां? आपल्याच घरापासून स्वतःला असे विलग करणे किती कष्टप्रद असते, जणू काही तिथे तुमचे स्वतःचे काहीही नव्हते!

तसे तर मी समुद्रकिनारा न्याहाळत होतो, पण होरपळून टाकणाऱ्या जळजळीत उन्हामुळे आणि माझ्या अंतरंगाला चटके देणाऱ्या आतील अग्नीच्या मिश्रित झळीमुळे माझे डोके जड होत होते. मी बाहेरच्या कडक उन्हापासून वाचण्याचा फक्त प्रयत्नच करीत राहिलो, कारण तिथे सावली देणारी हिरवी झाडे किंवा कोणत्याही प्रकारचे छप्पर दृष्टीस पडत नव्हते. माझ्या अंतर्यामी देखील प्रेमाच्या सावलीचा संपूर्ण अभाव होता. तप्त उन्हाचे चटके लाल अंगारांसारखे जळत आणि जाळत होते. मी असहाय्य आणि लाचारासारखा हे सर्व सहन करीत होतो. वर भाजणारे मोकळे अस्मान आणि खाली उन्हाचा तडाखा अंगावर झेलणारी उघडी बोडकी धरणी.

संध्याकाळ दाटून येण्यापूर्वी धूर देखील गर्द गडद होणार. या वेळी तरी तीव्र सूर्यप्रकाशाने उष्णता कायम ठेवत आपले वर्चस्व राखले होते. मी सूर्यस्नान करण्यासाठी नव्हे तर सागराच्या शीतल लहरींमध्ये सचैल भिजण्यासाठी आलो होतो. माझ्या आत पेटलेल्या वणव्याला शांत करण्यासाठी मी तळमळत होतो. मी लाखोंनी पैसे गमावले होते, मात्र मला त्याची पर्वा नव्हती. पण माझा लाडका बिट्टू? मी त्याला कसं विसरू? एखाद्याच्या आत्म्याला शरीरापासून तोडून वेगळे करणे इतके सोपे कां आहे? मानसिक यातना देण्याचे हे सर्वात तीक्ष्ण शस्त्र आहे.

मला तर आनंद व्हायला हवा होता कारण रोजच्या कटकटीतून मी एकदाचा मुक्त झालो होतो. पण नाही, पराभूत झालेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी पराभवाचाच अनुभव येतो. तिथे निदान बिट्टूसोबत तरी राहिलो असतो. त्याच्या एका गोड हास्याने मला सर्व कांही परत दिले असते. म्हणून तर त्याच्यापासून दूर राहून फक्त फक्त एक दिवस सुद्धा लोटला नव्हता आणि मी त्याच्या स्पर्शाकरिता इतका व्याकुळ झालो होतो.

पिता होणे इतके कष्टदायक का आहे? नऊ महिने कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात आपले मूल वाढतांना पाहतांना आणि अनुभवतांना माझी खूप तडफड व्हायची. मी माझे कान लिलीच्या पोटावर टेकवून बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचो. दररोज, माझी नजर त्या न जन्मलेल्या बाळामध्ये माझे स्वतःचे प्रतिबिंब शोधत होती. कसं होईल? सगळं ठीक असेल ना आत? आणि आता या घटकेला घटस्फोटानंतर, माझा अंश असलेल्या त्याच बाळाला त्याच्या आईकडे सोडून आलोय मी. जणू काही आता माझा त्याच्यावर कुठलाच अधिकार नाही. काय ही जबर शिक्षा! मीच कां म्हणून भोगायची? कारण मीच पिता आहे ना. त्याला न भेटल्याचे विदीर्ण करणारे क्लेश आणि त्या जखमेवर मीठ चोळणारा कायद्याचा आसूड. त्याच्या तिळातिळाने वाढणाऱ्या अंगप्रत्यंगाचा साक्षीदार असलेला मी एकाएकी त्याच्या आयुष्यातून वजा झालो.

माझा ताणतणाव कमी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येणे मला आता निरर्थक भासू लागले. शरीर कुठेही असले तरी, मन तर ज्या स्थानाशी जोडल्या गेलंय, तिथेच राहण्यासाठी तळमळत असते ना! माझे डोळे गडद अंधाराशिवाय कांहीच बघू शकत नव्हते. इतका मिट्ट काळोख असल्यावरही प्रभातीचा प्रकाश येऊ शकेल कां? कितीही अंधार असला तरी उगवतीच्या उजेडाला तो थोडाच रोखू शकतो? पण दुर्दैवाने प्रत्येक उगवतीला प्रकाशाची सोबत नसते. काही प्रभात बेला इतक्या काळ्याभोर असतात की येणाऱ्या कित्येक तेजोमय दिवसांना देखील त्या आपल्या कृष्णरंगाने झाकोळून टाकतात.

मला आता कळते आहे, मला प्रत्येक येणाऱ्या दिवशी या सर्व भावनिक कल्लोळाचा सामना करावा लागणार आहे. वाटले होते की मनमोहक निसर्गाने वेढलेल्या या स्थानी मला थोडेफार समाधान मिळेल आणि खरं सांगायचे तर ते मिळाले सुद्धा! माझ्या माथ्यावर एक सुखद समाधान रेंगाळले. कपाळावर जाणवला त्याच मऊसूत तळहाताचा मखमली स्पर्श. मी डोळे उघडले तर ते गोड गोजिरे बालक माझ्याकडे बघत खोडकरपणे हसत होते. त्याने लगेच पळून जाऊ नये आणि मला त्याचा सुगंधी स्पर्श दीर्घकाळ जाणवत राहावा म्हणून मी लगेच डोळे मिटले. यावेळी मी ठरवले की हे मधुर स्वप्न खंडित होऊ नये म्हणून मी डोळेच उघडणार नाही. बस, त्याच्या या बाललीला अनुभवीत राहीन. कदाचित या खेळातून त्याला माझ्यात त्याच्या पित्याचे अस्तित्व जाणवत असेल आणि मला त्याच्यात माझ्या मुलाचे! या क्षणी आम्हाला दोघांनाही एकमेकांची नितांत गरज होती. आम्ही आपसात बोलत नव्हतो, पण एकमेकांच्या स्पर्शातील मूक संवाद सर्व कांही सांगत होता. जणू आमच्या जिभेवर गूळ होता. त्याची गोड चव जिभेला माहित होती, पण त्याचे वर्णन करायला ती असमर्थ होती. आमच्या नजरानजरेतून ती मिठास मानसिक समाधान देऊन जात होती. त्याची आणि माझी इच्छा या दोन्हींचा जणू समाहित मधुरस!

मी डोळे उघडलेले नाहीत असे बघितल्यावर त्याचा मधुर किलबिलाट सुरु झाला. दुरून त्याच्या आईची साद ऐकू आल्यावर देखील तो जागचा हलला नाही. त्याच्या आईने जवळ आल्यावर त्याला हाक मारल्याने मी लगेच डोळे उघडून त्याच्याकडे डोळे भरून पाहिले आणि तोही निघून गेला. जातांना त्याच्या चेहेऱ्यावर खोडकर हास्य विलसत होते. मी देखील ‘बुडत्याला काठीचा आधार’ या न्यायाने त्या हलक्याश्या स्मिताचे बोट धरून पैलतीर गाठून स्वतःचा जीव वाचवला होता. एक क्षितीजाच्या रेखेसारखी अस्पष्ट आशा. धुराचे लोट पुन्हा दाटत होते, जणू आम्हाला घरी परतण्यासाठी ताकीद देत होते. जंगलालाही सारखे सारखे जळत राहिल्याने जणू ग्लानी आली होती. या जाळपोळीच्या भीषण कलहातून त्याला जणू स्वतःला वाचवायचे होते. मला आणि त्या मुलाला देखील हेच हवे होते. आमच्या सर्वांच्या आतले जंगल अग्नीचा घास घ्यायला तयारच होते. आगीला कवेत घेत ते बुभुक्षित वन धुराची वलये फेकीत जणू सिगारेटचा आस्वाद घेत होते.

माझ्यापासून दूर जाताना त्या मुलाने जोरात किलबिल केली. मी त्या संकेताला ओळखत त्याला प्रेमभरल्या नजरेने पाहिले. आमच्या दोघांतील मूक भाव एकमेकांना म्हणत होते, “पुन्हा भेटू या! ” मी जाणत होतो की हे निव्वळ मृगजळ होते. मात्र माझ्या माथ्यावर त्या गोजिरवाण्या स्पर्शाची अनुभूती अजूनही रेंगाळत होती.

त्या आश्वस्त करणाऱ्या शांत शीतल नजरेने ऋतुमानाला देखील पाझर फुटला होता. काळे सावळे कृष्णमेघ अंबरात दाटीवाटीने गर्दी करीत होते.

हे वरूण राजा! त्या निष्पाप बालकासाठी तरी कृपा करून जलवर्षाव कर, जेणेकरून प्रत्येक रानावनात धुमसत असलेला कोपिष्ट अग्नीदेव शांत होईल!

समाप्त –  

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग २ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!) इथून पुढे – – 

तेजस्वी सूर्याच्या दाहकतेमुळे आगीचे धूम्रवलय जरा आक्रसलेले वाटत होते. सायंकालीन प्रहराचे रंग गडद होता होता धुराने आकाशाला पुन्हा एकवार कवेत घेतले. रेतीवर पहुडलेल्या उन्हात लोक मनसोक्त लोळत होते. कित्येक महिन्यांच्या निष्ठुर हवामानाला वैतागलेले ते सर्वजण आता सूर्यस्नानाचा मनमुराद उपभोग घेत होते. समुद्र आणि त्याच्याच किनारी तप्त रेती! जळी आणि स्थळी पृथ्वीचीच दोन्ही रूपे दृष्टीस पडत होती.

सागरतीरावर सूर्यस्नान करणारे हे लोक त्याच्या अपार आनंदाचा अनुभव घेण्यात खरंच इतके दंग झाले होते कां की वाळूवर चालताना त्यांचे पाय देखील पोळत नव्हते?  निरभ्र आकाशातून सूर्यदेवाने सर्वदूर फेकलेल्या रवीकिरणांच्या जळजळीत जाळीत अडकून त्यांच्या चेहेऱ्याची गोरीपान त्वचा लालबुंद झाली होती. त्यांच्या पाठी आणि कडा देखील तितक्याच लालेलाल झाल्या होत्या. समुद्रचौपाटीवरील वाळूने व्यापलेली जमीन खडबडीत होती आणि त्यामुळे त्यांच्या अनवाणी पायांना चांगलीच टोचत होती. मात्र त्याची तमा न बाळगता वाळूच्या कणांना आपल्या पायांना मुक्तपणे चिकटण्याची मुभा देण्यासाठी प्रत्येकजण पादत्राणे काढून टाकीत मस्तीत पळत होता.

काही तरुणांनी दोन लाकडांच्या मदतीने नेट लावले होते. तिथे लहान व मोठे सर्वजण एकत्र बॅडमिंटन खेळत होते. दुसरीकडे बास्केटबॉलचा खेळ जोरात सुरू होता. जवळच कुठे तरी काही मुले डिस्क फेकत होती. दोन- चार पाळीव कुत्रे त्यांच्या मालकांसह पाण्यात आणि वाळूमध्ये धमाल मस्ती करीत होते. इतक्या गर्मीत सगळ्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. माणसे एकमेकांच्या जवळ आली की त्या घामाचा तीव्र वास एखाद्या पक्ष्यासारखा एका शरीरापासून दुसऱ्या शरीरापर्यंत मुक्त संचार करीत होता. या दर्पाद्वारे एका नाकापासून दुसऱ्या नाकापर्यंतचे अंतर आरामात मोजल्या जात होते.

जेव्हा एखादी व्यक्ती एकाकी पडते तेव्हाच तिचे इतरांकडे लक्ष जाते. तिथल्या प्रचंड गर्दीत देखील मी एकटा होतो. संपूर्णतः एकटा. माझ्यासमोर जलाने तुडुंब भरलेला सागर होता तर माझ्या डोळ्यांतही अश्रूंचा महासागर उसळला होता, राहून राहून त्याला भरती येत होती. मला ओलेत्या डोळ्यांचा पूर्ण तिरस्कार आहे. त्यांच्यासारखा अत्याचारी कोणी नसेल! ते सकळ शरीराचा भार आपल्या नाजूक खांद्यांवर उचलत फिरत असतात. जेव्हां शरीराचे अंगप्रत्यंग जळत असते तेव्हां हेच डोळे ओले होतात. जसजसे डोळे अश्रूंचे सिंचन करतात तसतसे त्या व्यक्तीचे शरीर शीतल होत जाते. किमान समुद्रासमोर तरी माझ्या डोळ्यांत पाणी येऊ नये असे मला वाटत होते, पण नाही, वेगाने बरसणाऱ्या अश्रूंच्या धारा माझी पीडा थेंबाथेंबाने कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या.

माझ्यासमोरचा समुद्र जणू काही मला समजावत होता, “अरे! डोळ्यात अश्रूंचे दोन थेंब आले की तू दुःखी होतोस. माझ्याकडे बघ, मी तर नेहमीच अंतर्बाह्य पाण्याने काठोकाठ भरलेला असतो. “

निसर्गाशी संवाद साधणे हा देखील माझा एकाकीपणा थोड्या प्रमाणात कमी करण्याचा जणू प्रयत्न होता. मात्र या रम्य निसर्गाच्या सानिध्यातही जन्मजात मानवी स्वभाव निसर्गावर आपले वर्चस्व स्थापित करण्यात गुंग होता. झाले असे की, कोणीतरी कोणा एका स्त्रीचे पाकीट चोरले होते. त्या पाकिटात त्या बिचाऱ्या महिलेचे सर्व क्रेडिट कार्ड आणि रोख रक्कम होती. ती निराश होऊन आपले पाकीट मिळते का हे वाळूत चाचपडून शोधत होती. क्रेडिट कार्ड रद्द होतीलही, पण हरवलेल्या नगदी पैशाचे काय?  ती तर मौजमजा लुटायला सहलीला आली होती, मात्र आता तिचे पाकीट लुटल्या गेले होती. आता जातांना ती रिकाम्या हाताने पण चिंताग्रत मस्तक सोबत घेऊन जाणार होती.

दुसऱ्या बाजूला, एक लहान मूल सतत रडत होते. त्याच्यासाठी, घर आणि घराबाहेर या दोहोंमध्ये कांहीच फरक नव्हता. त्याच्या घराची शीतल छाया किंवा बाहेरील तापलेले ऊन या दोहोंशी त्याला कुठलेच सोयरसुतक नव्हते. इतकंच नव्हे तर त्याला लगटून वाहणारा प्रबळ प्रवाह त्याच्या असहमती दर्शवणाऱ्या रडण्यात आपला सूर मिसळीत होता.

रेतीत अर्धवट पहुडलेल्या अल्पवस्त्रांकित लोकांची तुफान गर्दी. नजर पोहोचेल तिथवर अर्धनग्न लोकांचे जणू जंगल राज, पुरुष आणि स्त्रियांचे! आरामखुर्च्यांवर अस्ताव्यस्त पसरून ते मदमस्त अवस्थेत तप्त रवीकिरणांना जमेल तितके अंगावर झेलत होते. कित्येक महिन्यांच्या बर्फाळ थंडीने आक्रसलेल्या कॅनडासारख्या शीतल देशांमध्ये सूर्यकिरणांचे असे जंगी स्वागत होत असे. लज्जारक्षणापुरती वस्त्रे घातलेले बहुतेक तरुण पुरुष आणि स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी सूर्यस्नानामुळे स्वतःच्या शरीराची बदलती लालेलाल त्वचा कौतुकाने न्याहाळत मजा करीत होते, जणू कांही पिकलेल्या फळाचा आस्वाद घेण्याआधी ते त्याचा मधुर सुवास नाकात भरून घेत होते.

जर दुसरा वेळवखत असता तर मी त्या सर्वांना अनिमिष नेत्रांनी बघत राहिलो असतो. मनातल्या वखवखत्या आदिम इच्छा जागृत झाल्या असत्या. एरवी निषिद्ध असलेली वासनापुष्पे माझ्या मनात नकळत फुलण्याचा प्रयत्न करत असती. लख्ख सूर्यप्रकाशाचा झगमगाट आणि त्याची उष्ण धग अचानक मायाविनी वाटत असती. स्वतःच्या बेफाम कामनांवर अंकुश ठेवणे तर अशक्यच झाले असते. पण नाही! त्या वेदनादायक क्षणांमध्ये आयुष्याचे सकल गुलजार रंग हरवले होते. उरली होती ती ती फक्त निशाचरांचे साम्राज्य असलेली कधीही न संपणारी निराशेने ग्रस्त काळीकुट्ट रात्र. वर्षानुवर्षांपासून जपलेल्या अलवार नात्यांची आता उरली होती उसवलेली वीण. काळजाला आरपार छेदणारी असह्य वेदनेची कट्यार, क्षणोक्षणी विलाप करणारे विरहग्रस्त मन! हृदय पिळवटून टाकणारे एका पित्याचे दुःख कसे काय कमी होणार होते?  कायद्याच्या कर्तव्यकठोर साखळ्यांत जखडलेले माझे अपत्यप्रेम! मला किती भयानक शिक्षा मिळाली होती आपल्याच मुलापासून वेगळे राहण्याची.

जवळच एक युगुल होते. बहुदा घरी भांडण केल्यावर इथे आले असावेत. या सुंदर सागरतीरी देखील कलहाचा अध्याय सुरुच होता. विरुद्ध दिशांना तोंडे फिरवून फुरंगटून बसले होते दोघेही! मला अशा सर्व प्रकारच्या वादविवादापासून कायमची मुक्ती मिळालेली होती. निसर्गशोभेत रममाण होण्याकरिता मी एकटाच आलो होतो, घरच्या ताणतणावाने कातावलेल्या त्या खोलीपासून खूप दूर. पण इथे येऊन बघितल्यावर जाणवले की या लाटांच्या तडाख्यांना झुंज देणारा मी एकटाच नव्हतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या स्वतंत्र समस्या होत्या.

हळूहळू संध्याकाळच्या लांबसडक सावल्या पडायला सुरुवात झाली. घरी जाण्याची वेळ जवळ जवळ येत चालली होती, मी मात्र त्याच घरकुलापासून दूर पळत होतो. आता कुठले घर?  कोणे एके काळी माझे असलेले ते उबदार घरटे आता माझे राहिले नव्हते. मी संबंधविच्छेद झाल्या क्षणी अनिकेत झालो होतो. आता मला एक नवीन घर शोधावे लागणार होते. आधीच्या माझ्या मालकीच्या घरावर माझा कोणताही अधिकार नव्हता. आतल्या आणि बाहेरच्या उष्णतेची प्रखर झळ एकत्रित होत एका भीषण ज्वालामुखीच्या निर्मितीत गुंतली होती.

विचार करत असतांनाच माझा डोळा लागला. एकाएकी माझ्या माथ्यावर एका कोवळ्या तळहाताचा मृदुल अलवार स्पर्श जाणवला.

मी दचकलो. माझा मुलगा तर माझ्यापासून दूर गेला होता. आता माझ्या कपाळावर कोणाचा कोमल हात होता बरे?  तोच तर आहे हा! कदाचित माझ्या आठवणीने नकळत त्याला माझ्यापर्यंत इथवर खेचून आणले असावे. मी घाबरून डोळे उघडले. वाळूने नखशिखांत माखलेला एक लहानगा मुलगा गुडघ्यावर रांगत माझ्या पर्यंत पोचला होता आणि माझ्या डोक्यापाशी बसला होता व माझ्या माथ्याला कोमल स्पर्श करत होता. तो माझ्या बिट्टूसारखा तर दिसत होता, पण… तो माझा बिट्टू नव्हताच. त्यावेळी मी त्याच्याकडे नीटसे पाहिलेही नव्हते, तोच त्याची आई तडक तिथे आली आणि ‘माफ करा’ असे म्हणत त्याला घेऊन देखील गेली!

किती नाजूक रेशमी स्पर्श होता तो! नाजूक, वत्सल, मुलायम!

मी हतप्रभ झालो, आत्ता कुठे आला होता अन लगेच गेला सुद्धा! अरेरे! त्याचा मृदुल हात माझ्या कपाळावर आणखीन थोडा काळ राहिला असता तर किती बरं झालं असतं. माझ्या अंतर्यामी धगधगणारी आग काही प्रमाणात शांत तरी झाली असती! तो अनोळखी बच्चू गोड आठवणी जाग्या करून गेला. मला क्षणभरासाठी असे वाटले की मी बिट्टूसोबत लपंडावाचा खेळ खेळतोय. तो बिलंदरपणे कुठेही लपून बसायचा. मी शोध शोध शोधायचो तरी बेटा मला गवसायचा नाहीच. मी जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जायचो तेव्हां विजयी मुद्रेने तो टाळ्या पिटत खळखळून हसायचा. या उलट मी जेव्हां लपायचो तेव्हा तो मला लगेचच हुडकून काढायचा. तो अजून बोलायला शिकला नव्हता, पण त्याच्या बोलक्या डोळ्यांनी तो माझ्याशी अखंड बोलत असायचा.

या मुलाचे डोळे देखील माझ्या बिट्टूसारखेच बोलके आणि भावस्पर्शी होते. काय हा नियतीचा डाव! कालपर्यंत माझा मुलगा माझ्या निकट होता, पण आज मी इतका असहाय झालो आहे की, एका परक्या बालकात माझ्या स्वतःच्या मुलाचे प्रतिबिंब शोधतोय. मी त्याला माझ्यासोबत ठेवू इच्छित होतो. पण मी काय करू शकत होतो?  महिनोन्महिने अन्यमनस्क होऊन जगलेल्या निरुद्देश आयुष्याचे कमजोर धागे काल पूर्णपणे तुटले. इथे सागरतीरी येऊन माझ्या अस्वस्थ मनाला थोडाफार विरंगुळा देऊ इच्छित होतो. म्हणूनच समुद्रकिनाऱ्यावरही मी माझ्या आयुष्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत चक्रीवादळ निर्माण करणाऱ्या लाटा मोजत बसलो होतो.

न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला होता आणि अधिकृतपणे मला तात्काळ घर सोडण्याचा आदेश दिला होता. माझ्या नशिबाने नोकरी सुरक्षित होती. आर्थिक अडचणी नव्हत्या. परंतु बायको आणि मुलापासून दूर राहण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कोर्टाने एक नाही तर अनेक बाबींचे काटेकोरपणे पालन करणे माझ्यासाठी सक्तीचे केले होते.

“तुम्ही आपल्या पत्नीशी अर्थात लिलीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेऊ नका. “

“मुलगा वयस्क होईपर्यंत तुम्ही त्याला महिन्यातून फक्त दोन तासांसाठी त्याला भेटू शकता”

“अशा भेटी फक्त त्याच्या आईच्या उपस्थितीतच व्हायला हव्यात. ” 

“त्याच्याभोवती कधीही घोटाळत राहण्याचा प्रयत्न करू नका. “

जणू काही मी एक पिता नसून एखादा गुन्हेगार होतो, जो त्याला हानी पोहोचवू शकत होता. मी कल्पनेतही कधी कोणताच गुन्हा केला नव्हता. असे शक्य तरी होते कां की प्रत्यक्ष माझ्या प्रिय मुलाला मी कोणत्याही प्रकारे दुखापत करू शकेन?  

– क्रमशः भाग दुसरा

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आग – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

किती घोर अन्याय होता हा!

इतक्या आल्हाददायक वातावरणात घरातच राहणे ही अत्यंत कठोर शिक्षा होती. बर्फाळ दिवस उलटल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये हवामान जेमतेम दोन-तीन महिने कृपावंत व्हायचे. लोक घराबाहेर पडायचे. असे कांही सुखद दिवस मुक्कामास येत नाहीत तोच आसमंताला धूर घेरून टाकत असे. लोकांना घरातच राहण्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात येई. निव्वळ मोजक्या दिवसांच्या प्रखर उन्हामुळे धरतीवर इतकी उष्णता निर्माण व्हायची की जंगलात घर्षणामुळे आग लागायची. आग इतक्या भयानक वेगाने पसरायची जणू हजारो किलोमीटर व्यापलेल्या जंगलाच्या या अग्निकुंडात समिधाच अर्पण व्हायच्या! या आगीच्या दाहकतेचा अनुभव घेणारी अनेक शहरे रिकामी केली जायची. जिकडे तिकडे आग, आग आणि फक्त आगीचेच साम्राज्य.

कॅनडातील अल्बर्टा येथील जळणारी आणि जाळणारी वनराई!

वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांवर स्वार होत आगीतून निघणारा घनदाट धूर दशदिशांत स्वैर संचार करायचा आणि एडमंटन आणि कॅलगरीसह अनेक शहरांना आपल्या कवेत कवटाळून घ्यायचा. हे अग्निचक्र साधारणपणे दरवर्षी नित्यनेमाने सुरूच असायचे. वातावरण प्रदूषित करीत जाणारे हे धूम्रवलय अल्बर्टा प्रांत आणि त्याच्या पल्याड देखील विनासायास अनिर्बंधरित्या पसरत राहायचे. अग्निज्वालांचे भीषण तांडव इतके तीव्र असायचे की बहुतेक प्रभावित क्षेत्रात सरकारी प्रयत्न निष्प्रभ ठरायचे. दूरवर फैलावत चाललेले धुराचे वलय हेच दर्शवीत असायचे की आगीचे भीषण स्वरूप किंचितही कमी झाले नव्हते. ही प्रदीप्त अग्निज्वाळा वारा नेईल त्या दिशेने त्याच्या संगतीत प्रचंड आवेगाने फरफटत जात आणखीनच क्रियाशील होत होती.

बाहेर जाऊन मोकळी स्वच्छ हवा अनुभवू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वागत करायला धुराची उबदार वाकळ सज्ज असायची. त्यांची इच्छा असो कां नसो, त्यांना एक तर या गरम पांघरुणात स्वतःला लपेटून घ्यावे लागे, किंवा त्याची ऊब नकोशी असल्यास स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागे. हाच तो वन्य वणवा. मी जंगलीपणाच्या आहारी गेलेल्यांच्या पाशवी जिद्दीविषयी ऐकले होते. मात्र या वन्य वणव्याच्या जिद्दीने पेटवलेला प्रकोप प्रथमच डोळ्यांसमोर प्रकटला होता. जणू शिवशंकराने त्याचा प्रलयंकारी आग ओकणारा तिसरा नेत्र उघडलाय असा आभास होत होता. कुठल्याही उपायाने या आगीचा क्रोध शमण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अनियंत्रित गुंडगिरी अंगात भिनलेल्या झुंडीसारखी ही आग कोणाच्याच आटोक्यात येत नव्हती. आता तर सैरावैरा धावणाऱ्या या अग्निज्वाळांचा जणू स्वतःवरील ताबा नष्ट झाला होता.

मेघांचा वेगळाच हट्ट होता, न बरसण्याचा. मग सृष्टी हतबल झाली. पावसाचा एकही थेंब झिरपला नाही आसमंतातून! हेलिकॉप्टरच्या मदतीने पाडण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या सरींनी देखील कांहीच साध्य झाले नाही.

शेवटी उरली ती भडकलेली आणि करपून टाकणारी आग, आतली आणि बाहेरचीही! आतून आणि बाहेरूनही पेटलेली आग. बाहेर असलेली जंगलातील आग सर्वांना दिसत होती. पण आतल्याआत मला होरपळून टाकत धगधगणारी आग माझी स्वनिर्मित होती. त्या आगीच्या धुराने मला वेढून टाकले होते. त्या ज्वालांत मी एकटा जळत होतो, माझ्या मुलाशिवाय, लिली या माझ्या लाडक्या पत्नीशिवाय, माझ्या कुटुंबाशिवाय. शेवटी एकल माणसाची कुठली ओळख तरी असते कां?

कालपर्यंत जे कुटुंब डेरेदार वृक्ष होते, ते आज फक्त एक निष्पर्ण पोकळ खोड उरले होते, तेही घटस्फोट या शब्दाच्या साखळ्यांनी जखडलेले! संबंधविच्छेद होताच मला आता त्या प्रेमबंधनाने दोन जीवांना जोडणाऱ्या प्रत्येक धाग्याचा स्पर्श स्मरत होता. एक वेळ अशी होती की लिलीचा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय मला करमत नसे. तिकडे तीही तितकीच बेचैन असायची. या उन्मादात जगाला विसरून जात आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. आम्ही तासनतास बोलत असू. या संवादाचे चक्र कधीच थांबत नसे. आम्हाला एकमेकांचा विरह अजिबात सहन होत नसे. आमचे लग्न देखील मोठ्या थाटामाटात झाले, म्हणतात ना ‘बिग फॅट वेडिंग’, तसे!

लग्नानंतर मोहक स्मितहास्य करणारा लिलीचा चेहरा माझ्यासाठी दररोज जणू नवतीचे नजराणे घेऊन येत होता. तिचे ते खळखळणारे हास्य कानांत साठवून घेण्यासाठी माझे कान आसुसलेले असायचे. ते मधुर हास्य कायम राहावे यासाठी मी नाना क्लुप्त्या करून पाहत असे. कधी तर मी तिला तिच्या आवडत्या उपाहारगृहात घेऊन जायचो, तर कधी शॉपिंग मॉलमध्ये! या सर्वांहूनही तिला रम्य निसर्गाच्या सानिध्यात राहणे खूप आवडायचे. त्यासाठी मी दर महिन्याला तिची आवड ध्यानात घेत सहलीची योजना आखायचो. कधी कॅम्पिंग करायचे, कधी गिर्यारोहण तर कधी क्लाइंबिंग! तीही प्रणयाराधनात मागे नव्हती. ती माझ्या आवडीचे पदार्थ अगदी निगुतीने रांधायची आणि मला प्रेमाने खाऊ घालायची. ते पदार्थ आवडल्याचे निदर्शक असलेले माझे थम्सअपसहित मनमुराद हास्य बघताच तिचा चेहरा लाजेने लालेलाल व्हायचा. त्या गुलाबी दिवसांत आम्ही एकमेकांमध्ये बेभानपणे इतके हरवून जायचो की आम्हाला जगाची कसलीच पर्वा नसायची.

बेधुंद करणाऱ्या पहाटवेळा आणि अत्यंत आतुरतेने ज्यांची प्रतीक्षा केली जायची त्या उन्मत्त रात्री. प्रत्येक दिवशी हे असेच व्हायचे. कामावर जायचे अगदी जीवावर यायचे.

“ऐक ना, आज कामावरून सुट्टी घेऊ या. “

“वैद्यकीय रजा घेऊ या. ” 

“नको, त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम (घरून काम) करणे ठीक राहील. ”

या संभाषणानंतर आम्ही पुन्हा एकदा इतके निकट यायचो की आमच्यामध्ये शब्दाचा देखील आडपडदा येऊ शकत नसे. कामाचा कुठलाच ताणतणाव आम्हाला दिवसाढवळ्या देखील जवळ येण्यापासून रोखू शकत नव्हता. बस, एकच गोष्ट मनात भिनली होती, आम्ही पूर्ण समर्पणभावनेने एकमेकांमध्ये विलीन झालो होतो. जणू आमचे वेगळे अस्तित्वच नव्हते. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ मंदगतीने होत असे, पण नंतर जसजसा तो पुढे सरकत असे, तसतसा घड्याळाच्या काट्यांच्या मागे पळत जातांना इतका व्यस्त होत असे की तो कधी संपायचा ते आम्हाला कळतही नसे. दोघांच्याही मनांत एकमेकांच्या अधिकाधिक सामिप्याव्यतिरिक्त इतर कुठलीच कामना नव्हती.

हर्षोल्लास आणि प्रेमानुभवांचा अमर्याद खजिना दिवसागणिक वर्धमान होतच होता. आम्ही असे आनंदलहरींवर तरंगत असतांनाच आमच्या प्रेमाच्या वेलीवर एक पुष्प उमलले. बिट्टू आमच्या आयुष्यात आला. सुखाच्या वर्तुळाचा घेर चौपट झाला. आता आम्ही दोघांचे तीन झालोत. आमच्या घराला आता खरे घरपण आले. ते जणू एक पवित्र मंदिर झाले. असे म्हणतात की कळसावर कोणीही अधिक काळ थांबू शकत नाही, त्याला खाली उतरावेच लागते. आम्ही देखील मात्र तृप्ततेच्या शिखरावर असतांनाच या पूर्णत्वास गेलेल्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या. या भेगांनी भिंती अशा कांही खोलवर पोखरल्या गेल्या, की त्या भूकंप आल्यासारख्या हादरून जायला लागल्या. कदाचित आमच्या जीवनातील आनंदपर्व संपवण्याची काळालाच घाई झाली असावी. तसेही सगळ्या वेळा सारख्या थोड्याच असतात?  बिट्टू सहा महिन्यांचा होता होता आमच्या प्रेमाची गंगा उलट्या दिशेने प्रवाहित होत गेली. आमच्या प्रेमाचा पतंग जितक्या वेगाने उंच उंच उडत गेला होता, त्यापेक्षा अधिक वेगाने तो खाली आला. या पतंगाची फाटून पार दुर्दशा झाली होती. आता प्रत्येक क्षणी दुसऱ्याची मदत करायला आम्ही हात आखडता घेत होतो.

कटू संवादांच्या मालिकेने घर बेचैन व्हायचे.

“रात्रभर बिट्टू रडत होता. पण तुला एकदाही उठून बघावेसे वाटले नाही की तो इतका कां रडतोय? “

“अगं, त्याला भूक लागली असेल, दूध तर तूच पाजणार होतीस ना, मी उठून काय करणार होतो? ” 

“अरे, तो दरवेळी दुधासाठी उठत नाही. ” 

“मग मला उठवायचे की. “

“कधीतरी स्वतः होऊन काहीतरी करायचे ना. प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी कां?  कधीतरी तू समजून घ्यायला नको कां?  

“बरं बाई, मी खरोखर मूर्खच आहे. तुला कोणत्या वेळी काय हवे असते हे मला समजू शकत नाही. ” 

ती पाय आपटत तरातरा निघून जायची. या लहान सहान गोष्टी मोठमोठ्या मतभेदांच्या भेगांचा पाया आणखीनच मजबूत करायच्या. हातातील वस्तू जमिनीवर आदळत होत्या, त्यांचा आवाज वाढायला लागला की मी घराबाहेर निघून जायचो. हळूहळू कर्कश झालेल्या संवेदना आता धीट झाल्या होत्या. हे चिडचिड करणारे आवाज आता त्रासदायक व्हायला लागले. त्यांचे माझ्या मनावर आणि शरीरावर वाढत चाललेले ओझे मला सहन होईनासे झाले. कर्णकटू कोलाहल आता सतत माझ्या कानांशी अरेरावी करीत खोल घुसत होता. आता कुठलेही मधाळ शब्द कडव्या विषासारखे वाटायला लागले. आम्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे तीक्ष्ण वाग्बाण चालवत असतानांच मध्येच निरागस बिट्टूचे रडणे टिपेला जात असे. कोणे एके काळी प्रेमाचे मंदिर असलेले आमचे घर जणू तिघांच्या आवाजाने कातावून जात स्वतःच उच्चरवाने आक्रोश करीत होते. प्रेमाच्या गुलाबपाण्याने शिंपलेल्या मायाळू भिंतीचे आता कठोर सिमेंट आणि मजबूत मातीच्या लिंपणाने एका भावविहीन डोलाऱ्यात कधी रूपांतर झाले ते आम्हांला कळलेच नाही.

“इतक्या जोरात ओरडत जाऊ नकोस, लिली. माझी नाही तर किमान बिट्टूची तरी काळजी घे. “

“तू इथे असतांना ओरडल्याशिवाय काहीच होत होत नाही रे! त्याशिवाय तुला ऐकायला येतं कुठे? ” 

“हो, सगळी चूक माझीच आहे! “

माझं, माझं, माझं… माझ्या कानाभोवती घोंघावणाऱ्या या शब्दांनी मला धक्का बसला. मी भानावर आलो, कारण हे माझं घर नव्हतं तर समुद्रकिनारा होता. मात्र माणसांच्या गर्दीतही मी इथे एकटाच होतो. पण ते किंचाळणारे आवाज माझा पाठलाग करत होते. गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक हृदयस्पर्शी सत्यकथा…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “एक हृदयस्पर्शी सत्यकथा…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका शांत कॉलनीत ‘आप्पा’ एकटेच राहायचे. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी, ‘समीरा’, बंगळुरूमध्ये एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीला होती आणि नुकतीच ती लग्न करून तिथे स्थायिक झाली होती.

आप्पांची एक सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून, घड्याळात रात्रीचे बरोबर १० वाजले, की त्यांचा समीराला न चुकता फोन यायचा. फोनवरचे त्यांचे प्रश्न नेहमी तेच असायचे.

“हॅलो बाळा, ऑफिसमधून घरी पोहोचलीस का? जेवण झालं का तुझं?”

सुरुवातीला समीरा या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे द्यायची. पण लग्नानंतर आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तिला आप्पांच्या या रोजच्या फोनचा प्रचंड कंटाळा येऊ लागला. कधी ती मित्रांसोबत बाहेर असायची, कधी नवऱ्यासोबत टीव्ही बघत असायची, तर कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायची. बरोबर १० वाजता आप्पांचा फोन वाजला, की तिची चिडचिड व्हायची.

एके दिवशी रात्री समीराचे तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. ती रागातच बेडरूममध्ये येऊन बसली. तिचे डोके भणाणून गेले होते.

तेवढ्यात घड्याळात १० वाजले आणि तिच्या मोबाईलवर ‘आप्पा कॉलिंग’ असे नाव झळकले. समीराने रागाने फोन उचलला आणि आप्पा काही बोलण्याआधीच ती संतापाने ओरडली.

“बाबा, काय लावलंय तुम्ही हे रोज रोज? मी आता लहान शाळेत जाणारी मुलगी नाहीये! माझं लग्न झालंय, माझं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे. रोज रात्री बरोबर दहा वाजता फोन करून माझी चौकशी करणं प्लीज बंद करा आता. मला माझा ‘स्पेस’ हवाय. मी सुरक्षित आहे. मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मीच तुम्हाला फोन करत जाईन. प्लीज मला रोज हा असा त्रास देऊ नका!”

समीराने न थांबता एका श्वासात सर्व राग आप्पांवर काढला.

पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता होती. आप्पांचा फक्त एक जड श्वास समीराला ऐकू आला. थोड्या वेळाने अत्यंत कांपऱ्या आणि दबक्या आवाजात आप्पा फक्त एवढंच म्हणाले, “बरं बाळा… झोप आता. काळजी घे स्वतःची. “

आणि फोन कट झाला.

त्या दिवसानंतर आप्पांचा रात्री १० वाजताचा फोन येणे कायमचे बंद झाले. ते फक्त सकाळी व्हॉट्सॲपवर एखादा ‘सुविचार’ किंवा फुलांचा फोटो पाठवायचे. समीराला खूप मोकळे आणि निवांत वाटले. “चला, सुटले एकदाची या रोजच्या कटकटीतून, ” असा विचार करून ती स्वतःच्या संसारात आणि नोकरीत मग्न झाली. ती स्वतःहून आप्पांना रविवारी कधीतरी पाच मिनिटे फोन करायची, तेव्हाही आप्पा अतिशय मोजकेच बोलायचे.

असेच सहा महिने उलटून गेले.

एके दिवशी पहाटे साडेपाच वाजता समीराच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन पुण्याच्या शेजाऱ्यांचा होता. समीराने झोपेतच फोन उचलला आणि पलीकडचे शब्द ऐकताच ती जागीच थिजली.

आप्पांना झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक आला होता आणि ते कायमचे हे जग सोडून गेले होते.

समीरा वेड्यासारखी रडत, पहिली फ्लाईट पकडून पुण्यात पोहोचली. घरातली ती गर्दी, ते रडणे आणि आप्पांचे ते शांत झोपलेले शरीर बघून समीराच्या काळजाचे तुकडे झाले. सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेले. चार दिवसांनी समीरा आप्पांची बेडरूम आवरत होती.

आप्पांच्या उशीखाली तिला त्यांचा तो जुना स्मार्टफोन आणि एक छोटीशी डायरी सापडली. समीराने ती डायरी उघडली. त्यातील एका पानावर आप्पांच्या थरथरत्या अक्षरातील ओळी वाचून समीराचा श्वासच कोंडला गेला.

आप्पांनी लिहिले होते:

“समीराच्या आईला जाऊन पाच वर्षे झाली. हे घर खायला उठतं. रात्री १० वाजले की मला घाम फुटायला लागतो, छातीत भयंकर धडधडतं. या एकटेपणाची आणि अंधाराची मला खूप भीती वाटते. पण जेव्हा मी रात्री बरोबर १० वाजता समीराला फोन लावतो, तिचा ‘हॅलो बाबा’ हा आवाज कानावर पडतो… तेव्हा माझ्या धडधडणाऱ्या काळजाला शांतता मिळते. माझा जीव भांड्यात पडतो. ती सुरक्षित आहे हे समजलं, की मला या रिकाम्या घरात रात्रीची शांत झोप लागते. “

समीराचे हात थरथर कापू लागले. तिने पुढचे पान पलटले. ती त्याच तारखेची नोंद होती, ज्या दिवशी तिने आप्पांना फोनवर रागावून सुनावले होते.

“आज माझ्या मुलीने मला फोन करू नको असं सांगितलं. तिला माझ्या प्रेमाचा आता त्रास होतोय. तिचं बरोबर आहे, ती आता मोठी झालीये. मी आजपासून तिला कधीच कॉल करून त्रास देणार नाही. पण… आता रात्रीची झोप कशी येणार? तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही. “

समीराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने वेड्यासारखा आप्पांचा तो जुना मोबाईल हातात घेतला आणि त्याचा ‘कॉल लॉग’ (Call History) उघडून पाहिला.

मोबाईलची स्क्रीन बघताच समीराने एक भयंकर मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली!

गेल्या सहा महिन्यांत… ज्या दिवशी तिने आप्पांना ओरडले होते त्या दिवसापासून ते काल आप्पा जाईपर्यंत… रोज रात्री बरोबर १०:०० वाजता आप्पांनी समीराचा नंबर डायल केला होता! पण तो फोन ‘रिंग’ होण्याआधीच अवघ्या दोन सेकंदात त्यांनी तो ‘कट’ केला होता.

ती रोज रात्री आपला नंबर डायल करायचे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा समीराचा फोटो बघायचे, आणि फोन लागण्याआधीच कट करायचे… जेणेकरून समीराला त्रास होऊ नये! पण स्वतःच्या एकटेपणाशी लढताना, फक्त नंबर डायल करून ते स्वतःच्या काळजाची समजूत काढत होते.

समीरा ढसाढसा रडत होती. ती उशीला घट्ट मिठी मारून ओरडत होती, “मला माफ करा बाबा! मी खूप स्वार्थी आहे. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर ‘कंट्रोल’ ठेवण्यासाठी फोन करताय, पण तो फोन माझ्यासाठी नव्हता… तो तुमच्या स्वतःच्या जगण्यासाठी होता! बाबा, प्लीज मला एक कॉल करा… मला तुमचा आवाज ऐकायचाय!”

पण आता रात्रीचे १० वाजून गेले होते, आणि समीराचा फोन पुन्हा कधीच वाजणार नव्हता.

लेखक : अनामिक 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्यथा तिची, कथा माझी… – लेखिका : प्रतिभा परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ व्यथा तिची, कथा माझी… – लेखिका : प्रतिभा परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सुमनने नाश्ता टेबलावर ठेवून मुलांना आवाज दिला.

कालच मुलांची परीक्षा संपली होती त्यामुळे घरी सगळं रिलॅक्स्ड झालं होतं.

मागचे दहा-बारा दिवस मुलांच्या अभ्यासापुढे सुमनला काही सुचत नव्हतं. घर काम पटापट आवरून ती मुलांना अभ्यासाला बसवी. आता घराकडे लक्ष द्यायला हवे आहे, उन्हाळा ही सुरू होतो आहे.

गरम कपडे धुवायला काढून ते धुवून सुमन बाल्कनीत वाळत टाकायला गेली.

बाल्कनीत खाली खूपसा कचरा काड्या, पिसं पडलेली होती. तिने कपडे वाळत टाकून कचरा गोळा करून टाकला.

उद्यापासून एक एक खोली आवरायची असं ठरवून कामाला लागली.

दुपारी जरा झोपली तो चिवचिवाटाने तिला जाग आली.

 

काय बाई कल -कल आहे म्हणत ती बाल्कनीत आली. खाली परत कचरा पडला होता. सुमनने वर पाहिलं, बाल्कनीत एक विंड चाईम लावलेलं होतं त्यावर चिमणीने घरटे बांधले होते. “आता इथे ही घरटं ! बाई -बाई आणखीन कुठे जागा नाही का गं तुला मिळाली??” सुमन चिमणीकडे पहात बडबडली.

 

अचानक चिमणी खिडकीत येऊन बसली. सुमनला वाटले चिमणी तिच्याकडे पाहून बोलतिये.

“मग कुठे बांधू?? एक तरी झाड सोडल कां तुम्ही आमच्यासाठी? तुम्ही आमच्या जागेवर आपलं घर बांधलं, मग आता आम्ही तुमच्या घरात घरट बांधतोय.

अचानक घर मोडणं आणि त्यानंतर कुठे जायचं हे माहित नसल्यावर काय स्थिती होते हे तुम्हा माणसांना कसे समजणार??”

चिमणीचे बोलणे ऐकून सुमनच्या डोळ्यासमोर तिचे चाळीतले घर आले.

लग्न होऊन ती उदय बरोबर चाळीतल्या घरात आली होती. वर्षभरात अंकिताचा जन्म झाला. एक दिवस कुजबुज सुरू झाली येथे हायवे बनणार आहे तेव्हा त्यांची चाळ मोडून इथून हायवेचा पूल बनणार. तेव्हा ही जागा रिकामी करायची ऑर्डर आहे असे ऐकायला येत होते. मालकांनी आम्ही प्रयत्न करतो असे खोटे आश्वासन दिले. पण अचानक एक दिवस बुलडोजर घेऊन कामगार आले आणि एकच गोंधळ उडाला. कसेबसे सामान बाहेर काढून लोक बाहेर येऊन बसले.

 

उदयच्याएका मित्राने एका खोलीचे घर रिकामे असल्याचे सांगितले. भाडं जरा जास्त होतं, पण मागचा पुढचा विचार न करता उदयने ते घर घेतले. पैशांसाठी तिने सोन्याच्या बांगड्याही विकल्या.

पुढे उज्वल झाला. नशीब पालटले. उदयला बढती मिळाली आणि त्यांनी हा दोन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट नवीनच बांधलेले होते.

रस्ता पक्का करण्यासाठी बरीच झाडे कापली गेली होती. हे सर्व आठवून सुमनला तो दिवस आठवला आणि चिमणीची व्यथा जाणवली.

मुलांचा रिझल्ट लागला दोघे छान पास झाली म्हणून दोन दिवसासाठी चौघे गावी देवदर्शनाला जाऊन परत आली.

 

इकडे आता चिमणा चिमणीच्या घरट्यात चिवचिवाट वाढलेला होता. अंड्यांतून पिल्लं बाहेर आली होती. चिमणी चिमणा पोरांसाठी किडे, धान्य गोळा करून आणत होती.

 

सुमनही एका ताटलीत भात, पोळीचा चुरा ठेवायची. हळूहळू बाळ मोठे होत गेली.

काही दिवसांनी चिमणबाळे फुर्र– फुर्र उडू ही लागली आणि अचानक त्यांचं येणं बंद झालं.

चिमणी ही फारशी दिसत नव्हती.

आता सुमनला दुपार रिकामी रिकामी वाटू लागली.

चिमणी घर सोडून गेली वाटतं. ती विचार करू लागली. अचानक तिला चिऊ चिऊ चा आवाज आला. वाटलं चिमणी तिला बाय-बाय करायला आली आहे.

 

“पुढच्या वर्षी इथेच घरटं बांधायला ये हं!” सुमन चिमणीला म्हणाली.

“मी असेल कि नाही माहित नाही पण ही माझी बाळ त्यांच काय होणार??”

सुमनला जाणवले चिमणीला काय सांगायचे आहे! तिने मनाशी ठरवले बाल्कनीत कुंडीत लावलेले वडाचे व आंब्याचे रोप समोरच्या पार्कमध्ये नेऊन लावूया. चिमणीच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी घराची सोय होईल.

लेखिका : प्रतिभा परांजपे

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – ३ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती. )

इथून पुढे – – 

 ॓क्यूं हमीदा, तबीयत ठीक नही है क्या? क्या हुआ? 

या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, क्या करनेका बहन? अपना नशीबही अच्छा नही. चाचाके मर्जीनुसार कभी उनके रूममे भी जाना पडता है. पैर दबाने के बहाने से बुला लेते है और…. क्या करूं? मेरे फॅमिलीको खाली मेरा पैसा चाहिये. मेरा पासपोर्ट वगैरा सब चाचाके पास ही है. यहा दो बरस पुरे होने के बाद मुझे दो महीने की छुट्टी मिलेगी. तब तक मै वापस नही जा सकती. अभी मैने एक तरकीब सोची है. जब जब चाचा पैर दबाने के लिए बुलाते है, तो मैं पहिले उनसे कुछ अच्छा गहना मॉ॑ग लेती और मेरे बॅग में रखती. सायरा बेगमको सब पता है. लेकिन वो कुछ नही कर सकती. मेरे मेहनत का पैसा तो मेरे घरवालेही खाते है. कम से कम कुछ सोना तो मेरे पास रहेगा. तिचं घर आल्यावर,  ॓फिर मिलेंगे.॔ खुदा हाफिज.॔ म्हणून ती निघून गेली.

 पण तिचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर वीज पडल्यासारखं झालं. माझी अवस्था तिच्यापेक्षा फार वेगळी नव्हतीच !दिवसेंदिवस सुरेंद्रची मागणी वाढत चालली होती. त्यातच सुलेखा ताईला दिवस गेल्याचं कळलं. मी वरकरणी त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं नाटक केलं. पण एकदा सुलेखा ताईला फोनवर कुणाशी तरी बोलताना मी ऐकलं होतं की त्या होम सायन्सच्या डिप्लोमाची फी खूपच जास्त आहे. आता दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपली इथून सुटका नाही हे मी मनोमन जाणलं होतं. बाळ.. बाळंतीणीचं करायचं सोडून मला कोण शिकायला पाठवेल? इतकी चांगली हक्काची मुलगी कामाला घरात असताना मला कोण एवढ्यात भारतात पाठवेल?॔ 

… आणि त्यादिवशी सुरेंद्रने ॓मोठी मागणी ॔ पुढे केली. मी सगळी काळजी घेईन. तुला काही त्रास होणार नाही असं आश्वासनही दिलं.॔ हे कधीतरी घडणारच होतं, म्हणून मीही सावध होते. मुंबईला मी रात्रीच्या ज्युनिअर कॉलेजला जात असताना माझ्याबरोबरच्या काही मैत्रिणी, त्यांनी काल कुठे कसा सेक्सचा अनुभव घेतला ते रंगवून सांगत असंत. अमक्या तमक्या त्या मोठ्या बकऱ्याकडून ठरल्यापेक्षा मी काय जास्त उकळलं, ड्रेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी सेट कसं मिळवलं. याचं वर्णन करीत. मी त्यांच्या धैर्यापुढे अवाक् होई…. .॔ 

चित्रा पुन्हा रडू लागली. तिच्या पाठीवर हात फिरवत राजश्री तिला शांत राहायला सांगत होती. पण हे सगळे प्रकार ऐकून राजश्रीच एवढी हादरून गेली होती की आता तिच्याच पाठीवरून हात फिरवायला तिला सावरायला, तिचे डोळे पुसायला रमेश जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आणि एकीकडे हे सारं रामायण ऐकायला तो इथे नाही तेही चांगलं झालं असं वाटत होतं.

 काही मिनिटं अशीच शांततेत गेली. थोडं थांबून चित्रा म्हणाली दीदी,॓ कसं सांगू तुला? सुरेंद्रची मागणी मान्य करण्याआधी मी त्याच्यापुढे मुंबईतली महागाई, शिक्षणाचा खर्च, आमची घराची गरज असा सारा पाढा वाचला. त्यानं मला माझ्या मुंबईच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं. आणि मगच मी त्याच्या स्वाधीन झाले. मी कबूल करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पुरुष सहवासाची आणि प्रत्येक वेळी बँकेत जमा होणाऱ्या पैशाची मला भुरळ पडली. पण मला आता तिथून, या साऱ्या मोहातून लवकर बाहेर पडायचं होतं. मी वेळेवर मुंबईला पोचले नाही तर इथलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मला पुढच्या वर्षात ॲडमिशन मिळणार नाही हे मला माहीत होतं.

 दीदी, तुम्हा दोघांना माहितेय की मला पुढे शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचंय.

 ॓… आणि माझं नशीब चांगलं म्हणून दुबईच्या त्या मोहमयी, सोनेरी दुनियेतून परतण्याचा ॓शॉर्टकट ॔ मला लवकरच सापडला. काही दिवसांपूर्वी सुलेखाताई,  ॓आज मी लवकर घरी येते. दोघी मिळून थोडे लाडू, शंकरपाळे करू.॔ असे सांगून शाळेत गेली. आणि अनपेक्षितपणे, सुखाला चटावलेला सुरेंद्र लवकर घरी आला. त्याला मी ॓आज ताई पण लवकर घरी येणार आहे.॔ असं अजिबात सांगितलं नाही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असतानाच सुलेखाताई तिच्याकडची किल्ली लावून दार उघडून आत आली. सुरेंद्रला घाईनं माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरून तिनं काय ते जाणलं.

 खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तिला आमचा संशय होताच. पण आज आम्ही रंगेहाथ पकडले गेलो होतो. त्या दोघांची खूप वादावादी झाली. मलाही खूप बोलणी खावी लागली. शक्य तितक्या लवकरचं तिकीट काढून माझी मुंबईला रवानगी करण्याचा निर्णय झाला. मी ताईकडून आठवणीनं माझ्या पासपोर्टबरोबर माझं बारावीचं आणि माझी इतर सर्टिफिकेट्स मागून घेतली आणि मगच माझी बॅग भरायला घेतली. दीदी, मी तुम्हा दोघांची क्षमा मागते. माझा अपराध तुम्ही समजून घ्याल ना?॔ 

 राजश्री काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं याबद्दल खंत करावी की आपण विश्वासानं दुसऱ्या देशात पाठवलेली दुसऱ्याची मुलगी सुखरूप घरी आली याबद्दल देवाचे आभार मानावे हेच तिला समजेना. डोळे पुसत, जिना उतरणाऱ्या चित्राकडे ती निःशब्द होऊन नुसती बघत उभी राहिली.

 मन मोकळं झाल्याने चित्राला आता जरा बरं वाटत होतं. राजश्रीताईकडून घरी येताना चित्राला दुबईतला आणखी एक प्रसंग आठवला…

… एकदा काही खरेदीसाठी ती सुलेखाताई आणि सुरेंद्र एका मॉलबाहेर भेटणार होते. त्या दिवशी सुरेंद्रनं आपल्याला घरी फोन करून ठरल्या वेळेपेक्षा एक तास लवकर तयार राहायला सांगितलं होतं. सुरेंद्रला आवडणारा सुंदर आकाशी रंगाचा ड्रेस घालून आपण तयार झालो. ड्रेसचं आणि आपलं सुरेंद्रनं अगदी ॓साग्रसंगीत  ॔कौतुक केलं. बाहेर पडल्यावर गाडी वेगळ्याच दिशेला निघालेली पाहून आपण सुरेंद्रला विचारलं ,॓आपल्याला ताईने तिकडच्या मॉलमध्ये बोलावलं आहे ना ?॔हो. पण त्याआधी एक सरप्राईज आहे बाईसाहेबांना. असं म्हणत सुरेंद्रने गाडी ॓गोल्डसूक ॔ जवळ उभी केली. मागे ताईंबरोबर खरेदीला गेलो होतो तेव्हा आपल्याला आवडला होता तसाच सोन्याचा सेट सुरेंद्रने आपल्यासाठी खरेदी केला. भारावून जाऊन तो सेट पर्समध्ये ठेवताना आपल्याला झालेला आनंद आपण लपवू शकलो नाही. गाडीत बसल्यावर सुरेंद्र म्हणाला,  ॓बाईसाहेब याची पुरेपूर वसुली मी करणार आहे बरं !॔आपण खोटं खोटं रागावून त्याला आणखीनच उत्तेजन दिलं होतं. मॉलमधली खरेदी आटोपून, घरी येऊन सारं आवरल्यावर रात्री आपण आपल्या खोलीचं दार लावलं. तो चमचमणारा सुंदर सेट घालून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात न्याहाळलं. मग एका जुन्या ड्रेसमध्ये तो सेट गुंडाळून अलगद बॅगेच्या तळाशी ठेवला.

… आत्ता दीदीला सगळं काही सांगताना ही गोष्ट आपल्याला आठवली नाही की हे सांगायचं आपण मुद्दामून टाळलं ?

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.) – इथून पुढे – – 

साऱ्या विचारांनी, आठवणींनी शिणून राजश्रीला झोपाळ्यावरच डुलकी लागली. जाग आली तेव्हा सुनंदाबाई स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. रमेश येऊन त्याचं आवरून पेपर वाचत होता. राजश्री जागी झालेली पाहून त्यानं काळजीन विचारलं,  ॓बरं वाटत नाहीये का? किती थकलेला दिसतोय तुझा चेहरा!॔ 

“ काही नाही. थोडी डुलकी लागली होती. देवाजवळ देवा लावते आणि जेवून घेऊया “ राजश्री उठत म्हणाली.

जेवण झाल्यावर राजश्रीने संध्याकाळी बँकेत कळलेली चित्राच्या अकाउंटची हकीगत रमेशला सांगितली. चित्रा चोरी करणार नाही याबद्दल दोघांचीही खात्री होती.

मग नेमकं काय झालं असेल? चार-पाच महिन्यात एवढे कसले पैसे जमा झाले असतील? अशा विचारांच्या आवर्तात केव्हातरी राजश्रीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून रमेश दौऱ्यावर चालला होता तेव्हाच राजश्रीलाही जाग आली होती पण तिला उठावसंच वाटेना. पुन्हा चित्राच्या विचारात ती बुडून गेली..

 *****

सुरुवातीला आठवड्यातून एकदा चित्राचा ठराविक वेळी फोन येई तेव्हा तिची आई, भाऊ येऊन बसत. स्पीकरवर फोन ठेवला की साऱ्यांना तिचं बोलणं ऐकता येई. आणि तिच्याशी बोलताही येई. दुबईच्या कितीतरी गोष्टी ती उत्साहाने सांगत असे.

॓दीदी इथला एअरपोर्ट, रस्ते अगदी स्वच्छ आणि सुंदर आहेत. रस्त्यावर छान झाडं, फुलं आहेत आणि दिनेश रस्त्यावर इतक्या प्रकारच्या सुंदर मोटारी बघितल्या ना की मला तुझी खुप आठवण येते. किती प्रकारची गाड्यांची चित्रं तू जमविली आहेस. मी येताना आणीन आणखी चित्रं तुझ्यासाठी.

दीदी, सुलेखाताईची जागा पण आपल्यासारखी छान आहे. इथे मॉल्सपण खूप मोठे आहेत. ही दोघही मला बरोबर घेऊन जातात. आम्ही खरेदी करतो, खातो पितो. काळजी करू नका मी मजेत आहे.॔ असं उत्साहाने सांगायची तर कधी आपुलकीने दीदीची, भाईसाहेबांची चौकशी करायची. दहावीत गेलेल्या दिनेशला नीट अभ्यास करायलाही सांगायची.

घरकाम आणि स्वयंपाक या दोन्ही जबाबदाऱ्या चित्रानं घेतल्याने, सुलेखाला अगदी मोकळं छान वाटत होतं. गेली चार वर्ष स्वतः सगळं काम आणि नोकरी करण्यात तिची फार धावपळ झाली होती.

असाच एकदा चित्राचा ठरल्यापेक्षा वेगळ्या वेळी फोन आला होता.  ॓दीदी इथे येऊन आता दोन महिने होऊन गेले. मी सुलेखा ताईला माझ्या होम सायन्सच्या कोर्सबद्दल विचारलं. माझी सर्टिफिकेट तिच्याजवळ दिली. पण सुलेखा ताई म्हणाली की तू येईपर्यंत इथलं शैक्षणिक वर्ष अर्धं संपून गेलं आहे. आता तू घरच्या कॉम्प्युटरवर दुपारी प्रॅक्टिस कर. काही नवीन माहिती मिळव.॔ हे सारं ऐकताना चित्राच्या आवाजातली निराशा झाली जाणवत होती.

त्या रात्री मुद्दाम फोन करून राजश्री सुलेखाशी बोलली. पण ॲडमिशनचे काही अवघड नियम गोड भाषेत सांगून सुलेखानं वेळ साजरी केली. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनची आत्ताच चौकशी करते असेही ती म्हणाली. पण राजश्रीच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. पूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याने चित्राचाही जीव हळहळत होता. तिला मुकाट्याने घर काम आणि बाजारहाट करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तिच्या पगाराचे पैसे मात्र सुलेखा नियमित पाठवत होती. तरी हळूहळू चित्राच्या फोनमधला उत्साह कमी होत असल्याचं राजश्रीला जाणवलं.

काल बँकेत कळालेल्या माहितीने तर राजश्रीला आणखीनच कोड्यात टाकलं होतं. सुलेखाला सकाळीच फोन करावा असं ठरवून राजश्री स्वतःचं आवरत होती. तेवढ्यात सुनंदाबाई आल्या त्या सांगतंच की,  ॓अहो दीदी, चित्रा आज पहाटे अचानक घरी आलीय. तुम्हाला सर्वांना भेटावसं वाटलं म्हणून आले. इतकंच बोलली आणि डोक्यावर पांघरून घेऊन आडवी झाली. आज रात्री ती तुम्हाला भेटायला येणार आहे. माझ्याशी धड काही बोललीच नाही. तुमच्याजवळ बोलेल काहीतरी कदाचित !॔हे ऐकून राजश्रीला चांगलाच धक्का बसला. सुलेखानं साधं फोन करून चित्राच्या येण्याबद्दल कळवलंही नव्हतं. काय झालं असेल नेमकं? राजश्री विचारात पडली. आता रात्रीची आणि चित्राची वाट बघण्याखेरीज उपाय नव्हता.

चित्रा आल्यावर राजश्रीनं तिला स्वतःजवळ सोफ्यावर बसवून घेतलं. पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमानं विचारलं,॓ बरी आहेस ना बेटा?॔ पण राजश्रीच्या या प्रश्नावर चित्रा बांध फुटल्यासारखी गदगदून रडू लागली. राजश्रीने तिला थोडं रडू दिलं. शांत झाल्यावर चित्रा म्हणाली,  ॓दीदी, माझ्या हातून मोठी चूक झालीय. मला क्षमा करा. मी तुमचा माझ्यावरचा विश्वास मोडलाय. काय आणि कसं सांगावं तेच कळत नाहीये….. पण आता मला सगळं सांगायलाच हवं.

तिथे माझा सगळा दिवस कामात जात होता पण रात्री मात्र माझ्या खोलीमध्ये झोपायला गेल्यावर तुमच्या सर्वांच्या आठवणीनं मला फार रडू यायचं. एकटं.. एकटं वाटायचं. तिथे खायला प्यायला कमी नव्हतं पण ज्या उद्देशाने मी इथे आले होते त्या माझ्या शिक्षणाचं काहीच पुढे होत नव्हतं.

सुट्टीच्या दिवशी त्या दोघांबरोबर मला फिरायला मिळायचं. चकचकीत, डोळे दिपवणाऱ्या त्या श्रीमंत जगाचं दर्शनही मोहात पाडणारं होतं. त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा मॉलमध्ये गेले तेव्हा त्या उंच सरकत्या जिन्यांवरून मला सावरण्याच्या निमित्तानं सुरेंद्रने माझा हात दाबून धरला, तेव्हाच त्याचा स्पर्श मला वेगळा वाटला. मग लक्षात यायला लागलं की, सुलेखाताई अंघोळीला गेली असेल तेव्हा स्वयंपाकघरात काहीतरी मागायच्या निमित्ताने येऊन तो मला जाणूनबुजून स्पर्श करायचा. दीदी, खरं सांगते इथे तुमच्याकडे मला कसलीच भीती वाटली नाही. भाईसाहेबांबद्दल तर नेहमी आदरच वाटला. पण तिथे सुरेंद्रचं लागट वागणं जाणवायला लागलं होतं.॔ 

चित्रा पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. चित्राच्या डोळ्यांपुढे तो पहिलाच प्रसंग उभा राहिला…

एकदा सुरेंद्र अचानक ऑफिसमधून लवकर घरी आला. सुलेखाताईला घरी यायला अजून वेळ होता. आपण सोफ्यावर बसून कादंबरी वाचण्यात गढलो होतो. वॉश घेऊन आल्यावर सुरेंद्रनं बॅगेतून एक छान मोठं चॉकलेट काढून आपल्या पुढे धरलं. चॉकलेट घ्यायला हात पुढे केल्यावर तो म्हणाला,  ॓अगं, नको. पुस्तक वाचतेयस ना? ते खराब होईल. मीच देतो तुला… असं म्हणत त्यानं अगदी जवळ बसून आपल्या तोंडात चॉकलेट भरवलं. आपण वाचत असलेल्या कादंबरीत नुकताच अशा प्रकारचा प्रसंग रंगवला होता. त्यानं लावलेल्या भारी सेंटचा मंद सुवास, तोंडात विरघळणाऱं चॉकलेट, त्याची भुरळ घालणारी नजर सारं मोहात पाडणारं होतं. त्याच्या मिठीला आपण केलेला प्रतिकार लटका आहे हेही त्याच्या केव्हाच लक्षात आलं होतं… 

पण हे सगळं दीदीला कोणत्या तोंडानं सांगणार?

हुंदके थांबल्यावर चित्रा दीदीला एवढंच म्हणाली, दिवसेंदिवस दिवस त्याची लगट वाढत चालली होती. आणि मी कबूल करते की माझाही पाय मोहाच्या घसरगुंडीवर पडला होता. मला सावरायला कुणी नव्हतं.

सुरेंद्र– सुलेखा ताईच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. खरेदी करायला आम्ही तिघं एकत्रच गोल्डसुक मार्केटला गेलो होतो. सोन्याचा तो चमचमणारा बाजार पाहून डोळे दिपून जात होते. ताईंची पसंती चालली होती. मीसुद्धा मला आवडलेला एक सोन्याचा नेकलेस पुन्हा पुन्हा गळ्याला लावून बघत होते. मागच्या आरशात पाहिलं तर सुरेंद्र ॓छान दिसतोय ॔ अशी पसंतीची मान डोलावत, मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होता. दोन-चार पगार आपल्याला इथेच द्यायला सांगून तो सेट खरेदी करता आला तर किती छान होईल, या विचाराने झोपेतसुद्धा मला तो हार दिसत होता.॔ 

थोडं थांबून, पाणी पिऊन चित्रा पुढे सांगू लागली,  ॓एखादं सामान आणायचं राहिलं असलं तर मी आमच्या घराजवळ असलेल्या स्टोअरमध्ये जात असे. तिथेच माझी आणि हमीदाची चार-पाच वेळा गाठ पडली होती. ती सुद्धा काही सामान घ्यायला स्टोअर मध्ये यायची. तिच्याशी बोलताना कळलं की तीही हैदराबादहून इथे एका कुटुंबात काम करण्यासाठी आली होती. तिला आठ नऊ भावंडे होती. वडिलांच्या बांगड्या विकण्याच्या व्यवसायात त्यांचं भागत नव्हतं. कुणाच्या तरी ओळखीनं ती दुबईला आली होती. साधारण माझ्याच वयाची होती. इथे तिला घरकाम पुष्कळ होतं. फक्त नियमितपणे तिच्या घरच्यांना तिचा पगार मिळत होता आणि हमीदाला पंधरा-वीस दिवसांनी अम्मीशी फोनवर बोलता येत होतं.

त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं.  ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती.

– क्रमशः भाग दुसरा

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शॉर्टकट… – भाग – १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ शॉर्टकट… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

॓सुनंदाबाई, संध्याकाळी चांगली कोवळी मेथीची जुडी आणा. भाईसाहेब दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहेत. थोडे पराठे बरोबर देता येतील. ॑ नाश्ता करता करता राजश्री सुनंदाबाईंना दिवसभरच्या कामाच्या सूचना देत होती.

रमेश नाश्ता करून कोर्टाच्या कामासाठी बाहेर पडला होता. त्याच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची टॅक्स कन्सल्टेशनची फर्म चांगली नावाजलेली होती. एम कॉम झालेली राजश्री फर्ममध्येच अकाउंटस् चं काम सांभाळायची. आवरायला उशीर झाला की राजश्रीला चित्राची खूप आठवण येई.

  ॓दीदी, ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे. मॅचिंग बांगड्या गळ्यातलं पण ठेवलाय तिथेच आणि टेबलावर गोड ताज्या ताकाचा ग्लास ठेवलाय. आठवणीने प्या बरं का. मागचं सर्व आवरून येतेच मी ऑफिसला.॔ असा प्रेमळ आग्रह करणाऱ्या हुशार, चटपटीत चित्राला दुबईला पाठवून आता वर्ष होऊन गेलं होतं.

  ॓हल्ली ती फोनवर पहिल्यासारखी उत्साहाने बोलत नाही. नुसतं हो… नाही.. बरं.. म्हणंत फोन ठेवून देते. काही बिनसलय का तिचं ते एकदा नीट विचारलं पाहिजे.॔ असा विचार करत राजश्री सँडल्स घालत होती. तेवढ्यात फोन वाजला.

  ॓आता कोण असेल? आधीच उशीर झालाय ॔. असं मनात म्हणंत राजश्रीनं फोन उचलला. फोन तिच्या नेहमीच्या बँकेतल्या मॅनेजरचा होता. राजश्रीला शक्य तितक्या लवकर बँकेत भेटायला बोलावलं होतं.

  ॓संध्याकाळी नक्की येऊन जाते.॔ असं म्हणत राजश्रीनं फोन ठेवून दिला. एवढं अर्जंट काय काम असेल तिला प्रश्नच पडला.

 *****

  ॓तुमच्याकडे कामाला असलेल्या चित्राचा आपण इथे तुमच्या मदतीने एन् आर् आय् अकाउंट उघडला आहे. या नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंटमध्ये दरमहा 22/25 हजार रुपये जमा होतात आणि त्यातले 15/16 हजार रुपये काढले जातात.॔ संध्याकाळी भेटल्यावर बँक मॅनेजरने सांगितलं.

  ॓ हो. मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्राला आम्ही दुबईला माझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवत आहोत. तिचा भाऊ येऊन घरखर्चासाठी थोडे पैसे काढत जाईल. राजश्री म्हणाली.॔

पण गेल्या चार-पाच महिन्यात या अकाउंटमध्ये नेहमीच्या रकमेशिवाय

आणखी जवळजवळ दीड लाख रुपये जमा झाले आहेत. काही फिक्सड् डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर विचारा तिला. ही जमा रक्कम थोडी जास्त वाटली नेहमीपेक्षा म्हणून बोलावलं तुम्हाला. मॅनेजर म्हणाले ॔

  ॓थँक्स! मी कळवते तुम्हाला काय करायचं ते.॔ असं म्हणून राजश्री गडबडीने उठली.

घरी येईपर्यंत उलट सुलट विचारांनी राजश्रीचं डोकं भणभणून गेलं. तोंड धुऊन तिनं कपडे बदलले. सुनंदाबाईने दिलेलं गरम थालीपीठ आणि तिला आवडणारी वेलचीची कॉफी पितानाही तिच्या डोक्यात चित्राच होती. चित्राचा विषय सुनंदाबाईंजवळ… तिच्या आईजवळ… काढावा का हा मनातला विचार तिने बाजूला केला.

आधी रमेशजवळच बोलावं याबद्दल, असं ठरवून ती गप्प राहिली. खाण्यापिण्याची भांडी आवरून सुनंदाबाई बाजारात गेल्या. रमेश यायला अजून तसा वेळ होता. हॉलमध्ये टांगलेल्या वेताच्या झोपाळ्यावर ती विचार करत बसली. तिचं मन पाच सहा वर्ष मागे गेलं.

 *******

राजश्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. कदाचित गर्भाशय काढावही लागणार होतं. ऑपरेशननंतर दोन-तीन महिने राहायला येऊ शकेल असं सासर… माहेरचं कुणीच नव्हतं. त्यामुळे घर सांभाळेल, तिची काळजी घेईल अशा एखाद्या चांगल्या बाईच्या ती शोधात होती. त्याचवेळी तिच्याकडे भांडी घासणाऱ्या बाईंनी तिला चित्राचं नाव सुचवलं होतं. चित्राची आई बाईंच्या लांबच्या नात्यातली होती. अलिबाग जवळच्या एका छोट्या गावात ती मुलगी कुटुंबीयांसह राहत होती. चित्राच्या कामसूपणाची, चांगुलपणाची बाईंनी खात्री दिली आणि मदतीसाठी चित्राला मुंबईला आणायचं ठरलं.

चित्राने थोड्याच दिवसात मुंबईच्या जीवनाशी जुळवून घेतलं. राजश्रीदीदी आणि भाई साहेबांचा विश्वास संपादन केला. ऑपरेशननंतर दीदीची मनापासून काळजी घेतली. तिची औषधं, खाणं.. पिणं सारं सांभाळलं. डायबेटीस असलेल्या भाईसाहेबांचं पथ्याचं खाणं शिकून घेतलं. स्वच्छ, नीटनेटक्या, हसतमुख मितभाषी चित्राला राजश्री आणि भाईसाहेबांनी घरातल्यासारखंच वागवलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि आता राजश्रीच्या ऑपरेशन नंतर ती शक्यताही दुरावली होती.

चित्राच्या बोलण्यातून कळलं होतं की तिच्या वडिलांना मुंबईत चांगली नोकरी होती पण त्यांच्या व्यसनामुळे साऱ्या संसारावर अवकळा आली होती. धाकट्या दोन भावांच्या शिक्षणासाठी चित्रांने स्वतःच शिक्षण आठवीनंतर सोडलं होतं आणि गावातच एक लहानशी नोकरी धरली होती. आईसुद्धा मोलमजुरी करत होती. चित्रा तिला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाला मदत करत होती. तिला घरच्यांची आठवण यायची पण लांब राहून का होईना आपण त्यांना मदत करतोय हे जाणवलं की तिला बरं वाटायचं.

राजश्री आणि भाईसाहेबांनी तर या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलंच होतं.

  ॓चित्रा, तू आता इथेच राहून रात्र शाळेत जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. आपण जमेल तसं तुझ्या भावांना आणि आईलासुद्धा आणू इथे. दीदी आणि भाईसाहेबांच्या या बोलण्याने चित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची रात्र शाळा सुरू झाली. राजश्रीने खटपट करून, डिपॉझिट भरून एक छोटी दीड खोलीची जागा या कुटुंबासाठी मिळवली आणि काही महिन्यातच चित्राची आई आणि भाऊही मुंबईला आले. राजश्री आणि भाईसाहेबांनी  ॓कमवा व शिका॔ असा चांगला गुरुमंत्र या कुटुंबाला दिला होता. कुटुंब खरंच गुणी होतं. जर मोठा दिनेश शाळेत जायच्या आधी जवळपासच्या सोसायटीतल्या चार-सहा जणांच्या गाड्या पुसायच्या तर कधी कुणाला दूध, भाज्या आणून द्यायचा. चित्राच्या आईला सुद्धा चांगली घरकामं मिळाली. धाकटा भाऊ जवळच्या शाळेत जायला लागला. सगळ्यांचं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं होतं.

अशीच एकदा राजश्रीची बालमैत्रीण सुलेखा एका लग्नाच्या निमित्ताने राजश्रीकडे चार-पाच दिवस राहायला आली होती. पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन सुलेखा नवऱ्याबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर आत्ताच मैत्रिणींची भेट होत होती. त्यामुळे गप्पांना, खाण्यापिण्याला, फिरण्याला उधाण आलं होतं. सुलेखाचा नवरा सुरेंद्र दुबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. सुलेखा तिथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती.

इथे आल्यावर, राजश्रीच्या घरी काम करणारी कामसू, विश्वासू, शांत स्वभावाची चित्रा सुलेखाच्या मनात भरली. त्यावेळी नुकतीच बारावी पास झालेल्या चित्रांनं पुढे कुठलं शिक्षण घ्यावं याची चर्चा राजश्रीकडे चालू असतानाच,  ॓चित्रासारखी मुलगी आपल्याला मदतीला मिळाली तर?॔ असा विचार सुलेखाच्या मनात चमकून गेला.

  ॓अगं, चित्राला आमच्याकडे दुबईला पाठवतेस का? तिथे आता मुलींसाठी स्पेशल होम सायन्सचा कोर्स सुरू झालाय. आम्ही चित्राला त्या कोर्सला घालू आणि मला चित्राची घरकामात मदतही होईल. आम्ही दरमहा तिच्या इथल्या अकाउंटमध्ये साधारण 22… 25 हजार रुपये जमा करू. तिचं शिक्षण होईल आणि पैसे पण जमतील.॔ सुलेखाने आपला प्रस्ताव राजेश्रीकडे मांडला.

राजश्री विचारात पडली. चित्राच्या कुटुंबाला पैशाची गरज तर होतीच. दोन्ही भावांचे शिक्षण, चित्राचं लग्न, मुख्य म्हणजे स्वतःची जागा असं सगळंच व्हायचं होतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या कराराचे अकरा महिने कधी संपायचे कळायचंही नाही. मग राजश्रीलाच धावपळ करून, जादा भाडं कबूल करून जागेचं नवीन ॲग्रीमेंट करून घ्यावं लागायचं. सुलेखाच्या या प्रस्तावामुळे या कुटुंबाचा फायदा होईल असंच राजश्रीला वाटलं.

मुलीला एवढ्या लांब, अनोळखी ठिकाणी पाठवायला सुनंदाबाई प्रथम तयार नव्हत्या. मग चित्रानेच आईची समजूत घातली. चित्राला पासपोर्ट मिळाल्यावर सुरेंद्र सुलेखानं दुबईहून आवश्यक ती कागदपत्रं पाठवली. चित्राच्या येण्याचा उद्देश, तिची राहण्या जेवण्याची व्यवस्था, तिचा दरमहाचा पगार अशा बऱ्याच गोष्टींची नोंद तिथल्या सरकारी खात्यात झाल्यावर अखेर एकदाचं परवाना पत्र आणि तिकीट दुबईहून आलं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares