श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(ताराबाईंसारख्या एक दोन नाही तर, महाराष्ट्रात एकशे सत्तर महिला आहेत, ज्यांच्या पतीने पगार मिळत नाही म्हणून, आत्महत्या केली. त्यांच्यानंतर त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे आई-वडील या सगळ्यांचा मुख्य आधार गेला. कुणाचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. कुणाचा शिक्षण संस्थांवर विश्वास राहिला नाही. सरकारवर तर नाहीच नाही. थोडा वेळ ‘ती’ महिला आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि पुन्हा माझी रेल्वे आहे म्हणून परतीच्या प्रवासाला निघाली. ) – इथून पुढे —– 

आम्ही रस्त्याने चालत होतो. मी जगदाळे मास्तर यांना विचारले, “जखमा का झाल्या तुमच्या पायाला?  चप्पल का घालत नाहीत?  काही त्रास आहे का? ”

त्यावर जगदाळे मास्तर काहीच बोलले नव्हते. जगदाळे मास्तरांसोबत असलेले शिक्षक म्हणाले, “गुरुजींनी एक ‘पण’ केला आहे”.

मी म्हणालो “काय? “

त्यावर तो शिक्षक म्हणाला, “जोपर्यंत राज्यातल्या प्रत्येक शिक्षकाला पूर्ण पगार मिळणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असे त्यांनी ठरवले आहे”. सतत प्रवास, आंदोलने, उपोषण यातून पायाला दम नाही. ‘तो’ शिक्षक आणि मी बोलताना जगदाळे मास्तर म्हणाले, “माझे कौतुक सोडा, तुमचे सांगा”.

जगदाळे मास्तर यांच्या बोलण्यानंतर ‘ते’ शिक्षक काहीच बोलले नाहीत. ते गप्प गप्प होते. मग जगदाळे मास्तरनीच ‘त्या’ शिक्षकांचा इतिहास सांगितला. ‘ते’ शिक्षक सिद्धार्थ गायकवाड सोलापूरचे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते एका शाळेवर काम करतात, पण त्यांची चूल पेटत नाही, म्हणून ते शाळेचे काम झाल्यावर एका शेतामध्ये म्हशींचा गोठा सांभाळण्याचे काम करतात. जगदाळे मास्तरसोबत असलेले दुसरे शिक्षक संतोष पवार हे उस्मानाबादचे आहेत. ‘ते’ शाळा झाल्यावर रात्री एका लाकडाच्या घाण्यावर काम करतात. त्यांना बारा वर्षांपासून पगार नाही. जगदाळे मास्तर त्या दोघांची आणि त्यांच्यासारख्या हजारो शिक्षकांची व्यथा मला सांगत होते.

आम्ही चालत चालत ‘प्रेस क्लब’ला पोहोचलो. बऱ्याच वेळापासून जगदाळे मास्तर यांचा फोन वाजत होता. त्यांनी तो फोन घेतला आणि तिकडून येणाऱ्या महिलेचा शांत आवाज आम्ही ऐकत होतो. ती महिला तिकडून बोलत होती, “काहीतरी खाऊन घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका”. तो फोन चालू असताना मी जगदाळे मास्तरांना म्हणालो, “कुणाचा फोन आहे?  आईचा आहे का? “

जगदाळे मास्तर म्हणाले, “नाही माझ्या पत्नीचा आहे”.

मी म्हणालो, “मी बोलू शकतो का? ‘ 

जगदाळे मास्तरांनी माझी ओळख त्यांच्या पत्नीला करून देत लगेच माझ्याकडे फोन दिला. आमचा नमस्कार झाल्यावर तिकडनं जगदाळे मास्तरच्या पत्नी मला म्हणाल्या, “सर तब्येतीची काळजी घेत नाहीत, म्हणून वारंवार फोन करावा लागतो”.

बोलताना जगदाळे वहिनींनी घरची सगळी माहिती माझ्यासमोर ठेवली. जगदाळे मास्तरांना मानसी आणि दुर्गा नावाच्या दोन कन्या आहेत. मानसी सध्या एम. एस. सी. नंतर बी. एड करते आहे आणि दुर्गा दहावीला आहे. आई शकुंतला आणि वडील शिवाजीराव हे दोघेही आता हयात नाहीत. त्यांनी हाती घेतलेलं काम हे फार मोठं आहे. आम्ही परिवार म्हणून त्यांच्या पाठीमागे आहोत. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, की त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे’. असं म्हणून जगदाळे वहिनींनी फोन ठेवला.

आमच्या गप्पा रंगल्या. ‘प्रेस क्लब’मध्ये आम्ही चहानंतर जेवण घेतले. जेवताना जगदाळे मास्तर म्हणत होते, “आज माझे पन्नास हजार शिक्षक आनंदाने जेवणार आहेत. गेले पंधरा दिवस आम्ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलो होतो. सरकारला आमचं म्हणणं पटलं आणि आज पन्नास हजार शिक्षकांना न्याय मिळाला. “

मग काय, शिक्षक, समाज, शिक्षणव्यवस्था, राजकारण या सर्व विषयांवर जगदाळे मास्तर माझ्याशी बोलत होते. आम्ही बोलत असताना विजय तळपे नावाचे एक शिक्षक जगदाळे मास्तर यांना भेटायला आले. त्यांची ओळख करून देताना जगदाळे मास्तर म्हणाले, “हे विजय आहेत. विजयची तीन लग्नं मोडलीत. बायका निघून गेल्या. आता वय वर्ष ४६ आहे. या वयात यांना बायको कोण देणार?  प्रत्येक वेळेला जेव्हा लग्नाचा विषय निघतो, तेव्हा पोरीचा बाप मला फोन करतो आणि विचारतो, “सर मी माझी मुलगी देतो, पण मागची मुलगी विजयला पगार नाही म्हणून निघून गेली. विजयला पगार सुरू होणार आहे ना सर? ”

“मी अगदी आत्मविश्वासाने म्हणतो, हो मग, होईल ना?  तुम्ही काही काळजी करू नका”. असे अनेक विजय प्रत्येक गावात आहेत. माझी भाबडी आशा असते, की वीस टक्के होईल. चाळीस टक्के होईल. काहीतरी होईल आणि माणसं उभे राहतील. माणसं खचून जाणार नाहीत, असे वाटते. पण अनेक वेळा शासन पदरी निराशाच टाकते.

मी म्हणालो, “इतके सगळे शिक्षक आमदार आहेत. इतकं मोठं राजकीय पाठबळ आहे त्याचं काय करायचं? “

त्यावर जगदाळे मास्तर म्हणाले, “हे सगळे शिक्षक आमदार भाषणापुरते आहेत. आश्वासनाच्या खैरातीवर आपली पोळी भाजून घ्यायची आणि पुढे जे गरजवंत आहेत त्यांना टाटा बाय-बाय करत आपण मस्त जगायचं. याच्या पलीकडे या आमदारांचे काहीच काम नाही. बरं, बिचारे सगळे ‘हो हो’ म्हणतात, पण करत काहीच नाहीत. काही मिळाल्यावर मात्र श्रेय घेण्यासाठी यांच्या उड्या पडलेल्या असतात. सतरा-सतरा वर्ष फुकट नोकरी करायची आणि पुढे पैसे मिळाले तर त्याचं काय करायचं?  कारण पूर्ण आयुष्य संपलेलं असतं. अशी अवस्था सगळीकडे आहे. ” 

जगदाळे मास्तरांचा प्रत्येक प्रश्न काळजाला भाजून शिवून काढणारा होता. “शासनाच्या सगळ्या निकषांत बसत असूनही शासनअनुदान पदरात टाकायला का वेळ लावते?  या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही. अनुदानित शाळांवर दरवर्षी पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च होतात. आणि इथं विनाअनुदानितसाठी अकराशे कोटी द्यायला सरकार मागे पुढे पाहते. मी चप्पल घालावी असं प्रत्येक राजकारण्याला वाटतं. पण मी, ज्या प्रश्नासाठी लढतो, त्याला वाचा फोडण्यासाठी कोणताही राजकारणी पुढाकार घेत नाही. असे का?  आम्ही अर्धी लढाई जिंकली आणि अर्धी लढाई अजून बाकी आहे. एक ना एक दिवस आम्ही ही लढाई जिंकूच! त्या दिवशीच चप्पल घालीन. ” जगदाळे मास्तर बोलत होते आणि मी नुसता ऐकत होतो.

‘प्रेस क्लब’मध्ये जगदाळे मास्तर यांच्या सोबत दोन तास कसे गेले, हे कळालेच नाही. जगदाळे मास्तरांनी घड्याळीकडे पाहिलं आणि म्हणाले, “माझी गाडी आहे आता. मला निघावे लागेल. उद्या परत सांगलीमध्ये बैठक आहे”. असे म्हणून नमस्कार करत जगदाळे मास्तर त्यांच्या वाटेला लागले. एकटाच माणूस, त्या रस्त्याने एकामागे एक पाऊल टाकत निघाला होता. त्याच्या प्रत्येक पावलामागे रक्ताचा थेंब पडून त्याचा ठसा उमटत होता. ‘तो’ रक्ताचा प्रत्येक ठसा ‘त्या’ अस्वस्थ करणाऱ्या समाजाला त्रासून सोडणाऱ्या यंत्रणेला ओरडून सांगत होता, ‘तुम्ही कितीही रस्ते बदला, तुम्ही कितीही त्रास द्या, तुम्ही कितीही अत्याचार करा, मी आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे. आता मी माघार घेणार नाही’.

या अस्वस्थ समाजाला जागे करणारा हा नायक कशाचीही तमा बाळगणार नव्हता. अहंकार, स्वार्थीपणा किंवा कुठल्याही पदाचा हव्यास असता, तर जगदाळे मास्तर कधीही ‘अस्वस्थ समाजाचा नायक’ होऊ शकले नसते. तुमच्या अवतीभवती असे जगदाळे मास्तर अनेक असतील. त्यांना नक्कीच तुम्ही आधार द्या. त्यांच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि ‘तो’ आपला लढा आहे, असं समजून पुढे या?  येणार ना?  

समाप्त –  

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted