☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८३ आणि ८४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ८३ – – –
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ।
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ।।८३।।
अर्थ : मदनाला म्हणजेच कामदेवाला ज्या भगवान शंकरांनी जाळून भस्म केले, ते शंकर स्वतः रामाचे ध्यान करतात. श्रीरामांचे गुण अत्यंत आदरपूर्वक पार्वतीला सांगतात. ज्यांच्या ठायी महान सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे गुण एकवटले आहेत, अशा भगवान शंकरांच्या अंतरंगात नामाबद्दलचा दृढ विश्वास वास करून आहे.
(ध्यातो – ध्यान करतो, उमा – पार्वती)
विवेचन : या श्लोकातही समर्थ रामनामाचे महत्व आपल्याला पटवून देत आहेत. रती आणि मदन ही जोडी म्हणजे कामभावनेच्या देवता मानल्या जातात. कामभावनेचे मानवी जीवनात काही एक महत्व जरूर आहे. परंतु जेव्हा ही कामभावना अतिरेकी रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला विनाशाकडे नेते. रावणासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा आणि नंतरच्या काळातही अगदी आजपर्यंत अतिरेकी कामवासनेने ज्यांचा विनाश घडवून आणला अशा अनेक व्यक्तींची नोंद इतिहासात आढळते. त्यातूनच युद्धे देखील उद्भवली आहेत. कामवासना जर ज्ञान, वैराग्य आणि कर्तव्याच्या आड येत असेल तर तिला जाळून भस्म करणेच योग्य ठरते. तेच भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून केले. तिसरा डोळा हा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्याचा दुसरा अर्थ असा की ज्ञानाच्या साहाय्याने कामभावनेवर नियंत्रण मिळवावे.
भगवान शंकरांनी त्यांची तपस्या भंग करणाऱ्या कामदेवाला आपला तिसरा डोळा उघडून भस्म केले. एवढे सामर्थ्य असणारे भगवान शंकर पार्वती मातेला श्रीरामांचे गुणवर्णन करून सांगतात. भगवान शंकर म्हणजे सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत प्रतीक! माता पार्वती देखील काही कमी नाही. ती देखील ज्ञान, वैराग्य आणि साधना यांचे प्रतीक आहे. पण या दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांच्याही अंतरात रामनामाबद्दल अतूट श्रद्धा आहे. एवढे प्रचंड सामर्थ्य ठायी असलेले भगवान शंकर आणि पार्वती जेथे प्रभू श्रीरामाचे ध्यान करतात तेव्हा रामनामाची महती सांगण्यासाठी आणखी कोणते उदाहरण द्यायला हवे?
आपल्या मनातील कामवासना अनियंत्रित होत असेल, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यास रामनाम हे अचूक आणि अमोघ अस्त्र आहे. परंतु अशा व्यक्तींनीच रामनाम घ्यावे असा याचा अर्थ नाही. ज्यांच्या ठायी ज्ञान, वैराग्य आणि शक्ती आहे अशा व्यक्ती देखील रामाचे ध्यान करतात. किंबहुना ज्ञान, वैराग्य आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी रामनामासारखा दुसरा उपाय नाही असे देखील म्हणता येते. ज्ञान, वैराग्य आणि शक्ती यांचे अधिष्ठान रामनाम आहे. संत कबीर म्हणतात, ” कबिरा राम हृदय बसे, काम कहाँ घर होय? ” जिथे हृदयात रामाला स्थान दिले, तिथे कामासारख्या गोष्टींसाठी जागाच कुठे उरते?
स्वसंवाद ::
१. भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत आदराने रामगुणांचे गायन करतात तरी देखील रामनामाचे महत्व मला स्वतःला पटवून देण्यासाठी अन्य गोष्टींची आवश्यकता वाटते का?
२. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हे गुण माझ्याकडे नसले, तरी या तिन्ही गुणांचे अधिष्ठान असणारे ‘रामनाम’ घ्यावे असे मला वाटते का?
३. माझ्या मनात जेव्हा एखादा वाईट विचार किंवा अनावर वासना डोके वर काढते, तेव्हा मी माझ्या ‘ज्ञानाचा तिसरा डोळा’ (विवेक) उघडून तिला भस्म करतो का?
– – – –
श्लोक क्र. ८४ – – –
विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।।८४।।
अर्थ : प्रत्यक्ष विठ्ठलाने देवराणा म्हणजे श्रीशंकराला डोक्यावर धारण केले आहे. त्या श्रीशंकराच्या हृदयात मात्र रामनामाचा ध्यास आहे हे आपल्याला माहिती नाही का? मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या महान तपस्वी अशा भगवान शंकराचा दाह रामनामाने शांत झाला. आपल्या अंतकाळी रामनामच आपल्याला सोडवणार आहे.
(विठोने – विठ्ठलाने, देवराणा – देवांचा राजा /महादेव, नेणा – जाणत नाही, तापसी – तपश्चर्या करणारा, चंद्रमौळी– शिरावर चंद्र धारण करणारा (शंकर), निवाला – शांत झाला)
विवेचन : रामनामाचे महत्व पुन्हा स्पष्ट करणारा हा सुंदर श्लोक आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे सर्व संत, वारकरी यांचे दैवत. पांडुरंग हा श्रीकृष्णाचाच अवतार मानला जातो. असा हा भक्तांचा लाडका असणारा पांडुरंग स्वतःच्या मस्तकावर श्रीशंकराला धारण करतो. पांडुरंगाच्या डोक्यावर शिवाच्या पिंडीचा आकार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पांडुरंग स्वतःच श्रीशंकराचे गुणगान करतो. या अर्थाने देखील तो शंकराला डोक्यावर घेतो असे म्हणता येईल. कारण एखाद्याचे गुणगान करणे म्हणजे त्याला मस्तकी बसवणे. तेच पांडुरंगाने केले आहे. पण समर्थ पुढे म्हणतात की ज्या विठ्ठलाने श्रीशंकराला आपल्या शिरावर घेतले आहे, त्या भगवान शंकरांच्या हृदयात देखील रामानामाचा ध्यास आहे. या ठिकाणी श्रीरामाचे आणि रामनामाचे महत्व फारच सुंदररित्या आपल्याला पटवून दिले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे समर्थ रामनामाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी वारंवार श्रीशंकराचे उदाहरण का देत आहेत याचाही विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आणि वैराग्य आहे, तेच जर नामाचा आश्रय घेत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा अहंकार गळून पडायला हवा, हाच समर्थांचा यामागील हेतू असावा.
श्रीशंकरांना रामनामाचा ध्यास लागलेला आहे. रामनाम म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. अशा पद्धतीचा ध्यास आपल्यालाही लागावा अशीच समर्थांची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महान तपसामर्थ्य अंगी असणारे भगवान शंकर जेव्हा सातत्याने रामनाम जपतात, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! या श्लोकात भगवान शंकरांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात, “स्वये निवाला तापसी चंद्रमौळी. ” इथे निवाला शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे रामनामामुळे त्यांच्या जीवाला शांती लाभली. दुसरा अर्थ आपल्याला परिचित आहे. तो म्हणजे भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल (विष) प्राशन केले तेव्हा त्यांच्या कंठाचा जो दाह होऊ लागला, तो कशानेही शमेना. त्यांनी मस्तकी गंगा धारण केली, गळ्याभोवती शीतल नाग धारण केला, शीतल असणारा चंद्र मस्तकी धारण केला. परंतु त्यांचा दाह केवळ रामनामानेच शांत झाला. या अर्थानेही ‘ निवाला ‘ हा शब्द वापरला आहे.
श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यांना नेहमी तो समोर दिसत असतो. म्हणून ते कधीही ‘ तो राम ‘ म्हणत नाही. तर ‘ हा राम ‘ असे म्हणतात. एवढी त्यांची रामाशी एकरूपता आहे. पांडुरंगाने ज्यांना मस्तकी धारण केले आहे असे श्रीशंकर सुद्धा रामानामाचा ध्यास घेतात, तेव्हा असे पावन, पवित्र असे रामनाम आपली देखील अंतकाळी या भवसागरातून सुटका करील असे समर्थांना सांगायचे आहे.
स्वसंवाद ::
१. पंढरीचा विठ्ठल आणि कैलासीचा राणा शिव यांच्यात जर कोणतेही द्वैत नाही, तर मी मात्र जाती-पाती, पंथ किंवा संप्रदायांच्या खोट्या भेदांमध्ये का अडकून पडलो आहे?
२. संसारातील वेगवेगळ्या संकटांमुळे किंवा वासनांमुळे जेव्हा माझ्या मनाचा ‘दाह’ होतो, तेव्हा मी तो शांत करण्यासाठी बाह्य गोष्टींकडे धावतो, की भगवान शंकरांप्रमाणे रामनामाचा आश्रय घेतो?
३. समर्थांना प्रभू श्रीराम जसे ‘हा राम’ म्हणून अगदी जवळ (अंतर्यामी) भासतात, तशी आत्मीयता आणि ओढ मला कधी नाम घेताना जाणवते का?
४. “अंतकाळी हाच राम आपल्याला सोडवणार आहे” हे अंतिम सत्य ठाऊक असूनही, मी माझा आजचा अमूल्य वेळ केवळ नश्वर गोष्टींची चिंता करण्यातच घालवत आहे का?
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समर्पण
पांडुरंगाची निर्व्याज भक्ती करता करता तुकाराम महाराजांच्या तनामनात विठु माऊली विषयी समर्पित भावना निर्माण झाली आहे. त्यासंबंधी काही अभंगांचे आपण येथे विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तुकाराम महाराजांना सर्व जग विष्णुमय वाटते आणि साधकांनाही ते हेच सांगतात.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म/
भेदाभेद भ्रम अमंगळ//
आईकाजी तुम्ही भक्त भागवत/
कराल ते हित सत्य करा//
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर/
वर्म सर्वेश्वर पूजनाचे//
तुका म्हणे एका देहाचे अवयव/
सुखदुःख जीव भोग पावे//
ते असे मानतात की, सर्व जग, त्यातील सजीव प्राणी आणि निर्जीव जड वस्तू हे सगळेच विष्णुमय आहे असे जाणावे. एखाद्या दगडाला शेंदूर फासल्याने त्याला देवत्व येते ना? हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे. भेद, अभेद, वाद
-विवाद म्हणजे भ्रम आहे. भागवत भक्त म्हणजेच भगवंताचे निस्सीम भक्त! तुम्ही हे ऐका आणि स्वहित करून घ्या असे संत तुकाराम कळकळीने सांगत आहेत. कारण ते स्वतः या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचले आहेत. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये, त्यातच सर्वेश्वराचे पूजन आहे. पुढे महाराज सांगत आहेत की, सर्व जीव हे एकाच देहाचे अवयव आहेत, त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगावी लागतात. त्यामुळे दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याचा केलेला मत्सर पर्यायाने एका भगवंताचाच त्रास समजावा. भागवतात केलेला विश्वात्मकाचा उपदेश याहून वेगळा नाही. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराप्रती स्वतःला वाहून घेण्याची ही कृती आहे.
या अभंगात महाराज स्वतःची मनोवस्था अधिक स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणतात,
नींदी कोणी मारी/ वंदी कोणी पूजा करी//
मज हेही नाही तेही नाही/
वेगळा दोहीपासून//
देह भोग भोगे घडे/ जे जे जोडे ते ते बरे//
अवघे पावे नारायणी/ जनार्दनी तुकयाचे//
तुकाराम महाराजांची कोणी निंदानालस्ती करोत, किंवा कोणी त्यांना मारोत, (शब्दांचा मार)
कोणी त्यांना वंदोत नाही तर त्यांची पूजा करोत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही. त्यांना त्याचे सुखही नाही किंवा दुःखही नाही. सुखाचे किंवा दुःखाचे सारे भोग दैववशात केवळ देहाला भोगावे लागतात. संत तुकारामांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे जे काही बरे वाईट भोग आहेत ते एका जनार्दनाकडे, नारायणाकडे जातात. नारायणापाशी तुकाराम महाराजांच्या समर्पणाची ही अवस्था आहे.
सकळ चिंतामणी शरीर/
जरी जाय अहंकार समूळ आशा//
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी/
निर्मळ स्फटिक जसा//
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/
येती तया पासी अवघे जन//
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/
मोक्ष तेणे दर्शने//
मन शुद्ध तया काय करीसी माळा/
मंडित सकळा भूषणासी//
हरीच्या गुणे गर्जताती सदा/
आनंद तया मानसी//
तन मन धन दिले पुरुषोत्तमा/
आशा नाही कवणाची//
तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा/
काय महिमा वर्णू त्याची//
या अभंगात तुकाराम महाराज संतांचा महिमा सांगत आहेत. ज्याचा सर्व अहंकार विनाश पावला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी ज्याच्यामध्ये जराही उरली नाही, तो स्फटिका समान निर्मळ आहे. त्याचे सर्व शरीर जणू चिंतामणी आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशीला जाण्याची त्याला आवश्यकता नाही. उलट सर्व तीर्थ अशा पुरुषा पाशी येतात. कारण सर्व तीर्थाना पावन करणारा तो स्वतःच एक तीर्थस्थान झाला आहे. त्याच्या दर्शनाने मोक्षप्राप्ती होते. ज्याचे मन शुद्ध आहे त्याला जपमाळ ओढायची काही आवश्यकता नाही. तो स्वतः सर्व भूषण मंडित आहे. जो सतत हरीचे गुणगान करीत नामघोष करतो तो निरंतर आनंदातच असतो. ज्याने आपले तन, मन, धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे, तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज हे स्वतः अशाच पुरुषांपैकी एक आहेत, म्हणून तर आपण त्यांना संत तुकाराम असे ओळखतो.
तुकाराम महाराजांना सर्वत्र एक पांडुरंग दिसत आहे. ते म्हणतात—-
दाता नारायण/ स्वयेभोगीता आपण//
आता काय उरले वाचे/ पुढे शब्द बोलायचे//
देखती जे डोळे/ रूप आपुलते खेळे//
तुका म्हणे नाद/ झाला अवघा गोविंद//
सर्व प्राण्यांना सर्वकाही देणारा दाता दुसरा तिसरा कोणी नसून नारायणाच आहे आणि त्यांना मिळालेल्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच आहे. याचाच अर्थ असा की तुकाराम स्वतः नारायणमय झाले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा भोग ते म्हणजे नारायण घेत आहे. अशा परिस्थितीत मी मिळवले, मी भोगले असे म्हणायला जागाच उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्यांना नारायणाचेच रूप दिसते. (या ठिकाणी भक्त प्रल्हादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.)
नर आणि नारायण यामध्ये भेद असा राहिलेलाच नाही. जेवढा शुद्ध नाद आहे, तेवढा गोविंद झाला आहे.
म्हणून खेळ मांडीयेला ऐसा/
नाही कोणी दिशा वर्जीयली//
माझिया गोते हे वसले सकळ/
न देखी जे मूळ विटाळाचे//
करुनी ओळखी दिली एकसरे/
न देखो दुसरे विषमासी//
तुका म्हणे नाही काळापाशी गोवा/
स्थितीमति देवावाचुनिया//
वरील अभंगात तुकाराम पुन्हा एकदा स्वतःच्या स्थितीविषयी बोलतात. ते म्हणतात, ” मी असा खेळ आरंभला आहे की त्यामध्ये कोणतीही दिशा वगळली नाही. सर्व दिशा शुभ आहेत. पांडुरंग हाच माझे सर्व गणगोत आहे. त्याने सर्व जग व्यापले आहे, त्यामुळे विठ्ठलाचे मूळ जो भेदभाव तो माझ्या ठिकाणी उरलाच नाही. सर्वत्र पांडुरंग ओतप्रोत भरलेला आहे, अशी त्याने स्वतःच्या स्वरूपाची मला ओळख करून दिल्यामुळे मी त्याच्या स्वरूपा वाचून दुसरे काही पाहू शकत नाही. आता माझे मन काळाच्या कल्पनेत सापडलेले नाही की गुंतलेले नाही. मी कालातीत अशा देवाच्या स्थितीमध्येच माझ्या बुद्धीसह एक झालो आहे. “
तुकाराम महाराजांचा देहाभिमान संपूर्ण तया गळून पडला आहे, परब्रम्हाशी ते एकरूप झाले आहेत.
या संदर्भात आणखी काही अभंगांचा परामर्श आपण पुढील लेखात नक्की घेऊ.