सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ कात्यायनी – लेख क्र. ७ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
आश्रम हरणांशी खेळता खेळता मैत्रेयी माझ्याजवळच पहुडली. तिचा विपुल केश संभार माझ्या वल्कलांवर पडला होता. तिचा तो शांत आनंदी चेहरा पाहून थोडा मत्सर जागा झालाच. असं वाटलं की एवढं या चेहऱ्यात काय आहे की तिच्याकडे पाहिलं की ऋषीवर्यांचे डोळे चमकायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज पसरते. एक प्रसन्नता अलगद येते. असं वाटतं की, त्यांच्या डोळ्यातून तृप्तीचा पाझर उतरतो आहे व त्यांना चिंब भिजवतो आहे. खरं म्हणजे त्यांच्या माझ्याशी वागण्यात मैत्रेयीच्या येण्यानं काहीच फरक पडला नव्हता. मैत्रेयी होतीच तितकी लाघवी की त्यांनाच काय मला सुद्धा तिचा लोभ जडला होता. कधीतरी पण, आपल्यात काहीतरी न्यून आहे. ती नाथांना जे देते ते आपल्याला देता येत नाही, याची खंत वाटून अस्वस्थ व्हायला होतं.
आठवते ती विवाहापूर्वीची मैत्रेयी! राजप्रधान मित्रा यांची कन्या! तत्त्वज्ञानी, ब्रह्म वादिनी, जनकाच्या दरबारात सीतेसह येत होती. याज्ञवल्क्यांबरोबर वाद विवादात तिने भाग घेतला. नाथांची बुद्धिमत्ता पाहून भाळली. इतकी ऐश्वर्यवान हसते, तिचं व्यक्तिमत्त्वच इतकं भरजरी आहे नां! सगळं ऐहिक सुख मागे ठेवून ही आश्रमात आली कशी? नुसती आली नाही रमली सुद्धा! ते गोधन, ती वल्कलं, सडा सारवण! हिला कधी माहेरची आठवण येत नसेल? मेखला, वाकी, पैंजण, बिंदी, कंबरपट्टा कशी नखशिखांत सजलेली असायची. कधी जाऊन नटावं वाटलं नसेल? म्हणायची, ” नाही गं! त्या साजाचा मला कधीच मोह वाटला नाही. पण ते दिवस खरच सुंदर होते. कला विलासाबरोबर राजर्षी जनकाने दिलेला ज्ञानाचा वसा फार मोहक होता. त्याचं खूप आकर्षण होतं. पण सुदैवानं ती भूक इथेही भागते आहे. अगदी मन भरून जातं. ऐश्वर्याची ही बाजूच मला जास्त भावते. त्यात तुझ्यासारखी सखी मिळाली. हा कवेत घेणारा परिसर मिळाला. माझ्या ज्ञानाच्या कंगोऱ्यांना सुवर्ण मुलामा चढवणारा पती मिळाला. आणखी काय हवं! “
अशी बोलायला लागली नां की मी बघतच राहते तिच्याकडे! खरं म्हणजे मी तर भारद्वाज ऋषींची कन्या! आश्रमातच लहानाची मोठी झाले. तरीही ते नागरजीवन, नृत्य गायनात मग्न असणारे, अजूनही आठवतं. त्या घराचा सुगंध मनाला तिथे ओढून नेतो. तुझ्यासारखी जर राजवैभवात वाढले असते तर सारखं माहेरी जाण्याचा हट्ट केला असता. पण मला नां, हा संसार, पती, मुलं, त्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, फार आवडतं. म्हणून मी इथे रमले. मैत्रेयी म्हणाली, ” मी तरी कुठे इतकी ऋषीतुल्य आहे. राग, लोभ हे शत्रू अजूनही घेऊन बसली आहे कुशीत! ” मी विचारलं, ” तुला कधी राग येतो गं? ” तर म्हणते कशी, ” तुझा येतो, ऋषीवर्यांचा येतो. पण मी काय करते माहित आहे, त्यांच्या जागी, तुझ्या जागी मला ठेवते. मग आपणच आपल्याला कसं रागवायचं? मग राग जातो पळून! ” आणि असं म्हणून खूप हसायची. मला वाटायचं की यांच्यासोबत पण ही अशीच बडबडत असेल? हसत असेल? मलाच हे वेड्यासारखं वाटतंय. मग त्या ज्ञानी पुरुषाला काय वाटत असेल? पण मग त्यांच्या चेहऱ्यावरचं, तिच्या दर्शनाने उमटणारं स्मित पाहिलं की मला गोंधळायला होतं.
हेच पहा नां! ऋषिवर्यांनी आम्हाला त्यांचा संन्यास घेण्याचा निर्णय सांगितला. त्याला विरोध करण्याची माझी कुवतच नाही. त्यामुळे नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण जेव्हा ते माझं सगळं ऐश्वर्य तुम्हाला देऊन जातो असं म्हणाले, तेव्हा मी बर म्हटलं. तेवढंच बरं वाटलं. यांनी माझ्या भविष्याची काळजी घेतली. पण मैत्रेयी यांना म्हणते कशी, ” हे ऐश्वर्य घेतल्याने मी सुखी होईन का? अमर होईन कां? मग मी हे ऐश्वर्य घेऊन काय करू? मला अमर होण्याचा मार्ग सांगा. ” आणि त्यांच्याकडून ज्ञानाचा वसा घेऊन आत्मशोध घेण्यासाठी सगळे पाश तोडून सहज निघून गेली.
त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात मैत्रेयी आहे. पण ही साधीसुधी प्रपंचात रमणारी, छोट्याशा सुखानंही तृप्त होणारी, कात्यायनी, कुणालाच माहिती नाही. यांचा प्रत्येक शब्द झेलणारी, कधीच उलट प्रश्न न करणारी!
त्यामुळेच संसार करूनही ते परमार्थाची उग्र तपश्चर्या करत होते. विषयोपभोगाची सीमा कोठे संपते, याची त्यांना कल्पना होती. ते संसाराला विटले नव्हते. आमच्या संसाराला आनंदाची, संतोषाची झालर होती. तृप्तीची किनार होती. त्यांना ज्ञान वाटण्यासाठी दूर दूर फिरायचं होतं. इतक्या तृप्तींनं गृहस्थाश्रम उपभोगून संन्यासाश्रम स्विकारणारे ते पहिले ऋषी आहेत. मलाही इतक्या तपस्वी, ब्रह्मज्ञानी पतीचा सहवास मिळाला. माझे जीवन धन्य झाले. एकच इच्छा होती, अशीच शेवटपर्यंत त्यांची साथ लाभावी आणि त्यांच्या सानिध्यात हे डोळे मिटावेत. ती मात्र अपूर्ण राहिली..! !
(ही कात्यायनी, भारद्वाज ऋषींची तनया! तशीच कात्यायन ऋषींची मुलगी पण कात्यायनी, ही दुर्गेचे रुप आहे. नवरात्रीच्या नऊ देवींपैकी एक!)
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





