मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिकवण… लेखिका : श्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

?

☆ शिकवण… लेखिका : श्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.

छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.

मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.

मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”

“अग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.

आई म्हणाली,” नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”

एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.

मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की ग आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.

आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.

आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.

त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”

“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे.” आजीने डोळे पुसले.

मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात.

त्या म्हणाल्या,”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”

मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”

मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे त्यांना नोकरी लावून दिली व डॅाक्टरना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.

आई, तू किती चांगली आहेस ग! म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली,” तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं…

कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं.

“अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एका प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.

“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतय. एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं. ” आई म्हणाली.

“मग आई या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.

आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behaviuor therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्याची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”

मी आईकडे अभिमानाने बघितलं. १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.

मी आईला घट्ट मिठी मारली! “आई ग तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”

आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असते. आत लपलेले बरच काही आपल्याला सहजी दिसत नाही..

Before you judge someone, at least walk a mile in his shoes म्हणतात ते उगीच नाही!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हत्तीची आजी – – ☆ प्रा. भरत खैरकर 

कोकणामध्ये आंबोली घाट उतरून खाली गेलो की हिरण्यकेशी नदीचा उगम आहे.. तिथून अजून खाली उतरलो तर तिलारी नावाचा एक मोठासा जलाशय आपणास दिसतो.. आणि अजून खाली उतरलं तर मग गोवा बॉर्डर सुरू होते.काही अंतरावर कर्नाटक बॉर्डर  आहे. त्या निसर्गरम्य भागात राहणाऱ्या एका गावातील आजीची ही गोष्ट..

कोकणामध्ये पंधरा-वीस  वर्षापासून सारखा हत्तीचा धुमाकूळ आणि त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून  येतात.. आजीचे शेत  मुख्य गावापासून साधारण सात आठ किलोमीटर जंगलामध्ये.. तेथे आजी व आजोबाने एक झोपडी वजा राखण करण्यासाठी मचानासारखं घर बंद होतं.. बाजूलाच विहीर होती.. जंगलातील हत्ती कित्येक वर्षापासून आजी आजोबांना बघायचे.. आजी आजोबा सुद्धा.. हत्तींना सरावले होते.. विहिरीचं पाणी प्यायला मिळत असल्याने म्हणा.. किंवा त्या भागात हत्तींना सेफ वाटत असल्याने.. तोच त्यांच्या येण्या- जाण्याचा व विसाव्याचा मार्ग होता..  हत्ती बऱ्याचदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह आजीच्या ह्या घराजवळ बराच वेळ घालवायचे.. आजोबा आजी हत्तींचा हा कुटुंब कबीला लांबून निरीक्षण करायचे.. कधीही त्यांना ढोल बडवून किंवा मोठा आवाज करून.. फटाके लावून.. करंट लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.. उलट त्यांच्यासाठी सुरक्षित असे वातावरण त्या ठिकाणी निर्माण केले..

एक दिवस दुपारी आजी आजोबा लांबून हत्तींना बघत असताना.. एक भली मोठी हत्तीण  जमिनीवर गडबडा लोळायला  लागली.. तिला वेदना होत होत्या असं वाटलं.. आणि थोड्याच वेळात.. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला..  तीन चार हत्ती तिच्या बाजूला घोळका करून बघत होते.. बराच वेळ झाला तरी हत्तीण जागेवरून उठत नव्हती.. त्यामुळे इतर हत्तीची  कासावीस वाढली होती..  ते काळजीपोटी मागेपुढे.. मागेपुढे  करत होते.. काय करावं त्यांना सूचना! आजीने हे लांबून बघितलं.. तिच्या लक्षात आलं.. शेवटी आजीही एक आईच होती.. तिने हिंमत करून  हत्तीजवळ जायचं ठरविलं.. आजोबा ‘नको.. नको’  म्हणत असतानाही आजी गेली.. तिने विहिरीतून दोन-तीन बदल्याभरून पाणी काढलं.. आणि ते पाणी बेशुद्ध झालेल्या हत्तीणीच्या सोंडेवर आणि अंगावर ओतलं.. थोडसं पाणी तिने हिमतीने.. सोंडेतही टाकण्याचा प्रयत्न केला.. आणि काय आश्चर्य पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये हत्तीण उठून उभी झाली.. हत्तीणीच्या डोळ्यांमध्ये एक कारुण्य भाव होता.. नंतर तो कळप थोड्याच वेळात जंगलात निघून गेला.. आजी आणि आजोबाही  आपल्या गावात आले..

दरम्यानच्या काळात कोरोना संकट आल्याने.. दोन अडीच वर्ष.. कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते.. शिवाय आजीचीही तब्येत बऱ्यापैकी खालावली होती.. कारण नेहमी रानात फिरणारे आजी आजोबा कोरोना पायी घरात बसून बसून अजून थकले होते.. खेड्यातील माणसाला विशेषता रानातल्या माणसाला.. रानाशिवाय कसं जगवेल..? पण त्यांचं रानात जाणं मात्र बंद झालं होतं..

बऱ्याच दिवसानंतर.. गावातलाच एक गुराखी खूप घाबरत घाबरत आजीकडे आला आणि म्हणाला,” आजी तुमच्या जंगलातल्या घराकडे रोज दहा-बारा हत्तीचा कळप येतो.. तो तुमचं घर पाडणार आहे.. आम्ही हाकलायचा खूप प्रयत्न केला.. पण ते काही तिथून हलत नाही.. रोज दुपारी तुझ्या झोपडीजवळ त्यांचा राबता असतो.. बघ काहीतरी कर जंगलच्या लोकांना सांग.. नाहीतर तुझा घर काही रहायचा नाही.. काहीतरी सुतळी बॉम्ब वगैरे लाव.. फटाके वगैरे फोडून  हाकलून देऊ आपण त्यांना..” असं मनात गुराख्याने उपाय सुचविला.. आजी म्हटली” अरे हो, गप कि जरा! मला बघू तर दे!”

” उद्या जाते मी रानात अन् बघते काय करायचं ते?”  असं सांगून आजीने त्या गुराख्याला त्याच्या घरी पाठवलं..

दुसऱ्या दिवशी आजी आजोबा सह अडीच तीन वर्षानंतर पहिल्यांदा जंगलातील  शेतावर गेली.. तिला हत्तींची दुपारची येण्याची वेळ माहिती होती.. तोच वेळ तिने साधला.. आणि गेल्यावर पाहते तर काय.. आता दहा-बारा हत्ती होते.. त्यातला एक हत्ती आजीला पाहताच.. पुढे येऊन आपली सोंड वर करून “जणू इकडे ये.” असं सांगतो आहेस वाटत होतं.. आजीने ओळखलं ही हत्तीण तीच होती.. जिला आपण पाणी पाजलं होतं.. ती आपली सोंड सारखी.. कधी आजीकडे तर कधी छोट्या पिलांकडे करत होती.. जणू ती आजीला आपलं मूलं दाखवीत होती.. आणि जवळ येण्यासाठी सारखी सोंड खालीवर करून आजीला बोलवत होती..!

आजोबा ‘नको.. नको’ म्हणत असतानाही.. आजी हिंमत करून पुन्हा त्या हत्तीणीपाशी गेली.. तर आश्चर्य.. हत्तीणीने   सोंडेने आजीला स्पर्श करत.. आपल्या छोट्या बाळाच्या दिशेने हलकसं ढकललं.. जणू काही “हा तुझा नातू आहे बघ!” असंच काहीसं त्या हत्तीणीला सांगायचं असेल.. आजीनेही मग त्या छोट्या हत्तीच्या   पाठीवरून हात फिरवून  त्याला  अंजारलं..गोंजरलं.. विहिरीतलं तीन-चार बादल्या पाणी काढलं.. छोट्या हत्तींना पाजलं.. पाणी पिऊन झाल्यावर पुढच्या काही क्षणातच संपूर्ण कळप जंगलाच्या दिशेला निघाला.. आजीही आपल्या घरी आली..

तिने पुण्यातल्या आपल्या सॉफ्टवेअर  इंजिनीयर  असलेल्या नातवाला फोन करून सांगितलं, ” बाबू, आपल्या रानात हत्ती आले आहेत.. आपल्या शेतात राहतात.. तुला बघायचे असतील तर तू दिवाळीमध्ये ये.. तुला दाखवते मी हत्ती जवळून..!”

आजीचा हा फोन ऐकून नातवाला आश्चर्य वाटलं. तो सुरुवातीला आजीवर रागावला.. “कशाला ह्या गोष्टी करतेस.. हत्ती पिसाळला वगैरे तर ठेवेल कां तुला?”

वगैरे समजावलं.. पण आजीच म्हणाली, “अरे, तू डरपोक की काय?  मला नाही भीती वाटत.. तू ये तुझा कॅमेरा घेऊन.. वाटल्यास लांबच उभा रहा आणि माझा फोटो काढ बरं हत्ती आणि त्याच्या पिला सोबत…!” तेवढाच तुला फेसबुक का काय म्हणतात त्याला स्टेटस ठेवायला बरं.. नाहीतर रिल बनवायला बरं..” म्हणून आजीने फोन ठेवला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट काचेची… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वाट काचेची… ☆ डॉ. शैलजा करोडे

दुपारचे जेवण आटोपून प्रभाकरराव झोपाळ्यावर विसावले होते. सावित्रीबाईंनीही किचनमधील कामे संपवून दिवाणखान्यात मोर्चा वळविला. आरामखुर्चीवर ऐसपैस बसत त्या थोड्या विसावल्या हल्ली पायांनाही खूप रग लागते, गुडघे अतोनात दुखतात म्हणत गुडघ्यांवर तीळाच्या तेलाने त्या अलगद माॅलीश करू लागल्या.

” झोपलात काय हो “

” नाही ग, यावेळी झोप कसली. डोळे पेंगू लागले तसा आडवा झालो. लगेच दहा मिनिटात झोप गायब. “

” बरं आता निवांतपणा आहे तर बोलते. आपल्या अलकाच्या लग्नाचं मनावर घ्यायला हवं, यावर्षी तिचं शुभमंगल उरकलं कि आपण जवाबदारीतून मोकळे. माझ्या भावानं सुचवलंय स्थळ. मुलगा देखणा आहे, उच्चशिक्षित आहे, कौटुंबिक पार्श्वभूमिही चांगली आहे. आपण त्यांना निमंत्रण द्यायचं काय? “

” हो देऊया ना, का नाही द्यायचं? चांगलं स्थळ असेल तर नक्कीच विचार करू. “

” मग मी माझ्या भावाला फोन करते “

आई बाबांचं बोलणं आपल्या रूममधून अलका ऐकत होती. आई आता मामाला फोन लावणार. निमंत्रण जाणार, मंडळी येईल, तत्पूर्वी आपण आता बोललं पाहिजे. प्रितेशविषयी सांगितलं पाहिजे.

” आई ” अलकाने दिवाणखान्यात प्रवेश केला. ” ये ये अलका. आता तुझाच विषय सुरू होता ” ” ऐकलंय आई मी सगळं. पण मला काही सांगायचंय तुम्हांला ” ” अग हो, काय सांगायचं ते सांग ना बेटा, त्या परवानगी कसली मागतेस. मनमोकळेपणे बोल. ” ” आई बाबा, माझं प्रेम आहे प्रितेशवर ” ” कोण आहे हा प्रितेश? कोणाचा मुलगा? ” ” माझ्या काॅलेजात एकाच वर्गात आहोत आम्ही. लोकनेते प्रतापराव जाधवांचा मुलगा आहे प्रितेश जाधव. ” ” अलका राजकारणातील ती माणसं. आपल्यासारख्या सामान्यांना ती झेपतील काय? नको पोरी हा विचार नको करूस. तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन मी. पण हा हट्ट नको. ।

बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी लग्न करीन तर प्रितेशशीच. नाही तर कोणाशीही नाही. ” ” भलताच हट्ट करू नकोस पोरी. बाप आहे मी तुझा. तुझ्या भल्याचाच विचार करीन. ” ” तुम्ही माझ्या भल्याचा विचार करताय. मला चांगलं स्थळही पाहून देणार, पण मला प्रितेश नाही मिळनार बाबा जो माझा श्वास आहे. माझा श्वासचं हिरावून घेऊन एका निर्जीव पुतळीचं लग्न लावणार का तुम्ही

” प्रभाकरराव निरूत्तर झाले. काय बोलणार होते ते. पोरीच्या हट्टापुढे त्यांनी नमतं घेतलं. ते स्वतः प्रतापराव जाधवांकडे निमंत्रण देण्यास गेले. ” काय म्हणताय राव. प्रितेशचं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. मोठा छुपा रुस्तमचं निघाला पोरगा. विचारतो त्याला आज. तसं असेल तर येतो तुमच्याकडे प्रितेश व त्याच्या आईसह.

दिवाणखान्यात मंडळी बसली होती. कांदा पोहे, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम संपला.

” प्रभाकरराव मुलांंनी स्वतःचं पुढाकार घेऊन जमवलंय. आमच्यासाठी काही कामचं ठेवलं नाही. फक्त अक्षंता टाकायच्या. आता पुढचं आपण ठरवाचंय. प्रितेश माझा धाकटा चिरंजीव. शेवटचं लग्न माझ्या घरातलं, त्यामुळे सगळी हौस मौज झाली पाहिजे. लक्षात येतंय ना तुमच्या. हुंडा वगैरे नको आम्हांला. पण आमचं घराणं, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं असं लग्न झालं पाहिजे. लग्नकार्य एखाद्या चांगल्या रिसाॅर्टमध्ये व्हावं. पाहुण्यांची बडदास्त राखली जावी. त्यांचा योग्य तो मानपान झाला पाहिजे. माझी अनेक शुभचिंतक, हितचिंतक मंडळीही राहिल. त्यांच्याही स्मरणात हे लग्न राहावं म्हणून त्यांनाही सुंदरशी भेट द्यावी. त्यांचे लाखमोलाचे आशीर्वाद वधूवरांना मिळणार आहेत, त्यापुढे हा खर्च अगदीच नगण्य आहे, नाही काय? “

” होय प्रतापराव मी करीन ही सगळी व्यवस्था. मुलं खुश तर आपण खुश. “

” कसं बोललात, द्या टाळी ” म्हणत प्रतापराव गडगडाटी हसले.

” प्रभाकरराव, मुलांच्या खुशीसाठी करतोय आपण सगळं. मुलीला हळद लागणार, नवरी बनून जाधव घराण्याची सून होणार, ती कशी साजेशी हवी ना, लंकेची पार्वती थोडीच राहणार. म्हणून फार नाही हो फक्त 50 तोळे सोनं घाला मुलीच्या अंगावर, अर्थात ते तिचं स्त्रीधनचं राहणार आहे. जावई श्रीविष्णूचं रूप मानून तुम्ही कन्यादान करणार, मग त्याचा योग्य सन्मान वरदक्षिणा देऊन तुम्ही करणारच आहात यात मला तरी शंका वाटत नाही. “

” होय, करीन मी सगळं माझ्या लेकीच्या सुखासाठी “.

प्रभाकररावांनी जाणलं ही लालची मंडळी आहे. त्यांनी परत अलकाला समजावण्याचा प्रयत्न केला ” अलका विचार कर. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन बेटा. बाप आहे मी तुझा. तुझं कल्याण व्हावं, तू सुखी राहावीस हीच इच्छा आहे ग माझी. तुला जर काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही बेटा “. पण अलका ऐकायलाच तयार नव्हती. “बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर आणि स्त्री आयुष्यात एकचदा प्रेम करते. तुम्ही दुसरं चांगलं स्थळही शोधाल माझ्यासाठी, पण मी सुखी होऊ शकेन काय? उलट आम्हां तीन जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल. कोणीच सुखी होणार नाही बाबा. प्रितेश नाही तर कोणीच नाही. राहीन मी जन्मभर अविवाहित. नका काळजी करू तुम्ही. ” शेवटी लेकीच्या हट्टापुढे बाबांना झुकावच लागलं.

माझं शुभमंगल पार पडलं आणि मी जाधवांच्या उंबरठ्यावरील माप ओलांडले. बाबांनी लग्नात कसलीही कमतरता भासू दिली आहे. वरपक्षाकडून छोट्या मोठ्या बारीक सारीक मागण्या होत्याच, पण बाबांनी कसलीही कटकट न करता सहज पूर्ण केल्या. रूखवतात संसारोपयोगी भांडी कुंडी गोदरेजची कपाटे, सोफा सेट, दोन लाकडी दिवाण, झोपाळा सगळं सगळं दिलं. सांजोर्‍या, करंज्या, पाच प्रकारचे लाडू, शेव, चकली सगळं सोबतीला दिलं. माहेर सुटलं, मन हळवं झालं, निरोप देतांना बाबा डोळ्यातील अश्रू लपवू शकले नव्हते.

माझ्या सासरीही काही धार्मिक विधी पार पडले. कुलदेवता व विविध दर्शन ही पार पडले. आणि हनीमून साठी आम्ही निघालो. नैनितालच्या टाॅवर हाॅटेलमध्ये दहा दिवसांचं बुकिंग बाबांनीच करून दिलं होतं. नवजीवनाची मी रंगविलेली स्वप्न, प्रितेशच्या रुपात मनासारखा मिळालेला जोडीदार, नैनितालमधील सुखद गारवा देणारं वातावरण मला रोमांचित करीत होतं. ” काय ग अलका, थंडी वाजतेय काय? ” ” नाही तर ” ” मग अंग एवढं कसं शहारलंय. ” ” नैनितालचा गारवा तर जाणवणारचं ना “. ” हूमम, बातमे दम है, चल मग तुझा गारवा लगेच दूर करतो की म्हणत त्यानं मला बाहुपाशात ओढलं. ” ” अहो, काय हे. ” ” माझ्या बायकोशीच बोलतोय ना, जगावेगळं तर काही करत नाही आहे ना “. ” तसं नाही हो ” ” मग कसं ” ” मला बाई ” म्हणत माझी मान लज्जेने खाली गेली तशी माझी हनुवटी उचलत त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं, माझे डोळे नकळत बंद झाले आणि त्याक्षणी त्यानं माझं हलकसं चुंबन घेतलं “

नैनितालहून परतले. सासुबाईंच्या मैत्रिणी, काही नातलग नवीन सूनबाईला बघायला येतच होते. राजकारण्यांचं घर असल्याने कार्यकर्त्यांचा राबताही राहात होता. मी हळूहळू अंदाज घेत होते. प्रत्येकाचा स्वभाव जाणून घेत होते. नव्या नवलाईचे दिवस असल्याने घरातील सगळेही बरे वागत होते.

दिवाळी आली. मलाही माहेराची ओढ लागलेली. पहिला दिवाळीसण असल्याने बाबा जावयाला निमंत्रण द्यायला आले. मला व प्रितेशला कपडे, प्रितेशला सोन्याची अंगठी दिली. प्रितेशने लॅपटाॅपचीही मागणी केली. बाबांनी सव्वा लाखाचा लॅपटाॅप घेऊन दिला. हळू हळू माझ्या माहेराहून विविध वस्तूंची पैशांची मागणी होऊ लागली. नंतर हे प्रमाण वाढू लागलं तसा मी विरोध केला. मग माझा छळ होऊ लागला. ” हजारो मुली सांगून येत होत्या माझ्या मुलासाठी. पण प्रितेशचं प्रेम होतं म्हणे हिच्यावर. मुलाच्या सुखासाठी केला समझोता. पण दळभद्री निघाली. आमचंच नशीब फुटकं”. घरातून असे विविध टोमणे, माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार करणे, मी काही बोलली तर मारहाण करणे सुरु झाले. त्यात मला कडक डोहाळे लागलेले. पण माझ्या तब्येतीकडे सगळेच दुर्लक्ष करायचे, ज्याच्यावर माझं प्रेम होतं, लग्न करुन त्याच्या जीवनात आले तो प्रितेशही दुर्लक्ष करू लागला, माझं ऐकेनासा झाला. माहेरी ही सर्व वार्ता सांगितली तर बाबा म्हणाले मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी होतं. मी तुला न्यायला येतो. काळजी करु नकोस. अशा अवस्थेत मन शांत ठेव. बाळाच्या जन्मानंतर होईल सगळं ठीक.

अमेयचा जन्म झाला, आणि जणू त्रिभुवनाचं सुख माझ्या कुशीत आलं. मी माझं सारं दुःख, विवंचना विसरले. बाळाचं आगमन मला संजीवनीसमान होतं. माझ्या सासरी कळवलं. पण कोणी बाळाला बघण्यास आले नाही.

कामाच्या व्यापात जमत नाही म्हणाला प्रितेश. ” असं कोणतं काम आहे प्रितेश कि बाळाला तुम्ही भेटत नाही. ” ” बाळाला भेटण्यासाठी बाळ माझं तर पाहिजे ” ” काय बोलताय तुम्ही, असं बोलवतं तरी कसं ” आणि मला चक्कर आली. मोबाईल खाली पडला. आई धावत आली, तिने मला सावरले.

 

बाळ दोन महिन्यांचा झाल्यावर बाबांनी मला सासरी पोहचविले. घरातील लोकांच्या वागणुकीत खूप फरक पडला होता. पण बाळासाठी, संसार टिकविण्यासाठी मी सगळं सहन करीत होते. प्रितेश आता वारंवार माझ्या अंगावर हात उचलत होते. मारहाणीचे व्रण माझ्या शरीरावर उमटू लागले होते.

माझी नणंद शोभासाठी स्थळपाहणी सुरु होती. आणि एकाठिकाणी पसंतीही झाली. आता बैठक होणार होती देवाण घेवाणीची. त्यात नवपरिणित जोडीसाठी मुंबईत एक फ्लॅट पाहिला होता. चांगल्या लोकेशनमधील 3BHK फ्लॅटची किंमत तीन करोड होती.

कधी नव्हे त्या सासूबाई चांगलं बोलू लागल्या. ” किती वाळलीस ग. बरं नाही का? अमेय खूप त्रास देतो ना. उद्या जाऊ दवाखान्यात. शोभानेही गरमागरम उपमा आणला. ” आण वहिनी बाळाला दे माझ्याकडे. तू आधी नाश्ता करुन घे “

हळूच सासूबाईंनी माहेरचीही चौकशी केली. अलका, शोभा या घरची मुलगी, आपली जवाबदारी. तिला फ्लॅट घेऊन द्यायचाय आपल्याला. काही रक्कम कमी पडतेय. सव्वा ते दीड कोटी. तुझ्या बाबांना सांग तेवढी मदत करायला. शेवटी आपल्या घर परिवारासाठी तुझंही कर्तव्य आहे ना. ” पण मी यावेळी खमकी होती, स्पष्ट नकार दिला, ” कितीदा मदत करायची हो माझ्या माहेरच्या लोकांनी. माझ्या सुखासाठी आजवर भरपूर लुटलं त्यांनी तुमच्यावर. त्यांनी कमवायचं आणि तुम्हांलाच देत राहायचं काय? स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायचं काय त्यांनी”

” अरे देवा देवा, एवढं काय आणलंस ग तू माहेराहून कि त्यांना घरावर तुळशीपत्र ठेवावं लागलं. आम्ही काही कमवतचं नाही. तुझ्या माहेरच्या मेहेरबानीवरचं जगत आहोत नाही काय? तुझं माहेर तालेवार, आम्ही भिकारडे नव्हे काय? मग कशाला राहातेस या भिकारी लोकांमध्ये. जा की माहेरी. ” मी तशीच मुसमुसत राहिले. बाळ लहान, नवर्‍याचं बदललेलं वागणं, माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा, वारंवार मला होणारी मारहाण. कंटाळले मी या जीवनाला. नको हे जीवन, नको तो काचेच्या वाटेवरील संसार,. नको आईबाबांनाही त्रास, त्यांचं ऐकलं नाही मी, प्रेमात आंधळी झाले होते. पण ते प्रेम नव्हतं, तो एक सौदा होता. पाहिजे तेव्हा त्यांची मागणी पूर्ण करणारा. पण आता ही चूक मी सुधरवणार. माझ्यामुळेच घडतंय ना हे सगळं आणि जीवनभर घडतच राहणार, आईबाबांना त्रास देणारी मी पनवतीचं ठरणार. नाही, नाही, हे सगळं थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मी थांबवेन. बस झाला निर्णय. आजच याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लावीन गळफास, होईल थोडी तडफड, मग एकदम शांत शांत शांत.

(ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यातील कथानक व पात्रांशी कोणी व्यक्ती व संस्थेचे नामसाधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(निर्विवाद सत्यकथा आहे.)

“अरे बाबा लक्षात आहे ना? माझे दोनशे रुपये बाकी आहेत तुझ्याकडे. ” कुणीतरी कानात बोलले महेशच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो. घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी महेशच्या जवळचा. पण नेमका कुणाचा ते महेशच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती.

कुणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कुणाकडून घेतले, जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कुणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे दोनशे रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.

अचानक लकलकले डोक्यात त्याच्या. गुरूचरण.. हो गुरूचरणच तो. त्याचा कॉलेजमधला लास्ट इयरचा रूम पार्टनर. एक्झाम फी भरायला नेमके दोनशे रुपये कमी पडत होते. मुदतीचा शेवटचा दिवस. कामाचे पैसे पण मिळाले नव्हते. वरखाली झाला महेशचा जीव. अन देवासारखा धावून आला गूरू.

खरेतर तीस वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर पैसे आले पण गुरूचरण काही कामासाठी गावी गेला होता. इथे महेशची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेलवर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. गुरूचरणला महेशने पत्र ही लिहिले की रिझल्टच्या दिवशी भेटू, तुझे पैसे देतो तेव्हाच. पण त्या दिवशीही गुरू आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की तो गावीही नाही आता. नाईलाजाने महेश पैसे घेऊन परत आला.

एकदम भरून आले महेशला. ऐन वेळेस पैसे मिळाले नसते तर वर्ष वाया गेले असते त्याचे आणि तो चक्क विसरूनच गेला गुरूला. मग आठवले त्याला नुकत्याच फॉर्म केलेल्या त्याच्या कॉलेजच्या व्हाॅटसअप ग्रुपवर विषय झाला होता गुरूचा. तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितले कुणीतरी, नंतरही काहीच माहिती मिळाली नाही गुरुबद्दल.

सकाळ होताच महेशने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कुणालाच माहित नव्हते गुरुबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा. गाव त्याचे चांगलेच लक्षात होते पत्र व्यवहारामुळे.. कॉलेजमध्ये असताना केलेला. पत्ता आता आठवत नव्हता. पण कुणालातरी विचारता येईल, खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल तरी किती वाढणार.?

सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा मृणाललाही आश्चर्य वाटले.. असे अचानक?

महेश गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरी ही त्याने गुरूचरणचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले. एकजण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? गुरूचरणकडे येणारे अनेक असावेत?

घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा टच दिलेला होता टाईल्स वगैरे बसवून. महेश गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणि पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर गुरूचरण झोपलेला होता. महेशला कळलेच नाही आधी. तसे ही गुरूला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काच बसला.

अगदी बारीक झालेली शरीरयष्टी. बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या. गालफडं आत गेलेली. त्याने हाक मारली.. “गुरूचरण ऽऽऽ,.. गुरू…. “

गुरूचरणने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला. “महेश ऽऽ…… तू कसा आलास? ” त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किलीने विचारले.

“तुझे दोनशे रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो. “

“कुठले दोनशे….? “

मग महेशने त्याला आठवण करून दिली कितीतरी वर्षांपूर्वीची आणि शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.

त्याला आठवले.. पण त्यासाठी एवढ्या दूर..? गुरूने खूप वेळ महेशचा हात हातात धरून ठेवला. जुनी मैत्री आठवत आसवे गाळत.

रात्र झाल्यामुळे गुरूचरणच्या मुलाने महेशला निघूच दिले नाही आणि गुरूचरणनेही. जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपतांना गुरूच्या मुलाने सांगितले सारे.

गुरूचरणच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्टअटॅकने. वडिलांचे क्रियाकर्म होत नाही तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून त्याच्या ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला. पर्मनंट झाला. तिथेच सेटल झाला.

सगळे काही सुरळीत चालू असतांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधं उपचारासाठी भरपूर मदत दिली पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर गावी जाऊनच मरू हा निश्चय करून गुरू पुन्हा गावी आला आणि आता मृत्यूची वाट पाहत आहे.

दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने महेशला झोप लागली तरी स्वप्नात त्याच्या बरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याश्या गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. गुरूचरण रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता. त्याच्या हातात मात्र अजूनही काल महेशने दिलेले दोनशे रुपये होते.

गुरूचा अंत्यविधी करून खिशातल्या जितक्या नोटा होत्या त्या गुरूच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन महेश घरी परतला. किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो ह्याचे समाधान घेऊन.

खूप दिवस झाले आणि अगदी अचानक एका सकाळी गुरूचरणचा मुलगा महेशच्या घरी आला. काहीश्या आश्चर्याने आणि आनंदाने महेशने त्याचे स्वागत केले. नाश्तापाणी होताच मुलाने विषय काढला. “वडिलांचे वर्षश्राद्ध आहे पंधरा दिवसांनी. तुम्हाला तेच सांगायला आलो काका. आणखी एक.. ” मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.

“हे काय….? “

“तुम्ही निघतांना मला दिलेले पैसे… आठ हजार सातशे. “

“अरे पण ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही. आणि तुला एकदम मोजून ठेवायला कुणी सांगितले? “

“पप्पांनीं….. “

“म्हणजे ऽऽऽऽ…? “

गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात, तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम ही त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते. ते म्हणाले ‘ वर्षाच्या आत परत कर बाळा. ‘

थरथरत्या हाताने महेशने पैसे घेतले. तेवढ्यात त्याच्या मुलाने एक भारीपैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहीश्या आश्चर्याने त्याने विचारले. “हे कशासाठी? का हेही गूरूनेच द्यायला सांगितले? “

“हो. पप्पा म्हणाले, पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणि रिकाम्या हाताने गेला. तेव्हा….. “

गुरूचरणचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला. आणि हा त्या शर्टपीसवर हात फिरवत निशब्द. हे खरेच असते का काही… गुरूने स्वप्नात येऊन आठवण देणे. मरण्याआधीची भेट… अन आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे.

मृत्यूनंतर स्वप्नात येणे महेशने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे, याला काय म्हणता येईल….? त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्कवितर्क वगैरेच्या पलीकडील असतात.

महेशने कॅलेंडरवर गुरूच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो. जावेच लागणार होते त्याला.

– एक सत्यकथा 

लेखक – अनामिक

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ मला जगायचंय… ☆ सौ.प्रभा हर्षे

नर्स रूबी नेहमीप्रमाणे हॅास्पिटलच्या इमर्जन्सी रूम (ER) मध्ये येऊन पोहोचली. गेली तीस वर्षं तिनं त्या हॅास्पिटलच्या इमर्जन्सी वॅार्डात मनुष्य स्वभावाचे हजारो नमुने बघितले होते. खरच पेशंट प्राण पणाला लावून झगडत असतो. त्याचा संघर्ष बघताना ती नेहमीच कासावीस होत असे. अनेकांशी रक्तापलीकडचं नातं जुळले होते.

तिला जाणवत असे.. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असलेले जीव किती शुध्द असतात.. समाजात वावरताना घातलेले मुखवटे, अहंकार, द्वेष, ईर्षा सारं काही गळून पडतं! अशा जीवाचं दर्शन तिला नेहमी परमात्म्याजवळ नेत असे.

तिच्या ॲाफिसमधील कॅाफी मेकर भुस्स भुस्स आवाज करून कराफे मध्ये कॅाफी ओतत होता. कोलंबियन कॅाफीचा तो हवाहवासा वास तिनं श्वासात भरून घेतला. खुंटीवरचा एप्रन घातला व जेमतेम दोन घोट पोटात गेले असतील नसतील तेवढ्यात तिचा पेजर खणखणला..

“रूबी, रिपोर्ट टू रूम नंबर १० प्लीज..

रिपोर्ट टू रूम नंबर १०”

तो परिचित मेसेज बघून ती कॅाफी तिथेच ठेऊन ती रूम नंबर १० कडे धावली.

“गुड मॉर्निंग आजोबा! कसे आहात? ” तिच्या परिचित आवाजाने आजोबांच्या चेहऱ्यावर हसू झळकलं..

“सुखाने घरी बसलो होतो मिस रूबी, पण तुला फार मिस केलं म्हणून भेटायला आलोय. ” साधारण ऐंशीला पोचलेले आजोबा कसेबसे हसले. १०३ ताप, उलट्या व सतत लागलेल्या धापेमुळे ते दमून गेले होते.

डॅाक्टर साठे हसऱ्या चेहऱ्याने आत आले पण आजोबांचा चार्ट बघताच त्यांचं हास्य लुप्त झालं. त्यांनी पटकन काही टेस्ट करायला सांगितल्या. आजोबांचा आजार त्यांना माहित होता. तातडीने ॲापरेशन करण्याची वेळ आली होती.

ॲापरेशन झालं. आजोबा जगले पण त्यांना वेदना सोसत नव्हत्या. ऐंशी वर्षाचं शरीर प्राप्त व्याधीशी झगडून गलितगात्र होऊन गेलं होतं.. त्यापेक्षा गेले असते तर सुटले असते हा विचार रूबीनं डॅाक्टरना बोलून दाखवला.. आजोबांचे हाल बघून तिच्या पोटात तुटत असे..

तिथून बाहेर पडताच ती डॅा साठेना म्हणाली, ” सर, कधी काळी मी जर अशा एखाद्या आजाराने ग्रासलेली असेन तर मला अजिबात जगवू नका.. अशा पेशंटला वाचवून आपण त्याचे हालच करतो.. किती सहन करायचं त्या जीवाने? ही चूक माझ्या बाबतीत करू नका..

साठ्यांहून वीस वर्षाने मोठ्या असलेल्या रूबीकडे साठे पहात राहिले.. या चर्चेची त्यांना सवय होती.

“टेक इट ईझी, रूबी. एवढी पेशंटमधे गुंतत जाऊ नको. ” एवढं बोलून ते पुढच्या पेशंटकडे गेले.

आजोबा त्यानंतर सहा वर्षं जगले.. असेच विव्हळत, रडत-खडत, कसेबसे.. अनेक औषधाच्या साईड इफेक्टमुळे बेजार होऊन दुखणं परवडलं पण हे साईड इफेक्टस नकोत म्हणत.. पण जगण्याची इच्छा मात्र चिरतरुण होती..

रूबी सारं जवळून बघत होती.. तिला आश्चर्य वाटायचं.. हे पेशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत? शरीर आपलं आपण नैसर्गिकरित्या जे ठरवेल ते नक्कीच जीवाला कमी वेदना देणारं असेल.. तो मृत्यू सोपा असतो असे डॅा साठे मेडिकल स्टुडंटसनाही शिकवतात पण या भयानक प्रोसिजर चालूच राहतात.. याला जगणं आणि जगवणं म्हणायचं?

रूबीनं आपला शेवट कसा असावा हे स्वत:च्या विल मध्ये लिहून ठेवलं होतं..

“मी आजारी पडले तर माझे कोणतेही ॲापरेशन करू नका. ज्या उपचारामुळे माझी पंचेद्रिय निकामी होतील असे कोणतेही उपचार माझ्यावर करू नका. मला शेवटपर्यंत बोलायचं आहे, देवाचं रूप बघत जायचं आहे, मोगऱ्याचा वास घ्यायचा आहे.. हे जमणार नसेल तर मला वाचवू नका. ”

आता रूबी पंचाहत्तर वर्षाची झाली होती.. एक दिवस चक्कर येऊन पडली म्हणून तिला त्याच ER ला आणण्यात आलं.

“रूबी, काय पराक्रम करून आली आहेस? ” डॅा साठे वातावरण हलके फुलके करायला बघत होते. त्यांनी चष्मा नीट केला.. तिचे रिपोर्ट बघून ते जरासे खाकरले..

“रूबी, ॲापरेशन करून तुझ्या आतड्याचा काही भाग काढून टाकायला हवा.. तुझी इच्छा मला माहित आहे. ॲापरेशन कोणत्याही परिस्थितीत करायचे नाही हे तू लेखी दिले आहेस.. तर या परिस्थितीत तुला किती दिवस मिळतील सांगता येत नाही.. few weeks may be.. ”डॅाक्टर तिच्या नजरेला नजर देणं टाळत होते..

आता रूबीची खरी परीक्षा होती.. ॲापरेशन करून घ्यायचं का नाही? रिकव्हरी सोपी नव्हती. ॲापरेशन यशस्वी होण्याची शक्यता केवळ १५-२०% होती..

रूबीनं डॅाक्टरांकडे बघितलं. अशा गोष्टी डॅाक्टर जेव्हा बेडवर पडलेल्या पेशंटला सांगत असत तेव्हा ती डॅाक्टरांच्या

बाजूला उभी असायची..

पेशंट गडबडून गेलेला असे..

एखादं दिवस विचार करून तो करा जे करायचं ते सांगत असे.. पेशंट बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास त्याची मुलं बाळं “काही करून वाचवा” म्हणत..

आज ती त्या बेडवर होती..

शेजारी उभी नव्हती..

तिच्या डोळ्यात आशा एकवटून आल्या होत्या.. समोर तिला तिची मुलं दिसत होती.. वर्षाचं नातवंड चालायचा प्रयत्न करत होतं.. नवरा.. तो आपल्याशिवाय काही करू शकत नाही.. साधी कॅाफी करता येत नाही त्याला.. अंगणातील जाई जुई शेवंती एकटी पडेल आणि तिचा आवडता कुत्रा टायगर.. त्याला कोण समजावणार..

ती डॅाक्टरांकडे बघत बोलली..

“सर, करा ॲापरेशन. १५-२०% तरी सक्सेस मिळण्याची शक्यता आहे ना?

मला जगायचं आहे!

जी लागेल ती ट्रिटमेंट मला द्या.. ते विल फाडून टाका माझं..

मला जगायचं आहे सर..

I want to live..

I really want to live..

I really really want to live..

डॅा. साठे रूम मधून बाहेर आले. डोळ्यातलं पाणी पुसतं त्यांनी परत एकदा जीवाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते ते अनुभवले..

एकेक अवयव निकामी होतो..

वेदना सहन होत नाहीत..

यापेक्षा गेलं तर बरं वरवर म्हणतात पण.. अजून काय करता येईल विचारणारे सिरिअस पेशंट्स..

कितीही त्रास झाला तरी त्यांची जगण्याची इच्छा कधीच मरत नाही..

“मला जगायचंय” या तत्वावर उभं असलेलं जग.. त्यातील माणूस, प्राणी, किडा, मुंगी सारे जगण्यासाठी धडपडत असतात..

ही केवळ जैविक प्रेरणा नसते..

जीवांच्या गाभ्यातून उसळणारी शक्ती असते..

अस्तित्वाच्या गुढतेतून आलेली..

आत्म्याच्या अमरत्वातून निर्मिलेली..

गाभ्यातून जळणाऱ्या दीपांनं प्रखर केलेली..

म्हणून तर जग चालू आहे..

आजवर काही पेशंटना नैसर्गिकरित्या मरू द्यावं म्हणणारी रूबी जेव्हा स्वत: पेशंट झाली तेव्हा विल मध्ये लिहलेले सारे काही गळून पडले होते..

पाण्यातील मासा, झोप घेतो कैसा।

जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे ॥

आतून एकच आवाज येत होता..

“मला जगायचंय”

“I want to LIVE! ”

.. सर, आज मला कळलय.. टर्मिनल इलनेस असला तरी पेंशंट ट्रिटमेंट का नाकारत नाहीत..

कारण everyone wants to LIVE!

डॅाक्टर साठ्यांनी ॲापरेशनचे पेपर लगेच पुढे पाठवले.. आत येऊन त्यांनी रूबीची सही घेतली..

“Ruby, will try our best! ”

ॲापरेशनचा सक्सेस रेट ते परत परत शोधू लागले..

(सत्य घटनेवर आधारित) 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ गौरीचे खडे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज सुदैवाने तो कामावरून लवकरच घरी आला होता. चांगलंच झालं, गणपती तोंडावर आले होते, घरी तयारीला मदत झाली असती.

तो आला, बायको बाहेर जायच्याच तयारीत होती, “अहो, बरं झालं आलात. येता का दोन मिनिटं माझ्याबरोबर? गौरीचे खडे मिळतात का बघू या. “

त्याची आई – तिची सासू हा संवाद ऐकत होती.

तिच्या नजरेसमोर पंचवीस तीस वर्षांपूर्वीची नव्या नवलाईची सून – ती स्वतःच उभी राहिली. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला नदीवर जायचं, आणि तेव्हाच नदीपात्रातून निवडून सात गोल गुळगुळीत खडे घेऊन यायचे. तोंडात पाण्याचा घोट घ्यायचा, आणि घरी येईपर्यंत एक अक्षरही बोलायचं नाही. मग त्या गौरीच्या आगमनाच्या दिवशी गौरींना सगळं घर फिरवून दाखवायचं, हळदकुंकवाची पावलं घरभर फिरवायची, आरास करायची, सगळंसगळं कसं झर्रकन नजरेसमोर उभं राहिलं.

पण पुढे नवऱ्याच्या निधनानंतर ही शहरात मुलाकडे आली, इथं कुठली नदी आणि कुठले खडे!

सून चांगली होती, कुळधर्म निगुतीने सांभाळायची. श्रावण भाद्रपद आला की तिचा खडेगौरीसाठीच्या खड्यांच्या शोध सुरू व्हायचा. पण यावेळी या ना त्या कारणाने राहूनच गेलं होतं.

आणि आता गौरी अगदी आठवड्यावर आल्या होत्या. म्हणून तिची धावपळ सुरू होती.

तो आल्यापावली परत फिरला. खेळाची मैदानं, इमारतींची बांधकामं, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कडेला मांडलेले बांधकाम साहित्याचे ढिगारे – सगळं धुंडाळून झालं.

हल्ली बहुधा वाळू चाळूनच आणत असावेत, किंवा सरळ दगडाच्या कपच्याच वापरत असावेत.

कुठ्ठे कुठ्ठे म्हणून हवी तशी गोल गरगरीत खडी मिळतच नव्हती.

देवीच्या देवळाशेजारी बागेशी जरा बघावं म्हणून हे दोघं त्या दिशेने वळले, गुरुजींनी पाहिलं, म्हणाले, “खडेगौरी का शोधत आहात? नका घेऊ रे बाबांनो इथून. कुत्रीच काय पण माणसंदेखील लघवी करतात हो इथं निर्लज्जासारखे. ” 

त्यांचं हे वाक्य ऐकून तिथं शोधाशोध करायची इच्छा मरूनच गेली दोघांचीही.

हताश होऊन रित्या हाताने दोघेही परतले.

पण आईचा चेहरा थोडा प्रफुल्लीत होता. “अरे, तुम्ही एक काम करा, ” ती उत्साहाने सांगू लागली, “आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तिनं गाडगीळांकडून चक्क चांदीचे खडे आणले आहेत. फक्त त्यांचं विसर्जन करायचं नाही, बरं का! ” नर्म विनोद करत तिनं वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.

लेक आणि सून पु ना गाडगीळांच्या पेढीवर चांदीचे खडे घ्यायला निघाले. तिथे त्यांना जेम्सच्या गोळीच्या आकाराचा चांदीचा भरीव खडा दाखवला गेला. ४०-५० ग्रॅमच्या त्या एका खड्याची किंमत तब्बल ६, ००० रुपये म्हटल्यावर याचे तर डोळेच फिरले. अहो, सात खडे घ्यायचे होते ना!

“कमी किंमतीत आहेत का हो? ” यानं विचारलं. त्यावर साधारण त्या भरीव खड्याच्याच आकाराची पण पोकळ असा एक सोंगटीसारखा खडा त्याला दाखवला, तो होता ६०० रुपयांना. म्हणजे असे सात खडे ४, ००० रुपयांच्यावर पडणार होते.

महाग तर होतेच शिवाय त्यांचा तो सारीपाट खेळण्याच्या सोंगटीसारखा आकार काही तिला खडेगौर म्हणून रुचलाच नाही. यावेळी बहुधा पहिल्यांदाच गाडगीळांच्या दुकानातून ही दोघं रिकाम्या हाताने माघारी फिरले.

लगेहाथ वन ग्रॅम ज्वेलरीची दुकानं पालथी घालून झाली, वैशंपायनांचा सोनचाफा, आष्टेकर, सोनिगरा, रांका – सगळे ज्वेलर झाले. पण सगळीकडे नन्नाचाच पाढा.

हिरमुसले होऊन हे दोघं आपल्या सोसायटीत परतले, बिल्डिंगच्या दारात रखवालदाराला त्याने ही सगळी रामकहाणी सांगितली.

तो तोंडांत माव्याचा तोबरा भरून बसला होता. भूतदया दृष्टीने त्याने त्या मुखरसाला त्यागले, त्यामुळे मुक्त कंठाने ज्ञानरस वाटायला तो आणि त्याचा गळा मोकळा झाला होता. “बहुतही आसान है. आप ऐसा क्यो नहीं करते? आप अमेजॉन या फिलीपकार्टपर जाव, और पेबल्स मंगाव ना. सफेद, कलरवाला सब चॉईस रहता है उधर. वो फिशटँक में डालने के लिये या ऐसेच डेकोरेशन के लिये मंगाते है ना लोग. और १०० रुपयेमे काम हो जायेगा. ” त्याने आकाशवाणी केली आणि नव्या दमाने तो पुन्हा मौनात गेला.

नदीवरून गौरीचे खडे आणणाऱ्या आईच्या सुनेची वाटचाल आता अशी ऑनलाईन रंगीत खड्यांपर्यंत होणार आहे हा प्रवास त्याला काही झेपला नाही, आणि सुन्न होऊन तो तिथेच मटकन खाली बसला.

“अगर ये आप नहीं करनेवाले, तो फिर सिर्फ उपरवालाही आपकी मदद कर सकता है. ” रखवालदार.

त्याचं हे वाक्य ऐकू अचानक तिचा चेहरा उजळला, “बाई, बाई, बाई! कशी मी अशी वेंधळी? अगदी काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाली माझी. अहो, चला, हा म्हणतो आहे ना, उपरवाला मदद करेगा, अगदी बरोबर आहे हे. चला, चला, पहिल्या मजल्यावरच्या ओसवालांच्या घरी चला, ” तिने उत्साहात फर्मावलं.

“अगं, ते शेजारच्या इमारतीत भाड्याने रहात आहेत सध्या, त्यांच्याकडे renovation चं काम चाललं आहे ना. भिंती फोडल्या आहेत, नवीन बांधणार आहेत. पार लाद्यासुद्धा बदलून काढत आहेत ते, ” तो म्हणाला, आणि बोलता बोलता त्याच्या लक्षात आलं की भिंती, लाद्या बदलत आहेत म्हणजे सिमेंट रेती खडी आलीच की.

तोही नव्या दमानं तिला सामील झाला.

ते ओसवालांच्या घरी गेले, तिथल्या बांधकाम साहित्यात तिला चटदिशी तिला हवे तसे गोल गरगरीत खडे मिळाले.

तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिच्या खडेगौरीच्या शोधाची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली होती.

पर्समधून पाण्याची बाटली घेऊन ती घोटभर पाणी प्यायली, नवरोबा काहीतरी तिला विचारत होता, पण ती मुग्धच राहिली.

आता खडेगौरी सोबत होत्या ना, आता वरच्या मजल्यावर, घरी पोचेस्तोवर ती मौनातच राहणार होती.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निरोप… भाग १ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆

सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग १ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

उत्तराच्या मुलाचा जन्म झाला. श्रीकृष्णाने त्याला सुखरुप पाहिले, द्रौपदीला, पांडवाना नवसाम्राज्याच्या शुभेच्छा देऊन ते द्वारकेला परत जायला निघाले.

“कान्हा, परत कधी भेट होईल आपली? खूप कांही गमावून हे साम्राज्य मिळवले आहे… पण आनंद कुठे गेला जगण्यातला तेच कळत नाही… ” द्रौपदीला अश्रु अनावर झाले होते.

श्रीकृष्णांने तिचा खांदा थोपटला,

“पार्था, तुलाच ह्या सा-यांची काळजी घ्यायची आहे. विशेषतः उत्तरा आणि परीक्षिताची…! मला निघायला हवं, द्वारकेचेही बघायला हवचं ना? “

“कान्हा, सांभाळ हो स्वतःला, सत्याला न्याय देण्यासाठी वाईटपण पदरी घेत गेलास… विनाकारण शाप नशिबी आले तुझ्या… ” कुंती भरल्या गळ्याने बोलली.

“आत्या, नियती हीच असते, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा.. वानप्रथाश्रमाची तयारी केलीय ना… शांत मनाने जा… बदल हा निसर्गाचा नियम आहे. आता इथला विचार अजिबात नको. “

सा-यांना एक नवी उर्जा देऊन श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले.

द्वारकेत पोहचताच राज्यात वर्षभर नसल्याने द्वारकाधीश कामात गुंग झाले. दोनच दिवस झाले असतील,

गोकुळमधून निरोप आलाय असं उध्दवकाका सांगायला आले,

दूत आला आणि म्हणाला,

“महाराज, यशोदामाईंनी आठवण काढलीय आपली…! “

“काय झालय मैय्याला? “

अस द्वारकाधीशांनी हळुवार स्वरात विचारलं… पण त्याचं मन बालपणात हरवून गेलं.

कान्हा… कान्हा करत दहीभाताचं ताट घेऊन माग फिरणारी… नदीवर फिरायला खेळायला गेल्यावर कासावीस होणारी, क्षणाक्षणाला कान्हा बरोबरच मन असणारी… मैय्या अशी मैय्याची अनेक रुप द्वारकाधीशांसमोर तरळत होती… गोकुळ सोडून वीस वर्ष झाली सा-यां जबाबदा-यातून गोकुळात जाणं झालंच नव्हतं…

“मैय्या, तुझ्या कान्हाला क्षमा कर..! “

अस द्वारकाधीश रोज मनोमन म्हणत… आपण एवढे व्यस्त कसे झालो मैय्याला आपण कस तोंड दाखवणार?

द्वारकाधीशांचे मन व्याकूळ झाले होते..

द्वारकाधीश गोकुळात पोहचले…

गोकुळबनात रथ पोहचला…

तुता-या वाजू लागल्या,

“द्वारकाधीशांचे आगमन होत आहे,

सुस्वागत… महाराज..!!! “

“द्वारकाधीशांचा विजय असो…! “

द्वारकाधीशांच्या हृदयात कळ उठली, कान्हा, किसना, कृष्णा असं हाका मारणारं गोकुळ अस परक्यासारखं का हाका मारतयं मला….!!!

श्रीकृष्णांने वाड्याच्या दारात पाऊल ठेवले. समोर राधा उभी होती…

कान्हा राधेकडे पहात राहिला..

वीस वर्षांनंतर दिसत होती राधा… प्रौढ, शांत.. डोळ्यांभोवती दाट काळी वर्तुळं तोच व्याकूळ भाव..

“राधे, मैय्या कशी आहे ग? “

“यावं, द्वारकाधीश..!! मैय्या आत आहे. “

राधेनं कान्हाला हाताला धरुन आत नेल.

कान्हा आतल्या आत हलला… राधे मी तुझा कान्हा आहे ग… जन्मजन्मांतरीचे नात आपलं.. जगासाठी मी द्वारकाधीश…! तुझ्यासाठी मी कान्हाचं आहे ग..!!

कान्हाने यशोदेच्या दालनात पाऊल ठेवलं आणि पळतच यशोदेच्या बिछान्याजवळ जाऊन उभा राहिला…

इतक्या वर्षानंतर मैय्याला पहाताना कान्हा ला भरुन आलं, नेहमी साजशृंगार केलेली मैय्या… अव्याहत कान्हाच्या मागे पळणारी, उत्साहाने बडबड करणारी… उध्दवाबरोबर श्रीकृष्ण मथुरेला जाताना रथांमागे रडत रडत येणारी मैय्या, रडतच तिला सावरणारी राधा…

“मैय्या, मी आलोय ग कान्हा, डोळे उघड मैय्या…! “

यशोदेने हळुवारपणे डोळे उघडले, जणू त्यात नव्याने कुणीतरी प्राण फुंकावेत तशी उत्साहाने यशोदा उठली..!!!

मैय्या, अस म्हणतं कान्हाने त्या अशक्त कुडीला आपल्या कुशीत घेतलं, बांध फुटल्यासारखे दोघही गदगदून आपल्या आसवांनी जणू मधली विरहाची सारी वर्ष धुऊन काढत होते.

यशोदेच्या पायाशी बसलेली राधाही हुंदके देत होती… म्हातारे नंदबाबा वाहत्या डोळ्यांनी आपल्या कान्हाच्या खांद्यावर थोपटत होते.

“कान्हाला दहीपोहे दे गं राधे..!”

“मैय्या, द्वारकाधीशांना चालणार का दहीपोहे?” असं हळूच किंचित हसत राधेने विचारल

“मैय्या, बघ ना सारखचं द्वारकाधीश म्हणतेय मला, मी कान्हा चं आहे नं तुझा..?”

“राधे, नको ग असेल तो द्वारकेत द्वारकाधीश..! पण आपल्यासाठी तो कान्हाचं आहे. ” मैय्या क्षीण स्वरात म्हणाली…

“मैय्या आधीच कळवायचं ना ग, आलो असतो मी.. “आपल हे बोलण फोल आहे हे माहित असूनही श्रीकृष्ण म्हणाले.

“एवढं मोठं युध्द चाललेलं, तू पार्थाचं सारथ्य करत होतास.. सारं सांगितले बरं तुझ्या नंदबाबांनी… भरुन पावले मी, आता कांहीच इच्छा नाही, कान्हा! “

“मैय्या तु अन बाबा, राधा, अनयभाऊ सारेच चला द्वारकेला, सारे तिथचं रहाल माझ्याजवळ..! “

कान्हाला राधेनं मैय्याला जेवणं भरवायला लावलं, कान्हाला अशक्त झालेल्या यशोदेनं दहीपोह्याचे चार घास भरवले.. गोकुळात आनंद पसरला होता. नंदवाड्यात अशा पंक्ति कितीतरी दिवसांनी पडल्या होत्या.

श्रीकृष्ण क्षणभरही यशोदेला सोडून हलले नव्हते. सा-यांची जेवणं झाली…

यशोदा म्लान झाली होती. आपल्या हातात कान्हाचा शेला घट्ट पकडून तिने डोळे मिटले होते.

“कान्हा, आज बांसरी वाजवशील का रे? मी अन् राधा सतत आठवण काढत असतो त्या बासरीच्यां सूरांची..!

ही वेडी पोर तर सतत ती बासरी हातात धरुन एकटक पहात बसते…”

“कान्हा, वाजव ना रे मीही वाट पहातेय त्या अलवार सुरांची..! “राधा अधोवदनानेच बोलली.

“मैय्या, बांसरी कुठाय माझ्याकडे?”

“कान्हा, जाताना मला देऊन गेला होतास ना तुझी बांसरी.. “

अस म्हणत राधेन ती कान्हाच्या रेशमी शेल्यात निगुतीने जपून ठेवलेली बासरी बाहेर काढली. अन कान्हाच्या हातात ठेवली,

“हं, सुरु कर आता… “अस म्हणत राधा यशोदेच्या पायाशी जाऊन बसली.

श्रीकृष्णांने हातात बांसरी घेतली.. मन हळुवार झालं, यमुनेचा कांठ, गायी, गोपगोपिका सवंगडी, तो सर्वांनीच एकत्र खाल्लेला गोपाळकाला आठवून श्रीकृष्णांच्या काळजात उगाचच कासाविशी वाढली.

त्यानं मैय्याला नीट उशीला टेकून बसवलं, पाथथ्याशी बसलेल्या राधेकडे पहात त्यानं डोळे मिटले, अन् बांसरी वाजवायला सुरु केली.

अन् सारा नंदवाडा, गोकुळ त्या मधुर स्वरावर डोलू लागलं… त्या शांततेत ते खूप वर्षांनी वाजणारे मधुर स्वर… सर्वांना स्वर्गिय सुखाची अनुभूती देत होते….

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं… राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती 

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं.. राधेची मान वर केली अन् कान्हाचं काळीज चर्र झाल, डोळे अधोन्मिलीत, डोळ्यांच्या कडांवर पाणी साचलेलं. वेळीअवेळी ‘कान्हा वाजवं ना रे बांसरी असा लाडिक आणि एकच हट्ट करणारी राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

उध्दवाबरोबर मथुरेला जाताना श्रीकृष्ण राधेला भेटायला गेले होते. यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाखाली राधा झाडाला टेकून बसली होती. गोरापान चेहरा रडून रडून लाल झाला होता.

“कान्हा, जायलाच हवं का रे,…! “

अश्रुभरल्या डोळ्यांनी आणि जड गळ्याने राधेनं त्या पंधरा वर्षाच्या सावळ्या युवकाला विचारलं होतं.

“हे होणारच होतं राधे, तु दुःख करुन नको घेऊ मी येत राहिन ना… ग..! “

“नक्की येशील ना रे… मी वाट पाहिन, “

अस म्हणणारी राधा कायमची शांत झाली होती..

ते अर्धवट उघडे असलेले काळेभोर डोळे कान्हाला या वचनांचा आठव देऊन कासावीस करत होते.

माझे नेत्र राहतील उघडे,

तुझी वाट पहाताना…

माझे प्राण गेले तरी…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निरोप… भाग २ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆

सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग २ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

(कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.) इथून पुढे —- 

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती. यमुनेच्या काठावर दोन चिता रचल्या होत्या.

आधी मैय्याला चितेवर ठेवलं, श्रीकृष्णांने मैय्या च्या मुखात थरथरत्या हाताने तुलसीपत्र ठेवले.

शेवटचं चंदनी लाकूड मैय्याच्या चेहऱ्यावर ठेवले.

अन्

चितेभोवती प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. नंदबाबा आपल्या कान्हाला असं विवश पाहून दुःखी झाले होते… त्यांना कान्हाची सतत आठवण काढणारी, त्याच्याच आठवणींत जगणारी कान्हाची मैय्या आठवत होती.

कान्हा आपला मुलगा नाही असं कळल्यावर कान्हाला घट्ट मिठी मारुन 

पदराआड दडवू पहाणारी, जन्मभर कान्हाचीच आई म्हणून जगलेली भाबडी मैय्या होती ती… तिची प्रतिक्षा संपली होती. आज कान्हा माझ्याजवळ आहे या समाधानात ती गेली होती.

नंदबाबांनी मनोमन या मातेला वंदनच केलं.

कान्हाने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मैय्याच्या अग्नि दिला. कापूर, चंदनाच्या 

मध्ये मैय्याचा अशक्त देह अग्निला स्वाहा झाला.

कान्हा हात जोडून एकटक त्या जळणा-या चितेकडे पहात होते.

…………

सुन्न उभ्या राहिलेल्या कान्हाच्या खांद्याला अनय.. राधेच्या पतीने हलकासा स्पर्श केला.

अन भरल्या गळ्याने म्हणाला,

“यशोदानंदन, राधेला निरोप देऊया ना..! “

श्रीकृष्ण राधेच्या चितेजवळ उभे राहिले. जस समजायला लागलं तशी राधा त्यांच्याबरोबर होती. राधा कान्हापेक्षा मोठी होती सतत त्याला सांभाळून घेत राहिली. जिवापाड जीव टाकत राहिली.

त्या बांसरीच्या सुरांना सूर.. संगीत देत राहिली..

चितेवर सोळा शृंगारात पहुडलेल्या त्या राधेला पहाताना तिच्या लग्नात पूर्ण शृंगार केलेली दहा वर्षांची राधा आठवली.. तिच्या डोलीमागे रडतरडत धावणारा पांच वर्षांचा कान्हा…!

‘अरे दूर कुठे गेलीय राधुली, इथेच तर दोन घर सोडून अनयाघरी तर आहे. रोज खेळशील तिच्याशी तू.. ‘

अस कान्हाला यशोदेनं समजावलं होतं…

“अनयदा, आपण देताय ना राधेला निरोप..! “

अस अनयला सांगताना तो शामसावळा गदगदला होता, मनात हुंकार येत होते. राधेला निरोप देण शक्य आहे का मला? माझ्या रोमारोमात ती आहे, माझ्या अंतरंगात ती आहे… असेल जोपर्यंत चंद्रसुर्य आहेत तोपर्यंत हे राधाकृष्णाचे नातं अमर आहे..

“नाही यशोदानंदन, राधेचा लौकीकअर्थाने मी पती असलो तरी तिची शेवटची पाठवणी करायचा हक्क फक्त तुमचाच..! “

कान्हा पुढे झाला, अन् शांत मनाने राधेला अग्नि दिला….

कंदबाला टेकून उभा राहिला या दोन्ही चितेकडे पहात… त्याबरोबरच आपला इथला कार्यभाग संपला हीही जाणिव घेत… गोकुळाला… आणि आपल्या सरलेल्या बालपणाला निरोप देत राहिला… रिक्त रिक्त झालेला…

कान्हा नंदबाबांना आग्रहाने बरोबर घेऊन द्वारकेला निघाला.

द्वारकाधीश पुन्हा राजधानीत प्रवेश करते झाले. रुक्मिणी, सत्यभामा सामो-या आल्या. रुक्मिणीने नंदबाबांना मोठ्या मायेनं त्यांच्यासाठी तयार केलेल्या महालात पोहचवलं…!

द्वारकाधीश पुन्हा राज्यकारभारात रमले. पण रुक्मिणीला वाटत होतं, मैय्या आणि राधेला निरोप देऊन आल्यापासून खूप अबोल आणि शांत झालेत….

सतत विचारमग्न असणारे द्वारकाधीश 

राज्यकारभार करत होते… पण..

…………………

द्वारकाधीशांनी अश्वमेघ यज्ञ केला. अर्जुन तिकडे इंद्रप्रस्थात थुधिष्ठराच्या आज्ञेने राज्यकारभार पहात होता.

द्रौपदी सारे पुत्र अश्वत्थामाने मारल्याने विरक्त झाली होती.

परीक्षितांला मोठ आणि युध्दनिपुण करणं हेच सुभद्रा आणि पार्थाचे आता एकमेव ध्येय होते…

रुक्मिणी, सत्यभामा कृष्णपुत्र सांब, अनिरुध्द आणि इतरांच्या बाललीलात मग्न होत्या.

महाराज उग्रसेन वयस्कर झाले असले तरी या परंतवंडाकडे त्याचं लक्ष होतच.

महर्षी दुर्वास, विश्वामित्र, नारद, वशिष्ठ यांना कांही औपचारिक बैठकीसाठी द्वारकाधीशांनी आमंत्रित केले होते. राजधानी लगतच्या वनबागेत त्यांचा निवास होता. बैठक संपल्यानंतर महर्षी दुर्वास आपल्या कुटीत विश्राम घेण्यास गेले.

इकडे कृष्णपुत्र सांब आणि त्याचे मित्रांना दुर्वासऋषींची चेष्टा करायची लहर आली. सांबाने साडी नेसली, गर्भवती असल्याचा भास करण्यासाठी छोट्याशा मुसळाला कपडे गुंडाळून ते पोटाला बांधले.

“ऋषिवर, ही द्वारकाधीशांची स्नुषा आहे. आपण ह्यांना पुत्र होईल की पुत्री हे सांगाल का? “

अस सांबाच्या मित्रमंडळीनी मुद्दामच दुर्वासांना विचारलं.

महर्षी दुर्वास म्हणजे शिघ्रकोपी..!!

त्यांनी सांबच्या देहयष्टी आणि देहबोलीवरुन ओळखले हा कोणीतरी पुरुष आहे. त्यांना या तुच्छ चेष्टेचा अतिशय संताप आला…

“मुर्खा, तू जे हे पोटाला बांधलयस ना याच्यामुळेच तुझ्या पूर्ण कुळाचा नाश होईल… “

सांब घाबरला त्याने ‘मी कृष्णपुत्र आहे, मला क्षमा करा अशी याचना केली.. आजोबा उग्रसेनना सारं सांगितले, त्यांनीही क्षमा मागितली.

दुर्वास म्हणाले, “क्षत्रिय पराक्रमी, श्रेष्ठ पित्याच्या पोटी जन्म घेऊन तू अशी हीन बुध्दी कशी घेऊन आलास, अनिरुध्दाचा परिवार वाचेल कदाचित…! “

द्वारकाधीशांच्या कानांवर हे सारं गेलं, त्यांना गांधारीचा तळतळाट आठवला. कांहीच चूक नसताना सत्याचा पाठीराखा म्हणून “तू कौरव वंश संपवलास तसाच तुझा यादववंश संपेल..! ” असं गांधारीदेवी म्हणाल्या होत्या…

महायुध्द संपून पस्तीस वर्ष झाली होती. द्वारकाधीश आता वयोवृध्द दिसत होते. रुक्मिणीनेही या इहलोकाचा निरोप घेतला होता.

ज्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या महिरपीने द्वारकाधीश मोहकच दिसत ते आता रुपेरी झाले होते…

आता त्रेतायुग संपणार होते… अन कलियुग लागणार होते… हे घडणार अटळ आहे. हे त्यांनाही माहित होतेच.

राज्यात विचित्र घटना घडू लागल्या… द्वारकाधीशांच्या महालातून सुदर्शन चक्र, द्वारकाधीशांची गदा अचानक नाहिशी झाली…

बलरामदादांचा नांगरही नाहिसा झाला.

सांब आणि दुसऱ्यां भावंडामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरुन भांडणे झाली… अन् त्याचं रुपांतर मोठ्या घटनेत झालं. सांब मारला गेला…

द्वारका नदीकाठी चितांची रांग लागली…

द्वारकेवर म्लेंछ आणि डाकूंचा हल्ला झाला होता. द्वारकाधीशांनी अर्जुनाला मदतीला ये असा निरोप धाडला…

विषण्ण मनाने द्वारकाधीश वनात ध्यानधारणा करण्यास गेले… कंदबाला टेकून पाय लांब करुन शांत मुद्रेत बसले होते.

“कान्हा, आलास? मी कित्ती वाट पाहिली… पुरी पस्तीस वर्ष झाली रे मी वाट पहातेय… त्या शेवटी ऐकलेल्या बांसरीचे सूर ऐकतेय अजूनही….!

बघ तुला ऐकू येतय का? “

राधा शेजारीच बसून विचारत होती… कान्हाने तिचा हात हाती घेतला, अन् तेवढ्यात जिरु नांवाच्या शिका-याचा बाण सूं,. सूं करत 

कान्हाच्या तळपायात घुसला…

कान्हा जोरात ओरडले,

मैय्या,….. अन त्यांचे सावळेमुख लालभडक झाले… वेदना सहन करण्यासाठी त्यांनी राधेचा हात धरायचा प्रयत्न केला…. तर…

राधा सावकाश उठून द्वारका नदीच्या दिशेने जात होती…

“राधे राधे थांब… “अस कान्हा जिवांच्या आकांताने ओरडले… पण राधा क्षणार्धात त्या द्वारकेच्या पाण्यात नाहीशी झाली…

द्वारकाधीशांचे हळूहळू डोळे मिटू लागले. पृथ्वीला हात लावून आपल्या त्यांनी वंदन केलं… अन शांतपणे डोळे मिटले…. सत्य, प्रेम, करुणा यांनी पृथ्वीचा निरोप घेतला…!

……….

अर्जुन द्वारकेत आल्या आल्या श्रीकृष्णांनी इहलोकाचा निरोप घेतल्याची बातमी पार्थाला कळली…!

पार्थच्या दुःखाला पारावर राहिला नाही. बलराम आणि रेवती यांनी स्वतःला द्वारकेच्या स्वाधीन केले.

अर्जुनाने आपल्या जिवलगाचे पार्थिव द्वारकेच्या काठावर आणले.

डोळे शांत मिटलेले.. अर्जुनाला वाटले आता श्रीकृष्ण उठेल अन् म्हणेल,

“पार्था, असा पायाशी का बसलायस? बोल तुला काय मदत हवीय… चल मी येतो तुझ्याबरोबर..! “

ते रुपेरी कुरळे कुंतल, भव्य भालप्रदेश, धारदार नाक, पातळ गुलाबी जिवणी… पार्थाला कान्हाच्या चेहऱ्यावरुन नजर हटवावीशी वाटतं नव्हती… त्याच ते मनमोहक हसू… डाव्या गालावरील लाडिक खळी,

कान्हा विचारमग्न असला की माथ्यावर किंचितशी उभी आठी पडे,

द्रौपदीला शांत करण्याचं सामर्थ्य असलेला तिचा सखा..

युध्दात कर्तव्यकठोरपणे निर्णय घेणारा, द्रौपदीचे सारे पुत्र रात्री झोपेत अश्वत्थामाने मारल्यावर दुःखाने विव्हल होऊन पार्थ, द्रौपदीला पोटाशी घेणारा कान्हा…!

चितेवर श्रीकृष्णांचे पार्थिव ठेवताना अनिरुध्द आणि अर्जुन यांना गदगदून आलं… जड अंतःकरणाने त्या द्वारकाधीशाला निरोप दिला.

अर्जुनाने सत्यभामा, अनिरुध्द त्याची पत्नी उषा इतर सर्वांनाच तयार केले. सारे द्वारकेला निरोप देऊन तयार झाले… सारी द्वारका रिक्त झाली होती… इकडे द्वारका नदी उसळ्या मारु लागली होती.

अर्जुन हजारो लोकांना घेऊन आपली राजधानी इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करता झाला…

अर्जुन इंद्रप्रस्थात पोहचला… राणीवश्यात श्रीकृष्ण प्रयाणाची बातमी कळली.. तिथे आक्रोश उठला…!!!

इकडे द्वारका फारच खवळली होती. समुद्र जणू द्वारकेला भेटायला आला… अन् पूर्ण द्वारकानगरी पाण्यात बुडाली… जणू तिला द्वारकाधीशांच्या शिवाय रहायचं नव्हतं चं…

आश्चर्य म्हणजे द्वारकाधीशांचा राजप्रासाद मात्र सुरक्षित होता… तिथे पाणी गेलं नव्हतं…

पराक्रमी, न्यायी, प्रेम, करुणा असलेल्या कान्हाचा वियोग आजही त्या राजप्रासादाला जाणवतं असेल का…???

– समाप्त –

(एखाद्या कथेवरून बोध घेऊन आपला दृष्टिकोन बदलून जातो किंवा आपले विचार बदलतात, सकारात्मक होतात.) 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ १ लघुकथा आणि ३ अलक (भावानुवाद) – “ मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ १ लघुकथा आणि ३ अलक (भावानुवाद) – “ मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१) लघुकथा –  रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर”

रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावरून मजूर जातांनाचे त्यांच्या पावलांचे आवाज तेवढे ऐकू येताहेत… पण या दृश्याच्या अगदीच पलिकडे आहे त्यांचे दु:ख… वेदना… त्यांची निराश हताश मन:स्थिती…

रस्त्यावर सायकलच्या घंटांचे, गाड्यांच्या कर्कश्श हॉर्नचे आवाज आहेत. कचरा चघळत उभ्या असलेल्या गायींच्या हंबरण्याचा आवाज मध्येमध्ये ऐकू येतोय्. टांगे चाललेत, त्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकू येताहेत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या निरागस हसण्या-खिदळण्याचा गोड आवाज ऐकू येतो आहे.

मास्क घातलेले लोक भीतभीतच रस्त्यावर ये-जा करताहेत. त्यांच्या मनात करोना व्हायरसची भीती आहे… आणि त्या भीतीतून जणू मरण डोकावतंय्.

बिचारा मुका रस्ता… जिथे आहे तिथेच आहे… तो उठून कुठेच जाऊ शकत नाही. कुणीतरी फेकलेलं पेटत्या सिगरेटचं थोटूक त्या रस्त्याला कणाकणाने शोषून घेतंय्.

रस्त्यावरचा कचरा गोळा करणारा एक मुलगा… सारखं वहाणारं नाक पुसत.. रडत रडत चाललाय्… 

—- हे सगळं पाहून हवा वाहता वाहता जराशी थांबलीये… सूर्यही थोडा मंदावला आहे… आकाशाची निळाईही थोडी कमी झाली आहे.

रस्त्याच्या कितीतरी वर आकाश आहे… आकाशात पक्षी आहेत… आणि त्यांची सावली जमिनीवर पडली आहे… त्यांच्या पंखांमध्ये उडण्याची आस आहे… मनात आकाश मोजण्याची इच्छा आहे… श्वासांच्या शाईने ते त्यांचा आनंद रेखाटताहेत.

रस्त्याच्या एका बाजूला आलिशान घरं आहेत. पण त्यांना लाकडी कुंपणाने जणू काही बांधून टाकलंय्… कारण तिथे रहाणारे सगळे करोनाने ग्रासलेले आहेत.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मैदान आहे. तिथे हिरवंशार गवत उगवलंय्… ज्यात खूप किडे आहेत… एक चिमणी मन लावून ते किडे खाते आहे. एकीकडे तिची चिवचिव चालूच आहे. तिचा आनंद पाहून रस्ता हळवा होऊ लागलाय्…

दुधाच्या मोठाल्या कासंड्या सायकलला अडकवून काही दूधवाले चालले आहेत. हिंदकाळणाऱ्या त्या कासंड्यातल्या दुधाचा अभिषेक रस्त्यावर होतोय्… आणि रस्ता जरासा तृप्त होतो आहे.

काही माणसं एका तरूणाचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून चालली आहेत. त्या दृश्याच्या आडून, बेरोजगारीमुळे केलेली एक आत्महत्याच चालली आहे जणू! काही धार्मिक माणसं त्या प्रेताला नमस्कार करताहेत… आणि ते पाहून ते प्रेत उपहासाने हसतंय्…

त्याच रस्त्याने एक शेतकरी त्याचा जवळजवळ रिकामाच असलेला ट्रॅक्टर घेऊन चाललाय्. त्यात अगदी नावालाच थोडंसं धान्य आहे. गावाकडे असणाऱ्या त्याच्या बायकोचा फोन आला आहे. त्याचा भाऊही शेतकरीच होता… आणि त्याने आत्महत्या केल्याचं बायको सांगते आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आता दाट अंधार पसरलेला आहे. डोळ्यासमोर पसरलेला अंधार आणि रस्त्यावर पसरलेलं डांबर एकमेकांत मिसळून जणू एक काळाकुट्ट कोलाज बनवताहेत.

रस्त्यावरून शाळेत जाणारी निष्पाप मुलं बघतांना रस्त्याला नेहेमीच खूप छान वाटतं. त्यांच्या एका हातात जणू पृथ्वी असते आणि खिशात असतो सूर्य. त्यांच्या शांत आणि भाबडेपणाने सगळीकडे बघणाऱ्या डोळ्यात बुडून जातांना रस्ताही बाकी सगळं क्षणभर विसरून जातो.

गाणी गात गात रस्त्याकडेचं गवत कापत असणाऱ्या स्त्रिया रस्त्याला आवडतात. त्या रस्त्याने कॉलेजला जाणाऱ्या अल्लड-चंचल मुलींचं हसणं-खिदळणं रस्त्याला फार छान वाटतं. दिवसा असे हे मृदू, गोड आणि सुखद क्षण अनुभवतांना रस्ता खूप खूश होऊन जातो.

… आत्ता रात्रीची वेळ आहे. रस्त्यावरच काही अंतरावर एक दुर्घटना घडली आहे. दारू पिऊन बेधुंद अवस्थेत चाललेल्या एका ड्रायव्हरने त्याच्या गाडीने एका दुर्दैवी सायकलवाल्याला चिरडून टाकलंय्. रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावर मृत व्यक्तीचा छिन्न-विच्छिन्न झालेला देह पडलेला आहे. त्या मृत व्यक्तीचं रक्त त्या डांबरावर सगळीकडे पसरलंय्. तिथली भयाण शांतता जणू काही शोक-गीत गातेय् असं वाटतंय्. नशेत बेधुंद झालेल्या त्या गाडीचा ड्रायव्हर तिथून पळून जाऊन लांब कुठेतरी उभा आहे. हे सगळं दारूण दृश्य पाहून रस्ता शोक करतो आहे. त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होताहेत…

… कसंही करून पुन्हा एकदा पूर्वीसारखी पायवाट व्हावं आणि पूर्वीसारखंच आमराईत हरवून जावं असं आता अगदी अधीरतेने त्याला वाटतंय्…

… आणि त्या रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर… 

… हे सगळं त्रासदायक भयंकर दृश्य पाहून घाबरलंय्. त्या डांबराला मनापासून असं वाटायला लागलंय् की… त्याला पंख फुटावेत आणि त्या त्रासदायक दृश्यापासून खूप खूप लांब… त्या निळ्याशार आकाशापर्यंत उडत जाऊन, तिथेच कुठेतरी त्याने दडून बसावं… हरवून गेल्यासारखं……

मूळ हिन्दी कथा : ‘सडक की छाती पर कोलतार’

– – – 

(२) कोवळं ऊन… (अलक) 

आज मन कमालीचं उदास झालं होतं … काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी घराबाहेर पडलो, आणि इंडिया गेटशेजारी असलेल्या मैदानात येऊन बसलो होतो. तिथल्या हिरवळीवर काही जोडपी गप्पा मारत बसली होती. मुलं क्रिकेट खेळत होती. पण एकूणच वातावरण मात्र फार धूसर धूसर वाटत होतं. आकाश ढगांनी व्यापून गेलं होतं. मी नुसताच बसून राहिलो होतो. इतक्यात समोरून अडीच-तीन वर्षांची एक गोड मुलगी आपल्या आईचा हात धरून उड्या मारत येतांना दिसली.

ती माझ्याजवळून जात असतांना मी प्रेमाने तिला.. ’ हॅलो बेटा.. ‘ म्हटलं. आधी जराशी लाजली ती.. आणि मग माझ्याकडे बघून हात हलवत गोड हसली… आणि ते निष्पाप हसू पाहून मला वाटलं की माझ्या आसपास अचानक अगदी कोवळं ऊन पडलंय …. फक्त आसपासच नाही … तर माझ्या मनातही ….

– हिंदी कथा : धूप.

– – – 

(३) स्वप्न… (अलक) 

एखादं वादळ आल्यासारखा वारा खूप जोराने वहात होता. समोरच असणाऱ्या समुद्रात पाठोपाठ येणाऱ्या लाटाही अगदी अक्राळ विक्राळ दिसत होत्या. तिथे असलेले सगळे लोक घाबरून किनाऱ्यापासून लांब पळत होते. पण एक तरुणी.. जी पाठीमागून पहातांना मला ओळखीची वाटत होती.. ती मात्र किनाऱ्यावर वेगाने आपटणाऱ्या त्या लाटांच्या दिशेने चालली होती.

“ अगं तिकडे का चालली आहेस तू? “.. मी मोठ्याने ओरडत तिला विचारलं.

तिने उत्तरादाखल मला सांगितलं … “ तू त्या दुसऱ्या बाजूला राहतोस ना.. म्हणून मी तुझ्यापासून दूर.. उलट्या दिशेने चालले आहे.. “ 

… तिचं हे उत्तर ऐकलं आणि माझे डोळे खाडकन उघडले…. कायम माझ्या स्वप्नात राहणाऱ्या त्या तरुणीला मी ओळखलं …. नुकतीच मला सोडून गेलेली माझी प्रेयसी होती ती … मी भानावर आलो.. म्हणजे मला झालेला भास होता हा …. आणि तो मला सांगत होता की.. याआधी इतके दिवस माझ्याबद्दल तिच्या मनात जे प्रेम होतं ते प्रेम.. ती भावना आता पूर्णपणे मिटून गेली होती… कायमची संपून गेली होती….

– हिंदी कथा : सपना.

– – – 

(४) नोकरी …. (अलक) 

थोड्या वेळापूर्वीच मला ही नोकरी मिळाल्याचं पत्र आलं होतं. आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. भाऊ अक्षरशः पळत जाऊन पेढे घेऊन आला होता. आईने प्रेमाने माझ्या कपाळावर ओठ टेकवून मला तोंडभरून आशीर्वाद दिला. वडलांनी अतिशय मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला…. ते काहीच बोलले नाहीत पण त्यांचे डोळे बोलत होते …. ‘ माझ्या हुशार मुलाला ही नोकरी तर मिळणारच होती.. ‘.. “ पार्टी पाहिजे … दादा पार्टी द्यायचीच आहेस तू.. “ असा बहिणीचा हट्टही चाललाच होता. पण ….

… पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली एक शंका मात्र सारखी मला खुणावत होती …. म्हणजे …. कसं सांगावं … मी ही नोकरी मिळवली होती.. का या नोकरीने मला मिळवलं होतं … एक नवा ‘बकरा’ म्हणून..????

– हिंदी कथा : नौकरी.

चारही हिंदी कथांचे मूळ कथाकार : श्री. सुशांत सुप्रिय, इंदिरापुरम्

मराठी अनुवाद : सुश्री  मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पावसाची रात्र… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ पावसाची रात्र… ☆ श्री मयुरेश देशपांडे

रखमेच्या वेदना कमी होत नव्हत्या, तिचे विव्हळणे विठोबाला सहन होत नव्हते आणि इकडे पाऊस मात्र बेदकारपणे वेडावाकडा उभा आडवा कसाही कोसळत होता. समोर रस्त्यावर साचलेले तळे स्पष्ट दिसत होते. अमावस्या जवळ आली होती, अंधार अधिक गडद झाला होता. अश्यातच विठोबाने दोनदा मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन पाहिले काही मदत मिळते का? पण त्याला हताश होऊन माघारी फिरावे लागत होते. दोघेही एकदा बाहेरच्या पावसाकडे एकदा देव्हाऱ्यात लावलेल्या नंदादीपाकडे पहात होते.

“मालक तुम्हाला लवकर घराकडे बोलावलया”, धावत आलेला गणप्या धापा टाकत बोलत होता. त्याचे अस्पष्ट बोलणे ऐकून शेतातली कामे तशीच टाकून विठोबा घराकडे धावला. रखमा बिछान्यावर झोपली होती. पायाशी गणप्याची बायको बसली होती. विठोबाची आई भिंतीला मान खाली घालून बसली होती. “मालक, ताईसाहेब आजारी आहेत. “, गणप्याची बायको पदर सावरत खालच्या आवाजात बोलली.

“अग मग वैदुला बोलावणे धाडायचे ना. “

“बोलावले. तो येऊनबी गेला आणि म्हणूनच तुम्हाला एवढ्या घाईने बोलावणे धाडले. “

सर्वांचे उतरलेले चेहरे, रखमेचे असे दिवसा ढवळ्या बिछान्यावर झोपणे आणि गणप्याच्या बायकोचे दबक्या आवाजात बोलणे, विठोबाची चिंता आणखीनच वाढवित होते. विठोबाच्या लग्नाला आत्ता कुठे दोन एक वर्षे झाली होती. त्याचे रखमेवर जीवापाड प्रेम होते. आणि त्या रखमेला काहीतरी झाले या जाणीवेने त्याला त्रास होत होता.

“काय म्हणाला वैदू? “

“लई मोठ्ठा आजार आहे म्हणे. नऊ महिने काळजी घ्यावी लागेल, म्हणत होता. ” शक्य तेवढे हसू आवरण्याचा प्रयत्न करून गणप्याची बायको बोलली.

“नऊ महिने काळजी घ्यायला लागेल, असा आणिक कोणता आजार आहे? “

“आरं तु चार इयत्ता शिकला, पण खूळा ते खूळाच राहिला. ” विठोबाची आई हसत बोलली. “आर मी आजी नी तू बाप होणार हायीस. “

खरे काय ते कळले आणि विठोबा लाजला. त्याने प्रेमाने रखमेकडे बघितले आणि तिने पण लाजेने मान फिरवली.

“चल गं, बाहेर केवढी काम पडलीयेती. आता शेतातली कामं बी आपल्यालाच सांभाळावी लागतील वाटतं. “, त्या दोघांना घरात एकटं सोडत विठोबाची आई गणप्याच्या बायकोला घेऊन बाहेर पडली. “गावच्या देवाला साखर ठेवायला हवी. ” विठोबाची आई मनातल्या मनात विचार करत होती.

विठोबा रखमेच्या शेजारी जाऊन बसला. अजूनही तिने मान इकडे फिरवली नव्हती. “अवकाळी पाऊस आपल्याला पावला तर”, तिच्या खांद्यावर हात ठेवत विठोबा बोलला.

आता मात्र हळूच मान फिरवत रखमेने त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा मान फिरवली.

दिवसामागून दिवस जात होते. विठोबा घर आणि शेती दोन्हीकडे सारखाच वेळ देत होता. रात्रीच्या राखणीची जबाबदारी आता गणप्यावरच येऊन पडली होती. तर गणप्याची बायको रखमेला काय हव नको सारं बघत होती. वैदुने सांगितल्याप्रमाणे विठोबाने रखमेला तालुक्याच्या डाक्टरणीकडे दाखवून आणले होते. सर्वकाही ठिक चालले होते. रखमेचे डोहाळे शेतात काम करायचे होते पण विठोबा मात्र तिला फारवेळ शेतात थांबून देत नव्हता.

रखमेचे दिवस भरत आले तसे विठोबा अधिकच काळजी घेऊ लागला. पावसाची नक्षत्र जवळ आली होती. पावसा आधीच्या कामांनी वेग धरला होता. इच्छा असूनही विठोबाला घरी जास्तवेळ थांबता येत नव्हते. पण आई आणि गणप्याची बायको रखमेजवळ असल्याने काळजीचे फारसे कारण नव्हते. बाकीचा भार ग्रामदेवतेवर सोडला होता. पहिला पाऊस आला, अंगण ओले झाले तशी रखमा अधिकच खूलली. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतसे रखमेच्या चेहऱ्यावरचे तेज वाढत होते आणि इतरांच्या चेहऱ्यावरची काळजी. गणप्याने तर बायकोला बजावून ठेवले होते, ताई साहेबांच्या पाठीमागे सावली सारखे रहायचे. तो स्वतःसुद्धा येता जाता रखमेची ख्याली खुशाली विचारत होता. त्याची मालकीणबाई असली तरी सख्ख्या बहिणीचे प्रेम होते तिच्यावर.

पेरणी झाली, फवारणी झाली, आता यशापयश ईश्वराच्या पायी ठेवून विठोबा घरात थांबू लागला. त्याच्या शाळकरी मित्राची रंग्याची जीप त्याने सांगून ठेवली होती. कधीबी तालुक्याला जाव लागल, तयार रहा.

त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. रखमेला पाऊस प्रचंड आवडायचा. पावसाबरोबर येणारा मातीचा गंध तिची कळी खूलवायचा.

शेजारच्या गावातल्या नातेवाईकाकडे पूजा होती. विठोबा घरी होता आणि सकाळी जाऊन दुपार पर्यंत परतायचे म्हणून विठोबाची आई आणि गणप्याची बायको पूजेला गेले. त्यांना सोबत म्हणून विठोबानेच गणप्याला पाठविले. एरवी तो गेलाच नसता, पण पावसाचे दिवस, आईचे वय असा सगळा विचार करून तो तयार झाला.

अंगणात कोसळणाऱ्या पावसाला पहात दिवस कसा सरला कळालेच नाही. अंधार पडू लागला तसे विठोबाने देवघरात दिवा लावला. अजून आई कशी आली नाही या काळजीने त्याला ग्रासले होते. पाऊस कमी व्हायचे नाव घेत नव्हता. रखमेशी बोलत बोलत मग त्यानेच काहीबाही बनविले व रखमेला जेवायला दिले. हळूहळू रखमेची तब्येत बदलू लागली. तिला कळा यायला लागल्या.

विठोबाच्या लक्षात आले की आता हिला तालुक्याच्या दवाखान्यात न्यायला हवे. तश्या पावसातच अंधारात चाचपडत तो रंग्याच्या घरी गेला. तेव्हा त्याला कळाले की सकाळची फेरी घेऊन तालुक्याला गेलेला रंग्या परतलाच नाहीये. आता त्याच्या लक्षात आले की, या पावसामुळेच त्याची आई दुसऱ्या गावी अडकली असावी. आता काय करावे त्याला सुचत नव्हते. गावात तशी गाडी कोणाकडच नव्हती. एवढ्या पावसात आणि अश्या अवस्थेत बैलगाडीतला प्रवास रखमेला घातक ठरला असता. विठोबाच्या घरापासून मुख्य रस्ता जवळ असल्याने त्याने तिथून एखादे वाहन थांबते का बघितले, काही मदत मिळते का बघितले, पण सगळे प्रयत्न विफल ठरले.

आता मात्र त्याने वैदुचे घर गाठले. विठोबाची परिस्थिती पाहून वैदू मदतीला धावला. रंग्याची आई व बायको, तसेच इकड तिकडच्या चार बायका वैदूच्या मदतीला धावल्या. आणि तास दिड तासांच्या वेदनांनंतर रखमा-विठोबाचे बाळ जन्माला आले. इकडे बाळ जन्माला आले आणि इकडे पाऊस ओसरला. कृष्णाचा अवतारच जणू. वैदूने त्याच्याकडची औषधै दिली. सकाळ होताच रखमेला व बाळाला तालुक्याला घेऊन जायला सांगितले.

उरली रात्र विठोबा रखमेच्या जवळ बसून होता. तिच्या वेदना कमी झाल्या असल्या तरी संपल्या नव्हत्या. शेजारी बाळ झोपले होते. त्या ग्लानीमध्येच रखमेला झोप लागली तर विठोबाचे डोळे अधूनमधून उघडझाप करत होते.

सकाळ झाली. पाऊस ओसरला. तसा रंग्या तालुक्यावरून परतला. त्याला घरी आल्यावर घडला प्रकार बायकोकडून व आईकडून कळाला. त्याला फार अपराध्यासारखे वाटले. पण काय करणार? निसर्गा पुढे तोही हतबल होता. त्याने तडक विठोबाचे घर गाठले. घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तर उलट विठोबाने त्याच्या आईचे व पत्नीचे आभार मानले. त्याने लगेच विठोबा, रखमा व बाळ यांना तालुक्याला नेले. इकडे विठोबाची आई, गणप्या व त्याची बायको घराकडे परतले. बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे त्यांना कळाले. विठोबाच्या आईने तिथूनच ग्रामदेवतेला नमस्कार केला व संकटातून वाचविल्या बद्दल आभार मानले.

विठोबाचे बाळ आता अंगणात खेळत आहे. रखमेला दुसऱ्यांदा दिवस गेले आहेत. गणप्याच्या संसारवेलीवरही एव्हाना एक फूल फुलले आहे. गणप्या आणि विठोबा मोठ्या आनंदाने शेतात राबत आहेत तर आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून विठोबाची आईही समाधानी आहे.

आणि हो, सगळेजण मिळून पुढच्या पावसाची वाट पहात आहेत.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares