मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कैलास… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ कैलास  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

राघव – पन्नाशी उलटून गेली होती त्याची. मान खाली घालून आजवर नोकरी केली, बाकी कधी काही छानछौकी केली नाही, पण आयुष्यात एकदातरी कैलास–मानसरोवरला जायचंच अशी त्याची तीव्र इच्छा होती. 

… आणि यावर्षी, अचानकपणे, ध्यानीमनी नसताना, ही त्याची इच्छा पूर्ण होण्याची संधी आली होती. पार्ल्याच्या जोशीकाकांच्या ग्रुपतर्फे त्याचा मित्र जाणार होता, पण वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जमणार नव्हतं, त्यानं राघवला विचारलं, आणि, राघव, अर्थात, एका पायावर तयार झाला. पासपोर्ट – व्हिसाचे सोपस्कार पूर्ण झाले आणि त्याने पत्नी मीराला सांगितलं, “मी यावर्षी मानसरोवरला जाणार आहे.”

मीरा काही क्षण शांत राहिली. “एकट्यानं? ”

“यात्रेचा ग्रुप आहे. काळजी करू नकोस.”

मीरा त्याच्याकडे पाहत हसली. “तुम्ही इतक्या दूर चाललात… आणि मी तुमची काळजी करायची नाही? ”

राघव हसला. “अगं, खुद्द महादेव आहेत ना सोबत.”

मीरा काही बोलली नाही. तिने कपाट उघडलं. तिने हळूच एक छोटासा फोटो काढला. त्यात राघव, मीरा, त्यांची मुलगी, जावई आणि छोटासा नातू होता. तिने तो फोटो राघवच्या बॅगेच्या पुढच्या कप्प्यात ठेवला.

राघवने ते पाहिलं.

“हा फोटो कशाला? ”

मीरा काहीच बोलली नाही, फक्त मंद हसली. 

राघव हसला. “तुला माहिती आहे ना? मी परत येणार आहे.”

मीरा त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिली. मग फक्त एवढंच म्हणाली, “कैलासाला जाऊन आल्यावर माणूस बदलतो.”

राघव निघाला. नेपाळमधून कैलासकडे जाणारा प्रवास सुंदर होता. डोंगर… धुकं… बर्फ… आणि त्या भव्य हिमालयाच्या कुशीतून जाणारा, वळणावळणाचा छोटासा रस्ता.

राघव अधूनमधून मोबाईलमध्ये फोटो काढत होता. एकदा त्याने मीराला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. नेटवर्क मिळालं नाही. त्याने मेसेज टाइप केला, “इथले पर्वत खूप सुंदर आहेत. तुला आवडले असते.”

मेसेज गेला नाही.

राघव हसला. “घरी गेल्यावर दाखवतो.”

तेव्हा त्याला ठाऊक नव्हतं की हा त्याचा साधा विचार त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनणार होता.

२६ ऑगस्ट २०२६.

सकाळची वेळ. नाश्ता करून नुकताच बसचा प्रवास सुरू झाला होता त्यांचा. 

… आकाश अचानक काळवंडलं.

पावसाचा जोर वाढला.

गाडीतील लोक अस्वस्थ झाले.

आणि अचानक…

दूरवरून एक भयानक आवाज आला.

गर्जना.

जणू संपूर्ण पर्वत तुटून खाली येत होता.

ड्रायव्हरने गाडी थांबवली.

“बाहेर पडा! जीव वाचवा! पळा! ”

लोकांना काहीच समजत नव्हतं.

पण पुढच्या क्षणी त्यांनी जे पाहिलं…

ते दृश्य ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हते.

वरून पाण्याचा एक महाकाय लोंढा येत होता. बर्फ, दगड, झाडं, माती – त्या लोंढ्याच्या कचाट्यात जे सापडत होतं त्याला फरफटत नेत होता तो. रस्त्यावरची वाहनंही त्या पुरात खेळण्यांसारखी उलटत होती, इमारती कोसळत होत्या.

हे बघितलं, आणि सगळ्यांना परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव झाली. लोक जीवाच्या आकांताने पळू लागले.

राघवही धावत होता.

पण एका क्षणी त्याचा पाय घसरला.

तो खाली पडला. पाठीवरची बॅग दूर फेकली गेली.

आणि त्याच क्षणी पाण्याचा जोरदार प्रवाह आला.

राघवने बॅग पकडण्याचा प्रयत्न केला.. पण ती त्याच्या हातातून निसटली.

आणि त्या बॅगेत होता… मीराने दिलेला तो फोटो.

राघव दूर जाणाऱ्या त्या बॅगकडे पाहत राहिला. “मीरा…”

लोकांनी त्याला ओढून उंच जागेवर नेलं.

रात्र झाली.

वाचलेले लोक एका छोट्या इमारतीत आश्रयाला होते.

.. बाहेर पाऊस.

.. आत भीती.

मोबाईल नेटवर्क नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती. कुणाचा फोन लागत नव्हता. कुणाला आपल्या कुटुंबाची खबर नव्हती.

.. एक आई आपल्या मुलाला छातीशी धरून बसली होती.

.. एक वृद्ध माणूस सतत प्रार्थना करत होता.

आणि राघव…

एका कोपऱ्यात सुन्न बसला होता.

त्याच्या हातात मोबाईल होता.

त्याने पुन्हा नंबर लावला.

मीरा… 

कॉल लागला नाही.

पुन्हा.

काहीच नाही.

त्याने मोबाईल बंद केला. डोळे मिटले.

आणि त्याला आठवलं – मीरा त्याला विमानतळावर निरोप देताना म्हणाली होती, “लवकर या.”

राघवच्या डोळ्यांत पाणी आलं.

त्याने दोन्ही हात जोडले.

“महादेवा…”

काही क्षण तो गप्प राहिला.

मग कुजबुजला,

“नको मला कैलासाचं दर्शन…”

त्याच्या आवाजात हुंदका होता.

“नको मानसरोवराचं…”

त्याने डोळे घट्ट मिटले.

“मला फक्त…”

आवाज तुटला.

“…माझ्या मीराकडे परत जायचं आहे, मला घरी जायचं आहे. इथले फोटो मीराला दाखवायचे आहेत.”

पुढचा दिवस आणखी भयानक होता.

हिमस्खलनाचा धोका होता.

आणखी एक मोठा पूर येण्याची भीती होती.

बचावकार्यात असंख्य अडथळे येत होते.

सगळे जण जणू मृत्यूची वाट पाहत बसून राहिले आहेत असं वाटत होतं.

राघव एका दगडावर बसला होता.

त्याच्या शेजारी एक तरुण नेपाळी मुलगा होता.

तो म्हणाला, “अंकल, घाबरू नका. हेलिकॉप्टर येईल.”

राघव हलकंसं हसला.

“तुला खात्री आहे? ”

मुलगा म्हणाला,

“हो.”

“कशी? ”

मुलगा काही क्षण शांत राहिला.

मग म्हणाला,

“कारण माझी आई म्हणते… देव माणसांना एकटं सोडत नाही.”

राघव त्या मुलाकडे पाहत राहिला.

… आणि त्याला अचानक मीरा आठवली.

ती सुद्धा असंच म्हणायची.

“देवावर विश्वास ठेव.”

काही तासांनी…

दूरवर हेलिकॉप्टरचा आवाज आला.

सगळे बाहेर धावले.

हेलिकॉप्टर वरून गेलं.

थांबलं नाही.

लोकांच्या चेहऱ्यावरची आशा पुन्हा मावळली.

राघव खाली बसला.

त्याने डोळे मिटले.

तेवढ्यात पुन्हा आवाज आला.

धड्… धड्… धड्…

… हेलिकॉप्टर परत येत होतं.

यावेळी ते खाली उतरलं.

बचाव पथक धावत आलं.

एकामागून एक लोकांना बाहेर काढलं जाऊ लागलं.

राघवही उठला.

तेवढ्यात त्यांच्या यात्रा कंपनीतल्या एका तरुण कर्मचाऱ्याने त्याला आवाज दिला.

“साहेब, ये आपका है क्या? “

राघव वळला.

त्या तरुणाच्या हातात एक वस्तू होती.

राघवचे डोळे मोठे झाले.

ती त्याची बॅग होती. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली. मातीने माखलेली… त्याने थरथरत्या हाताने ती बॅग उघडली, मीराने दिलेला फोटो त्यात होता, मातीने माखलेला, कडांनी फाटलेला.

पण…

मीराचा चेहरा अजूनही त्यात स्पष्ट दिसत होता.

राघवने तो फोटो दोन्ही हातांनी धरला.

काही क्षण तो त्याच्याकडे फक्त पाहत राहिला.

मग फोटो छातीशी धरून तो ओक्साबोक्शी रडू लागला.

तो तरुण म्हणाला, “बॅग दगडांमध्ये अडकलेली होती.”

राघव काहीच बोलला नाही, त्यानं आकाशाकडे पाहिलं, हात जोडले.

हेलिकॉप्टर वर उडू लागलं.

खाली दिसणाऱ्या दरीकडे राघव पाहत राहिला.

रस्ते गायब झाले होते.

पूल वाहून गेले होते.

सगळीकडे नुसते चिखलाचे साम्राज्य पसरलं होतं.

नद्या आपला रौद्र चेहरा दाखवत होत्या.

आणि त्या सगळ्याच्या मध्ये…

हिमालय शांत उभा होता.

राघवच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले.

तो फोटो हातात धरून म्हणाला,

“महादेवा… मी तुम्हाला भेटायला आलो होतो.”

त्याने फोटोतला मीराचा चेहरा पाहिला.

“पण तुम्ही मला परत पाठवलंत.”

मुंबईत विमानतळावर मीरा त्याची वाट पाहत होती.

राघव बाहेर आला.

दोघांची नजरानजर झाली.

मीरा काही क्षण तिथेच उभी राहिली, स्तब्ध, थबकलेली.

… मग ती धावत त्याच्याकडे गेली.

राघवने तिला घट्ट मिठी मारली.

इतकी घट्ट…

जणू पुन्हा कधीही सोडणार नव्हता.

.. मीरा रडत होती.

.. राघवही रडत होता.

काही मिनिटं दोघंही एक शब्दही बोलले नाहीत.

शेवटी मीरा कुजबुजली,

“कैलासाचं दर्शन झालं? ”

राघवने तिच्या डोक्यावर हात ठेवला.

“नाही.”

“मानसरोवर? ”

“नाही.”

मीरा त्याच्याकडे पाहत राहिली.

राघवने खिशातून तो फाटलेला, चिखलाने माखलेला फोटो काढला.

तो तिच्या हातात ठेवला.

“पण…”

त्याचा आवाज भरून आला.

“मला माझं मानसरोवर सापडलं.”

मीरा काही न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली.

राघव म्हणाला,

“मी देवाला भेटायला गेलो होतो.”

तो थांबला.

“पण मृत्यूच्या त्या क्षणी मला देव नको होता.”

.. त्याने तिचा हात घट्ट धरला.

“मला फक्त तू हवी होतीस, तुम्ही सगळे हवे होतात.”

मीराच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

राघव हळूच म्हणाला,

“त्या दिवशी समजलं… देव कुठे असतो.”

“कुठे? ”

“आपल्या घरी, आपल्या माणसांत. जिथे कोणीतरी आपली वाट पाहत असतं.”

त्या रात्री राघवने तो फाटलेला फोटो देवघरात ठेवला.

मीराने त्याच्या शेजारी एक छोटासा दिवा लावला.

दोघे काही वेळ शांत बसून राहिले.

राघवने हात जोडले. त्याच्या डोळ्यांसमोर कैलास नव्हता… मानसरोवर नव्हतं.

होता…

एक छोटासा घराचा दरवाजा.

आणि त्या दारात उभी असलेली मीरा.

त्याने डोळे मिटले. आणि मनात म्हटलं—

“महादेवा, आयुष्यभर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा होती…

पण आता एकच प्रार्थना आहे—

माझ्या माणसांपासून मला कधीच दूर करू नका.”

कारण कधी कधी…

तीर्थयात्रा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात नाही.

ती आपल्याला आपल्याच आयुष्याची किंमत समजावून सांगते.

कधी कधी…

हिमालय आपल्याला घाबरवतो, पूर आपल्याला वाहून नेतो, मृत्यू आपल्याला कवटाळतो…

आणि तरीही…

एखादा अनोळखी हात आपल्याला वाचवतो.

एखादा छोटासा फोटो पुरातून परत येतो.

आणि एखादी व्यक्ती विमानतळावर उभी राहून म्हणते—

“तुम्ही आलात… आता मला काही नको.”

तेव्हा जाणवतं…

कैलास कितीही उंच असो, मानसरोवर कितीही पवित्र असो…

आपल्या माणसाच्या मिठीत परत येण्यापेक्षा मोठी तीर्थयात्रा या जगात दुसरी नाही.

आणि कदाचित…

देवाकडे जाण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे—

आपल्या माणसांकडे परत येणं.

(नेपाळ – चीनमध्ये अडकलेले सर्व श्रद्धाळू सुखरूप घरी पोहोचोत, ही प्रार्थना.)

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांची खरी किंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

🌸 जीवनरंग🌸

☆ नात्यांची खरी किंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

ज्या बहिणीची राखी सर्वात स्वस्त होती… तिच्यासाठी भावाने घेतलेला निर्णय सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता!

रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीने भावाला फक्त वीस रुपयांची राखी पाठवली होती…

पण त्या राखीच्या मागे दडलेली तिची वेदना कळताच भावाने जे केलं, ते पाहून संपूर्ण कुटुंबाला नात्यांची खरी किंमत समजली. 

साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावातल्या जुन्या घराच्या ओसरीवर मंदा शांतपणे बसली होती.

अंगावरची साडी जुनी आणि अनेक ठिकाणी विरलेली होती. चेहऱ्यावर काळजीच्या रेषा होत्या आणि डोळ्यांत मात्र एकच आशा होती…

यंदा तरी भाऊ मला विसरणार नाही ना?

रक्षाबंधनाला फक्त दोन दिवस बाकी होते.

मंदाने घरातल्या जुन्या पेटीतून तीन रेशमी राख्या काढल्या. त्यासोबत थोडं कुंकू, अक्षता आणि वीस रुपयांची एक जुनी नोट ठेवली.

तिने ते सगळं एका साध्या पांढऱ्या लिफाफ्यात ठेवलं.

लिफाफा बंद करताना तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.

“माझ्या भावाच्या मनगटावर माझी राखी पोहोचली, तरी पुरे…” 

तिला ठाऊक होतं की भावाच्या घरात आता पैशाची कमतरता नव्हती.

पण तिच्याकडे भावाला देण्यासाठी महागडं घड्याळ नव्हतं…

महागडी मिठाई नव्हती…

होता तो फक्त आपुलकीने बांधलेला एक रेशमी धागा आणि वीस रुपयांचा आशीर्वाद. 

तिकडे पुण्यात मंदाचा मोठा भाऊ माधव आपल्या प्रशस्त घरात रक्षाबंधनाची तयारी करत होता.

टेबलावर मोठमोठे पार्सल ठेवले होते.

नागपूरला राहणारी बहिण वंदनाने महागडी मिठाई आणि सुंदर घड्याळ पाठवलं होतं.

कोल्हापूरला राहणाऱ्या सविताने सुंदर साडी आणि महागडी राखी पाठवली होती.

तेवढ्यात माधवची पत्नी स्नेहा स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली.

ती सहज म्हणाली,

“माधव, बाकी सगळ्या बहिणींच्या किती छान भेटवस्तू आल्या आहेत. पण मंदाताईंचा नेहमीसारखा साधा लिफाफा आलाय. त्यात फक्त राखी आणि वीस रुपये आहेत.”

माधवने काहीही उत्तर दिलं नाही.

त्याने तो लिफाफा अलगद हातात घेतला.

लिफाफ्यावर बहिणीची ओळखीची अक्षरं पाहताच त्याचे डोळे पाणावले. 

कारण त्याला माहीत होतं…

त्या वीस रुपयांची किंमत बाकीच्या सगळ्या भेटवस्तूंपेक्षा कितीतरी मोठी होती.

मंदाचं लग्न दहा वर्षांपूर्वी सांगली जवळच्या एका कुटुंबात झालं होतं.

सुरुवातीला संसार ठीक होता.

पण काही वर्षांतच तिच्या सासऱ्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं.

घरची परिस्थिती ढासळली.

नंतर घरातील मालमत्तेवरून भावांमध्ये भांडणं झाली आणि मंदाच्या नवऱ्याला घर सोडावं लागलं.

या सगळ्या धक्क्यांमुळे त्यांची मानसिक अवस्था बिघडली.

ते एका छोट्या किराणा दुकानात मिळेल ते काम करू लागले.

मंदाने मात्र परिस्थितीसमोर हार मानली नाही.

तिने मुलगा ओंकारला शिकवलं.

स्वतः घरकामं केली.

कधी शेतात मजुरी केली, कधी दुसऱ्यांच्या घरची भांडी घासली…

पण माहेरच्यांना आपली परिस्थिती सांगितली नाही.

कारण तिला भीती होती—

“माझ्यामुळे माझ्या भावावर ओझं पडू नये.” 

माधवला हे सगळं माहीत होतं.

पण गेल्या काही वर्षांत कामाच्या व्यापात त्याच्याकडूनही बहिणीकडे पुरेसं लक्ष गेलं नव्हतं.

आज त्या वीस रुपयांच्या नोटेने त्याला स्वतःचीच चूक जाणवून दिली.

त्याने स्नेहाकडे पाहिलं.

“स्नेहा… यावेळी रक्षाबंधन आपण इथे साजरं करणार नाही.”

“मग? ”

माधव म्हणाला,

“यावेळी आपण सगळे मंदाकडे जाणार. आणि तिला न सांगता जाणार.”

स्नेहा काही क्षण शांत राहिली.

“पण अचानक आपण गेलो तर ती आपली व्यवस्था करण्याच्या चिंतेत पडेल…”

माधव हळूच म्हणाला,

“आपल्यासाठी ती व्यवस्था करणार नाही… आपण तिच्यासाठी काहीतरी करणार आहोत.”

रक्षाबंधनाची सकाळ…

माधव, स्नेहा आणि त्यांचा मुलगा अथर्व साताऱ्यातील मंदाच्या गावात पोहोचले.

घरासमोर उभे राहिल्यावर माधव काही क्षण स्तब्ध झाला.

मंदा अंगणात बसून कपडे धुत होती.

अंगावर जुनी साडी होती.

केस विस्कटलेले होते.

चेहरा थकलेला होता.

भावाला पाहताच तिच्या हातातून कपडा खाली पडला.

“दादा… तुम्ही? ”

तिच्या आवाजात आनंदापेक्षा आश्चर्य जास्त होतं.

जणू तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा भाऊ खरंच तिच्या दारात उभा आहे.

माधवने पुढे होऊन तिला मिठी मारली.

“हो गं वेड्या… यावेळी मला तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची होती.”

मंदाच्या डोळ्यांत पाणी आलं.

“पण दादा, आधी सांगितलं असतंस तर घर नीट केलं असतं…”

माधव तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता म्हणाला,

“मला तुझं घर बघायला नाही… माझी बहीण बघायला यायचं होतं.” 

स्नेहाने मंदाला बाजारात नेलं.

तिच्यासाठी नवीन साडी घेतली.

ओंकारसाठी नवीन कपडे घेतले.

घरासाठी महिनाभराचं किराणा, औषधं, चादरी, पडदे आणि आवश्यक सामान घेतलं.

मंदा वारंवार म्हणत होती,

“वहिनी, एवढं कशाला? ”

स्नेहा हसून म्हणाली,

“गप्प बस. आज तुझं काही ऐकणार नाही.”

कित्येक वर्षांनी त्या घरात पुन्हा चैतन्य आलं होतं. 

मंदाच्या डोळ्यांत आनंद होता…

पण माधवच्या लक्षात एक गोष्ट आली.

मंदा अधूनमधून छातीकडे हात नेत होती आणि थोडा वेळ शांत बसत होती.

“काय झालं गं? ”

“काही नाही दादा… थोडा थकवा आहे.”

ती हसली.

माधवने जास्त विचार केला नाही.

संध्याकाळ झाली.

मंदाने राखीची थाळी सजवली.

तिने माधवच्या कपाळावर कुंकू लावलं.

राखी हातात घेतली…

तेवढ्यात माधव म्हणाला,

“थांब जरा…”

मंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

“का? ”

माधव हसला.

“तुझ्या दोन्ही बहिणी अजून आलेल्या नाहीत.”

मंदाला काहीच कळेना.

तेवढ्यात बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. 

दार उघडलं…

आणि समोर वंदना आणि सविता आपल्या कुटुंबासह उभ्या होत्या.

मंदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 

तिने धावत जाऊन दोन्ही बहिणींना मिठी मारली.

काही दिवसांपूर्वी माधवने बहिणींना म्हटलं होतं,

“आपण दरवर्षी फिरायला जातो. यावेळी कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊया.”

तेव्हा तोच हसून म्हणाला होता,

“यावेळी आपली चारधाम यात्रा म्हणजे आपल्या मंदाचं घर.”

दोन्ही बहिणींनी त्याच क्षणी होकार दिला.

त्यांनी ठरवलं होतं—

मंदाला पैशांची मदत करायचीच, पण त्याहून आधी तिला हे जाणवून द्यायचं की ती एकटी नाही. 

त्या रात्री सगळे जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले.

मंदा फारसं बोलत नव्हती.

ती फक्त सगळ्यांकडे पाहत होती.

कधी भावाकडे…

कधी बहिणींकडे…

कधी आपल्या मुलाकडे…

आणि पुन्हा तिच्या डोळ्यांत पाणी येत होतं. 

पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं.

ते अश्रू होते—“माझी माणसं अजून माझीच आहेत” या समाधानाचे. 

रात्री सगळे घराच्या अंगणात गाद्या टाकून झोपले.

जुन्या आठवणी निघाल्या.

सगळे हसत होते.

मंदा मात्र शांतपणे माधवच्या खांद्यावर डोकं ठेवून पडली होती.

“दादा…”

“काय गं? ”

“आज खूप वर्षांनी मला माझं माहेर मिळाल्यासारखं वाटतंय.”

माधवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“माहेर कधी संपत नसतं गं… फक्त आपण एकमेकांपासून दूर जातो.” 

मंदाने डोळे मिटले.

तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

रात्री बराच वेळ गप्पा सुरू होत्या.

अचानक माधवला जाणवलं की मंदाचा हात खूप थंड झाला आहे.

“मंदा…? ”

त्याने तिला हलवलं.

“मंदा, उठ गं…”

काहीच प्रतिसाद नव्हता.

सगळे घाबरून उठले.

दिवा लावला.

पण…

मंदाचे डोळे कायमचे मिटले होते. 

तिच्या चेहऱ्यावर मात्र एक शांत, समाधानाचं हास्य होतं.

सगळ्यांच्या लक्षात आलं की ती काही महिन्यांपासून आजारी होती.

पण तिने कुणालाही सांगितलं नव्हतं.

कदाचित तिला औषधांपेक्षा एका गोष्टीची जास्त गरज होती…

आपल्या माणसांची.

आणि कदाचित म्हणूनच ती त्या दिवसापर्यंत थांबली होती.

ज्या दिवशी तिची राखी भावाच्या मनगटावर बांधली जाणार होती…

ज्या दिवशी तिच्या अंगणात पुन्हा बहिणींचं हसू येणार होतं…

ज्या दिवशी तिला पुन्हा एकदा “माझं माहेर माझ्यासोबत आहे” असं वाटणार होतं. 

 

मंदा या जगातून निघून गेली…

पण यावेळी ती एकटी गेली नाही.

तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या आजूबाजूला तिची माणसं होती.

तिच्या डोक्यावर भावाचा हात होता.

आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. 

कधी कधी महागड्या भेटवस्तूंपेक्षा एखाद्या माणसाची वेळ, त्याचा हात आणि “मी आहे ना” हे चार शब्द आयुष्यभर लक्षात राहतात.

म्हणूनच…

नाती फक्त सणाच्या दिवशी आठवू नका.

कदाचित कुणीतरी तुमच्या एका भेटीची वाट पाहत असेल… आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. 

