मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शेवटचा दिवस…. ☆ श्री अरविंद लिमये

☆ इंद्रधनुष्य :  शेवटचा दिवस…. ☆ श्री अरविंद लिमये 

खूप वर्षांपूर्वी मी युनियन बँकेच्या सांगली शाखेत मॅनेजर होतो तेव्हा ‘मधू कांबळे’माझा स्टाफ मेंबर होता.जवळजवळ चार वर्षे आम्ही एकत्र काम केलेलं.ती जवळीक होतीच.पुढे खूप वर्षं उलटून गेल्यानंतर त्याची अचानक भेट झाली ,तो नुकताच रिटायर झाल्यावर आमच्या ‘युनियन बॅंक निवृत्तकर्मचारी संघटनेचा मेंबर झाला तेव्हा..!त्या मिटींगमधे गुलाबपुष्प देऊन माझ्या हस्तेच त्याचं स्वागत झालं होतं.मिटींग नंतरच्या चहापान कार्यक्रमात तो मुद्दाम माझ्या जवळ येऊन खूप मोकळेपणाने भरभरून बोलला.जुन्या आठवणींची उजळणी झाली.निघायची वेळ झाली तेव्हा मुद्दाम माझा पत्ता/मोबाईल नोट करून घेतलान् .’लेकीचं लग्न ठरलंय.ते झालं की मी खर्या अर्थाने रिटायर झालो म्हणायचं.पत्रिका छापून आल्या की घरी येऊन आमंत्रण देणाराय..’ म्हणाला आणि गेला.गेलाच.

अगदी अचानक.. अनपेक्षित..! लग्नाच्या तयारीची धावपळ… उत्साहाच्या भरात तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष..अचानक आलेला लो बीपीचा अटॅक..आणि त्याचं त्याच अवस्थेत जागच्याजागी कोसळणं.. ऐकून मला धक्काच बसला.लेकीच्या लग्नाची तारीख हाकेच्या अंतरावर आलेली..त्याच्यासकट सगळेच लगीनघाईत..घरातलं कामांच्या प्रचंड दडपणातलं आनंदी वातावरण…आणि…अचानक ध्यानीमनी नसताना हा घरचा कर्ताच अचानक गेला..! संपूर्ण घरावर शोककळा पसरली.आम्ही संघटनेचे प्रतिनिधी घरी सांत्वनाला जाऊन आलो.ते आवश्यकही होतंच.दिवसकार्य आवरलं. ठरल्याप्रमाणे संघटनेचे कार्यकर्ते फॅमिली पेन्शनसंबंधीचे फाॅर्म्स घेऊन मधूच्या घरी गेले. ते परतले ते भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह सोबत घेऊन…! घरचे सगळे आर्थिक व्यवहार मधूच्या पहात असे. त्याचे आर्थिक व्यवहार,गुंतवणूकी, नियोजन याबद्दल घरी कुणालाच काहीच माहीत नव्हतं.आपलं अचानक कांही बरंवाईट होईल असं त्याला वाटलं नसणार पण ते तसं झाल्यामुळे एक विचित्र त्रांगडं निर्माण झालं होतं एवढं मात्र खरं..!त्यातूनही मार्ग काढावा म्हंटलं पण घरच्यांना भरपूर शोध घेऊनही आर्थिक व्यवहाराच्या नोंदी वा कागदपत्रे कांहीच सापडलं नाही. बॅऺकेतल्या ठेवी, नाॅमिनेशन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, टॅक्स सेव्हिंग इनव्हेस्टमेंटस् सगळंच अधांतरी..! मुलीचं लग्न पुढं ढकललं असलं तरी जवळचाच मुहूर्त पाहून ते साधेपणानं का होईना लगेच करुन द्यायचं होतंच. पुढे खूप दिवसांनी संदर्भ शोधत हळूहळू सगळं मार्गी लागलं, तरी तोवर लग्न अक्षरश: कसंतरी उरकावं लागलं आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या पैशांच्या सोंगासाठी नातेवाईकांनी केलेल्या तात्पुरत्या मदतीचं मिंधेपण आलं ते वेगळंच.

‘मृत्यू अटळ आहे’ हे सर्वज्ञात व सर्वमान्य सत्य! पण आपण ते स्वत:च्या बाबतीत सहजपणे गृहितच धरलेलं नसतं. ‘जेव्हाचं तेव्हा पाहू’ हीच काहीशी बेफिकीर वृत्ती असते बर्याचदा.पण जेव्हाचं तेव्हा पहायला आपण नसणार आहोत हेच नेमकं लक्षात घेतलं जातं नाही. या सगळ्यांची विलक्षण बोचरी जाणीव मला झाली, त्याला मधू कांबळे असा निमित्त झाला.

खरंतर या किती साध्या गोष्टी.तरीही तितक्याच महत्वाच्या.पण मला तरी ते महत्त्व मधू कांबळे गेल्यावर त्याच्या घरच्यांची ससेहोलपट होईपर्यंत कुठे जाणवलं होतं? आपण तरी आपली बायको, मुलगा, सून याना आपण मनोमन केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर कुठं काय सांगितलंय? सांगणं राहू दे, पण एकत्रित नोंद करुन तरी ठेवलंय का?हे विचार मनात आले आणि मी हादरलोच. आपण हे करायला हवं. करायलाच हवं..!

‘शेवटचा दिस’ यायचा तेव्हाच येणाराय. पण तो येणाराय कदाचित असाच. अचानक. न सांगता. शेवटचा दिस गोड व्हावाच पण तो आपल्यापुरताच नव्हे. आपल्यामागे आपल्या माणसांसाठीही. याकरता योग्य ते नियोजन प्रत्येकाने करायला मात्र हवं.

चारसहा दिवसांच्या प्रवासाची तयारीही आपण अगदी आधीपासून नियोजनपूर्वक करत असतो.मग न परतीच्या प्रवासासाठीची बांधाबांध काळजी पूर्वक करायला नको?त्या प्रवासाला जाताना आपण जे बरोबर नेणार आहोत त्या आपल्या कर्मांचं दस्तावेजीकरण परस्पर झालेलंच असतं. पण आपण आपल्या माणसांसाठी जे मागे ठेवणार आहोत त्याचे दस्तावेजीकरण आपणच निगुतीने नियोजनपूर्वक करायला हवंच. नाही का ?

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार

परिचय

जन्मतारीख – १३/१२/१९४५

शिक्षण – बी.ए. डी.सी.ओ.एस्

साहित्यिक कारकीर्द 

दोन काव्यसंग्रह – कविता अंतरीच्या काव्यसंग्रह, शब्दुली चारोळीसंग्रह

दैनिके व मासिकांमधून कवितांना प्रसिद्धी, नवतरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेचा समावेश

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. ( सातारा , सांगली , पुणे , कराड , इंदौर , डोंबिवली )

अखिल भारतीय महिला कवयित्री परिषद , दिल्ली  ह्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्त्व, संस्कारभारती , सांगली साहित्यविभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षक म्हणून नेमणूक, कवि विचारमंच, शेगाव कडून साहित्यातील योग

सांगली / कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन

आरोग्य संवेदना , सांगली कार्यकारिणीत कार्यरत, महात्मा गांधी ग्रंथालय कार्यवाह

सम्मान / पुरस्कार –  शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार, इतिहास संशोधन मंडळ , संगमनेर उल्लेखनीय काव्य पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान , सांगली साहित्य पुरस्कार,  सरोजिनी नायडू पुरस्कार दिल्ली येथे कविता अंतरीच्या पुस्तकाला, कै.सुरेश कुलकर्णी पुरस्कार – सुधांशू , औदुंबर, अनेक काव्यस्पर्धेत पुरस्कार, कल्पना फिल्म असो. कला मंच , मिरज – सन्मानपत्र, श्री समर्थ साहित्य , कला , क्रिडा व सांस्कृतिक युवा मंडळ , पलूस कडून कविता अंतरीच्या पुस्तकास पुरस्कार,  बिझनेस एक्सप्रेस, सांगली काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ, रंगत संगत प्रतिष्ठान , पुणे – सन्मानपत्र, साहित्य प्रेमी मंडळ  सोमेश्वरनगर , बारामती विशेष पुरस्कार, जिल्हा ग्रंथालय आयोजित ग्रंथोत्सवात उत्कृष्ट वाचक प्रमाणपत्र, आदर्श कार्यकर्ती संस्कारभारतीचा पुरस्कार,दानाबद्दल शब्दभारती पुरस्कार, ऑनलाईन स्पर्धांमधून ९४ प्रमाणपत्रे

 

☆ मनमंजुषेतून: सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार 

‘अजी सोनियाचा दिनु। वरुषे अमृताचा घनु।‘ म्हणावं, असा आनंदयोग एक दिवस माझ्याही आयुष्यात आला. त्या दिवशी पाडगावकरांच्या सुप्रसिद्ध गीतात एक-दोन शब्दांचा बादल करत मला म्हणावसं वाटलं, ‘तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे. तुझे गुण गाण्यासाठी शब्द लाभू दे.’ ‘तुझे’ म्हणजे, कै. लक्ष्मणराव इनामदार यांचे आणि तो सोनियाचा दिनु होता, 21 सप्टेंबर 2017. तो दिवस होता, कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीचा. हा सोहळा साजरा झाला, तो दिलीतील विज्ञानभवन येथे आणि निमंत्रक होते. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.

कै. लक्ष्मणराव इनामदार हे माझे चुलत सासरे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ते गुरू. ते वकील होते. ते मुळचे महाराष्ट्रातले असले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी, संघप्रचारक म्हणून गुजराथमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. ते ब्रम्हचारी होते. गुजराथमधील भ्रमंतीतच त्यांची आणि मोदीजींची भेट झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव मा. मोदीजींवर पडून ते संघाकडे ओढले गेले. लक्ष्मणरावांना त्यांनी आपले गुरू मानले. ‘आयुष्यात मी जो काही घडलो, ते केवळ वकीलसाहेबांमुळेच (लक्ष्मणरावांमुळेच),‘ असे उद्गार त्या समारंभात मोदीजींनी काढले आणि आम्हाला धन्य धन्य वाटले. समाजातील आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी लक्ष्मणरावांनी ’सहकार भारती’ या चळवळीचा पाया घातला. ‘विना संस्कार नही सहकार’ हे त्या चळवळीचे बोधवाक्य होते. हा मंत्र मोदीजी आजही आचरणात आणतात.

21 सप्टेंबर 1917 हा लक्ष्मणरावांचा जन्म दिवस. 2017 ला या दिवशी त्यांचा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करावा, असे मोदीजींच्या मनात आले. त्याची रूपरेखा आखताना, लक्ष्मणरावांच्या परिवारातील मंडळींनाही त्यात सामील करून घ्यायला हवे, असे मोदीजींना वाटले. त्या दृष्टीने त्यांनी आखणी करायला सुरुवात केली. लक्ष्मणरावांच्या परिवारातील व्यक्तींचा शोध घेतला गेला. प्रत्येकाला स्वतंत्रपणे आमंत्रणे पाठवली. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आग्रहपूर्वक निमंत्रणे दिली गेली. त्याप्रमाणे आम्ही 20-22 जण 21 सप्टेंबर २०17 रोजी बरोबर दहा वाजता दिल्लीयेथील विज्ञानभवनावर हजार झालो. दारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.  सभागृहातील २-३ रांगा खास आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या होत्या. आमचे स्वागत करून मोठ्या सन्मानाने आम्हाला आमच्या जागी बसवले गेले. खुर्च्यांवर आमच्या नावाच्या पट्ट्या लावलेल्या होत्या. बरोबर ११ वाजता पंतप्रधान सभास्थानी आले. सुरूवातीला लक्ष्मणरावांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. मा. मोदीजींनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.  दोन वाजता उपस्थितांचे भोजन झाल्यावर समारंभाची सांगता झाली.

आम्हा इनामदार परिवारातील सर्वांना मोदीजींनी संध्याकाळी चार ते पाच यावेळात भेटायला बोलावले. आम्ही सर्वजण बरोबर चार वाजता जनपथावरेल त्यांच्या निवासस्थानी पोचलो. एका हॉलमध्ये आमच्या भेटीची व्यवस्था केली होती. तिथे त्यांनी आम्हा प्रत्येकाची स्वतंत्रपणे ओळख करून घेतली. कोण कोण कुठे असतं, काय काय करतं, प्रत्येकाचे लक्ष्मणरावांशी काय नाते आहे, याची चौकशी केली. या प्रसंगी त्यांनी लक्ष्मणरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आम्ही दिलेल्या भेटी त्यांनी स्वीकारल्या. यावेळे मला त्यांना अगदी जवळून पाहता आलं. पाच मिनिटे त्यांच्याशी बोलता आलं. त्यांना हार घालून त्यांच्याबद्दलची भावना विकत करता आली. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी समरसून बोलणं, त्यांचा शालीन, हवाहवासा वाटणारा सर्वत्र सहज वावर यामुळे मी अगदी भारावून गेले. माझ्यासाठी त्यावेळी जसा ‘अमृताचा घनु बरसला’ आणि तो ‘सोनियाचा दिनु झाला.

त्यावेळी आमच्या इनामदार परिवारासोबत त्यांचा फोटो काढला.  आजही तो फोटो पाहताना ते आंनंदक्षण माझ्यापुढे साजिवंत होतात.

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिल्पकार श्री राम सुतार.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

☆  इंद्रधनुष्य : शिल्पकार श्री राम सुतार.. : – संग्राहक – सौ. स्मिता पंडित

अयोध्येतील भगवान राम मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत 1500 पुतळे साकारणारे एक ‘राम’च करणार आहेत. या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे राम सुतार…

95 वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला आहे. धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर 63 येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (208 मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. 20 मीटर उंचीचे चक्र 50 मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची 182 मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 137.2 मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 212 मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील 16 पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे 50 हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला 16 फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

1950 मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संग्राहक – सौ.स्मिता पंडित

9422409713

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सासू होताना ☆ सुश्री मानसी काणे

☆ मनमंजुषेतून :  सासू होताना – सुश्री मानसी काणे ☆

जेंव्हापासून माझ सासू व्हायच नक्की झाल तेंव्हापासून मी जरा गोंधळूनच गेले होते. सासू म्हणजे ‘‘सारख्या सूचना’’ आणि सून म्हणजे ‘‘सूचना नको’’. म्हणजे हाताची घडी तोंडावर बोटच ठेवायला हव. काय करू? कशी करू सासूपणाची तयारी? ‘गर्भसंस्कार, आई होताना’ अशी पुस्तक असतात तस ‘’सूनसंस्कार, सासू होताना’’ अस काही पुस्तक मिळत का ते पहायला हव. मग होमवर्क म्हणून मी आधी हिंदी सिरीयल पाहिल्या. सगळ्या बा, बीजी, ममीजी, सासूजी, माँजी वगैरे भरजरी साड्या नेसून, अंगभर दागिने घालून, केसांची एकच बट पांढरी करून सुनेन केलेल्या खिरीत मीठ टाक, तिच्या जेवणात पाल टाक, तिच्या खोलीत साप सोड, तिच्या नवर्‍याचे कान भर असले उद्योग करत होत्या. ये अपने बसकी बात नहीं. मी मराठी सिरियलकडे वळले. तिथल्या सासवा सारख सुनेला खाऊन घे, विश्रांती घे, मी तुझा डबा भरते, गजरा घाल, माहेरी जा थोडययात तू उनाडयया कर मी सगळ काम करते अस म्हणत होत्या.  ये भी अपने बस की बात नहीं.  मग आता करायच तरी काय? भारदस्त दिसण्यासाठी मी कॉटनच्या कशीद्याच्या साड्या नेसू का?  आता बेडवर लोळत पडून वाचल तर चालेल ना? दुधावरची साय खाी तर बर दिसेल ना? मैत्रीणींशी फोनवर खिदळत बोलता येईल ना? सकाळी कधी उशीरा उठल तर चालेल का? आवडते सिनेमे पाहता येतील ना? नाहीतर येणारी ती म्हणायची ‘‘काय हे आईंच अगोचर वागण! माझी आई नाही हो अस वागत. ’’अरे बापरे! आता तिची स्पेस जपायची म्हणजे माझी स्पेस घालवायची की काय?

तिला सांगू का ‘‘कि बाई तुझा नवरा म्हणजे माझा मुलगा अजून लहानच आहे. त्याला भूक लागलेली समजत नाही. आपणच समजून घ्यायला लागत. त्याला चहात साय चालत नाही. आमटी फार दाट नको  फार पातळही नको असते. शेपू करडई तो खात नाही. पोळीवर कधीतरी जाम लागतो.  लहर आली की तूपसाखरही मागतो. ’’सांगू का तिला हे सगळ? पण नकोच.  ह्यांना काय वाटतय ते विचाराव म्हणून पाहिल तर ते मस्त निवांत होते. या बाबा लोकांकड ‘‘शाबास सूनबाई’’ चा मंत्र असतो. त्यामुळ सून खूष आणि तिच्याकडचे लोक म्हणतात बाबा अगदी रॉयल आहेत.  पण आई थोड्या ‘ह्या’ आहेत.  आता या ‘ह्या’ चा अर्थ हटवादी, अडेलतट्टू, फटकळ असा काहीही हो ऊ शकतो. आता काय करायच बाई?  मला पडलेले प्रश्न माझ्या आई, आजी, पणजीला पडले असतील का? एका परयया स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीला आपल्यात सामावून घेताना त्याना काही अडचण आली नसेल का? विचार करत करत मी डोळे मिटले.

माझ्या कानावर बांगड्यांची नाजूक किणकिण आली. पैंजण रुणझुणले. कोरी साडी सळसळली. मोगरा दरवळला, ‘‘आई, आले हं मी’’कानात बासरी वाजली. तिचा रेशमी लाजरा वावर मनाला मोह पाडू लागला. मुलाच्या चेहर्‍यावर न मावणारा आनंद माझ्या मनावर पसरू लागला. सगळ घर मोहरलेल्या आंब्यासारख दिसू लागल. ही किमया तिच्या आगमनाची होती हो! आपल घर सोडून माझ्या घराच्या उंबरठ्यावरच माप ओलांडून दुधात विरघळणार्‍या साखरेसारखी माझ्या घरात मिसळून जायला ती आली आहे. माझी नजर माझ्या आई, आजी, पणजीची झाली.  मी बदलून गेले. ए आई नसले तरी अहो आई आहे ना . मी तिच मनापासून स्वागत केल. दाराला तोरण लागलच होत. मनालाही मोत्याची महिरप लागली. घर सोनेरी किरणानी उजळून गेल. सासू म्हणजे ‘‘सामंजस्याचा सूर’’ आणि सून म्हणजे ‘‘सूर नवा’’. दोघीनी एकत्र मिळून रियाज केला की गाण नक्की सुरेल होणार. मी डोळे उघडले. सनई चौघडा वाजू लागला. अत्तराचा गंध दरवळला. लग्नघर सजल आणि सासू व्हायला मी सज्ज झाले. ***

© सुश्री मानसी काणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कौतुक ☆ सुश्री अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा : कौतुक –  सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆

कौतुक!एक आपलासा करणारा शब्द! कुणी कुणाचं कौतुक करावं?

जे खरच आवडतं आणि भावतंही …जे सहज सुंदर असतं… मग ते काव्य असो,लिखाण असो,चित्र असो, एखादी कलाकृती असो… एखाद्याच्या खेळातील यश असो…एखाद्याचा जबरदस्त विचार असो!

एखाद्याच्या शब्दाच कौतुक करावं, सुंदर हस्ताक्षराच करावं ,  एखाद्याच्या प्रगतीच, एखाद्याच्या निखळ आणि नितांत सुंदर भावनांचं कौतुक करावं! एखाद्याने केलेल्या पाककृतींचे कौतुक कराव, एखाद्याच्या अंगी असलेल्या छंदाच कौतुक करावं, तर प्रत्येकातील चांगलं काय? हे शोधून आणि ओळखून त्याच कौतुक करावं!

एखाद्याचा किरकोळ दोष सोडून देऊन, त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीला न तोडता, तिच्या  गुणांना जर आपुलकीच्या शब्दांनी कौतुकाच प्रेम दिल तर नक्कीच अवगुणही लयास जाऊ शकतील  !

कौतुक मारून मुटकून करता येत नसत. ते आतूनच करता येण म्हणजेच दुसऱ्यांच्या भावना जपण एकमेकांना आदर व आधार देण भावना न दुखावणार व माणुसकी जपणार, अस म्हणता येईल. खूप अवास्तव कौतुक करण्यापेक्षा एका शब्दाच झालेलं कौतुक, शाबासकी व पुढील वाटचालीस  प्रेरणा दायी ठरेल अस असाव! आपला एखादा कौतुकाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा शब्द कित्येकांचे यशाचे आलेख उंचावू शकतो.

कौतुक करताना ती अतिशयोक्ती आहे असं वाटू नये…वरवर कौतुक करणारेही कळतात आणि तोंड देखल करणारे ही कळतात….

जे चांगलं आणि कौतुक करण्यायोग्य असत, त्याच कौतुक करायला पैसे पडत नसतात. समोरच्याची बुद्धिमत्ता, हुशारी, चांगुलपणा, ह्याच कौतुक करायलाही खर तर मन मोठं असावं लागतं….ते सर्वानाच जमत नाही. मी का म्हणून? हा ‘मी’ जो आहे तोच खरा नाशक असतो आपल्या प्रगतीचा आणि भावी आयुष्याचाही!

आणि दुसर एक… मत्सर! एक मोठा भयावह दंश!हा दंश ज्यांना झालेला असतो त्यांचा तर विचारच सोडून द्यावा….

मन साफ आणि निर्मळ असावं! कायमच … म्हणचे भाव स्वभाव होऊन जातो!

दुसर्यांना चांगलं द्यावं ,माफ करावं, दुसऱ्यांकडून शिकाव, दुसऱ्यांचे चांगलं चिंताव! दुसऱ्यांच्या आनंदात जे खरोखर आनंदी होतात ते खरच मनापासून कौतूक करत असतात, आणि दुसऱ्याच्या कौतुकास ही पात्र होतात!

 © सुश्री अश्विनी कुलकर्णी 

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाळ- एक संस्कृती ☆ श्री राजीव दिवाण

☆ मनमंजुषेतून :  चाळ- एक संस्कृती –  श्री राजीव दिवाण ☆

ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती …. कोर्टाची..

महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला.

सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत….तीला “चाळ”म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं…सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही ” चाळ” म्हणजे “आसेतूहिमाचल” भारताची प्रतिनिधीच… गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला…ती हि “चाळ”. ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा… एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा… तीच बाब इतर सर्व सणांची… होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं उत्साहाने हजर. चाळीच्या गणपतीच्या सजावटीची सगळी जबाबदारी शेखसाबची..चाचा मंडप,सजावट, टेबल,खूर्च्या भाड्याने देत होते ना…ईदचा शीरकुर्म्याची लज्जत सगळे लुटायचे.  देवधरांच्या सुली( सुलेखा) ची डिलीव्हरी झाली..मुलगा झाला तो ईदच्या दिवशी तर भाभीला काय आनंद झाला..म्हणाली..”चाळमंदी महम्मद आया….शुभशकून हूया” . हीच सुली शाळेचा अभ्यास जिन्यावर बसून करताना ,इस्त्रीवाल्या भैय्याला ओरडायची ” चाचाss..गावो मत,मै अभ्यास करती हूँ “..” हां हां मालूम है.बडी आयी डागदर बननेवाली” .  दिवसातून चारवेळा तरी दोघाचं असं भांडण व्हायंचच…सुली दहावीच्या पेपरला जाताना सगळ्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून निघाली नि जाता जाता जिन्याखाली बस्तान ठोकलेल्या इस्त्री वाल्या भैयालाही नमस्कार करायची विसरली नाही. सुली ग्रॅज्युएट झाली…दोन वर्ष नोकरी झाली नि लग्न ठरलं… लग्नाला निघताना चाचाला नमस्कार करायला गेली तेंव्हा भरल्या डोळ्यांनी चाचा बोलला” हे गंगामैया..का बोलू , हमार बिटूवा भी अब बडी हुई होगी..!!!”

पाटील काकांचा अर्जुन  लहानपणापासून  एक नंबरचा दंगेखोर नि , टग्या. सगळ्यांना अगदी नको जीव करून सोडलेलं.हाच टग्या  मिलीट्रीत भरती झाला तेंव्हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. एकेक घुंगरू एकमेकांना बांधून तयार करतात त्यालाही ” चाळ” म्हणतात..सार्यांचाताल,सूर,लय,जसं एकंच असतं ना तशीच एकरूपता ह्या इमारतीच्या माणसांच्या वागण्यातून व्यक्त व्हायची ..म्हणूनच ती “चाळ”असावी.

अशीही चाळ आता पडली. दोनतीन वर्षात उंच मनोरेवजा फ्लॅटसिस्टीम उभी राहिली. कुटूंबं रहायला आली. काळ पुढे जात होता, पण चाळीतला जिवंतपणा नि जिव्हाळा काही जाणवेना. चाळ असताना सदैव उघडे असलेले घराचे दरवाजे आता सेफ्टी डोअरसह सतत बंदच दिसू लागले. पोरांचा किलबिलाट नाही, जिन्याखालील भैयाचं गाणं नाही. कुणाकडे कोण आला,कोण गेला कशाचा कशाला पत्ता नाही.

मोडक्या चाळीतून निघताना पाहिलेली सारी स्वप्नं ह्या फ्लॅटसिस्टीम मधे जणू “ फ्लॅट” होवून गेली.

 

© श्री राजीव दिवाण.

भ्रमणध्वनी ९६१९४२५१५१

वॉटस्अप ८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिलोरी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा : बिलोरी  ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

उगवतीला पीतवसनाची आभा अलगद पसरत जाते अन् सृष्टी जागी होऊ लागते… दशदिशांत सामावलेला, अवघं चराचर व्यापून उरलेला अनंत रूपांतला कान्हुला आपल्या अंत:चक्षूंना जाणवू लागतो… पक्षांची किलबिल, झरे-नद्यांच्या प्रवाहांना बहाल करतो तो आपल्या बासरीतले सूर… नुकतेच भुईतून उगवलेले मौजेत डुलणारे कोंब, इवलुशी रोपटुली म्हणजे त्याच्यातल्या बाळलीलांना आलेलं उधाण…  झाडांच्या पालवीतल्या कोवळेपणात, अनेक हिरव्या रंगछटांच्या पानांच्या सळसळीत, फुलांच्या मनमोहक सुगंधात, त्यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या फुलपाखरांच्या बागडण्यात ओसंडत राहातं त्याच्यातलं सळसळतं चैतन्य… गुरा-वासरांच्या डोळ्यांतल्या मायाळूपणातही तोच वसलेला…

विशाल पर्वत-डोंगररांगांतून फैलावते त्याच्यातली भव्यता… अथांग, शांत सागराच्या सखोलतेत विसावतो त्याच्यातला तत्ववेत्ता, खळाळत्या लाटांतून बहरणारा ‘तो’ म्हणजे रासलीलेतला आवेगी शृंगार अन्  ओहोटीतल्या लाटांतून शांतावत जाणारा ‘तो’ म्हणजे त्याला अंतरी जपून ठेवणाऱ्या राधेच्या मनातलं त्याचं चिरंतन… ऋतूबदलात सामावलेली त्याच्या भावनांची आंदोलनं… झरणाऱ्या मेघसरींनी वसुंधरेला उल्हसित करणारा तो… प्रखर उन्हाच्या झळांतून ओसंडणारा त्याचा क्रोध आणि तो निमाल्यानंतर सुखावणारं शारदचांदणं घेऊन येणाराही तोच…

अस्ताचलाच्या भावविभोर क्षणांत मावळतीला आभाळभर सांडलेले रंग त्यानं मस्तकी धारण केलेल्या मोरपिसाचं नभदर्पणातलं प्रतिबिंब तर नव्हे!? असं वाटू लागतं आणि भूल पडत जाते ते निरखण्यात हरवून जाण्याची… हळूहळू ती रंगभूल साकार करत जाते यमुनेचा किनारा, रंगक्षणांत माखलेला घननीळ आणि त्याला डोळ्यांत साठवणारं अवघं गोकुळ… शृंगाराचं ते अद्भुत लेणं मनात अवतरत असताना भान हरपून जातं… अचानक त्याक्षणी तिथलेच होऊन जाताना यमुनेच्या तीरी चाललेल्या लगबगीत मन सामील होऊन जातं…

साक्षात मनभावन मनमोहन आपल्याला सामोरा आणि त्याच्या रंगांचं गारूड अनुभवण्यासाठीचं आपल्या जिवाचं आतुरलेपण, तो बिलोरी पीतवसन नवोन्मेष रोमारोमांत साठवून ठेवण्याची ओढ, त्या खट्याळ नजरेतले नाजूक सोनसळी संकेत टिपताना नुरलेपणातलं बेभानफूल माळण्याची अधीरता, त्याच्या ओठांवर रेंगाळणारी सानिका होण्याचा मोह आणि एका क्षणी अवघं तनमन कृष्ण झाल्याची जाणीव!…

अंतर्बाह्य व्यापणारा झंकार चैतन्यरंगाची उधळण करणारा आणि मनाच्या तारा छेडत राहून सौख्यधून अनुभवायला देणारा… तीच चाहूल त्यानं वेढून घेतल्याची, तीच खूण त्यानं त्याच्या रंगात माखून टाकल्याची आणि देहभान हरपवून त्याच्यात सामावून घेतल्याची!… तिथून पुढं बाकी रंगांचे रंग फिके पडत जात सावळरंगाचं देखणेपण अवतीभवती पसरत जातं… काळजाला चांदणभास देणारी शीतलता जाणवू लागते आणि अख्खं आभाळ नीरव शांततेत न्हात सावळरंग पांघरतं…!

त्या नीरवतेच्या कुशीत पहुडले असताना चेहरामोहरा नसलेलं कुणी काळजाचा ठाव घेत गालावर मोरपीस फिरल्याचे भास होऊ लागतात… आजूबाजूला एक धून विहरत असल्याची जाणीव होते… स्वत्व विरून जात मन त्या क्षणाच्या स्वाधीन होतं आणि आपल्यातल्याच त्याची नव्यानं ओळख पटते..

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर,

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

माझ्या खिडकीतून दिसतात

रात्री नक्षत्रे नि तारे

आणि दिवसा वाहत असतात

झुळूझुळू मंजुळ वारे ….

 

खरंच् …खिडकी…! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे…मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी … वा…वा..वा….! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर…घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही…घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे…! वा….!

काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे….! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ….?

माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते….! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते …. , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच …व माझ्या हातून टेबला- वरील कागदांवर चांगले काही लिहूनही होते… बघा खिडकी किती महत्वाची आहे…!अख्ख्या घराचा कंट्रोल मी खिडकीतून बसल्या जागी करते ..वॅाच  ही ठेवते..! बसल्या जागेवरून… कळले का मंडळी खिडकीचे महत्व ? म्हणून मी माझ्या रूम मध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत …. शुद्ध हवा ,प्रकाश , मनोरंजन,लेखन ,वाचन, गाणी ऐकणे, पेपर वाचणे ,अऽऽऽऽऽऽऽबबबब !

खिडकी कित्ती कामाची

मनोरंजन करण्याची

येणारे नि जाणारे …

हसून त्यांना बघण्याची…..!

ह्या खिडकी मुळे माझ्या मनाची खिडकी सदैव उघडी ताजीतवानी असते.भरभरून उत्साह ही खिडकी मला देते….कसा…?

उठल्या बरोबर बघावे तर …छान दाट धुके ,शुभ्र धुके .. प्रसन्न धुके ,दुधा नि पारदर्शक धुके जणू माझी वाट पाहत असते….कधी खिडकीची काच बाजूला होईल नि मॅडम आम्हाला बघतील …असे जणू धुक्याला वाटते.. आणि मग …? मी बघताच धुके प्रसन्न हसते.

आळस पळतो . अनिमिष नेत्रंनी मी धुक्याकडे पाहत राहते … न जाणे दृष्टी आड झाले तर ….!

हरवले तर ..?त्याला मनसोक्त पाहून घ्यावे ,मनात साठवावे हो … अदृश्य झाले तर… म्हणून मग मी तिथेच झोपाळ्यावर ठाणं मांडत झुलत मनसोक्त त्याचा आस्वाद घेते.हळू हळू मनावरील पडदा दूर व्हावा तसे ते धुके अलगद हळू हळू काढता पाय घेते …विरत जाते…

नि मग …डोळे मिचकावत किरणांची स्वारी दंवबिंदूंना चिडवत ,चकाकत अळवावरच्या पानांवरून ओघळणाऱ्या दवांत चमकत  मिश्किलपणे हसत माझ्या खिडकीत समोरच्या टेकडीवर झाडांवर शेंड्यांवर वेलींवर किरणे  अवखळ पणे खेळू लागतात. पाने हसतात, फुले हसतात ,दंव हसते , गवत पाती डुलतात, वेली पुढे झुकतात,  हलतात ,अंग घासतात नि किरणे हळूहळू बालकाने लोळावे तशी पहुडतात , स्थिरावतात.

हे सारे दो नयनांनी तृप्त होत मी अनिमिष नेत्रांनी बघत असते. वा …! किती सुंदर सुंदर देणग्यांचा वर्षाव निसर्ग करतो आपल्यावर..!

धुके ,किरणे,पाने  ,फुले ,फुलपांखरे ,पक्षी,सारे समोर झाडांवर ,चराचरांवर आपल्या स्वागतासाठी हजर असतात . ..हसत असतात, डुलत असतात, ओसांडत असतात …आनंद घ्या म्हणत असतात…केवढी कृपा ! असीम…!

रात्री तर माझ्या खिडकीत चांदणीच अवतरते तिच्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन… समोर टेकडीव नि:शब्द शांतता असते… झाडे काळोखात बुडून गुडूप शांत झोपी जातात, वारे स्वस्थ शांत होतात , पाने अंग मिटून स्तब्ध होतात ,पक्षी गप्पा मारून झोपी जातात….खिडकीतल्या चिकूवर मात्र वटवाघळे नि पाकोळ्या घिरट्या घालतात . वटवाघळे उलटी लटकून मुटूमुटू चिकू खातात , गर खातात …सालं खाली पडतात . सकाळी झाडाखाली मला ती दिसतात … समोर टेकडीवर मात्र डोळे फाडून पाहिले तरी काही दिसत नाही….

मला वाटते , दिवसभर माझी करमणूक करून सारी मंडळी थकली वाटतं .आता त्यांना विश्रांतीची गरज आहे.मग मी शहाण्या मुलीसारखी कुरकुर न करता आपल्या लेखन कार्यात रमून जाते ते थेट बारा साडेबारा पर्यंत ….. मला मुळी कंटाळाच येत नाही माझ्या भोवताली असलेल्या या साऱ्या मंडळींमुळे…. कारण आता एवढ्या रात्री सुद्धा मी ….. हो .. खिडकीतच असते ना? हसूआलं ना ?

अहो … आहेच माझी खिडकी गुणी ? जगाची खिडकी किती ही मोठी असो ..कुणीही असो मला त्याच्याशी देणे घेणे नसते .मी माझ्या खिडकीवर एकदम खूष  आहे…हो … माझी …खिडकी ….

कंटाळा न येऊ देणारी

साऱ्या जगाची खबर देणारी ..

कोण आलं कोण गेलं सांगणारी

माझ्याशी गप्पा मारणारी

मला आनंदात ठेवणारी…..

मला खूप काही देणारी…

अशी माझी खिडकी आपल्याला बघाविशी

वाटली तर …जरूर ….या …

खिडकी तुमची वाट पाहते आहे…

 

तिचा पत्ता…. सारंग बंगला वाघ गुरूजी शाळेसमोर नाशिक १३

येताय् ना मग… ?

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

svpawar6249@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

अल्प परिचय  
सतीश स. कुलकर्णी : साधारण तीस वर्षांपासून पत्रकारितेत. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकांमध्ये उपसंपादक ते वृत्तसंपादक. तीन वर्षांपासून मुक्त पत्रकारिता व व्यावसायिक लेखन, ब्लॉगलेखन. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ उपक्रमात  khidaki.blogspot.com ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस. ललित लेखनाचे ‘शब्दसंवाद’  पुस्तक प्रकाशित. शब्दांकन, संपादन, पुनःलेखन, मुद्रितशोधन, पुस्तक परिचय आदी काम व्यावसायिक तत्त्वावर करतो.

☆ विविधा : फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆

(डॉ. एडनवाला ह्यांना ‘स्माईल ट्रेन’ चा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.)

अहमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘स्माईल मेकर’ ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३० मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरातील ११, नगरवाला रस्ता पत्त्यावरचा बंगला, हेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी ‘पारशी टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली.

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या ‘ज्युबिली मिशन हॉस्पिटल’ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील ‘चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर’ ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत.

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचार करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे ‘स्माईल ट्रेन’. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचाच एक घटक बनले. त्यांच्या निधनानंतर ‘स्माईल ट्रेन’ ने संकेतस्थळावर विशेष श्रद्धांजली लेख प्रसिद्ध केला.

हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली.  श्री बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अगदी अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

… सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं भेट द्या >> – https://khidaki.blogspot.com/2020/07/Adenwalla.html

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – shabdkul@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई 

☆ विविधा : मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

 

परवाच संकष्टी झाली गणपतीची आरती आणि नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागलो ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…… त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी असं म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती, गणेश, गजानन, विनायक, अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली रत्नजडित किरीट घातलेली तुंदिल तनु असलेली जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का?

मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात. एक डोळ्याला दिसणार किंवा व्यक्त रूप आणि दुसर डोळ्याला न दिसणारे सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं असं आहे.” गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह हे अनंत अपरिमित आहे. या ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलाच एक अगदी छोटा भाग आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमितापासून परिमिता पर्यंत येत तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. ही  मोजमाप करणारी शक्ती गणित तज्ञांचा गणित तज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते जसं चिकू आंबा फणस यातील प्रत्येकाचं पान ,फुल, फळ निरनिराळ असत. आंब्याच्या झाडाला लिंबू किंवा चिकू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई चमेली ही फुलं लागत नाहीत. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच  ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी ,अनावृष्टी, साथीचे  आजार अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्राता तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायु आकाश अशा पंचमहा तत्वांनी बनलेले आहे. ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरण अर्ध्या आकाश तत्वात पुरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम). ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओमकारातून जन्माला आली व प्रत्येक गोष्ट ओ मच आहे असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व ,आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्ही मधील गाठ हे पृथ्वीतत्त्व, तेथून निघणारी रेषा हे वायू तत्व ,वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी .आणि त्यावरील टिंब हे चैतन्य.  आणि हे  सगळं सगळं ज्याच्या मध्ये सामावलं आहे ते आकाश तत्व. .अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा वस्तूचा सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणू केंद्रकात प्रोटॉन भोवती न्यूट्रॉन फिरत असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यापर्यंत गणना करून देतो ती शक्ती म्हणजेच गणेश .कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू, आणि विलय करणारा तो महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश आपण तरी काय करतो? पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने कौतुकाने त्याची पूजा करतो. उत्सव करतो आणि विसर्जन म्हणजे पृथ्वी तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे पर्वत बेटे यांची  उत्पत्ती होते. स्थैर्य येते आणि आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! आणि या या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश. या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. हे गूढ आहे.  उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय विज्ञानमय असा गणेश च असतो. गणेश उत्सव सुरू झाला आहे.. सर्व शक्तीच्या प्रतीकांची पार्थिव गणेशाची पूजा करीत असताना निसर्गाचा समतोल राखून त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares