सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
इंद्रधनुष्य
☆ नीरजा भनोत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
आज आपल्यापैकी खुप जणांना नीरजा भनोत कोण हेही माहीत नसेल .
नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची
‘अशोक चक्र‘ हे वीरता पदक मिळवणारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगनेला विसरून गेले .
नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये “सीनियर पर्सर” म्हणून काम करणारी मुलगी.
5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात 400 प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.
विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते.
नीरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले.
नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले .. त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रके प्रवाश्यांपर्यंत पोहोचविली. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती .. तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. 17 तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला.
नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला ‘ माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.’
भारताने नीरजाला “अशोक चक्र” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.
पाकिस्तानने तिला “तमगा-ए-इन्सानियत” हा सर्वोच्च पुरस्कार दिला.
अमेरिकेने “जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम” अवार्ड हा वीरता पुरस्कार देवून नीरजाला सन्मानित केले.
माहिती संकलक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