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाणीव… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(“नाही गं बाई! मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही.तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा.तुमच्या घरात भांडणं लावायची माझी अजिबात इच्छा नाही “

“बरं “) 

इथून पुढे – –

एक महिन्याने विनायक घरी आला तर माधवी त्याला उत्साहाने म्हणाली

“अहो आनंदाची बातमी आहे.नयनाला नोकरी लागली “

” अरे वा! कोणत्या कंपनीत आणि किती पॅकेज आहे? “

कंपनीचं नाव सांगून माधवी म्हणाली

” सध्या सहा लाखाचं पॅकेज आहे आणि पुढे वाढेल असं ती म्हणत होती “

” वा छानच! पण आता कशी लागली नोकरी? काही ओळखबिळख होती का? “

” नाही हो.कसली ओळख आणि कसलं काय! इंटरव्ह्यूच्या अगोदर सहासात दिवसापासून ती अभ्यास करत होती.जावईबापूंनी तिच्या मागे लागून तिची छान तयारी करुन घेतली होती म्हणे “

“आपण हेच तर सांगत होतो तिला की इंटरव्ह्यूला जातांना थोडी तरी तयारी करुन जा.पण आपलं तिनं कधी ऐकलं नाही “

” जाऊ द्या.आता सासरी तिला अभिमानाने रहाता येईल.पैशासाठी कुणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही “

“ते ठिक आहे माधवी पण आपण दिलेल्या शिक्षणाचा तिनं आपल्याला नाही सासरच्यांना फायदा करुन दिला याची मला खंत वाटते “

” तेही खरंच पण तिनं जी थोडीफार नोकरी केली तेव्हाही आपण तिचा पगार कधी मागितला नाही. आपल्याला कधी तशी गरजच भासली नाही “

“तिच्या सासरच्यांनाही कुठे तिच्या पैशाची गरज आहे? नवऱ्याला चांगला पगार आहे शिवाय सासूसासऱ्यांनाही चांगलं पेंशन आहे.जाऊ दे.जे आहे त्यात आपण आनंद मानायचा.ती खुश, तिच्या सासरचे खुश.अजून आपल्याला काय पाहिजे? “

” खरंय “

एक महिन्यानंतर एक दिवस अचानक विनायकच्या मोबाईलवर खात्यात वीस हजार जमा झाल्याचा मेसेज आला.मेसेजवर नयनाचा नंबर पाहून विनायक चांगलाच चक्रावला.त्यानं लगेच तिला फोन लावला.

“बेटा हे कसले पैसे तू मला पाठवले आहेत? “

“बाबा मी आता मी मिटिंगला चाललेय.त्यामुळे आता बोलता येणार नाही. पण मी तुम्हांला सविस्तर मेसेज व्हाॅटस्अपवर पाठवलाय.तो वाचल्यानंतर कदाचित तुम्हांला बोलायची गरज भासणार नाही. वाचून घ्या.ठेवू मी फोन? ” आणि फोन कट झाला.

विनायकनं उत्सुकतेने व्हाॅटस्अप उघडलं.तिथे खरोखरच नयनाचा भला मोठा मेसेज होता.

“प्रिय आदरणीय बाबा,

मी तुम्हांला पैसे पाठवलेत याचं तुम्हांला आश्चर्य वाटलं असेल.तीनचार दिवसांपूर्वीच माझा पहिला पगार झाला.कापूनकुपून चाळीस हजार हातात पडला. बऱ्याच वर्षांनी इतके स्वकमाईचे पैसे हातात आल्यावर खुप आनंद झाला.बाबा मी इथे नोकरीत लागल्यावर एक अशी घटना घडली की जिच्यामुळे मी आरपार बदलून गेले आहे.त्या घटनेमुळे लग्नापूर्वी मी माहेरी असतांना तुम्हांला खरंच खुप त्रास दिला याची मला जाणीव आणि पश्चाताप होऊ लागलाय.झालं असं की माझी काॅलेजची एक पुजा परदेशी नावाची मैत्रीण मला इथे कंपनीत भेटली.हो ही तीच पुजा जिचे वडील सायकलवर भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे.खुप गरीब मुलगी पण अतिशय हुशार. ती इथे गेल्या तीन वर्षांपासून काम करतेय आणि सध्या तिला अठरा लाखाचं पॅकेज आहे.ती मला सांगत होती की माझ्यासोबत इंजीनियरींग सुटल्यावर ती एकही दिवस रिकामी बसली नाही. इंजीनियरींग झाल्यावर तिनं लगेच शाळेतल्या मुलांच्या ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली.एका महिन्यातच तिला एका छोट्या एजन्सीजमध्ये जाॅब लागला.खरं तर त्या जाॅबचा इंजिनिअरिंगशी काहिही संबंध नव्हता.पण घरची परिस्थिती वाईट म्हणून कशाही मार्गाने आलेले पैसे तिला चालणार होते.एक वर्षाने तिला पुण्यातल्या एका कंपनीत जाॅब लागला.पॅकेज कमीच होतं पण त्या अनुभवावर तिला पुण्यातल्या पुण्यात तीनचार ठिकाणी जाॅब बदलता आले.दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं.लग्नाआधी तिनं नवऱ्याला अट टाकली की ‘ आईवडिलांनी पोटाला चिमटे घेऊन दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर मला नोकरी मिळालीये.माझ्या पगारावर खरा हक्क त्यांचा आहे.आज ते दोघंही थकलेत.त्यांच्याकडून आता भाजीविक्रीचा व्यवसाय पुर्वीसारखा होत नाही. माझ्या भावाचं शिक्षण सुरु आहे.तर जोपर्यंत माझा भाऊ शिकून कमवायला लागत नाही तोपर्यंत मी माझ्या पगारातला अर्धा पगार माझ्या आईवडिलांना पाठवणार ‘ तिचा नवरा आणि सासूसासरेही समजदार निघाले.त्यांनी कोणतीही आडकाठी घेतली नाही. मागच्याच वर्षी तिला इथे आमच्या कंपनीत जाॅब मिळाला.आणि अजूनही ती आईवडिलांना अर्धा पगार पाठवते.तिची कहाणी ऐकून मी खुप भारावून गेले.माझ्या वागण्याची मला लाज वाटू लागली.तुम्ही म्हणायचा की ‘अगं बेटा आम्हांला तुझ्या पैशांची गरज नाहिये.पण तू कुठेतरी, कशाततरी गुंतलेली आहे याचंच आम्हांला समाधान हवंय ‘तुमचंही बरोबरच होतं, तुमच्या सगळ्या मित्रांची माझ्या बरोबरची मुलं नोकरीला लागली होती किंवा काही व्यवसाय करत होती.मीच एकटी रिकामी बसले होते.मित्र, नातेवाईक तुम्हांला माझ्याबद्दल विचारत असतील तेव्हा तुमची परिस्थिती किती ऑकवर्ड होत असेल या कल्पनेनेच मला कसंतरी होतंय.आपल्या सर्व गरजा, इच्छा आईवडिलांनी पुर्ण कराव्यात अशी मुलांची अपेक्षा असते तशीच मुलांनी शिकून कुठंतरी कामधंद्याला लागावं अशी आईवडिलांचीही अपेक्षा असते ती मी पुर्ण करु शकले नाही याची रुखरुख मला वाटू लागलीये.मी खरंच बाबा तुम्हां दोघांना खुप त्रास दिला. गेलेल्या काळाची भरपाई तर मी करु शकणार नाही पण तुम्ही माझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला त्याची भरपाई तर नक्कीच करु शकते.मी ठरवलंय की कमीतकमी पाच वर्ष तरी अर्धा पगार तुम्हांला पाठवायचा.मला कल्पना आहे की तुम्हांला ते आवडणार नाही.”तुला शिकवणं माझं कर्तव्यच होतं “असं तुम्ही म्हणाल.तुमचं कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडलं बाबा.आता माझं कर्तव्य मला पार पाडू द्या.प्लीज नाही म्हणू नका आणि मी पाठवलेला अर्धा पगार मला परत पाठवू नका.मला ही सुद्धा कल्पना आहे की माझ्या पैशांची तुम्हांला काहिच गरज नाहीये आणि मुलीकडून पैसे घेणं तुम्हांला आवडणारही नाही.पण असं समजा की मी माझ्यावरचं कर्ज फेडतेय.या पैशांचा उपयोग सहलींसाठी करा, समाजसेवेसाठी करा किंवा कशासाठीही करा मी तुम्हांला एका शब्दानेही विचारणार नाही. पण प्लीज नाही म्हणू नका.तुम्ही नाही म्हंटलात तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर प्रेमच नाहिये “

तो मेसेज वाचून विनायकला गहिवरून आलं.उशीरा का होईना आपल्या मुलीला जाणीव झाली याचं त्याला समाधान वाटलं.

घरी येऊन त्यानं नयनाचा मेसेज माधवीला वाचून दाखवला.तो वाचून माधवी म्हणाली

” हो.आज सकाळीच मला तिचा फोन आला होता.खुप इमोशनल झाली होती.मला म्हणत होती की बाबांना सांग पाठवलेले पैसे परत नका करु म्हणून “

“पण तिच्या नवऱ्याला आणि सासूसासऱ्यांना आवडेल का असा तिनं अर्धा पगार पाठवला तर? “

” हो तिचा नवरा आणि सासू दोघंही माझ्याशी बोलले.त्यांना उलट तिचा हा निर्णय खुप आवडलाय “

” वा मग तर काही प्राॅब्लेमच नाही.माझ्या डोक्यात एक कल्पना आलीये.अशीही आपल्याला तिच्या पैशांची गरज नाहीये.तर आपण आता असं करु तिनं पाठवलेल्या पैशात आपले थोडे पैसे टाकून गरीब, पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलींसाठी नयनाच्याच नावाची एक स्काॅलरशिप सुरु करुया.म्हणजे तिचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल “

” वा खुपच छान आयडिया आहे.तिला कळवून टाका तसं.तिलाही खुप आनंद होईल “

” नको.तिला जरी आनंद झाला तरी तिच्या सासरच्यांना ते आवडेल की नाही ते सांगता येत नाही.आता नवीनच तिचं लग्न झालंय.आतापासून तिच्या संसारात गैरसमज नकोत.योग्य वेळ आली की आपण ते उघड करु “

“चालेल “

विनायकनं मोबाईल उचलला आणि तो नयनासाठी मेसेज टाईप करु लागला.

“बेटा उशीरा का होईना तुला जाणीव झाली.याचा आम्हां दोघांनाही खुप आनंद होतोय.

तुझा निर्णय आवडला.विशेष म्हणजे तुझ्या निर्णयाला सासूसासरे आणि जावईबापूंचा पाठींबा आहे याचा जास्तच आनंद होतोय.माणसं चांगली आहेत.पुढेही त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नकोस.तुझ्या आग्रहास्तव तू पाठवलेले पैसे ठेवून घेत आहोत.ते पैसे चांगल्या कारणासाठीच वापरले जातील हा माझा शब्द आहे.तू आमच्या भावना जाणून घेतल्यास त्याबद्दल आम्हांला तुझा अभिमान वाटतो.आईवडिलांना दुसरं तरी काय हवं असतं? त्यांना मुलांचा पैसा नको असतो मात्र मुलांनी काहितरी अभिमानास्पद कार्य करावं, चारचौघात मुलांविषयी बोलतांना मान ताठ व्हावी असं मुलांचं कर्तृत्व असावं एवढीच त्यांची अपेक्षा असते.आज ती अपेक्षा पुर्ण केलीस याचा आनंद होतोय “

थोड्या वेळाने तिचा मेसेज आला

“आय लव्ह यू बाबा “

तो मेसेज पाहून विनायकचे डोळे अश्रूंनी भरुन आले.

समाप्त —  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जाणीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“मला कुणी समजूनच घेत नाही” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत” रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली.) 

इथून पुढे – –  

“अशीच करते ही आजकाल. थोडंसं काही बोललं की लगेच रडायला लागते. तिच्याशी कसं वागावं तेच कळेनासं झालंय ” माधवी हताश होऊन म्हणाली.

” साहजिकच आहे माधवी. सध्या तिला डिप्रेशन आलंय. तिच्या बहुतेक मैत्रिणी नोकरीला लागल्यात. ज्यांना लागल्या नाहीत त्यांची लग्नं होऊन गेलीत. ही एकटीच अशी घरात रिकामी बसलीये. जिच्याजवळ भावना मोकळ्या करता येऊ शकतील अशी कुणी व्यक्तीच सध्या उरलेली नाहिये. साहजिकच तिला डिप्रेशन येणार. एकट्या मुलांचा हाच प्राॅब्लेम असतो. ती लवकर डिप्रेशनमध्ये जातात. याकरिता कमीतकमी दोन मुलं तरी हवीत “

” हो. नाही झालं आपल्याला दुसरं मुल. काय करणार. पण ही ही गोष्ट खरी की तिच्या डिप्रेशनला तीच स्वतः जबाबदार आहे. तिच्या अपेक्षा तर खुप आहेत पण तिला स्वतःला काहिच करायला नको असतं “

” हो. तेही खरंच. पण ते ती ॲक्सेप्ट करत नाहीये. याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तिचं लवकरात लवकर लग्न लावून देणं “

” ठिक आहे. सुरुवात केलीच आहे आपण स्थळं बघायला”

दोनच दिवसांनी रोजचा पेपर वाचतांना एल. आय. सी. च्या व्हेकंसीजची जाहिरात विनायकच्या पहाण्यात आली. त्यानं नयनाला हाक मारुन बोलावलं

” तू आजचा पेपर वाचलास? “त्यानं विचारलं

” नाही. मी पेपर वाचत नाही “

” का? का पेपर वाचत नाहीस? कमीतकमी नोकरीच्या जाहिरातीसाठी तर वाचत जा “

” अहो बाबा इतके जाॅब पोर्टल आहेत. त्याच्यावर हजारोंनी जाहिराती येत असतात. त्याच्यासाठी पेपर वाचायची काय गरज आहे? “

” मग एल. आय. सी. ची जाहिरात वाचलीच असशील तू?  “

” वाचली असेल. शक्यता आहे. पण त्यांनी कंप्युटर इंजीनियर कुठे मागितलेत? ” जाहिरात बघत ती म्हणाली

” पण त्यांना कोणतेही ग्रॅज्युएटस् चालणार आहेत “

” बाबा मी कारकून बनून काय करु? मागेही तुम्ही कुठल्यातरी बँकेची जाहिरात दाखवली होती. मला अशा जाॅबमध्ये इंटरेस्ट नाहिये बाबा. मला माझ्याच फिल्डमधला जाॅब हवाय ” ती वैतागून म्हणाली.

” बेटा नोकरीच करायची म्हंटलं तर कुठलीही चालू शकते. फिल्ड वेगळं असलं तरी शिकतो माणूस. आणि सरकारी नोकरी केव्हाही चांगली. पगारही चांगला असतो. जाॅब सिक्युरिटी असते आणि लग्न झाल्यावरही तू तिथे बदली करुन जाऊ शकतेस “

” हो पण जाॅब सॅटिसफॅक्शनच काय? ते मला या सरकारी नोकरीत मिळणार थोडीच आहे. आणि मला त्या सरकारी नोकऱ्या अजिबात आवडत नाहीत. राहू द्या. मी पुण्यातल्या एका कंपनीत अप्लाय केलाय. पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू आहे “

विनायकला चुप बसण्याव्यतिरिक्त पर्यायच उरला नाही. तो माघार घेत म्हणाला

“ठिक आहे. मात्र या वेळी तरी तुझं सिलेक्शन व्हायला पाहिजे “

“मी प्रयत्न तर करणारच आहे ” ती म्हणाली आणि रुममध्ये निघून गेली. ती गेल्यावर माधवी विनायकला म्हणाली

“तुम्ही नोकरीसाठी तिच्या इतकं मागे लागता पण नोकरीला लागल्यावर ती कशी वागते ते माहित आहे ना? घरातल्या एकाही कामाला ती हात लावत नाही वरुन तिच्याच तैनातीत मला रहावं लागतं. असा रुबाब दाखवते की जणू घरात कमावणारी ती एकटीच आहे आणि आपण तिच्याच कमाईवर अवलंबून आहोत “

” माहितेय मला. पण अशी रिकामी बसलेलीही मला सहन होत नाही. पण तू काळजी करु नकोस. तिला नोकरी लागणं कठीणच दिसतंय कारण इंटरव्ह्यूला जातांना ती कधी तयारीच करुन जात नाही “

दुसऱ्या आठवड्यात नयना पुण्याला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली तेव्हा तिचा चेहरा पडलेला होता. संध्याकाळी विनायकनं घरी आल्यावर तिला विचारलं.

“काय झालं? कसा झाला इंटरव्ह्यू? “

” चांगला झाला पण माझं काही सिलेक्शन झालं नाही “

“का? “

” आजकाल वशिला लागतो बाबा सगळ्या ठिकाणी. आणि आपण तिथेच तर कमी पडतो. साक्षी जाॅबला लागली ती तिच्या मामाच्या ओळखीमुळे. समीर टिसीएस मध्ये त्याच्या बाबांच्या ओळखीमुळे लागला. नेहा पण तिच्या बाबांच्याच वशिल्यामुळे आयबीएम मध्ये लागलीये”

” याचा अर्थ तू मलाच ब्लेम करतेय. माझ्या जिथे ओळखी आहेत त्या एल. आय. सी. मध्ये आणि बँकेमध्ये तर तू नोकरी करायला तयार झाली नाहीस. सगळ्याच ठिकाणी माझी ओळख कशी असणार? आणि फक्त ओळखीमुळे नोकऱ्या लागत नाहीत. इंटरव्ह्यूमध्ये आपली हुशारीही दाखवावी लागते. मी पाहिलंय की इंटरव्ह्यूला जातांना तू कधीच तयारी करुन जात नाहिस. आज पाच वर्षं झाली तुला इंजीनियरींग सोडून. काय शिकलीस तेसुद्धा तुला आठवत नसेल तर इंटरव्ह्यूमध्ये तू काय बोंब पाडणार आहेस? तू पुण्याला गेलीस खरी पण काय होणार आहे हे आम्हांला अगोदरच माहित होतं “

“तुमचीच नाट लागली माझ्या इंटरव्ह्यूला ” ती रडत रडत म्हणाली

“वा रे वा! तू स्वतः तयारी करुन जायचं नाही. इंटरव्ह्यूत चांगली उत्तरं द्यायची नाही आणि सिलेक्शन झालं नाही तर आईबापालाच दोष द्यायचा. ही कोणती पद्धत? आम्ही काय वैरी आहोत का तुझे? ” माधवी चिडून म्हणाली

” जाऊ द्या मला काही बोलायचंच नाही या विषयावर “ती उठली आणि रडतरडत आपल्या रुममध्ये निघून गेली.

तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत माधवी म्हणाली

“बघा. अशी करते ही. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांची मुलं काय ओळखीने लागतात का नोकरीला? “

” खरंय माधवी तुझं. गरीब आणि अशिक्षित आईवडिलांच्या मुलांमध्ये परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि कसंही करुन यश मिळवण्याची जिद्द असते. त्यांना आपल्यालाच प्रयत्न करुन पुढे जायचं आहे याची जाणीव असते. कितीतरी यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आईवडील अशिक्षित आणि गरीबच होते. कोणत्याही सुखसुविधा मुलांना ते देऊ शकले नाहीत तरीही मुलांनी यशाचं शिखर गाठलं. आणि आपली मुलं पहा. आपलंही चुकलंच. आपण नको तितके तिचे लाड केले. ती म्हणेल ते आपण तिला देत आलो. त्यामुळे तिला कधी गरिबीची जाणीवच झाली नाही. आईवडिलांनी आपल्याला शिकवलंय तर आपण स्वतःहून धडपड करुन नोकरी मिळवली पाहिजे, त्यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पुर्ण केल्या पाहिजेत असं तिला कधी वाटलंच नाही “

“खरंय तुमचं पण आपलंही काही चुकलं असं मला वाटत नाही. आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या एकूलत्या एक मुलीला मिळाव्या असं आपल्यालाही वाटणं साहजिकच होतं. आता तिलाच या गोष्टींची जाणीव नाही तर आपणही काय करणार?

त्यात एवढंच सुख म्हणावं की तिनं प्रेमाबिमाच्या काही भानगडी नाही केल्या. नाहीतर आपल्या डोक्याला अजून ताप झाला असता “

“खरंच. ही देवाचीच कृपा समजायची कारण कितीही चांगले संस्कार केले तरी या मुली कधी भरकटतील सांगता येत नाही. पहातेय ना कसं मुलींना फसवून मग त्यांना मारुन टाकलं जातंय ते “

माधवीच्या अंगावर शहारे आले. ती म्हणाली

“असं काही घडण्याच्या आतच नयनाचं लग्न उरकून टाकलं पाहिजे “

 

एक महिना असाच गेला. त्यात नयना दोन ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आली पण दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली नाही. या दरम्यान बंगलोरचं एक स्थळ चालून आलं. मुलगा एकुलता एक होता, देखणा होता. बारा लाखाचं पॅकेज होतं. आणि सहा महिन्यांनी ते सोळा लाख होणार होतं. फक्त लग्न झाल्यावर मुलीने नोकरी करावी अशी मुलाकडच्यांची अट होती. त्यात विनायक आणि माधवीलाही काही गैर वाटलं नाही. मुलामध्ये दोष काढण्याकरीता कोणतेच मुद्दे नसल्याने नयनाही नाही म्हणू शकली नाही. शेवटी तीन महिन्यांनी नयनाचं लग्न थाटामाटात पार पडलं.

एक महिन्याने माधवीनं नयनाला सहजच फोन केला.

“कशी आहेस बेटा? “

“आई तशी मी मजेत आहे. सासूबाई आणि नवरा दोघंही स्वभावाने चांगले आहेत पण इथे खुप कामं करावी लागतात. सकाळी सहा वाजताच उठावं लागतं “

” का? “

” अगं माझ्या नवऱ्याला फिटनेसचं वेड आहे म्हणून तो सकाळी पाच वाजताच जिमला जातो. सासूसासरेही सकाळी साडेपाचलाच माॅर्निंग वाॅकला जातात. सुरुवातीला मी माझ्या सवयीने एकटीच नऊ वाजेपर्यंत झोपलेली असायचे. तसं मला कुणी बोलत नव्हतं पण त्यांच्या चेहऱ्यावरुन माझं असं उशीरापर्यंत झोपणं त्यांना आवडत नाहिये असं माझ्या लक्षात आलं. मग नाईलाजाने मलाही सकाळी सहा वाजता उठावं लागतं. नवरा, सासूसासरे सकाळी घरी आले की त्यांना लगेच चहा करुन द्यावा लागतो. मग नाश्त्याची तयारी. माझी झोपच होत नाही आजकाल. वरुन घरात सतत लोकांचं येणं जाणं असतं. दिवसभर चहापाणी करुन मी थकून जाते. त्यातून आता नवरा आणि सासू दोघंही माझ्या मागे लागलेत मी नोकरी करावी म्हणून. सासूबाई म्हणतात ‘तू इतकी शिकली आहेस त्याचा उपयोग तुझ्या आईवडिलांना नाहितर आम्हांला तरी होऊ दे “

“काय चुकीचं म्हणताहेत त्या? मिळत असेल तर कर नोकरी “

” हो पण घरातली कामंही मलाच करावी लागणार ना? सासूसासऱ्यांना थोडीच कामं सांगता येतील! “

माधवीला हसू आलं. माहेरी नोकरी करतांना जो रुबाब नयना दाखवायची तो आता तिला सासरी दाखवता येणार नव्हता.

“ठरव मग काय करायचं ते “आपलं हसू दाबत ती म्हणाली.

“तू बोल ना जरा माझ्या सासूबाईंशी. त्यांना म्हणा कमीत कमी लग्नाचं एक वर्ष तरी तिला एंजॉय करु द्या “

“नाही गं बाई! मी तुझ्या संसारात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. तू आणि तुझ्या सासरचे काय ठरवायचं ते ठरवा. तुमच्या घरात भांडणं लावायची माझी अजिबात इच्छा नाही “

“बरं “

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “फक्त आशिर्वाद मोजावेत..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “फक्त आशिर्वाद मोजावेत.. ☆ संध्या बेडेकर ☆

३)  — 

 “  “ लेखिका : संध्या बेडेकर

फक्त आशिर्वाद मोजावेत – – 

“रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची/सवयींची पाठराखण काही उपयोगाची नसते. ” 

ताईकडे महालक्ष्मी सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. दर वर्षी तिच्या घरचे सर्व एकत्र येऊन हा सण साजरा करतात. ताईच्या सासू बाई पण असतातच. सर्व मिळून गौरींच्या आगमनाची तयारी सजावट, दुसऱ्या दिवशी ची तयारी करतात. भाज्या निवडणे वगैरे वगैरे.

 पूजेच्या दिवशी ताई कडचे पंधरा वीस जण सहज असतात. म्हणून आम्ही माहेरचे एक दिवस नंतर विसर्जनाच्या दिवशी जातो. सर्वांना प्रसादही मिळतो. ताईला खूप दगदगही होत नाही. नंतर ची आवाराआवरीची जबाबदारी आम्ही घेतली आहे.

 काम करताना गप्पा पण रंगतातच. किती तरी विषय निघतात. वेगवेगळ्या सणांच्या आठवणी निघतात. काही गोड असतात तर काही पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यातून आपलं डोकं वर काढून जिवंत होतात.

 मन आपल्या शरीरात कुठे आहे?? किती मोठे आहे?? त्याची मेमरी डिस्क किती GB ची आहे? काही माहीत नाही. पण अगदी सर्व मनात व्यवस्थित recorded असत. चांगल्यापेक्षा सर्व वाईट प्रसंग सहज अगदी डिटेल्स मध्ये आठवतात. बहुदा त्याची उजळणी बरेचदा झालेली असावी. बरे असो,

 आम्हा तिघी बहिणींचे एकत्र येणेही या निमित्ताने होते.

 रमा (आमची सर्वात लहान बहीण) म्हणाली,  ताई!! तुझ्या घरी सर्व मजेत पार पडतं ग. आमच्या घरी एकत्र जमले की टेन्शनच असतं. एखादा तरी ‘रंगारंग कार्यक्रम’ होतोच. बहुतेक मीच टार्गेट असते. यावेळी काय ऐकायला मिळणार?? माझ्यातले दोष सांगण्यात येतात. मी कुठे चूकते?? वगैरे वगैरे. त्यानंतर आमच्या दोघांत भांडण होतं. हेही ठरलेलंच आहे.

 असं सांगताना रमाचे डोळे भरून आले.  ताईच्या सासूबाई लगेच म्हणाल्याच,  

 अग!! रमा! गौरींसमोर आहेस ना तू. मग अजिबात रडायचं नाही. अग!! तू शाळेत शिक्षिका आहेस ना,

 ‘Positive attitude’ वर भाषण देतेस ना मग स्वतः केंव्हा स्ट्रॉंग होणार??

 ताई म्हणाली,  रमा!! यात तुझी पण चूक आहेच. किती दा तुला सांगितलंय, की घरच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. प्रत्येक घरात काही न काही प्रश्न असतातच. नवरा बायको मध्ये वादविवाद चालतच असतात. ते सर्व बाहेरच्या लोकांना म्हणजे अगदी आम्हाला सुद्धा सांगायची काहीच गरज नाही. असं वागून तूच लोकांना तुझ्या घरात घुसायची परवानगी देते. चर्चेला विषय देते. मग असं होणारच. आधी तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्या, सांभाळून घ्या. इथे तिथे बोलण्यापेक्षा आपापसात बोला. तुम्ही दोघे एकमेकांची किंमत ठेवत नाही. मग दुसरे त्याचा फायदा घेतात. तुमच्या घरात लुडबुड करतात. तुझी ही सवयच झाली आहे. तू त्यात रमते. सारख रडगाण का??

 या जगात कोणीच सर्व गुण संपन्न नाही.

 म्हणतात ना,

 “Talking about our problems is the greatest addiction, break the habit and talk about your joys. ” And enjoy life.

आपली किंमत आपण ठरवायची असते, दुसऱ्यांनी नाही. आपला मान आपण ठेवला तर दुसरा अपमान करायची हिम्मत करत नाही.

 अग!! प्रत्येकाच्या घरी काही न काही घडत असतच. उतार चढाव येतातच. पण ते तुला कधी काही सांगतात का??

 अग!!! काही लोकांना असते तशी सवय. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही. आगीत तेल घालण्याचे काम ते उत्तम करतात.

 ” कितीही प्रेमाने कांदा कापला तरी अश्रू निघणारच. ” दुर्लक्ष करायचे कौशल्य वाढवावे. तेच आपल्या सुखी आनंदी जीवन जगायचे औषध आहे. कोणी काहीही म्हणणार आणि तू रडणार का? लोक सोयीनुसार जवळ येतात, गरज संपली की झालं. आणि त्या नुसार तुम्ही वाईट की छान ठरवतात. लोकांना ‘impress’ करायला जायचे नाही. त्यात वेळ व कष्ट वाया घालवायचे नाही.

 ” When you decide not to impress anyone, your mental freedom begins. ” 

 स्वतः ला कमी लेखू नको. मी गरीब, मी बिचारी, या कोशातून बाहेर नीघ. तुझ्यात काय आहे?? जमेची बाजू कोणती?? याचा विचार कर. त्या गुणांचा विकास कर.

 समोरचा श्रीमंत आहे, तर असू दे. म्हणून तूं गरीबीचा न्यूनगंड बाळगू नकोस. जसं स्वतः ला श्रेष्ठ समजणं अहंकार आहे, तसंच स्वतः ला गरीब, बिच्चारी समजणही चूकच.

 दुसऱ्यांची आरती ओवाळण बंद कर. स्वतः ची आरती ओवाळण सुरू कर. आवाजात करारीपणा व डोळ्यात आत्मविश्वासाचे तेज असू दे.

 अग!!! गरूडासारखी उंच झेप घेता येत नाही म्हणून बाकी पक्षी रडत बसतात का?? लहानस फुलपाखरू सुध्दा बगीच्यात स्वच्छंद बागडत.. वटवृक्षाखाली वाढणार गवत ही मजेत जगतच.

आपल्या क्षमतेप्रमाणे अगदी धाटात, मजेत व ताठ मानेने जगायचे.

आज गौराईं समोर नक्की ठरव, यापूढे हसून जगायचं की रडायचं?? धाकात जगायचं की थाटात??

यापूढे रडायचं नाहीच.

 आज ताईने अगदी मनसोक्त बोलायचं ठरवलेलं दिसतंय. बरोबर आहे किती कुरवाळायच.??? कधी कधी कान उघडणी करणे पण गरजेचे असते.  

बरोबर आहे. म्हणतात ना,

 “Stop focussing how stressed you are, and remember how blessed you are. “

“Enjoy life “

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हरवलेले शेजारी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “हरवलेले शेजारी…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

महत्वाच्या कामामुळं अनिलला ऑफिसमधून निघायला रात्रीचे नऊ वाजले. धो धो पाऊस होता. त्यात कॅब बुक होत नव्हती. गरजेच्या वेळी कॅब बुक होत नाही हा नेहमीचा अनुभव. चालत निघालेला अनिल छत्री असूनही बसस्टॉपला पोहचेपर्यंत भिजलाच. आधीपासून तिथं एकजण थांबलेला. अर्धा तास झाला तरी एकही बस आली नाही. वाट बघून वैतागलेल्या अनिलनं रिक्षानं जायचं ठरवलं पण चार-पाच रिक्षावाल्यांनी नकार दिला. शेवटी एकजण मीटरपेक्षा शंभर रुपये जास्त देण्याच्या बोलीवर तयार झाला. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, लाइट गेलेले, जवळपास निर्मनुष्य रस्ता या परिस्थितीचा विचार करून अनिल तयार झाला. परिस्थितीनुसार काही निर्णय घेताना शहाणपण बाजूला ठेवावे लागते. रिक्षात बसल्यावर अनिलनं बसस्टॉपवर उभ्या असलेल्याला हाक मारली.

“हॅलो, चला. पुढच्या स्टॉपला सोडतो. ”

“थँक्स, मी जाईन. ”

“अहो या हो. बराच वेळ थांबलो. एकही बस आली नाही. ” नाही-हो करत तो रिक्षात बसला.

“हॅलो, मी अनिल”

“मी सुनील, थँक्यु सो मच”

“वेलकम, इथं कुठे”

“ऑफिस”सुनील.

“माझीपण कंपनी इथंच आहे. आज जरा निघायला उशीर झाला. ”

“सेम हीयर, नेहमी बाईकवर येतो पण आज… ”

“कुठे राहता? ”अनिलनं विचारलं.

“आनंदनगर, नवीन डी पी रोड”

“अरे वा!! मी पण आनंदनगरला राहतो”अनिल.

“चांगला योगायोग आहे. एक रिक्वेस्ट, मला आनंद नगरला सोडता. रिक्षा भाडं शेयर करू”

“ओफकोर्स सोडतो पण भाडं शेयर वगैरे नको. ”

“अहो.. पण.. ”

“मित्रा, भयाण पाऊस पडतोय. नशिबानं रिक्षा अन सोबत दोन्ही मिळालय. ”

“सो नाईस ऑफ यू”सुनील.

“आनंदनगरला कुठं राहता”

“नील सोसायटी”सुनीलच्या उत्तरावर अनिलनं डोळे विस्फारले आणि मोठमोठ्यानं हसायला लागला. त्याच्या अनपेक्षित वागण्यानं सुनील गोंधळला.

“एकदम हसायला काय झालं. ”

“दुनिया गोलयं. मीसुद्धा नील सोसायटीतच राहतो”

“काय सांगता”सुनील किंचाळला.

“एच बिल्डिंग, फ्लॅट नंबर १५. ”

“मी जी २०. ”

“म्हणजे आपण चक्क शेजारी आणि आपल्याला माहीतच नाही. ”अनिल, सुनील दोघंही मोठ्यानं हसले अन पुढच्या क्षणाला एकदम गप्प झाले. म्हटलं तर साधी बाब पण खोलात जाऊन विचार केला तर…

काळाच्या ओघात खूप काही बदललं. सध्या मी, मला, माझं यापलीकडं विचार नसल्यानं जो तो मोबाइलसोबत एकटा. आपसातल्या भेटीगाठी कमी झाल्यात तर काही वर्षांपूर्वी जगण्याचा भाग असलेले ‘शेजारी’ तोंडदेखले राहिलेत. आता परिस्थिती अशी आहे की आसपास कोण राहतं हे देखील माहिती नसतं अन तशी गरजही वाटत नाही. चाळीत, वाड्यात सताड उघडी असलेली मनं आणि दारं आता फ्लॅटसारखीच कायम बंद असतात. प्रायव्हसीच्या नादात ‘सोशल लाईफ’ हळूहळू संपत चाललीये.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेफ्टी डोअर… ☆ श्री संजय जोगळेकर ☆

श्री संजय जोगळेकर

? जीवनरंग ❤️

☆ सेफ्टी डोअर ☆ श्री संजय जोगळेकर 

आज वंदनाताई वेगळ्याच मूडमध्ये होत्या. सकाळचे आठही वाजले नव्हते पण आज अंघोळ, पूजा आवरून तयार होत्या. आज एक ठेवणीतली साडी नेसून तयार होऊन बसल्या होत्या.

खरं म्हणजे नेहमीच्या रूटीन प्रमाणे सकाळची आठची वेळ म्हणजे वंदनाताईंची बाहेरच्या टेरेसवरील झोपाळ्या वर बसून चहा आणि मोबाईलचा आस्वाद घेण्याची.

पाच एक मिनिटापूर्वीच त्यांची सून आणि मुलगा लगबगीने ऑफिसला निघाले.

जाता जाता त्यांनी विचारले सुद्धा

“आई आज एवढी नटून थटून बसलीस….. कुठे लग्नाला वगैरे जायचं आहे का तुला? खूप छानसा बुके ही मागवला आहेस म्हणून विचारतोय”.

“अरे लग्नाला वगैरे नाही. काम झालं की तुम्हाला सांगेन आधीच सांगितलं तर ते काम होत नाही असं म्हणतात. ”

“बरं बरं…. ऑल द बेस्ट. ”

खरंच वंदनाताईंच्या दृष्टीने ते एक वेगळं काम होतं. काम म्हणजे काय त्यांची आज एक लाडकी मैत्रीण येणार होती बऱ्याच महिन्यांनी…. काहीतरी नवीन स्कीम घेऊन.

तिचं नाव होतं तन्वी…. “भान” संस्थेची एक सेविका. वेळेची अगदी पक्की.

तन्वीला यायला अवघी पंधरा मिनिटे बाकी होती, तेवढ्यात वंदनाताईंनी जमेल तेवढं घर आवरून घेतले. घराबाहेर एक छान उदबत्ती लावली.

हॉल मध्ये एक रूम फ्रेशनर देखील मारला.

त्या पंधरा मिनिटात विचारांचे अगदी काहूर माजले होते त्यांच्या डोक्यात. कशासाठी येणार असेल तन्वी? काय स्कीम असेल?

“भान” संस्थेची तन्वी भेटल्यापासून वंदनाताईंची लाईफस्टाईल बरीचशी सिस्टिमॅटिक झाली होती. ठराविक वेळीच घरची पूजा करणे, सकाळ संध्याकाळ घराबाहेर उदबत्ती लावणे, आठवड्यातून ठराविक दिवशी देवळात जाणे, संध्याकाळची प्रार्थना वगैरे वगैरे बरेच काही. असो.

इतक्यात दारावरची बेल वाजली.

तन्वीच आली होती… आज एक वेगळाच पेहराव होता तिचा. डार्क ब्लू कलरची जीन्स अर्थात कुठेही न फाडलेली. पिवळसर रंगाचा एक छानसा कॉटनचा कुर्ता, एक ब्रँडेड पर्स, गळ्यामध्ये बारीक मोत्याची माळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीन्स असून देखील तन्वीने लावलेली एक छानशी टिकली. ती टिकली लक्ष वेधून घेत होती. जरा एक special च होती ती.

अगदी मोहरून गेल्या वंदनाताई.

“अगं किती महिन्यांनी आलीस आणि किती सुंदर दिसतेस गं तू. घरी गेल्यावर आईला दृष्ट काढायला सांग”.

तन्वी फक्त गालातल्या गालात हसली.

तशी वंदनाताई म्हणाल्या, “ तन्वी…… वेळ न दवडता बोल बाई लवकर. नाहीतर तुमच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे तीन मिनिटापेक्षा जास्ती बोलायचे नसते ना? तीन मिनिटे केव्हाच संपायची. हो….. आणि safety door च्या आतूनच बोलतेय मी…… तुमच्या नियमाप्रमाणे. ”

“ सांगते सांगते….. नीट ऐका. “भान” संस्थेतर्फे मी जेव्हा काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे आले होते तेव्हा मी म्हटलं होतं की आमच्या संस्थेची कुठलीही स्कीम नाही, योजना नाही, आमची अपेक्षा नाही, पण “भान” ला नाईलाजाने बदलावे लागले. आता एक नवीन स्कीम आणली आहे…. फक्त तरुण मुलींसाठी. स्कीम म्हणजे काय फक्त आपली लाईफस्टाईल थोडीशी बदलायची.

आता स्कीम ऐका….

आपल्या देशाच्या सिंदूर मोहिमेला मे महिन्यात एक वर्ष झालं ना. वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही स्कीम सुरू केलीय. आमची संस्था प्रत्येक Interested स्त्रीला एक “सिंदूर” चे म्हणजे टिकल्यांचे पाकीट विकत देते, ज्यात साधारणपणे 400 टिकल्या असतात. पारंपारिक, काळ्या, लाल, मरून, हिरव्या, पिवळ्या अशा गोल आकाराच्या आहेतच पण त्याशिवाय राफेल, ब्रह्मोस, S 400, sky striker suicide, drone, धनुष्यबाण, त्रिशूल अशीही चित्रे या टिकली वर print केल्येत. अर्थात टिकलीचा आकार गोलच आहे कारण तो आम्हाला शक्यतो बदलायचा नाहीये.

या चारशे टिकल्यांपैकी तुमच्या आवडीच्या हव्या त्या टिकल्या तुम्ही लावायच्या….. त्या देखील प्रत्येक महिन्याच्या 7, 8, 9 आणि 10 या तारखेला. ओळीने तीन महिने असे करायचे आणि त्याचा foto तुमच्या फेसबुक किंवा instagram वर टाकायचा आणि आमच्या संस्थेला पाठवायचा. फोटो टाकल्यानंतर ती स्त्री दिवसभर टिकली ठेवेलच असं नाही. हे आम्ही गृहीत धरलं आहे किंबहुना आमची तशी फारशी अपेक्षाही नाही. ”

मध्येच थांबून वंदनाताईने तिला विचारले,

” तरीच तू लावलेली टिकली मला काहीतरी special वाटली. “

तन्वी म्हणाली, “हो, यात S400 चे चित्र आहे”

“अय्या, सॉलिड…… काय छान आयडिया आहे. Great. किती कल्पकता….. पुढल्या महिन्यातच हळदी कुंकू आहे. हळदी कुंकवाला लुटायला खूप छान item आहे हा. अगदी एक पाकीट जरी घेतले तरी 4 बायका adjust होतील त्यात. आणि हो…… किती किंमत असेल गं एका पाकिटाची?

तन्वी थोडीशी गंभीर होऊन म्हणाली, “ अहो ताई पैशाचे जाऊ द्या…. जी गोष्ट आपल्या मुलींकडून सहजतेने घडायला हवी ती घडत नाही म्हणून अशी कल्पकता आणि अशा स्कीम आणाव्या लागतात. आपल्या धर्माचे दुर्दैव दुसरं काय. नाईलाज आहे आमच्या संस्थेचा. नुसती कल्पकता नाही तर काहीतरी आमिष दाखवावं लागलं. या चारही तारखांचे सलग 3 महिने टिकली लावलेले ज्यांचे फोटो आमच्याकडे येतील त्यांना आम्ही दुप्पट पैसे म्हणजे 500 रुपये परत करू. अहो 250 रुपये तर ही फक्त त्याची manufacturing cost आहे. तसंच आमचे जे मासिक निघते ना त्यात या सगळ्यांचे फोटो देखील छापणार आहोत. ”

“अय्या किती मस्त” वंदनाताई म्हणाल्या.

आता तर वंदना ताईंच्या डोळ्यातून फक्त अश्रू यायचे बाकी होते. त्यांनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या, “अग तन्वी आत ये ना गं…. आजच्या दिवस तुमचा नियम मोड ना गं…. मी सेफ्टी डोअर उघडते. बैस तरी पाच मिनिट, तोंड गोड करते तुझं…… बस ना…. नेहमीच तू घाईत असतेस. “

त्या आनंदाच्या भरात वंदनाताईंनी सेफ्टी डोअर हळूच उघडले.

तन्वी म्हणाली, “नाही हो काकू, मला खूप काम आहे आत्ताशी कुठे तुमचं पहिलंच घर झालं आहे आणि अशा गप्पा मारत बसले आणि तोंड गोड करत सुटले तर माझं टार्गेट नाही पूर्ण होणार”

“अगं पण मला एक सांग…. खरंच पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या अपेक्षेने आम्हा बायकांनी तुमच्या टिकल्या विकत घेतल्या आणि लावल्या तर तुम्हाला किती भुर्दंड पडेल. पैसा तर किती खर्च होईल आणि असे तुझ्यासारखे कितीतरी कार्यकर्ते असतील ना मग किती संख्या होईल त्याची. कशाकरता हा आटापिटा? यातून फायदा तर नाही उलट संस्थेच्याच खिशातील पैसे जाणार. ”

तन्वी म्हणाली “अहो काकू हेच तर वाईट आहे ना. पैसे गेले तर गेले, पण या आपल्याच हिंदू मुली. आपलीच परंपरा जपताना लाज वाटते ना यांना. आमच्या संस्थेचे जाऊ द्या, पण युट्युब वर “भारतीय महिलांची टिकली” किंवा “कुंकू” असा तुम्ही टॉपिक टाकून बघा, कितीतरी शास्त्रोक्त आणि उपयुक्त माहिती मिळेल तुम्हाला. “

“आमच्या संस्थेवर तुम्ही नका अवलंबून राहू पण युट्युब युनिव्हर्सिटीचे तरी ऐका म्हणजे तरी तुमचा विश्वास बसेल. “

“आपल्या हिंदू मुलींना कितीतरी गोष्टी सांगाव्या लागतात, शिकवाव्या लागतात गळी उतरवाव्या लागतात आणि हे जर झाले नाही तर काहीतरी वेगवेगळ्या स्किम्स पैसा आणि प्रसिद्धीचे आमिष दाखवून आणाव्या लागतात. जाऊ द्या. ”

वंदनाताई ना काय बोलावे ते सुचेना. क्षणभर दोघीही शांत होत्या.

तन्वी ने विचारले “मग तुमच्या सुनेचे नाव Register करू ना? “

म्हणाल्या, “अगं विचारायचे काय? ”

“अहो, तसं नाही काकू, एकदा तिला फोन लावा…. तिला “हो” म्हणू द्या. ”

“अग ताई, माझी सून माझ्या शब्दा बाहेर नाही गं. आमच्या घरचे दोन मेंबर धर. ”

“दोन मेंबर कोण? ”

“अगं….. दुसरी मी. ”

“माफ करा वंदनाताई, तुम्ही मेंबर नाही होऊ शकणार. ”

“का बरं? ”

“मी पण आहे की इंस्टाग्राम वर फेसबुक वर व्हाट्सअप वर सगळीकडे आहे. अहो ताई एक सांगायचे राहिले. तुम्ही वयाच्या अटीत बसू शकत नाही, कारण ही योजना फक्त 20 ते 40 या वयोगटातल्या बायकांनाच लागू आहे. ”

इतका वेळ उत्साहाने बोलणाऱ्या वंदनाताई क्षणार्धात हिरमुसल्या….. रडवेल्या झाल्या.

तन्वीने देखील नाईलाजाने अगदी अलगदपणे सेफ्टी डोअर ओढून घेतले आणि म्हणाली, “वाट बघते तुमच्या सुनेच्या फोनची. “

– – वंदनाताई सेफ्टी डोअर मधून पाठमोऱ्या तन्वी कडे शांतपणे बघत होत्या

 

© संजय मुकुंद जोगळेकर

मो. 9867180426 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अध्यात्म…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ अध्यात्म… – भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(तिने तेल तापवायला घेतले. मी तिला म्हंटले..

‘संध्या.. मी पुऱ्या लाटून देते. तू तळून घे.

मी पुऱ्या लाटता लाटता तिच्याशी बोलू लागले..) 

इथून पुढे – – – 

‘संध्या.. आम्ही म्हणजे माझा मुलगा, सुन आणि मी सात वर्षांपूर्वी या जागेत राहायला आलो, माझा मुलगा आणि सुन नोकरीला जातात.. म्हणजे सकाळी नऊला बाहेर पडतात.. मग मी ग्यालरीत बसते.. आता तुमची ही बिल्डिंग झाली त्या ठिकाणी रिकामी जागा होती.. गुलमोहराची आणि आंब्याची झाडें होती..

‘मग ती झाडें तोडली की काय?

‘झाडें तोडूनच हा प्लॉट तयार केला.. मग मोजमाप सुरु झाले.. खड्डे पडले पाठोपाठ विटा, वाळू, लोखंड, सळी घेऊन ट्रक्स धावू लागले आणि कामगार पण पोचले. पुरुष आणि स्त्रिया… खड्ड्यात दगड, वाळू, सिमेंट घालू लागले. मग एका कामगारासाठी पाल उभे राहिले. बाकी कामगार जाऊन येऊन असायचे पण एक जोडी याच पालात राहू लागली.. कदाचित ते वाचमन असतील. त्यांची दोन मुले.. एक चार वर्षांची मुलगी आणि एक पाळण्यातील मुलगा. ती बाई त्या मुलाला झोळीत घालून काम करत असे. तिची मोठी मुलगी त्या आपल्या भावाला झोक देत असे, त्याच्या तोंडात पेजपाणी घालत असे. ती बाई दुपारी आली की त्या बाळाला पाजत असे.. मग संध्याकाळी आली की भाकऱ्या बडवत असे.. मग कालवण करून सगळी शांत झोपत.

‘मग तिचा नवरा? तो दारू पिऊन तिला मारत असे काय?

‘नाही.. तिचा नवरा कमालीचा देवभक्त होता.. तो संध्याकाळी भजने म्हणायचा.. मुलांना खेळवायचा..

‘म्हणजे काकू.. एकांदरीत ते गरीब, झोपड्यात रहाणारे पण समाधानी कुटुंब होते तर..?

‘होय.. खरेच.. मी देवळात जातानायेताना ती मुले दिसायची.. मी त्यांच्यासाथी खाऊ न्यायचे.. छोटया मुलाला बाहुल्या, खेळणी द्यायचे..

आणि एक दिवस ढग दाटून आले.. जोराचा वारा आणि पाऊस सुरु झाला, धुलीचे लोट जाऊ लागले, अनेक ठिकाणची झाडें पडली, त्यात त्या जोडप्याच्या पालावरील छप्पर उडून गेले.. संसार उघडा पडला..

‘अरे बापरे.. मग?

‘माझ्यासकट या बिल्डिंगमधील लोक धावली.. मी त्या सर्वाना माझ्या घरात घेऊन आले. चहापाणी दिले.

‘मग?

‘रात्रीपर्यत या बिल्डिंगचा बिल्डर आणि त्याची माणसे आली आणि त्यांनी त्या कुटुंबाची व्यवस्था त्यांच्या तोपर्यंत बांधून ठेवलेल्या जागेत केली.. म्हणजेच आज तुम्ही रहात आहात त्या जागेत केली..

‘काय? या आमच्या जागेत?

‘तेंव्हा ही तुमची जागा नव्हती आणि व्यवस्थित पण केलेली नव्हती, फक्त चार बाजूला विटा लावलेल्या होत्या.. खाली टाईल्स नव्हते, भिंतीना रंग नव्हता फक्त एक नळ जोडून दिला होता.

‘मग या जागेत ती मंडळी राहिली?

‘होय.. आता ती जोडी आणि त्यांची मुले मला अगदी जवळ आली.. त्या बाईचे नाव मुक्ता आणि त्याचे सदाशिव. मी ग्यालरीत बसले की त्यांचा संसार दिसायचा. मी मुक्ताला म्हंटले..

‘या मोठया पोरीला शाळेत घाल.. शिकेल ती..

‘साळेत घातलं तर बाबूला कोन बगणार… ती बघते म्हणूं मी कामावर जात्ये..

‘मग तू घरी आलीस की तिला माझ्याकडे पाठव.. मी घेईन तिचा अभ्यास..

‘ह्ये झाक हुईल..

असं म्हणून ती तिच्या मोठया मुलीला माझ्याकडे पाठवू लागली. मला पण जाग झाली.. मी तिला मुळाक्षरे, आकडे शिकवू लागले आणि ती पण शिकू लागली. पण त्याच दरम्याने मुक्ताचे पोट दिसायला लागले आणि त्या मुलीचे येणे अनियमित होऊ लागले आणि मुक्ताला मुलगी झाली.. मग मात्र आईचे करायला ती घरी राहू लागली. सातआठ दिवसांनी मुक्ता कामावर जायला लागली.. आणि आपल्या दोन्ही भावंडाना सांभाळायला ती मुलगी घरीच थांबली.

‘अरेरे.. मुलीचे शिक्षण थांबले म्हणायचे..

‘होय.. थांबले ते थांबलेच म्हणायचे.. पुढे ती शाळेत जाते की नाही की आईसारखी अशिक्षित राहते कोण जाणे?

‘मग कुठे आहेत आता मुक्ता आणि तिचा नवरा.. मुले?

तिसरे मूल सहा महिन्याचे होत आले तोपर्यंत या बिल्डिंगचे काम पुरे होत आले.. रंग लाऊन बिल्डिंग पुरी झाली.. तुमच्यासारखे लोक घर पहायला येऊ लागली.. आणि एक दिवस..

‘एक दिवस काय काकू?

‘एक दिवस मी नेहेमीप्रमाणे माझ्या ग्यालरीत बसले होते तर याच जागेतून मुक्ता आणि सदा ची बांधाबांध दिसून आली.. त्याचे सामान ते केव्हडे.. पण चार भांडी.. चिरंगुट.. लाकडे.. स्टोव्ह.. सगळे कापडात बांधलेली.. मला कळेना कुठ जातात ही? मी हाक मारुंन सदाला विचारलं..

‘सदाभाऊ.. कुठ बाहेर जाताय काय?

‘भायर कुठलं.. आता मालकांनी नवीन बांधायला घेतलं नव्ह.. तिथं जायचं..

माझा जीव कासावीस झाला.. गेली चार वर्षे या दोघांना आणि त्यान्च्या तीन मुलांना पहायची सवय.. तीनही मुले माझ्या डोळ्यसमोर मोठी झालेली..

‘मग आता परत येथे नाही येणार?

एव्हड्यात मुक्ता धाकट्या मुलीला कंबरेवर घेऊन आली. माझ्याकडे पाहून हलकेसे हसली.. थोरली एक पिशवी घेऊन चालायला लागली.. बाबूला सदाने खांदयावर घेतले आणि दोन हातात दोन पोती घेऊन चालायला लागला. मला वाटलेले निदान मुक्ताला तरी हे घर सोडताना जड वाटेल.. पण ती पण छोटीला कमरेवर आणि हातात लाकडाची मोळी, दुसऱ्या हातात एक पोत घेऊन नवऱ्याच्या मागोमाग चालायला लागली..

‘काय.. काकू.. रोज तुम्ही त्यांच्याशी बोलायचा.. त्याना जुने कपडे दयायचा..

मोठीचा अभ्यास घयायचा.. वाऱ्याने त्त्यांचे छप्पर उडाले तेंव्हा त्याना घरात घेतलेत तुम्ही.. तरीसुद्धा..

‘कशातही मन अडकवायचं नाही.. कसलेली पाश गुंडाळून घ्यायचे नाही यालाच जर अध्यात्म म्हणत असतील तर सदा आणि मुक्ताजोडीने मला ते शिकवले.. ज्या घरात म्हणजे संध्या आज तू ज्या घरात राहतेस, त्या घरात तीन वर्षे राहून त्या घराचा लोभ तिला झाला नाही.. मागे वळूनही न पहाता ती मुलांना घेऊन बाहेर पडली.

‘पण तुम्हाला कधी परत भेटतील का ती?

‘नाही भेटणार.. ती कदाचित मला आणि या बिल्डिंगला विसरून पण गेली असतील.. रोजचे काम हेच त्त्यांचे आयुष्य. मघा तू म्हणालीस संध्या.. दोन जागा सोडून तू या जागेत आलीस.. तुला ही तरी जागा लाभावी.. म्हणून. मी तुला खात्रीने सांगते.. ज्या जागेत सदा आणि मुक्ता.. त्यांची तीन मुले.. आनंदाने राहिली.. कसलीही अभिलाषा न ठेवता.. ती जागा तुला लाभणारच.. आजपर्यंत कधीही न मिळालेले सुख आणि समाधान या जागेत तुला मिळणारच..

पुऱ्या तळता तळता संध्या थांबली आणि तिने मला घट्ट मिठी मारली.

समाप्त –

© श्री प्रदीप रामदास केळुस्कर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अध्यात्म…- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ अध्यात्म… – भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मी नेहेमीप्रमाणे ग्यालरीत बसले होते. सचिन सारिका कामावर गेली की मी मोकळी. या ग्यालरीत बसले की माझा वेळ छान जातो. समोर नवीन बिल्डिंग उभी राहिली होती, त्यात नवीन फ्लॅटधारक राहायला येत होते. त्या मंडळींचे टेम्पो, ट्रक आवारात येत होते, सामान उतरविले जात होते.. हमाल सामान वर नेत होते.. मग त्या फ्लॅटमधील मंडळी गाडीतून येत होती. फार्निचर लावत होती.. सुतारांचे ठोकणे.. त्त्यांचे ठोक ठोक आवाज अनेक फ्लॅटमधून बाहेर पडत होते.

नवीन नवीन चेहेरे समोर दिसत होते… काही मराठी बोलणारे, काही गुजराथी, काही हिंदी भाषिक… छोटी छोटी लहान गोजिरवाणी मुले, त्यांच्या सुंदर आया, देखणे बाबा, तरुण मुली, मुलगे, म्हातारे आजीआजोबा…

माझा वेळ मजेत जात होता. सात वर्षांपूर्वी आम्ही या जागेत आलो, तेंव्हापासून ही ग्यालारी मला प्रिय झाली. आम्ही येथे रहायला आलो तेंव्हा आमच्या बिल्डिंगच्या बाजूला मोकळी जागा होती. गुलमोहरची दोन झाडें सतत जाग करत असत, एक जुना आंबा होता.. किती वर्षाचा कोण जाणे? सकाळी सकाळी त्यावर पाखरे जमा होत आणि किलबिलाट करत. सायंकाळी तीच पाखरे घरट्याच्या ओढीने परत येत.

पण या माझ्या सुखाला दृष्ट लागलीच. एका दिवशी भराभर झाडें तोडणारे, जमीन साफ करणारे आलेच. विटा, दगड, लोखंड येऊन पडू लागले आणि भराभर बिल्डिंग उभी राहिली.

तीन वर्षात बिल्डिंग उभी राहिली. नवीन नवीन मंडळी राहायला आली. माझ्या ग्यालारीसमोरच्या फ्लॅटमध्ये नवराबायको जोडी आणि त्त्यांची सातआठ वर्षांची मुलगी राहायला आली.. त्या चुणचुणीत मुलीमुळे माझे दिवस आंनदात जाऊ लागले… मला ती हळूच हात दाखवू लागली, जीभ बाहेर काढून वेडावू लागली. तिची आई कवचितच दिसायची.. बहुतेक ती आतल्या खोलीत कॉम्पुटरवर काम करत असावी. तिचे बाबा कधी सकाळी दिसत, कधी दुपारी दिसत किंवा चारचार दिवस दिसत नसतं.

त्या छोटया परीला मी तिचे नाव विचारले..

मुग्धा..

आणि तूझ्या आईचे नाव?

आई.. पण बाबा तिला संध्या म्हणतात..

आई घरात काम करत असते काय? बाहेर जात नाही आणि ग्यालरीत फारशी येत नाही..

आई कॉम्प्युटरवर टायपिंग करते..

बर.. बर.. मी हसत म्हणाले.

मुग्धाने बहुतेक आपल्या आईला मी तिची चौकशी करत असल्याचे सांगितले असणारं, दुसऱ्या दिवशी मुग्धाची आई ग्यालरीत आली आणि माझ्याशी बोलायला लागली..

तुम्ही काल माझी चौकशी करत होतात असे मुग्धा म्हणाली..

होय.. तुम्ही बाहेर जाताना दिसत नाही पण घरात पण दिसत नाहीत म्हणूंन चौकशी केली..

मी घरातच असते पण मी DTP ची कामे करते एका प्रकाशकाची, त्यामुळे पुरा दिवस कॉम्प्युटरसमोर जातो आणि माझा नवरा सेल्सलाईनला आहे, त्यामुळे त्याच्या टूर असतात..

हो का.. बर बर..

पण आजी उदया सकाळी आमच्याकडे याल का.. मुग्धाचा वाढदिवस आहे उदया आणि तिचे बाबा बाहेरगावी गेलेत.. उदया दुपारी जेवायलाच या.. थोडया लवकर आलात तर गप्पा मारू..

हो हो.. येते.. तुम्हाला थोडी मदत पण होईल माझी.

दुसऱ्या दिवशी मी मुग्धाच्या घरी गेले. मुग्धा आणि तिची आई संध्या वाट पहात होती. संध्या वालाची उसळ करणार होती, त्या करिता काल रात्री पाण्यात भिजत ठेवलेले वाल ती सोलत होती, मी पण तिच्या शेजारी बसले आणि वाल सोलायला बसले.

या आधी तुम्ही कुठे राहत होतात संध्याताई..

या आधी आम्ही दोन जागा बदलल्या.. माझे लग्न झाले आणि मी मुंबईत आले, हे एका औषधंकंपनीत सेल्स लाईनमध्ये नोकरी करत होते, मी ग्रॅज्युएट होऊन DTP चा कोर्स केलेला, यांची कळव्याला चाळीत खोली होती. त्या खोलीत पाण्याचा प्रॉब्लेम, कधी पाणी येई कधी चारचार दिवस नाही. कॉमन संडास. मी कंटाळले.. यांना दुसरी जागा शोधायला सांगत होते पण पैसे नव्हते, म्हणूंन मी काम शोधू लागले, डोंबिवलीतील एका पुस्तक प्रकाशकाने मला काम दिले. माझे टायपिंग बिनचूक त्यामुळे मला भरपूर काम मिळाले. रात्रंदिवस काम करत होते आणि पैसे जमवत होते. पण माझी तब्येत बिघडली. मग आम्ही ती जागा सोडली आणि डोंबिवलीत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागलो. तेथेच मुग्धाचा जन्म झाला. मी परत काम करू लागले, आता प्रकाशन व्यवसायात माझ्या कामाची चर्चा होऊ लागली, मला पुण्याच्या प्रकाशकांची कामे मिळू लागली, दोन पैसे बँकेत जमू लागले आणि माझ्या नवऱ्याला हार्टअटॅक आला. सतत दौरे, त्यात सिगरेटचे व्यसन आणि अधूनमधून पार्टीच्या नावाखाली दारू पिणे. त्यातून त्याला बाहेर काढले तर जागामालक जागा खाली करायला मागे लागला… आता मी ठरवले आता स्वतःच्या मालकीची जागा विकत घ्यायची, भाडे देणे बस झाले. मग मी माझ्या सर्व प्रकाशकाकडे ऍडव्हान्स पैसे मागितले आणि यांनी पण कंपनीतून कर्ज घेतले आणि ही जागा घेतली. त्या आजारानंतर यांनी व्यसने सोडली, दौरे कमी केले आणि एकएक पैसा वाचवून माझ्याकडे देऊ लागले. आता या जागेत आमचा संसार सुरु आहे, मुग्धाला पण इथे चांगली शाळा मिळाली आहे, तुमच्यासारखे चांगले शेजारी आहेत.. पण जागा पण लाभावी लागते म्हणतात.. तशी ही जागा लाभावी.. आमचा संसार सुखाचा व्हावा हे मी देवाकडे मागते.

वाल सोलून झाले होते, ते घेऊन संध्या किचनमध्ये गेली आणि तिने वाटणं मिक्सरमध्ये लावल.

मी संध्याचे बोलणे ऐकत होते.. जागा लाभावी लागते.. तशी ही जागा आम्हाला लाभावी… खरे आहे तिचे, वास्तू पण तुमचे नशीब ठरवते, तुमचे सुख किंवा दुःख ठरवते..

संध्याने बहुतेक श्रीखंडपुरीचा बेत ठरविला होता. ती पुऱ्या करण्यासाठी पीठ मळू लागली. तिचे मघाचे बोलणे माझ्या मनातून जात नव्हते..

तिने तेल तापवायला घेतले. मी तिला म्हंटले..

संध्या.. मी पुऱ्या लाटून देते. तू तळून घे.

मी पुऱ्या लाटता लाटता तिच्याशी बोलू लागले..

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप रामदास केळुस्कर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वातंत्र्यदिन, सर्व्हर आणि नेटवर्क… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

स्वातंत्र्यदिन, सर्व्हर आणि नेटवर्क… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

चिंचवडमध्ये राहणारा अमोल वयाच्या तिसाव्या वर्षीच संसाराच्या सुखदुःखाचे मोठे अनुभव घेत होता.

सुख म्हणजे सुट्टीचा दिवस, क्रिकेट आणि मिसळ.

दुःख म्हणजे सोमवार, ऑफिस आणि बायकोने सांगितलेला “थोडासा” व्यायाम.

दोन वर्षांपूर्वीच नेहा आणि अमोलचं लग्न झालं होतं. लग्न चांगलंच मानवलं होतं त्याला. नेहा जरी त्याला लाडात “ढोलू” म्हणत असली, तरी अमोलच्या मते ती अतिशयोक्ती होती. परिस्थिती त्याच्या पूर्णपणे आटोक्यात होती, तो फक्त “खाते पिते घर का” होता इतकंच.

असं त्यानं म्हटलं, की शर्टाची पोटावरची बटणं किती वेळा तुटली याचा पाढा नेहा त्याला वाचून दाखवायची.

पण त्याला अमोलचा नाईलाज होता. “खाणं” या विषयावर त्याचं मनापासून प्रेम होतं, कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्तच.

व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्याच्या तर तो सर्वस्वी विरोधात होता. जिमची फी आपणच भरायची, आणि तिथं जाऊन, मेहनत करून, घामही आपणच गाळायचा हे त्याच्या तत्वातच बसत नव्हतं. उलट त्याच्या मते तर व्यायाम केल्याने माणूस दमतो आणि त्यामुळे त्याला जास्त भूक लागते. “मग फायदा काय? ” तो नेहमी विचारायचा.

त्याची पत्नी नेहा याच्या अगदी उलट होती.

सकाळी पाच वाजता उठणे, धावणे, योगा, सायकलिंग, ट्रेकिंग, प्रोटीन शेक—तिच्या आयुष्यात ‘बसून राहणे’, ‘लोळत पडणेही संकल्पनाच नव्हती.

अमोललाही तिने केलेल्या पौष्टिक खाद्यकृती खायला आवडायच्या, पण तो ठरलेल्या मापापेक्षा दुप्पट खायचा आणि सगळंच मुसळ केरात जायचं.

असो. आज १५ ऑगस्ट होता, शनिवार, स्वातंत्र्यदिन, सुट्टी.

सकाळपासून भुरभुर पाऊस रिमझिमत होता, हवेत छान गारवा होता.

पण नेहा पहाटेच उठली होती. “अमोल, उठ! सहा वाजले.

चादरीखालून आवाज आला. “हं…”

सहा वाजले, अमोल, उठ. अजून किती झोपणार? ”

आज सुट्टी आहे ना? ”

हो. म्हणूनच तर तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंगला जायचं आहे! ”

अमोलने डोळे उघडले. “ट्रेकिंग? “

हो. ट्रेक! किती दिवसांपासून सांगतेय. ”

किलकिल्या डोळ्यांनी अमोलने खिडकीतून बाहेर पाहिले.

पाऊस.

गार हवा.

ढग.

आणि त्याच्या डोक्यात दुसरेच दृश्य होते.

सोफा.

टीव्ही.

क्रिकेट.

आणि कदाचित…

मिसळ.

आजपासून भारत–श्रीलंका कसोटी क्रिकेट सामना सुरू होणार होता. तिकडे बांगला देशाची क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाचा बॅण्ड वाजवत होती.

इतका भरगच्च कार्यक्रम असताना, शरीराला कष्ट घेऊन ट्रेकिंगला जायचं? नुसत्या विचारानंच अमोलला दम लागला.

पण नेहा अजूनही खमकेपणाने समोर उभी होती. “काय विचार करतोयस? ”

काही नाही. ”

मग तयार हो. ”

अमोलने एक दीर्घ श्वास घेतला.

सरळ सांगितलं असतं—“मला ट्रेकला यायचं नाही. ” तर त्याचे परिणाम त्याला चांगले माहिती होते.

.. आरोग्य, वजन, स्टॅमिना, वय, भविष्यातील जीवनशैली आणि “तू स्वतःची काळजी घेत नाहीस” या विषयांवर किमान दीड तासाचं व्याख्यान होणार होतं, – रिकाम्या पोटी त्याला हे सगळं ऐकून घ्यायला लागलं असतं, आणि नंतर मान खाली घालून ट्रेकला जावंच लागलं असतं.


म्हणून अमोलने दुसरा मार्ग निवडला.

नेहा…”

काय?”

मी आलो असतो ग, मला खरंच खूप आवडलं असतं. पण आज ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग लावली आहे. ”

नेहा थांबली.

आज?”

हो. ”

१५ ऑगस्टला?”

हो. ”

कशाची?”

अमोलने चेहऱ्यावर शक्य तितका गंभीर भाव आणला.

.. “नेटवर्क प्रॉब्लेम आहे. क्लायंटचा सर्व्हर काल रात्री क्रॅश झाला. काल रात्री उशीरा मेसेज आला आहे. मॅनेजमेंटने सगळ्यांनाच बोलावलंय. रिकव्हरी प्लॅन आजच तयार करायचा आहे. ”

नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.

गंभीर चेहरा ठेवून त्याने आणखी एक वाक्य जोडले— “क्लायंटची समस्या सुट्टी बघून येत नाही. ” हे वाक्य कुठेतरी ऐकलेलं होतं. पण त्या क्षणी ते त्याला फार कॉर्पोरेट वाटलं.

नेहाने दीर्घ श्वास घेतला. “ठीक आहे. मग मी जाते माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. ”“हो. तुम्ही जा. ट्रेक एन्जॉय करा. “ नेहा निघून गेली आणि अमोलने आपला झोपेचा कोटा पूर्ण करून घेतला. आंघोळपांघोळ आटोपली आणि तडक रवीच्या घरी डेरेदाखल झाला.

रवीने दार उघडलं.

काय रे?”

अमोल आत शिरत म्हणाला, “आज देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. ”

म्हणजे? ”

आणि आपण स्वतःला घरच्या बंधनातून मुक्त करणार आहोत. ”

रवी अमोलचाच मित्र, त्याला लगेच अर्थ समजला.

नेहाला काय सांगितलं आहेस? ”

ऑफिस. ”

कशासाठी? ”

अर्जंट मीटिंग. नेटवर्क नाहीये, सर्व्हर बिघडला आहे. ”

साल्या, पकडला जाशील. ” रवीचे अनुभवाचे बोल.

ते राहू दे रे. काहीतरी खायला दे, अशक्तपणा आला आहे. “

रवीच्या सोसायटीत झेंडावंदनानंतर घरोघरी समोसे पाठवले होते, त्यांच्यावर ताव मारणं झालं, तोपर्यंत रवीने फोनाफोनी करून अतुल आणि आशुतोष या त्यांच्या शाळासोबत्यांना “स्वातंत्र्यदिनाची” कल्पना दिली.

रवी – अमोल गॅलरीत चहाचा आस्वाद घेत मित्रांची वाट पाहत होते, तोवर प्रशांत स्वीटसमधून खादाडीची सामुग्री घेऊन अतुल आणि आशुतोष आलेच.

टीव्हीवर आलटून पालटून ऑस्ट्रेलिया – बांगला देश आणि भारत–श्रीलंका सामने सुरू होते. तिकडे बांगला देशचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा फडशा पाडत होते, इकडे हे चौघं कांदा भजी, खमण आणि कचोऱ्यांचा.

खाण्याच्या डिशेस समोर… चहा बाजूला… क्रिकेट टीव्हीवर.

त्या क्षणी अमोलला जाणवलं—

स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं हेच असावं.

अचानक टीव्हीवर सामना थांबला. इकडे ऑस्ट्रेलिया सामन्याचा दिवस संपला म्हणून, आणि तिकडे श्रीलंकेत पाऊस पडू लागला म्हणून.

अमोल म्हणाला, “मॅच का थांबली? माहिती आहे का? आपण नेवाळे मिसळला जाईपर्यंत काही मिस व्हायला नको म्हणून. ”

चांडाळचौकडीचा दौरा ताबडतोब चिंचवड बाजारात नेवाळे मिसळीकडे निघाला.

खादाडी, गप्पा, खाणं – सगळं मनसोक्त झाल्यावर, साळसूदपणे नेहा घरी येण्यापूर्वीच अमोल घरी परतला.

त्याने चेहऱ्यावर थकवा आणला.

शर्ट विस्कटला.

लॅपटॉप बॅग सोफ्यावर टाकली.

आणि चेहऱ्यावर शक्य तितका ‘कॉर्पोरेट शहीद’ असल्याचा भाव आणला.

नेहा आत आली.

काय रे? ”

काय सांगू…” अमोलने दीर्घ श्वास घेतला. “खूप मोठी मीटिंग होती. ”

हं. ”

सुट्टीच्या दिवशी यावं लागलं, सगळे वैतागले होते. ”

हं. ”

पण सर्व्हरचा प्रश्न गंभीर आहे. ”

हं. ”

अमोलला वाटलं, काम झालं.

नेहा पाणी प्यायला गेली.

मग अगदी सहजपणे म्हणाली, “आज स्वातीचा फोन आला होता. ”

स्वाती – नेहाची मैत्रीण, रवीच्याच सोसायटीत रहायची.

अमोलच्या हातातला मोबाइल थांबला. “स्वाती? ती तर ट्रेकला येणार होती ना, तुझ्याबरोबर. ”“हो. पण तिच्याकडे अचानक पाहुणे येणार होते, म्हणून कॅन्सल झालं तिचं. तिने विचारलं—अमोल का आला नाही ट्रेकला म्हणून. ”

अमोलच्या घशात काहीतरी अडकलं. “तिला कसं कळल मी ट्रेकला नाही ते? ”

अमोल, ती रवीच्याच सोसायटीत राहते. आजची तुम्हा मित्रांची रवीच्या घरची पार्टी आणि नेवाळे दौरा हे सगळंच तिनं पाहिलं आणि मला सांगितलं आहे. ”

घरात शांतता.

अमोलने हळू आवाजात विचारलं,

तिनं तुला सगळं सांगितलं? “

नेहा शांतपणे म्हणाली, “अमोल, मला एकच सांग. ”

हं…”

तुला ट्रेकला यायचं नव्हतं, एवढंच ना? ”

हो. ”

मग सरळ सांगितलं असतंस. ”

अमोलने हळू आवाजात उत्तर दिलं, “माझं काही न ऐकता, ट्रेक माझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणत तू मला खेचत घेऊन गेली असतीस. ”

हो. ”

म्हणून मी…”

खोटं बोललास. ”

हो. ”

नेहा हसू लागली. “ठीक आहे. ”

अमोलला आशा वाटली. “म्हणजे? ”

म्हणजे काही नाही, उद्या सकाळी सहा वाजता आपण दोघं तिकोना किल्ल्यावर जाणार. ”

अमोलचा चेहरा उतरला.

अगं, पण तू आजच जाऊन आली आहेस ना! ”

हो. ”

मग पुन्हा कशाला? ”

ट्रेक तुझ्या आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून. ”

.. अमोल गप्प.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता नेहा ट्रेकिंगच्या शूजमध्ये तयार उभी होती.

अमोल तिच्या मागे उभा होता.

चेहऱ्यावर झोप… डोळ्यांत दुःख… आणि हातात पाण्याची बाटली.

नेहा म्हणाली, “चल. ”

अमोलने एकदा आकाशाकडे पाहिले. मग म्हणाला, “नेहा… ”

काय? “

तिकोना गडावर मिसळ मिळते का? ”

नेहाने मागे वळून पाहिलं. “नाही. आणि तरीही आपण ट्रेकला जाणार आहोत. ”

आणि अमोलला तेव्हा एक अंतिम सत्य समजलं—

क्रिकेटमध्ये Rain Delay असतो, ऑफिसमध्ये Emergency Meeting असते, पण बायकोच्या हातात पुरावा आला की कुठलाही Delay काम करत नाही.

आणि त्याहून महत्त्वाचं—

बायकोला फसवणं कठीण आहेच; पण तिच्या मैत्रिणींच्या नेटवर्कला फसवणं अशक्य आहे.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares