मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-1☆ सुश्री मृदुला बेळे

?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… ☆ संग्राहक – मृदुला बेळे☆

मी इटलीमधल्या तुरीन इथे  बौद्धिक संपदा  कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे,  2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून  गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं  होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही,  आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं.  हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि  त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून  परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा,  नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता.  ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं.  या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल  मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच  दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं.  दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल…टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध  माणूस… अब्जाधीश….सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा!  तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता…पाय लटपटत होते…छाती धडधडत होती.

क्रमशः….

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

?  काव्यानंद  ?

 ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण –सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

एक प्रतिभा संपन्न कवयित्री, लेखिका, मराठीच्या प्राध्यापिका, सह संपादिका, अनुवादिका, तसेच बालगीते, कथा, कविता, ललित लेख यावर हुकूमत गाजवणाऱ्या रसिक प्रिय कवयित्री शांताबाई शेळके. त्यांची अनेक भावगीते, भक्तीगीते, कोळी, सिने गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी जपानी हायकूचे अनुवाद ही केले आहेत. एक सालस, सोज्वळ व्यक्तीमत्व. अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या शब्दाचं गारूड होत. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्मृतीदिन ६ जूनला आहे. त्या निमित्ताने. त्याच्या “खांब” या कवितेचे रसग्रहण.

कवयित्री ची ‘खांब’ ही कविता समस्त संसारी महिलाचे प्रतिनिधित्व करते. या कवितेत संसारी स्त्रीला बाई असे संबोधले आहे. इथ मी तोच शब्द वापरते. लग्न होवून बाई घरात आली की तिचे विश्व बदलते.ती त्या घराशी एकरूप होऊन जाते. आनंदाने ते घर स्विकारते. तिला ही घरातील लोक गृहित धरतात. सरळ साध्या बाईचा आधार घराला किती मोलाचा असतो हे कवयित्रीने या  कवितेत मांडले आहे. ही कविता शहरी, ग्रामिण प्रत्येक बाईची आहे असे मला वाटते.प्रत्येकीचे सोसणे सारखेच असते.

संसार करत असताना बाई किती सहनशीलतेने वावरते. नव्या घरात तिला अडचणी येतात, वावरताना अवघडल्या सारखे होते, माहेरची आठवण येते, काही गोष्टी खटकतात, तेव्हा रडू कोसळते, पण हे सारे आवेग बाई चेहऱ्यावर दाखवून देत नाही. आपल्या मनातील खळबळ बोलून दाखवत नाही. ओठांवर आणत नाही, हसून वेळ मारून नेहते. आतल्या आत दु: ख दाबून ठेवते. कुढत राहते. चेहऱ्यावर हसरे मुखवटे चढवते, ओठावर हसू आणते. आतल्या आत खुप काही साठवते. सगळी कामे सहज करत राहते.

त्याच हसऱ्या चेहऱ्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे, पैपाहुण्याचे स्वागत करते. त्यांना हव नको ते विचारते. स्वत:राबते. त्याचे आदरातिथ्य करते. हे काम बाईनेच करावे असा अलिखित नियम आहे. असे जणून तशीच वावरते. इथं तिच्या हालचालींना कवयित्रीनी वाऱ्याची उपमा दिली आहे. अगदी वाऱ्या सारखी घरभर फिरून ती बाई आपल कर्तव्य करते असते त्या तिला काही कमीपणा वाटत नाही.

घरातील प्रत्येक व्यक्तीला छोट्या मोठ्या कामासाठी बाई हवी असते. तिच्या शिवाय कुणाचे पान हलत नाही. तिला गृहित धरलेले असते. शिवाय तिच्या कामात नेमकेपणा असतो. तिच्या कामावर सर्वाचा विश्वास असतो. म्हणून नवऱ्या पासून सासऱ्या पर्यत सगळेजण तिच्या कडून कामाची अपेक्षा ठेवतात. “बिन पगारी फुल अधिकारी” प्रमाणे सगळी कामे बाई मनापासून करते पण साधे कौतुकाचे चार शब्द मिळतं नाहीत.मोबदला मिळणे दूरची गोष्ट.

घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाचे नाते जुळते.आपलेपणाने त्यांची काळजी घेते. त्यांचे आरोग्य सांभाळते.सर्वानी आरोग्य संपन्न असावे ही गरज वाटते तिला. जर कोणी आजारी पडले तर उश्यापायशाला बसून मनोभावे सेवा करते. दिव्या प्रमाणे स्वत: जळते. रात्रभर जागते. पुन्हा दुसऱ्या दिवशी नित्याच्या कामाला लागते. बाईच झीजणं दिसतच नाही.तिच्या मनाची कदर केली जात नाही. तिच्या शिवाय घरची कामे कोण करणार? सर्वांना तिची सवय झालेली असते. ती फक्त आपलं काम करत असते.

बाईच्या पाठीला पुजलेले काम म्हणजे “रांधा वाढा उष्टी काढा”. बाईने किती पराक्रम गाजवला. ती किती ही कर्तृत्वाने असली तरी ही कामे तिच्या पाठची जात नाहीत. हे तिचेच काम आहे असे गृहीत धरले जाते. या बाबत कवयित्रीनी या ठिकाणी खुप छान ओळी लिहिल्या आहेत. “राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण” हे त्रिकाल सत्य आहेत. लग्नात कुणा कुणाला छान छान वस्तू भेट मिळतात. त्या भेटीतून आनंद मिळतो. पण बाईला मात्र लग्नात राबण भेट मिळत. मूल आणि मूल ही प्रतिमा आज ही विचारात घेतली जाते. तिची काय कळते? तिला कुठाय अकल्ल आहे? तिने चुल आणि मूल सांभाळावे एवढंच तिला कळत. तिने स्वयंपाक करावा,स्वच्छता करावी. सगळ्यांच्या मर्जीने वागावे हेच तिच्या कपाळावर सटवीने ठळक गोंदलं आहे.गोंदण जसं कपाळावर कायम स्वरुपी असतं तसे बाईच्या कपाळी राबणे गोंदलं आहे. कवयित्रीनी खुप छान प्रतिमा वापरली आहे.

