श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ नावात काय आहे? – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.) – इथून पुढे —-
” साहेब याला कारण आपली मराठीच माणसं आहेत ” तो सांगू लागला ” दोन वर्षांपूर्वी हे हाॅटेल टाकलं तेव्हा मोठ्या हौसेनं हाॅटेलचं नाव समर्थ ठेवलं. वाटलं आपली मराठी माणसं स्वामी समर्थांचं नाव पाहून हाॅटेलला येतील. खुप जोरात चालेल आपलं हाॅटेल. पण हाॅटेलचं नाव मराठी, मालकही मराठी म्हणजे हे हाॅटेलही कमी दर्जाचं असा समज आपल्या मराठी माणसांनी करुन घेतला. तुम्हांला सांगतो साहेब आपल्या मराठी माणसांना मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी खाद्यपदार्थांचा जराही अभिमान नाही. तो जर असता तर मुंबईत नव्वद टक्के हाॅटेल्स परराज्यातील लोकांची दिसली नसती. तिथंच काय इथे मलकापूरातही परक्या लोकांचीच हाॅटेल्स जास्त आहेत. आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्राचे काय स्वतःचे खाद्यपदार्थ चांगले नाहीत? “
कस्टमर आले तसा तो थांबला. कस्टमर मराठी दिसत होते पण ते त्याच्याशी हिंदीत बोलत होते. ते गेल्यावर तो म्हणाला” बघितलं साहेब माणसं मराठी होती पण हिंदीत बोलत होती. का? कारण आम्हांला मराठी भाषेचा अभिमानच नाही. महाराष्ट्रात असूनही तुम्ही मराठी माणसाशी हिंदीत बोलता. मराठी भाषा काय नाॅन स्टँडर्ड आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणे आणि इथे आम्हांला मराठीत बोलायचीही लाज वाटते. मराठी लोकांची मानसिकताच वाईट आहे साहेब”
त्याचे मुद्दे मला पटत होते. बरेच मराठी डाॅक्टर्स मी मराठी आहे हे माहीत असूनही माझ्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचे. आणि माझ्यासारख्या एम. आर. ना फार्मा कंपन्यांचे प्राॅडक्टस् विकायचे असल्याने त्यांच्याशी आम्हांला नाईलाजास्तव हिंदीत बोलावं लागायचं.
” खरंय तुमचं म्हणणं ” मी म्हणालो ” बघा ना मराठी माणसं मराठी गाणी ऐकत नाहीत, मराठी चित्रपट पहात नाहीत. फक्त हाॅटेल्सच नाहीत तर जवळजवळ सगळे व्यवसाय नाॅन मराठी लोकांच्या ताब्यात गेले आहेत. आपल्याकडचे कॅटरर्स पहा. बहुतेक राजस्थानी आहेत. फॅक्टरीतले कामगार बिहारी आहेत. महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोकांची राजधानी असूनही मुंबईत हिंदीच बोलणारे जास्त सापडतात. मराठी माणसांसोबत मराठी भाषाही मुंबईतून हद्दपार होतेय ”
” अहो साहेब मुंबईचं सोडा. आमच्या विदर्भातही तेच होत चाललंय. एक दिवस बघा महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्रीही परप्रांतीयच असणार आहे. आणि ही संधी आपले आपापसात भांडणारे मराठी आमदारच त्यांना देणार आहेत हे नक्की ”
” पण काहो तुम्ही हाॅटेल गुजरात हे नाव कसं ठेवलंत? “
” तुम्ही पाहीलंच की हाॅटेल फारसं चालत नव्हतं. कामगारांचे पगार सुद्धा करणं मला कठीण होऊन बसलं होतं. हाॅटेलमधले मराठी वेटर्स, कामगार सोडून गेले. गंमत बघा साहेब आपले मराठी कामगार मारवाडी, सिंध्यांकडे कमी पैशात निमुटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे जास्त पगार मिळूनही नखरे करतात. खाडे मारतात, मालकाला जमेल तसं छळून घेतात. माझी आई गुजरातची. त्यामुळे गुजराती भाषा आणि गुजराती पदार्थ आम्हांला चांगले येतात. मी हे हाॅटेल टाकतांना माल काढणारा मुख्य कारागीर मराठी ठेवला होता. पण तो दारु पिऊन यायचा आणि खुप खाडे करायचा म्हणून त्याला काढून मी गुजरातमधून कारागीर बोलावून आणला. तो मात्र मेहनती आणि इमानदार होता. माझ्या पडत्या काळातही तो मला सोडून गेला नाही. त्यानंच मला हाॅटेलचं नाव गुजरात करण्याचं सुचवलं. एकंदरीत परिस्थितीमुळे मलाही ते पटलं. मग मी नाव तर बदललंच पण आतलं इंटिरिअरही बदलून टाकलं. त्याच कारागीरानं गुजरातमधले कामगार बोलावून घेतले. आता माझ्याकडचा सगळा स्टाफ गुजराती आहे. हे लोक कधीच मराठी माणसांसारख्या दांड्या मारत नाहीत, दारु पिऊन येत नाहीत, पगार उशीरा दिला म्हणून भांडणं करत नाहीत. सध्या सगळं सुरळीत चालू आहे. हाॅटेलचं नाव गुजरात ठेवल्यामुळे लोकांना हाॅटेल उच्च दर्जाचं वाटून ते इथंच नाश्ता, चहाला येतात “
” खरंय. सध्या तर बसायला जागा मिळत नाहिये ” मी हसत म्हणालो तसा तोही हसला
” तुम्हांला ते पुढच्या चौकातलं ब्रजवासी हाॅटेल माहीत आहे का? “
” हो. माहितेय पण मला ते आवडत नाही. गचाळ आहे ”
” बरोबर. तरीही त्याच्याकडे अगोदर खुप गर्दी असायची. आता तिकडचे गिऱ्हाईक आपल्याकडे यायला लागलेत ”
मी घड्याळाकडे पाहिलं. मला आता निघायला हवं होतं. साडेदहाची डाॅक्टरांची अपाॅइंटमेट होती. मी बिलाचे ८० रुपये काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यानं ४० रुपये मला परत केले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला
” असू द्या साहेब. तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात”
मी ४० रुपये परत करत म्हणालो
” तुम्ही हाॅटेलचं नाव गुजरात केलं आता मराठी माणसांची मानसिकता सोडून गुजराती लोकांसारखे व्यवहारी व्हा. धंदा म्हणजे धंदा. कस्टमर कुणीही असो. नो डिस्काउंट ”
त्यानं हसून ४० रुपये गल्ल्यात टाकून दिले. त्याच वेळी तिथं आलेल्या दोनतीन कस्टमरचेही पैसे त्यानं घेतले. ते गेल्यावर तो म्हणाला
” साहेब पुढच्या महिन्यापासून आपण वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था करतोय. पंजाबी, गुजराती, मारवाडी, जैन सगळ्या प्रकारच्या थाली मिळतील. या कधी जेवायला “
” आणि महाराष्ट्रीयन थाळीचं काय? “
तो हसला
” काय करता साहेब. आपल्या मराठी माणसाला आपलं घरचं जेवण हाॅटेलमध्ये नको असतं. त्यांना हाॅटेलमध्ये जे जेवायला आवडतं तेच आपल्याला ठेवावं लागणार ना! ”
अर्थातच त्याच्या या युक्तिवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.
बडिशेप खाऊन मी निघालो.
रविवारी माझ्या घरी पाहूणे येणार होते. बायको मला म्हणाली. ” अहो उद्या त्या बिकानेर स्वीट मार्ट मधून एक किलो श्रीखंड घेऊन याल ”
” का आपल्या जवळच्या दत्त डेअरीतही चांगलं श्रीखंड मिळतं. तिथून का नाही आणायचं? ”
” नको तिथलं नको. राजस्थानी लोकांकडचे सगळे पदार्थ चांगले असतात ”
” अहो मॅडम मराठी लोकांकडचे पदार्थ चांगले नसतात ही मानसिकता सोडून द्या आता. आपलेही लोक चविष्ट पदार्थ बनवतात. तू स्वतः मराठी आहे. तू काय चवदार पदार्थ बनवत नाहीस? दत्त डेअरीचा मालक मराठी असला तरी त्यांचं श्रीखंड बिकानेरवाल्यापेक्षा जास्त चांगलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात घे. श्रीखंड हा महाराष्ट्रीय पदार्थ आहे. तो मराठी माणसं चांगला करतील की राजस्थानी? तूच तर म्हणतेस ना की इडली, डोसा साऊथ इंडियन जितका चांगला करतात तितका आपला नसतो. छोले भटूरे पंजाबी लोक जसे बनवतात तसे आपल्याला जमत नाहीत. मग हीच बाब श्रीखंडाला का लागू होत नाही? ”
या प्रश्नावर बायको निरुत्तर होणार हे मला माहीत होतं. झालंही तसंच. माघार घेत ती म्हणाली
” ठीक आहे, दत्त डेअरीतून आणा “
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈















