(श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख)
काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं…. “माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!” या अर्थानं अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी!!!!!
दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये…..!
असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा…..
नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर!!! मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं. अत्रेंचं तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे….
अत्र्यांच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पु.ल.नी अचूक पकडला आणि म्हणाले,
‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीति का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात, अत्रेसाहेब आपण आहात.’’
टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
“मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.”
आचार्य अत्र्यांचा शब्द पु.ल.नी खोटा ठरू दिला नाही. अत्र्यांच्यानंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पु.ल.नी चोख केले….!!!
गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा:…. याचंच मनोहारी दर्शन वरील प्रसंगातून सतेज दृग्गोचर झालं…!!!
संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदलपूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते.
गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे आदिवासी पुरुष, लाकूड-फाटा आणि मध, डिंक, चिंचा, आवळे, सीताफळे असा रानमेवा गोळा करून पसरट चौकोनी टोपल्यातून डोक्यावरून घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रिया मधून मधून दिसत होत्या. या स्त्रिया कानावर एका बाजूला उंच अंबाडा बांधतात. त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या, मण्यांच्या माळा घालतात. घट्ट साडी नेसलेल्या, पायात वाळे आणि नाकात नथणी घातलेल्या तुकतुकीत काळ्या रंगाच्या या स्त्रिया भोवतालच्या निसर्गचित्राचा भव्य कॅनव्हास जिवंत करीत होत्या. आरकू म्हणजे लाल माती.आरकू व्हॅली व परिसरातील आदिवासींना, वनसंपत्तीला संरक्षण देणारे विशेष कायदे आंध्र प्रदेश सरकारने केले आहेत. व्हॅलीतील सुखद,शीतल वास्तव्य अनुभवून आम्ही छत्तीसगडमधील जगदलपूर इथे जाण्यासाठी निघालो.
जगदलपूर हे बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बस्तरच्या खाणाखुणा पाषाण युगापर्यंत जातात. प्राचीन दंडकारण्याचा हा महत्वपूर्ण भूखंड आहे. हा सर्व भाग घनदाट जंगलसंपत्तीने, खनिजांनी समृद्ध आहे.साग आणि साल वृक्ष, बांबूची दाट बने, पळस यांचे वृक्ष तसेच चिरोंजी, तेंदूपत्ता,सियारी म्हणजे पळस, आंबा, तिखूर सालबीज, फुलझाडूचे गवत, रातांबा आणि कित्येक औषधी वनस्पतींनी श्रीमंत असं हे जंगल आहे. या पूर्व घाटातील बैलाडीला या पर्वतरांगांमध्ये अतिशय उच्च प्रतीच्या लोहखनिजाचे प्रचंड साठे आहेत. ब्रिटिशांनी दुर्गम प्रदेशातील या खनिजसंपत्तीचा शोध लावला. बस्तर संस्थानच्या भंजदेव राजाला फितवून त्यांना हैदराबाद प्रमाणेच हे संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते. भारताची आणखी मनसोक्त लूट करायची होती. पण पोलादी पुरुष सरदार वल्लभाई यांनी १९४८साली बस्तर संस्थान खालसा केले. विशाखापट्टणम ते जगदलपुर ही पूर्व घाटातून ५४ बोगदे खणून बांधलेली रेल्वे जपानने बांधून दिली. १९६० साली जपानबरोबर ४० वर्षांहूनही अधिक वर्षांचा करार करण्यात आला. बैलाडीलातील समृद्ध लोहखनिज खाणीतून काढून कित्येक किलोमीटर लांबीच्या सरकत्या पट्ट्यांवरून मालगाड्यात भरले जाते. तिथून ते विशाखापट्टणमला येते आणि थेट जपानला रवाना होते. कारणे काहीही असोत पण जपानबरोबरचा हा करार अजूनही चालूच आहे. ब्रिटिशांच्या, जपान्यांच्या बुद्धिमत्तेचे, चिकाटीचे, संशोधक वृत्तीचे कौतुक करावे की वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या देशाची केलेली लूट पाहून विषाद मानावा अशी संभ्रमित मनस्थिती होते.
☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित ☆
माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच….
आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो, त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत… वडिलांची आणि सासर्यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले..”बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे” असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.. तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता मी एकटा जाऊ शकतो तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला..हसतील मला सगळे..”
म्हणुन सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो.. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो.. मला कळून चुकलय की त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे कदाचीत थोडासा दुर्लक्षित…
आता मी संध्याकाळी फिरायला जातो.. तेवढाच माझाही वेळ जातो.. रोजचा मार्ग ठरलाय माझा agricultural college च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी.. त्या मार्गावर एक दोन शोरूम आहेत चार-चाकी गाड्यांच्या.. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते.. म्हणुन मग येता जाता त्या शोरूम मधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरूनच..
पण एक दिवस त्या शोरूम मधे एक वेगळीच गाडी दिसली काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवल होत. कुतुहल वाटल म्हणून आत गेलो.. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला.”yes sir कुठली गाडी बघताय” नाही….म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला.. ही एव्हढी जुनी तुमच्या शोरूममधे कशी काय हा विचार करतोय. “सर ही vintage car आहे 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”
का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे या गाडीवर मात्र तो नाही.”सर ही विंटेज कार आहे हिची किंमत ठरवता येत नाही..ज्याला या गाडीच मोल कळेल तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”
मी शोरूम मधून बाहेर पडलो..कसला तरी विचार येत होता मनामधे पण नक्की कळतं नव्हत काय ते..
असेच मध्ये काही दिवस गेले रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.
गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते.. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा..जरा उदासच होतो मी पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.. “आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते रोड वायडिंग मधे ते पाडणार होते.. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं.. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणुन ते महत्वाचं आहे.”
त्या गाड्यांच्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर जस वाटलं होतं तसच काहीसं वाटून गेलं.
सुनबाई म्हणाली “बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची..इतकी वर्षे आई करायच्या म्हणुन वाटत आज तुम्ही करावी..” मी पण तयार झालो..
आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती.. जेवायला तांब्याची ताट काढली.. मुलगा म्हणाला ” अगं आज तो काचेचा सेट काढायचा ना”
“अरे असू दे आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट… त्या सेट मधली आता फक्त ताटचं उरली आहेत म्हणुन मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी आईची आठवण म्हणून.”आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.
अचानक मला त्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला..मौल्यवान या शब्दाचा.. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड काही तरी इशारा करत होते..
आता माझे मला समजले होते मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो..
आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने.. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कार सारखं आहे… एकदम स्पेशल..
✍ सौरभ साठे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(हृदयस्पर्शी अनुभव ) –जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!
मी असं ऐकलंय, की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो… आपला हा पण खेळ आता अर्ध्यावरच मोडेल ना बाबा….?
बोला ना बाबा, गप्प का?
बाबा, तुम्ही आणि आई मला देवाघरी रहायला पाठवणार आहात ना?
का? मी मुलगी आहे म्हणुन…?
मुलगी असणं दोष आहे का बाबा?
तुमची आई, पण एक मुलगीच आहे ना…!
बाबा, देवाचं घर कसं असतं हो…?
तीथं आई-बाबा पण असतात की आईबाबांना नको असणा-या माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात…..?
सांगा ना बाबा, तुम्ही गप्प का?
बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी रहायला का पाठवताय? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का?
मी ना बाबा, आपल्या मनीमाऊ सारखी काॕटखाली झोपून राहीन एकटीच, तुम्हाला आणि आईला मी कध्धी कध्धी त्रास देणार नाही बाबा…. मला नका ना पाठवू देवाघरी…. प्लीज बाबु…!
बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही…. आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही….
खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण यातलं एकही खरं होणार नाहीये.
मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो, पण मला काय माहित… जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात ते, कायमचं!
आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे.
आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा….?
पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला बाबा??
फक्त एकदाच लाडानं कपाळावरुन हात फिरवाल बाबा…???
बोला ना बाबा, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे…. रात्र संपत चालली आहे…. बोला ना बाबा… बोला ना…
बापरे…. बोलता बोलता सकाळ झाली…. तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा…???
आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील…
तुम्ही हे बघू शकाल का बाबा?
फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमाकाकुला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डाॕक्टर काका… बाबा तुम्ही सहन करू शकाल हे…?
बाबा, हे डाॕक्टर काका, मला आणि आईला घेवुन कुठे चालले आहेत…?
कसले कसले आवाज येताहेत इथं बाबा… मला भिती वाटत्येय… आईला थांबवा ना… या डाॕक्टर काकांना थांबवा ना… बाबा थांबवा ना यांना प्लीज…
डाॕक्टरकाका, तुम्ही तरी ऐका… मी माझी बाहुली देते तुम्हाला… हवं तर माझ्याकडची सर्व चाॕकलेट्स देते… पण आईबाबांपासुन दूर नका ना करु मला काका….
बाबा, तुम्ही माझा हात नका ना सोडु… प्लीज बाबु… सांगा ना या डाॕक्टरकाकांना… आई, तू तरी सांग ना… तू गप्प का…?
असह्य वेदना होत आहेत बाबा मला….
बाबा मला वाचवा…. बाबा मला वाचवा…. बाबा…. बाबा… बाबु…. बाबड्या…!
….. बाबा रडताहात तुम्ही?
आता नका रडु… गेले मी केव्हाच तुमच्यामधुन…
तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत, तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार, लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कध्धी कध्धीच सापडणार नाही बाबा, दारामागुन आता तुम्हाला भ्भ्वाँव करायलासुद्धा मी येवु शकणार नाही… आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कध्धीच हरवायला येणार नाही बाबा… तुम्ही जिंकलात बाबा कायमचे!
तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे, आभाळात…. तुम्हालाही तेच हवं होतं ना…?
जाऊदे बाबा, आता मला कसलाही त्रास होत नाहीय, कसली ही वेदना नाही, संवेदना सुद्धा नाही…. मी या पलीकडे गेले आहे.
सारं कसं शांत शांत झालंय बाबा…
आता शेवटचा… अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल….?
आता फक्त एकदा एकदाच कुशीत घेउन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल???
चिडवा ना बाबा…प्लीज…. शेवटचं… मी नाही रागावणार तुमच्यावर…!
देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठे म्हणा…!
नोकरी – व्यवसाय 2012 मधे VRS घेवून RBI मधून निवृत्त !
साहित्य निर्मिती –
RBI मधे असतांना बँकेच्या हाऊस मॅगझीन मधून (Without Reserve) इंग्रजी कविता प्रसिद्ध.
RBI मधील ‘मराठी वांग्मय मंडळाच्या’ बोर्डवर त्या त्या वेळच्या चालू घडामोडीवर विनोदी टीका टिप्पणी करणारे लेखन. RBI स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित एकांकिका लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक.
RBI मधून निवृत्त झाल्यावर सुमारे दोनशेच्या वर कविता, चारोळ्या, ललीत लेख व विनोदी प्रहसन यांचे लेखन.
“सिंगापूर मराठी मंडळाच्या” अंकातून कविता प्रसिद्ध. तसेच त्यानी आयोजित केलेल्या कविता स्पर्धेत कवितेची निवड आणि त्याचा मधुराणी प्रभुलकर आयोजित “कवितेचे पान – सिंगापूर !” या web series मधे छोटया मुलाखतीसह समावेश !
विविधा
??? बैठक !????श्री प्रमोद वामन वर्तक
मी तरुण असतांना (अर्थात वयाने !) जे काही शब्द प्रचलित होते, त्यातील “बैठक” हा शब्द, सांप्रतकाळी नामशेष झाल्यात जमा आहे !
“अहो जोशी काकू, तुम्ही तो नवीन आणलेला फ्लॉवर पॉट द्याल का आज संध्याकाळी, थोडा वेळासाठी ?” “हो न्या की, त्यात काय विचारायचं मेलं ? आज काही खास आहे वाटत घरी ?” “अहो, आमच्या सुमीच्या लग्नाची ‘बैठक’ आहे संध्याकाळी !”
असे संवाद त्या काळी, लग्न सराईत म्हणजे लग्नाच्या सीझन मध्ये चाळी चाळीतून ऐकायला मिळत असतं ! या संवादात फक्त फ्लॉवर पॉटची जागा दुसऱ्याकडच्या, दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूने घेतलेली असायची, एवढाच काय तो फरक ! आणि हो त्या काळी लग्नाचा सीझन असायचा बरं का ! आत्ता सारखे दोन्ही पक्षांना सोयीचा मुहूर्त काढून, लग्न उरकण्याचा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता !
लग्न जमल्यावर, म्हणजे रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन, एकमेकांची पसंती झाल्यावर, लग्नाची ही “बैठक” साधारणपणे मुलीच्या घरी एखाद्या रविवारच्या सकाळी होत असे ! ही बैठक एकदाची यशस्वी झाली, की त्याच संध्याकाळी भावी जोडपे फिरायला जायला मोकळे ! या अशा लग्नापूर्वीच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोचलेल्या “बैठकी” पर्यंत, एकदा जमणाऱ्या लग्नाची गाडी आली, की भावी वधूपित्याला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत असे ! कारण नंतर कुठल्याच कारणाने असे “बैठकी” पर्यंत जमत आलेलं लग्न, देण्या घेण्यावरून मोडल्याची उदाहरण हातावर मोजण्या एवढी सुद्धा नसायची !
“ताई, उद्या माझी रजा हाय !” आमच्या कामवाल्या बाईने, सौ.ला एका सुप्रभाती आल्या आल्या, काम सुरु करायच्या आधीच, हसऱ्या चेहऱ्याने ही ललकारी दिली ! ते ऐकून सौ ने पण तिच्या इतक्याच, पण त्रासिक चेहऱ्याने तिला विचारलं, “अग मालू उद्या मधेच गं कसली तुझी रजा ?” यावर तिने लगेच हातातले भांडे हातातच ठेवून, नमस्कार केला आणि उत्तरली “उद्या आमच्या ‘तिरकाल न्यानी बाबांची बैठक’ हाय !” “बैठक म्हणजे ? तुझ्या त्या बाबांचं लग्न बिग्न ठरलं की काय ?” सौ ने हसत हसत पण खोडकरपणे विचारलं ! “काही तरीच काय ताई, आमचे बाबा अखंड ब्रमचारी हायत म्हटलं !” “अग मग बैठक कसली ते सांगशील का नाही ?” “अवो बाबांची ‘बैठक’ म्हणजे ते परवचन देनार आनी आमी समदी बगत मंडली, ते खाली बैठकीवर बसून ऐकनार !”
तर मंडळी, मालूच्या त्या उच्चारलेल्या वाक्यातील “बैठक” या शब्दाच्या, मला समजलेल्या नव्या अर्थाने, माझ्या शब्दांच्या ज्ञानाची बैठक थोडी विस्तारली !
“आजच्या ‘बैठकीत’ बुवांचा आवाज जरा कणसूरच लागला, नाही ?” शास्त्रीय संगीताची खाजगी बैठक संपल्यावर बाहेर पडतांना, असे संवाद कधी कधी कानावर येतात ! यात कणसूर म्हणजे नक्की काय, हे माझ्या सारख्या कान सम्राटाला, तीच बुवांची बैठक खूपच आवडल्यामुळे कळतंच नाही ! कदाचित माझी शास्त्रीय संगीताच्या जाणकारीची बैठक, फक्त कानापूर्ती मर्यादित असल्यामुळे असं झालं असावं ! असो !
हल्ली अनेक संघटनांच्या, राजकीय पक्षांच्या चिंतन “बैठका” होण्याचं प्रमाण वाढलं आहे ! अशा चिंतन बैठका मध्ये कसलं चिंतन होतं, ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्या बैठकामधे प्रवेश नसाल्यामुळे कधीच कळू शकत नाही ! हे बरंच आहे ! त्यांच चिंतन त्यांना लखलाभ !
फडावरची लावणी आणि “बैठकीची” लावणी असे दोन प्रकार असतात, असं ऐकून होतो ! हे दोन्ही प्रकार जरी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही, तरी अनेक मराठी तमाशा चित्रपटांनी माझी ही इच्छा पूर्ण केली, हा भाग निराळा ! फडावरच्या लावणीत नृत्यांगना बोर्डावर नाचत नाचत लावणी म्हणते आणि बैठकीच्या लावणीत, ती एकाच जागी बसून हाताची अदा, डोळ्याचे विभ्रम इत्यादी करून लावणी सादर करते !
या दोन्ही प्रकारात मला एक फरक जाणवला तो असा, की ही बैठकीची लावणी सादर करणारी नटी, फडावरील लावणी सादर करणाऱ्या नटी पेक्षा अंगाने थोडी जाडजुडच असते ! किंबहुना माझं आता असं स्पष्ट मत बनलं आहे की, उतारवयात शरीर थोडं स्थूल झालेल्या आणि स्वानुभवातून आलेल्या बौद्धिक बैठकीतून एखाद्या अशा नटीनेच, हा बैठकीच्या लावणीचा प्रकार शोधून काढला असावा ! असली तमाशा बहाद्दरच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील असं मला वाटत !
पूर्वीचे खवय्ये (का खादाड ?) लग्नात जेवण झाल्यावर, त्याच बैठकीत ताटभर जिलब्या किंवा परातभर लाडू संपवत असत, असं मी फक्त ऐकलंय ! असा प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचे भाग्य या पुढे कोणाला बघायला मिळणे दुरापास्त आहे, यात दुमत नसावे !
तसेच एखाद्या पैलवानाने एकाच सत्रात पाच हजार जोर, दंड बैठका काढल्या, ही पण माझी ऐकीव बातमी बरं का ! उगाच खोटं बोलून मी आपल्यातील संवादाची बैठक कशाला मोडू ?
“मग काय राजाभाऊ, येत्या शनिवारी रात्री कुणाच्या घरी ‘बैठक’ ठरली आहे ?” या गजाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नातील “बैठक” या शब्दात नानाविध अर्थ अभिप्रेत आहेत, हे आपल्या सारख्यांना वेगळे सांगायलाच नको ! ज्याने त्याने, आपापल्या बुद्धिमतेच्या बैठकीप्रमाणे त्याचे अर्थ लावावेत आणि आपली बुद्धिमत्तेची बैठक त्या शब्दाच्या मिळणाऱ्या नवनवीन अर्थाने विस्तारावी, ही विनंती !
एखाद्या पुस्तकाची समीक्षा करतांना, साक्षेपी समीक्षक (म्हणजे नक्की कोण ?) त्यात “पुस्तक चांगले उतरले आहे, भाषा चांगली आहे, पण लेखकाच्या विचारांची ‘बैठक’ नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करत्ये, (आता बैठक म्हटल्यावर ती वाटचाल कशी करेल, हे मला न उलगडलेलं कोडं बरं का !) हे शेवट पर्यंत वाचकाला कळतच नाही ! लेखकाच्या स्वतःच्या बौद्धिक विचारांचा, त्याच्या स्वतःच्याच डोक्यात गोंधळ उडालेला दिसतो, हे पुस्तक वाचतांना कळते आणि त्याचे प्रत्यन्तर पुस्तकात पाना पानांत प्रत्ययास येते !” अशी सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बैठकीचा कस पाहणारी बोजड वाक्य हमखास लिहून, हे साक्षेपी समीक्षक वाचकांच्या डोक्यातील गोंधळ आणखी वाढवतात, एवढं मात्र खरं !
“बैठक” या शब्दाचे आणखी बरेच अर्थ जे तुम्हांला ठाऊक असावेत पण मला ठाऊक नाहीत, ही शक्यता आहेच ! तरी आपण ते अर्थ मला योग्य वेळ येताच कळवाल, अशी आशा मनी बाळगतो !
शेवटी, आपली सर्वांची बौद्धिक बैठक, या ना त्या कारणाने नेहमीच उत्तरोत्तर विस्तारत राहो, हीच त्या जगदीशाच्या चरणी माझी प्रार्थना !
(हृदयस्पर्शी अनुभव ) –जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!
प्रिय बाबा,
साष्टांग नमस्कार !
बाबा…. अहो बाबा… झोपलात की जागेच आहात ?
अहो, मी इकडुन बोलतीये आईच्या पोटातून….
मला माहितीये, रात्र खुप झालीये आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय, मला जन्माला घालायचं की… मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं… ?
बाबु…. बाबा मी तुम्हाला प्रेमानं बाबु म्हणु…. ?
म्हणुद्या की हो… बाबु… !
बाबु, खरं सांगू मला यायचंय हो तुम्हाला भेटायला…. इतके दिवस आईच्या पोटात झोपले आता बाबु, तुमच्या कुशीत झोपायचंय मला… मला ना, श्वास घ्यायचाय हो बाबा.. फक्त एक श्वास…. !
बाबा परवाचं आईबरोबरच तुमचं बोलणं मी ऐकलंय…. मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही…. आणि मुलगी जन्माला आली तर ?
बाबु… नकोय मला गादी… मी तुमच्या मांडीवरच झोपेन ना…. नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नकोत मला… मी खेळेन बाई तुमच्याशीच बाबा…
बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टी फू करणार नाही बरं… बाबु… तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला… पण दाढी टोचली तरी मी अज्जिबात रागावणार नाही…
बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरुन घरी आलात ना, की दारामागुन मी भ्भ्वाँव करीन हां तुला… पण तुम्ही घाबरायचं हां बाई…
नायतर आमी नाय खेळणार ज्जा…
आई चहा करुन आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईन हां…
बाई गं… कपाळावरचे केस कुठं गेले बाबुड्या…. ?
टकलु हैवान झाले आहात नुसते… !
आँ… आईग्ग्ं…. गालगुच्चा नाही घ्यायचा हां आमचा… गाल दुखतात आमचे…. नाहीतर मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे…. बघा मग ह्हां… सांगुन ठेवते… !
आणि हो, बाबा… परवा माझ्या मैत्रिणींसमोर सारख्खं ठमाकाकु… ठमाकाकु म्हणुन चिडवत होतात ना मला…. ?
थांबाच आता, तुमच्या आॕफिसातले लोक घरी आले ना की, त्यांच्यासमोर मी पण तुम्हाला ढेरीपाॕम…. ढेरीपाॕम… म्हणुन चिडवेन….
ढोलुराम पळायला जात जा की जरा… !
काय म्हणालात… ?
हो, मी मुलगी म्हणुन जन्मले तरी तुमची आई म्हणुनच जगेन…. !
पण मला जन्माला तरी येवु द्या बाबा….
बाबा तुम्हाला वेणी घालता येते का हो ? नाही….?
कसा रे तू बाबड्या….!
बरं भांडीकुंडी तरी खेळता येतात का… ? नाही….???
बाई गं…. काहीच कसं करता येत नाही तुम्हाला… ???
मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय…?
आता लंगडी घालता येते का म्हणून अज्जिबात विचारणार नाही मी या ढेरीपाॕमपाॕमला… ढोलुराम कुठले… !
लहान मुलांना आपण शेकडो गोष्टी सांगतो. साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून सात-आठ वर्षांची होईपर्यंत सगळी मुलं गोष्टींमध्ये मनांपासून रमतात. या गोष्टींमधून मुलांचं स्वतःचं एक भावनिक, आभासी विश्व तयार होत असतं. त्यात राजा असतो, राणी असते, राजकन्या असते, म्हातारी असते, लबाड कोल्हा असतो आणि एक भला मोठा भोपळा सुद्धा असतो. ही सर्व मंडळी मुलांच्या लेखी खरोखरच अस्तित्वात असतात!आजी-आजोबा हा गोष्टी मिळवण्याचा मुख्य स्रोत! त्यानंतर रात्री गोष्टी ऐकत ऐकत झोपण्यासाठी आई लागते. बाबा लागतात.
या गोष्टीतल्या पात्रांमधल्या “म्हातारी” या पात्राबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे! वेगवेगळ्या गोष्टींतून ही म्हातारी येते. गोष्टी निरनिराळ्या असल्या, तरी मला म्हातारी नेहमी एकाच रूपातली दिसते. पांढरे शुभ्र केस, तोंडाचं बोळकं, बारिकशी कुडी, कमरेत वाकलेली, हातातली काठी टेकत टेकत तुरुतुरु चालणारी! डोक्यानं तल्लख! “एक होती म्हातारी” हे वाक्य ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर म्हातारीचं हेच चित्र उभं रहातं. म्हातारी आणि भोपळा यांचं नातं अतूट आहे. कुठल्याही मराठी माणसानं म्हातारीची ही विलक्षण कथा ऐकलेली नसेल, हे तर संभवतच नाही! पूर्वी कितीही वेळा ऐकलेली असली, तरी मुलं ही माहीत असलेली गोष्टच पुन्हा पुन्हा सांगायला लावतात! ती म्हातारी, तिची लेक, वाघोबा-कोल्होबा, शिरा-पुरी, तूप-साखर, लठ्ठलठ्ठ होण्याचं खोटं आश्वासन, भला मोठा भोपळा, आणि “म्हातारी बितारी मला नाही ठाऊक – चल रे भोपळ्या टुण्णुक टुण्णुक” असं म्हणत वाघोबा-कोल्होबाचा पार मामा करून टाकणं — हे सगळं ऐकतांना गुदगुल्या झाल्यासारखी खिदळणारी पोरं पाहायला मला आवडतात!! या गोष्टीचा शेवट दोन प्रकारांनी सांगितला जातो. पहिल्या प्रकारात वाघोबा-कोल्होबाच्या हातावर तुरी देऊन भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणून पोचवतो, असा शेवट केला आहे. दुसऱ्या प्रकारात, म्हातारी राखेच्या ढिगाऱ्यावर झोपते, मग वाघ तिला खायला येतो, आणि मग म्हातारी जोरात *???? फुस्स्स्स्!! राख उडते आणि वाघाच्या डोळ्यांत जाते. डोळ्यात राख गेल्यामुळे वाघ डोळे चोळत बसतो आणि भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणतो, असा शेवट केला आहे. मला दुसरा प्रकार ऐकायला खूप आवडायचा! आणि इतर बच्चे कंपनीला सुद्धा! पण एकूणच या म्हातारीने बालवाङ्मयात अढळपद मिळवलं!!!
म्हातारीची इतर रूप पाहतांना देखिल मला मजा वाटते. सांवरीच्या झाडाची, चवरीच्या आकाराची, पांढऱ्या तंतुंची, बुडाला हलकसं बियाणं चिकटलेली, हवेवर तरंगत तरंगत जाणारी म्हातारी पाहायला मला आवडते! सावरीची म्हणजेच शेवरीची शेंग तडकली, की अशा शेकडो म्हाताऱ्या एकदम हवेवर तरंगायला लागतात. त्यांच्या हातात हात घालून मला पण तरंगल्याचा भास होतो! (शेवरीची म्हातारी म्हटल्यावर आचार्य अत्रे यांची आठवण येणे अपरिहार्य आहे!)
सुकं खोबरं किसतांना शेवटी किसला न जाणारा असा चिवट पापुद्रा शिल्लक राहतो. त्याला म्हातारी हे नांव कां पडलं असावं, हे मला एक कोडं आहे. बहुधा मरू घातलेल्या, पण चिवटपणे जिवंत राहून आप्तेष्टांच्या पदरी गाढ निराशा टाकणाऱ्या म्हातारीचा ‘चिवटपणा’ हा गुण या पापुद्र्याला चिकटला असावा आणि हे नामाभिधान त्याला प्राप्त झालं असावं!
साखरेच्या गुलाबी रंगाच्या तंतुंच्या काडीभोवती गुंडाळलेल्या कापसाच्या गठ्ठ्याला म्हातारीचे केस असं कां म्हणतात, हे सुद्धा मला एक कोडंच आहे. आजकाल बऱ्याच खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्या, मेंदी लावून आपले केस लाल-भगवे करून घेतात. खरं म्हणजे त्यांना म्हातारपणांत सुद्धा गुलाबी रंगाचं वावडं नसावं! म्हातारीचे गुलाबी साखरेचे केस विकणारे, हातात एक हळुवारपणे किणकिणणारी घंटा घेऊन केस विकायला येतात. त्यांच्याकडे गुलाबी रंग मिळू शकेल हे या खऱ्या म्हातार्यांना कुणीतरी सांगायला हवं! कदाचित तो म्हातारीचे केस विकणारा, खऱ्या म्हाताऱ्यांच्या खऱ्या केसांना सुद्धा गुलाबी रंग लावून देईल!
पावसाळ्यात गडगडाट झाला, की आकाशातली पीठ दळणारी म्हातारी केवढी असेल, तिचं ते धान्य दळायचं जातं केवढं मोठं असेल, असं कुतुहल लहानपणी वाटायचं! आकाशातून सरसरत खाली पडणाऱ्या पिठाचा पाऊस कसा होतो, हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीतच आहे. पण त्या लहान वयात सगळं खरं खरं वाटायचं!!
म्हातारीच्या टोपलीतली बोरं चोरणाऱ्या कोल्होबाची गोष्ट तर आबालवृद्धांना अतिशय प्रिय! या कोल्होबाला अद्दल घडवायला म्हातारी होते सज्ज! हुशारच ती!! सणसणीत तापवून, लालबुंद केलेला तवा ती टोपली जवळ ठेवते. आपल्याला बसायला म्हातारीने रंगीत पाट ठेवलाय्, म्हणून कोल्होबा खुश्. ते त्या रसरशीत तव्यावर जरा बुड टेकून बसतात मात्र … आणि??? आणि हाहा:कार!!! कोल्होबा जीव घेऊन पळ काढतात. म्हातारीची हसून हसून पुरेवाट होते. जळके कुल्ले सांभाळत पळणाऱ्या कोल्होबाला म्हातारी खिजवून प्रश्न विचारते …
शहरी भाषेत
कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?
नको नको म्हाताऱ्ये, खोड मोडली!!
ग्रामीण भाषेत
कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?
नको नको म्हाताऱ्ये, * भाजली !!
तर अशी ही म्हातारी! लहान मुलांच्या गोष्टींतून, लोकवाङ्मयातून दिसणारी. ती डोक्याने तल्लख आहे, चटपटीत आहे, युक्तीबाज आहे, विनोदी आहे! ती लहान मुलांच्यात रमते आणि मुलं तिच्यात रमतात. मुलांच्या भावविश्वात तिचं स्थान अढळ आहे आणि म्हणूनच …
☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆
(Please visit->> www.snehwan.in)
आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा इथे स्नेहवन नावाची एक संस्था… श्री. अशोक आणि सौ. अर्चना देशमाने यांचा २३० जणांचा संसार ….
२५ व्या वर्षी संगणक क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुसऱ्यांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी अंगावर घेणे आणि ती व्यवस्थित पार पाडणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. अशोकजींच्या समर्पणाला आणि त्यांना तन आणि मनाने साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ला माझा सलाम !
२०२० मध्ये आलेली मरगळ झटकून देऊन २०२१ मध्ये काहीतरी खूप छान करायचे. मी, माझे कुटुंब आणि माझे घर यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे असा संकल्प मनी धरूनच या वर्षीची सुरुवात केली होती. त्यामुळे जेव्हा या संस्थेविषयी कळले त्यावेळी इथे नक्की भेट द्यायची आणि आपल्याकडून जी होईल ती मदत करायची हे मनात पक्क केलं होतं. ती संधी चालून आली आमच्या ब्राह्मण संघामुळे. यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे थोडा वेगळा साजरा करूयात ही कल्पना मंदारजी रेडे आणि केतकीताई कुलकर्णी यांनी मांडली आणि आम्ही सर्वानी ती उचलून धरली. याचा अर्थ असा नाही की या आधीचे सर्व व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरे केलेच आहेत :). पण काहीतरी वेगळं , ज्या समाजात आपण राहतो , ज्यांच्यामुळे आपल्याला ४ सुखाचे घास मिळतायत अश्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना जर स्नेहवनमार्फत आपणही छोटीशी मदत करू शकत असू तर करावी या हेतूने आम्ही २५ जणांनी स्नेहवनला भेट दिली.
तिथे गेल्या गेल्या अशोकजींनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि एका क्षणात आम्हाला आपलेसे करून घेतले. थोडा औपचारिक गप्पा तोंडओळख झाली आणि मग अशोकजीनी सांगितलेला त्याचा इथपर्यंतचा प्रवास ऐकून आम्ही सर्वजण स्तिमित झालो.
अशोकजींचे बालपण परभणीजवळील एका छोट्याश्या खेड्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थिती झाले. जिथे रोजच्या जेवणाची भ्रांत होती तिथे शिक्षणाची आस धरणे हे एक स्वप्नच होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने त्यांनी ते इंजिनिअर झाले आणि एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागले. नोकरी करत असताना ते विविध विषयांवरील पुस्तके, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करत होते. स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना सतत यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. नुसत्या गप्पा मारून अन चार कविता लिहून, पैसे देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत तर यासाठी वेळ दिला पाहिजे.
या विचारात असतानाच एका क्षणी त्यांनी ठरवले की आता मी यात उडी मारणार आणि स्वतःच्या आई वडिलांचा विरोध पत्करून त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्याकरिता वाहून घेतले. सुरुवातीला विरोधात असलेले आई वडील नंतर मुलाचा निर्धार बघून गावाकडील शेतीवाडी विकून पुण्यात मुलाच्या संसाराचा गाडा ओढू लागले. सुरवातीला भोसरी येथे ४ खोल्यांमध्ये ते तिघे आणि १८ मुले असे २१ जण जवळ जवळ ३-४ वर्षे राहत होते. थोड्याच दिवसात अशोकजींचा लग्नाचा विषय त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यात घोळायला लागला. पण लग्नाआधीच १८ ते २० मुलांचे पालकत्व स्वीकारलेल्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होणारी मुलगी मिळणे म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना तुम्ही जर मनापासून समर्पित होऊन जर एखादे काम करत असेल तर देवसुद्धा तुम्हाला त्याच्या परीने सर्व मदत करतो. अनेक वधुपरीक्षा झाल्यांनतर अर्चनाताई अशोकजींच्या आयुष्यात आल्या आणि ते ही रीतसर पद्धतीने दाखविण्याचा कार्यक्रम करूनच. अर्चना ताई आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या धाडसाचे ही कौतुक करावे तितके थोडे आहे. कुठल्याही आई वडिलांचे आणि मुलीचे स्वतःच्या लग्नाचे संसाराचे एक सुरेख चित्र असते. पण त्या चौकटीच्या बाहेर येऊन चित्र पूर्ण काढणे आणि ते रंगवणे ह्यासाठी पण एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी अर्चनाताई आणि त्यांच्या पालकांकडे होती म्हणून एवढा मोठा निर्णय ते घेऊ शकले.
१८ मुलांपासून सुरु केलेला त्यांचा संसार आज २३० मुलांबरोबर गुण्या गोविंदाने सुरु आहे. स्नेहवनात असलेले अनोखे उपक्रमही जाणून घेण्यासारखे आहेत.
१. वन बुक वन मूवी : स्नेहवनात भारतातील पहिली कंटेनर लायब्ररी आहे ज्यात १०००० पुस्तके आहेत. इथल्या प्रत्येक मुलाने दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर विवेचन करायचे. जो पुस्तक वाचून पूर्ण करेल त्याला एक चित्रपट पाहायला मिळेल. जो पुस्तक वाचणार नाही त्याला त्या आठवड्यात चित्रपट पाहायला मिळणार नाही. मग त्याला स्वतः अशोकजी आणि अर्चनाताईही अपवाद नाहीत.
२. रिंगण: इथली मुळे TV अजिबात पाहत नाहीत तर रोज संध्याकाळी सगळे मुळे एकत्र रिंगणात बसतात आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतात, आपली मते मांडतात. कधी कधी एखादा विषय दिला जातो आणि त्यावर प्रत्येकानी आपले मत , विचार व्यक्त करायचे. मग तो विषय माझी आई, माझे गाव, आपले पंतप्रधान असा काहीही असू शकतो पण ह्यामुळे ह्या मुलांच्यात लहानपणासूनच वक्तृत्व कला जोपासली जाते आणि विचारांना दिशा देऊन ते व्यक्त करण्याचे धाडस येते. त्यामुळे ही मुळे ५०० लोकांसमोर सहज बोलू शकतात.
३. सोलर प्लांट : स्नेहवनचा संपूर्ण परिसर हा सोलर पॉवरवर चालतो. इथली मुलेच हा प्लांट पण सांभाळतात.
४. बायो गॅस : इथे प्रत्येक जण स्वतःला लागणार गॅस स्वतः तयार करतो. हा पूर्ण प्रकल्प पण मुलेच सांभाळतात.
५. कॉम्पुटर लॅब आणि अकाउंटिंग : लॅब चे व्यवस्थान आणि हिशोबाचे काम ही मुलेच पाहतात. कुणालाही काहीही लागले तरी तो तो विभाग पाहणाऱ्या मुलांना विचारूनच सगळे कामे केली जातात. अगदी अशोकजीसुद्धा या मुलांच्या सल्ल्यानेच काम करतात
६. संगीत, चित्रकला, योगाभ्यास : दर शनिवारी आणि रविवारी इथे बाहेरील शिक्षक येऊन मुलांना गाणे , चित्रकला आणि योगाचे धडे देतात आणि त्यांची चौफेर प्रगती होईल याकडे लक्ष देतात
७. गौ-शाळा : स्नेहवनची स्वतःची गौशाला आहे त्यात २ गीर गायी आहेत. त्यामुळे त्यांना लागणारे दूध दुभतेही त्यांना इथेच उपलब्ध होते.
८. जैविक शेती : स्नेहवनला लागणार रोजचा भाजीपाला ते त्यांच्याच आवारात पिकवतात ते ही जैविक पद्धतीने. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता.
अश्या एक ना अनेक गोष्टी इथे पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. एक अतिशय स्तुत्य उपक्रम बघून , एकमेवाद्वितीय असा अनुभव घेऊन भारलेले आम्ही सर्वजण पुढील अनेक दिवसांसाठी अनोखी ऊर्जा घेऊन तिथून बाहेर पडलो.
प्रत्यकाने जाऊन जरूर पाहावे आणि अनुभवावे असे हे स्नेहवन , नक्की भेट द्या !!!
स्नेहवन संपर्क- 87964 00484
www.snehwan.in
सौ. शिल्पा महाजनी
संग्राहक – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
चित्रकला हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्या वेळी भाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आदिमानव आपल्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करीत होता. अश्मयुगातील गुहाचित्रातून हे स्पष्ट झाले आहे. आज ही चित्रकला आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. लोककलेची ओळख करून घेऊ.
आबालवृद्धांना चित्र पाहणे आवडते. सरळ साधी सोपी चित्रे सहज समजतात.त्या चित्रातील रंग आकर्षक असतील तर ती चित्रे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. मधुबनी शैलीची चित्रे सर्वांग सुंदर आहेत.त्यातील विषय,आशय, रंग बघताक्षणी आपल्या खिळवून ठेवतात.
मधुबनी पेंटिंग हा बिहारचा सांस्कृतिक ठेवा आहे.हा चित्र प्रकार सुंदर आहे.ही चित्रे छान तेजस्वी रंगात रंगवलेली असतात. रेखांकन मुक्त असते. पाने, फुले, पक्षी, प्राणी, मासा, देवदेवता, किती सहजतेने काढलेली असतात. १९३४ साली बिहार मध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा या भागाची पाहणी करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी तिथे आला तेंव्हा भूकंपात पडलेल्या घराचच्या भिंती वर सुंदर चित्रे दिसली.त्या चित्राचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो या चित्र शैलीचे सर्वात जुने नमुने आहेत. ही चित्रे गावातून बाहेर कधी आलीच नव्हती. ही चित्रेशैली आजवर बिहार मधील महिलांनी जोपासली. बिहार मधील काही गावं चा गावं या चित्र शैलीने सजलेली दिसतात. प्रत्येक घरातील चार वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या महिले पर्यत सर्वजण ही चित्रे काढतात. जणू ही चित्र शैली त्यांच्या रक्तातून धावत आहे.
बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात ही कला विकसित झाली. म्हणून याला मधुबनी पेंटिंग/शैली म्हटले जाते. मधुबनी बरोबर दरभंगा, पूर्णिया, सहसा, मुजक्कापूर व नेपाळचा काही भाग यातून ही चित्रे काढली जातात. ही कला पुरातन काळा पासून प्रचलीत आहे असे मानले जाते. जनक राजाने आपली कन्या सीता हीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात, गावात ही चित्रे काढून घेतली होती. म्हणून या कलेला मिथिला पेंटिंग/शैली म्हणून ही ओळखली जाते. रामायण काळापासून ही कला चालत आली आहे.
या चित्र शैलीचे दोन प्रकार
१) भिंती चित्रे
२)अरिपन चित्रे
१) भिंतीवर चित्रे काढण्याचे दोन प्रकार पडतात अ) गोसनी म्हणजे देवघराच्या भिंतीवर काढायची चित्रे यात दुर्गा, काली, गणेश, सूर्य, राधाकृष्ण या विषयावर चित्रे. काढतात.
ब) कोहबर म्हणजे शयन कक्ष इथे प्रमुख्याने कमळ,मासा,झाडे, शिवपार्वती,घोडा,सिंह इ.चित्रे रेखाटली जातात.
२)अरिपन म्हणजे रांगोळी. अल्पना ही म्हणतात. घरातील खोलीच्या फरशीवर, अंगणात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.त्यात रेषेला जास्त महत्त्व असते.
ही चित्रे काढण्यासाठी बांबूच्या काटक्या, काडेपेटीच्या काड्या यांचा उपयोग होत असे.ही चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.हळदी पासून पिवळा,पळसा पासून लाल,काजळी पासून काळा,तांदळा पासून पांढरा.
चित्राचे रेखांकन प्रथम काळ्या रंगाने करून घेतले जाते. मग त्यात लाल,पिवळा,हिरवा,निळा हे रंग भरले जातात.बार्डर दुहेरी असते.चित्रातील चेहरे व्दिमित एका बाजूला पाहणारे असतात.ही चित्रे सहज समजतात.त्यांतील भाव कळतात .चित्रे आपल्याशी बोलतात म्हणून तर ही चित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून पोहचली.परदेशातून या चित्रांना मोठी मागणी आहे.विशेषत: अमेरिका,जपान.जपान मध्ये मधुबनी कलेचे मोठे म्युझियम आहे.या कलेच्या प्रसार करण्यासाठी १५० महिला कलाकारांनी मधुबनी रेल्वेस्थानक विनामोबदला सुशोभित केले आहे.नंतर दरभंगा, पूर्णिया,सहसा,मुजक्कापुरही रेल्वे स्थानके ही सुशोभित केली.ही कला केवळ महिलांन मूळे जिवंत आहे.आज पर्यंत महिलांनी टिकवली आणि विकसित केली.या चित्राची वाढती मागणी पाहून पुरुष चित्रकार ही आता तयार झाले आहेत.पण या कलेच्या विकासाचे आणि संवर्धनाचे सारे श्रेय महिलांनाच जाते.
मधुबनी चित्रात साधेपणा दिसतो.बघता क्षणी मनाला भावतात.मनुष्य,पशुपक्षी,देवीदेवता, राधाकृष्ण, शिवपार्वती,फळे फुले,शुभचिन्हे,चित्रे काढली जातात.मातीच्या भिंतीवर, कागदावर, काॅन्व्हासवर, पिलोवर ही चित्रे काढली जातात. सीता देवी यांनी ही कला गावातून बाहेर काढली. दिल्लीत चित्रे पाठवली, प्रदर्शने मांडली, लोकांन समोर मांडली. लोकांना चित्रे समजू लागली मागणी वाढू लागली स्थानिक महिलांना रोजगार मिळू लागला.परदेशातील आर्ट गॅलरीत ही चित्रे पोहचली.चित्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली. सीतादेवींच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारने पुरस्कार देवून १९६९ मध्ये सन्मानीत केले, तर भारत सरकारने १९८४ ला पद्मश्री देवून सन्मानित केले. ही कला विकसित होण्यास जगदंबा देवी,महासुंदरी देवी,बउआ देवी या महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांना ही पद्मश्रीने सन्मानीत केले आहे.
या कलेचे महत्त्व इतके वाढले आहे की स्टेट बॅक ऑफ़ इंडियाने आपले डेबीट कार्ड या चित्राने सुशोभित केले आहे. अनेक रेल्वेचे डबे या चित्राने सजत आहेत.ह्या चित्रातील साधेपण आपल्या आकर्षित करतो.ही कला कलाकारी न राहता आता कारागिरी झाली आहे. अनेक महिला या कलेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही कला केवळ बिहार ची न राहता भारताचा सांस्कृतिक ठेवा झाली आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.
बाई म्हणजे माझ्या सासूबाई, दहाबारा दिवसांपूर्वी त्यांचे देहावसन झाले.मला अखंड कुतूहल वाटायचे त्यांच्या नावाबद्दल, व्यक्तिमत्वा बद्दल आणि एवढ्या दीर्घायुष्याबद्दल.
इथे माझ्या सासऱ्यांचा उल्लेख केलाच पाहिजे ‘ कै नारायण घाडगे ‘ सहा फुटांपेक्षा जास्त उंची, गौर वर्ण आणि चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न,समंजस हास्य,कुठल्याही मदतीला सदैव तत्पर व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला त्यांना पाहिलं ते लाल रंगाचा स्वेटर घालून घराजवळच्या बागेत बंबासाठी लाकडे फोडताना. त्या
पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व अगदी एखाद्या इंग्रजी पिक्चर मधील कलाकारासारखे दिसत होते.
याच्या अगदी विरुध्द बाईंचे व्यक्तित्व. ठेंगणाठुसका बांधा, सावळा नाहीच काळ्याकडे झुकणारा वर्ण आणि नाकीडोळी मात्र ठसठशीतपणा,कपाळावर मोठे कुंकु आणि चेहऱ्यावर आत्म प्रौढी मिरवणारे दिमाखदार हास्य.त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव प्रतीत व्हायचा.अखंड स्वत:च्या तालात असणारे व्यक्तित्व.जणू तो अहंकार त्यांच्या
शरीरालाच चिकटलेला होता आणि तो शेवटपर्यंत तसाच राहिला.
त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता होती, नेतृत्वगुण होते शिवाय ज्ञानप्राप्तीची आवड होती,त्यामुळे सतत सल्ला विचारण्यासाठी माणसे येत असत.कधीही फक्त स्वतः च्या कुटुंबाचा विचार करायचा नाही, आपल्या मुलांबरीबरचं त्यांच्या मित्रांनाही खाऊपिऊ घालायाचे.त्या काळी एस टी मध्ये काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न ते किती असायचे,पण त्यातूनही सतत परोपकार करत राहायचे.आपली पाच मुलं जशी तशी ती सुध्दा आपलीच मुलं मानायच्या आणि त्यांना शिकण्या साठी सक्रिय प्रोत्साहन द्यायच्या.
त्याची पाचही मुले उच्च शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी.त्या स्वतः साठ वर्षांपूर्वीच्या म्याट्रिक आणि माझे सासरे संस्कृत मध्ये एम ए होते.(कै नारायण घाडगे विट्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील सुरुवातीच्या शिक्षकांपैकी एक होते) त्यामुळे दोघांनाही शिक्षणाविषयी आस्था होती.त्याची मुले माझे मोठे दिर श्री अविनाश घाडगे मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले, श्री दिनेश घाडगे विट्यातील शिवसेनेचे संस्थापक, श्री सुरेश घाडगे सोलापूर ट्रेनिंग सेंटर येथे DYSP म्हणुन कार्यरत, कै अधिवक्ता सतीश घाडगे प्रथितयश वकील, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे तालुक प्रमुख होते आणि कै राजेश घाडगे यशस्वी वेट लिफ्टर होते.
या सर्वांबरोबर श्री लालासाहेब पवार आणि श्री अरुण फडतरे हे त्यांचे मानसपुत्र देखिल उच्चशिक्षित झाले. पवार सरांनी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांचा कोणताही शब्द डावलला नाही.
बाईंचे माहेर वाई. अागदी नदीकाठालगत ब्राम्हणपुरी मध्ये. त्यामुळे शुद्ध सडेतोड भाषा, ओचा पदर खोचलेली नऊवार साडी आणि आंबाड्यावर खोचलेले एखादे फूल नेहमीच त्यांना शोभून दिसत असे. त्यांचे माहेर देखिल सुशिक्षितच. वडिल शिक्षक होते आणि भाऊ मामलेदार, आई मात्र लहानपणीच वारलेली मग कर्तेपणाने लहान बहिणींची लग्ने बाई भावजींनीच करुन दिली. त्यामुळे सारेच सासऱ्यांना भावोजी म्हणू लागले.
बाई आपल्या वडिलांकडून काही औषध देण्यास शिकल्या होत्या. त्यामुळे काविळीचे औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच लोक येत. त्या देखिल सकाळी सकाळी ओचा पदर खोचून, आजूबाजूला फिरून काही वनस्पती गोळा करत आणि त्या वाटून रस काढून पिण्यास देत, वरुन काही पथ्य सांगत.त्यामुळे मी डॉक्टर असले तरी सुरुवातीला आमच्याकडे येणारे रुग्ण बाईंकडून औषध घेण्यासाठी येत.
अशी ही कृष्णा काठची लेक घाडगेवाडी सारख्या दुष्काळी गावात आली आणि त्या गावची होतकरू व्यक्ती झाली.
तिथली खडकाळ शेती विट्यातील मैत्रिणींना बरोबर घेऊन केली.
या कृष्णा काठच्यां लेकीचे सासरीही तसेच लाड झाले, शिकलेली ज्ञानी म्हणुन. अगदी तिच्या थोरल्या जावेणे, म्हाताऱ्याआईने, इंदुला सिनेमा बघायला आवडते म्हणुन
आपल्या दिराला बैलगाडी जुंपायला सांगावे आणि ती परत येईपर्यंत भाकरी कालवण करुन ठेवावे.
पोथ्या, पुराणे, पचांग जाणत असल्या तरी बाई विचाराने पुरोगामी होत्या. रोजचे वर्तमान पत्र वाचणे आणि टीव्ही वरच्या बातम्या पाहणे हे त्यांचे शेवटच्या पाचसहा वर्षां पूर्वीपर्यंत चे छंद होते. आपल्या मुला, नातवंडांनी आपल्या मर्जीने केलेली लग्न त्यांनी स्वीकारली होती.
आम्हा सुनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वभावानुसार फार लावून घेतले नाही, पण आमच्या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाला कधी बाधा आणली नाही. माझ्या मोठ्या जाऊबाईंच BA Bed, नंतरच्या BSc,नंतर MSc Bed आणि माझे BAMS या साऱ्या पदव्या लग्नानंतर घेतल्या गेल्या आहेत आणि आम्ही साऱ्याजणी स्वतः चा पायावर उभ्या आहोत, यातच सारे काही आले.
बाईंच्या नातसूनांनीही ही परंपरा पुढे चालवली. सौ कविता MA Bed, सौ अमृता Phd,. सौ अनुजा ME, त्याचबरोबर त्यांची सारी नातवंडेही उच्च शिक्षित असून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.
त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नातावंडाला दिलेले वेगवेगळे नाव बाळक्या,गुंड्या,पप्या ही त्यापैकी काही. सगळ्यात लहान नात म्हणजे माझी मुलगी.तिला त्या नेहमी आवडे या नावानेच हाक मारत. असा बाईंच्या वारसांचा वटवृक्ष विस्तारला आहे. एक सुफळ संपुर्ण आयुष्य त्यांना लाभले.
सारं आयुष्य भरल्या घरात, खूप माणसं अवतीभोवती असं गेलं त्यामुळे थोडथोडक काही करायचं माहीतच नाही, जे केलं जायचं ते अगदी डबे भरभरून असायचं.भाकरी चपाती बरोबर पुरणाची पोळीही पोळपाट भरुन लाटली जायची, त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जेव्हा नवरा, आणि दोन तरुण मुलं यांचं जाणं बघावं लागलं, घरातली माणसं कमी झाली तसा स्वभाव अधिक दुराग्रही झाला. तरी त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती आणि त्यांच्याजवळ वर्तमान काळात जगण्याची हातोटी होती.
बरीच वर्षे मला कोडे पडले होते त्यांना बाई का म्हणत असावेत आणि विशेष म्हणजे त्यांना बाई म्हटलेले आवडायचे, आपल्या परतवंडांना ही त्या स्वतः ला बाई म्हणायला शिकवत, तसे त्यांचे नाव इंदिरा ठेवले होते.
नंतर मी कोठेतरी वाचले की महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वी घरातली मोठ्या मुलीला बाई म्हणायची पद्धत होती, जसं ताई, अक्का तसं बाई. म्हणजे बाई हे त्यांचे माहेरचे नाव होते आणि म्हणुनच त्यांना बाई म्हटलेले आवडायचे.