श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः
अर्थ : पराशर ऋषीचे पुत्र श्रीव्यास महर्षी यांच्या मताप्रमाणे भगवंताची विविध प्रकारे पूजा करणे म्हणजे भक्ति होय.
विवेचन : श्रीनारदमहर्षी प्रथम पराशरसुत व्यासमहर्षींनी प्रतिपादित केलेली भक्तिची लक्षणे सांगत आहेत. त्यांचे एक नाव कृष्ण द्वैपायन असेही आहे. अर्थात ते साक्षात नारायणाचा अवतार आहेत असे मानले जाते. महाभारतात एक श्लोक आहे.
“कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धि नारायणं प्रभुम्।
को ह्यन्यः पुरुषव्याघ्र महाभारतकृद् भवेत्॥”
श्रीनारदमहर्षीनीच व्यासांना भागवताचा उपदेश केला होता, हे प्रथम सांगितलेच आहे. तोच भागवताचा उपदेश व्यासानी आपला ज्ञानी पुत्र जो शुक त्याला केला. महर्षी नारद हे वेदव्यासांचे गुरू मानले जातात. नारदांनी व्यासांना भक्तिमार्गाचा उपदेश केल्याचे सांगितले जाते, अर्थात एका दृष्टीने वेदव्यास हे नारदाचे शिष्य होत. आपल्या शिष्याचे मत आपल्या ग्रंथाच्या अग्रस्थानी ठेवण्याची उदात्तता आपल्या संस्कृतीत होती हे यावरून सिद्ध होताना दिसते. वेदव्यासांच्या श्रेष्ठत्वाची नारदांना पूर्ण कल्पना होती हेच याचे कारण असावे.
भक्तीमध्ये भज्य, भजक व भजन (सेवा) अशी त्रिपुटी मानली जाते. भक्ती करणारा भक्त आपल्या भावनेप्रमाणे भज्य, सेव्य जो असेल त्याच्या अधिकाधिक सेवेचा लाभ कसा मिळेल हे पाहून सेवेची अर्थात पूजेची पद्धती स्वीकारीत असतो. या दृष्टीने व्यासांना सेवेमध्ये पूजापद्धती श्रेष्ठ वाटली. कारण त्या सेवेत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मनबुद्धि, चित्तप्राणादि सर्वांचा समावेश होत असतो. अशी भक्ति करताना सर्वांगाने सेवा घडते. आपल्याकडे प्रामुख्याने षोडशोपचार पूजा आणि पंचोपचार पूजा सांगितली गेली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सोळा उपचार करणे सर्च दृष्ट्या जिकिरीचे ठरत असते, त्यासाठी किमान पंचोपचार पूजा करावी असा दंडक घातला गेला. सोळा उपचार कोणते ते आपण पाहू.
१. आवाहन (देवतेचे आवाहन करणे),
२. पाद्य (अर्थात देवाला पाय धुण्यासाठी पाणी देणे)
३. अर्घ्य (देवाला गंध, फुल, अक्षता मिश्रित पाणी देणे)
४. आसन (देवाला आसन ग्रहण करण्याची विनंती करणे
५. आचमन (देवाला तोंड धुवायला व पिण्यासाठी पाणी देणे)
६. स्नान (देवाला पंचामृत, सुगंधी द्रव्ये, अथवा उष्णोदकाने स्नान घालावे.
७. देवाचे अंग पुसणे, देवाला उपवस्त्र अर्पण करणे.
८. देवाला जानवे समर्पण करणे.
९. चंदन, कस्तुरी इ. सुगंधी द्रव्यांचे विलेपन करणे.
१०. फुले आणि हार समर्पण करणे.
११. धूप दाखवणे.
१२. दीप, निरांजन ओवाळणे.
१३. नैवेद्य दाखवणे.
१४. मंत्रपुष्पांजली म्हणणे.
१५. दक्षिणा देणे.
१६. प्रदक्षिणा घाल.
(टीप : रुढी परंपरे नुसार एखादा उपचार किंवा त्याचा क्रम मागेपुढे होऊ शकतो)
सोळा उपचार करणे शक्य नसल्यास स्नान, गंध, फुल, दीप आणि नैवेद्य इत्यादी किमान पाच उपचार करून पूजा करावी.
सगुण पूजा कशी करावी याचा विचार आपण केला आता मानसपूजा कशी करावी याचा विचार आपण करू.
सगुण पूजेत खास करून मानस पूजेचे महत्व सर्व संतांनी गायिले आहे.
मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. मानसपूजा म्हणजे सूक्ष्म अर्चन, तर प्रत्यक्ष सगुण मूर्तीची केलेली पूजा म्हणजे स्थूल अर्चन होय. आपले आराध्य दैवत किंवा सद्गुरू यांची कल्पनेने, मनाने केलेली पूजा म्हणजे मानसपूजा.
मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. मानसपूजा म्हणजे सूक्ष्म अर्चन, तर प्रत्यक्ष सगुण मूर्तीची केलेली पूजा म्हणजे स्थूल अर्चन होय. आपले आराध्य दैवत किंवा सद्गुरू यांची कल्पनेने, मनाने केलेली पूजा म्हणजे मानसपूजा. त्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये आपल्या आराध्य देवतेची किंवा सद्गुरूंची मूर्ती स्थापन करणे आवश्यक असते; किंबहुना मानसपूजेचे ते साध्य आहे. त्यासाठी उपासना आवश्यक आहे. अंत:करण पवित्र असल्याशिवाय तेथे परमात्मा विराजमान होणार नाही.
आपण इथे अगदी संक्षिप्त रूपात मानसपूजा कशी असते किंवा करतात याचा आढावा इथे घेतला आहे.
सगुण उपासनेत एक गोष्ट खूप महत्वाची आहे असे लज्जा येते. देव प्रसन्न होण्यासाठी कितीही बाह्योपचार केले पण मनीचा भाव जर शुद्ध नसेल, तर त्यापासून लाभ होण्याची शक्यता फारच कमी आहे असे समजावे.
संत ज्ञानेश्वरांनी ताटी लावून घेतली आणि स्वतःला कोंडून घेतले, तेव्हा त्यांनी ताटी उघडावी म्हणून छोट्या मुक्ताईने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यात मुक्ताई म्हणते,
“शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला”
मुक्ताबाई म्हणतात, ज्याच्या मनीचा भाव शुद्ध झाला, तो देवापासून दूर राहूच शकणार नाही, नव्हे देवच त्याच्यापासून दूर राहू शकणार नाही.
एक उदाहरण पाहू. *एक मिठाची बरणी आहे. त्यातील मीठ बाहेर काढले आणि त्यात पाणी ओतले तरी त्याचा खारटपणा जात नाही. त्याच्यात सतत पाणी ओतत राहिले तर पाण्याचा खारटपणा हळूहळू कमी होत जातो आणि कालांतराने त्या बरणीतील पाणी खारट लागत नाही. मनुष्याचे मन असेच वासनांनी लडबडलेले असते. साधना सुरू केली की वासना रुपी खारटपणा हळूहळू कमी होत जातो. असे करता करता मनातील मळ निघून गेला की मनाचा तळ स्वच्छ होतो, अर्थात भाव शुद्ध होतो, मग अंतरात असलेला भगवंत प्रगट होतो*.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. १५
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