आपल्या सुंदर दिसण्याच्या कल्पना ही बाईच्या मनावर बिंबवल्या असतात. अतिशय साध्या गोष्टीत ती समाधानी राहते.रहायला भाग पाडतात.गोंदणावर रूपया एवढे लालभडक कुंकू लावले तरी ती सुखावते. ती तिला सुंदर दिसते.आनंद मानते.सोन्या चांदीच्या दागिण्याची हौस नाही. चार काळे मनी गळ्यात असले तरी तिला ती साजरी वाटते.आपले हे सौभाग्य आहे असं  मानते.तिच्या अपेक्षा जास्त नाहीत.पती परमेश्वरासाठी घरात आनंद पेरते. नवऱ्याच्या  आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या अहेव मरण यावे असे वाटते.हातातला चुडा अखंड रहावा ही बाईची इच्छा असते. दुसऱ्यावर तिचा विश्वास नसतो म्हणून सगळी कामे स्वत: करते.

आपल्या हातावर तिचा विश्वास आहे. किती कष्ट करण्याची तयारी आहे.

मुला शिवाय घराला घरपण नाही. अगंणात मुलं खेळलं तर संसार सुखाचा होतो हे तिला ठाऊक आहे. ती स्वत: भार सोसून  घराला वंशाचा दिवा देते आणि अनेक पिढ्यांना जोडली जाते. बाळाला मोठं करते तो जेव्हा पुढची पिढी घडवतो. तेव्हा ती पिढीत जोडली जाते. नाते बदलते. घराच घरपण पिढीच्या रूपात बाईच पुढं नेते. हे कवयित्रीने नेमक्या शब्दात मांडले आहे.

धरतीच प्रतिक बाई. संसाराची धरती बाई.घराचा डोलारा बाईच फुलतो. तो फुलवण्यासाठी बाई कष्ट करते. फुलोरा गगनाला भिडतो तेव्हा बाई जमिनीत घट्ट मूळे रोवून उभी असते. ती स्वत: चा तोल ढळू देत नाही. डगमगत नाही. ती या घराचा आधार असते. सारं घर तोलून धरण्याची ताकद फक्त बाईच असते. कवयित्रीने तर या कवितेत “देहाचाच खांब” असे प्रतिक वापरले आहे. संसारात बाई स्वत:चे मूल्य विसरते, आपल्या देहाचे कौतुक विसरते, केवळ आपले घर सावरण्यासाठी, फुलवण्यासाठी कणाकणाने, क्षणाक्षणाने झीजते. आपल्या आधारावर घराचा भार तोलून धरते, सर्वांना सुरक्षित करते.सर्वाची काळजी घेते.स्वत: खांब होते.आपले अस्तित्व विसरून. बाई घरासाठी झिजते, खपते. घर उभं करते.

भुईत पाय रोवून आभाळ फुलवणारी, गंधित करणारी जाई आणि आपल्या देहाचा खांब करून अवघं घर तोलून धरणारी बाई या कवियत्री ने मांडलेल्या प्रतिमा कवितेला अत्युच्च उंचीवर नेतात व रसिकांना बाईपणाच्या समस्त दुखण्याबद्दल संवेदनशील करतात. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते.हे समजून कवयित्रीने स्त्रियांचे चिरंजीव दु:ख व्यक्त केले असले तरी ती घराचा खांब आहे हे सांगून तिच्या मोठेपणाची व अस्तित्वाची सर्वांनाच जाणीव करून दिली आहे.हे या कवितेचे यश म्हणावे लागेल.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,  ‘तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’  शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं. आता इथून पुढे…..)

‘हे सख्या निसर्गा!’

सहजता, पारदर्शकता, आत्मरतता या बरोबरच चित्रमयता हेही शांताबाईंच्या काव्याचं महत्वाचं वैशिष्ट्य. निसर्गाशी त्यांचं निकटचं नातं अनेक काव्यातून, गीतातून लक्षात येतं. निसर्गाच्या विविध विभ्रमांचं, रंगरूपाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी आपल्या कवितांधून केलय. मात्र बालकवींप्रमाणे निव्वळ, निखळ निसर्ग वर्णन त्या करत नाहीत. त्यांच्या निसर्गवर्णनाला त्यांच्या भावनेचं अस्तर असतं. त्यांच्या निसर्गवर्णनात त्यांच्या प्रीतीचे, आसक्तीचे, विरह –वेदनेचे, भक्ती-विरक्तीचे, एकाकीपणाचे जरतारी रेशीम धागे विणलेले दिसतात. ‘मूक सांत्वन’ मध्ये त्या म्हणतात, ‘हे सख्या निसर्गा! कोण तुझ्यावाचून आमची अनामिक दु:खे घे जाणून’ काळ्या राती अवसेला भयभीत झाली असताना ‘पिंपळ’ तिला धीर देतो. निसर्गातील अनेक घटक त्या ‘पिंपाळा’सारखे शांताबाईंच्या कवितेत दृश्यमान होतात. ‘आला ग वसंत’ किंवा ‘ऋतु हिरवा…. ऋतु बरवा’ या गीतातील निसर्गाचे वर्णन किती सुखद आहे. ‘दरवळत डोलू लागतात’, या कवितेतील निसर्गवर्णन कसं प्रत्यक्षदर्शी आहे पहा,

‘माळरानावरून सरकत येणार्‍या ढगांच्या सावल्या

क्षितिजाआड फिकट गुलाबी संधीप्रकाश

गवतात मलूल उन्हाची संथ फिरणारी बोटे

ओल्या गार हवेत घननीळ भास-आभास’

आपले एकाकीपण त्यांनी, ‘मावळतीला’, ‘दु:खाचे हिमकण’ अशा किती तरी कवितातून सांगितलय. ‘लोट’मध्ये गवसलेलं श्रेय हरपल्याचं वर्णन, ‘क्षणभर मिटल्या मुठीत, फिरूनी उडून गेला रावा’ या शब्दातून अतिशय हृद्यपणे केले आहे.

‘प्रकाशतार्‍यांचे संदिग्ध संदर्भ’मध्ये त्या म्हणतात,

‘अशी मी सदाची, भरतीची परतीची

काही आभाळाची, बरीचशी धरतीची

सांजेचा घनदाट प्रत्यय असा’

निसर्ग शांताबाईंच्या भावस्थितीशी असा एकरूप होऊन येतो. त्यांना जीवनातील सौंदर्याची, आनंद मिळवण्याची असोशी आहे. वृत्ती भावुक, स्वप्नाळू आहे. पण स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी यात अंतर पडत जातं. मग मनावर औदासिन्याचं, नैराश्याचं सावट पसरतं. ‘दु:खाचे हिमकण’, ‘शेवट’, ‘रंग मातीचा आभाळाला’, ‘दिवस गतीने फिकाच पडतो’ आशा किती तरी कविता उदासीनतेची गडद छाया चित्रित करतात. याची परमावधी तमात, काळोखात होते. संध्याकाळ वेढीत जाणारा काळोख आणि या काळोखात अनुभवावं लागणारं एकटेपण, यांचे उल्लेख शांताबाईंच्या कवितेत जागोजागी येतात. ‘प्रदीर्घ’मध्ये त्या लिहितात, ‘घेरीत येतो काळा करडा संदिग्ध काळोख आणि गिळतो पायापुढला उजेड पसाभार’. ‘काळोख’ कवितेत त्या म्हणतात, तो सारे भेद, रंगरूपाचे वेगळेपण मिटवून टाकतो. तो आत्मलीन आणि आपले गाणे गाणारा असतो.

सूर्य, अरण्य, वाळवंट, आभाळ, पाणी, वारा, जमीन, पूर या प्रतिमा शांताबाईंच्या कवितांमधून पुन्हा पुन्हा येतात. त्यातून त्यांच्या मनाच्या आशा-निराशेचे हिंदोळे झुलू लागतात.

‘पाऊस कोसळत रहातो   घोंघावत येतो पूर

वाजू लागतात अज्ञात घंटा   आयुष्यापलीकडचे संदिग्ध सूर’

कोसणारा पाऊस आणि घोंघावत येणारा पूर याच्या पार्श्वभूमीवर अज्ञात घंटानाद कारूण्याची लय साकारतो. ‘हिरण्यगर्भ’सारखी कविता मात्र यापेक्षा वेगळे सूर आळवते. शिशाच्या पत्र्यासारखे काळे करडे आभाळ गच्च दाटून येत. आणि दिशा भस्म फसल्यासारख्या राखाडी होतात, पण त्यांना खात्री आहे,

‘या सार्‍यांपालीकडे खचितच असतील   

 झळाळती हिरण्यगर्भ उन्हे-

जी ढग फाडून येतील आवेगाने बाहेर      

आणि अनावर बरसतील या माळावर, या झाडावर

कुणी सांगावे? कदाचित माझ्याहीवर’

‘ढळणार सूर्य कधीतरी ’  

चिंतांनाशीलता हे शांताबाईंच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘नाती’ कवितेत त्या म्हणतात.

वाटते, तितके नसतो आपणही एकाकी निराधार

अर्थात तेवढ्याने काळोख उजळत नसला तरी’

‘कुठे तरी आपल्यासाठी कुणी तरी असते फुलत जळत’, ही जाणीव आत आत कुठे तरी आश्वस्त करते. जीवन पुढे सरकत रहाते. ‘कळते आता गेला क्षण नाही पुन्हा हाती गवसत’. असं किती आयुष्य सरलं. त्यातून हाती काय लागलं?

‘वर्षांचा ढीग इथे साठला किती?     मातीतून त्या मलाच खणत राहिले’

‘ढळणार सूर्य कधीतरी’ याची त्यांना जाणीव आहे पण त्या सूर्यास रोखणार तरी कसे? ‘तम’ तेवढाच खरा, याची खात्री पटली आहे, तोपर्यंतचे जगणे कसे?

‘कैसे जीवन हे इथे जर आम्ही मृत्यूच श्वासितो.’

भूतकाळ सरत, मिटत चाललाय. अदृश्य भविष्याच्या दिशेने होणारी वाटचालही सरत आल्याचे ‘सूर’ इथे कातर, विषण्ण करून जातात. शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून अति उत्कटतेने प्रगट झालाय. 

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! – भाग 3 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 ‌शांताई म्हणजे काव्याचा सतत वहाणारा एक झरा!

शब्द पाण्याच्या थेंबासारखे ओघळत येणारे प्रवाही! असं कुठलं गाण्यातलं क्षेत्र नव्हतं जिथे त्यांच्या शब्दांचा ओघ वाहिला नाही! भक्तीगीते, भावगीते, भजन, देशभक्तीपर गीतं सगळ्या क्षेत्रात ही गंगा वहात राहिली! स्वभावाने अतिशय नम्र तरीही हुशारी चे तेज त्यांच्या काव्य रचनेत लपत नव्हते!’ भस्म विलेपित रूप साजिरे… ‘ सारखे भक्तीगीत असो वा ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ सारखे विरहगीत ‌असो तितक्याच ताकदीने त्यातील भाव उभे करण्याचे कसब त्यांच्या गीतात होते. बाबूजींकडे त्यांनी चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली. आणि ‘तोच चंद्रमा नभात..’ सारखे अजरामर गाणे आपल्याला मिळाले.लहानपणापासून संस्कृत श्लोक, ‘काव्य प्रकाश’ चे वाचन, मनन,  चिंतन केले होते, त्यांचा सुसंस्कार त्यांच्या गीतातून दिसून येतो. ‘शालू हिरवा, पाचू न् मरवा, वेणीत पेडी घाल आता..’  गाण्यातून दिसणारा आनंद व्यक्त होतो तर ‘रेशमाच्या तारांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा…’ हे गाणं लिहिताना त्यांचा लावणीचा बाजही तितकाच उत्कट तेथे दिसून येतो. भालजी पेंढारकर यांनी शांताबाई ना कोल्हापूर ला बोलावून घेतले आणि काव्य लिहून घेतले. अनेक संगितकारांनी शांताबाईंच्या गीतांना चाली लावून अजरामर गाणी मराठी सिनेमा ना दिली. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी त्यांच्या गीतांना योग्य न्याय मिळवून दिला!

शांताबाई या मागच्या पिढीतील अतिशय सुसंस्कृत, हुशार, चतुरस्त्र लेखन करणार्या कवयित्री होत्या.बहिणाबाई चौधरी, सरोजिनी बाबर, शांता शेळके या सारख्या कवयित्री नी आपल्या मराठी भाषेला जे लेणं दिलं आहे, ज्याचे मोल करता येणं अशक्यच आहे !

शांताबाईंच्या स्मृतीला मन:पूर्वक अभिवादन!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि डबा वाजू लागला… ☆ सुश्री स्वरदा केळकर वझे

?  मनमंजुषेतून ?

☆ आणि डबा वाजू लागला… ☆ सुश्री स्वरदा केळकर वझे ☆

त्यादिवशी मीनल कडून आले. घरातली सगळी कामं तशीच पडून होती. मात्र थकव्यामुळे करण्याची उमेद नव्हती. आल्या-आल्या फ्रेश होऊन खाऊन घेतले आणि आता जरा पडावं म्हणून खोलीत आले.

खोलीला लागूनच मोठे ग्राउंड होते. सुट्टीचा दिवस म्हणून सगळी पोरं जमली होती. डबा ऐसपैस चा डाव मोठ्या रंगात आला होता. मी आडवी झाले, मात्र पोरांच्या दंगामस्ती करण्यामुळे आणि डब्याच्या आवाजामुळे झोप लागणे अशक्य होते. कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता नुसता. जोरात ओरडावंसं वाटलं आणि राग अनावर होऊन मी बाहेर आले. खूप बोलले त्यांना. बिचारी पोरं एवढेसे तोंड करून ग्राउंड वरच बसून राहिली.

घरी आले आणि समाधानाने झोपावं म्हंटलं तर मेली झोपच येईना. सारखी हिरमुसलेली मुलं आणि त्यांचे हिरमोड झालेले चेहरे डोळ्यांसमोर येत राहिले. लहानपणी आपण खेळलेले खेळ, केलेली दंगामस्ती आठवत राहिले. शेजारचे भावे काका ओरडायचे, मग इनामदार आजी समजायच्या, सगळं, सगळं आठवलं.

मग वाटलं, या मुलांचा काय दोष? आलेला थकवा घालवण्यासाठीच तर हि खेळतात, दंगा करतात. आपण मोठी लोक यांच्यावर ओरडतो, कारण आपल्याला थकवा घालवण्यासाठी दुसरा उपाय सापडत नसतो. खरं तर दोष आपला, पण बकरा होतो बिचार्‍या कोवळ्या जिवांचा. ते काही नाही, मुलांवर अन्याय होता कामा नये. त्यांनी खेळलंच पाहिजे.

विचार करत करत उठले, राग तर कुठल्या कुठे पळून गेला होता. झोपही उडाली होती. पटकन गरमागरम थालीपीठ खायला केलं आणि बाहेर बसलेल्या मुलांना अंगणात बोलावलं. साऱ्यांची अंगत-पंगत छान झाली. मुलांची कळी खुलली. त्यांनी दंगा न करता खेळण्याचे कबूल केलं, मात्र मी त्यांना भरपूर दंगा करण्याची परवानगी दिली.

त्या दिवसापासून मुलं रोज खेळू लागली. रोज डबा ऐसपैसचा खेळ रंगत राहिला. खेळातला डबा वाजत राहिला आणि त्याचे पडसाद माझ्या आठवणीतल्या अनुभवांच्या रुपाने उमटू लागले.

© सुश्री स्वरदा केळकर वझे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर

?इंद्रधनुष्य?

☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर ☆

वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांनी त्यांच्या एका टिपणीमध्ये या सुप्रसिद्ध श्लोकाचा अर्थ दिला होता. श्रीनिवास चितळे यांनी नेमका वक्रतुंड या शब्दाचाअर्थ विचारला. वैशाली प्रसाद पराड़कर जोग  यांनी आपल्या मूळ टिपणीप्रमाणेच “वाकड्या तोंडाचा” असा अर्थ सांगून वर “सोपा आहे” अशी पुष्टी जोडली. यावर श्रीनिवास चितळे यांनी या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे स्पष्ट केले.यावर वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

यावरून माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आठवला.

जन्मापासून सत्तावीस वर्षं मी बेळगावातच होतो.त्यावेळी केवळ आमच्या घरातच नव्हे तर आजूबाजूलाही धार्मिकच वातावरण होतं.भजन-कीर्तन-प्रवचन-पूजा यात दिवस कसा गेला हे कळतही नसे.पण सर्वत्र वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असंच सांगितलं जायचं.संस्कृतचं थोडंफार ज्ञान असूनही हा अर्थ कधीही चुकीचा वाटला नाही. किंबहुना त्यामुळेच या शब्दाचा हा अर्थ योग्य आहे हे समजलं होतं.

देवाला त्याचा भक्त असं कसं म्हणेल हा प्रश्नच मला कधी पडला नाही.कारण संत तुकाराम महाराजांची बायको आवली हि विठ्ठलाला काळतोंड्या म्हणत असे हे सर्वश्रुत होतं. तसेच विठ्ठलाच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ गणले गेलेले संत नामदेव महाराज यांचा पुढील अभंग प्रसिद्धच आहे.

“पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा

पतितपावन न होसि म्हणुनी जातो माघारा

घेसी तेंव्हा देसी ऐसा अससी उदार

काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार

सोडि ब्रीद देवा आता न होसी अभिमानी

पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी ”

याशिवाय नवविधा भक्तीमध्ये विरोधी भक्ती हीसुद्धा समाविष्ट आहे हेही मला माहीत होतंच.त्यामुळे या अर्थाचा मी पूर्णपणे स्वीकार केला होता.

१९७२ साली मला पोटासाठी बेळगाव सोडून मुंबईत स्थायिक होणं भाग पडलं.

त्याच वर्षी दादरच्या शिवाजी उद्यानात दिलेल्या प्रवचनात पं.सातवळेकर यांनी वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे सांगितले.यामुळे माझ्या मनात (भावनिक नव्हे पण बौद्धिक) हलकल्लोळ माजला.जोपर्यंत एकच अर्थ माहित होता तोपर्यंत तोच स्वीकारार्ह वाटत होता.पण दुसरा अर्थ समजल्यावर कोणता अर्थ बरोबर आहे हे निश्चित केल्याशिवाय माझ्या जन्मजात कन्याराशीजन्य चिकित्सकपणाला चैन पडणे शक्य नव्हते.एका बाजूला आयुष्यभर ऐकलेले अनेक प्रवचन-कीर्तनकार व दुसऱ्या बाजूला एकटेच पं.सातवळेकर असले तरी कॊणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेणे हे माझ्या स्वभावाविरुद्ध होते.तसेच या बाबतीत पुरेसे पुरावे गोळा करणे हे माझ्या जन्मजात आळशीपणाला परवडणारे नव्हते.त्यामुळे हा प्रश्न तर्काने सोडवणे याला पर्याय नव्हता.त्यामुळे मी पुढीलप्रमाणे तर्क केला.

गणपतीचे शीर हत्तीचे आहे हे सर्वज्ञातच आहे.यामुळेच त्याची गजानन,गजवदन,गजमुख,गजवक्त्र,गजास्य,गजतुंड अशी अनेक नावे प्रचलित आहेत.जर वक्रतुंड या शब्दातील तुंड या पदाचा अर्थ तोंड असा असेल तर वरीलप्रमाणे गणपतीचीवक्रानन,वक्रवदन,वक्रमुख,वक्रवक्त्र,वक्रास्य ही नावेदेखील प्रचलित झाली असती.पण ही नावे प्रचलित तर सोडाच,पण निदान माझ्यातरी ऐकिवातही नाहीत.शब्दांचे खेळ मांडण्यात धन्यता मानणाऱ्या संस्कृतभाषेत हे स्वाभाविकही नाही.त्यामुळे तुंड हे पद तोंड या अर्थी नाही हा एकच निष्कर्ष निघू शकतो.म्हणजेच वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे हे निस्संशय.

वाईट इतकंच वाटतं कीं,इतका काळ लोटल्यावरही लोकांच्या मनात चुकीचाच अर्थ रुजलेला आहे.आशा आहे कीं,लवकरच सर्वांना खरा अर्थ समजेल.

– श्री हेमंत कुलकर्णी

संग्राहक:  सुश्री भावना कांडेकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती अनुराधा फाटक

?  काव्यानंद  ?

 ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक ☆

मनाचा ठाव घेणारे काव्य लेखन हे वैशिष्ट्य असणाऱ्या आदरणीय कवियत्री शांता शेळके यांची ही रचना!प्रत्येक तारुण्याला भूतकाळात नेणारे असे गीत !

संसारात गुरफटल्यानंतर तरुणपणीचा मैत्रीचा बहर आपोआप ओसरतो पण मनाच्या कप्प्यात काहीतरी लपलेले असते.ते कधीतरी बाहेर येते.

या गीतातून असाच एक भूतकाळ कवियत्री शांता शेळकेनी उलगडला आहे.

काही कारणाने गीताचा नायक एका ठिकाणी जातो आणि तेथे गेल्यावर आपण आपल्या सखीबरोबर याच ठिकाणी आल्याचे त्याला स्मरते. त्याचेच मन त्याच्याशी हितगुज करते अशी या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे.

संध्याकाळी तिथे आलेला तो तिथल्या लताकुंजात बसून आकाशाकडे बघत असतानाच त्याला त्याच्या सखीबरोबरची भेट आठवते… तेव्हा जो चंद्र आकाशात होता तोच आता आहे. तीच चैत्र पौर्णिमेची रात्र आहे आणि जिच्याबरोबर मी स्वप्ने रंगविली तिही तूच आता मला इथं आहेस असे वाटते.

तीच शांतता, प्रितीची धुंदी आणणारे चांदणे, आता जसा मांडवावर जाईचा वेल पसरला आहे तसाच त्यावेळीही पसरला होता. जाईच्या गंधमोहिनीवर त्यावेळी आपण लुब्ध झालो होतो पण आता…आता गंधमोहिनीची ती धुंदी नाही. तू आणि मी तेव्हाचेच आहोत पण आपले मार्ग वेगळे झाले,आपले प्रेम विरून गेले, एकमेकांच्या भेटीची ओढ राहिली नाही की स्वप्ने पहाणे नाही. एकमेकांच्या विरहाची आर्तता नाही की डोळ्यात भेटीची स्वप्ने नाहीत. ज्या जाईच्या फुलांच्या सुगंधाने आपण भारावलो होतो ती फुले केव्हाच वाळली असून आज तुझी झालेली आठवण म्हणजे वाळलेल्या फुलातला गंध !प्रेमाच्या भंगलेल्या सुरातून यापुढे कधीच गीत जुळणाय नाही.

हे एक विरहगीत असून सत्यात न उतरलेले स्वप्न बघणे आहे.

निसर्ग कधी बदलत नसतो.तो नित्य तसाच असतो बदल घडतात ते मानवी जीवनात आणि ते बदल उराशी बाळगत आपण जुने शोध घेण्याचा प्रयत्न करत दुःखाला कवटाळत असतो.

 हे गीत ऐकताना मम्मटाच्या काव्य प्रकाश ग्रंथातील एका रचनेची प्रसंग साधर्म्यामुळे आठवण येते.

‘ यः कौमारहरः स एव हि वरः

ता एव चैत्रक्षपाः

ते चोन्मीलित-मालती-सुरभयः

प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि

सुरत-व्यापारलीलाविधौ रेवा-रेतसि-वेतसी- तरुतले

चेतःसमुत्कण्ठते ।।

माझ्या कुमारीपणाचे ज्याने हरण केले तोच प्रियतम( जरी आज आहे)चैत्रातल्या त्याच रात्री आहेत, उमललेल्या मालतीफुलांच्या सुगंधाने भरलेले तेच कदंब वृक्षावरून वहात येणारे वेगवान वारे आहेत,आणि मी देखील तीच आहेतरी त्याच नर्मदा तीरावरील वेतांच्या कुंजामध्ये त्याच सरतक्रीडेच्या विवाहासाठी माझे मन उत्कंठीत आहे.

 या संकृत रचनेत या गीताचे बीज दडलेले असावे असे वाटले म्हणून श्लोकाचा उल्लेख करावासा वाटला फरक एवढाच आहे श्लोकातील नायिका विवाहोत्सुक वाटते आणि हे गीत विरहगीत आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)

आपल्या ओघवत्या भाषेचं श्रेय त्या आचार्य अत्रेंना देतात. ‘ शब्दांचा सोस असला तरी बोलण्यातील ओघ आपल्या लेखनात पाहिजे’; हे अत्रे यांचं वाक्य त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचूर भाषाशैली बदलली. जीवन अनुभव घेताना कोणताही प्रसंग, एखादे दृश्य, ऐखादं चित्रं, एखादं मनात कोरलं गेलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं कविता सुचायला कारणीभूत झाले आहेत.

शांता शेळके यांची ‘ पैठणी ‘ ही कविता…. मनात खोलवर रुजलेली पण अजुनही मायेची उब व आधार देणारी ही कविता, ‘प्रत्येक स्त्री चा थोडा वेगळा असला तरी असाच एखादा अनुभव तिच्या मनात नक्कीच असणार———

‘पैठणी’—फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली आजीची एक ‘पैठणी’ जपून ठेवली आहे.कवयित्री लिहिते —–

कधीतरी ही पैठणी

मी धरते ऊरी कवळून

मऊ रेशमी स्पर्शामध्ये

आजी भेटते मला जवळून

त्यांची शोध ही कविता—— आजही स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कविता आहे. हा स्वतः च्या अस्तित्वाचा शोध पूर्वीही होता आणि आजही तसाच आहे. शोध या कवितेतील या ओळी पहा….

‘माहीत नव्हते मला माझे बळ,

माझी दुर्बलता   सतत मला वेढून बसलेली

माझी  भिरुता’

आणि पुढे त्या लिहितात—-

आत आतल्या आत मी.   

आहे उलगडत

 क्षणोक्षणी विस्तार पावत.

 पोहचते आहे जाऊन—

 अंतरंगाच्या कानाकोपऱ्यात.

 मी चकीत होत आहे.

 स्तिमित होत आहे.

दुखावत आहे आणि सुखावतही’

‘असा बेभान हा वारा’, ‘ किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह —अनेक सूक्ष्म, तरल,  वेगवेगळ्या भावना, संवेदना यातून जाणवतात.

चित्रपटातील गाणी जशी लोकप्रिय तशी चित्रपटातील ‘लावणी’ ही.

मराठा तितुका मेळवावा हा  ‘चित्रपट’; या चित्रपटातील लावणी. ‘ आनंदघन’ ह्या नावाने लताबाईंचं संगीत आहे.

‘ *रेशमाच्या रेघांनी

लाल काळया धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी  काढीला        

हात नका लावू माझ्या साडीला’*

‘सोनियाची पाऊले’ पवनाकाठचा धोंडी’, ‘     ‘मंगळसूत्र’ हे लावण्यामुळे गाजलेले चित्रपट.

तसेच  चित्रपटातील त्यांची द्वंद्वगीतेही तितकीच लोकप्रिय झाली.

प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले. साहित्यातील विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

आळंदी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला.

निसर्गीची त्यांना विलक्षण ओढ होती.त्यांचे मन तासनतास तेथे रमे, हे धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्रात लक्षात येते.

म्हणून त्या म्हणतात_———

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे’

कवयित्री शांता शेळके यांची काही प्रसिद्ध पुस्तके——

१. ‘चिमुकल्यासाठी गाणी —अकुबाई बकुबाई ‘हा  बालकविता संग्रह         

२.’ जन्म जान्हवी’

३. ‘तोच

काही अनुवादित पुस्तके—–

 ६. काॅनरॅड रिझ्टर यांचे अनुवादित पुस्तक —-  ‘गवती समुद्र’

७. लुईसा हे अल्काॅट ( मूळ इंग्रजी लेखिका)

    यांच्या लिटल वुमन पुस्तकाचा अनुवाद — ‘चौघीजणी’

८. द हेलन केलर ह्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद —  ‘आंधळी’

९.  मूळ लेखक वेद मेहता यांच्या पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळ्याचे डोळे’   

१०. कविता संग्रह —

      १. ‘असा बेभान वारा’

      २. ‘किनारे मनाचे’

      ३. ‘अनोळख’

११. ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र    

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात –  मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून, ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय…. आता इथून पुढे)

‘हृदया, गात रहा नीज गीत’

सहजता हा शांताबाईंच्या काव्यलेखनाचा स्थायीभाव आहे.  जुन्या जमन्यातील अनागर सस्कृतीतील बहिणाबाई म्हणते,

अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी

तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी.

आजच्या जमानातल्या शांताबाई जुन्या जमन्यातील या बहिणाबाईचाच वारसा सांगतात जणू! ‘अंतरीचे स्व-भावे धावे बाहेरी’ या संतवचनाप्रमाणे जे जे अंतरात उचंबळलं, मनाला भावलं, ते ते काव्यरूपात बाहेर आलं. भोवतालच्या निसर्गाचा त्यांच्यावरचा प्रभाव, त्यांची प्रीतभावना, विरहावेदणा, त्यांचं एकाकीपण, चिंतन-गूढगुंजन, आत्मसंवाद सार्‍यांचंच प्रगतीकरण त्यांच्या कवितेत अगदी सहजपणे येतं॰

‘सांज काजळत आली   हाका येतात दुरून

आई ठेव ना आता    खेळ सारा आवरून’

किंवा  ‘मीच निर्मिली होती ती मायानगरी

          क्षणभर माझा जीव खुळा रमवाया

          जे जे होईल, व्हावे म्हटले होते

          त्याची केवळ करात आली छाया ‘

किंवा   होते इथे माझ्यासवे, होते सदा जे भोवती,

        आता कुठे गेले बरे, गेले कुठे ते सोबती

किती म्हणून उदाहरणे द्यावी?त्यांची प्रत्येक कविता सहजपणे साकार झाली आहे. त्यांच्या कवितेतील सहजपणाचे कारण, त्या ‘नीज गीत’ गात राहिल्या. ‘हृदया, गात रहा नीज गीत’ म्हणत राहिल्या. आपल्या हृदयाची स्पंदने व्यक्ता करत राहिल्या. ती व्यक्त करताना म्हणत राहिल्या, ‘ज्ञात जगाच्या पैलतीरावरि, असेल कोठे रसिक कुणीतरी, प्रांजळ तूझिया बोलावरती, जाडेल त्याची प्रीत’ 

‘वर्षा’ या शांताबाईंच्या पाहिल्याच काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत, शांताबाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगताना रा. श्री. जोगांनी ‘सहजता आणि प्रसन्नता’यांचा उल्लेख केलाय. हीच वैशिष्ट्ये त्यांच्या पुढच्या, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी इ. काव्यसंग्रहातही दिसून येतात. फक्त पुढच्या काळात त्यांची कविता त्यांची कविता सखोल, अर्थगंभीर, परिपक्व आणि विकसित होत गेली असं डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात.

शांताबाईंच्या रचनेतील सहजता त्यांच्या कवितेइतकीच गीतरचनेतूनही जाणवते.किंबहुना आशा सहज, सुंदर रचनेमुळेच त्या उत्तम गीतकारही होऊ शकल्या. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आधी बांधलेल्या चालींवर ज्या गीतरचना शांताबाईंनी केल्या, त्यातही ही सहजता उणावली नाही.

शांताबाईंचा प्रतिभा पक्षी त्याला वाटलं, तेच गात राहिला. त्याचे स्वत:चे सूर…. म्हणून ते सच्चे सूर वाटतात. त्यात कृत्रिमता, गारागिरी, उसनेपणा कुठेच नाही. शांताबाई स्वत:च म्हणतात, मी जे लिहिले, ते अगदी मनापासून लिहिले. त्यात उणिवा असतील, दोष असतील, पण अप्रामाणिकपणा यत्किंचितही नाही. एका कवितेत त्या म्हणतात,

‘नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा

एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा’

नव्या वळणाचा दृश्य प्रभाव त्यांच्यावर खूप कमी आहे. त्यांची कविता नवतेबरोबर भरकटत गेली नाही. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती याबाबत ती स्वत:शी अत्यंत प्रामाणिक राहिली’ असं डॉ. प्रभा गणोरकर आवर्जून सांगतात.

शांताबाईंची कविता आत्मारत आहे पण ती आत्मकेंद्रित नाही. कुसुमावती देशपांडे यांनी ‘रूपसी’च्या प्रस्तावनेत ती ‘आत्मलक्षी’ असल्याचा उल्लेख केलाय. त्यांच्या कवितेत ‘भेदक आत्मविश्लेषण’ आणि ‘शांत प्रामाणिकपणा’ आहे, असेही त्या म्हणतात. ती केवळ स्वत:शीच बोलत नाही. ‘ग्रेस’सारखी ती केवळ स्वत:तच मश्गुल रहात नाही. ‘ग्रेस’ची कविता वाचताना वाटतं, हा कवी एका भारलेल्या रिंगणाच्या आत उभा आहे. त्यात सहजपणे दुसर्‍याला प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी ‘तिळा उघड’ सारखा एखादा मंत्र माहीत असायला हवा. शांताबाईंचे तसे नाही. त्या स्वत:शी बोलतात. स्वत:शी बोलता बोलता त्या रसिकांशीही संवाद साधतात. केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,

‘ तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’

शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिभासंपन्न कवयित्री- शांताबाई शेळके ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ प्रतिभासंपन्न कवयित्री- शांताबाई शेळके ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

शांताबाई…. शांताबाई शेळके एक प्रतिभावंत कवयित्री.. लेखिका… संतसाहित्य, पारंपरिक गाणी.कविता यांचा एक चालता बोलता ज्ञानकोश असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अफाट वाचन करून मुखोदगत असणाऱ्या एक अभ्यासक, सच्चा रसिक.

शांताबाई चा जन्म पुण्याजवळील इंदापूर या गावी 12 ऑक्टोबर 1922 साली  झाला. त्यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांनी शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत घेतले. त्यांच्या आईला वाचनाचे वेड असल्यामुळे शांताबाईंना लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली. आजोळी गेल्यावर पारंपारिक गाणी ओव्या त्यांच्या कानावर पडत त्यामुळे लहान वयातच कवितेची गोडी रुजत गेली. त्यांनी सर परशुरामभाऊ कॉलेजमधून बीए डिग्री संपादन केली. कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापक श्री. म. माटे, प्राध्यापक के. ना. वाटवे., प्राध्यापक रा. श्री. जोग यांच्यामुळे त्यांना अवांतर वाचनाची, कवितेची गोडी लागली. कॉलेजमधील नियतकालिकेत त्यांनी लेख लिहिला. त्याची प्रस्तावना माटे सरांनी लिहिल्यामुळे त्यांना लेखनासाठी हुरूप आला आणि त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली.बी.ए. झाल्यावर मुक्ता व इतर गोष्टी या नावाचा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. 1944 साली त्यांनी संस्कृत विषय घेऊन एम ए केले. या परीक्षेत त्यांनी तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी नवयुग साप्ताहिक मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. थोडे दिवस नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये व नंतर मुंबईच्या रुईया व महर्षी दयानंद कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून काम केले.

त्या निगर्वी, शांत व मितभाषी होत्या. ज्येष्ठ कलाकार म्हणून त्या कधीच  मिरवल्या नाहीत. आपण जे सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते इतरांनाही दिसावं अशी त्यांची भावना होती.या भावनेतून त्यांना “मधुसंचय”  पुस्तकाची कल्पना सुचली असावी.

“किलबिल किलबिल पक्षी बोलती” हे बालगीत लिहिताना या काव्यात’ कुणी न मोठे कुणी धाकटे’ ती ओळ फक्त त्यांनी लिहिलीच नाही तर त्या स्वतः आपल्या कृतीतून दाखवत.

देव, पूजा अर्चा यावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता पण’गणराज रंगी नाचतो किंवा गजानना श्री गणराया’ लिहिताना त्यां निस्सिम गणेश फक्त गेल्या.

‘ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरुभुरु, लिहून प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली.

समुद्राची कल्पना करून,’ वादळ वार सुटल ग’ यासारखं गीत लिहिलं आणि ‘जाईन विचारत रानफुला’ लिहिताना विरहिणी झाल्या.

‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’या गीतातून वेगळा भाव वेगवेगळे तरंग आपणास दिसून येतात.

स्त्री मनाच्या भावनांचा वेध घेणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली त्यापैकी काही गाणी स्त्री मनाची अवस्था व्यक्त करणारी आहेत उदाहरणार्थ’ तू न सखा मजसंगे वाटही उन्हाची’संगतीत एकाकी वेदना ही मनाची’

हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्यासंबंधी एक किस्सा वाचण्यात आला. लेखक रणजित देसाई व संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांना नाटकासाठी एक गाणं हवं होतं. शांताबाईंनी केलेले गाणे त्यांना पटेना तेव्हा तुम्हाला कसे गाणे हवे आहे? असे शांताबाईंनी विचारताच  त्यांनी एक शेर सांगितला. तो शेर शांताबाईंना भावला. त्यातून ‘काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी मज फुल ही रुतावे हा दैवयोग आहे’ हे अजरामर गीत जन्माला आले. तसेच पदराची किनार यासाठी शांताबाईंना शब्द सुचत नव्हता पण शेव खाताना’तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ हे काव्य स्फुरले.

कविता कथा कादंबरी बालसाहित्य चित्रपट गीत समीक्षा आत्मकथन अनुवाद…. इत्यादी नानाविध साहित्यप्रकारात शांताबाईंनी लेखन केले पण त्यांचे खरे प्रेम कवितेवरच होते.

त्यांच्या प्रसिद्ध गीता पैकी काही गीते सांगता येतील “ऋतू हिरवा ऋतू बरवा, कळले तुला न काही, काटा रुते कुणाला, काय बाई सांगू, दिसते मजला सुख चित्र नवे, जय शारदे बागेश्वरी, शूर आम्ही सरदार, मराठी पाऊल पडते पुढे”. इत्यादी.

नादलयींचे नेमके भान, सुभग प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्य लेखनाचे वैशिष्टय होते. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिरांच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता त्यांच्या काव्यातून दिसून येते.

अशा या प्रतिभावान कवयित्रीने 1996 साली आळंदी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले तसेच 1996 साली त्यांना गदिमा लेखन पुरस्कार देण्यात आला. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश”या गीताला सूरसिंगार पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट चित्र गीत लेखन पुरस्कार (चित्रपट भुजंग ) आणि साहित्य योगदानासाठी 2001 साधी यशवंतराव चव्हाण पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले गेले. आज शांताबाई आपल्यात नाहीत पण त्यांचे साहित्य वाचताना अजूनही त्या आपल्यात वावरतात असा भास होतो.

अशी दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई शेळकेंचा सहा जून हा स्मृतिदिन. शांताबाईंना विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares