श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

सत्य-संकल्पाचा दातारु | बापरखुमादेवीवरु ||” – भाग-१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

वारीत माझी एका तरुणाची भेट झाली. वारीच्या वाटेवर तो भाविकांना गंध बुक्का लावण्याची सेवा करतो. अगदी दरवर्षी नियमितपणे वारी करतो. जागा मिळेल तिथं पथारी पसरुन झोपतो, मिळेल तिथं आंघोळ करतो, जिथं मिळेल तिथं जेवतो. महिनाभर गंधसेवा करतो. पैसे ऐच्छिक असतात.

“माऊली, बाकी वर्षभर पोटापाण्यासाठी काय करता? ” मी विचारलं. “मी लाकडाच्या गोडाऊन मध्ये कामाला हाये. सात हजार पगारावर.. ” त्यानं ठसक्यात सांगितलं.

“सात हजारात महिना? माऊली, आता गॅस सिलेंडरच हजाराच्या घरात गेला की. एवढ्या महागाईत घर कसं चालायचं? ” 

“गॅस लागतच नई. लाकडाचं सरपण मिळतंय मला. कांडी कोळसा आणला की झालं. “

“पण बाकी खर्च असतोच ना. ” 

“बायको यार्डात धान्य निवडायला जाती. तिला अर्धी हजेरी २०० रुपये अन् पूर्ण हजेरी ३०० रुपये पडती. तिचे पैशे येतातच ना. तेवढ्यात भागतंय आपलं. ” तो एकदम आनंदात सांगत होता.

“मग हे गंध बुक्क्याचं काम करुन किती पैसे मिळतात? ” मी उत्सुकतेनं विचारलं.

” माऊली कधी कुणाला कमी पडू देत नाहीत. रोजचा तीनशे चा नेम आहे माझा. ” 

” तीनशेचा नेम म्हणजे? माझ्यासाठी हा प्रकारच नवीन होता. ” 

” वारीला प्रस्थानाच्या आधी माउलींना भेटतो, दर्शन घेतो आणि नेम धरतो. तीनशेचा नेम म्हणजे रोज तीनशे जणांना गंध लावायचं. त्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही. पैशे किती मिळतात ते बघायचं नाही. ” 

“मग मिळतात का पैसे? “

” हो तर. निदान रुपया तरी देतातच लोकं. कुणी रुपया देतात, कुणी दोन रुपये, कुणी पाच रुपये, कुणी दहा रुपये पण देतात. माऊली तळावर समाज आरती असती. तिथं आरतीला उभा राहतो. नंतरच दिवस मोजतो. रात्री जिथं कुठं प्रसाद सुरु असेल तिथं घेतो. जागा मिळेल तिथं बसून दुसऱ्या दिवशी साठी गंध भिजवतो अन् मग झोपतो. “

” चांगलंय की मग तुमचं. ” मी सहज बोलून गेलो.

” हो तर. पण कधी कधी परीक्षा बघतात देव. आज परीक्षाच होती. एक तास झाला, गंध लावून घ्यायला कुणी तयारच होईना. तीनशेला एकच कमी होता. पण इतकी लोकं असूनसुद्धा मला तासभर कुणी मिळालं नाही. शेवटी तुम्ही सापडलात. माझा नेम पुरा झाला. ” त्याला आनंद झाला होता.

” पण एखाद्या दिवशी समजा नाहीच तीनशे पूर्ण झाले तर काय बिघडणार आहे? आता आज एकच राहिला होता ना? तो उद्या मिळाला असता. देव काय शिक्षा करणार आहे का? ” मी म्हटलं.

“अहंकाराचा वारा न लागो राजसा” असं संतवचन आहे ना, ते “उफराट्या नवमतवादाचा वारा न लागो राजसा” असं म्हणायला पाहिजे. ज्यातलं आपल्याला काही ढेकळं कळत नसतं, त्यातही स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी “ह्याला काय होतंय? “, “देव काय स्वतः असं सांगतो का? “, “हेच कर्मकांड आहे” असला अर्धवटपणा अनेक लोक करत असतात. स्वतःला काही कळत नसतं, समजून घ्यायचं नसतं, करायचं तर त्याहून नसतं. पण करणाऱ्याच्या डोक्यात हळूच पिल्लू सोडण्यात मात्र ही माणसं तरबेज असतात. एखाद्याच्या श्रद्धेवर आपल्या मनोरंजनासाठी शंका घेणं हा एक मोठा अपराध. आपणही कधी कधी आपल्याही नकळत यांच्या पंगतीला जाऊन बसतो. मोठी चूक होते. मी म्हटलं खरं, पण आपण चुकीचं बोललो आहोत हे पुढच्याच क्षणी लक्षात आलं.

“एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, असंच असायला पाहिजे. तीनशे जणांना गंध लावायला देवानं मला सांगितलं होतं का? मीच देवांना तसं सांगितलं. आपला शब्द आपण पाळायला पाहिजे. ” तो सहजपणे म्हणाला. दिलेल्या शब्दाची पूर्ण जबाबदारी घेण्याची आणि तो शब्द पाळण्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची त्याची तयारी होती.

केवळ पैसे कमावण्यापुरतीच बाब असती तर तो वारीत दुसरं काहीही विकू शकला असता. वारीत गंध- बुक्का लावणारे जसे असतात तसेच, चहा विकणारे असतात, ऊसाचा रस विकणारे असतात, चपला विकणारे असतात, कपडे विकणारे असतात आणि अगदी तंबाखू चुना विकणारेही असतात. पण यापेक्षा गंध बुक्का लावण्याचं काम करणं त्याला योग्य वाटलं.

“मी वारीत गंध बुक्का लावतो म्हणजे देवाचं काम करतो, धर्माचं काम करतो” अशी त्याची श्रद्धा. स्वतःच्या कृतीमधून, कर्मामधून प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधणारा तो तरुण मला फार श्रेष्ठ वाटला. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यानं माऊलींची वारी सोडली नाही अन् माऊलींनीही त्याला सोडलं नाही. त्याचा नेम रोज पूर्ण करुन घेतला..!

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्याचे प्रश्न वेगळे असतात. अडचणी असतात. विवंचना असतात. लाखो माणसं अशी आहेत, ज्यांच्या खिशात पैसे नाहीत. कित्येकजण रोजंदारीवर, मजुरीवर काम करतात. त्यांना रोज काम करुन घर चालवावं लागतं. पण तरीही तो वारीला पर्याय शोधत नाही. काहीही झालं तरी तो वारी करतोच. पंचवीस दिवस वारीत चालायचं अन् रोज नेमानं तीनशे जणांना गंध लावायचं. म्हणजे जवळपास साडे सात हजार लोकांना गंध लावायचं. सोपं नाहीय हे सगळं..!

– क्रमशः भाग पहिला 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted