मराठी साहित्यात निसर्गाचे अत्यंत कोमल, चित्रमय आणि भावस्पर्शी वर्णन करणाऱ्या कवितांमध्ये “औदुंबर” या कवितेचे स्थान विशेष आहे. बालकवींनी अवघ्या काही ओळींत एक जिवंत निसर्गचित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. ही कविता वाचताना आपण एखाद्या शांत नदीकाठी उभे आहोत आणि त्या दृश्याकडे तल्लीन होऊन पाहत आहोत, असा अनुभव येतो.
कवितेच्या सुरुवातीलाच कवी म्हणतात की झऱ्याच्या दोन्ही तीरांवर हिरवीगार वनराई पसरलेली आहे. निळसर पाणी बेटाबेटांतून संथपणे वाहत आहे. या वर्णनामुळे मनात शांत, प्रसन्न आणि रमणीय वातावरण निर्माण होते. पुढे पाण्यातील काळसर डोह, त्यातील पांढऱ्या पायवाटा, हिरव्या कुरणांवर चरणारी जनावरे अशा तपशीलांमुळे दृश्य अधिक सजीव बनते.
बालकवींची एक मोठी ताकद म्हणजे शब्दांतून चित्र निर्माण करण्याची क्षमता. हिरवे, निळे, काळे, पांढरे अशा रंगछटांचा अत्यंत प्रभावी वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे कविता केवळ वाचली जात नाही, तर ती डोळ्यांसमोर उभी राहते.
मात्र या कवितेचे खरे सौंदर्य शेवटच्या ओळीत दडलेले आहे—
“पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.”
येथे औदुंबर वृक्षाचे मानवीकरण केले आहे. तो एखाद्या समाधानी, चिंतनशील ऋषीसारखा पाण्यात पाय सोडून शांत बसला आहे, असे वाटते.ही फक्त झाडाची प्रतिमा नाही. आयुष्याच्या धावपळीतून निवृत्त झालेला, जगाकडे शांत नजरेने पाहणारा एखादा ज्ञानी मनुष्यही त्या औदुंबरात दिसतो. सभोवताली हिरवळ, पाणी, पशुपक्षी, जीवनाची हालचाल सुरू आहे; पण औदुंबर मात्र निर्विकार, समाधानी स्थिर आहे.ही प्रतिमा केवळ निसर्गचित्र राहत नाही, तर ती जीवनदृष्टी बनते. जगातील गोंधळ, धावपळ आणि अस्थिरतेच्या मध्यभागी स्थिर, शांत आणि समाधानी राहण्याचा संदेश या प्रतिमेतून सूचित होतो.
या कवितेचा स्थायीभाव शांत रस आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारी प्रसन्नता, निवांतपणा आणि अंतर्मुखता यांचा अनुभव कविता देते. अलंकारांच्या दृष्टीने मानवीकरण, अनुप्रास आणि चित्रमयता यांचा सुंदर उपयोग आढळतो.
“औदुंबर” ही केवळ एका वृक्षाची किंवा नदीकाठची कविता नाही. ती निसर्गाशी एकरूप होण्याची, क्षणभर थांबून जीवनाकडे शांत नजरेने पाहण्याची प्रेरणा देते. म्हणूनच ही कविता आजही वाचकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत राहिली आहे.
थोडक्यात, “औदुंबर” ही निसर्गसौंदर्य, शांतता, स्थैर्य आणि समाधानी जीवनदृष्टी यांचे अत्यंत प्रभावी कलात्मक दर्शन घडवणारी बालकवींची अजरामर कविता आहे.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी
महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.
त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.
शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.
गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.
स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.
दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.
रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.
स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.
बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “
यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.
गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.
गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.
दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली
दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.
अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.
विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.
टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.
एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.
—–
☆ गीत : ८२ ☆
TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.
Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.
Thy centuries follow each other perfecting a small wild flower.
We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We
are too poor to be late.
And thus it is that time goes by while I give it to every querulous1
man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.
At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.
MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.
The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy
breast.
Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.
☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे ☆
काव्यानंद
समर्थांची मूळ कविता…
☆ बुद्धि दे रघुनायका ☆
☆
युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥
नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥
*
मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥
कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥
*
बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥
बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥
*
तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥
सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥
*
नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥
अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥
*
प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥
मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥
*
संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥
वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥
*
चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥
आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥
*
कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥
हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥
*
आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥
आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥
सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी
“बुद्धी दे रघुनायका”
साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर
🪷
प्रस्तावना
दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची स्विकृती आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.
समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. “युक्ति नाही बुद्धि नाही” अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ स्विकृती देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे!
ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.
आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश
“युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥”
या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.
साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही स्विकृती म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.
मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ
“मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…”
मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.
ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.
परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका. ”
हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.
सामाजिक अपुरेपणाची वेदना
“बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…”
येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.
“संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥”
या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?
ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.
असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश
“चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…”
मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.
“कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…”
येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.
निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी
“आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…”
ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.
समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.
समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया
ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.
स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे “बुद्धी दे रघुनायका. ”
ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.
समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—
“मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.”
रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे,
पुणे
संपर्कः ९५ ५ २६ २९ २ ४ ५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माणसाचे आयुष्य म्हणजे केवळ वय वाढणे नक्कीच नाही. नानाविध भावनांची अनुभूती व त्यांचा अविष्कार जीवनात होत असतो.. या भावनांचे प्रकटीकरण करणे, त्यांचे विवरण यथार्थ शब्दातून मांडणे ही आंतरीक भावना सर्वांना असते. कवी मनाच्या लोकांना तर ती नेहमीच खुणावते.. अर्थात काही वेळा हे असे अनुभव कवीचे स्वतःचे ही असूच शकतात.. भावनांना शब्दांचे साज देऊन कवी कविता रुपात ही अनुभूती काव्यरसिकांसमोर सादर करतो. यथार्थ, अर्थवाही, अर्थपूर्ण काव्यरचना करताना कवी त्याच्याकडील शब्दभांडार कवितेच्या रूपावर उधळून देतो. कवितेचे हे शृंगारलेले रूप पाहून, वाचून वाचक /रसिक सहजपणे मोहित होतो. भावनेची प्रांजलता आणि तिचे हे साजिरे रूप घेऊन आलेली, मनावर गारुड करणारी अशीच एक भावकविता वाचण्यात आली. कवी आहेत डॉक्टर निशिकांत श्रोत्री… त्यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहातील हे भावगीत. आज या कवितेचा आस्वाद घेऊ या.
“अश्रु ढाळले किती” या शीर्षकावरून या कवितेत विरह /दुःख भावनांचा आविष्कार असणार हे रसिक वाचकांच्या लक्षात येतेच. यथार्थ व अर्थपूर्ण काव्यशीर्षकामुळे वाचकांच्या मनात मनोज्ञ भावनेचे शब्दचित्र नक्कीच तयार होते. या जाणिवेला अतिशय उच्च स्तरावर नेणारी आणि तितकीच भावगर्भितता देणारी ही कविता. काव्यशीर्षकातून उमगलेल्या भाववृत्तीचे अतिशय सुंदर शब्दचित्रण या कवितेत केलेले दिसते.
सर्वप्रथम या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की ही संपूर्ण कविता “तिच्या” भावनेशी निगडित आहे. तिच्या अंतरंगातून उमटलेल्या आवाजांचा नाद आहे. कवी पुरुष असूनही त्यांनी या स्त्रीच्या भावनेला पूर्णपणे न्याय देऊन त्या प्रकारची शब्दयोजना आणि भाव या कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यासाठी लागणारे तरल मन कवीपाशी असल्यामुळेच हे शक्य झाले आहे हे निश्चित…
तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती
भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||
कवितेतील “ती” परिस्थितीवश एकांत भोगते आहे खरं तर एकटी पडली आहे हे म्हणणे योग्य ठरेल. कारण हा एकांत तिच्या दृष्टीने अजिबात सुखावह नाही. तिला अतीव प्रिय असलेल्या प्रियकराचा शाश्वत विरह घडवून नियतीने हा तिच्यावर लादलेला आहे. साहजिकच या नकोनकोशा एकांतात ती स्वतःबरोबरच आजूबाजूच्या लोकांचे ही भान विसरली आहे. “भान हरपणे” न म्हणता “भान विसरले” अशी शब्दयोजना केल्याने कवीचे साहित्यिक भान लक्षात येते. दुःखामध्ये सर्व गोष्टींचा विसर पडतो हे लक्षात घेऊन अशी सुयोग्य शब्दरचना केली आहे. विरहाचा दुःखद धक्का प्राक्तनाने जीवनात तिला दिला आहे. अशा परिस्थितीत अटळ सत्याचे भान ती विसरली आहे हे गर्भित अर्थाने सूचित केले आहे. वरवर साधा सोपा सरळ अर्थ वाटतो पण कवीने सहजपणे गहन अर्थ यातून व्यक्त केला आहे. या सहेतुकपणामुळे कवितेतील तिच्या भावावस्थेकडे प्रकर्षाने लक्ष जाते. ती सुन्न, बधिर होवून जाणिवेच्याही पलीकडे गेलेली आहे. एकांतात ती केवळ रडली आहे. त्याच्या नसण्याने त्याच्या स्मृती तिच्या मनात प्रकर्षाने उचंबळून येतात. आपसूकच तिने अश्रू ढाळले आहेत. “किती” या शब्दांतून अगणित, गणना करता न येणारे हा सूचक भावार्थ अपेक्षित आहे. तिच्या या जाणिवेची त्याला जाणीव नसणारच कारण तो या “अशा” भावनिक जाणीवेच्या पलीकडे गेलेला आहे. ही जाणीव आता त्याला कधीच जाणवणार नाहीये. अतिशय सहजपणे साध्या, सोप्या शब्दांतून मृत्यूचे अटळ सत्य उलगडले आहे. मोजक्या व यथार्थ शब्दातून तिच्या भावनेचा स्तर आणि तीव्रता या ध्रुवपदातून लक्षात येते. अन् म्हणूनच सहजपणे वाचक तिच्या भावनांशी नकळतच जोडला जातो.
पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध
भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद
उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती//१//
सुमनविकसित उपवनात गंधांची उधळण झालेली असणार हे गृहीत आहे. येथे पुष्पबहर म्हणजे प्रीतीचा बहर. प्रेमाच्या उपवनी प्रीतपुष्पे बहरली.. त्यांचा
गंधदरवळ तनामनावर/तनामनाशी लपेटून घेतला. “लपेटून”शब्द फारच सुंदर व सुयोग्य.. भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला व काळजाजवळ असलेला गंध.. लपेटून हा अर्थपूर्ण व अर्थवाही शब्द यासाठी वापरला आहे. विकसित फुलांवर रुंजी घालणारे भुंगे तसेच इतर
अविकसित, अजून न फुललेल्या कळ्या यांना आपल्या धुंद प्रीतीचे प्रदर्शन करुन या युगुलाने खिजवले आहे. इथे भुंगे म्हणजे इतरेतर जे प्रीतीचा गंध व अनुभव घेत आहेत. त्यांच्यापेक्षा आपली प्रीती उच्च दर्जाची तसेच अधिक गहिरी आहे हे जाणवून दिले आहे. कळ्यांचा संदर्भ ज्यांनी अजून प्रेमाचा अनुभव घेतला नाही त्यांच्याशी आहे. “खिजवित” या शब्दातून स्वतःच्या गहिऱ्या प्रेमाचे जाणूनबुजून प्रदर्शन केले हा भाव व्यक्त केला आहे.
या कडव्यात अतिशय कल्पकतेने रूपक, चेतनागुणोक्ती तसेच अतिशयोक्ती अलंकारांचा वापर करून कवीने प्रेमाचा अनोखा स्तर वर्णिला आहे. अशा या धुंद प्रीतिच्या धुंद आठवणी मनात नव्हे तर उरात जपून तिने कितीतरी (अनेक असा अर्थ)दिवस कंठले आहेत.. “उरात”शब्दातून आत्यंतिक जवळ हा अर्थ लक्षात येतो. “कंठणे”म्हणून नाईलाजास्तव ती जगत आहे याकडे निर्देश केला आहे. पहिल्या दोन चरणातले यमक व तिसऱ्या चरणाचे ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज सुंदर… साहजिकच कवितेला मोहक लय व गेयता लाभली आहे.
तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ
आणा भाका कितीक शपथा हाती होते हात
आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती
अश्रु ढाळले किती ||२||
समय /काळ सरत राहिला. सांजवेळ सामोरी आली. अशावेळी झाडाच्या मुळात/अंतरंगात संध्येची लाली पसरते. अन् कातरवेळी कातर झालेल्या काळजाला जणू काही फक्त ओलावलेले डोळे साथ व साद देतात, घालतात. हे वाहणारे अश्रूं जमिनीवर पडून त्याचा गंध (मृद्गंध) मनाला साथ देतो. झाडाची मुळे जशी जमिनीत खोलवर जातात तसेच तिच्या ही मनात प्रीत खोलवर रूजलेली आहे. येथे तरू म्हणजे ती व संध्या म्हणजे वाढलेले वय/आयु… तसेच केवळ त्याच्या आठवणीने तिच्या गाली लाली पसरली असा अजून एक अर्थ.. माणूस अंतिमतः मातीत मिसळतो हे सत्य नाकारता येत नाही. तो गंध तिला साद घालतो आहे असा ही भावार्थ… अतिशय सुंदर रूपक… कवितेतील भावनेला अधिक अर्थ देणारे.. तिला अशा वेळी मनात जाग्या असलेल्या, कधी काळी घेतलेल्या साऱ्या आणाभाका, शपथा पुन्हा एकदा आठवतात. तेव्हा एकमेकांचे हात हातात होते… एकमेकांना एकमेकांची साथ होती, संगत, सोबत होती. आता मात्र अंधुक सांजेपाठी अटळपणे येणाऱ्या काजळलेल्या, काळोख्या रात्री नजरेतून, काळजातून व्यक्त होत आहेत. त्याच्या नसण्याने तिचे आयुष्य अंध:कारमय झाले आहे. प्रीतिचा अस्त म्हणजे रात्र झाली आहे.
प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती
सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती
जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती
अश्रु ढाळले किती ||३||
या साऱ्या सुखद व दु:खद आठवात तिला प्रकर्षाने जाणवते की त्यांचे हे प्रेम तिच्या मनाच्या क्षितिजावरती शोभून दिसते आहे. अर्थात क्षितिजाप्रमाणे आता ते भासमान व दूरवर आहे. थोडक्यात तिला वास्तवाची जाणीव ही आहे. या रम्य आठवणी आता केवळ मनात जाग्या आहेत. प्रीतिच्या सौंदर्याची काल्पनिक पखरण फक्त हृदयात व हृदयातून आहे. यातले काहीच आता पुन्हा प्रत्यक्षात घडणार नाही. “काही नाही हाती”यातून हातात हात नाहीत, सोबत उरली नाही. शब्दशः हातात हात नाहीत हे जाणवून दिले आहे. तसेच “हाती न लागणे”म्हणजे न गवसणे.. श्लेष फारच छान… प्रीतभावनेने समृद्ध झालेले भावविश्व आता काळाआड गेले आहे.
जीवन हेच मृगजळाप्रमाणे भासमान झाले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची भावना खरी नाही हे तृषार्त मनाला जाणवले आहे. मृगजळाची आशा जशी खोटी असते तशीच आशा आता जीवनाविषयी वाटते आहे. जीवन या शब्दावरील श्लेषही अत्यंत समर्पक. जीवन म्हणजे पाणी व आयुष्य. तिच्या जीवनाला लागलेली प्रेमाची तहान कधीच भागणार नाही हे सत्य तिच्या मनाने स्वीकारले आहे.
तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी
तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी
कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति
अश्रु ढाळले किती ||४||
त्याच्या अनुपस्थितीत केवळ त्याच्याचसाठी जीवन जगणे हे स्वप्न तिने उरात बाळगले होते. तुझ्याचसाठी मधील “च” भावनेची सत्यता व तीव्रता जाणवून देणारा. तिला स्वतःला जीवनाविषयी कुठल्याही प्रकारची आस राहिलेली नाही. केवळ त्याच्यासाठी जगणे हाच तिच्या जीवनाचा उद्देश होता, ते तिचे स्वप्न होते. ते तिने प्रामाणिकपणे उरात जपले. त्याच्याशिवाय जगताना हा सर्वकाळ तिने मुग्ध राहून, अबोल राहून कंठला. मुग्ध
शब्दातून एखाद्या कळी प्रमाणे ती विकसित न होता जगली. नाईलाजाने जगताना जाणीवपूर्वक मुग्धता राखली. परंतु हा काळ बिलकुल सोपा नव्हता. मरणाला उराशी कंटाळून ती जगत होती. “अति”, या शब्दातून तिला नकोसे असताना व तिला वाटणाऱ्या गरजेपेक्षाही जास्त ती जगली अशी तिची भावना जाणवते. अर्थात त्याच्या शिवाय जगताना सारे आयुष्य “अति” झाले, जास्त झाले. एखादी गोष्ट नको असताना जेव्हा प्रमाणाबाहेर घडते तेव्हा हे “अति झाले” असे आपण म्हणतो.
“जीवन जगणे जपले”, “काळ कंठला” यातील अनुप्रास, पहिल्या दोन चरणातील यमक व शेवटच्या चरणातील ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज व अर्थपूर्ण वाटते.
मनातल्या प्रांजल प्रीतीच्या प्रांजळ भावनेला व आपल्या प्रियकर / पतीच्या शिवाय जगताना जाणवलेल्या अंतरीच्या अनुभूतीला अतिशय काव्यात्मतेने, विविध साहित्यालंकारांनी नटवून या कवितेत प्रस्तुत केले आहे. नैसर्गिक भावनेतील खरेपणा जपून तो लयबद्ध पद्धतीने व्यक्त केला आहे. ही कविता सूर्यकांत या मात्रावृत्तात रचली आहे. काव्यवाचकांना हृदयाला थेट भिडणारे हे सुंदर भावगीत नक्कीच आवडेल. कवीचे तरल मन व साहित्यिक जाणीव कौतुकास्पद.. , मनाला भुरळ घालणारी…