श्री संदीप काळे
इंद्रधनुष्य
☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆
ऑगस्टमध्ये अमळनेर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘केडर कॅम्प’ आयोजित केला आहे. त्या ‘केडर कॅम्प’च्या अनुषंगाने माझी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या काही पदाधिकाऱ्यांसोबत ‘प्रेस क्लब’मध्ये बैठक आयोजित केली होती. बैठक संपली आणि मी ‘प्रेस क्लब’च्या बाहेर गाडीची वाट बघत थांबलो होतो.
थोड्या वेळाने मी बाजूच्या रस्त्यावर पाहिले, तर आझाद मैदानावर जी आंदोलन होतात, त्या आझाद मैदानाच्या गेटच्या अलीकडे एक माणूस आणि त्याच्या समवेत काही जण अगदी रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यांच्यात मोठ्याने संवाद चालू होता. पहिल्यांदा मला वाटलं की, त्या माणसाचा अपघात झालाय, त्याला काहीतरी लागलंय म्हणून, तिथे चार माणसं जमली आहेत.
मी थोडा पुढे गेलो, तेव्हा तिथे एका माणसाच्या पायावर असणाऱ्या जखमांवर शांतपणे पाणी टाकणारी माणसं मी पाहात होतो. आझाद मैदानातून बाहेर येणारी अनेक माणसं, त्या पायाला जखमा असणाऱ्या माणसाला नमस्कार करत होते. तो माणूस उठायचा, थोडा चालायचा आणि पुन्हा पायाची खूप आग होते म्हणत जागेवर बसायचा. पुन्हा ती माणसं, त्या माणसाच्या पायावर पाणी टाकायची.
तो माणूस सोबतच्या माणसांना म्हणत होता, “पायाची भयंकर आग उठली हो, दहा-पंधरा मिनिटे काही कळालं नाही, आता थोडसं मन स्थिरावले, तर पायाकडे लक्ष जाते”.
तो पायाला जखमा असलेला माणूस आणि त्याच्या सोबत असणारी माणसं, एकमेकाला बोलत होती, आणि ते मी ऐकत होतो. महाराष्ट्राला उगाच फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत नाहीत, तर इथं काम करणारी अनेक साधीसुधी माणसंसुद्धा, त्याच फुले- शाहू- आंबेडकरांचा वारसा पुढे चालवताना दिसतात. तो पायाला, जखमा झालेला माणूस, त्याच फुले, शाहू, आंबेडकरांचा वंशज आहे, ज्यातून त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. तो जखमा असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असणारी माणसं कोण आहेत? तिथं ते का बसलेत. येणारी – जाणारी माणसं त्यांना नमस्कार का करतात, इथपासून ते ‘त्या’ पायाला जखमा असणाऱ्या माणसाचा सगळा प्रवास, मी रस्त्यावरच अनुभवत होतो.
हा आपला सारा अस्वस्थ समाज, या समाजाला जागे करायचे, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणारे अनेक ‘नायक’ म्हणून या महाराष्ट्राची खास वैशिष्ट्ये आहेत. तसे ‘ते’ पायाला जखमा असलेले व्यक्ती होते. “कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही”, या भूमिकेच्या पलीकडे जाऊन काम करणारी ही माणसं खऱ्या अर्थाने त्या ‘अस्वस्थ समाजाचे नायक आहेत’.
या जखमा असणाऱ्या व्यक्तीची कहाणीसुद्धा तशीच आहे, अगदी अस्वस्थ करणारी. ‘त्या’ पायाला जखमा असणाऱ्या माणसाच्या जखमा ह्या केवळ त्याच्या पायाच्या जखमा नव्हत्या, तर राज्यात अस्वस्थता पेरणारी समाजव्यवस्था होती, त्याचे चित्र स्पष्ट करणारे बोलके स्वरूप होते.
ज्या जखमा असणाऱ्या व्यक्तीशी मी बोलत होतो, त्यांचं नाव खंडेराव शिवाजीराव जगदाळे
(9673551793) गाव शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.
जगदाळे मास्तर पेशाने शिक्षक. सुरुवातीला ‘ते’ नोकरी करीत असलेल्या त्यांच्या शाळेवर पगार नव्हता, म्हणून त्यांनी आंदोलनाचा नारा दिला होता. त्यातून त्यांना मिळालेल्या दुसऱ्या शिक्षकांचा प्रतिसाद, मग तिसऱ्याचा प्रतिसाद, असं करत करत जगदाळे मास्तरांनी हजारो शिक्षकांना घेऊन संपूर्ण राज्यात संघटना बांधली. त्या बांधणीमधून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेचा जन्म झाला. शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेने जोरात काम उभे केले, ज्याला प्रचंड यश मिळाले.
राज्यात अनुदानाचा ‘टेकू’ घेऊन एक-दोन नव्हे, तर तब्बल ६५०० शाळा आहेत. तिथे काम करणाऱ्या ६२ हजार शिक्षकांना शासनाचे अनुदान कसे मिळेल, त्यांची चूल कशी पेटेल, याची पूर्ण जबादारी या संघटनेने घेतली.
शासनाचे निकष आणि नियमावली ही अनुदानासाठी ठरलेली आहे, पण ते वेळेत कधीच होत नाही. त्यातून शैक्षणिक अस्वस्थता टोकाला गेली आहे. या ६५ हजारांपैकी काहींना २० टक्के, काहींना ४० टक्के, तर काहींना ६० टक्के असा पगार मिळतो. पण ज्यांना वीस वीस वर्ष नोकरी करूनही, काहीच पगार मिळत नाही, अशा शिक्षकांची संख्या या महाराष्ट्रात २३ हजारांपेक्षा जास्त आहे. मग काय? तर आंदोलन करा. लढा उभारा आणि न्याय पदरात पाडून घ्या. यासाठी जगदाळे मास्तरांनी जिवाचं रान केलं. प्रत्येक पीडित माणसामधला शिक्षक जिवंत राहावा, यासाठी पुढाकार घेतला.
गेल्या पंधरा दिवसांपासून जगदाळे मास्तर अनेक पीडित शिक्षकांना घेऊन, ‘महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान संघटनेच्या झेंड्याखाली आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले होते. या संघटनेच्या हाकेला ‘ओ’ देऊन अनेक संघटना एकत्रित आल्या. त्यांनी सर्वांच्या वतीने लढा दिला. आजच या लढ्याला यश मिळाले. या लढ्याने राज्यातल्या ५० हजाराहून अधिक शिक्षकांना थोड्या प्रमाणात का होईना फायदा झाला. त्यांना न्याय मिळाला आणि जगदाळे मास्तरांचे उपोषण, आंदोलन सुटलं. लढ्याचा तंबू आवरून जगदाळे मास्तर दुसऱ्या आदोलनच्या दिशेने निघाले होते. जगदाळे मास्तरांच्या सोबत असलेल्या शिक्षकांशी माझं बोलणं सुरू होतं. ते मला सारे काही सांगत होते.
मी जगदाळे मास्तरांना विनंती केल्यावर काहीतरी पाहुणचार घेण्याच्या उद्देशाने आम्ही ‘प्रेस क्लब’च्या दिशेने निघालो. आम्ही रस्त्याने जात असताना मागून एका महिलेने आवाज दिला. ‘ती’ महिला म्हणाली, ‘सर, पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून हातभार लावला, म्हणून मुलीचा संसार लागला. तुम्ही लग्नाला नक्की या’.
जगदाळे मास्तरांनी हात जोडत, ‘त्या’ महिलेला मी नक्की येतो, असा निरोप दिला. माझ्याकडे पाहात ‘त्या’ महिलेकडे बोट दाखवत, जगदाळे मास्तर म्हणाले, “संदीपराव, ही ताराबाई जाधव. ह्या सांगलीच्या आहेत. संगमेश्वर जाधव या शिक्षकाच्या ‘त्या’ पत्नी आहेत. संगमेश्वर यांनी सतरा वर्ष पगार मिळेल, याची वाट पाहिली. संगमेश्वर दिवसभर शाळा करायचे आणि रात्री शेतीचे काम करायचे. सतरा वर्षांनी बिचाऱ्या संगमेश्वरचा संयम सुटला. संगमेश्वरने कमरेला दगड बांधून विहिरीत उडी मारली. काहीतरी मावेजा मिळावा यासाठी ‘ही’ महिलाही आमच्या समवेत अनेक वर्ष आंदोलनात आहे. आम्ही सर्वांनी ताईला मदत व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. मुलांचे शिक्षण झाले. आता लग्न होत आहे. अजून या महिलेला न्याय मिळाला नाही.
मी ‘त्या’ ताराबाईंशी बोलत होतो. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ताराबाई मला म्हणाल्या, “दादा घरातला कर्ता माणूस गेला आणि उमेदीचे दिवस संपले की, आयुष्यात शिल्लक काही उरत नाही. त्रासातून सुटण्यासाठी पुरुष मरतात. महिलांचं तसं नसतं. त्यांना सगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. जगदाळे सरांसारखे पाठीराखे भाऊ माझ्या मागे नसते तर, मीही माझ्या आयुष्याला आत्महत्येची दोरी लावली असती. माझे पती गेले त्यांच्या पाठोपाठ, ‘त्यांचे’ आई-वडील गेले, नंतर माझे आईवडील गेले. पाहता पाहता आयुष्यातला सगळाच आधार मावळला”.
उपासपोटी, ज्ञान देणारे शिक्षक, त्यांच्या कार्याला किती न्याय देत असतील, हे त्यांचे त्यांनाच माहिती! या शिक्षकाला शिक्षणाला न्याय देत असताना, त्या शिक्षकाला एकीकडे समोर बसलेली उद्याची पिढी दिसत असेल, आणि दुसरीकडे त्यांच्या घरी त्यांचे उपाशी असलेली मुलंबाळं दिसत असतील. सारे काही धक्कादायक होते.
मी एकदम भानावर आलो. ताराबाईंच्या संवादातून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ताराबाईंच्या पतीची आई, ताराबाईची आई यांच्यामध्ये होणारा संवाद सांगून ताराबाई अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. अत्यंत भावनिक असणारे जगदाळे मास्तर, त्या बाईला शांत करण्याऐवजी स्वतःचे अश्रू खिशातल्या रुमालाने पुसत होते.
ताराबाई स्वतः सावरल्या आणि म्हणाल्या, “सर मी निघते. गाडीची वेळ झाली. सोबत आणखीन महिला आहेत”. जगदाळे मास्तरांनी ‘त्या’ महिलेकडे पाहायची हिंमतही केली नाही. तिला नमस्कार करत, ते शांतपणे जागेवर उभे राहिले.
ताराबाईंसारख्या एक दोन नाही तर, महाराष्ट्रात एकशे सत्तर महिला आहेत, ज्यांच्या पतीने पगार मिळत नाही म्हणून, आत्महत्या केली. त्यांच्यानंतर त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे आई-वडील या सगळ्यांचा मुख्य आधार गेला. कुणाचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. कुणाचा शिक्षण संस्थांवर विश्वास राहिला नाही. सरकारवर तर नाहीच नाही. थोडा वेळ ‘ती’ महिला आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि पुन्हा माझी रेल्वे आहे म्हणून परतीच्या प्रवासाला निघाली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈







